१८/०६/२०२६

Article about less rain fall in India.

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा...


सर्वत्र जरी अल निनोचे कारण असले तरी आमच्या खामगांवात मात्र पाऊस उशिरा दाखल होण्याबाबतचा एक अजब समज आहे. तो म्हणजे आनंद मेला गावांत आला की पाऊस पडत नाही. अशी अंधश्रद्धा अनेक गावांमध्ये आहे. 

तसे पाहिले तर या गुरुवारी लिहिण्यासाठी म्हणून अनेक विषय होते. कारण शीर्षकात दिल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांत जनतेने प्रणित मोरे या स्टॅन्डअप  कॉमेडियनचे ; स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणण्यापेक्षा अश्लील कॉमेडियनचे, वाढत्या झुरळांचे, दलबदलू राजकारण्यांचे, पुरोगामी म्हणवणाऱ्या साहित्यिक असून जातिवाचक द्वेष भावना पसरविणाऱ्या महिलेचे व शिवाय इतरही अनेक असे तमाशे पाहिले आणि पाहतही आहे. परंतु "कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच" या म्हणीप्रमाणे उपरोक्त विषयांबाबत कितीही लिहा किंवा बोला वरील बाबींसारख्या गोष्टी या समाजात घडतच राहणार. मग अजून हा असा कोणता तमाशा आहे की जो लोक डोळे फाडून पाहत आहे ? तर हा तमाशा आहे पावसाचा. जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी अजूनही वरूण राजाचे आगमन नाही. "नेमेची येतो मग पावसाळा" ही म्हण सुद्धा आता पावसाळा पाळत नाही, आता पावसाचा काही नेमच राहिला नाही. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या पावसाबाबत अनेकांनी कविता लिहिल्या आहे, लेख लिहिले आहेत तसेच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा अनेक पाऊस गीते आहेत. यातील बहुतांश गीते ही प्रेमगीते आहेत. जुन्या जमान्यातील सिनेमात कथानकाच्या गरजेप्रमाणे ही गीते सिनेमात असत. 1980 च्या दशकापासून मात्र हिंदी सिनेमात पाऊस गीते ही घुसाडली जाऊ लागली हीरो,  हीरोईनला विशेषत: हीरोईनला लाल किंवा पांढऱ्या साडी मध्ये भिजवून , अंग प्रदर्शन, चुंबन दृश्ये दाखवून चित्रपट यशस्वी करण्यासाठी व गल्ला कमवण्यासाठी दिग्दर्शक पाऊस गीतांचा वापर  करू लागले. रोमँटिक पाऊस गीते जरी प्रचंड असली तरी दुष्काळाची किंवा पाऊस न पडल्यामुळे असलेल्या  गीतांची संख्या मात्र अत्यंत तुरळक आहे. पाऊस न पडण्याच्या सिच्युएशनवर एक गीत देवानंदच्या गाजलेल्या गाईड या सिनेमात आहे. गाईड असलेला राजूच्या जीवनात अचानक अनेक स्थित्यंतरे येतात आणि आकस्मिकपणे तो साधू बनतो व एका गावातील मंदिरामध्ये राहू लागतो. गावातील लोकांना तो पाऊस पडण्यासाठी उपवास करणाऱ्या एका महान व्यक्तीची गोष्ट सांगतो. नेमका त्या गावात सुद्धा दुष्काळ पडतो आणि लोक आता साधू बनलेल्या पूर्वाश्रमीच्या त्या राजू गाईडला पाऊस पडावा म्हणून उपवास धरण्यास सांगतात. आर. के. नारायण यांच्या कथेवर आधारित हा सिनेमा प्रचंड गाजला होता. राजूचे उपवास सुरू असतांना संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या आवाजातील हे गीत सुरू होते, 

रामा मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू शामा मेघ दे |

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा

हाय रे विश्वास मेरी हाय मेरी आशा ||

गीत ऐकताना आणि पडद्यावर ते दुष्काळाचे चित्र पाहताना दर्शकाला सुद्धा पाऊस पडावा असे वाटू लागते. 

     यंदा  भारतामध्ये सुद्धा पावसाने दडी मारली आहे. शेतकरीच नव्हे तर पांढरपेशा शहरी वर्ग सुद्धा पावसाची प्रतिक्षा करतो आहे. प्रचंड उन्हाने तापणारा विदर्भ तर पावसाची चातकासारखी  प्रतीक्षा करत असतो. मानवाने कितीही मोठी प्रगती केली चंद्रापर्यंत झेप घेतली तरी मनुष्य हा निसर्गावर निर्भर आहे आणि राहणारच. त्यामुळेच तमाम भारतीयांना सध्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट 2027 पर्यंत  धरणातील पाणी व पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार करण्याचे आदेश दिले आहे. सुपर अल निनोमुळे यंदाचा मान्सून लांबला आहे. नुकत्याच झालेल्या काही युद्धामुळे सुद्धा वातावरणावर  नक्कीच परिणाम झाला असेल. मान्सून सगळीकडेच उशिरा दाखल होत आहे. सर्वत्र जरी अल निनोचे कारण असले तरी आमच्या खामगांवात मात्र पाऊस उशिरा दाखल होण्या बाबतचा एक अजब समज आहे. नेमका याच वर्षी आमच्या खामगांवात तमाशा आला आहे. तमाशा अर्थात आनंद मेला. बऱ्याच इतर राज्यात आनंद मेला ला तमाशा, नुमाईश असे शब्द आहे. तर यंदा खामगांवात सुद्धा आनंद मेला दाखल झाला आहे. आनंद मेला गावांत आला की पाऊस पडत नाही अशी एक अंधश्रद्धा अनेक गावांमध्ये आहे. काही वर्षांपूर्वी तर खामगांवात आनंद मेला लोकांनी परतवून लावला होता. 

     आज अबालबुद्ध सर्वत्र पावसाची प्रतीक्षा करत आहे, परिस्थिती बिकट आहे, पेरण्या केव्हा होतील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल काही कल्पना करवत नाही. उकाड्याने सर्व त्रस्त झाले आहे, प्रदूषण एसी, सिमेंटचे रस्ते, जागोजागी लावल्या जात असलेले गट्टू यामुळे सर्वच शहरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. 

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त आहे, मानवी शरीराला सुद्धा पाण्याची जास्त गरज असते, पाणी हे सर्वांना प्रिय असते, हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा जलाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याला रत्न म्हटलेले आहे. 21 जून पासून पाऊस सुरू होणार असे वृत्त आज झाले आहे ते वृत्त खरे होवो म्हणजे 

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा

असा पाऊस न पडण्याचा तमाशा जनतेला पहावा लागणार नाही. तसेच 

हाय रे विश्वास मेरी हाय मेरी आशा || 

या गीतातील पुढील ओळी प्रमाणे सर्वच जाती धर्माच्या लोकांना ईश्वरावर भरोसा असतो, आशा असते. ईश्वर पावसाची वाट पहाणाऱ्या लोकांचा विश्वास खरा करो व त्यांची उशिराच खरा पण पाऊस येईल ही आशा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

११/०६/२०२६

Article on Tukaram Mundhe and his working style

 तुका झालासे कळस


कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले सकस अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे.

अन्न व औषधी प्रशासन या विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला आणि अन्न व औषधी प्रशासन हा सुद्धा एक विभाग असतो आणि हा विभाग अन्न आणि औषध यातील भेसळ, हॉटेलमधील पदार्थ तसेच हवाबंद पाकिटा मधील पदार्थ यांवर लक्ष ठेवून असतो हे अनेकांना प्रथमच ठाऊक झाले. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, कठोर शिस्तीचे आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. २००५ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असलेले मुंढे हे त्यांच्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धडक कारवायांसाठी महाराष्ट्रात 'युथ आयकॉन' आणि 'पीपल्स ऑफिसर' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कार्यशैली ही प्रामाणिक आणि शिस्तबद्ध आहे. ते कोणत्याही पदावर गेले तरी तेथील व्यवस्थेत सुधारणा घडवून आणतात. या प्रक्रियेत राजकीय नेते आणि भ्रष्ट घटकांचे हितसंबंध दुखावल्यामुळे "कुछ ही दिनो मे उनकी बदली हो जाती है, लेकीन इतनी बदलियो के बाद भी उनकी कार्यशैली नहीं बदली" त्यांच्या कारकीर्दीत म्हणजे २१ वर्षात  झालेली ही त्यांची पंचवीसावी बदली आहे. आजरोजी पावेतो त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यांमध्ये  विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, पीएमपीएमएल (PMPML) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,  दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव या पदांचा समावेश आहे आणि सद्यस्थितीत वर उल्लेखल्या प्रमाणे ते आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) या पदावर नियुक्त आहे.

     अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच  तुकाराम मुंढे यांनी धाडींचे सत्र  सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अन्न भेसळी बाबत,  अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्याबाबत बराच ऊहापोह होत आला आहे जनतेला कोणत्या पदार्थात कोणती भेसळ केली जाते,  कोणती फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर होतो हे सर्व ठाऊक आहे परंतु भेसळ करणाऱ्यांवर फक्त दिवाळी व सणासुदीच्या वेळेसच धाडी टाकल्या जातात इतर वेळेस मात्र काहीही कारवाई होत नाही. वास्तविक पाहता अन्न व औषध प्रशासन हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विभाग आहे. सरकारला जनतेच्या जीविताची, आरोग्याची काळजी असते किंवा त्यांनी ती करणे अपेक्षितच असते, त्यांची ती जबाबदारीच आहे.  कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले, सकस, भेसळ रहित अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे,  अनेकदा अन्नातून विषबाधा झाल्याची उदाहरणे ऐकायला येतात, विकतच्या पदार्थांमध्ये झुरळ, पाल, उंदीर आढळून येतात. मागे एकदा एका हॉटेलमध्ये अन्नात पाल दिसून आल्याचे वृत्त देशभर गाजले होते. परवाच ठाण्याला केक मध्ये सुया आढळून आल्या. अशा प्रकारची उदाहरणे हल्ली मोठ्या प्रमाणावर ऐकू येतात. तुकाराम मुंढे अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त होता बरोबरच त्यांनी धडक मोहीम हाती घेऊन अनेक ठिकाणी धाडी घातल्या. पदभार स्वीकारताच "मी जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही" असे म्हणत काही दिवसातच त्यांनी शेकडो ठिकाणी धाडी टाकून शंभर पेक्षा अधिक जणांना अटक केली. ८६ अस्थापना सील केल्या तर १ कोटी 58 लाख 26 हजाराचा भेसळयुक्त माल जप्त केला. या धाडींमध्ये गुटखा व्यवसायिक, दूध व्यवसायिक, फळ विक्रेते, हॉटेल चालक इत्यादींचा समावेश आहे. तसेच पतंजली ला सुद्धा दणका बसला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असे धाडसत्र राबवले गेले असावे. त्यांच्या या धडक कारवाई मुळे गुटखा तस्कर , भेसळ करणारे, रासायनिक द्रव्याद्वारे फळे पिकवणारे यांचे धाबे दणाणले आहे.      

      तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीही त्यांच्या आधीच्या विभागांमध्ये त्यांची कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा तसेच जनतेसाठीचे कार्य या गोष्टी सिद्ध केल्या आहेत आणि आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची सुरू असलेली धडाकेबाज मोहीम या सर्व गोष्टींमुळे इतर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहे शिवाय त्यांनी स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या मांदियाळी बाबत अभंग लिहितांना संत बहिणाबाई यांनी तुकाराम महाराजां बाबत "तुका झालासे कळस" असे वर्णन केले आहे त्याचप्रमाणे इतर भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तुलनेत व त्यांच्या मांदियाळीत जनहितार्थ कार्य, कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता, याबाबतीत मुंढे यांनी जणू उत्तुंग शिखर सर केले आहे. म्हणूनच त्यांच्या बाबतीत सुद्धा तुका झालासे कळस असे म्हणावेसे वाटते. तुकाराम मुंढे यांची कारवाई स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे. तुकाराम मुंढे यांचा सारखा कित्ता जर किमान पन्नास टक्के प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांनी गिरवला तरी या भारतात मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल.

ता. क. - नेपाळ सारख्या छोट्या व आपल्या लगतच्या देशाने सुद्धा रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे पिकवले जात असल्यामुळे भारतीय आंब्यांवर बंदी घातली आहे. त्यांनी भारतातून  त्यांच्या देशात होणाऱ्या आंबे आयातीवर रोक लावली आहे. ही आपल्या देशाची नामुष्की नाही का ? 

०४/०६/२०२६

Article about Maharashtra government scheme ladki bahin scheme

 सौ मे से अस्सी बेईमान....

अर्ज करणाऱ्या ८० लाख लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज पडताळणी नंतर  या अपात्र धनदांडग्या अर्जदारांच्या  इतक्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत की त्या अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  

         खूप वर्षांपूर्वी प्रवासात असतांना एका ट्रकच्या मागे लिहिलेले "सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान" असे एक वाक्य वाचले होते. ते वाक्य मनाला खूप भिडले होते. म्हणूनच ते लक्षात राहिले. आज ते वाक्य आठवले याचे कारण म्हणजे ८० हा आकडा आणि ८० आकडा आठवण्यास निमित्त ठरले ते लाडकी बहीण योजनेचे ८० लाख अर्ज अपात्र झाल्याचे वृत्त वाचण्याचे. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली याचा पुरेपूर फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. योजना सुरू झाली योजनेवर बहिणींनी आणि काही प्रत्यक्षात भाऊ असलेल्या परंतु लिंग न बदलता बहीण झालेल्या अशा डुप्लिकेट बहिणींनी फुकट पैसे मिळतात म्हणून उड्या मारल्या. फुकटचे काहीही मिळत असले की भारतीयांच्या उड्या पडतातच हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सरकारकडून काही मिळत असले की ते लाटण्यासाठी ज्या लोकांना त्याची काहीही आवश्यकता नसते अशा सुखवस्तू कुटुंबातील लोक सुद्धा काहीही विचार न करता त्या योजनांसाठी अर्ज दाखल करतात. ज्यांच्या घरी  खायप्यायची काही कमी नाही तेही लोक अशा फुकटछाप शासकीय योजनांवर उड्या मारतात. तसेच लाडकी बहीण योजनेतही झाले. ते होणारच होते याचा अंदाज होताच. योजना सुरू होताच करोडो अर्ज दाखल झाले परंतु जेव्हा सरकारी तिजोरीवर त्याचा बोजा वाढू लागला तेव्हा अर्जाची छाननी सुरू झाली आणि त्यामध्ये ८० लाख अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले. राज्यास २४ हजार ३०० रुपयांचा फटका बोगस बहिणींनी दिला. ८० लाख अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी निर्लज्जपणे येन केन प्रकारेण या योजनेत अर्ज दाखल केले. ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून सुरुवातीला सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर अर्ज स्वीकारले होते परंतु पडताळणी नंतर अनेक धक्कादायक अशा बाबी समोर आल्या. यातील काही धनदांडग्या अर्जदारांच्या तर इतक्या धक्कादायक बाबी आहेत की त्या लाडकी बहीण अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  त्यांच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सादर केलेल्या असत्य बाबी ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्यालाच लाजवतात अशा आहे. 

     या अपात्र केलेल्या लाडकी बहीण अर्जदारांमध्ये  १४ हजार अर्ज तर पुरुषांचे आहेत. म्हणजे महिला असल्याचे भासवून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि सरकारची फसवणूक केली. याहीपेक्षा पुढची उदाहरणे तर तोंडात बोट घालायला लावतील अशी आहे. 

     80 लाख अपात्र अर्जांपैकी दहा लाख अर्जदार प्राप्तिकर भरणारे आहे. आता बोला ! पाच लाख अर्जदार हे सरकारी कर्मचारी कुटुंबातील आहे. म्हणजे कामचुकारी करायची, सरकारी पगारही घ्यायचा, वरकमाई सुद्धा करायची आणि फुकट छाप शासकीय योजनांचाही लाभ घ्यायचा (काही सन्माननीय अपवाद वगळून). अशा पद्धतीने आपल्याच पात्रात तूप ओढून घ्यायचे, देशाचे ओरबाडून ओरबाडून खायचे देशाला मात्र द्यायचे काही नाही. 

     या पाच लाख सरकारी कर्मचारी कुटुंबीयांपैकी काहीं जवळ तर चारचाकी वाहने सुद्धा आहेत. म्हणजे बघा सर्व बाजूंनी देशाला कसे ओरबाडणे सुरू आहे, देशाचा पैसा असा लुटणे सुरू आहे. 

    लोकांना असे खोटे अर्ज सादर का करावेसे वाटतात त्याचीही अनेक कारणे आहेत. सर्वच लोक तर फायदा करून घेत आहेत तर मग मी का नाही करू ? नेते तर गब्बर होत आहे तर मग मी का नाही घेऊ ? पैसा तर सरकारीच आहे अशी मानसिकता नागरिकांची हळूहळू होऊ लागते आणि त्यातून मग अशा प्रकारे खोटे अर्ज सादर होत असतात

     या सरकारी फुकटच्या योजनांचा लाभ जे खरे लाभार्थी असतात त्यांना न होता जे बोगस लाभार्थी आहे तेच जास्त करून घेतात असे कित्येक वेळा समोर आलेले आहे. तरीही आपल्या देशातील नेते सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रकारची आमिषे जनतेला देत आले आहे आणि सत्तेचा मार्ग मोकळा करून घेत आले आहे हेच स्वातंत्र्यापासून सुरू आहे. तसे पाहता कोणतेही सरकार हे सर्वसामान्यांसाठी जनहिताच्या योजना राबवत असते परंतु त्या योजनांचा कोणी गैरफायदा घेणार नाही याचासुद्धा विचार सरकारने करायचा असतो. गैरफायदा घेतलाच तर त्याला अटकाव व कठोर कारवाई सुद्धा असायला हवी. फुकटछाप योजना ह्या दूरगामी विचार करता देशाच्या हिताच्या नसतात. परंतु देशाचे हित कोण पाहते? म्हणूनच तर लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख अर्ज अपात्र ठरले आहे. जनता सुद्धा भ्रष्ट मार्ग अवलंबून योजनांचा गैरफायदा करत आहे, अनुदान लाटत आहे. लाडकी बहीण योजना बोगस लाभार्थींच्या अर्जांची आता पुन्हा छाननी, चौकशी होईल. या  कार्यात सरकारी पैसे आणि सरकारी श्रम, वेळ यांचा व्यय होईल म्हणजे योजना लागू करूनही नुकसान मात्र सरकारचेच असे होणार आहे. बोगस लाभार्थीं कडून पैसे वसूल केले जातील असे म्हटले जात आहे. पैसे तर वसूल केलेच पाहिजे कारण ते जनतेचे आहे. शिवाय कायद्यात सुद्धा तरतूद केली पाहिजे. सरकारी कर्मचारी, प्राप्तिकर दाते, चार चाकी वाहन असणारे अशा लोकांनी जर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस अर्ज दाखल केलेच तर त्यांच्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाईचा असा एक कायदा निर्माण केला जावा जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, जनतेचे पैसे असे उधळले जाणार नाही, जनतेचा पैसा बोगस लाभार्थी लुटून घेणार नाही. दिवसेंदिवस बोगस लाभार्थी, भ्रष्ट लोक वाढत चालले आहे लाडकी बहीण योजनेचे 80 लाख बोगस लाभार्थी आढळल्याने पुनश्च हेच सुतोवाच करावेसे वाटते की,

सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान

टीप - अनेक प्रमाणिक, देशीहितैशी, श्रमिक असे नागरिक, सरकारी कर्मचारी, नेते आजही थोडे का होईना परंतु आहेत मात्र नक्की. अशा लोकांमुळेच हा देश टिकून आहे. अशा सन्माननीय लोकांनी या लेखातून स्वतःला वगळावे.

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगांव