२६/०४/२०२६

Demanding Adhaar Card everywhere is really essential ?

 आधार कार्डचा अनावश्यक अट्टाहास

वर्ग सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बऱ्याच ठिकाणी ऐन वेळेवर आधार कार्ड घेऊन जाण्यास सांगितले ते खरोखर आवश्यक आहे का ? आधार कार्डच्या बाबतीत फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावर अथवा कपाळावरच आधार कार्ड नंबरचा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

आज वर्ग सातवीची महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. खामगावच्या विविध केंद्रांवर शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहे. परीक्षेस आवेदन करतांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरची माहिती अपलोड केली जाते शिवाय आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा घेतली जाते. शासनाने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वितरित केले जाते.  हे प्रवेश पत्र परीक्षेच्या केंद्रावर प्रवेश करण्यास आवश्यक तो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला म्हणजेच तो त्याच्या शाळेचा अधिकृत विद्यार्थी आहे, त्याने त्या शाळेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे,  त्या शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याला जी जी कागदपत्रे सांगितली आहे ती त्याने त्या शाळेत सादर केलेली आहे हे स्पष्ट आहे. तरीही ऐन शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना असे सूचित करण्यात आले की परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रवेशपत्रावर मात्र परीक्षेसाठी आधार कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे अशी कोणत्याही स्वरूपाची सूचना दिलेली नाही. तरीही काही शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे असे ऐनवेळी विद्यार्थ्यांना सूचित केले. ही सूचना मिळेपावेतो अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून सुद्धा दिले होते. ऐनवेळी सूचना प्राप्त झाल्यावर आपल्या पाल्य परीक्षेपासून वंचित न राहावा या काळजीने काही पालक घरी येऊन पुन्हा आधार कार्ड आधार कार्डची  झेरॉक्स घेऊन खामगावच्या रणरणत्या उन्हात, 42 डिग्री च्या तापमानात पुन्हा परीक्षा केंद्रावर गेले तेथे उपस्थित शिक्षकांना आधार कार्ड झेरॉक्स दिली असता,  "दिले तर चालेल" असे त्यांचे विधान होते म्हणजे निश्चित असे काही नाही तुम्ही आधार कार्ड आणले तर चालेल नाही आणले तर नाही तरी चालेल असाच त्यांचा अर्थ होता. म्हणजे एक स्पष्ट अशी सूचना दिली जात नाही आणि त्याने विद्यार्थी व पालकांची harrashment होते. 

    आज-काल जिथे नाही तिथे आधार कार्ड मागितले जाते. काही ठिकाणी स्पष्ट समजत असते की तो व्यक्ती अधिकृत ग्राहक आहे विद्यार्थी आहे. शिवाय तो व्यक्ती अधिकृततेचे  स्पष्ट होणारे सबळ पुरावे सुद्धा त्याच्याजवळ असतात पण तरीही आधार कार्डचा आग्रह धरला जातो. हे योग्य नाही. सर्वच क्षेत्रातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा आणि आवश्यक तेथेच आणि खरोखर जरुरी असल्यास आधार कार्डची मागणी करावी. या देशात घुसखोर येऊन राहतात, नोकऱ्या मिळवतात त्यांना काही होत नाही आणि अधिकृत नागरिकांना मात्र नाहक त्रास दिला जातो हा किती मोठा विरोधाभास आहे. आधार कार्डच्या बाबतीत तर फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावरच नाहीतर कपाळावर आधार कार्ड नंबर चा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

या लेखाद्वारे हेच सांगणे अभिप्रेत आहे की सर्व कागदपत्रांची शहानिशा झालेली असल्यावर विनाकारण आधार कार्डचा अट्टाहास करू नये. आधार कार्ड संबंधित समस्त प्रणाली व अधिकाऱ्यांनी याबाबतीत विचार करावा व तसे निर्देश सर्व खात्यांना देण्यात यावे. 

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव


०२/०४/२०२६

Article about memories of Hanuman janmotsav and bhandara

आठवणी हनुमान  जन्मोत्सवाच्या


गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. 

 आज हनुमान जन्मोत्सव.  1990 च्या सुमारास आमच्या रहिवासी भागात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. गल्लीतील नागरिकांच्या घरी, गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. रोडग्यांसाठी तयार केलेल्या केल्या जाणाऱ्या आहारासाठी गौऱ्या गोळा करून आणण्याची एक गंमत होती. त्यासाठी एक पथक रवाना होत असे. वाचकांपैकी या पथकात जे लोक गेलेले आहेत त्यांना त्या गोष्टीचे स्मरण होऊन नक्कीच हसू आले असेल. दुसऱ्या दिवशी भंडारा झाल्यानंतर भांडी घासण्याचा एक मोठा कंटाळवाणा कार्यक्रम होत असे. जेवण झाल्यानंतर भांडे घासण्याचा मला तरी अतिशय कंटाळा येत असे परंतु तरी सर्वजण मिळून भांडी घासत असत. एक माणूस उभे राहणे तर दूर कसाबसा बसू शकेल असे ते मंदिर होते एकदम साधे. "सबके लिए खुला है मंदिर ये हमारा" या तुकडोजी महाराजांच्या गीताप्रमाणे त्या मंदिराचे होते कुणीही या, केंव्हाही या आणि दर्शन घ्या, आपापल्या परीने बजरंगाची पूजा करा अन् जा. त्या हनुमान मंदिरामध्ये कुणाला कठीण वाटतील असे विशेष काही नियम, बंधन, नियमावली नव्हती परंतु हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मात्र सर्वजण एकत्र येत असत. रोडगे बनवण्यासाठी प्रमोद पाटील, स्व. मुकुंदा, पंचायत समिती निवासस्थानात राहणारे महादेव भाऊ हे लोक तज्ञ होते. मी त्यांना फक्त गोळे तयार करून देत असे. एक सुनील नामक मुलगा दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आमच्या गल्लीत दिसत असे इतर वेळी मात्र तो कुठेच दिसत नसे. तो कुठे राहायचा , कोणाचा मित्र होता, आमच्या गल्लीत का यायचा हे मला खूप वर्षे कळलेच नव्हते. रात्रभर जागल्यानंतर सुद्धा पुन्हा सकाळी सहा वाजता सर्वजण जन्मोत्सवासाठी हजर असत. पण हळूहळू सर्व मंडळी आपापल्या व्यापात मग्न होतील. सर्वांची लग्न झाली, मुले झाली आपापल्या संसारात सर्व मग्न झाले आणि हनुमान जन्मोत्सवाचा तो साध्यासुध्या पद्धतीचा भंडारा होणे बंद झाले. जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त बरेच जण हनुमंताची पूजा आदी करीत असे, मंदिर साफसफाई करीत असे. माझे वडील तर मंदिराचा परिसर रोज झाडत होते. भंडारा होणे बंद झाल्यावर  हनुमान मंदिर दुर्लक्षित झाले. आज आमच्या वेटाळात लोकसहभागातून नवीन शिवमंदिर उभारले आहे. प्रदीप मिश्रा यांच्या व्यापक आवाहनानंतर सध्या भोळे शंकर हे टॉपवर आलेले देव आहे. 'एक लोटा जल' या आवाहनाने शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली आहे. देव तर सर्व सारखेच आहे. सर्व देव त्यांच्या भक्तांचे भलेच करणार. असो ! आपल्या देशातील लोक भोळे आहेत देवभोळे आहेत कुणी काही आवाहन केले की ते लगेच स्विकारतात परंतु स्वतः भगवंतांनी दिलेला संदेश मात्र विसरतात.  स्वतः भगवंतांनी गीतेत म्हटले आहे

 आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | 

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

अर्थात ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे जल समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूलाच जाऊन मिळतो. 

या अर्थाने तुम्ही कोणत्याही देवाची आराधना केली तरी ती शेवटी विष्णूलाच अर्पण होत असते.

    आमच्या भागात हनुमान जन्मोत्सवाच्या काळात थोडा 'सुकून' होता, प्रत्येकाकडे वेळ असे, ट्युशन क्लासेस यांचे एवढे प्रस्थ नव्हते त्यामुळे सर्व एकत्र येत असत आणि सर्वांनुमते सर्व सहमतीने कार्यक्रम पार पडत असत. अमुक एक गोष्ट अशीच झाली पाहिजे आणि तशीच झाली पाहिजे असे काही बंधन नव्हते. "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" या ओळीनुसार आपापल्या भावानुसार सर्वजण हनुमंताचे दर्शन घेत असे. 

    आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या बाबी स्मरण झाल्या. तशा त्या प्रत्येकच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी स्मरण होत असतात म्हणा ! पण आज त्यावर लिहावेसे वाटले. लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आल्यावर आपापल्या परीने लोक दानधर्म करतात, काही लोक मंदिर उभारणीच्या बांधकामादी कार्यामध्ये सक्रिय सहभाग देतात. स्वतःचे घर तर सर्वजण बांधतात परंतु ईश्वराचे घर बांधणे, त्यासाठी निधी देणे पुण्यवंताच्याच भाग्यात असते. अशातून सुंदर, भव्य मंदिर निर्माण होते. याच प्रकारे आपल्या वेटाळात सुद्धा उभे राहिले आहे. शोले सिनेमात एक संवाद आहे "समाज और बिरादरी तो इंसान को अकेलेपन से छुडाने के लिए बनाई गई है, उसे अकेला रखने के लिए नही |" त्याचप्रमाणे मंदिरेही आपल्या बांधवांना एकत्र आणण्याचे एक ठिकाण आहे.

   आमच्या वेटाळात झालेले नवीन शिव मंदिर सुद्धा जुन्या हनुमान मंदिरप्रमाणे सर्वांना कायम एकत्रित ठेवेल, जिथे सर्व सहमतीने, सर्व सहभागाने आपापल्या भक्तिभावाने सर्वजण एकत्र येत राहतील, पुन्हा तसे हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी होणारे साधेसुधे भंडारे आयोजित होतील हिच आशा व  ईश्वरचरणी प्रार्थना.

०१/०४/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar

आठवणी नानाशास्त्रींच्या 

जलंब - भाग १ 

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य व परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.


नानाशास्त्री वरणगांवकर यांचा वाडा या ठिकाणी होता.

सुवर्ण व्यवसायी वर्मा यांचे जलंब मधील 1922 मध्ये सुरू केलेले दुकान.

नानाशास्त्री वरणगांवकर यांच्या जागेचे सध्याचे मालक
श्री घोपे काका 

काही जुनी, काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे, चुलत्यांचे, आत्याचे, बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार  माझ्या डोक्यात येत होते. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो.

"जलंब ग्रामाबद्दल मला बालपणापासून जिव्हाळा, आकर्षण आहे." जलंबला हिंदू संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून गेलो असता व्याख्यानाच्या सुरुवातीलाच वरील वाक्य आपसूकच माझ्या मुखातून निघाले. त्याचे कारण माझे आजोबा वैद्य दत्तात्रय रामचंद्र वरणगांवकर हे सुमारे 1940-50 च्या दशकात जलंबला वास्तव्यास होते, वैद्य असल्याने जलंब, खामगांव परिसरात ते नानाशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. व्याख्यानापुर्वी हनुमान मंदिराच्या जवळच राहणाऱ्या वानखेडे यांच्याकडे आम्हाला चहापाण्यास आमंत्रित केले होते. पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आहे की एखादे जुने गांव, जुनी वास्तू दिसली की एखादा जुना मित्र भेटला की जसा आनंद होतो तसा आनंद वाटत असतो. जलंबला आलो असल्याने माझ्या मनात सुद्धा मला माझे वाडवडील राहत असलेली जुनी वास्तू बघण्याची तीव्र इच्छा जागृत झाली असल्याने मी अनिल भाऊ यांचे जवळ माझे आजोबा इथे राहिलेले आहे, इथे आमचे घर होते, ते मला पाहायचे आहे असे सांगताच त्यांनी त्यांच्या वृद्ध वडीलांना विचारल्यावर त्यांचे वडिलांनी नानाशास्त्री वरणगांवकर कुठे राहत होते आणि आता तिथे कोण राहते ते सांगितले. तरी खात्रीसाठी म्हणून अनिल वानखेडे मला म्हणाले चला आता आमच्या गावाची इत्यंभूत माहिती असलेल्या "सायंटिस्ट"कडे घेऊन जातो. सायंटिस्ट म्हणजे खूप माहिती असलेले असे त्यांचे म्हणणे होते हे कळायला मला वेळ नाही लागला. त्यांच्या काकांकडे ते घेऊन गेले. माझे आजोबा जलंबला राहत होते हे म्हटल्यावर काही वेळातच त्यांना मी आपलासा वाटू लागलो. ते माझ्या सोबत अनवाणीच निघाले, मी त्यांना चप्पल घाला असे म्हटल्यावरही त्यांना मला माझ्या पूर्वजांचा वाडा दाखवण्याची घाई झाली होती, जलंबशी माझे नाते असल्याचे पाहून मी त्यांचा ग्राम बंधू वाटल्याने त्यांच्या अंगी सुद्धा उत्साह संचारलेला दिसला. वानखेडे यांच्या काकांना नानाशास्त्री म्हटल्याबरोबर "नानाशास्त्री काय भारदस्त माणूस होता. मी त्यांना पाहिलेले आहे. मोठ्या मिशा, चहे-यावर तेज, टोपी, गोरापान वर्ण, उंचेपुरे. जलंब गावात असा रुबाबदार माणूस एकच होता. त्यांच्याकडे बंदूक होती, नेमबाज. होते, परवाना धारक शिकारी तर होतेच, शिवाय वैद्य होते" एका दमात काकांनी माझ्या आजोबांचे वर्णन केले. ते तसेच होते. मी नानाशास्त्रींचा नातू आहे असे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला त्यांनी कौतुक सुद्धा केले, चहापाण्याचा खूप आग्रह केला परंतु वेळ कमी असल्याने फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही वाड्याच्या दिशेने जाऊ लागलो. काही जुनी तर काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे,  चुलत्यांचे, आत्याचे बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार माझ्या डोक्यात येत होते. माझी आत्या सांगत असे की आजोबा त्यांना खामगांवला खेळ (सिनेमा) पाहण्यासाठी बैलगाडीत घेऊन येत असत आणि अंजुमन शाळेच्या चारमिनार जवळ ते शिदोरी खात असत. हे मला आठवले. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो. खुप वर्षांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत जलंबला गेलो होतो. त्याचे वडील सुद्धा जलंबला राहत असत. ते माझ्या वडिलांचे बालमित्र होते. म्हणून आम्ही दोघे त्यावेळी जलंबला गेले होतो. त्यावेळी ते घर आजोबांच्या वेळी जसे होते तसेच होते पण आता मात्र ज्यांच्या मालकीचे ते घर आहे त्यांनी बरेच बदल केले आहे. मी नानाशास्त्रींचा नातू आहे हे ऐकल्यावर आमच्या घराचे आताचे मालक घोपे काका यांनी आमचे खूप आदराने स्वागत केले. घोपे काकांनी तर मला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि नानाशास्त्री यांचा मळा सुद्धा दाखवण्याचे आश्वासन दिले. तो मळा अजूनही तसाच आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. माझा जलंब गावाशी अगदी जुजबी संबंध, कधीकाळी आजोबांनी वास्तव्य केलेले पण आजही त्या गावात एवढे  प्रेम, माया, आपुलकी, आदर कसे काय मिळत होते ? तर जे पेराल ते उगवते या उक्ती नुसार माझ्या आजोबांनी येथे लोकांना चांगली वैद्यकीय सेवा दिली होती, आपुलकीने आयुर्वेदिक औषधे दिली होती, वन्यप्राण्यांच्या संकटातून त्यांना वाचवले होते त्यामुळे आजही त्यांचे नांव अनेक ज्येष्ठ जलंब ग्रामवासी जाणून आहे. तीन वेळ संध्या,  नित्यपूजा आणि गणपतीवर नितांत भक्ती असणा-या  माझ्या आजोबांनी काय कमवून ठेवले ते मला कळले. 

     माझे व्याख्यान चांगले झाले, परतीच्या प्रवासात माझ्या मनात जलंब भेटीमुळे आजोबांच्या अनेक स्मृती तरळत होत्या.  त्यात मला आजोबांचे मित्र त्यांनी भेटी दिलेली छोटी छोटी गांवे आठवली त्यातले एक लांजूड गांव आठवले. पण तूर्तास एवढेच लांजूडचा  किस्सा व इतर आठवणी या लेख मालिकेत  लवकरच वाचायला मिळतील.

  रामदास स्वामींनी सांगितले आहे की, पूर्वजांची कीर्ती सांगत बसण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. पण संत वचन माहित असूनही  वडीलांची अर्थात पूर्वजांची किर्ती, स्मरण या व आगामी काही लेखातून वाचकांना काही प्रेरणा मिळेल या हेतूने लिहित आहे.

...ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव