२७/११/२०२५

Artical on decide demise of actor and good human being Dharmendra


 तु म्हारो कौण लागे ?


धर्मेंद्रला अनेक लोकांचे प्रेम मिळाले. त्याने सुद्धा लोकांवर भरभरून प्रेम केले. धर्मेंद्रचे समकालीन अभिनेते हे  80-90 च्या दशकात चरित्र भूमिका स्वीकारत होते तेंव्हाही धर्मेंद्र  नायक सहनायकांच्या भूमिकात दिसत होता. 

जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोण सुटलेला आहे ? जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळच असला तरीही जवळचा व्यक्ती न जावा असेच सर्वांना वाटत असते. अगदी असेच धर्मेंद्र या अभिनेत्याचे निधन झाल्यावर त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना वाटले. कुण्या एखाद्याचा मृत्यू झाल्यावर इतर जनांना त्याचे दुःख होत असते परंतु आपणही त्याच मार्गावर आहे याचे मात्र विस्मरण होत असते. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,

अकस्मात तोही पुढं जात आहे |

संतजनांनी जे काही लिहून ठेवलेले आहेत ते सर्व कालातीत आहे परंतु तरीही दुःख हे होतच असते. 

   चित्रपट अभिनेते हे सामान्यजनांपासून खूप लांब असतात. बोटावर मोजता येतील इतक्यांशी त्यांची भेट होते किंवा त्यांना ते दिसत असतात परंतु तरीही पडद्यावरील त्यांच्या भूमिका पाहून आणि त्यांच्या बाबतच्या काही गोष्टी ऐकून लोक त्यांच्या प्रेमात पडत असतात. धर्मेंद्र हा असा एकमेव अभिनेता आहे की ज्याला लोकांचे अफाट प्रेम मिळाले. धर्मेंद्रच्या वागण्या-बोलण्यातून नेहमी तो जमिनीशी जुळलेला आहे इतर लोकांबद्दल त्याला प्रेम आहे , आपुलकी आहे जीवनावर त्याचे प्रेम आहे असे कित्येकदा दिसून आले आहे.

 कोई मुस्कुराता है तो, मै हात बढाता हुं |

कोई हात बढाता है, तो मै सीने से लगा लेता हुं|

कोई सिनेसे लगाता है, तो मै दिल में बिठाता हुं |

या त्याच्या  स्वरचित ओळीतून धर्मेंद्रचे व्यक्तिमत्व आपल्याला कळते. 

     खरे तर या सिने कलाकारांसोबत  आपले काय नाते असते ? त्यांच्या अनेक कृती,  अनेक गैरकायदेशीर बाबी याबाबत पब्लिकला माहिती असते तरीही पब्लिक त्यांना एवढी डोक्यावर का घेते ? हे सर्व प्रश्न हमखास पडतातच. तसाच आमच्या घरी धर्मेंद्र हा प्रत्येकाच्या आवडीचा अभिनेता. आमच्यासह आमच्या मित्र परिवारात सुद्धा धर्मेंद्र हा आवडीचा अभिनेता आहे . असे कोणी का आवडू लागते ? त्याच्यात असे काय असते ? आपल्या अध्यात्मानुसार या जीवनामध्ये आपला ज्या-ज्या लोकांशी संबंध येतो त्या-त्या लोकांशी आपला पूर्व जन्मात सुद्धा संबंध आलेला असतो असे म्हटले जाते.  मग तसे काही असू शकते का ? हे सेलिब्रिटी सुद्धा पूर्व जन्मात आपले परिचित असतील का ? की, ज्यामुळे आपल्याला हे सिनेकलाकार सुद्धा आवडू लागतात. असे सुद्धा नाना प्रश्न पडतात. आमच्या घरी कदाचित माझ्या वडिलांमुळे धर्मेंद्र आम्हा सर्वांना आवडू लागला असावा. ते सुद्धा धर्मेंद्रचे फॅन आहे. त्यांना धर्मेंद्रचे देमार चित्रपट पाहायला आवडते. कुणाच्या दिसण्याच्या बाबतीत किंवा मारामारीच्या बाबतीत त्यांना धर्मेंद्रचे दाखले देतांना आम्ही कित्येकदा ऐकले आहे. "मारधाड से भरपूर" , दुष्टांचे निर्दालन होऊन सज्जनांचा विजय दाखवले जाणारे चित्रपट पाहतांना "असे चित्रपट पाहतांना डोक्याला काही ताण नसतो"  असे ते म्हणतात. तसेच धर्मेंद्रसारखा दिलदारपणा, व्यायामाची आवड, "पैसोसे ज्यादा इंसानियतको, सेहतको अहमियत देना चाहिये" हा समान विचार, सर्वांचे हृदय जिंकून घेण्याची कला,  त्यांच्या हृदयात जागा मिळवण्याची कला, जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन, असे साम्य त्यांच्यात व धर्मेंद्रमध्ये आम्हाला जाणवते. दिसण्यात जरी काही साम्य नसले तरी देहबोली आणि स्वभाव यामध्ये मात्र ते साम्य आम्हाला आजही वाटते. मिशी राखलेला धर्मेंद्र आणि माझे वडील यात तर ते साम्य आम्हाला थोडे अधिक वाटते आणि म्हणून मग धर्मेंद्र हा आमच्या परिवाराचाच आवडता असा कलाकार अभिनेता आणि व्यक्ती झाला. हिंदी सिनेसृष्टीत अनेक लोकप्रिय सिनेकलाकार होऊन गेले व आहे. परंतु जनतेचे अफाट प्रेम मिळालेला असा धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता होता. प्रचंड लोकप्रियतेने जनतेने त्याला खासदार सुद्धा बनवले परंतु साधे सरळ जीवन व्यतीत करण्याची वृत्ती असल्याने राजकारणात त्याचे मन रमले नाही. राजकारणात जसे अटल बिहारी वाजपेयी होते तसा सिनेसृष्टीत धर्मेंद्र होता आणि दोघांमध्ये आणखी एक साम्य होते ते म्हणजे दोघेही कवी मनाचे होते. अटलजी उत्कृष्ट कवी होते तर धर्मेंद्रला शायरी करण्याची आवड होती. आधी उल्लेख केल्याप्रमाणे सिने कलाकार हे आपले कुणीही नसतात परंतु तरीही आपल्याला त्यांच्याबद्दल आकर्षण प्रेम वाटत असते. धर्मेंद्र सुद्धा त्याला अपवाद नव्हता. त्याला अनेक लोकांचे प्रेम मिळाले. त्याने सुद्धा लोकांवर भरभरून प्रेम केले. धर्मेंद्रचे समकालीन अभिनेते हे  80-90 च्या दशकात चरित्र भूमिका स्वीकारत होते तेंव्हाही धर्मेंद्र  नायक, सहनायकांच्या भूमिकात दिसत होता. 80 च्या दशकातच त्याचा बटवारा हा चित्रपट झळकला होता. त्यात डिंपल कपाडिया आणि त्याच्यावर चित्रित झालेले एक गीत होते. 

थारे वास्ते रे ढोला 

नैण म्हारे जागे रे जागे,

सारी  रैण जागे

 तु म्हारो कौण लागे ?

धर्मेंद्रच्या मृत्यूनंतर त्याची मोठी अंतिम यात्रा जरी निघाली नसली,  त्याचा शासकीय इतमामात अंतिम संस्कार जरी झाला नसला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अफाट चाहत्यांना, सहकलाकारांना झालेले मोठे दुःख मात्र सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. जरी त्याच्या चाहत्यांचा तो कोणी नसला तरी त्याच्या चाहत्यांना मात्र  त्याच्या बद्द्ल अफाट प्रेम वाटत होते आणि म्हणूनच त्यांना तु म्हारो कौण लागे ? असा प्रश्न कदाचित पडला असेल.  




२०/११/२०२५

Article about various works assigned to school teachers

शिक्षक की डेटा एन्ट्री ऑपरेटर ?


माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर , उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. अशा रीतीने शिक्षकांना निव्वळ ऑनलाईन कार्यास जुंपून टाकले आहे.

परवा शिक्षकांना अचानकपणे खान अकॅडमीसाठी विद्यार्थ्यांची नांवे पाठवण्याचा आदेश दाखल झाला. आदेश दिला त्याच दिवशी व वेळेच्या मर्यादेत नांवे अपलोड करण्याचे सांगितले गेले. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आपापली शैक्षणिक कार्ये थांबवून खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याचे कार्य पुर्ण केले. याबाबत अनेकांना ही माहिती का पाठवली जात आहे वगैरे अशी काही इत्यंभूत माहिती मिळाली नाही. काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये खाजगी परीक्षा घेणारे, स्पर्धा घेणारे अशांना , अशा संस्थांना शाळेत त्यांच्या परीक्षांची व स्पर्धांची जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मग आज शासन स्वतः खाजगी संस्था असलेल्या खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती कशी काय पाठवण्यास सांगत आहे ? माहिती सुद्धा अत्यंत घाईघाईत पाठवण्याचे काय ' खास '  कारण आहे ? असा प्रश्न तमाम शाळांना पडला आहे. 

     शिक्षण क्षेत्रात येता-जाता नवीन-नवीन काहीतरी प्रयोग केले जात आहे आणि रोजच काही ना काही माहिती अपलोड करण्याचे सांगितले जात आहे. शिक्षकांना सोपवल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत अनेकदा उहापोह होतो व झालेला आहे. अशैक्षणिक कामासोबतच शिक्षकांना शिक्षण विभागा अंतर्गतच दिल्या जाणा-या शैक्षणिक कामांचा सुद्धा अतिरिक्त बोजा सद्यस्थितीत खूपच वाढलेला आहे. शिक्षकांवर सोपवल्या जाणाऱ्या अनेक कार्यामुळे ज्या मुख्य कार्यासाठी शिक्षकांना नियुक्त केले जाते ते शिकवण्याचे, विद्यादानाचे कार्य शिक्षक सध्या नीटपणे करू शकत नाही आणि त्यामुळेच जशी पाहिजे तशी शैक्षणिक प्रगती साध्य होत नाही. ती साध्य होत नसल्यामुळे पुन्हा नवनवीन प्रयोगांचा भडीमार केल्या जातो आणि शिक्षकांना आणखी इतर नवीन कार्यास जुंपले जाते. दिर्घकालीन अशी कोणतीही प्रणाली किंवा उपाययोजना केल्या जात नाही. धोरणे नियम बनवतात आणि त्वरित बदलले जातात. आठवी पास नापासचे उदाहरण ताजेच आहे. नवीन सरकार आले की, जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलवून टाकते. 

     इंटरनेट आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत बरीच कार्ये ऑनलाईन व्हायला लागली त्यात शाळांचाही समावेश झाला. सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांना अनेक ऑनलाईन  कार्ये करावी लागत आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर सुद्धा होत आहे, पण याचा शासन विचार करते की नाही ?  व्हॉट्स ॲपमुळे त्वरित संदेश पाठवला जातो आणि त्यामुळे आजकाल त्वरित म्हणजे अगदी वेळेवर आदेश देऊन कार्य करण्यास सांगितले जाते जसे काही शिक्षकांकडे, शाळांकडे सर्व माहिती नेहमी अगदी तयारच असते. अगदी वेळेवर माहिती मागितल्याचे परवाचे खान अकॅडमीचे उदाहरण वर दिलेच आहे. आजच आदेश पाठवला जातो आणि आजच माहिती मागवली जाते. मग ती माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर ,उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. कधी शासनाचे पेपराचे मार्क अपलोड कर, तर कधी हजेरी अपलोड कर,  शाळांचे फोटो अपलोड कर , मां के नाम पेड चे फोटो अपलोड कर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. विशेष म्हणजे प्रश्न हा पडतो की एवढा सगळा डेटा अपलोड होत आहे तर तो तपासतो कोण? तो तपासल्यावर त्याच्याबद्दल कुठे काही आकडेवारी व माहिती सुद्धा प्रसिद्ध होत नाही, ती झाली तरी त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही मग हा रोजच माहिती पाठवण्याचा, डेटा अपलोड करण्याचा अट्टाहास का ? ऑनलाइन झाले म्हणून हुरळून जाऊन सर्वच माहिती पोर्टलवर टाकण्याची खरंच काही आवश्यकता आहे का ? ती टाकल्यावर त्यांनी शाळांची प्रगती होत आहे का, किंवा होईल का ? बरे शासनाने माहिती भरण्यासाठी जी पोर्टल दिली असतात त्यांचे सर्व्हर स्ट्रॉंग नसतात. मग कित्येकदा वेबसाईटवर ते कार्य होत नाही, वेबसाईट चालत नाही किंवा हळूहळू चालते याकडे पण शासनाचे लक्ष नाही. शासनाला जर ऑनलाईन माहिती हवीच असेल तर मग तसे स्ट्रॉंग सर्व्हर सुद्धा शासनाने ठेवले पाहिजे. शालार्थ या वेतनाच्या पोर्टलमधे असलेल्या एका तृटीमुळे शाळांनी खोटे कर्मचारी आयडी दाखवून पगार उचलला. त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली परंतु शालार्थ प्रणाली पुरवणाऱ्या कंपनीवर काय कारवाई झाली हे काही कुठे वाचनात आले नाही. 

     शिक्षण क्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. समाजाची सद्यस्थिती पाहता शिक्षणाचा दर्जा एकदम उच्च कोटीचा असणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे बालमनावर वाईट परिणाम होत आहे. नको त्या गोष्टींचे ज्ञान त्यांना नको त्या वयात होत आहे त्यामुळे बालकांकडे अधिकाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून शासनाने शिक्षकांना शिक्षकच राहू द्यावे डेटा एन्ट्री ऑपरेटर बनवू नये जेणेकरून ते या बालकांकडे चांगले लक्ष देतील आणि मोबाईलमुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम रोखल्या जाऊन त्यांच्यावर शिक्षणाद्वारे चांगले संस्कार रुजवू शकतील.