११/१२/२०२५

Article about increasing no of leopards and their attack.

 बिबटे उदंड जाहले


बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेषात आले तर मग ही भिती किती वाटेल हे विचारूच नका. बिबट्यांच्या वाढत्या संख्ये बाबत हा ऊहापोह.

गत बुधवारी नागपूरच्या पारडी भागात बिबट्याने पाच ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. महाराष्ट्रात आणि देशातही गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये, गाव-खेड्यांमध्ये बिबटे घुसण्याचे प्रमाण  वाढले आहे.  गत एक दोन वर्षात तर हे प्रमाण फारच वाढले आहे. काही अभ्यासकांचे तर असेही म्हणणे आहे की, प्रत्येकच शहरात दररोज रात्री बिबटे येत असतात आणि उकर्ड्यावरचे मांसाचे तुकडे, कोंबड्या, शेळ्या खात असतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांना सुद्धा त्यांनी फस्त केले आहे. यावर संपूर्ण राज्यात, विधानसभेत गदारोळ सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सुद्धा मांडली. परंतु बिबट्या हा प्राणी केंद्रीय सुचीत येत असल्याने राज्याला त्याबाबत निर्णय घेण्यास मर्यादा येतात. तरीही केंद्राने काही बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले.शहरात बिबट्या आल्याच्या बातम्या आता नित्याच्याच  झाल्या आहे.बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण असेही सांगितले जाते की मादी बिबट ही वर्षातून दोन वेळा पिल्ले देते आणि बहुतांश वेळी ऊसाच्या शेतात पिल्ले दिल्यामुळे ती पिल्ले सुरक्षित राहतात आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांच्या शहरात घुसण्याच्या प्रकारावर उपाययोजना म्हणून नाना प्रकारचे उपाय सुचवले जात आहे. उदाहरणार्थ बिबट्यांची नसबंदी, जंगलामध्ये शेळ्या सोडणे हा सुद्धा एक अजब उपाय सांगण्यात आला, भिंती/कुंपण घालणे असे उपाय अभ्यासक, लोक सुचवत आहेत. विद्यार्थी सुद्धा त्यांच्या शालेय प्रकल्पांमध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे व मानवांचे संरक्षण कसे करावे या प्रकारचे प्रकल्प बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बिबट्यांची संख्या कशी वाढते आहे यावर त्यांच्या शैलीमध्ये भाष्य केले, तसेच काल बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात ज्यांचा वचक असतो ज्यांचेकडे अधिकार असतात ते  लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेशात आले तर मग हा वचक किती वाटेल हे विचारूच नका. म्हणून मग सभापतींनी त्यांना समज दिली. असो ! वरील विविध उपाययोजना बिबट्यांना रोखण्यासाठी अनेकांकडून सुचवल्या गेल्या. जंगलात शेळ्या सोडणे हा ही एक उपाय त्यात आला, पण त्या फुकटच्या शेळ्या पकडून माणसेच तर त्यावर ताव मारणार नाहीत ना ! अशीही भीती आहे. वन्यजीव शहरात घुसण्याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि सोयीस्कररित्या मिळणारे गृह कर्ज यामुळे घरे बांधण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि मनुष्य वस्ती वाढत चालली आहे त्यामुळे जंगलांचे प्रमाण घटत आहे मग ते वन्यजीव कुठे जातील ? कोणे एकेकाळी जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशाच्या ठिकाणी आज मानवाने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आता मनुष्य राहायला लागला आहे, शेती करू लागला आहे. त्यांच्या हक्काची जागा मनुष्यानेच हिरावून घेतलेली आहे आणि आता जें व्हा ते मनुष्यवस्तीत येत आहे  तेव्हा आपण ते वन्यजीव आपल्या वस्ती झाल्याची तक्रार करीत असतो. बिबट्यांप्रमाणेच हरणे आणि रोही सुद्धा शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पिके उद्ध्वस्त करीत असतात. 

     या सर्व उपाययोजना व अशी पार्श्वभूमी असतांना खालील  काही उपाययोजना सुचावाव्याशा वाटतात

१. महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात प्राणिसंग्रहालयांना परवानगी दिल्यास अनेक बिबट्यांना त्यात ठेवता येईल व बिबटे आटोक्यात येतील , त्यांच्यासाठी पिंजरे सुद्धा प्रशस्त ठेवावे.

२. ज्याप्रमाणे आपण विदेशातून चित्ते आणले त्याप्रमाणे कुण्या देशाला बिबट्यांची आवश्यकता असेल तर त्यांना आपण बिबटे पाठवले पाहिजे. 

३. अन्य राज्यात जिथे मांसभक्षक प्राणी कमी असतील व शाकाहारी वन्यजीव जास्त असतील अशा राज्यातील जंगलात बिबटे सोडणे.

     उदंड जाहलेल्या या बिबट्यांच्या संख्येमुळे व त्यांच्या शहरात येण्यामुळे न घाबरता, त्यांना न घाबरता सकारात्मक पद्धतीने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे, आवश्यक ती काळजी घेणे हेच नागरिकांना करावे लागेल असे वाटते. याप्रसंगी वरील काही उपाय मनात आले त्यावर राज्य सरकार , केंद्र सरकार यांनी यावर विचार करावा असे वाटते. 

२७/११/२०२५

Artical on decide demise of actor and good human being Dharmendra


 तु म्हारो कौण लागे ?


धर्मेंद्रला अनेक लोकांचे प्रेम मिळाले. त्याने सुद्धा लोकांवर भरभरून प्रेम केले. धर्मेंद्रचे समकालीन अभिनेते हे  80-90 च्या दशकात चरित्र भूमिका स्वीकारत होते तेंव्हाही धर्मेंद्र  नायक सहनायकांच्या भूमिकात दिसत होता. 

जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोण सुटलेला आहे ? जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळच असला तरीही जवळचा व्यक्ती न जावा असेच सर्वांना वाटत असते. अगदी असेच धर्मेंद्र या अभिनेत्याचे निधन झाल्यावर त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना वाटले. कुण्या एखाद्याचा मृत्यू झाल्यावर इतर जनांना त्याचे दुःख होत असते परंतु आपणही त्याच मार्गावर आहे याचे मात्र विस्मरण होत असते. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,

अकस्मात तोही पुढं जात आहे |

संतजनांनी जे काही लिहून ठेवलेले आहेत ते सर्व कालातीत आहे परंतु तरीही दुःख हे होतच असते. 

   चित्रपट अभिनेते हे सामान्यजनांपासून खूप लांब असतात. बोटावर मोजता येतील इतक्यांशी त्यांची भेट होते किंवा त्यांना ते दिसत असतात परंतु तरीही पडद्यावरील त्यांच्या भूमिका पाहून आणि त्यांच्या बाबतच्या काही गोष्टी ऐकून लोक त्यांच्या प्रेमात पडत असतात. धर्मेंद्र हा असा एकमेव अभिनेता आहे की ज्याला लोकांचे अफाट प्रेम मिळाले. धर्मेंद्रच्या वागण्या-बोलण्यातून नेहमी तो जमिनीशी जुळलेला आहे इतर लोकांबद्दल त्याला प्रेम आहे , आपुलकी आहे जीवनावर त्याचे प्रेम आहे असे कित्येकदा दिसून आले आहे.

 कोई मुस्कुराता है तो, मै हात बढाता हुं |

कोई हात बढाता है, तो मै सीने से लगा लेता हुं|

कोई सिनेसे लगाता है, तो मै दिल में बिठाता हुं |

या त्याच्या  स्वरचित ओळीतून धर्मेंद्रचे व्यक्तिमत्व आपल्याला कळते. 

     खरे तर या सिने कलाकारांसोबत  आपले काय नाते असते ? त्यांच्या अनेक कृती,  अनेक गैरकायदेशीर बाबी याबाबत पब्लिकला माहिती असते तरीही पब्लिक त्यांना एवढी डोक्यावर का घेते ? हे सर्व प्रश्न हमखास पडतातच. तसाच आमच्या घरी धर्मेंद्र हा प्रत्येकाच्या आवडीचा अभिनेता. आमच्यासह आमच्या मित्र परिवारात सुद्धा धर्मेंद्र हा आवडीचा अभिनेता आहे . असे कोणी का आवडू लागते ? त्याच्यात असे काय असते ? आपल्या अध्यात्मानुसार या जीवनामध्ये आपला ज्या-ज्या लोकांशी संबंध येतो त्या-त्या लोकांशी आपला पूर्व जन्मात सुद्धा संबंध आलेला असतो असे म्हटले जाते.  मग तसे काही असू शकते का ? हे सेलिब्रिटी सुद्धा पूर्व जन्मात आपले परिचित असतील का ? की, ज्यामुळे आपल्याला हे सिनेकलाकार सुद्धा आवडू लागतात. असे सुद्धा नाना प्रश्न पडतात. आमच्या घरी कदाचित माझ्या वडिलांमुळे धर्मेंद्र आम्हा सर्वांना आवडू लागला असावा. ते सुद्धा धर्मेंद्रचे फॅन आहे. त्यांना धर्मेंद्रचे देमार चित्रपट पाहायला आवडते. कुणाच्या दिसण्याच्या बाबतीत किंवा मारामारीच्या बाबतीत त्यांना धर्मेंद्रचे दाखले देतांना आम्ही कित्येकदा ऐकले आहे. "मारधाड से भरपूर" , दुष्टांचे निर्दालन होऊन सज्जनांचा विजय दाखवले जाणारे चित्रपट पाहतांना "असे चित्रपट पाहतांना डोक्याला काही ताण नसतो"  असे ते म्हणतात. तसेच धर्मेंद्रसारखा दिलदारपणा, व्यायामाची आवड, "पैसोसे ज्यादा इंसानियतको, सेहतको अहमियत देना चाहिये" हा समान विचार, सर्वांचे हृदय जिंकून घेण्याची कला,  त्यांच्या हृदयात जागा मिळवण्याची कला, जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन, असे साम्य त्यांच्यात व धर्मेंद्रमध्ये आम्हाला जाणवते. दिसण्यात जरी काही साम्य नसले तरी देहबोली आणि स्वभाव यामध्ये मात्र ते साम्य आम्हाला आजही वाटते. मिशी राखलेला धर्मेंद्र आणि माझे वडील यात तर ते साम्य आम्हाला थोडे अधिक वाटते आणि म्हणून मग धर्मेंद्र हा आमच्या परिवाराचाच आवडता असा कलाकार अभिनेता आणि व्यक्ती झाला. हिंदी सिनेसृष्टीत अनेक लोकप्रिय सिनेकलाकार होऊन गेले व आहे. परंतु जनतेचे अफाट प्रेम मिळालेला असा धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता होता. प्रचंड लोकप्रियतेने जनतेने त्याला खासदार सुद्धा बनवले परंतु साधे सरळ जीवन व्यतीत करण्याची वृत्ती असल्याने राजकारणात त्याचे मन रमले नाही. राजकारणात जसे अटल बिहारी वाजपेयी होते तसा सिनेसृष्टीत धर्मेंद्र होता आणि दोघांमध्ये आणखी एक साम्य होते ते म्हणजे दोघेही कवी मनाचे होते. अटलजी उत्कृष्ट कवी होते तर धर्मेंद्रला शायरी करण्याची आवड होती. आधी उल्लेख केल्याप्रमाणे सिने कलाकार हे आपले कुणीही नसतात परंतु तरीही आपल्याला त्यांच्याबद्दल आकर्षण प्रेम वाटत असते. धर्मेंद्र सुद्धा त्याला अपवाद नव्हता. त्याला अनेक लोकांचे प्रेम मिळाले. त्याने सुद्धा लोकांवर भरभरून प्रेम केले. धर्मेंद्रचे समकालीन अभिनेते हे  80-90 च्या दशकात चरित्र भूमिका स्वीकारत होते तेंव्हाही धर्मेंद्र  नायक, सहनायकांच्या भूमिकात दिसत होता. 80 च्या दशकातच त्याचा बटवारा हा चित्रपट झळकला होता. त्यात डिंपल कपाडिया आणि त्याच्यावर चित्रित झालेले एक गीत होते. 

थारे वास्ते रे ढोला 

नैण म्हारे जागे रे जागे,

सारी  रैण जागे

 तु म्हारो कौण लागे ?

धर्मेंद्रच्या मृत्यूनंतर त्याची मोठी अंतिम यात्रा जरी निघाली नसली,  त्याचा शासकीय इतमामात अंतिम संस्कार जरी झाला नसला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अफाट चाहत्यांना, सहकलाकारांना झालेले मोठे दुःख मात्र सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. जरी त्याच्या चाहत्यांचा तो कोणी नसला तरी त्याच्या चाहत्यांना मात्र  त्याच्या बद्द्ल अफाट प्रेम वाटत होते आणि म्हणूनच त्यांना तु म्हारो कौण लागे ? असा प्रश्न कदाचित पडला असेल.  




२०/११/२०२५

Article about various works assigned to school teachers

शिक्षक की डेटा एन्ट्री ऑपरेटर ?


माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर , उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. अशा रीतीने शिक्षकांना निव्वळ ऑनलाईन कार्यास जुंपून टाकले आहे.

परवा शिक्षकांना अचानकपणे खान अकॅडमीसाठी विद्यार्थ्यांची नांवे पाठवण्याचा आदेश दाखल झाला. आदेश दिला त्याच दिवशी व वेळेच्या मर्यादेत नांवे अपलोड करण्याचे सांगितले गेले. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आपापली शैक्षणिक कार्ये थांबवून खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याचे कार्य पुर्ण केले. याबाबत अनेकांना ही माहिती का पाठवली जात आहे वगैरे अशी काही इत्यंभूत माहिती मिळाली नाही. काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये खाजगी परीक्षा घेणारे, स्पर्धा घेणारे अशांना , अशा संस्थांना शाळेत त्यांच्या परीक्षांची व स्पर्धांची जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मग आज शासन स्वतः खाजगी संस्था असलेल्या खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती कशी काय पाठवण्यास सांगत आहे ? माहिती सुद्धा अत्यंत घाईघाईत पाठवण्याचे काय ' खास '  कारण आहे ? असा प्रश्न तमाम शाळांना पडला आहे. 

     शिक्षण क्षेत्रात येता-जाता नवीन-नवीन काहीतरी प्रयोग केले जात आहे आणि रोजच काही ना काही माहिती अपलोड करण्याचे सांगितले जात आहे. शिक्षकांना सोपवल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत अनेकदा उहापोह होतो व झालेला आहे. अशैक्षणिक कामासोबतच शिक्षकांना शिक्षण विभागा अंतर्गतच दिल्या जाणा-या शैक्षणिक कामांचा सुद्धा अतिरिक्त बोजा सद्यस्थितीत खूपच वाढलेला आहे. शिक्षकांवर सोपवल्या जाणाऱ्या अनेक कार्यामुळे ज्या मुख्य कार्यासाठी शिक्षकांना नियुक्त केले जाते ते शिकवण्याचे, विद्यादानाचे कार्य शिक्षक सध्या नीटपणे करू शकत नाही आणि त्यामुळेच जशी पाहिजे तशी शैक्षणिक प्रगती साध्य होत नाही. ती साध्य होत नसल्यामुळे पुन्हा नवनवीन प्रयोगांचा भडीमार केल्या जातो आणि शिक्षकांना आणखी इतर नवीन कार्यास जुंपले जाते. दिर्घकालीन अशी कोणतीही प्रणाली किंवा उपाययोजना केल्या जात नाही. धोरणे नियम बनवतात आणि त्वरित बदलले जातात. आठवी पास नापासचे उदाहरण ताजेच आहे. नवीन सरकार आले की, जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलवून टाकते. 

     इंटरनेट आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत बरीच कार्ये ऑनलाईन व्हायला लागली त्यात शाळांचाही समावेश झाला. सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांना अनेक ऑनलाईन  कार्ये करावी लागत आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर सुद्धा होत आहे, पण याचा शासन विचार करते की नाही ?  व्हॉट्स ॲपमुळे त्वरित संदेश पाठवला जातो आणि त्यामुळे आजकाल त्वरित म्हणजे अगदी वेळेवर आदेश देऊन कार्य करण्यास सांगितले जाते जसे काही शिक्षकांकडे, शाळांकडे सर्व माहिती नेहमी अगदी तयारच असते. अगदी वेळेवर माहिती मागितल्याचे परवाचे खान अकॅडमीचे उदाहरण वर दिलेच आहे. आजच आदेश पाठवला जातो आणि आजच माहिती मागवली जाते. मग ती माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर ,उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. कधी शासनाचे पेपराचे मार्क अपलोड कर, तर कधी हजेरी अपलोड कर,  शाळांचे फोटो अपलोड कर , मां के नाम पेड चे फोटो अपलोड कर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. विशेष म्हणजे प्रश्न हा पडतो की एवढा सगळा डेटा अपलोड होत आहे तर तो तपासतो कोण? तो तपासल्यावर त्याच्याबद्दल कुठे काही आकडेवारी व माहिती सुद्धा प्रसिद्ध होत नाही, ती झाली तरी त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही मग हा रोजच माहिती पाठवण्याचा, डेटा अपलोड करण्याचा अट्टाहास का ? ऑनलाइन झाले म्हणून हुरळून जाऊन सर्वच माहिती पोर्टलवर टाकण्याची खरंच काही आवश्यकता आहे का ? ती टाकल्यावर त्यांनी शाळांची प्रगती होत आहे का, किंवा होईल का ? बरे शासनाने माहिती भरण्यासाठी जी पोर्टल दिली असतात त्यांचे सर्व्हर स्ट्रॉंग नसतात. मग कित्येकदा वेबसाईटवर ते कार्य होत नाही, वेबसाईट चालत नाही किंवा हळूहळू चालते याकडे पण शासनाचे लक्ष नाही. शासनाला जर ऑनलाईन माहिती हवीच असेल तर मग तसे स्ट्रॉंग सर्व्हर सुद्धा शासनाने ठेवले पाहिजे. शालार्थ या वेतनाच्या पोर्टलमधे असलेल्या एका तृटीमुळे शाळांनी खोटे कर्मचारी आयडी दाखवून पगार उचलला. त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली परंतु शालार्थ प्रणाली पुरवणाऱ्या कंपनीवर काय कारवाई झाली हे काही कुठे वाचनात आले नाही. 

     शिक्षण क्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. समाजाची सद्यस्थिती पाहता शिक्षणाचा दर्जा एकदम उच्च कोटीचा असणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे बालमनावर वाईट परिणाम होत आहे. नको त्या गोष्टींचे ज्ञान त्यांना नको त्या वयात होत आहे त्यामुळे बालकांकडे अधिकाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून शासनाने शिक्षकांना शिक्षकच राहू द्यावे डेटा एन्ट्री ऑपरेटर बनवू नये जेणेकरून ते या बालकांकडे चांगले लक्ष देतील आणि मोबाईलमुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम रोखल्या जाऊन त्यांच्यावर शिक्षणाद्वारे चांगले संस्कार रुजवू शकतील.


३०/१०/२०२५

Article about craze of photos and beauty parlour

 ब्युटी पार्लर मे जा जा के...

हल्लीच्या झकपक लग्न समारंभात वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात. माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो.

किशोरवयात चित्रपट, गाणी हा विषय मला आवडू लागला होता. तसा त्या वयात तो विषय बहुतेकांना आवडत असतो म्हणा. त्या काळात दूरदर्शनला पर्याय म्हणून केबलद्वारे विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण होणे सुरू झाले होते. व्हीसीआर हे नवीन गॅजेट उपलब्ध झाले होते, टॉकीज तर होत्या आणि गाणी ऐकण्यासाठी रेडिओ आणि कॅसेट प्लेयर सुद्धा होतेच. त्यामुळे कित्येक चित्रपट व गाण्यांच्या उजळण्या सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे काही संवाद, गाणी लक्षात राहिली तर काही गाण्यांच्या एखाद दोन ओळीच लक्षात राहिल्या.  या लेखाचे शीर्षक असलेली त्यापैकीच अशी एका गाण्याची ओळ. एखाद वेळी प्रसंगानुरूप आपल्याला सहजच एखादे गीत आठवून जाते. काल वृत्तपत्रात आलेल्या एका ब्युटी पार्लरच्या पत्रकामुळे "ब्युटी पार्लर मे जा जा के वक्त अपना ना जाया करो" अशी ही ओळ मला आठवली. पण ही ओळ कोणत्या गाण्यातील आहे हे मात्र मी साफ विसरलो होतो. कारण नव्वदच्या दशकातील ते गीत काही फार सुंदर रचना वगैरे असे असणारे गीत नव्हते तर उडत्या चालीचे बी ग्रेड सिनेमाचे ते गीत होते. ओळ आठवत होती पण गीत काही आठवत नव्हते त्यामुळे डोक्यात किडा वळवळू लागला आणि मग युट्युबवर या ओळी टाकून सर्च केले  आणि ते गीत सापडले. हे सर्व या लेखात सांगणे हे क्रमप्राप्तच आहे अन्यथा या लेखाचे वाचक विशेषत: महिला वाचक म्हणतील की लेखक मनानेच काहीतरी सांगून ब्युटी पार्लर विरोधी विचार मांडत आहे. मी गीत शोधल्यावर ते ऐकले त्यातील ओळी या अशा खालील प्रमाणे आहे.  

तुम वैसे ही इतनी हसीं हो
मेकअप ना लगाया करो,
ब्यूटी पार्लर में जा जा के
वक़्त यूँही न जाया करो |

ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपला वेळ वाया जातो असे प्रतीत करणाऱ्या या ओळी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर महिला वाचकांना कदाचित ते रुचणार नाही. आजकालच्या काळात कुणाला काही सल्ला देणे किंवा तत्सम लिखाण करणे हे कठीणच आहे कारण आजकालच्या लोकांची विशेषतः तरुणांची सहनशक्ती ही कमी झाली आहे. पण कोणाचा विरोध किंवा कोणाच्या व्यवसायाची अवहेलना हा या लेखाचा मुळीच उद्देश नाही. सोशल मिडिया आल्यापासून फोटो, सेल्फी काढण्याची खूपच क्रेझ वाढलेली आहे सोशल मिडियाच्या आधी सुद्धा फोटो काढले जात असत परंतु फोटो काढणे, मग तो डेव्हलपिंगला टाकणे असे बरेच सोपस्कार पार पाडल्यावर ते फोटो मिळत असत. शिवाय काढलेले फोटो हे फक्त घरचीच मंडळी बघत असत. आता फोटो काढल्यावर ते सोशल मिडियावर पण टाकावे लागतात, ते सर्वजण बघतात मग त्यांचे लाईक, कमेंट मिळवण्यासाठी ते फोटो मेकअप करून काढले जातात, इफेक्ट वगैरे दिले जातात. नवरात्र आदी समारंभात तर तरुण-तरुणी,  चाळीशीतील बायका या मोठ्या सजून धजून तयार होत असतात. हल्ली प्री-वेडिंग शूट, पोस्ट विडींग शूट यांची मोठी टूम लग्नप्रसंगी निघाली आहे. हे करण्यासाठी कॅमेरा आणि इतर सामग्री असे सर्व तामझाम घेऊन विविधी लोकेशनवर फोटोग्राफर आणि फोटो काढणारे तरुण-तरुणी दिसतात. जणू काही चित्रपटाचे शूटिंग होत आहे की काय असे दृश्य असते. हे फोटो आणि त्या फोटोसाठी करावा लागणारा मेकअप यासाठी मग ब्युटी पार्लरची आवश्यकता भासते आणि  सौंदर्य खुलवण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी मग ब्युटी पार्लरला मोठा वेळ द्यावा लागतो. हल्लीच्या लग्न समारंभात तर विधींपेक्षा फोटोंनाच अधिक प्राधान्य असते. एकेका विधीनंतर गुरुजी सुद्धा सांगायला लागले की चला आता फोटो काढा. काही वेळेस तर अक्षरशः विधी बाजूला टाकून दिले जातात आणि फोटो काढले जातात. वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो. एकदा तर एका लग्नात एक स्त्री येऊन माझ्याशी बोलायला लागली प्रथम तर मी तिला ओळखलेच नाही पण काही क्षणातच माझ्या लक्षात आले. "अरे मी तर तुम्हाला प्रथम ओळखलेच नाही" मी म्हणालो. ही माझी खरी, उत्स्फूर्त व नैसर्गिक, सहज स्वाभाविक प्रतिक्रिया होती परंतु त्यांना ती त्यांची स्तुती वाटली कारण इश्श !इतका चांगला मेकअप झालाय का माझा ? असे त्या म्हणाल्या.  (तसं तर हल्लीच्या काळात कोणतीही स्त्री इश्श वगैरे काही म्हणत नाही, पुरुषांवरच आता इश्श म्हणावं अशी वेळ आलेली आहे पण लेखात थोडी रंगत यावी म्हणून इश्श हा शब्दप्रयोग केला आहे.) तर त्या सभ्य महिला माझ्या परिचित असल्याने  त्यांचा नेहमीचा, (म्हणजे विना मेकअपचा) चेहरा माझ्या लक्षात होता पण खूप मेकअपमुळे मी त्यांना खरोखर ओळखले नव्हते. एखाद्या चित्रपट किंवा रील मध्ये दाखवल्या जाणाऱ्या किश्शांसारखाच हा प्रकार घडला होता. 

     आपण सुंदर दिसायला पाहिजे ही तमाम स्त्री पुरुषांची इच्छा असते किंवा बालपणापासून त्यांना तसेच शिकवले जाते त्यामुळे बहुतांश जणांना आपल्या बाह्य सौंदर्याची काळजी अधिक असते. परंतु आंतरिक सौंदर्य मात्र दुर्लक्षिले जाते. आताशा तर आंतरिक सौंदर्य हा पण काही प्रकार आहे असतो हे सुद्धा तरुणाईस ठाउक आहे की नाही अशी परिस्थिती आहे.

  ज्याचे विचार चांगले असतात, विविध विषयांचे ज्ञान असते, अभ्यास असतो जो सर्वांना समदृष्टीने पाहत असतो तो सर्वाँना आपोआपच सुंदर दिसायला लागतो. त्याला बाह्य मेकअप, ब्युटी पार्लर किंवा यूनिसेक्स सलून आदी भानगडींची काही गरज वाटत नाही. परंतु सहसा अभ्यास, ज्ञान, विचार, सकारात्मकता या गोष्टींनी आपले सौंदर्य खुलवण्याऐवजी विविध रसायनांनी युक्त अशी सौंदर्यप्रसाधने वापरून आपले बाह्य सौंदर्य फुलविण्याचा प्रयत्न आजकाल खुप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेष म्हणजे ही सौंदर्यप्रसाधने अत्यंत महागडी असतात पण तरीही मेकअप करण्यावर मोठा खर्च होत आहे. लग्नाच्या फोटोंचा खर्च सुद्धा आजकाल खिशाला मोठी कात्री लावणारा झाला आहे. तसे पाहता स्त्रिया त्यांच्या सौंदर्याकडे अनादी काळापासून लक्ष देत आलेल्या आहे. आपण सुंदर दिसलो पाहिजे अशी प्रत्येक स्त्रीची स्त्रीसुलभ अभिलाषा असते. परंतु जुन्या काळात सौंदर्यप्रसाधने ही शुद्ध दुध, हळद, तूप आदी नैसर्गिक पदार्थांची अशी होती. 

      तर मुद्दा हा आहे की, केवळ मेकअप केल्यानेच कुणी सुंदर दिसतो असे काही नाही. काही व्यक्ती या जात्याच सुंदर असतात. त्यांना सुंदर दिसण्यासाठी म्हणून काही विशेष उपद्व्याप करावे लागत नाही. काही स्त्री पुरुष हे बिना मेकअपचे सुद्धा सुंदर दिसतात प्रहार या सिनेमात माधुरी दीक्षित ही विना मेकअपची होती आणि ती त्या सिनेमात खूप सुंदर सुद्धा दिसली आहे. साधेपणात सुद्धा एक सौंदर्य असते. काही स्त्री पुरुष हे त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. उदाहरणार्थ मेट्रो प्रकल्प प्रमुख अश्विनी भिडे आपल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि काश्मीर मधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल निर्मिती प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. जी. माधवी लता या त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. अशी आणखीही भरपूर उदाहरणे आहेत. 

मेकअपचा खर्च, सौंदर्य प्रसाधनांवर होणारा खर्च त्यासाठी वाया जाणारा वेळ कदाचित यावरूनच वर दिलेल्या ओळी, ते गीत कवीला सुचले असावे आणि म्हणूनच तो म्हणतो की,

तुम वैसे ही इतनी हसीं हो
मेकअप ना लगाया करो
ब्यूटी पार्लर में जा जा के
वक्त युंही ना जाया करो |

 टीप - सद्यस्थितीतील फोटो, मेकअप बाबतची ही वस्तुस्थिती कथन केली आहे. लेखक कुणालाही फोटो न काढण्याचा किंवा मेकअप न करण्याचा आग्रह करत नाही. शेवटी घटनेने आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहेच. त्यामुळे लेखातून आपल्याला पटते तेवढे घ्यावे ही विनम्र सूचना 

२७/१०/२०२५

Trubuting article for Asrani #asrani

 आसरानीची "छोटीसी बात"


प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेता येतील अशा बाबी  त्याच्याकडे असतात व त्याला सुद्धा या बाबींचा  प्रभाला पटवण्यासाठी चांगला उपयोग होईल याचा विश्वास असतो. आसरानीने नागेशची ही भूमिका त्याच्या अंगभूत अभिनयाने सुरेख वठवली आहे. 

देशभर दिवाळी साजरी होत असतानाच आसरानीच्या निधनाची दुःखद बातमी येऊन टपकली. लहानपणापासून पाहत असलेल्या अनेक सिनेमांमध्ये विनोदी कलाकार म्हणून आसरानी हा दिसायचाच. जुन्या जमान्यातील मेहमूद, राजेंद्रनाथ, आय.एस. जोहर, मोहन चोटी या विनोदी कलाकारांचे युग संपुष्टात येत असताना आसरानीचा चित्रपटांमध्ये प्रवेश झाला. आसरानी हा सपोर्टिंग कलाकार त्यामुळे त्याचा पाहिलेला पहिला चित्रपट निश्चितच आठवत नाही पण बहुदा शोलेच असावा. आसरानीच्या निधनानंतर बहुतांश जणांना त्याने बेसुमार गाजलेल्या शोले सिनेमात केलेल्या जेलरच्याच भूमिकेच स्मरण झालं. ती भूमिका होती सुद्धा तशीच आसरानीला साजेशी. हिटलरसारख्या मेकअप मध्ये शोलेत फक्त काही रीळांची असलेली जेलरची भूमिका अगदी उत्कृष्ट वठवली होती. शोलेतील अगदी छोट्या छोट्या भूमिका सुद्धा रसिकांच्या आजही लक्षात आहे. आसरानीची शोलेतील भूमिका ही निर्विवादपणे चांगली आहे, त्याने त्या भूमिकेत प्राण ओतले आहे तरी मला मात्र आसरानीच्या निधनाची वृत्ते वाचतांना आसरानीच्या विविध भूमिका आठवू लागल्या. त्यातल्या त्यात सर्वात प्रथम मला आठवली ती छोटीसी बात या बासू चॅटर्जी निर्देशित सिनेमात आसरानीने साकारलेली नागेश शास्त्रीची भूमिका आणि नंतर मग अभिमान सिनेमातील अमिताभच्या सेक्रेटरीची भूमिका, ऋषिकेश मुखर्जी यांच्या बावर्ची सिनेमातील संगीतप्रेमी तरुणाची भूमिका आणि अगदी अलीकडच्या काळातील धमाल सिनेमातील पारशी बापाची भूमिका, मालामाल विकली मधील हत्तीवाल्याची रितेश देशमुखच्या गरीब बापाची भूमिका. पण त्यातही मला स्वतःला आवडलेली म्हणजे नागेश शास्त्रीची भूमिका. बासू चॅटर्जी यांचे सिनेमे म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांच्याप्रमाणे साधे सरळ मध्यमवर्गीय सामान्य माणसाचे जीवन दर्शविणारे सिनेमे असायचे यातीलच एक छोटीसी बात हा सिनेमा. अशोककुमार, अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि आसरानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा. या सिनेमामध्ये नागेश शास्त्री बनलेल्या आसरानी आणि अरुण नांव असलेल्या अमोल पालेकर या दोघांनाही चित्रपटात प्रभा बनलेली विद्या सिन्हा ही नायिका आवडत असते परंतु अमोल पालेकर हा सुरुवातीला आत्मविश्वासहीन असा तरुण दाखवलेला आहे तर त्यासोबत प्रभा हीच्या कार्यालयात नोकरीला असलेला नागेश शास्त्री हा अतिशय कॉन्फिडंट, चतुर थोडक्यात एखाद्या तरुणीला सहज आकर्षित करू शकेल असा बेधडक युवक दाखवलेला आहे. त्याच्या तुलनेत अमोल पालेकर हा म्हणजे अगदीच लाजाळू,  श्यामळू असा तरुण दाखवला आहे. आसरानीने नागेशच्या भूमिकेत चांगले रंग भरलेले या सिनेमात आपल्याला दिसतात. त्याने नागेशची भूमिका उत्कृष्टरित्या वठवली आहे. नागेश टेबल-टेनिसपटू असतो, चांगला बोलघेवडा असतो शिवाय त्याच्याकडे स्कूटर सुद्धा असते. या प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेता येतील अशा बाबी  त्याच्याकडे असतात व त्याला सुद्धा या बाबींचा  प्रभाला पटवण्यासाठी चांगला उपयोग होईल याचा विश्वास असतो असे या सिनेमात दाखवले आहे. आसरानीने नागेशची ही भूमिका त्याच्या अंगभूत अभिनयाने सुरेख वठवली आहे. नागेशच्या भूमिकेतील आसरानीचा अस्सल अभिनय दर्शकांना दिसतो. चित्रपटात लव्ह गुरु बनलेल्या अशोककुमार कडून चित्रपटात  अरुण बनलेला अमोल पालेकर हा प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासंबंधी मार्गदर्शन प्राप्त करून येतो आणि त्यानंतर मग अंगी बळावलेल्या आत्मविश्वासाने प्रभाला प्राप्त करण्याच्या दोघांच्या चढाओढीत नागेशला मागे टाकतो आणि मग नागेशची होणारी फजिती, गंमत, त्रागा हे सर्व आसरानीने अतिशय सुंदर साकारले आहे. "ये दिन क्या आये" या गाण्यात दर्शकांना ते दिसते.  अमोल पालेकर त्याला अगदी frustrate करून टाकतो. नागेशच्या त्या frustration चा अभिनय आसरानीच करु जाणे. 

     छोटीसी बात हा तसा मध्यमवर्गीय प्रेक्षकाला आकर्षित करणारा असा  लो बजेट सिनेमा. यात सर्वांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टरित्या वठवल्या आहे, यात अमिताभ बच्चन धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहे परंतु नागेश शास्त्री या आसरानीच्या पात्रामुळे या चित्रपटात खरी गंमत येते. त्यामुळे छोटीशी बात हा जसा अशोककुमार, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांचा सिनेमा आहे  तेवढाच तो आसरानीचा सुद्धा आहे.

     नुकतेच महाभारत या गाजलेल्या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणाऱ्या पंकज धीरचे  निधन झाले, अभिनेत्री संध्याचे निधन झाले आणि काल सतीश शहा या आणखी एका चांगल्या विनोदी अभिनेत्याचे निधन झाले. रसिकांना त्यांचे दुःख क्षणभर का होईना विसरायला लावणाऱ्या अशा या सर्व गुणी कलाकारांना विनम्र श्रद्धांजली. या गुणी कलाकारांपैकीच एक म्हणजे आसरानी सुद्धा होता त्याचेही परवा निधन झाले म्हणूनच आसरानी यांची ही एक छोटीसी बात.

 


०९/१०/२०२५

Article about a organisation and its centenary and some memories.

100 वर्षांचा तरुण आणि माझ्या आठवणी

आता हा तरुण कोण आणि या तरुणाशी माझा परिचय कसा झाला ? या बाबतच्या  काही घटना तसेच या तरुणाविषयी व तो त्याच्या शंभरीतही कसा तरुण आहे, त्याचा आणि त्या बाबतीत माझ्या काही आठवणींचा ठळक लेखाजोखा.

     शंभर वर्षाचा हा तरुण माझ्यापेक्षा 50 वर्षांनी मोठा आहे. माझा जन्म 1975 चा तर याचा 1925 चा म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा याने त्याच्या वयाची  पन्नाशी सुद्धा गाठली होती. या शंभर वर्षाच्या तरुणाशी माझा परिचय माझे वय दहा-बारा वर्षाचे असताना झाला. म्हणजे मी जेव्हा दहा-बारा वर्षाचा असेल तेव्हा हा तरुण त्याच्या साठीत होता. आता असा हा शंभर वर्षांचा तरुण कोण ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल त्यामुळे आता हा तरुण कोण आणि या तरुणाशी माझा परिचय कसा झाला या बाबतच्या  काही घटना तसेच या तरुणाविषयी व तो त्याच्या शंभरीतही कसा तरुण आहे, त्याचा शंभरी पर्यंतचा प्रवास या बाबतच्या काही ठळक बाबी या लेखात देत आहे. 

      मी बालपणी पाहिलेल्या काही जुन्या फोटोत मला माझ्या आजोबांनी काळी टोपी परिधान केलेली दिसत असे. त्यांची टोपी काळी का ? असा प्रश्न माझ्या बालपणी मला पडत असे. पुढे त्याचे उत्तर मिळाले. आजोबा दरवर्षी विजयादशमीला आमच्याकडून शस्त्र पूजन करून घेत आणि शस्त्रांना प्रणाम करवून घेत. माझे काका नेहमी तरुण भारत वृत्तपत्र वाचत असल्याचे मला आठवते. त्यामुळे संघाचे बाळकडू घरीच मिळाले होते. पण त्या काळात सरकारी नोकर हे संघात उघड उघड जाण्यास कचरत असत.  आमच्या घरची सर्व वडीलधारी मंडळी ही नेमकी सरकारी खात्यातच होती त्यामुळे संघ आणि आम्ही यात थोडे अंतरच होते. असो ! पण आता मात्र वाचकांचा हा शंभरीतला तरुण कोण ? हा प्रश्न सुटला असेल. होय हा शंभरीतला तरुण म्हणजे यंदा शताब्दी वर्ष साजरे करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच. मी या माझ्याहून पन्नास वर्षे ज्येष्ठ असलेल्या संघाकडे कसा ओढल्या गेलो त्या काही घटना संघाच्या शताब्दी वर्षात विजयादशमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका वाटत असतांना माझ्या डोळ्यासमोर येत होत्या.

     घरीच संघाचे बाळकडू मिळाल्यावर पुढे माझ्या शाळेच्याच म्हणजेच नॅशनल हायस्कूलच्या समोरच्या छोट्या मैदानात काही समवयस्क तसेच काही वयाने मोठ्या मुलांसोबत शाखेत गेल्याचे आठवते. 

     दुसरी घटना म्हणजे पुढे माझा रहीवासी पत्ता बदलल्यावर झुनझुनवाला प्लॉट मधील केशव शाखा मला जवळ पडत असे. आम्ही आमच्या कॉलनीत खेळत असू तेंव्हा या शाखेचे स्वयंसेवक संतोष दादा हे आमच्या कॉलनीत संघाचे अधिकारी अरविंद नेटके सर राहत असत त्यांचेकडे येत असत तेंव्हा ते आम्हाला शाखेत घेऊन जात. संतोष दादा म्हणजे संतोष देशमुख, ते आता खामगांव तालुका संघचालक आहे.

     असा थोडा-थोडा परिचय संघाशी, शाखेशी झाला. काही बौद्धिके ऐकण्यात आली. पुढे एकदा माझा मित्र श्रीकांत करंदीकर यांच्या घरी काही निमित्ताने जाणे झाले तेंव्हा त्याच्या त्या नीटनेटक्या आणि टापटीप घरात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या तसविरी सर्वप्रथम पाहिल्या. राणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्या पण तसविरी होत्या. त्याचे वडील म्हणजे निष्ठावंत, हाडाचे स्वयंसेवक यशवंत उपाख्य बापू करंदीकर यांचेशी परिचय झाला. ड्युटी झाल्यावर ते संघ कार्यासाठी खेड्यापाड्यात सायकलवर जात. आजही काही खेड्यात गेलो की तेथील सर्व ज्येष्ठ मंडळी बापू  करंदीकर यांचे नांव मोठ्या आदराने घेतात. बापू करंदीकर यांचा मुलगा माझा मित्र असल्याने बापूंना जवळून पाहिले त्यांची साधी जीवनशैली, त्यांच्या वागणुकीचा नकळत माझ्यावर कुठेतरी काही ना काही तरी परीणाम झाला असावा असे मला वाटते. बापू आजही वयाच्या 80 व्या वर्षातही संघात तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने सक्रिय आहेत.

     याच दरम्यान धाकट्या बहिणीचे लग्न झाले तिच्या सासरचे सर्वच संघवाले, मोठा भाऊ ABVP चा सक्रीय कार्यकर्ता, एक भाऊ घोषात सक्रिय होता, माझ्या मोठ्या वहिनींच्या माहेरचे सुद्धा संघाचेच घराणे, एक वहिनी विद्यार्थी परिषद सदस्य. असे असल्याने संघाशी संबंध अधिक दृढ झाले.

      दिवसामागून दिवस जात होते. मी कॉलेज मध्ये गेलो. संघ आता मला ब-यापैकी समजला होता. मी गद्धे पंचविशीत असतांना संघ अमृत महोत्सवी वर्षात होता. त्यावेळी मी जळगांव खान्देश येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. जळगांवला माझे मामा प्रभाकर नाईक हे संघाचे तालुका कार्यवाह होते. ते रोज रस्त्यावरच्या विविध फलकांवर सुविचार लिहिण्यास जात. त्या सुविचारांचे "परागकण" अशा समर्पक नावाने माझ्या मामीनी सुदर्शनजी यांचे कडून प्रकाशन करून घेतले होते. याच ठिकाणी माझ्या मित्राला नोकरी मिळण्यासाठी म्हणून संघाचे भास्कर वासुदेव जोशी यांनी मोठे प्रयत्न केल्याचे सुद्धा आठवते. मामा, भास्कर वासुदेव जोशी अशा लोकांना पाहून मला संघाचे लोक कसे कर्तव्यतत्पर, राष्ट्रहितैशी आणि मदतीस धाऊन जाणारे असतात हे लक्षात आले. 

    दहा पंधरा वर्षांपूर्वी मात्र जेंव्हा माझ्याकडे जे. व्ही. मेहता नवयुग विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वृंद सुनीलजी जोशी, नगर संघचालक प्रल्हादजी निमकंडे, विकासजी कुळकर्णी, शंकरजी अनासाने  हे संगणक शिकण्यासाठी म्हणून येत त्यांचेशी ब-याच चर्चा होत. तदनंतर संजयजी बोरे सुद्धा संपर्कात आले. अशी ही पुर्वी पासूनच परिचित असलेली संघ मंडळी संपर्कात आली. त्यातूनच पुढे काही कार्यक्रमात जाणे झाले आणि मग मात्र संघाने मला त्याच्या चुंबकीय शक्तीने कायमचे ओढून घेतले.

     विजयादशमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका वाटतांना असे संघ आठवणींचे चलचित्र माझ्या चक्षू पटलांवर दिसत होते. एखाद्या मनुष्याने शंभरी गाठली तर तो वृद्ध म्हणवला जातो, त्याची शारीरिक, बौद्धिक कार्यक्षमता  घटते पण संघ हा शंभरीत सुद्धा मला माझ्या वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षात जसा दिसला होता तसाच दिसतो. तोच उत्साह, तेच खेळ, त्याच नित्य शाखा, तीच संघगीते, तीच सर्व समावेशकता, तेच जाती धर्माचा लवलेश नसणे, तेच चैतन्य, राष्ट्राय स्वाहा म्हणून आपले जीवन संघाला अर्पण करणारे प्रचारक, राष्ट्र प्रथम हे मानणारे स्वयंसेवक, संघाच्या विविध आयामांच्या माध्यमातून होणारी कार्ये, सेवा कार्ये, विदेशात HSS चे वाढणारे कार्य हे सर्व आजही तितकेच तरुण आहे जेवढे पुर्वी होते. 

     दहा-बारा लोकांना सोबत घेऊन डॉ हेडगेवार यांनी हे संघरुपी रोपटे लावले, गुरुजींनी, बाळासाहेब देवरसांनी संघबंदीच्या कठीण काळातही अथक परिश्रमाचे खतपाणी घालून या रोपट्याचा मोठा वृक्ष केला. असा  हा संघ आज शंभरीत असूनही तरुणच आहे आणि चिरतरुणच राहील. कारण त्याला चिरतरुण राखण्यास "वयं अमृतस्य पुत्र" असा स्वामी विवेकानंद यांचा मंत्र मानणा-या स्वयंसेवकांच्या निष्ठेचे, कार्याचे, सेवेचे, त्यागाचे अमृत त्याला सतत मिळत राहणार आहे. डॉ हेडगेवार यांनी नागपूरात लावलेल्या या रोपट्याचा आता जगभर विस्तार असलेला भलामोठा वृक्ष झाला आहे आणि हा वृक्ष आचंद्रसुर्य राहणार आहे.



२५/०९/२०२५

Article about death, moksha etc.

 मोक्ष मिळवून देणारा मृत्यू

रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हते. पण तरीही ईश्वरी कार्य करतांना त्यांच्या मृत्यू झाला त्यामुळे त्या विषयी लिहावेसे वाटले.

     रामायणात राजा दशरथाचा शोकावस्थेत मृत्यू झाला होता. त्याच दशरथ राजाची रामलीलेत भूमिका करणाऱ्या अमरेश महाजन यांचा काल रामलीलेत अभिनय करतांनाच मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू हा केव्हा आणि कसा होईल हे कोणालाही सांगणे अशक्य आहे. मृत्यूचे वर्णन अनेक लेखकांनी व कवींनी केलेले आहे. कुणी मृत्यूला कविता म्हटले आहे तर कुणी मृत्यूला एक गाढ निद्रा असे संबोधले आहे. रामदास स्वामींनी सुद्धा

एक मरे त्याचा  दुजा शोक वाहे 

अकस्मात तोही पुढे जात आहे 

असे मृत्यूबाबत म्हटले आहे. 

जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता

 राहील कार्य काय

ही भा. रा. तांबे यांची कविता सुद्धा प्रसिद्ध आहे. मृत्यूनंतर काहीही उरत नाही. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी संपत्ती इथेच सोडून मनुष्य अंतिम प्रवासाला जातो. मनुष्याचा अंत होण्याच्या सुद्धा अनेक पद्धती आहेत. कुणी अपघाती मृत्यू पावतो, तर कुणी नैसर्गिकरित्या मृत्यू पावतो. हल्ली तर ताण तणाव आणि सकस अन्न खायला मिळत नसल्याने ऐन तारुण्यात सुद्धा अनेकांचे निधन होतांना आपण बघतच आहोत. अशाच एका मृत्यूची हिमाचल प्रदेशातील चंबा या ठिकाणची ही कथा आहे. या ठिकाणच्या रामलीलेमध्ये अमरेश महाजन नामक अभिनेते गेल्या चाळीस वर्षांपासून दशरथ राजाची भूमिका वठवतात. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हेत. ते स्थानिक पातळीवरचे अभिनेते होते परंतु तरीही त्यांच्या मृत्यू बाबत लिहावेसे वाटले कारण की त्यांचे निधन हे ईश्वरा संबंधित कार्य म्हणजेच नाट्य म्हणजेच रामलीला  सुरू असतांना झाले आणि म्हणून त्याबाबत लिहिणे महत्वाचे वाटले. चंबा येथे  यंदाची रामलीला आयोजित झाली होती. लीला सुरू झाली दशरथ राजाच्या भूमिकेतील अमरेश महाजन आपली भूमिका वाठवू लागले, संवाद म्हणू लागले. अयोध्या नगरी, प्रजा यांविषयी त्यांची संवादफेक सुरू होती. आपल्या संवादात ते एका ठिकाणी भरलेल्या दरबाराच्या दृश्यात "मैं अपनी प्रजा के लिये अपने प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" हा संवाद म्हणू लागले आणि शेजारच्या पात्राच्या खांद्यावर त्यांनी आपले डोके टेकवले. थोडा वेळ सर्वत्र शांतता झाली. दर्शकांना व सहपात्रांना सुद्धा ते पुढचा संवाद म्हणतील असे वाटू लागले पण या "प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" संवादा बरोबरच त्यांचे प्राण पाखरू उडून गेले होते. सुरुवातीला प्रेक्षकांना व सहकलाकारांना अमरेश महाजन हे अभिनयच करत आहे असे वाटले पण त्यांचे डोके त्या सह कलाकाराच्या खांद्यावर वाजवीपेक्षा जास्त वेळ राहिल्याने काहीतरी वेगळे होत आहे हे उपस्थितांच्या लक्षात आले. रामलीलेत प्राण तक न्योच्छावर कर दुंगा असे म्हणत असतांनाच अमरेश महाजन यांचे निधन झाले. आता वर लिहिल्याप्रमाणे अमरेश महाजन यांच्या मृत्यूबाबत लिहिणे का महत्त्वाचे वाटले ते पाहू.

     आपल्या भारतीय संस्कृतीत असे म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी व्यक्ती जर का नामस्मरणामध्ये किंवा साधन, भजन, भक्ती मध्ये रत असेल किंवा ईश्वर चिंतन करीत असेल तर त्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच नामस्मरण करण्याबाबत सर्वच संतांनी सत्पुरुषांनी आपल्याला सांगितले आहे. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा नामस्मरणाचे महात्म्य सांगितले आहे. पुराणांमध्ये अजामेळाच्या  कथेत सुद्धा अजामेळ हा त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या मुलाचे "नारायण" असे नांव घेतो आणि त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मुलाचे नांव नारायण म्हणजेच ईश्वराचे नांव आणि त्याच्या नामोच्चरणामुळे त्याला मुक्ती मिळते अशी कथा आहे. 

अजमेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठासी

असे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे.

अमरेश महाजन हे रामलीला मध्ये गेल्या अनेक वर्षापासून दशरथ राजाची भूमिका वठवत होते. रामायणात राजा दशरथाचा पुत्र वियोगाने मृत्यू होतो आणि चंबा येथील रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला यात कुठेतरी साधर्म्य वाटले. दशरथ राजाची भूमिका वठवतानाच काल त्यांचे निधन झाले त्यामुळे अमरेश महाजन यांना सुद्धा मुक्तीच मिळाली.  अमरेश महाजन हे रामलीलेच्या निमित्ताने एकप्रकारे ईश्वरी कार्यात मग्न होते म्हणजेच त्यांचा मृत्यू हा  त्यांना मोक्ष मिळवून देणारा असा आहे. अमरेश महाजन यांच्या अशा मृत्यूमुळे मृत्यू, मुक्ती, नामस्मरण, अजामेळ याचे स्मरण झाले आणि ते वाचकांसमोर मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.


१८/०९/२०२५

Article on PM Modi birthday

 दे जितनी गाली देनी है...

विरोधकांनी केलेल्या कितीही शिवीगाळीमुळे त्यांचा  विकासाचा वारू अडलेला नाही. विरोधकांच्या शिवीगाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. 

काल देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस झाला. देशभरात नागरिकांनी देशाला एक नवीन वाट दाखवणाऱ्या पंतप्रधानाचा वाढदिवस आपापल्या परीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. संसदेच्या पायरीवर डोके ठेवून संसदेला नमन करून मग प्रवेश करणा-या मोदींना पाहून देश अवाक झाला. लोकशाहीला एवढा सन्मान देणारा पंतप्रधान जनता प्रथमच पाहत होती. पुढे मोदींनी त्यांच्या वेगळ्या शैलीची, नेतृत्वाची प्रचिती देशवासीयांना अनेकदा आणून दिली आहे. मग ते सफाई कामगारांचे पाय धुणे असो, संसदेत संविधानाचा सन्मान करणे असो,  अंदमानात जाऊन सावरकरांच्या कोठडीत जाऊन ध्यानावस्थेत बसणे असो, साफसफाई करणे असो, खाली पडलेला कागद उचलून खिशात ठेवणे असो अशी कित्येक उदाहरणे आहेत. सर्व उदाहरणे कधी लिहिली तर लेखाच्या ऐवजी उदाहरणांची यादी होऊन जाईल एवढे वेगळेपण मोदींनी आपल्या कारकिर्दीत जनतेला दाखवले. मोदींच्या कार्याच्या धडाक्यामुळे आणि भारत देशाला एक प्रबळ सक्षम लोकशाही देश म्हणून उभे करण्यामुळे जगभरात मोदींची प्रतिमा खुप मोठी झाली. जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये मोदी प्रथम क्रमांकावर आलेले आहे. कित्येक देशात मोदी गेल्यावर तेथील भारतवासीयांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत समारोह पाहिल्यावर देशातील जनतेला मोठे कौतुक वाटले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा विदेशी नागरिक व NRI एवढा सन्मान करत आहे हे जनता प्रथमच पाहत होती. मुस्लिम राष्ट्रात सुद्धा मोदींचा मोठा सन्मान झाल्याचे आपण बघितले.  मोदींनी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा आपल्या भारतीय सैन्याची दहशत बसवली. मोदी सत्तेत येण्यापुर्वी आतंकवादी देशातील विविध शहरात घुसून बॉम्बस्फोट किंवा गोळीबार करत असत परंतु मोदींच्या कारकिर्दीत अशी एकही घटना घडली नाही. पुलवामा हल्ल्यानंतर केलेले सर्जिकल स्ट्राइक,  पहेलगाम नंतर राबवलेले ऑपरेशन सिंदूर यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्यापूर्वीही मोदींनी म्हटलेले "घर मे घुसकर मारेंगे" या वाक्याने तर मोदींची लोकप्रियता खूपच वाढवली. 

     नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान वरून मोदींवर टीका होत आहे हे साहजिकच आहे कारण फाळणीनंतर देशाचा एक नंबरचा शत्रू म्हणून पाकिस्तान ओळखला जातो, जनता आजही फाळणीचे आणि फाळणी नंतर झालेल्या अत्याचाराचे दुःख आजही विसरलेली नाही, त्याचे शल्य भारताला कायम राहणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर झालेली भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच अनेकांना पटली नाही परंतु टीका करणाऱ्यांनी हेही ध्यानात घ्यावे ही मोदींच्या पूर्वी अतिरेकी हल्लेही होत होते आणि भारत-पाक क्रिकेट सामने सुद्धा होत होते, अतिरेकी हल्ल्यांना प्रतिउत्तर सुद्धा दिले जात नव्हते आणि पाकिस्तान सोबत शांततेच्या हवेतील गप्पा आणि लांगुलचालन हे पण सुरू होते. मोदींच्या कारकिर्दीत मॅच जरी झाली असली तरी पाकिस्तानला जबरदस्त उत्तर पण दिले जात आहे हे जनता पाहतच आहे. भारताने दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे आधीच कोलमडलेला पाकिस्तान आणखीनच थंडागार झाला आहे. एवढेच काय तर पाकिस्तानच्या मीडियामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचे झालेले कौतुक जनतेने पाहिले आहे. नुकतेच नेपाळमध्ये gen z ने केलेल्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा नेपाळी जनतेने मोदींसारखा पंतप्रधान व्हावा अशी मागणी केलेली जगाने पाहिली. 

      मोदींना मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांनी देशाला दाखवलेल्या नवीन वाटेमुळे विरोधकांचा प्रचंड जळफळाट झालेला गतकाळात आपण बघितला आहे. या जळफळाटातून त्यांनी मोदींना वाटेल त्या शिव्या कित्येकदा दिल्या आहेत. मोदींना मौत का सौदागर म्हणणे, त्यांचा बाप काढणे, चहाच्या व्यवसायावरून कमी लेखणे, पत्नी सोबत राहत नाही म्हणून टीका करणे, आणि नुकतेच त्यांच्या आई बाबतचा AI व्हिडिओ काढणे अशी मोदींना शिव्या शाप देण्याची अजूनही कित्येक उदाहरणे घडली आहेत. मोदींनी त्याबाबत कधीही ब्र सुद्धा काढला नाही. नुकतेच आसाम मध्ये त्यांनी विधान केले की मी शिवभक्त आहे सगळे विष पचवून टाकले. त्यामुळे तर विरोधकांचा जास्तच जळफळाट झाला आहे, होतो आहे. 

     यंदा अनेक व्यक्ती तसेच संघटना यांचे महोत्सवी वर्ष आहे. अहिल्याबाई होळकर 300 वी जयंती वर्ष, उमाजी नाईक यांची 234 वी जयंती, देश साजरे करीत आहे. तसेच ज्या संघाच्या मुशीतून मोदी सारखे नेतृत्व तयार झाले तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करीत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षासोबतच मोदींनी सुद्धा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या सर्वांसोबतच भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहासात मैलाचा दगड ठरलेला, लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडणारा, अनेक नेत्यांना सुद्धा आवडणारा शोले या चित्रपटाने सुद्धा पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. 

     शोले चित्रपटात गब्बर सिंग जेंव्हा ठाकूरला पकडतो तेंव्हा ठाकूर त्याला अनेक शिव्या देतो. तेव्हा गब्बरच्या तोंडी एक वाक्य आहे, "दे जितनी गाली देता है". या सिनेमात गब्बर सिंग खलनायक होता परंतु मोदी तर देशाचे खरे नायक आहे. विरोधकांनी केलेल्या कितीही शिवीगाळीमुळे त्यांचा  विकासाचा वारू अडलेला नाही. विरोधकांच्या शिवीगाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे "दे जितनी गाली देता है, मै हर जहर निगल डालूंगा" असाच संदेश ते विरोधकांना देत आहे.

११/०९/२०२५

Article about developing khamgaon

 दिल गार्डन गार्डन हो गया

खामगांवकरांचे हृदय बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया सारखी का झाली आहे ते या लेखात वाचा.

90 च्या दशकामध्ये गुलशन ग्रोवर हा खलनायक म्हणून प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या वेशभूषेत दिसणे ही गुलशन ग्रोवरची खासियत असे शिवाय त्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्या सिनेमांमध्ये त्याच्या तोंडी एक विशिष्ट असा डायलॉग वारंवार दिलेला असे. जसे "गन्ना चुसके" , "गई भैंस पानीमे" , "बॅड मॅन" असे संवाद त्याच्या मुखी दिलेले असत.  प्रत्येक संवादामध्ये ठराविक अंतराने असे डायलॉग पालुपदासारखे तो पुन्हा पुन्हा म्हणतांना सिनेमात दिसत असे.  यातलाच एक डायलॉग म्हणजे 'दिल गार्डन गार्डन हो गया'. कुठल्यातरी एका सिनेमामध्ये त्याच्या तोंडी दिल गार्डन गार्डन हो गया असा संवाद होता त्याचा हा संवाद पुढे एवढा लोकप्रिय झाला की दिल गार्डन गार्डन हो गया असे एक गाणे सुद्धा कुण्या गीतकाराने लिहिले होते. 

      आता हे दिल गार्डन गार्डन हो गया आणि गुलशन ग्रोवर पुराण आज का बरं बुवा ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल. या संवादाची आठवण होण्याचे कारण म्हणजे खामगांव शहरांमध्ये मा. ना. आकाश फुंडकर यांच्या कारकिर्दीमध्ये व नेतृत्वाखाली नगरपरिषदेने अनेक नवीन बागा निर्माण केल्या तसेच जुन्या बगीच्यांना नवीन स्वरूप दिले. सावरकर उद्यान , छकुली उद्यान यांसारखी इतरही अनेक नवीन उद्याने खामगांव शहरात निर्माण केली याशिवाय भारतरत्न राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन याचे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नटराज गार्डन या जुन्या उद्यानांचे नूतनीकरण केले गेले. या उद्यानांमुळे खामगांव शहराला कसा ' फ्रेश लुक ' आला आहे. तसे तर या नवीन आणि नूतनीकरण झालेल्या उद्यानांबाबत समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ पूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. नवीन निर्माण केलेली उद्याने चांगली तर आहेच परंतु टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन यांची अवस्था फार खराब झाली होती नटराज गार्डन पेक्षाही टॉवर गार्डन अधिकच खराब झाले होते त्या उद्यानाकडे पाहवले सुद्धा जात नव्हते इतकी त्याची दुर्दशा झाली होती परंतु ऑगस्ट 2025 मध्ये या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण झाले आणि खामगांवकर नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. आज जर का आपण टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला अतिशय आल्हाददायक, नयनरम्य शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही प्राणवायूने परिपूर्ण असे वातावरण मिळते. शिवाय जागोजागी योग्य ती शिल्पे, भिंतींवरती सुंदर चित्रे, व्यायामासाठी जागा आणि साधने, फिरण्यासाठी जागा आणि साधने, लहान मुलांसाठी खेळणी, समाजाला, कुटुंबाला ज्यांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची नेहमीच गरज असते अशा ज्येष्ठ  नागरिकांना बसण्यासाठी बाक, लॉन इत्यादी अनेक सुविधा या दोन्ही गार्डनमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे आता सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी आपल्याला या उद्यानांमध्ये दिसून येते. नटराज गार्डनच्या दुरावस्थेमुळे येथील भव्य नटराजाची मुर्ती सुद्धा उदास वाटत होती परंतु आज या नटराजाची मुद्रा कशी छान फुललेली दिसून येत आहे. त्याच्या समोरील पूर्वी जे छोटे कमळाचे टाके होते ते आता मोठे केले आहे. ही उद्याने रात्री सुद्धा खुप सुंदर दिसतात. जनुना तलावाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार जुन्या काळात बनवलेले आहे.  नूतनीकरण करतांना त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल  न करता याच दरवाजाला पुनश्च चांगले स्वरूप देण्यात आले हे फार चांगले झाले कारण या प्रवेशद्वारावरील मुर्त्या या स्थानिक राष्ट्रीय शाळेतील कलाकारांनी बनवलेल्या होत्या आणि त्या आजही खूपच सुंदर दिसतात म्हणून त्या तशाच राहू देणे गरजेचे होते आणि त्या तशाच राहू दिल्यामुळे व त्यांना रंग दिल्यामुळे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार आता अधिक आकर्षक दिसते. रात्रीची रोषणाई सुद्धा बघणाऱ्याला सुखद अनुभव देते.

रात्रीच्या वेळेचे नटराज गार्डन

   मध्यंतरी खामगांवला उद्याने असूनही नसल्यासारखीच होती. खामगांवकरांचा एकमेव पिकनिक स्पॉट जनुना तलाव याची सुद्धा अवस्था चांगली नव्हती. त्यामुळे खामगांवात येणाऱ्या पाहुण्यांना कुठे घेऊन जाण्यासाठी चांगले ठिकाणास नव्हते आणि खामगांवकरांना मोकळा श्वास घेता येईल असे सुद्धा कोणतेही ठिकाण खामगाव मध्ये नव्हते. सर्वत्र गर्दी आणि अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता परंतु आज मात्र नवीन निर्माण झालेल्या उद्यानांमुळे आणि जुन्या नूतनीकरण केलेल्या उद्यानांमुळे खामगांवकर नागरिकांना मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. उद्याने म्हणजे शहराची फुफ्फुसे असतात. गतकाळात खामगांव  मतदारसंघाचे तरुण नेतृत्व मा. ना. आकाशभाऊ फुंडकर, खामगांव नगरपरिषद सीओ प्रशांत शेळके, यांनी खामगांव शहराचा कायापालट करण्याचा निश्चयच घेतलेला दिसतो. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी खामगांवात होतांना दिसत आहे. यशवंत टॉवरवर बसवलेल्या घड्याळामुळे सुद्धा खामगांवकरांना मोठा आनंद झालेला आपण पाहिला, रस्ते सुद्धा चांगले होत आहेत. एक पाण्याची समस्या तेवढी दूर होणे आवश्यक आहे. ती सुद्धा लवकरच मार्गी काढण्यात येईल असे काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे तोही प्रश्न लवकरात संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत. 

 आज खामगांवकरांना घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी खामगांवतील अनेक गार्डन उपलब्ध आहे.  अशी गार्डन निर्माण झाल्यामुळे आणि एकूणच चांगले बदल होत असलेले बघतांना खामगांवकरांचे हृदय बगीच्या प्रमाणे बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया याप्रमाणे झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

०४/०९/२०२५

Article about Khamgaon ganpati festival

 आठवणी खामगांवच्या गणेशोत्सवाच्या 

आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे.

काल मुलाने गणपती बघायला घेऊन चला म्हणून हट्ट केला आणि म्हणून त्याला घेऊन गणपती पाहण्यास गेलो. त्याला विविध गणेश मंडळांचे गणपती दाखवतांना विशेषत: वंदेमातरम मंडळाचा  रामायणातील लंका दहनाच्या प्रसंगाचा देखावा पाहतांना खामगावात पूर्वी होत असलेल्या  देखाव्यांच्या आणि येथील गणपती मंदिरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या. आम्ही गणपती पाहण्यास  राष्ट्रीय गणेश मंडळापासून सुरुवात केली. राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हातून झालेली आहे. खामगांव शहर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक जुने आणि मोठे शहर असल्याने राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेनंतर खामगांवला अनेक थोर पुरुषांनी भेटी दिलेल्या आहे. तसेच खामगांवला अनेक वर्षापासून गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ, तानाजी गणेशोत्सव मंडळ, रामदल ही गणेश मंडळे अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. सामाजिक संदेश देणारे तसेच धार्मिक उद्बोधन करणारे मोठमोठे देखावे, सामाजिक उपक्रम ही खामगांवच्या गणेशोत्सव मंडळांची वैशिष्ट्ये. वरील गणेश मंडळानंतर वंदेमातरम, राणा, जय संतोषी मां, चंदनशेष, त्रिशूल, नेताजी, हनुमान, एकता, आत्मशक्ती अशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे खामगांवात स्थापित झाली. गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते त्याचप्रमाणे खामगांव शहरात सुद्धा गणपतीचे आगमन मोठ्या थाटात होते आणि त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्व लोक करत असतात. खामगांव शहरात लाकडी गणपती हा मानाचा गणपती म्हणून मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी असतो. खामगांव शहरातील गणेशोत्सवाचा तसा भला मोठा इतिहास आहे. तसेच या उत्सवामध्ये सामाजिक सलोखा, शांतता चांगल्या पद्धतीने जपल्या गेल्याची अनेक उदाहरणे सुद्धा आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जगदीशजी जोशी यांनी आठवण सांगितली की, या गणेश मंडळाचे श्री तय्यबजी नामक एक मुस्लिम अध्यक्ष सुद्धा होऊन गेले आहे. अशी खामगावच्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 1980 च्या दशकात आम्ही लहान असतांना चंदनशेष गणेशोत्सव मंडळ हे आमच्या घराजवळच असल्याने आम्ही तेथील गणपती आवर्जून व अनेकदा बघत असू. हे गणेश मंडळ जेंव्हा गणेश स्थापनेच्या काही दिवस आधीपासून देखावे बनवण्याचे कार्य करीत असे तेंव्हा आम्ही पडदा बाजूला करून ते काम बघत असू. चंदनशेष मंडळाने केलेले साक्षरतेवर आधारीत गणपती उंदरांना शिकवत असल्याचा देखावा, हनुमान राक्षसिणीच्या तोंडात जाऊन कसा चटकन बाहेर येतो हे दाखवणारा देखावा, उंदरांचा देखावा, नवनाथांचा देखावा असे अनेक देखावे आजही स्मरणात आहे. या मंडळाचे तत्कालीन तरुण कार्यकर्ते तेंव्हापासून परिचित झाले. टिळक पुतळ्याजवळ मधु ऑटो जवळ दरवर्षी भूतांचा देखावा असलेला एक गणपती बसत असे. आमच्या घराजवळ आझाद गणेश मंडळ म्हणून एक गणेश मंडळ 80 च्या दशकात सुरू झाले होते तसेच पुरवार गल्लीत सुद्धा एक गणेश मंडळ होते. पुरवार गल्लीतील गणेश मंडळानी एकदा सुपारीचा गणपती बनवला होता तसेच पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा देखावा सादर केला होता. ही गणेश मंडळे नंतर बंद झाली. अशा खामगांवच्या गणेश मंडळाच्या कित्येक आठवणी आजही आहेत काही कटू आठवणी सुद्धा आहेत परंतु त्यांचा उल्लेख न केलेलाच बरा. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एक पागोट्या नामक व्यक्ती दरवर्षी वेगळीच लक्षवेधक अशी वेशभूषा करून सर्वत्र फिरत असे. या पागोट्या व्यक्तीचे खरे नांव मला आजरोजी पर्यंत कळले नाही. आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे. पठाण आता हयात आहे की नाही कुणास ठाऊक. खामगांवचा गणेशोत्सव हा राज्यभर प्रसिद्ध आहे. येथील राणा गणेश मंडळाने खामगांवचा राजा नामक गणपतीची स्थापना केलेली आहे. खामगांव हे चांदीची बाजारपेठ असल्यामुळे  या गणपतीच्या अंगावर चांदीची विविध आभूषणे आहे.  ज्याप्रमाणे इथे लाकडी गणपतीचे मंदिर आहे तसेच शिवाजी वेसकडे जातांना सुटाळपुरा भागात सुद्धा एक अत्यंत प्राचीन असे गणपती मंदिर आहे, सितला माता मंदिरात सुद्धा अनेक वर्षापासून स्थापित  केलेला गणपती आहे. बहुतांश खामगांवकरांना माहीत नसलेले गणपती मंदिर म्हणजे गर्गे यांचे मंदिर. गर्गे यांच्या घरातच त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केलेला गणपती आहे, हे मंदिर म्हणजे एक घरच आहे आणि या घराच्या दिवाणखान्यात आपल्याला गणेश मूर्ती दिसते. या मंदिरात सुद्धा खूप प्रसन्न वाटते मूर्ती सुद्धा आकर्षक आहे. गणेश उत्सवाबरोबरच खामगांवातील ही गणपती मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी काल ताज्या झाल्या. यंदा खामगांवात गणपती हा विविध रूपांमध्ये दिसला. तानाजी व्यायाम मंडळाचा धनगराच्या वेषातील गणपती बर्डे प्लॉटमधील गजानन महाराजांच्या वेषातील गणपती तसेच अमरलक्ष्मी मंडळाचा शिवाजी महाराजांच्या वेषातील गणपती बघायला मिळाला. सर्व मूर्ती उत्कृष्ट होत्या परंतु आगामी काळात पूर्वीसारखेच देखावे सुद्धा या मंडळांनी करावे असे वाटते. देखाव्यातून सामाजिक उद्बोधन होते, बालगोपालांना  धार्मिक देखाव्यातून आपल्या धर्माची माहिती मिळते त्यामुळे देखावे हे असायला  पाहिजे. अशाप्रकारे गणेशोत्सव बघून आम्ही घरी परतलो. आजही गणेशोत्सवात गणपती बघायला जातांना तोच उत्साह कायम आहे आणि खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सुद्धा कायम आहेत.

२८/०८/२०२५

Article about lakadi ganpati khamgaon

बिन डोर खिचा जाता हुं....


 तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे  गणपती मंदिर होत व हा गणपती होता.  पण आता मात्र हे मंदिर खूपच सुंदर, लक्षवेधक, प्रसन्न वाटेल असे झाले आहे...

तसे पाहिले तर आज शाळेत पोहोचण्यास थोडा उशीर होत होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून एका ठिकाणी जाण्याची सतत इच्छा मनात येत होती.  म्हटले आज या ठिकाणी जाण्याची इच्छा पूर्ण करूनच घ्यावी. टेलिपॅथी म्हणून एक प्रकार असतो तसे झाले की काय कोण जाणे कदाचित ते ठिकाण सुद्धा मला खुणवत होते. म्हणून मी त्या ठिकाणी पोहचलो आणि त्या ठिकाणाचे बदललेले स्वरूप पाहून मला अत्यानंद झाला. ते ठिकाण म्हणजे खामगावचे लाकडी गणपती देवस्थान. बुद्धीची देवता गणपतीबद्दल बालपणापासून जसे सर्वांना असते तसेच प्रेम, भक्ती, आकर्षण मला सुद्धा आहे. त्यामुळेच लाकडी गणपतीबद्दल सुद्धा तशाच भावना आहे. कदाचित त्याचे कारण माझे आजोबा आणि वडील हे असावेत. माझे आजोबा वैद्य दत्तात्रय उपाख्य नानासाहेब वरणगांवकर गणपतीचे निस्सिम भक्त होते तसेच लाकडी गणपतीच्या  प्रथम संचालक मंडळात सुद्धा ते होते आणि माझे वडील या मंडळाचे कार्यकर्ते होते. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लाकडी गणपतीच्या समोर पुर्वी मोठा नगारा असे तो नगारा माझे वडील आणि त्यांचे मित्र वाजवत असत. आजच्या डीजेच्या बेसूर आणि कर्णकर्कश्श आवाजाच्या ऐवजी तत्कालीन नगाऱ्याचा आणि लेझीमचा आवाज भक्तांना किती कर्णप्रिय आणि भक्तीभाव पुर्ण वाटत असेल नाही का ? आजोबांचे आणि वडिलांचे लाकडी गणपती मंदिर, मिरणूक यांत असलेल्या योगदानामुळेच कदाचित लाकडी गणपतीबद्दल मला वरील भावना असाव्यात असेही असू शकते कारण गणपती तर सर्वत्र सारखाच किंवा एकच असतो. लाकडी गणपतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे हे काही महिन्यांपूर्वीच कळले होते त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या लाकडी गणपतीच्या अरुंद आणि जीव घुसमटणाऱ्या मंदिराचे नवीन स्वरूप कसे असेल हे बघण्यासाठी माझी बऱ्याच दिवसापासूनची उत्कंठा होती. आज ती उत्कंठा पूर्णत्वास गेली आणि मला ते नवीन मंदिर बघून खूप आनंद झाला लाकडी गणपती मंदिराचा सभामंडप आता चांगलाच रुंद झाला आहे शिवाय इतरही अनेक गोष्टी जसे दरवाजा कोरीव काम, गाभारा लाकडी गणपतीचे संपूर्ण मंदिरच अतिशय सुंदर झाले आहे. माझ्याच प्रमाणे खामगांवकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या गणपतीबद्दल खामगांवचे नागरिक तसेच खामगांव सोडून गेलेले नागरिक यांनासुद्धा अतिशय आकर्षण भक्ती आणि प्रेम आहे. कारण आजही जेव्हा समाज माध्यमांवर खामगांवचे नागरिक लाकडी गणपतीचे फोटो, व्हिडिओ, रील टाकतात तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद येतांना आपल्याला दिसतो. लाकडी गणपतीची स्थापना शंभरहून अधिक वर्षांपूर्वी झालेली आहे असे ज्येष्ठ मंडळींकडून ऐकलेले आहे. याबाबत मागेही एका लेखात मी लिहिले आहे की, हा लाकडी गणपती तत्कालीन बोर्डी नदीच्या पुरामध्ये वाहून आला आणि भुसाऱ्याजवळच्या पुलामध्ये अडकला तेव्हा अय्याची कोठी या वेटाळातील  गंगाधरराव पिवळटकर, नानासाहेब वरणगांवकर, गिरजापुरे, त्र्यंबकलाल पुरवार, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी यांनी मिळून या गणपतीला अय्याच्या कोटीतील सद्य ठिकाणी स्थापित केले. असे काहींचे म्हणणे आहे. तर काही लोक असेही म्हणतात की, अय्याची कोठी  या भागामध्ये अय्या लोक म्हणजेच आचारी लोक राहत असत आणि स्वयंपाक करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लाकडे लागत असत. याच लाकडांमध्ये काही विशिष्ट आकारांची लाकडे बघून तत्कालीन काही कलाप्रेमींना त्यातून गणपती बनू शकतो असे वाटले आणि त्यांनी त्या लाकडांचा गणपती बनवला असेही काही जुने नागरिक म्हणतात. कथा कोणतीही असो परंतु या लाकडी गणपतीवर खामगावकरांची श्रद्धा मात्र अगाध आहे. 1956 च्या एका कटू प्रसंगात या लाकडी गणपतीला समाजकंटकांकडून दुखापत सुद्धा झाली होती असेही काही नागरिक सांगतात. त्यावेळी खामगांवकर दुखावले होते. तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे लाकडी गणपती मंदिर होत व हा गणपती होता. 


पुढे मात्र हा काष्ठ रूपातील गणरायास खामगांव शहर हे चांदीची मोठी  बाजारपेठ असल्यामुळे काही धनाढ्य लोकांनी चांदीच्या दागिन्यांनी सजवले. त्या साजानंतर हा लंबोदर अधिकच आकर्षित दिसू लागला. पुर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बैलगाडीवर या गणपतीची मिरवणूक निघत असे. परंतु आता काही अंतरापर्यंतच बैल असतात आणि नंतर मात्र ट्रॅक्टरवर या गणपतीला नेले जाते. असा बदल गत दोन वर्षापासून झाला आहे. सुरज अग्रवाल, भेरडे, चंद्रशेखर पुरोहित तसेच इतर सर्व संचालक मंडळ सुद्धा या  मंदिराची चांगली देखरेख व कारभार करीत आहे असे दिसून येते. मी काही कधी देवाला नवस करत नाही परंतु अनेकांच्या नवसाची पूर्ती या लाकडी गणपतीने केली आहे असे अनेक नागरिक सांगतात. खामगांवातून बाहेर गेलेले नागरिक खामगांवला आले की हमखास लाकडी गणपतीच्या दर्शनाला जातात. लाकडी गणपती म्हणजे खामगावचे असे दैवत आहे की सर्वांनाच त्याच्या दर्शनासाठी जावेसे वाटते. सर्वानाच त्याची ओढ असते आणि म्हणूनच "बिन डोर खिंचा जाता हुं..." अशी भक्तांची अवस्था होऊन श्रद्धेमुळे अनेकदा अनेकांची पावले न कळत या मंदिराकडे खेचली जातात.  


२१/०८/२०२५

Article about DJ and Shravan Somwar kavad Yatra

 डीजेच्या गोंगाटात लुप्त झाले "हर बोलाsss..... हर महादेवsss"


आपण जर शंकराचे कोणतेही चित्र डोळ्यासमोर आणले तर  एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेला देवांचा देव महादेव हेच चित्र आपल्याला आठवते. या चित्रावरून बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे, कोलाहलापासून दूर राहणे त्यांना आवडते. अशा शांतताप्रिय निळकंठाच्या कावडयात्रेत हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात डीजेचा गोंगाट वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ? 

यंदाचा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी प्रकृती ठीक नसल्याने मी घरीच होतो. दुपारनंतर डीजेचा भला मोठा आवाज कानावर आदळू लागला. तो आवाज  कावडयात्रेतील डीजेचा आहे याचे स्मरण सौ. ने करून दिले. मी घरीच असल्यामुळे माझे मन भूतकाळात गेले. मला पुर्वीच्या कावड यात्रांचे  स्मरण झाले.

साधारणतः 35 ते 40 वर्षांपूर्वीचे ते दिवस असतील श्रावणात आई घरीच महादेवाला "शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा..." असे पुटपुटत शिवमुठ वाहायची. सकाळी सकाळी बेsssलपुडाsss अशी आरोळी गल्ली गल्लीत धूमू लागे. पुर्वी मोजक्याच असलेल्या परंतू प्राचीन अशा महादेव मंदिरात लोक आपापला भाव घेऊन दर्शनाला जात, एक लोटा जल चे स्तोम हे आताआताचे. श्रावणात शंकराच्या पूजेचे महात्म्य असते हे बालवयात कळायला लागले. सकाळी शाळा किंवा शिकवणीस जातांना कधी एखाद-दोन तर कधी चार-पाचच्या घोळक्यात खांद्यावरील बांबूला छोटे पितळी तांबे किंवा तांब्याचे भांडे बांधून गावात येणारे युवक दिसत. ते दिसण्यापुर्वीच त्यांची "हर बोलाsss हर महादेवsss" अशी महादेवाला भक्ती भावाने घातलेली साद लांबूनच ऐकू येऊ लागायची. हे युवक पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असत. हे कावडधारी युवक नदीचे पवित्र जल आणून गावातील शिव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात असे पुढे ज्ञात झाले होते. आता नद्यांचे जल किती निर्मळ, शुद्ध आहे हे महादेवचं जाणे. पण किती साधी-सरळ भक्ती होती पूर्वी. किती शुद्ध भाव होता. पण आता मात्र या शुद्ध भावाचे किंवा भक्तीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहे आजच्या कावड यात्रांचे स्वरूप पाहता ती भक्तांची एक "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" अशी यात्रा आहे की, निव्वळ डीजेच्या कान फाडणा-या, शरीरात कंप निर्माण करणाऱ्या भल्या मोठ्या आवाजाच्या तालावर गोंगाट, कोलाहल करीत जाणारा, सण म्हणजे सुद्धा एन्जॉय समजणारा केवळ एक जत्था आहे असे सामान्यजनांना वाटू लागते.

     हिंदू धर्मामध्ये पूर्वापार अनेक सणसमारंभ, रितीरिवाज चालत आलेले आहेत. हे सणसमारंभ चलीरीती, परंपरा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडले जात असत. शंकर भगवान हे पूर्वीपासूनच भोळे म्हणून ओळखले जातात. वनातील कोणतीही पत्री त्यांना वाहिली तरी चालते असेच आपण सर्व लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत.  कुण्या एका शंकराच्या पुस्तकात एक मनुष्य रात्री जंगलात काही आसरा नसतांना शंकराच्या पिंडीवर पाय देऊन रात्रभर त्या झाडावर बसतो. बसल्या-बसल्या एक-एक पान तोडून खाली टाकतो. ते पान नेमके खालच्या पिंडीवर पडते. पिंडीवर बिल्व पत्राचा आपसूकच अभिषेक होतो व त्यामुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न होतात अशी एक कथा आहे. या कथेवरून समजते की शंकर इतका भोळा आहे की, त्याच्याच पिंडीवर पाय देऊन चढलेल्या आणि सहज रात्री काही काम नाही म्हणून झाडावरून एक एक पान खाली टाकणा-याचे पान पिंडीवर पडले म्हणून त्याला सुद्धा तो प्रसन्न झाला. परंतु आता मात्र शंकराला बेलच पाहिजे, हे पान नको अन् ते फुल नको असे उगीचच सांगितले जाते. झेंडूचे फुल नको असे नवीन ऐकायला मिळत आहे. पण काही भक्त झेंडूचे हार शंकराच्या पिंडीला घालतात आणि झेंडूचे फुल मात्र नको म्हणतात. हरतालिकेला तर पत्री अर्थात कोणत्याही झाडांची पाने तोडून भोळ्या शंकरास वाहात असतात. तसेच अनेक लोक भक्ती भावाने मंदिरे उभारतात. त्या मंदिरांमुळे एकता स्थापित होणे गरजेचे आहे. परंतु बरेच वेळा दुर्दैवाने तसे न होता वाद होत असल्याचे दिसते. असो ! हा भाग वेगळा परंतु आताशा भक्तीचे अवडंबर होतांना दिसत आहे. भगवंताच्या आराधनेमध्ये भक्तीपेक्षा दिखावाच जास्त दिसून येत आहे. श्रावणात निघणाऱ्या कावडयात्रांमध्ये मोठमोठे, देखावे आणि तत्सम इतर अनेक गोष्टींचे प्रमाण फार फोफावले आहे. सणांमुळे हिंदू समाज एकत्रित येतो, सामाजिक सलोखा, एकोपा वाढतो तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि सामाजिक संघटन निर्माण होते. हे सर्व जरी खरे असले तरी कुठेतरी हे सण समारंभ सुव्यवस्थितपणे इतरांना त्रास न होतील अशा पद्धतीने, नशा विरहित, अमली पदार्थ विरहित पद्धतीने साजरे व्हावे असे वाटते. मोठी मिरवणूक काढण्यास काही हरकत नाही परंतु कर्णकर्कश्श असे डीजे मात्र टाळायलाच हवे. भगवान शंकराचे कुठलेही चित्र आपण बघितले तर आपल्याला एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेले देवांचे देव महादेव हेच चित्र आठवते. या चित्रावरून असे बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे. कोलाहलापासून त्यांना दूर राहणे आवडते. अशा शांतताप्रिय  निळकंठाच्या कावडयात्रेमध्ये  हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात गोंगाट  वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ?  तशी भक्ती शंकराला प्रिय होईल का ? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यामुळे यावर तरुणांनी व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्यांनी अवश्य विचार करावा असे वाटते. परंतु आजकाल हा सर्व विचार केला जात नाही. लोकशाहीमध्ये संख्येला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जिथे संख्या आहे तिथे राजकारणी सुद्धा त्या संख्येच्या बाजूने कललेले दिसतात. 35-40 वर्षांपूर्वी अत्यंत कमी संख्येने जाणारे कावडधारी दिसले की मनाला प्रसन्न वाटे. त्यांना पाहून नागरिकांचा भक्ती भाव सुद्धा जागृत होत असे. तसेच त्यांनी दिलेली "हर बोला हर महादेव" ही आरोळी सुद्धा भगवान महेशाचे स्मरण येणाऱ्या जाणाऱ्यांना करून देई. परंतु आता मात्र भल्यामोठ्या कावड यात्रांच्या मधून मार्ग काढत नागरिक कसेबसे जातात, डीजेपासून अंतर राखून किंवा कानात बोटे घालून जातात. त्यांना ना शंकराचे स्मरण होत असावे, ना त्यांच्या मनात भक्तीभाव जागृत होत असावा किंवा प्रसन्नता सुद्धा वाटत नसावी.  

    बऱ्याच वेळाने मला ऐकू येत असलेला डीजेचा आवाज आता थांबला होता. मी मनोमन त्या केदारनाथास, त्या ओंकारेश्वरास नमन केले. मनात प्रश्न आला की, काळाच्या ओघात डीजेच्या कर्णकर्कश्श अशा आवाजात कुठेतरी हरवलेली "हर बोला हर महादेव" ही घोषणा पुन्हा ऐकू येईल का ?.

१४/०८/२०२५

Article about philanthropy, rockfeller and swami vivekanand

तुमच्या संपत्तीचे विश्वस्त व्हा, मालक नव्हे !


"तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नसून ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्याने मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून  संताप आला.

परवाच्या वर्तमानपत्रात एक वृत्त वाचले. वृत्त  कर्नाटकातील होते.  कर्नाटकातील रायचूर येथील 60 वर्षीय भिकारीण रंगम्माने एका मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख त्र्यांशी हजारांचे दान केल्याचे ते वृत्त होते. हे वृत्त वाचून आश्चर्य व कौतुक दोन्ही वाटले. अनेक दानशूर व्यक्तींच्या कथा, नांवे आठवली. आणखी एक किस्सा आठवला तो म्हणजे रॉकफेलर आणि स्वामी विवेकानंदांच्या भेटीचा. 

     भारतात स्वामी विवेकानंद माहीत नसतील असा मनुष्य विरळाच असेल. परंतु स्वामी विवेकानंद म्हटले की एक योगी, अगाध ज्ञानी, योद्धा संन्यासी असे चित्र डोळ्यासमोर येते तसेच त्यांचे अमेरिकेत धर्मसभेसाठी जाणे, ती धर्मसभा जिंकणे आणि हिंदू धर्माचे पताका विश्वभर फडकवणे अशा काही जुजबी गोष्टीच ज्ञात असतात परंतु स्वामीजींच्या अनेक प्रेरणादायी अशा कथा, त्यांच्या जीवनातील प्रसंग आहेत की जे आजही मनुष्याला प्रेरणा देऊन जातात, अंतर्मुख करतात. अमेरिकेत त्यांचे झालेले हाल, त्यांना झालेला त्रास, कोलंबो ते अल्मोडा या भ्रमणातील अनुभव हे आजही काही निवडक, मोजक्याच लोकांना माहीत असावेत. स्वामीजींनी काही लोकांना केलेल्या मार्गदर्शनाच्या त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, ज्या आजही तितक्याच प्रासंगिक आणि उपयुक्त आहेत. स्वामीजींनी गडगंज संपत्ती असलेल्या रॉकफेलरला केलेल्या अशाच एका मार्गदर्शनाची कथा इथे आज देत आहे. 

      अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांमध्ये अनेक शक्तींचा विकास झाला होता केवळ दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातल्या गतीविधींची ओळख किंवा जाणीव त्यांना होत असे. ज्यांना कोणाला स्वामीजी या गोष्टी सांगत असत ते लोक त्यांचे शिष्य होऊन जात असत. स्वामीजींनी ज्यांचे मन ओळखले होते त्यापैकी एक व्यक्ती होता जॉन डी. रॉकफेलर. हा मनुष्य अमेरिकेतील तत्कालीन स्टॅंडर्ड ऑइलचा संस्थापक होता. आज हीच कंपनी एक्सान मोबाईल नावाने ओळखले जाते. व्यापारातील अनिष्ट कृत्ये आणि एकाधिकारशाही या जोरावर रॉकफेलरने मोठी धनसंपत्ती अर्जित केली होती. रॉकफेलरला पुढे अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्या, त्याची प्रकृती खालावत जात होती. त्याला आपला मृत्यू समिप आला आहे असेही वाटू लागले होते. रॉकफेलर यांस मग स्वामी विवेकानंद यांना भेटण्याची प्रेरणा झाली कारण ज्या काही लोकांच्या घरी स्वामीजींनी वास्तव्य केले होते ते रॉकफेलरचे मित्र होते व त्यांनी रॉकफेलरला स्वामीजींच्या योग शक्ती बाबत सांगितले होते. रॉकफेलर स्वामीजींच्या भेटीस आला तेव्हा स्वामीजींनी त्याला त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या ज्या केवळ त्यालाच ठाऊक होत्या. त्या गोष्टी ऐकून रॉकफेलर प्रभावित झाला. स्वामीजींनी त्याला म्हटले की, "तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नाही तर ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्यानी मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून  संताप आला त्याला प्रथमच कोणी असा उपदेश करत होते. तो तिथून बाहेर पडला. 

     परंतु एक आठवड्याने तो स्वामीजींकडे परत आला आणि एका संस्थेला मोठे दान करीत असल्याचा एक कागद किंवा चेक म्हणा तो स्वामीजींचे पुढे ठेवला आणि म्हणाला आता तुम्हाला संतोष वाटत असेल आता तुम्ही मला धन्यवाद द्या. तेंव्हा स्वामीजी म्हणाले की, "तुम्हीच मला धन्यवाद द्या कारण तुम्ही दान केलेल्या रकमेपेक्षा जास्त समाधान, अनमोल असा मानसिक आनंद तुम्हाला या दानामुळे प्रथमच मिळाले आहे. तुम्ही ज्यांना दान केले त्यांच्यापेक्षा तुमचेच अधिक कल्याण झाले आहे.

     यानंतर रॉकफेलरचे हृदय परिवर्तन झाले पुढे तो एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने पुढील काळात अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक विश्वविद्यालय, दवाखाने यांना त्यानी मदत केली त्याच्यामध्ये सकारात्मक बदल झाला त्याची प्रकृती सुद्धा सुधारली आणि तो वयाच्या 97 व्या वर्षापर्यंत जगला.

कर्नाटक मध्ये भिकरिणीने केलेल्या दानाच्या बातमीमुळे ही रॉकफेलरची  वरील गोष्ट आज आठवली. भगवद्गीते मध्ये सुद्धा

यज्ञो दानं तपश्चैव न त्याज्यं इतीचापरे ||

यज्ञ, दान आणि तप ही कर्मे मनुष्याने कधीही त्यागू नयेत. बदलत्या जीवनशैलीमुळे यज्ञ आणि तप करणे सामान्य माणसाला कठीण आहे परंतु तो दान करून मात्र मनाचे मोठे समाधान तसेच पुण्य  प्राप्त करू शकतो कारण स्वामीजी म्हणाले होते की "वोही जीते है जो दुसरोके लिये जिते है" त्याचप्रमाणे स्वामीजींनी रॉकफेलरला जसे "तुम्ही तुमच्या संपत्तीचे विश्वस्त आहात मालक नव्हे" हा संदेश समस्त मानवजातीला सुद्धा लागू पडतो.



३१/०७/२०२५

Artical about behaviour of leaders

लोकप्रतिनिधींना झाले तरी काय ?

गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींची अचाट कृत्ये महाराष्ट्रवासीयांना चकित करून सोडत आहेत.  कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणे,  कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करणे   ,  बेताल वक्तव्ये करणे, सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होणे, लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य पद्धतीने न बोलणे असे हे प्रकार आहे. 

खरे तर या विषयावर अनेक वेळा लिखाण झालेले आहे परंतु जसे जसे आपण पुढे जात आहोत विकास करीत आहोत तसे असे राजकारण मात्र गढूळ होत चालले आहे. त्यामुळे पुन्हा-पुन्हा त्याच- त्याच विषयावर लिखाण करावे लागते. कर्मचाऱ्यांना मारणे, गलिच्छ भाषा वापरणे असे कित्येक प्रकार लोकप्रतिनिधींकडून होत असतात. पुर्वी महाराष्ट्राचे राजकारण हे देशभरात सुसंस्कृत राजकारण म्हणून ओळखले जात असे महाराष्ट्रात होऊन गेलेले अनेक संतपुरुष तसेच अनेक प्रथित यश नामांकित असे लेखक कवी, नाटककार यामुळे महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये उठून दिसत होता. महाराष्ट्राची भारतभरात एक वेगळी छाप होती, पण दुर्दैवाने आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. 

     गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींची अचाट कृत्ये महाराष्ट्रवासीयांना चकित करून सोडत आहेत. यात खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला नव्हता म्हणून मंत्रालयातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणे, विधानभवनातच कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करणे एकमेकांना शिवीगाळ करणे, कृषीमंत्र्यांनी बेताल वक्तव्ये करणे आणि सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा त्यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होणे, लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य पद्धतीने न बोलणे असे अनेक प्रकार घडले. 

      खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला नव्हता म्हणून मंत्रालयातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारताना हा सुद्धा विचार केला नाही की आपण कोणत्या अवतारात आहोत आणि काय करत आहोत. तुम्हाला जेवण चांगले मिळाले नाही तर एवढा राग येतो पण तुम्ही राज्य करत असलेल्या राज्यातील जनतेला जेवणासाठी काय मिळते आहे ?, त्यांना जेवण मिळत आहे की नाही ? मिळत असल्यास त्याचा दर्जा चांगला आहे की नाही ? शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी चांगल्या दर्जाची मिळते आहे की नाही ? हे याची सुद्धा जाणीव लोकप्रतिनिधींना असली पाहिजे. जनतेला जर पौष्टिक धान्य, दोन्ही वेळचे जेवण मिळत नसेल तर ते कसे मिळेल याच्यावर विचार करायला पाहिजे. परंतु स्वतःला चांगले पदार्थ मिळाले नाही याची भयंकर चीड येते पण जनतेला काही मिळते आहे की नाही ? त्यांना उपाशी झोपावे लागते आहे का? याबद्दल मात्र काहीही काळजी नाही.   

      याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या हाणामारीबद्दल सुद्धा म्हणता येईल. कार्यकर्ते हे असे कसे असतात की यांना आपण कुठे आहोत काय करत आहोत याचे सुद्धा भान राहात नाही. यांच्या अंगात एवढा जोर कसा येतो की हे विधान भवन सुद्धा मारामारी करायला धजावतात ? 

     महाराष्ट्रवासियांना सर्वात जास्त आश्चर्य वाटले जेंव्हा मंत्री महोदयांचा सभागृहात ऑनलाइन रमी खेळतांनाचा व्हिडिओ माध्यमांवर झळकू लागला. जनता तुम्हाला कशासाठी निवडून देते तुम्ही तिथे जाऊन काय करता, तुमची योग्य खाते मिळाले नाही म्हणून नाराजी आहे तर म्हणून काय जे खाते मिळाले तेथे चांगले काम करायचे नाही आणि बेताल वक्तव्य करायचे असे असते का ?

त्याचप्रमाणे पोलिसांना कायदा व सूव्यवस्था राखायची असते. त्यामुळे पोलिसांची भाषा ही रफ झालेली असते. कायदा व सुव्यवस्था राखतांना पोलीस मोठ्या आवाजात बोलले तर लोकप्रतिनिधींना ते सहन होत नाही मग हे लोकप्रतिनिधी पोलिसांशी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही जनतेच्या रक्षणासाठी जे पोलीस आहेत त्यांना सुद्धा हे दटावतात त्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आले आहे. यावेळी पोलिसांची मानहानी होत असते आणि जनतेच्या नजरेतून पोलिसांचा मान कमी होत असतो.

     अशी ही लोकप्रतिनिधींची वर्तणूक बघून जनसामान्य आश्चर्यचकित झाले आहे. आपण ज्यांना निवडून दिले ते लोक कसे आहेत याची प्रचिती जनतेला येत आहे. सत्ता, खुर्ची मिळाली की मीच सर्वस्व आहे आणि मी काहीही केले तरी चालते असे लोकप्रतिनिधींना वाटता कामा नये. पण नेमके तसेच होते. जनतेने लोकप्रतिनिधींना सत्ता दिली आहे, खुर्ची दिली आहे तेव्हा ती खुर्ची त्यांना हे राज्य सांभाळण्यासाठी दिली आहे, जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी दिली आहे. एकमेकांशी भांडणासाठी, मारामाऱ्यांसाठी, शिवीगाळ करण्यासाठी दिलेली नाही. परंतु याचे भान ठेवतील तर ते लोकप्रतिनिधी कसले ? काल माननीय मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त कृत्ये केलेल्या सर्व संबंधित मंत्र्यांची आमदारांची कान उघडणी केली असल्याचे वृत्त आले आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा कृषिमंत्र्यांना दटावले आहे. परंतु असे जरी केले तरी लोकप्रतिनिधींची वागणूक ही पुन्हा जैसे थे अशीच राहते.          त्यामुळे इथे हेच म्हणणे आहे की लोकप्रतिनिधींनी हे सदैव ध्यानात ठेवावे की त्यांना सत्ता जनतेमुळे मिळालेली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. त्या अर्थाने ते जनतेचे सेवक आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा प्रथमच निवडून आल्यानंतर ते प्रधानसेवक असल्याचे म्हटले होते. तेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे अनुसरण करून आपण जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेलो आहोत हे भान लोकप्रतिनिधींना ठेवायला पाहिजे. सत्ता डोक्यात न जाऊ देणे किंवा डोक्यात जाणार नाही हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. 

१७/०७/२०२५

Article about Khamgaon city.

 मी कात टाकली...

यशवंत टॉवरवरचे घड्याळ

विविध सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यावर ट्रिगार्डसह लावलेली झाडे, त्या झाडांची कटाई करीत असलेली माणसे हे न्याहाळत मी पुढे गेलो. बस स्टॅन्डसमोर गेलो असता तिथे कवी ना. धो. महानोर यांनी रचलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध "मी रात टाकली मी कात टाकली" हे गीत मोठ्या आवाजात सुरू होते. 

पावसाळ्यात रिमझिम पावसात भिजत-भिजत फेरफटका मारणे मला खूप आवडते. अशाच एका निवांत संध्याकाळच्या पावसात    भिजत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. घराजवळचेच सुंदर होत असलेले राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन, पंचायत समितीच्या त्या यशवंत टॉवरवर मा. ना. आकाश फुंडकर यांनी तातडीने निर्देश देऊन बी.डी.ओ. आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांने लागलेले नवीन घड्याळ, महाराणाप्रताप पुतळा त्या समोरचे  सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यावर ट्रिगार्डसह लावलेली झाडे, त्या झाडांची कटाई करीत असलेली माणसे हे न्याहाळत पुढे गेलो. बस स्टॅन्डसमोर गेलो असता तिथे कवी ना. धो. महानोर यांनी रचलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले लता मंगेशकर यांनी गायलेले "मी रात टाकली मी कात टाकली" हे गीत मोठ्या आवाजात सुरू होते. बस स्टॅन्ड मध्ये बससाठी प्रवेश करण्यासाठी जे गेट आहे त्या गेटच्या अगदी समोर एक सायकल स्टोअर आहे. तिथे अजूनही सायकल भाड्याने मिळते. तुर्तास अतिक्रमण हटवल्यामुळे ते सायकल स्टोअर तिथे  नाही पण त्या सायकल स्टोअरचे मालक नेहमी मोठ्या आवाजात जुनी गीते लावत. गेल्या काही दिवसात माझे त्या रस्त्याने बरेच वेळा येणे जाणे झाले. त्यामुळे तिथे लागलेली जुनी गीते माझ्या कानावर पडत. त्या दिवशी पावसात हे वरील गीत कानावर पडले. मी परत मागे वळलो नगरपरिषद जवळ झालेले भव्य सभागृह आणि त्याच्या समोरचे सौंदर्यीकरण दृष्टीस पडले, रेल्वे स्थानकाचे झालेले नवीन गेट दिसले. पुढे नटराज गार्डन कडून गेलो नटराज गार्डनचा तर कायापालटच झालेला मला दिसला. तसा तर तो कायापालट आधीच दिसला होता पण यावेळी मी निवांत असल्यामुळे तो परिसर चांगल्यारीतीने बघितला. पुर्वीचे, आम्ही लहानपणी पाहिलेले नटराज गार्डन सुद्धा सुंदरच होते पण मध्यंतरीच्या काळात त्याची अवस्था फार वाईट झाली होती. आज खूपच सुंदर, प्रेक्षणीय, झालेले नटराज गार्डन बघीतले. का कोण जाणे पण तेथील भव्य नटराजाच्या चेहऱ्यावरील भाव मला प्रसन्न असल्यासारखे  वाटले. नंतर माझ्या डोळ्यासमोर यापुर्वीच विकसित  झालेले नाना-नानी पार्क, छकुली गार्डन, सावरकर उद्यान ही सुंदर उद्याने आली. नवीन सार्वजनिक प्रसाधन गृहे सुद्धा चांगली बनवली गेली आहेत. ती चांगली ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे. 

     अनेक नव्याने झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांवरून माझी गाडी जात होती. खामगांवात बरेच चांगले बदल झालेले नागरिक बघत आहे. शासकीय यंत्रणेतून तर बदल होतच आहे परंतु रोटरी, लायन्स यासारख्या सामाजिक संस्था सुद्धा खामगावात चांगले कार्य करत आहे. खामगावातील मिशन ओटू ही संस्था सुद्धा वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी मोठा पुढाकार घेत आहे शंभो-शंभो गृपने सुद्धा जनुना तलाव परिसरात अनेक वृक्ष लावली आहेत. तरुणाई फाऊंडेशन सुद्धा उत्कृष्ट कार्य करत आहे. मिशन ओटूचे संस्थापक डॉक्टर के. एम. थानवी यांनी तर त्यांच्या गाडीवरच छोटी पाण्याची टाकी लावली आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकण्यासाठी ते ही गाडी घेऊन जातात आणि झाडांना पाणी टाकतात. अशा प्रकारचे त्यांचे हे वृक्ष संवर्धनाचे कार्य अनेकांना प्रेरणा देऊन जात आहे. शासनाच्या माध्यमातून खामगांवात विकास होत आहेच पण वर उल्लेखित सामाजिक संस्था तशाच इतरही काही संस्थांच्या माध्यमातून खामगांव शहर हिरवेगार होत आहे. वृक्षांमुळे शहरातील प्रदूषण सुद्धा आटोक्यात आहे. माझे नोकरी निमित्त इतर शहरात गेलेले मित्र आल्यावर खामगांवची हवा अजूनही शुद्ध असल्याचे सांगतात. सोशल मीडियावर खामगांवच्या द्रोणच्या माध्यमातून  घेतलेल्या अनेक चित्रफिती आलेल्या आहेत त्यात खामगाव खूपच सुंदर दिसते आहे. मध्यंतरी खामगाव शहरातून गेलेल्या नाल्यांचे सुद्धा सौंदर्यीकरण होणार आहे असे ऐकले आहे. ते जर झाले तर खामगांवच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे. पण नवीन उद्योग खामगांवात यावे तसेच पाणीपुरवठा सुद्धा नियमित व दैनंदिन असावा याचीही नागरिकांना प्रतीक्षा आहे. पाणीपुरवठा दैनंदिन करण्यामध्ये गत काळात अनेक समस्या आल्या होत्या परंतु आता वाढीव पाणीपुरवठा लवकरच होण्याची चिन्हे दिसत आहे. 

खामगांव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे अनेक बदल बघत बघत एव्हाना मी पुनश्च माझ्या घराकडे जात होतो. यशवंत टॉवर आले  पुन्हा त्या टॉवरवरच्या घड्याळाने माझी नजर खेचली आणि थोड्या वेळापूर्वी ऐकलेले "मी रात टाकली, मी कात टाकली" हे गीत मला आठवू लागले. शहरात होत असलेल्या अनेक बदल बघून खामगाव शहराने सुद्धा आता कात टाकली असा विचार माझ्या मनात आला आणि देहाने मी मानसिक आनंदाने भिजलेला मी घरी पोहचलो.

१०/०७/२०२५

Article about my lt. aunty

 वोही जीते है जो दुसरो के लिए जीते है |


मनुष्य आयुष्यभर जे काही जमा करतो ते सोबत घेऊन जात नाही पण पुण्यकर्म मात्र सोबत घेऊन जात असतो. आयुष्यभर इतरांसाठी घेतलेले कष्ट आणि धार्मिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या यामुळे मामींना निश्चितच सद्गती मिळाली असेल. 

बालपणी थोडे फार कळायला लागल्यावर "मामाच्या गावाला जाऊ या" हे वाचता / म्हणता येऊ लागले. मग कधीतरी आईसोबत मामाच्या गावाला जळगांवला मी गेलो असेल. त्या आठवणी तर आता खूपच धूसर झाल्या आहेत. मात्र त्या काळात नवी पेठ जळगांव खांदेश येथील रत्नपारखी चाळीतील तिस-या मजल्यावरील दोन खोल्यांचे प्रवेश करतांनाच स्वयंपाकघर असलेले, जाळीचा दरवाजा असलेले मागे गॅलरी असलेले छोटेखानी घर, विहीर स्पष्टपणे स्मरणात आहे, विहिरीतून रोज पाणी ओढून भरावे लागे. याच सोबत स्मरणात आहे त्या स्वयंपाकघरात आणि पुढे स्वत:च्या घरात नेहमी सर्वांसाठी कष्टत, झटत आलेल्या आमच्या मामी, प्रवरा मामी म्हणजेच प्रवरा प्रभाकर नाईक. कष्ट आणि मामी हे जणू समीकरणच होते पण इतके कष्ट करूनही ना कधी तक्रारीचा सूर आणि ना कधी उदासवाणा चहेरा. मामींना मी नेहमी हसतमुखच पाहिले. चार जुलै रोजी मामींच्या दु:खद निधनाची वार्ता आल्यावर मामींबाबतच्या अशा आठवणी झरझर डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी खामगांवहून निघालो. खामगांव ते जळगांव हा रस्ता तसा बालपणापासून परिचित पण यावेळी तो रस्ता, आजूबाजूंची गावे याकडे मुळी लक्षच गेले नाही. मनात येत होत्या त्या केवळ मामींच्या आठवणी. 
        बळीराम पेठेतील गरीब कुळकर्णी कुटुंबात जन्मलेली ही कन्या माझ्या अंदाजाप्रमाणे 60 च्या दशकात कोर्टात नोकरी करणा-या माझे  मधले मामा प्रभाकर नाईक यांची पत्नी झाली. घरी खाणारी पाच सहा तोंडे होती, ईश्वराने मामींना काही अपत्य सुख दिले नाही पण  पुतणी, पुतणे होते त्यांचा सांभाळ त्यांनी केला. आजोबांची तुटपुंजी पेन्शन, मामांचा पगार हे पुरेसे नव्हते म्हणून मामींनी आजी व मामांकडून नोकरीची अनुमती घेतली. आजी मोठी कडक सोवळ्याची होती "नोकरी करते म्हणून घरच्या पुजादी कामात हयगय चालणार नाही" या आजीच्या अटीवर ज्या शाळेत मामी शिकल्या होत्या त्याच विद्या विकास प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या, पुढे "जिस स्कुलमे तुम पढते हो हम उसके हेडमास्तर है" या फिल्मी डायलॉगप्रमाणे त्याच शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा झाल्या. हाडाच्या शिक्षिका असलेल्या मामी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रिय अशा शिक्षिका तर होत्याच पण आम्हा सर्व भाचे, पुतणे मंडळीसाठी त्या जणू जीवनशिक्षण देणा-या चालत्या-बोलत्या विद्यापीठच  होत्या. आम्ही उन्हाळ्यात मामींकडे गेलो की मामी शाळेतून लहान मुलांची पुस्तके घेऊन येत असत. गोष्टींच्या त्या पुस्तकांचा आम्ही फडशा पाडत असू. मामींनी आम्हाला खुप खाऊपिऊ घातले. सातूचे पीठ तर त्या अप्रतिम बनवत. आमची खाण्यापिण्याची तर चंगळ असे. जेवणात विविध पदार्थ, वरणावर घरचे साजूक तूप. "तूप मोरीत नाही गेले पाहिजे" अशी ताकीद असे त्यामुळे आम्ही तूप निपटून खात असू. मला बेरी आवडते म्हणून त्या आवर्जून माझ्यासाठी साखर घालून बेरी ठेवत असत. "मामाची बायको सुगरण" या गीत पंक्तीप्रमाणे त्या चांगल्या सुगरण होत्या त्यांच्या हातचे लाडू, त्यांचा हातचा चिवडा, भाज्या, इतकेच काय साधे वरण सुद्धा अप्रतिम असे. कुकर ऐवजी त्या भांड्यातच भात शिजवत. अंतिम दर्शनासाठी जाताना गाडीत माझ्यासोबत मामींच्या भावजयीचे भाऊ सुद्धा होते त्यांनी चहाची आठवण काढली त्यामुळे आठवणींच्या गर्दीतून मी भानावर आलो आणि मला चहावरून मामींची चहा बनवण्याची  निराळीच पद्धत आठवली.  त्या भरपूर चहा देत असत त्यांनी चहाने शिगोशीग भरलेला कप आणला की, "एवढा चहा तर दिवसभर पुरेल" असे माझे वडील गमतीने म्हणत. आम्ही आणि आमच्या सोबत येत असलेल्या मामींच्या आठवणी असे जळगांवात दाखल झालो, मामींचे घर आले. त्या दिवशी जळगांवला प्रथमच आता देहरुपातून आणि त्यांच्या घरातूनही कायमच्या निघून गेलेल्या त्या "रामपद", 4-B, शंकरवाडी, जेडीसीसी बँके जवळ, रींग रोड जळगांव या पत्त्यावरील घरात मी येऊन पोहोचलो होतो. कदाचित त्या घराला आता ही माझी शेवटचीच भेट असेल. माझ्या मामांनी चाळीस वर्षांपुर्वी मोठ्या हौसेने कोरीव अक्षरात लिहिलेले घराचे "रामपद" हे नांव न्याहाळले. मामीचे अंतिम दर्शन घेतले, त्या दिवशी सकाळपासून आभाळ पण रडत होते. "एक समय पर दो बरसाते एक बदलीसे एक नैनोसे " अशी सर्वांचीच गत झाली होती. मामींच्या घरात समोरच्या खोलीत बसल्यावर पुन्हा मला मी शिक्षण, नोकरी निमित्त जळगांवला राहत असतानाचे दिवस आठवले. 
     मी मामांकडे न राहता खोली करून मित्रांसोबत राहत असे. मी मामांकडे न राहिल्याने मला मामा, आजी आणि मामींनी रोज त्यांच्या घरी हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. तो आदेश मी काटेकोर पाळला होता. माझ्या मित्रांसह मी मामांकडे जात असे, मामी रोज काही खायला देत, चहा करत मग गप्पा गोष्टी झाल्या की आम्ही खोलीवर परतत असू. मी रोज माझ्या मामाकडे मित्रांना घेऊन जातो म्हणून एकदा शेजारच्या खोलीतील एक मुलगा मला म्हणाला, "कोण आहे रे तुझे मामा मामी की जिथे तुम्ही रोज जाता ? मला पण त्यांना बघायचे" म्हणून एक दिवस तो पण आला समीर देसाई त्याचे नाव. त्या दिवशी समीरसाठी खास बेत केला होता. समीरची आणि त्यांची ओळख करून दिली. मामा-मामींनी केलेले यथोचित स्वागत आणि त्यांची आपुलकीची वागणूक बघून समीरला अतिशय आनंद वाटला होता. त्याला आम्ही तिथे रोज का जातो हे आता कळून चुकले होते. जळगावच्या तीन वर्षाच्या कालावधीत दरवर्षी मला मामींनी ड्रेस घेऊन दिला. मला मी कधीही घरापासून दूर आलेलो आहे असे जाणवू दिले नाही.
     मामा आणि मामी दोघेही तसे लढाऊ बाण्याचे होते मामी मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या परंतु तरीही त्यांची मान्यता काही आली नव्हती. ही एक मोठी चूक होती. हे जेव्हा कळले तेव्हा मामांनी कठोर परिश्रम घेऊन लोकायुक्त, मुंबईपर्यंत जाऊन त्यांची मान्यता आणून त्यांची पेन्शन सुरू करून दिली होती. मामा रोज सकाळी लवकर उठून संघाचा गणवेश घालून रिंग रोड परिसरातील अनेक सुविचार फलकांवर सुविचार लिहीत असत ऊन, वारा, पाऊस काहीही असो त्यांचा हा नियम होता. पुढे मामा वारल्यावर मामींनी त्या सुविचारांचे "परागकण" नावाचे एक पुस्तक छापले. मामींची अशी इच्छा होती की त्या पुस्तकाचे विमोचन तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी यांच्याकडून करून घ्यावे. योगायोगाने सुदर्शनजी जळगाव खान्देशच्या दौऱ्यावर आले होते  मामींनी संघ कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. विनंती केली व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ मिळणे अवघड होते पण तरीही मामींनी जिद्द सोडली नाही आणि येनकेन प्रकारेण त्यांनी सुदर्शनजी यांच्याशी संपर्क साधला आणि मामांचे परागकण हे पुस्तक त्यांच्या हस्ते विमोचित करून घेतले आजही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे. 
     मामा आणि मामी यांनी अनेकांना भरभरून मदत केली मग ते त्यांचे नातेवाईक असोत किंवा नित्यपरिचित लोक असोत. दूधवाला, भांडेवाली, भाजीवाली अशा सर्वांना त्यांनी भरपूर मदत केली. अखेरच्या दिवसात मामी त्या काळात त्यांच्या भावजयीकडे राहण्यास गेल्या होत्या त्यामुळे भांडेवालीचे काम नव्हते, निराधार अशा तिला आता तिचा पगार मिळणार नाही याची चिंता लागली होती. तिने तसे सांगितल्यावर "तुला काम नसले तरी मी पगार देईल असे मामी तिला म्हणाल्या आणि तिला त्यांनी दर महिन्याचा पगार मोफत दिला. मामांना स्वतःचे घर संघाला दान करावे असे खूप वाटत होते परंतु काही अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही. मामी सर्वांसाठीच आयुष्यभर झटत राहिल्या. "इदं न मम" म्हणत सर्वांना सदैव देतच राहील्या, सर्वांना भरभरून प्रेमही दिले. अनेक अडचणी जीवनात आल्या तरीही त्यांना कधी नैराश्याने ग्रासले नाही त्या सदैव शांत आणि हसतमुखच राहिल्या. कुणाला दोष देण्याचा हेतू नाही पण काळाचा महिमा बघा कसा असतो. मामी सर्वांसाठी झटत राहिल्या पण त्यांच्या अनेक आप्तांना आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, व्यस्त, किंवा पूर्वनियोजित अशा कार्यक्रमांमुळे किंवा अन्य अडचणींमुळे मामींच्या अंतिम दर्शनासाठी सुद्धा येणे अशक्य झाले.      
     स्वामी विवेकानंदांनी दिलेला "वोही जीते है जो दुसरो के लिए जीते है" हा संदेश मामा आणि मामी प्रत्यक्ष जगले. त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था, खामगांव यांना सुद्धा भरघोस मदत निधी दिला. अध्यात्मिक, धार्मिक कार्यासाठी त्यांनी ज्या काही देणग्या दिल्या त्या सोबत घेऊन त्या इहलोक सोडून गेल्या. कारण मनुष्य आयुष्यभर जे काही जमा करतो ते सोबत घेऊन जात नाही पण पुण्यकर्म मात्र सोबत घेऊन जात असतो. आयुष्यभर इतरांसाठी घेतलेले कष्ट आणि धार्मिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या यामुळे मामींना निश्चितच सद्गती मिळाली. त्यांचा सर्वच नातेवाईकांना एक भावनिक असा आधार होता तो आधार कायमचा नष्ट झाला त्यामुळे जणू काही एखादा भला मोठा आधारवडच कोसळला असे वाटते आहे. मामींना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏