Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०८/२०२५

Article about lakadi ganpati khamgaon

बिन डोर खिचा जाता हुं....


 तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे  गणपती मंदिर होत व हा गणपती होता.  पण आता मात्र हे मंदिर खूपच सुंदर, लक्षवेधक, प्रसन्न वाटेल असे झाले आहे...

तसे पाहिले तर आज शाळेत पोहोचण्यास थोडा उशीर होत होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून एका ठिकाणी जाण्याची सतत इच्छा मनात येत होती.  म्हटले आज या ठिकाणी जाण्याची इच्छा पूर्ण करूनच घ्यावी. टेलिपॅथी म्हणून एक प्रकार असतो तसे झाले की काय कोण जाणे कदाचित ते ठिकाण सुद्धा मला खुणवत होते. म्हणून मी त्या ठिकाणी पोहचलो आणि त्या ठिकाणाचे बदललेले स्वरूप पाहून मला अत्यानंद झाला. ते ठिकाण म्हणजे खामगावचे लाकडी गणपती देवस्थान. बुद्धीची देवता गणपतीबद्दल बालपणापासून जसे सर्वांना असते तसेच प्रेम, भक्ती, आकर्षण मला सुद्धा आहे. त्यामुळेच लाकडी गणपतीबद्दल सुद्धा तशाच भावना आहे. कदाचित त्याचे कारण माझे आजोबा आणि वडील हे असावेत. माझे आजोबा वैद्य दत्तात्रय उपाख्य नानासाहेब वरणगांवकर गणपतीचे निस्सिम भक्त होते तसेच लाकडी गणपतीच्या  प्रथम संचालक मंडळात सुद्धा ते होते आणि माझे वडील या मंडळाचे कार्यकर्ते होते. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लाकडी गणपतीच्या समोर पुर्वी मोठा नगारा असे तो नगारा माझे वडील आणि त्यांचे मित्र वाजवत असत. आजच्या डीजेच्या बेसूर आणि कर्णकर्कश्श आवाजाच्या ऐवजी तत्कालीन नगाऱ्याचा आणि लेझीमचा आवाज भक्तांना किती कर्णप्रिय आणि भक्तीभाव पुर्ण वाटत असेल नाही का ? आजोबांचे आणि वडिलांचे लाकडी गणपती मंदिर, मिरणूक यांत असलेल्या योगदानामुळेच कदाचित लाकडी गणपतीबद्दल मला वरील भावना असाव्यात असेही असू शकते कारण गणपती तर सर्वत्र सारखाच किंवा एकच असतो. लाकडी गणपतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे हे काही महिन्यांपूर्वीच कळले होते त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या लाकडी गणपतीच्या अरुंद आणि जीव घुसमटणाऱ्या मंदिराचे नवीन स्वरूप कसे असेल हे बघण्यासाठी माझी बऱ्याच दिवसापासूनची उत्कंठा होती. आज ती उत्कंठा पूर्णत्वास गेली आणि मला ते नवीन मंदिर बघून खूप आनंद झाला लाकडी गणपती मंदिराचा सभामंडप आता चांगलाच रुंद झाला आहे शिवाय इतरही अनेक गोष्टी जसे दरवाजा कोरीव काम, गाभारा लाकडी गणपतीचे संपूर्ण मंदिरच अतिशय सुंदर झाले आहे. माझ्याच प्रमाणे खामगांवकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या गणपतीबद्दल खामगांवचे नागरिक तसेच खामगांव सोडून गेलेले नागरिक यांनासुद्धा अतिशय आकर्षण भक्ती आणि प्रेम आहे. कारण आजही जेव्हा समाज माध्यमांवर खामगांवचे नागरिक लाकडी गणपतीचे फोटो, व्हिडिओ, रील टाकतात तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद येतांना आपल्याला दिसतो. लाकडी गणपतीची स्थापना शंभरहून अधिक वर्षांपूर्वी झालेली आहे असे ज्येष्ठ मंडळींकडून ऐकलेले आहे. याबाबत मागेही एका लेखात मी लिहिले आहे की, हा लाकडी गणपती तत्कालीन बोर्डी नदीच्या पुरामध्ये वाहून आला आणि भुसाऱ्याजवळच्या पुलामध्ये अडकला तेव्हा अय्याची कोठी या वेटाळातील  गंगाधरराव पिवळटकर, नानासाहेब वरणगांवकर, गिरजापुरे, त्र्यंबकलाल पुरवार, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी यांनी मिळून या गणपतीला अय्याच्या कोटीतील सद्य ठिकाणी स्थापित केले. असे काहींचे म्हणणे आहे. तर काही लोक असेही म्हणतात की, अय्याची कोठी  या भागामध्ये अय्या लोक म्हणजेच आचारी लोक राहत असत आणि स्वयंपाक करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लाकडे लागत असत. याच लाकडांमध्ये काही विशिष्ट आकारांची लाकडे बघून तत्कालीन काही कलाप्रेमींना त्यातून गणपती बनू शकतो असे वाटले आणि त्यांनी त्या लाकडांचा गणपती बनवला असेही काही जुने नागरिक म्हणतात. कथा कोणतीही असो परंतु या लाकडी गणपतीवर खामगावकरांची श्रद्धा मात्र अगाध आहे. 1956 च्या एका कटू प्रसंगात या लाकडी गणपतीला समाजकंटकांकडून दुखापत सुद्धा झाली होती असेही काही नागरिक सांगतात. त्यावेळी खामगांवकर दुखावले होते. तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे लाकडी गणपती मंदिर होत व हा गणपती होता. 


पुढे मात्र हा काष्ठ रूपातील गणरायास खामगांव शहर हे चांदीची मोठी  बाजारपेठ असल्यामुळे काही धनाढ्य लोकांनी चांदीच्या दागिन्यांनी सजवले. त्या साजानंतर हा लंबोदर अधिकच आकर्षित दिसू लागला. पुर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बैलगाडीवर या गणपतीची मिरवणूक निघत असे. परंतु आता काही अंतरापर्यंतच बैल असतात आणि नंतर मात्र ट्रॅक्टरवर या गणपतीला नेले जाते. असा बदल गत दोन वर्षापासून झाला आहे. सुरज अग्रवाल, भेरडे, चंद्रशेखर पुरोहित तसेच इतर सर्व संचालक मंडळ सुद्धा या  मंदिराची चांगली देखरेख व कारभार करीत आहे असे दिसून येते. मी काही कधी देवाला नवस करत नाही परंतु अनेकांच्या नवसाची पूर्ती या लाकडी गणपतीने केली आहे असे अनेक नागरिक सांगतात. खामगांवातून बाहेर गेलेले नागरिक खामगांवला आले की हमखास लाकडी गणपतीच्या दर्शनाला जातात. लाकडी गणपती म्हणजे खामगावचे असे दैवत आहे की सर्वांनाच त्याच्या दर्शनासाठी जावेसे वाटते. सर्वानाच त्याची ओढ असते आणि म्हणूनच "बिन डोर खिंचा जाता हुं..." अशी भक्तांची अवस्था होऊन श्रद्धेमुळे अनेकदा अनेकांची पावले न कळत या मंदिराकडे खेचली जातात.  


२१/०८/२०२५

Article about DJ and Shravan Somwar kavad Yatra

 डीजेच्या गोंगाटात लुप्त झाले "हर बोलाsss..... हर महादेवsss"


आपण जर शंकराचे कोणतेही चित्र डोळ्यासमोर आणले तर  एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेला देवांचा देव महादेव हेच चित्र आपल्याला आठवते. या चित्रावरून बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे, कोलाहलापासून दूर राहणे त्यांना आवडते. अशा शांतताप्रिय निळकंठाच्या कावडयात्रेत हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात डीजेचा गोंगाट वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ? 

यंदाचा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी प्रकृती ठीक नसल्याने मी घरीच होतो. दुपारनंतर डीजेचा भला मोठा आवाज कानावर आदळू लागला. तो आवाज  कावडयात्रेतील डीजेचा आहे याचे स्मरण सौ. ने करून दिले. मी घरीच असल्यामुळे माझे मन भूतकाळात गेले. मला पुर्वीच्या कावड यात्रांचे  स्मरण झाले.

साधारणतः 35 ते 40 वर्षांपूर्वीचे ते दिवस असतील श्रावणात आई घरीच महादेवाला "शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा..." असे पुटपुटत शिवमुठ वाहायची. सकाळी सकाळी बेsssलपुडाsss अशी आरोळी गल्ली गल्लीत धूमू लागे. पुर्वी मोजक्याच असलेल्या परंतू प्राचीन अशा महादेव मंदिरात लोक आपापला भाव घेऊन दर्शनाला जात, एक लोटा जल चे स्तोम हे आताआताचे. श्रावणात शंकराच्या पूजेचे महात्म्य असते हे बालवयात कळायला लागले. सकाळी शाळा किंवा शिकवणीस जातांना कधी एखाद-दोन तर कधी चार-पाचच्या घोळक्यात खांद्यावरील बांबूला छोटे पितळी तांबे किंवा तांब्याचे भांडे बांधून गावात येणारे युवक दिसत. ते दिसण्यापुर्वीच त्यांची "हर बोलाsss हर महादेवsss" अशी महादेवाला भक्ती भावाने घातलेली साद लांबूनच ऐकू येऊ लागायची. हे युवक पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असत. हे कावडधारी युवक नदीचे पवित्र जल आणून गावातील शिव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात असे पुढे ज्ञात झाले होते. आता नद्यांचे जल किती निर्मळ, शुद्ध आहे हे महादेवचं जाणे. पण किती साधी-सरळ भक्ती होती पूर्वी. किती शुद्ध भाव होता. पण आता मात्र या शुद्ध भावाचे किंवा भक्तीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहे आजच्या कावड यात्रांचे स्वरूप पाहता ती भक्तांची एक "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" अशी यात्रा आहे की, निव्वळ डीजेच्या कान फाडणा-या, शरीरात कंप निर्माण करणाऱ्या भल्या मोठ्या आवाजाच्या तालावर गोंगाट, कोलाहल करीत जाणारा, सण म्हणजे सुद्धा एन्जॉय समजणारा केवळ एक जत्था आहे असे सामान्यजनांना वाटू लागते.

     हिंदू धर्मामध्ये पूर्वापार अनेक सणसमारंभ, रितीरिवाज चालत आलेले आहेत. हे सणसमारंभ चलीरीती, परंपरा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडले जात असत. शंकर भगवान हे पूर्वीपासूनच भोळे म्हणून ओळखले जातात. वनातील कोणतीही पत्री त्यांना वाहिली तरी चालते असेच आपण सर्व लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत.  कुण्या एका शंकराच्या पुस्तकात एक मनुष्य रात्री जंगलात काही आसरा नसतांना शंकराच्या पिंडीवर पाय देऊन रात्रभर त्या झाडावर बसतो. बसल्या-बसल्या एक-एक पान तोडून खाली टाकतो. ते पान नेमके खालच्या पिंडीवर पडते. पिंडीवर बिल्व पत्राचा आपसूकच अभिषेक होतो व त्यामुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न होतात अशी एक कथा आहे. या कथेवरून समजते की शंकर इतका भोळा आहे की, त्याच्याच पिंडीवर पाय देऊन चढलेल्या आणि सहज रात्री काही काम नाही म्हणून झाडावरून एक एक पान खाली टाकणा-याचे पान पिंडीवर पडले म्हणून त्याला सुद्धा तो प्रसन्न झाला. परंतु आता मात्र शंकराला बेलच पाहिजे, हे पान नको अन् ते फुल नको असे उगीचच सांगितले जाते. झेंडूचे फुल नको असे नवीन ऐकायला मिळत आहे. पण काही भक्त झेंडूचे हार शंकराच्या पिंडीला घालतात आणि झेंडूचे फुल मात्र नको म्हणतात. हरतालिकेला तर पत्री अर्थात कोणत्याही झाडांची पाने तोडून भोळ्या शंकरास वाहात असतात. तसेच अनेक लोक भक्ती भावाने मंदिरे उभारतात. त्या मंदिरांमुळे एकता स्थापित होणे गरजेचे आहे. परंतु बरेच वेळा दुर्दैवाने तसे न होता वाद होत असल्याचे दिसते. असो ! हा भाग वेगळा परंतु आताशा भक्तीचे अवडंबर होतांना दिसत आहे. भगवंताच्या आराधनेमध्ये भक्तीपेक्षा दिखावाच जास्त दिसून येत आहे. श्रावणात निघणाऱ्या कावडयात्रांमध्ये मोठमोठे, देखावे आणि तत्सम इतर अनेक गोष्टींचे प्रमाण फार फोफावले आहे. सणांमुळे हिंदू समाज एकत्रित येतो, सामाजिक सलोखा, एकोपा वाढतो तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि सामाजिक संघटन निर्माण होते. हे सर्व जरी खरे असले तरी कुठेतरी हे सण समारंभ सुव्यवस्थितपणे इतरांना त्रास न होतील अशा पद्धतीने, नशा विरहित, अमली पदार्थ विरहित पद्धतीने साजरे व्हावे असे वाटते. मोठी मिरवणूक काढण्यास काही हरकत नाही परंतु कर्णकर्कश्श असे डीजे मात्र टाळायलाच हवे. भगवान शंकराचे कुठलेही चित्र आपण बघितले तर आपल्याला एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेले देवांचे देव महादेव हेच चित्र आठवते. या चित्रावरून असे बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे. कोलाहलापासून त्यांना दूर राहणे आवडते. अशा शांतताप्रिय  निळकंठाच्या कावडयात्रेमध्ये  हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात गोंगाट  वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ?  तशी भक्ती शंकराला प्रिय होईल का ? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यामुळे यावर तरुणांनी व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्यांनी अवश्य विचार करावा असे वाटते. परंतु आजकाल हा सर्व विचार केला जात नाही. लोकशाहीमध्ये संख्येला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जिथे संख्या आहे तिथे राजकारणी सुद्धा त्या संख्येच्या बाजूने कललेले दिसतात. 35-40 वर्षांपूर्वी अत्यंत कमी संख्येने जाणारे कावडधारी दिसले की मनाला प्रसन्न वाटे. त्यांना पाहून नागरिकांचा भक्ती भाव सुद्धा जागृत होत असे. तसेच त्यांनी दिलेली "हर बोला हर महादेव" ही आरोळी सुद्धा भगवान महेशाचे स्मरण येणाऱ्या जाणाऱ्यांना करून देई. परंतु आता मात्र भल्यामोठ्या कावड यात्रांच्या मधून मार्ग काढत नागरिक कसेबसे जातात, डीजेपासून अंतर राखून किंवा कानात बोटे घालून जातात. त्यांना ना शंकराचे स्मरण होत असावे, ना त्यांच्या मनात भक्तीभाव जागृत होत असावा किंवा प्रसन्नता सुद्धा वाटत नसावी.  

    बऱ्याच वेळाने मला ऐकू येत असलेला डीजेचा आवाज आता थांबला होता. मी मनोमन त्या केदारनाथास, त्या ओंकारेश्वरास नमन केले. मनात प्रश्न आला की, काळाच्या ओघात डीजेच्या कर्णकर्कश्श अशा आवाजात कुठेतरी हरवलेली "हर बोला हर महादेव" ही घोषणा पुन्हा ऐकू येईल का ?.

१४/०८/२०२५

Article about philanthropy, rockfeller and swami vivekanand

तुमच्या संपत्तीचे विश्वस्त व्हा, मालक नव्हे !


"तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नसून ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्याने मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून  संताप आला.

परवाच्या वर्तमानपत्रात एक वृत्त वाचले. वृत्त  कर्नाटकातील होते.  कर्नाटकातील रायचूर येथील 60 वर्षीय भिकारीण रंगम्माने एका मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख त्र्यांशी हजारांचे दान केल्याचे ते वृत्त होते. हे वृत्त वाचून आश्चर्य व कौतुक दोन्ही वाटले. अनेक दानशूर व्यक्तींच्या कथा, नांवे आठवली. आणखी एक किस्सा आठवला तो म्हणजे रॉकफेलर आणि स्वामी विवेकानंदांच्या भेटीचा. 

     भारतात स्वामी विवेकानंद माहीत नसतील असा मनुष्य विरळाच असेल. परंतु स्वामी विवेकानंद म्हटले की एक योगी, अगाध ज्ञानी, योद्धा संन्यासी असे चित्र डोळ्यासमोर येते तसेच त्यांचे अमेरिकेत धर्मसभेसाठी जाणे, ती धर्मसभा जिंकणे आणि हिंदू धर्माचे पताका विश्वभर फडकवणे अशा काही जुजबी गोष्टीच ज्ञात असतात परंतु स्वामीजींच्या अनेक प्रेरणादायी अशा कथा, त्यांच्या जीवनातील प्रसंग आहेत की जे आजही मनुष्याला प्रेरणा देऊन जातात, अंतर्मुख करतात. अमेरिकेत त्यांचे झालेले हाल, त्यांना झालेला त्रास, कोलंबो ते अल्मोडा या भ्रमणातील अनुभव हे आजही काही निवडक, मोजक्याच लोकांना माहीत असावेत. स्वामीजींनी काही लोकांना केलेल्या मार्गदर्शनाच्या त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, ज्या आजही तितक्याच प्रासंगिक आणि उपयुक्त आहेत. स्वामीजींनी गडगंज संपत्ती असलेल्या रॉकफेलरला केलेल्या अशाच एका मार्गदर्शनाची कथा इथे आज देत आहे. 

      अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांमध्ये अनेक शक्तींचा विकास झाला होता केवळ दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातल्या गतीविधींची ओळख किंवा जाणीव त्यांना होत असे. ज्यांना कोणाला स्वामीजी या गोष्टी सांगत असत ते लोक त्यांचे शिष्य होऊन जात असत. स्वामीजींनी ज्यांचे मन ओळखले होते त्यापैकी एक व्यक्ती होता जॉन डी. रॉकफेलर. हा मनुष्य अमेरिकेतील तत्कालीन स्टॅंडर्ड ऑइलचा संस्थापक होता. आज हीच कंपनी एक्सान मोबाईल नावाने ओळखले जाते. व्यापारातील अनिष्ट कृत्ये आणि एकाधिकारशाही या जोरावर रॉकफेलरने मोठी धनसंपत्ती अर्जित केली होती. रॉकफेलरला पुढे अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्या, त्याची प्रकृती खालावत जात होती. त्याला आपला मृत्यू समिप आला आहे असेही वाटू लागले होते. रॉकफेलर यांस मग स्वामी विवेकानंद यांना भेटण्याची प्रेरणा झाली कारण ज्या काही लोकांच्या घरी स्वामीजींनी वास्तव्य केले होते ते रॉकफेलरचे मित्र होते व त्यांनी रॉकफेलरला स्वामीजींच्या योग शक्ती बाबत सांगितले होते. रॉकफेलर स्वामीजींच्या भेटीस आला तेव्हा स्वामीजींनी त्याला त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या ज्या केवळ त्यालाच ठाऊक होत्या. त्या गोष्टी ऐकून रॉकफेलर प्रभावित झाला. स्वामीजींनी त्याला म्हटले की, "तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नाही तर ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्यानी मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून  संताप आला त्याला प्रथमच कोणी असा उपदेश करत होते. तो तिथून बाहेर पडला. 

     परंतु एक आठवड्याने तो स्वामीजींकडे परत आला आणि एका संस्थेला मोठे दान करीत असल्याचा एक कागद किंवा चेक म्हणा तो स्वामीजींचे पुढे ठेवला आणि म्हणाला आता तुम्हाला संतोष वाटत असेल आता तुम्ही मला धन्यवाद द्या. तेंव्हा स्वामीजी म्हणाले की, "तुम्हीच मला धन्यवाद द्या कारण तुम्ही दान केलेल्या रकमेपेक्षा जास्त समाधान, अनमोल असा मानसिक आनंद तुम्हाला या दानामुळे प्रथमच मिळाले आहे. तुम्ही ज्यांना दान केले त्यांच्यापेक्षा तुमचेच अधिक कल्याण झाले आहे.

     यानंतर रॉकफेलरचे हृदय परिवर्तन झाले पुढे तो एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने पुढील काळात अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक विश्वविद्यालय, दवाखाने यांना त्यानी मदत केली त्याच्यामध्ये सकारात्मक बदल झाला त्याची प्रकृती सुद्धा सुधारली आणि तो वयाच्या 97 व्या वर्षापर्यंत जगला.

कर्नाटक मध्ये भिकरिणीने केलेल्या दानाच्या बातमीमुळे ही रॉकफेलरची  वरील गोष्ट आज आठवली. भगवद्गीते मध्ये सुद्धा

यज्ञो दानं तपश्चैव न त्याज्यं इतीचापरे ||

यज्ञ, दान आणि तप ही कर्मे मनुष्याने कधीही त्यागू नयेत. बदलत्या जीवनशैलीमुळे यज्ञ आणि तप करणे सामान्य माणसाला कठीण आहे परंतु तो दान करून मात्र मनाचे मोठे समाधान तसेच पुण्य  प्राप्त करू शकतो कारण स्वामीजी म्हणाले होते की "वोही जीते है जो दुसरोके लिये जिते है" त्याचप्रमाणे स्वामीजींनी रॉकफेलरला जसे "तुम्ही तुमच्या संपत्तीचे विश्वस्त आहात मालक नव्हे" हा संदेश समस्त मानवजातीला सुद्धा लागू पडतो.