Click "Follow" Button below To Follow this Blog

२९/०८/२०२४

Article about falling if Shivaji Maharaj statue and politics and allegation

पक्ष कार्यकर्ते की गुंडांची टोळकी ?

इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते.

राजकोट किल्ल्यावरचा आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि एकच गदारोळ महाराष्ट्रात सुरू झाला. ज्या छत्रपतींचे किल्ले अद्यापही शाबूत आहे त्याच छत्रपतींचा पुतळा इतक्या अल्पावधीत कोसळावा ही खरोखरच दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. हा पुतळा कोसळल्यावर तो कोणी उभारला ?  मूर्तिकार कोण ? कंत्राटदार कोण ? लोखंड किती वापरले गेले होते ? आदी बाबींवर उहापोह होण्यास सुरुवात झाली. या गोष्टीचे राजकारण जर झाले नाही तर नवलच आणि ते राजकारण पण सुरू झाले. काल राजकोट किल्ल्यावर मोठे महानाट्य झाले. ठाकरे गट आणि भाजपा मध्ये राजकोटच्या पवित्र भूमीत मोठी हाणामारी झाली. राजकोटला प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नारायण राणे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे असे नेते पोहोचले. जयंत पाटील सुद्धा होते. या नेत्यांच्या गटांकडून महाराष्ट्राला अशोभनीय अशा अर्वाच्य भाषेत एकमेकांना , एकमेकांच्या नेत्यांना हिणवण्याचा प्रयत्न झाला. पेंग्विन, कोंबड्या चोर, अंगार, भंगार अशी घोषणाबाजी झाली. आमचा इतिहास ठाऊक नाही का ? ( या वाक्यात ते अप्रत्यक्षरीत्या स्वतःच सांगत आहे की ते कोण होते ) , एकाही घरात जाता आले नसते, घरात घुसून एकेकाला मारून टाकेन, शिवसेना राडे करूनच पुढे आली , उद्धव ठाकरे यांना काही समजत नव्हते , आदित्य शेंबडा होता. असेही राणे यांनी धमकावले व हिणवले. नारायण राणे यांनी आव्हान दिल्यावर आणखीनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते. हा गदारोळ पाहून महाराजांच्या आत्म्याचा किती तळतळाट झाला असेल, त्यांना किती वेदना झाल्या असतील. बरं, महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून हे कार्यकर्ते तिथे गोळा झाले होते त्याच ठिकाणी, महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरच यांच्या हमरीतुमरीने, झटापटीमुळे, लोटपोटिने किल्ल्याची सुद्धा हानी झाली, मोडतोड झाली, किल्ल्याला क्षती पोहचली. या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटते की, पुतळा कोसळला म्हणून तेथे एकत्र यायचे आणि किल्ल्याची हानी करायची. हे असे कसे यांचे छत्रपतींवरचे प्रेम ! जनतेने तमाम राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांना आता पुरते ओळखले आहे म्हणून लोकसभेच्या गत निवडणूकीत मतदार मतदान केंद्राकडे फिरकलाच नाही. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूकीत सुद्धा संमिश्र असे निकालच पाहायला मिळतील असे वाटते. पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात मोठा फरक आहे आताची पिढी ही हुशार आहे, त्यांना राडे नको आहे तर त्यांना विकास पाहिजे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपल्या पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत, देशाचा विकास करायचा आहे की निव्वळ फुकटचे पैसे वाटून मते मिळवायची आहेत आणि सत्ता उपभोगायची आहे यावर त्यांचे चिंतन होणे जरुरी आहे, कारण देशाचा खजिना लुटून मध्यमवर्गीयांनी आणि व्यापाऱ्यांनी भरलेल्या कराचे पैसे खुशाल उधळणे हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. सत्तेसाठी महाराष्ट्रात चाललेले राजकारण सुज्ञ जनतेस पटलेले नाही याचे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चिंतन करायला हवे. त्यांनी संयमित राहणे जास्त शोभानीय आहे व त्यांनी संयमित भाषा वापरायला हवी, तोलून मापून बोलायला पाहिजे. जरांगेंनी जेष्ठ नेत्यांबाबत बोलतांना अरे-तुरेची भाषा वापरणे सुरू केले. आता सर्वच नेत्यांनी एकमेकांना अरे-तुरेत बोलणे सुरू केले आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे योग्य नव्हे. या अशा प्रकारच्या वागण्यामुळे नेत्यांच्या भाषेमुळे कार्यकर्ते सुद्धा भरकटले, नेत्यांची आजची एक भूमिका आणि उद्याची वेगळी यामुळे ते संभ्रमात पडत आहे. आपल्या नेत्याची तुला पाहून घेईल, तू राहशील नाहीतर मी या प्रकारची धमकीवजा वक्तव्ये पाहून या तरुण कार्यकर्त्यांचेही  भान हरपत आहे, त्यांचे हात शिवशिवत आहेत. त्यांच्या अंगातील जोमाला, जोशाला आपले नेते गुंडगिरीकडे वळवण्याचे काम करीत आहेत. कालच्या राजकोटला सर्वच मोठ्या पक्षांच्या उपस्थिती झालेल्या राड्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असे राडे करणारे राजकीय पक्ष कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा जनतेनेच त्यांच्या मतदानाच्या अधिकारातून आगामी निवडणुकीद्वारे या नेत्यांना दिले पाहिजे.

०८/०८/२०२४

Article about Khamgaon water problem.

खामगांव पाणी पुरवठा यंत्रणा
ज्ञानगंगा धरणात बुडवून टाका

भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा संघ समुद्रात बुडवून टाकावा आणि भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष विसर्जित करावा अशी दोन प्रसिद्ध विधाने आहेत. या दोन्ही विधानांप्रमाणे खामगाव पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा ज्ञानगंगा धरणात बुडवून टाकावी असे खेदाने म्हणावेसे वाटते.

पाणी समस्या ही खामगावकरांच्या पाचवीला पुजलेली आहे. आजरोजी पावेतो खामगावच्या पाणी समस्येबद्दल माझे अनेक लेख लिहून झाले आहेत. खामगाव शहरात असलेल्या पक्क्या पाण्याच्या अशा वीस विहिरींची यादी सुद्धा वृत्तपत्रातून जाहीर केलेली आहे तसेच ती नगर परिषद माजी मुख्याधिकारी यांना सुध्दा दिली होती. परंतु तरीही या लेखांनी विशेष असा काही परिणाम झाल्याचे जाणवले नाही. नागरिकांनी तेवढे कौतुक केले खरे परंतु प्रशासनाने मात्र त्या लेखांची काहीही एक दखल घेतल्याचे दिसले नाही. (पाणी समस्यांचे माझे इतर लेख माझ्या ब्लॉगवर वाचक शोधू शकतात.) यंदा पावसाळा चांगला सुरू आहे. या चांगल्या सुरू असलेल्या पावसाळ्यात चातकाची तहान नक्कीच भागली असेल पण खामगांवकर मात्र नळाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पहात बसलेले असतात, स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या पाणीपुरवठाच्या वेळापत्रकाकडे डोळे ठेवून असतात. उन्हाळ्यात पण तेच आणि पावसाळ्यात पण तेच. नागरिक पाण्याअभावी अगदी हवालदिल होऊन गेलेले आहेत परंतु कोणी काही बोलत नाही. गेल्या 10 दिवसांपासून खामगावचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. नेहमीप्रमाणेच यंत्रणेत बिघाडाचे कारण सांगितले जात आहे. आमच्या भागातील पाणीपुरवठा हा 28 जुलै रोजी झाला होता त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे आजरोजी पर्यंत नळाला पाणी आलेले नाही. खामगावच्या पाणीपुरवठा यंत्रणेत एवढा बिघाड कसा काय होत राहतो ? हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. कधी बूस्टर पंपात बिघाड तर कधी पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड, कधी विद्युत पुरवठ्याचे कारण तर कधी पाईपलाईन फुटल्याचे. पाणीपुरवठा जेव्हा विस्कळीत होतो तेव्हा अशी नाना कारणे सांगितली जातात. मला आश्चर्य वाटते की मुंबई, पुणे वा आणखी इतर मोठ्या शहरांमध्ये पाणीपुरवठा कसा होत असावा? तिथे  कधी  खामगाव शहरात येतात तशा व तितक्या पाणीपुरवठ्याच्या नाना प्रकारच्या समस्या येत असल्याचे कधी काही ऐकिवात आले नाही. शहरातील माझ्या मित्रांशी याबाबत बोललो असता त्यांनी सुद्धा धरणात जर का पाणी असेल तर आमच्याकडे व्यवस्थित पाणी येत असल्याचे सांगितले. माझ्या एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्राला मी एकदा विचारले की तिकडे पाणीपुरवठा कसा होतो ? तो तिथे गेल्या अनेक वर्षापासून राहतो. त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की, "रोज नळ येतात पण पाईपलाईन कुठून आहे, नळाला पाणी कोण सोडते, कुठून सोडते हे अजूनही आम्हाला कळलं नाही, कधी कुठे पाईपलाईन दुरुस्तीचे कामही दिसले नाही किंवा कधी कुठे पाईपलाईन फुटलेली ही दिसली नाही फक्त आमच्याकडे नळाला पाणी मात्र नियमित येत असते एवढे आम्हाला पक्के माहित आहे. पण आपल्या भारतात आणि त्या अनुषंगाने खामगावात धरणामध्ये पाणी असून सुद्धा नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. खामगावसारख्या काही ठिकाणी तर पाणी समस्या इतकी अंगवळणी पडली आहे की आता तर लोकांना 15-15, 20-20 दिवस पाणी आले नाही तरीही काही वाटत नाही. खामगाव शहराला पूर्वी जनुना तलावावरून पाणीपुरवठा होत असे. ती पाईपलाईन अद्यापही आहे, ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते व शहराच्या अगदी लगतच्या मोठ्या जलसाठ्याचा लाभ खामगांवकरांना होऊ शकतो. पण त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. सध्या ज्ञानगंगा धरणातून खामगावला पाणीपुरवठा सुरू आहे. आता खामगावची लोकसंख्या वाढली, पाण्याची मागणी अधिक होऊ लागली आहे. पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगावला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती म्हणून तेंव्हा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला तो आजतायागात कायमच आहे. त्यातच कधी बूस्टर पंप खराब होणे तर कधी पाईपलाईन फुटणे, विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने किंवा फांद्या कोसळल्याने धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणे व त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, तर कधी बिबट्याच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा कार्यासाठी न जाणे, यंत्रणेत बिघाड होणे अशा अनेक समस्या खामगावचा पाणीपुरवठा करताना येत असतात. त्या जाहीर झाल्यावर नागरिक मूकपणे आप-आपली पाण्याची व्यवस्था करतात. कुणी टँकर, कोणी कॅन तर कुणी लीक झालेल्या व्हॉल्व वरून आपली पाण्याची गरज भागवतात. पूर्वी पाणी नसले की घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा असे किमान ऐकू तरी यायचे, वृत्तपत्रातून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांच्या बातम्या वाचनात यायच्या, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे गा-हाणे मांडले जायचे पण आता खामगांवकरांना विस्कळीत पाणी पुरवठा इतका अंगवळणी पडला आहे की उपरोक्त मागण्या सुद्धा आताशा होणे बंद झाले आहे. 

भारतीय क्रिकेट बोर्ड का संघ हा समुद्रात बुडवून टाकावा अशा आशयाचे विधान बिशनसिंग बेदी यांनी एकदा केले होते तसेच भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष सुद्धा विसर्जित करावा असे विधान गांधीजींनी केले होते. या दोन्ही विधानांप्रमाणे तसेच खामगाव पाणीपुरवठ्यात येणाऱ्या नाना अडचणींमुळे व कुचकामी यंत्रणेमुळे खामगाव पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा खामगावला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्ञानगंगा धरणात बुडवून टाकावी असे खेदाने म्हणावेसे वाटते.

२५/०७/२०२४

Article about Marathi poem by poorvi bhave for first standard

"वन्स मोअर" चा "शोर" 

पहिलीच्या मराठी कवितेबाबत प्रतिक्रिया देतांना मंत्री महोदय म्हणतात की, " प्रॅक्टिकल राहायला पाहिजे" ही प्रतिक्रिया देतांना सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल या शब्दाला मराठीतील व्यवहारीक हा पर्यायी शब्द आठवला नाही. 

महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात "जंगलात ठरली मैफल" कवितेत माऊस, वन्स मोअर हे इंग्रजी भाषेतील तसेच शोर हा हिंदी भाषेतील शब्द आल्याचे वृत्त परवा विविध वाहिन्यांवर सुरु होते. आपली मराठी भाषा, माय मराठी, माझी मराठी, आम्ही मराठी, मराठी माणूस, मराठी शाळा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, सरकारी कार्यालयांचे कामकाज मराठीतून करा, दुकानांवर मराठीत पाट्या लावा. अशा मागण्या, मुद्दे व मराठी भाषेबाबतचा ऊहापोह हा अनेकदा होत असतो. प्रत्यक्षात शुद्ध मराठी बोलतांना किंवा बोलायचे झाले तर आपली त..त.. , प..प होते, विशेषतः हल्लीच्या इंग्रजाळलेल्या पिढीची तर होतेच होते. बालभारतीच्या इयत्ता पहीलीच्या मराठीच्या पुस्तकातील नृत्यांगना व निवेदक असलेल्या पूर्वी भावे यांच्या कवितेबाबत व त्या कवितेत वापरलेल्या इंग्रजी व हिंदी भाषेतील शब्दांबाबत बोलतांना शिक्षण मंत्री केसरकर साहेब काय म्हणाले ते प्रथम वाचा, केसरकर साहेब म्हणतात  "वन्स मोअर ला पर्यायी शब्द आहे का ? शेवटी यमक जुळवण्यासाठी एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार बाऊ केला पाहिजे असे नाही. आपण टेबल हा शब्द वापरतो हा शब्द मराठी आहे का. मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द आहेत त्याला पर्यायी शब्द आलेले नाहीत. त्यामुळे आपण थोडं प्रॅक्टिकल राहायला पाहिजे" दीपक केसरकर साहेबांनी अशी प्रतिक्रिया काल दिली. आपल्या मातृभाषेबाबत मंत्री महोदय म्हणतात की प्रॅक्टिकल राहायला पाहिजे ही प्रतिक्रिया देताना सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल या शब्दाला मराठीतील व्यवहारीक हा पर्यायी शब्द आठवला नाही. असे त्यांचेच नव्हे तर अनेकदा आम्हा सर्व मराठी जनांचेही हल्ली होत असते. हा दोष आपलाच आहे. देशातील इतर भाषिकांपेक्षा मराठी माणसाचे भाषा प्रेम हे थोडे कमीच आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. केसरकर म्हणतात की टेबलसारख्या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाही. यावर असे सांगावेसे वाटते की, कोण म्हणते पर्यायी शब्द नाही ? ते तर फार पूर्वीपासून आहेत. परंतु इंग्रजाळलेल्या नवीन पिढीला टेबलला मेज म्हणतात असे कोणी शिकवलेच नाही. घरी सुद्धा कोणी मेज म्हणत नाही आणि शाळेत सुद्धा त्याला कोणी टेबल म्हणजे मेज असे शिकवत नाही. वन्स मोअरला आपण "पुन्हा एकदा" असे म्हणू शकतो. शिवाजी महाराजांनी त्या काळात मराठी शब्दकोश केला होता. सावरकरांसारख्या अनेक  भाषाप्रभू व्यक्तींनी कितीतरी इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिलेले आहेत परंतु त्याचा वापर करण्यात आपण कमी पडतो. केवळ मराठी दिनापुरतेच  मराठीचे गोडवे गायचे आणि इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठीत पर्याय नाही असे म्हणायचे हे चुकीचेच आहे. मराठी शब्दांचा वापर करण्यात आपण कमी पडतो असे म्हणण्याचे कारण की, बरेचदा आपण बाजारपेठेत, प्रवासात असतांना कुणी व्यक्ती भेटल्यास किंवा दुकानदाराशी संवाद साधताना मराठी असूनही आपण हिंदीत/इंग्रजीत  बोलण्यास सुरुवात करतो. काही वेळा तर आपण हिंदीत बोलतो व त्यास समोरच्याकडून मराठीत प्रतिसाद येतो. मग आपल्याला तो व्यक्ती मराठी असल्याचे कळते. कधी-कधी तर हिंदी भाषिक आपल्यासोबत मराठीत बोलतो पण आपणच हिंदी बोलू लागतो. याचा अर्थ हिंदी ही आपली राष्ट्रभाषा बोलूच नाही किंवा तिचा द्वेष करावा असा नाही परंतु बोलतांना प्रथम आपल्या मातृभाषेचा प्रयोग करायला हवा. मराठी बोली भाषेत हल्ली इंग्रजी भाषेतील व हिंदी भाषेतील शब्दांची इतकी सरमिसळ झाली आहे की आपल्याला त्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुद्धा आठवत नाही. म्हणूनच केसरकर साहेबांनी टेबल या मराठीत मिसळलेल्या शब्दाचे उदाहरण दिले. टेबल व टेबल सारखे पेन, बाईक, माईक, ऑफिस, कॉलेज, फोटो इत्यादी अनेक शब्द मराठी भाषेत इतके मिसळले आहेत की आपण टेबलला असलेला मेज हा पर्यायी शब्द कधीच वापरत नाही. तसेच बाईकला दुचाकी, माईकला ध्वनिक्षेपक, ऑफिसला कार्यालय आणि कॉलेजला महाविद्यालय सुद्धा अभावानेच म्हणतो. फोटोला कुणी छायाचित्र व true copy ला कोणी सत्यप्रत म्हटले तर त्याच्याकडे असे पाहिले जाते जणू काही तो कोणती दुसरी भाषा बोलतो आहे की काय ! मुद्दा हा आहे की मराठी भाषेमध्ये अनेक नामवंत कवी होऊन गेले असतांना व त्यांच्या शुद्ध मराठीत असलेल्या अनेक कविता असतांना भाषा विषयाची समिती असे इंग्रजी व हिंदी शब्द असलेली मराठी कविता अभ्यासक्रमात निवडतेच कशी ? अगदी लहानपणी हिंदी व इंग्रजी शब्द असलेली मराठी कविता विद्यार्थी शिकतील मुखोद्गत करतील तर त्यांना शोर, माऊस, वन्स मोर हे शब्द मराठीच शब्द असल्याचे वाटणार नाही का? असा प्रश्न पडतो. पुर्वी बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांच्या मध्ये खूप सुंदर अशा कविता असायच्या की ज्या आजही अनेकांच्या मुखोद्गत आहे. 

तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड झाडावर धिवराची हाले चोच लाल जाड 

तसेच रोपट्या विषयीची ही पुढील कविता 

आज ये अंगणा पाहुणा गोजिरा, ये घरा आमुच्या सोयरा साजरा 

व ही पुढील बालकविता

वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणाटणा वाटेत भेटला तिळाचा कण 

अशा कितीतरी सुंदर कवितांचा अभ्यासक्रमात  समावेश असे. परंतु हल्लीच्या अभ्यासक्रमात विषय समित्या कविता, पाठांची निवड कशी करते ? त्यासाठी कोणते निकष असतात ? ते जाहीर होणे गरजेचे झाले आहे. ज्ञानेश्वर माऊली, केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे, टिळक, आगरकर, सावरकर, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मराठी शाळा मरणासन्न स्थितीत आहे. इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झाला आहे. मराठी शाळांमधल्या शिक्षकांवर गंडांतर आलेले आहे. इंग्रजी शाळेतल्या मराठी बाबूला एकोण ऐंशी म्हटले की समजत नाही त्याला सेव्हंटी नाईन असे सांगावे लागते अशी स्थिती आहे. भाषा टिकवण्याची आपणा सर्वांचीच तसेच शासनाची सुद्धा जबाबदारी आहे. मंत्री महोदयच जेंव्हा मराठी भाषेत इंग्रजी व हिंदी शब्द आले असता त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाही म्हणून थोडे प्रॅक्टिकल (त्यांच्या भाषेत) अर्थात व्यवहारीक व्हावे लागेल असे म्हणतात तेव्हा आगामी काळात "माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके" असे ज्या मराठी भाषेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केले होते त्या मराठी भाषेची काय दशा असेल असा प्रश्न मराठी भाषिक मराठी प्रेमी असलेल्या जनतेच्या मनात निश्चितच उपस्थित होत असेल.

११/०७/२०२४

Article about cleanliness

मुसळधार वृष्टी आणि गाडी नंबर 716


कर्तव्यदक्षता हा शब्द अधिका-यांच्याच बाबतीत वापरला जातो परंतू इतरही अनेक कर्मचारी जे उच्च पदावर नसतात पण कर्तव्यतत्पर असतात. त्यांचा गौरव, सन्मान क्वचितच होतांना दिसतो, समाजा कडून अशा छोट्या पदांवर असलेल्या व कर्तव्यदक्ष कर्मचा-यांचा सुद्धा गौरव होणे अपेक्षित असते.

यंदाच्या सहा जुलैच्या दुपारी आकाश काळ्या मेघांनी आक्रमून आले होते. त्रस्त होत असलेल्या उकाड्यामुळे समस्त जनांना हे घन केंव्हा बरसतात याची प्रतिक्षा होती, अन ते जे बरसू लागले ते थांबले आठ जुलै 24 रोजी. वातावरण गारठले, विशेष म्हणजे विद्युत पुरवठा सुरळीत होता. मी 8 जुलै रोजी सकाळी पावसाचा मस्त आनंद घेत भिजत होतो तेवढ्यात दूरवरून परिचित असा घंटीचा आवाज कानी पडू लागला. सोबतच "स्वच्छ भारत है हमारा" हे गीत सुद्धा ऐकू येत होते आणि थोड्याच वेळात आमच्या घरासमोर नगर परिषदची कचरा गोळा करणारी गाडी येऊन उभी राहिली. मला आश्चर्य वाटले, एवढ्या जोरात सुरू असलेल्या पावसात सुद्धा घंटागाडी घेऊन फिरणारे ते कर्मचारी आमच्या घरासमोर कचरा गोळा करण्यासाठी म्हणून हजर झाले होते. मला त्यांची ती कर्तव्य तत्परता खूप भावली आणि प्रेरित सुद्धा करून गेली. एरवी कर्तव्यदक्षता हा शब्द अधिका-यांच्याच बाबतीत वापरला जातो परंतू इतरही अनेक कर्मचारी जे उच्च पदावर नसतात परंतू कर्तव्य तत्पर असतात पण त्यांचा गौरव, सन्मान क्वचितच होतांना दिसतो, त्यांची दखल त्या मानाने कमी घेतली जातो. समाजाकडून अशा छोट्या पदांवर असलेल्या व कर्तव्यदक्ष असलेल्या कर्मचा-यांचा सुद्धा गौरव होणे अपेक्षित असते. असेच आणखी एक उदाहरण मला त्याच दिवशी मिळाले. त्या दिवशी माझी बहीण अगदी सकाळी खामगांवला आली होती पावसात त्यांची बस पुरामुळे थांबली असता चालकाने त्याला दररोज भर पहाटे त्याच्या खेड्यातून बस स्टँडवर कर्तव्य बजावण्या करता हजर राहावे लागते ते प्रवाशांशी झालेल्या चर्चेत सांगितले. भर पावसात भल्या पाहटे खेड्यातून शहरात ड्युटीवर हजर होणारा तो व त्याच्यासारखे इतरही अनेक चालक/वाहक यांना कधी आपण कुणी "आभारी आहे" असे सुद्धा म्हणत नाही. ते दोघे कचरा गोळा कर्मचारी सुद्धा भर पावसात सकाळी घरून निघून त्यांचे कर्तव्य बजावत होते म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मी त्यांना दोन मिनिटे थांबण्याची विनंती केली, त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेतलेली पाहून आनंद झाला, तो त्यांच्या मुखावर दिसू लागला.  आमच्या भागात बरीच वाहने असतात तरी या घंटा गाडीचे चालक गाडी रिव्हर्स फॉरवर्ड करून प्रत्येकाच्या घरासमोर आणतात हे माझे निरीक्षण मी त्यांना सांगितले असता ते आणखीनच खुलले. त्यांचा फोटो काढला व थोडीफार चौकशी केली असता त्यांनी विचारले की,  "सर तुम्ही आमची माहिती का विचारत आहात ?" "सकाळपासून जोरात सुरू असलेल्या पावसात तुम्ही तुमचे कर्तव्य बजावत आहात म्हणून." अनेकदा आपण पाहतो की थोडासा जरी पाऊस असला तर त्याही पावसाचा बहाणा बनवून काम पुढे ढकलले जाते, कर्तव्यात कसूर केल्या जाते. पण ती दोघे मात्र त्यांचे काम चोखपणे करत होते. आणखी थोडा वेळ आमचा संवाद पावसातही चाललाच होता. त्यांना मी लेखक असल्याचे सांगितल्यावर ते मला म्हणाले सर तुम्ही जर आमच्या बाबत लिहिले तर आमचा गाडी नंबर व प्रभाग नंबर पण टाकालं का? "का नाही मी तर तुमचे नांव सुद्धा टाकेल" मी उत्तरलो व त्यांचे नांव सुद्धा विचारून घेतले. ते निघून गेल्यावर कर्म, कर्मफल, सहेतूक कर्म, कर्तव्य इ . बाबतचे विचार माझ्या मनात बराच वेळ घोळत राहिले. माझी पण शाळेची वेळ जवळ येत होती, मला सुद्धा वेळेवर पोहचायचे होते म्हणून मी पुढील कार्यात मग्न झालो. शाळेत जातांना

"विमोह त्यागून कर्मफलाचा, सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था" 

हे सुधीर फडके यांनी गायलेले जुने मराठी गीत आठवू लागले. पुढे मी माझ्या कामात व्यस्त झालो. शाळेतून घरी आल्यावर त्यांनी सांगितलेला प्रभाग क्रमांक चार आठवला, माझ्या मुलाने त्यांची नांवे वहीत लिहून ठेवली होती. त्या गाडीचे चालक संतोष मुळीक व मदतनीस दिनेश गोहर होते. पण त्यांनी सांगितलेला गाडी नंबर काही आठवेना. सायंकाळी पुन्हा बाहेर पडलो असता थोडा पाऊस सुरू झाला एक गाडी माझ्या समोर होती त्या गाडीचा क्रमांक 716 होता.  "अरे ! हाच तर तो त्या सकाळच्या घंटा गाडीचा नंबर." मनातल्या मनात मी उद्गारलो. सकाळच्या पावसाच्या वेळी त्यांनी सांगितलेला नंबर मला सायंकाळच्या पावसाच्या वेळी आठवला. घंटागाडीवाले ते दोघे संतोष मलिक व दिनेश गोहर यांची कर्तव्यदक्षता, प्रभाग क्रमांक चार, मुसळधार पाऊस आणि गाडी क्रमांक 716 हे आता दीर्घकाळ पर्यंत माझ्या स्मरणात राहतील असे मला वाटू लागले.

०४/०७/२०२४

Article about amitabh bachchan song, and Miller of the Dee poem

हर हसीं चीज का मैं तलबगार हूं |


सुलभ कर्ज सुविधेमुळे प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे वरून जरी आनंद दिसत असला तरी आत प्रचंड तणाव असतो. आज आपल्या देशात भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पण आनंदी लोकांच्या जागतिक यादीत मात्र आपण खूप पिछाडीवर आहोत. 

खरे तर तो एक अल्पउत्पन्न गटात मोडणारा खेडूत, खजूरच्या झाडांपासून निघणा-या रसापासून गुळ बनवून तो विकण्याचा व्यवसाय करणारा. अगदीच सर्वसामान्य असा. अमिताभच्या वाट्याला अशा भूमिका क्वचितच आल्या आहेत. सौदागर या राजश्रीच्या चित्रपटात अमिताभने गुळ विक्रेत्याची भूमिका साकारली होती, त्याच चित्रपटातील “हर हसीं चिज का मै तलबगार हूं” हे गीत मला गत रविवारी मलकापूर जवळच्या वडनेर भोलजी या गावापासून जवळच असलेल्या निंबोडा देवीच्या निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आठवले. सौदागर एक क्लासिक सिनेमा. त्यातील हे गीत संगीतप्रेमी, दर्दी लोकांना आता आठवले असेलच. या गीतात गुळ विकणारा अमिताभ किशोरकुमारच्या आवाजात व रविंद्र जैन यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतात स्वत:चे वर्णन करतांना तो कसा रसिक आहे, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद मानून जगणारा आहे,  ज्याने गुळ बनतो त्या रसाचा, जीवनातील विविध रसांचा, फुलांचा, गीतांचा तो कसा “बिमार” आहे हे व्यक्त करतो. त्याच्या आनंदी वृत्तीने जगण्याच्या, तो करीत असलेल्या कामावर प्रेम व त्यात आनंद मानण्याच्या जगण्याच्या त-हेमुळे गावातील लोक त्याला “रसिया” म्हणतात असेही तो सांगतो. याच गीताच्या ओळी मग मी एक फोटो पोस्ट करतांना कॅप्शन म्हणून वापरल्या. त्या ओळी अनेकांना भावल्या हे त्या गीतकाराचे महात्म्य. तो फोटो व त्याला दिलेले ते "हटके" असलेल्या जुन्या श्रवणीय गीताच्या मुखड्याचे कॅप्शन पाहून धनंजय टाले या माझ्या मित्राने परगावाहून संवाद साधला. सौदागर हा त्याचा व माझाही अतिशय आवडता सिनेमा. मग आम्ही साधी जीवनशैली, समाधानी वृत्ती आदींवर खुप बोललो त्यावरूनच मग त्याला “मिलर ऑफ द डी” ही आनंदी वृत्तीने जीवन व्यतीत करणा-या त्याच्या वडिलांनी फार पुर्वी सांगितलेल्या एका चक्कीवाल्याच्या  जीवन जगण्याच्या पद्धतीवर आधारीत कवितेची आठवण सांगितली. त्याच्या स्मृती जागृत झाल्यावर मग माझ्याही विस्मृतीत गेलेली ती कविता मला पण आठवली. माझ्या डोळ्यासमोर एक नदी व त्या नदीच्या प्रवाहावर चालणारी चक्की आणि चक्कीवाला येऊ लागला.


 हा चक्कीवाला सुद्धा त्या सौदागर मधील अमिताभप्रमाणेच आनंदी वृत्तीने जगणारा, समाधानी, ग्रामीण माणूस. सी. मॅके नामक कवीच्या कवितेतील या मिलरची अर्थात चक्कीवाल्याची डी नदीच्या प्रवाहावर चालणारी  पाणचक्की असते. तिच्यावरच त्याची उपजीविका असते. हा खुश-मिजास मिलर त्याची चक्की  अतिशय इमाने-इतबारे व जे काम त्याला मिळाले आहे त्यात आनंद घेऊन चालवत असतो. हा मिलर त्याचे काम करतांना गीत गात असतो की, "मी कुणाचा द्वेष करीत नाही व कुणी माझा द्वेष करीत नाही" कवीने त्याच्या गाण्याला लार्क पक्षाच्या मधूर आवाजाची उपमा दिली आहे. या मिलरला गीत गाता-गाता कार्यमग्न असतांना एक दिवस राजा पाहतो. "तू इतका आनंदी कसा आहेस? मलाही तुझ्यासारखे आनंदी व्हायचे आहे मला तर वाटते आहे की तू माझे हृदय घे आणि मला तुझे आनंदी हृदय दे" असे राजा त्याला म्हणतो. मिलर हसतो आणि म्हणतो की, "मी माझ्या कुटुंबासाठी पुरेल एवढे कमावतो, माझी बायको, मुले आणि मित्रांवर प्रेम करतो, आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्जही नाही. या नदीचा सुद्धा मी आभारी आहे की जिच्यामुळे माझी गुजराण होते. हे माझ्या आनंदाचे कारण आहे." ज्याप्रमाणे संत कबीराने म्हटले आहे की 

"साई इतना दिजीये जा मे कुटुंब समाय

मै भी भुका ना रहू साधू न भुका जाये"

कबीराच्या या दोह्याशी जुळेल असेच काहीसे त्या मिलरचे म्हणणे असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवते. पण राजा त्याला पुढे म्हणतो की, "तुझा द्वेष कोणी करत नाही असे तू म्हणू नको. कारण की आता मीच तुझा द्वेष करू लागलो आहे. कारण की तू जितका आनंदी आहे तसा तर सर्व ऐश्वर्य सुखोपभोग असूनही मी सुद्धा नाही. मला तर तुझी ही पिठाळलेली टोपी माझ्या मुकुटा पेक्षाही मूल्यवान वाटत आहे व तुझी ही चक्की माझ्या राजवाड्यापेक्षाही मला श्रेष्ठ वाटत आहे तुझ्यासारखे आनंदी प्रामाणिक कष्टाळू लोक हे हेच इंग्लंडचे भूषण आहे." 

  वरील गीत व कविता आठवल्यावर आजची जीवनशैली कशी झाली आहे हे पण मला आठवले. आज आपण बघतो आनंद मिळवण्याच्या नादात नाना प्रकारच्या वस्तू आपण खरेदी करतो. कुटुंबीयांना खुश करण्यासाठी भेटवस्तू देण्याचे प्रमाण किती वाढले आहे. जणू काही वस्तू प्राप्त झाली किंवा खरेदी केली तरच आनंद मिळतो. आनंदासाठी वस्तूची गरज असते का ? , खरा आनंद कुठून मिळेल याचा विचार होतांना दिसत नाही. सुलभ कर्ज सुविधेमुळे प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे वरून जरी आनंद दिसत असला तरी आत प्रचंड तणाव असतो. आज आपल्या देशात भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पण आनंदी लोकांच्या जागतिक यादीत मात्र आपण खूप पिछाडीवर आहोत. 

     आपल्या उपजीविकेचे साधन आपले मित्र आपले कुटुंब कोणाचाही द्वेष न करणे, उगाच कर्ज न घेणे, साधी समाधानी वृत्ती असणे, "हर हसीं चीज का मैं तलबगार हूँ" याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहणे असा संदेश देणारे हे सौदागर सिनेमातील अमिताभचे गीत आणि "मिलर ऑफ द डी" या कवितेतील चक्कीवाला आपल्याला हाच संदेश देतात.

तलब = आवडणे /छंद

तलबगार = आवड असणारा (चाहनेवाला) / छंदी

Song Link 👇

https://youtu.be/rsuzrIVoFYY?si=a1NJ3268vQsSFdK5