१८/१२/२०२५

Article about Jujube, Chinese date, Ber

"जुजुबे"चे दिवस आणि आठवणी

आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ?

      हे काय नवीन जुजुबे ? असा प्रश्न ब्लॉग वाचकांना पडला असेल. तर तो आता हा लेख वाचला की उलगडेलच.

का रे तुम्ही काही बोरं, सुर्यफुलाच्या बिया खात नाही का रे ? शाळेमध्ये वाढणारा चिप्स, कुरकुरे आणि तत्सम पदार्थाच्या पाकिटांचा कचरा पाहून मी माझ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थी अनुत्तरीत होते. पुर्वी शाळांमध्ये विद्यार्थी बोरे, चिंचा, आवळे, सुर्यफुलांच्या बिया असे पदार्थ खात व त्यामुळे बोरांच्या आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ? का त्यांना या रानमेव्या पेक्षा मॅगी, पिझ्झा, बर्गर इ. असे फास्ट फूड आवडू लागले ? असा प्रश्न मला पडला. दुसऱ्या दिवशी माझ्या परिचित रस्त्याने शाळेत जातांना नित्य परिचित अशी ठिकाणे दृष्टीस पडत होती. अनेक स्थानांमध्ये नवीन बदल झाले होते. कालच्या मुलांना विचारलेला  अनुत्तरीत प्रश्न माझ्या मनात घोळत होताच. शाळेत जातांना मी लहान असताना ज्या ठिकाणी बोरं विकणारी लोक बसत ती ठिकाणे सुद्धा मला दिसली परंतु आता त्या ठिकाणी एकही बोरं विक्रेता माझ्या काही दृष्टीपथास आला नाही. सरकारच्या फुकटछाप योजनांमुळे पूर्वीचे अनेक व्यवसाय लोकांनी जवळपास सोडूनच दिले आहे. अगदी नगण्य अशा संख्येत काही विक्रेते मात्र आजही टिकून आहे. माझ्या लक्षात आले की हा रानमेवा विकणारे लोकच जर नसतील तर मुले असा रानमेवा घेणार तरी कुठून ? आम्ही शाळेत असतांना प्रत्येक शाळेच्या बाहेर रानमेवा, विकणारे गुळपट्टी आदी घरी बनवलेली पदार्थ विकणारे लोक असत. आता मात्र जास्तीत जास्त प्रमाणात पॅकड फूड विकणारेच शाळा परिसरात विक्रीला आलेले दिसतात. महाविद्यालयात असतांना आमच्या महाविद्यालयाच्या मागे कित्येक अशी बोरांची झाडे होती. आम्ही त्यांचा खूप आस्वाद घेत असू. कुणाला कच्ची बोरे आवडत तर कुणाला पिकलेली, कुणाला चण बोरं (एकदम बारीक आणि लाल बोरं ) आवडत. काहींना शेंबडी बोरे आवडत असत. ज्या बोरांमध्ये द्रवरूप असा मगस असतो अशा बोरांना कुणीतरी, कधीतरी शेंबडे बोर असे नांव पाडले असावे. या बोरांच्या बिया मग काही व्रात्य पोरे शाळा, महाविद्यालयाच्या भिंतीवर फेकून त्या भिंतीला चिटकवत असत. आता बोरांच्या ऋतूत बोरे काही विकायला येत नाही. गावाच्या बाहेर लदबदलेल्या बोरीच्या झाडांभोवती पोरांची गर्दी दिसत नाही. असा पण काय हा बदल व्हावा ? का असा बदल व्हावा ? मी शाळेत पोहोचलो, शाळा सुटल्यावर घरी जातांना गावातून गाडी घेतली आणि कोण जाणे कसा एक व्यक्ती बोरं घेऊन बसलेला मला दिसला... "लॉ ऑफ ॲट्रक्शन"  का कशामुळे तो तिथे आला असावा असा प्रश्न मला पडला. मी आनंदाने त्याच्याकडे गाडी घेतली....माझ्या अचानक गाडी वळवल्याने एका व्यक्तीला अडचण सुद्धा झाली. मी मानेनेच त्याला माफीचा इशारा केला त्यानेही तो उदार मनाने स्वीकारला. बोरं विक्रेत्याकडून बोरे घेतली...पुर्वी दिसणारी मापे आता मात्र नव्हती... बोरं विक्रेत्याची चौकशी केली. त्यांचे नांव रमेश बोदडे असे होते. "मी अनेक रानभाज्या व फळे आणतो सर" त्यांच्या या उद्गारावर "हो तुमच्याकडून मी अनेकदा भाज्या इ घेतले आहे" असे मी म्हटल्यावर त्यांनी ओळखले. त्याच्याकडे नागपुरी बोरे होती. आपोआप माझा हात खिशात गेला आणि मी मोबाईलवर त्यांचा फोटो घेतला.


     बालपणीच्या जुन्या बोरं विक्रेत्याच्याच जागी म्हणजे एकबोटे चौक, संत पाचलेगांवकर महाराज मार्ग खामगांव या ठिकाणी हा नवीन बोरं विक्रेता मला दिसला होता. इतर जुन्या बोरं विक्रेत्यांच्या जागा जशा नॅशनल हायस्कूल, सहा नंबर शाळा, अलका लॉज समोरील जागा या जागा मात्र हल्ली बोरांच्या दिवसात रिक्तच असतात. गतवर्षी जिल्हा परिषद शाळेसमोर सुद्धा एक बोरं विक्रेता दिसला होता त्यावेळी मी त्याची चित्रफित बनवली होती. घरी जातांना माझ्या मनात बोरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या होत्या. माझे वडील फळ फळावळांचे चाहते, त्यामुळे ते आम्हाला विविध प्रकारची फळे खाऊ घालत, बोरं पण खूप आणत. माझे मामा जळगांवला राहत ते आमच्यासाठी मेहरुणची बोरे आणत. मेहरूणची बोरे गोड म्हणजे गोडच असत. नागपुरी बोरं असतात गोड पण किडके जास्त असतात. हल्ली नवीन निघालेली ॲपल बोरं ज्यांनी गावरान बोरं चाखली आहे त्यांना आवडत नाही. आयुर्वेदात सर्वच फळांचे जसे महत्व सांगितले आहे तसेच बदर अर्थात बोर. बोराचे सुद्धा पित्त, वात नाशक, शक्तीवर्धक, उष्णता रोधक म्हणून महत्व सांगितले आहे. बोरकुट हा एक चांगला पदार्थ सुद्धा आता दुर्मिळ झाला आहे. मला दिसलेल्या त्या विक्रेत्याकडून मुलांसाठी थोडी बोरे घेऊन घरी गेलो.  बोरांच्या दिवसात अशा बोरांबाबतच्या स्मृती ताज्या झाल्या. बोरांना इंग्रजीत jujube असा हा शब्द आहे. जुजुबे हा शब्द डेट्स म्हणजेच पेंड खजूर साठी सुद्धा काही प्रदेशात वापरला जातो.  बोरे, बोरकुट असा हा रानमेवा बाजारात पुन्हा जोरदार उपलब्ध व्हावा सर्वांनी तो खावा आणि आपल्या बालगोपालांना सुद्धा त्याची गोडी लावावी असे मला वाटले.

     दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो मधल्या सुटीत एक विद्यार्थी माझ्या जवळ आला आणि सर तुमच्यासाठी एक गंमत आणली म्हणून एक पुडके माझ्यापुढे ठेवले. मी उत्साहाने ते उघडले त्यात बोरं होती...मी त्याच्याकडे कौतुकाने, आनंदाने बघत राहिलो. या मुलांना अशीच अस्सल पदार्थांची गोडी वाटत राहावी असे माझ्या मनात आले मी त्याने दिलेल्या बोरांतील चार - पाच बोरे उचलून उरलेली बोरे इतर विद्यार्थ्यांना वाटण्यास सांगितली. 


 

११/१२/२०२५

Article about increasing no of leopards and their attack.

 बिबटे उदंड जाहले


बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेषात आले तर मग ही भिती किती वाटेल हे विचारूच नका. बिबट्यांच्या वाढत्या संख्ये बाबत हा ऊहापोह.

गत बुधवारी नागपूरच्या पारडी भागात बिबट्याने पाच ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. महाराष्ट्रात आणि देशातही गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये, गाव-खेड्यांमध्ये बिबटे घुसण्याचे प्रमाण  वाढले आहे.  गत एक दोन वर्षात तर हे प्रमाण फारच वाढले आहे. काही अभ्यासकांचे तर असेही म्हणणे आहे की, प्रत्येकच शहरात दररोज रात्री बिबटे येत असतात आणि उकर्ड्यावरचे मांसाचे तुकडे, कोंबड्या, शेळ्या खात असतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांना सुद्धा त्यांनी फस्त केले आहे. यावर संपूर्ण राज्यात, विधानसभेत गदारोळ सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सुद्धा मांडली. परंतु बिबट्या हा प्राणी केंद्रीय सुचीत येत असल्याने राज्याला त्याबाबत निर्णय घेण्यास मर्यादा येतात. तरीही केंद्राने काही बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले.शहरात बिबट्या आल्याच्या बातम्या आता नित्याच्याच  झाल्या आहे.बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण असेही सांगितले जाते की मादी बिबट ही वर्षातून दोन वेळा पिल्ले देते आणि बहुतांश वेळी ऊसाच्या शेतात पिल्ले दिल्यामुळे ती पिल्ले सुरक्षित राहतात आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांच्या शहरात घुसण्याच्या प्रकारावर उपाययोजना म्हणून नाना प्रकारचे उपाय सुचवले जात आहे. उदाहरणार्थ बिबट्यांची नसबंदी, जंगलामध्ये शेळ्या सोडणे हा सुद्धा एक अजब उपाय सांगण्यात आला, भिंती/कुंपण घालणे असे उपाय अभ्यासक, लोक सुचवत आहेत. विद्यार्थी सुद्धा त्यांच्या शालेय प्रकल्पांमध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे व मानवांचे संरक्षण कसे करावे या प्रकारचे प्रकल्प बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बिबट्यांची संख्या कशी वाढते आहे यावर त्यांच्या शैलीमध्ये भाष्य केले, तसेच काल बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात ज्यांचा वचक असतो ज्यांचेकडे अधिकार असतात ते  लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेशात आले तर मग हा वचक किती वाटेल हे विचारूच नका. म्हणून मग सभापतींनी त्यांना समज दिली. असो ! वरील विविध उपाययोजना बिबट्यांना रोखण्यासाठी अनेकांकडून सुचवल्या गेल्या. जंगलात शेळ्या सोडणे हा ही एक उपाय त्यात आला, पण त्या फुकटच्या शेळ्या पकडून माणसेच तर त्यावर ताव मारणार नाहीत ना ! अशीही भीती आहे. वन्यजीव शहरात घुसण्याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि सोयीस्कररित्या मिळणारे गृह कर्ज यामुळे घरे बांधण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि मनुष्य वस्ती वाढत चालली आहे त्यामुळे जंगलांचे प्रमाण घटत आहे मग ते वन्यजीव कुठे जातील ? कोणे एकेकाळी जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशाच्या ठिकाणी आज मानवाने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आता मनुष्य राहायला लागला आहे, शेती करू लागला आहे. त्यांच्या हक्काची जागा मनुष्यानेच हिरावून घेतलेली आहे आणि आता जें व्हा ते मनुष्यवस्तीत येत आहे  तेव्हा आपण ते वन्यजीव आपल्या वस्ती झाल्याची तक्रार करीत असतो. बिबट्यांप्रमाणेच हरणे आणि रोही सुद्धा शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पिके उद्ध्वस्त करीत असतात. 

     या सर्व उपाययोजना व अशी पार्श्वभूमी असतांना खालील  काही उपाययोजना सुचावाव्याशा वाटतात

१. महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात प्राणिसंग्रहालयांना परवानगी दिल्यास अनेक बिबट्यांना त्यात ठेवता येईल व बिबटे आटोक्यात येतील , त्यांच्यासाठी पिंजरे सुद्धा प्रशस्त ठेवावे.

२. ज्याप्रमाणे आपण विदेशातून चित्ते आणले त्याप्रमाणे कुण्या देशाला बिबट्यांची आवश्यकता असेल तर त्यांना आपण बिबटे पाठवले पाहिजे. 

३. अन्य राज्यात जिथे मांसभक्षक प्राणी कमी असतील व शाकाहारी वन्यजीव जास्त असतील अशा राज्यातील जंगलात बिबटे सोडणे.

     उदंड जाहलेल्या या बिबट्यांच्या संख्येमुळे व त्यांच्या शहरात येण्यामुळे न घाबरता, त्यांना न घाबरता सकारात्मक पद्धतीने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे, आवश्यक ती काळजी घेणे हेच नागरिकांना करावे लागेल असे वाटते. याप्रसंगी वरील काही उपाय मनात आले त्यावर राज्य सरकार , केंद्र सरकार यांनी यावर विचार करावा असे वाटते.