०५/०६/२०२५

Article about increasing number ofaccidents

वाहन नियंत्रणात असावे


    वाहन म्हटले की स्टेअरिंग, इंजिन मधील अनेक चक्रे, गाडीची चाके हे आलेच. चाक म्हणजे चक्र. चक्र हे भगवान विष्णूच्या हाती असणारे आयुध त्यामुळे या चक्राला  आपल्या नियंत्रणात ठेवणे, त्याचा आदर करणे हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे.

आज भारतात चकचकीत रस्त्यांचे जाळे विणल्या गेलेले आहे. कधी नव्हे असे रस्ते भारतात निर्माण झाले आहे. या रस्त्यांसोबतच भारतात प्रचंड खप होतो तो म्हणजे वाहनांचा. निरनिराळ्या कंपन्यांच्या चार चाकी आणि  दुचाकी वाहनांचा मोठा खप भारतात दरवर्षी होत असतो. तसेच नवीन नवीन मॉडेल सुद्धा बाजारात उपलब्ध होत असतात. तरुणांना क्रेझ असते दुचाक्यांची अर्थात बाईकची. नाईट रायडर्स म्हणून एक संकल्पना सुद्धा भारतातील मोठ्या शहरांमध्ये चांगली फोफावली आहे. यामध्ये रात्री रस्ते सुनसान असताना वेगाने बाईक रायडिंग केले जाते. काही तरुण तर दिवस असो अथवा रात्र, गर्दी असो अथवा सुनसान रस्ता त्यांचे वाहन मात्र सुसाटच धावत असते. तरुण म्हटले की जोश उत्साह साहस हे सर्व आलेच परंतु या साहसामुळे, उत्साहामुळे, जोशामुळे इतरांच्या जीवावर संकट येता कामा नये. मी स्वतः अनेक तरुणांना भर रहदारीच्या रस्त्यावरून वेगाने वाहन चालवतांना पाहिले आहे.

     सुटाळा खामगाव, येथील शुभम दुतोंडे हा  रविवार 1 जुन रोजी स्पर्धा परिक्षेसाठी म्हणून  खामगावहून अकोला येथे जाण्यास निघाला. हायवेवर चढतांना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बाईकस्वारांनी शुभमच्या गाडीला जोरात धडक दिली, त्याला अकोला येथील  रुग्णालयात नेण्यात आले, मेंदूला जोरात मार लागला होता, शस्त्रक्रिया झाली, परंतू 4 तारखेला त्याची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. B.tek झालेला शुभम एम.पी.एस.सी ची तयारी करीत होता. खामगांवात अनेकांना परिचित अशा हिंदुस्तान लिव्हर मधील रामेश्वर दुतोंडे यांचा  शुभम हा तरुण मुलगा आज बाईक अपघातामुळे निधन पावला हे सर्वांसाठी मोठे शोकदायक आहे. शुभमसारख्या हुशार, तरुण मुलाचे निधन झाले. समोरून विरुद्ध दिशेने येणा-या दुचाकीस्वारांच्या चुकीमुळे या बाईक अपघातात शुभमचे निधन झाले असे वृत्त आले आहे. यावरून इतर तरुणांनी बोध घ्यावा. तरुणांच्या अकाली निधनाने समाजाची, देशाची न भरून निघणारी हानी होत असते शिवाय परीवारजनांना सुद्धा असा अकाली मृत्यू हा धक्कादायक आणि शोककारक असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा रस्त्यावरती अत्यंत सुंदर "संतुलित वेग सुरक्षित जीवन" , "सडक पे मस्ती जान नही सस्ती" , "नजर  हटी दुर्घटना घटी", अशा पाट्या लिहिल्या असतात. पण अशा पाट्यांकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि चकचकीत रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने हाकली जातात. तसे पाहिले तर नवीन  रस्ते हे दुभाजकांसह आहे परंतु अपघातांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे यावर सर्वांनीच विचार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे

     कोणतेही वाहन म्हटले की त्याला चाक आलेच.  चाक म्हणजे चक्र आणि चक्र हे भगवान विष्णूच्या हाती असणारे आयुध त्यामुळे या चक्राला आपल्या नियंत्रणात ठेवणे, त्याचा आदर करणे हे आपण नेहमीच ध्यानात ठेवले पाहिजे. या लेखाद्वारे सर्व तरुणांना हेच आवाहन करण्यात येते की त्यांनी  वाहन नियंत्रित वेगातच चालवावे. 

1 टिप्पणी:

  1. वाहन चालवतांना वाहनांवर आपला ताबा असला पाहिजे.वाहन हि मशीन आहे जी तुमच्या हातापायाच्या आदेशानुसार संचलन करते.तेंव्हा जेही वाहन आपण रस्त्यावर चालवतो तेंव्हा त्या वाहनाचे संनियंत्रणावर चालकाचा ताबा असावा.

    उत्तर द्याहटवा