Click "Follow" Button below To Follow this Blog

२४/०४/२०२५

Article about pahalgam attack.

पहलगाम हल्ला, सिंधू करार स्थगित आणि स्मरण पालखेडच्या लढाईचे.

अशा प्रकारचे अतिरेकी हल्ले झाले की स्मरण होत असते ते ऐतिहासिक घटनांचे. काल रात्री या हल्ल्याचे विचार करता करता आणि भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला त्यामुळे स्मरण झाले ते अशाच एका लढाईचे ज्यात शत्रू सैन्याला पिण्यास पाणी मिळू नव्हते दिले. पाण्याअभावी शत्रुची मोठी कोंडी झाली होती व तो पराभूत झाला होता. 

परवा दुपारी पहलगाम येथे हिंदू पर्यटकांना टार्गेट करून मारण्यात आले. काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर पर्यटन व्यवसाय चांगलाच जोरात सुरू झाला. 2023-24 मध्ये काश्मीर मधील पर्यटन व्यवसाय 16800 कोटी रुपयांचा असा झाला होता. अनेक स्थानिकांना पर्यटनामुळे तिथे चांगला रोजगार मिळाला. दल लेकमध्ये तर पंधराशेपेक्षा अधिक हाऊस बोटींचा व्यवसाय सुरू आहे. मोदी सरकार आल्यापासून देशात आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांवर  केंद्र सरकारने मोठा अटकाव आणला आहे, तरीही परवा हा हल्ला झाला. यात 27 पर्यटकांची निर्घृण हत्या झाली, देश हादरला, पहलगाम आणि काश्मीर पुन्हा शांत झाले, पंतप्रधान मोदी हे सौदी अरब दौरा रद्द करून भारतात परत आले आणि  विमानतळावरच तातडीची बैठक घेतली. गृहमंत्री काश्मीरमध्ये रवाना झाले. मोदी, शहा यांच्या देहबोलीवरून पुर्वीसारखाच सर्जिकल स्ट्राइक होतो की काय ? असे भारतीयांना वाटू लागले कारण मोदींचे "घरमे घुसकर मारेंगे" हे वाक्य आजही तमाम भारतीयांच्या लक्षात आहे. पण यावेळेस भारताने वेगळ्या पद्धतीचा सर्जिकल स्ट्राइक केला आणि या स्ट्राइक मध्ये 1960 मध्ये झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित करून टाकला. याशिवाय पाकिस्तानच्या नागरिकांचा विसा रद्द करून टाकला, पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना एका आठवड्यात देश सोडायला सांगितले, तसेच पाकिस्तानातील आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा भारतात परत बोलावले. असे अनेक निर्णय केंद्र सरकारने तातडीने घेतले. 

      सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान मोठ्या कोंडीत पकडल्या जाणार आहे. सिंधू नदी प्रणालीतील सुमारे २०% पाणी, म्हणजेच ३३ दशलक्ष एकर फूट (एमएएफ) भारताला त्याच्या विशेष वापरासाठी वाटप करण्यात आले आहे . उर्वरित ८०%, म्हणजेच १३५ एमएएफ, पाकिस्तानला वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान चांगलेच अडचणीत येणार आहे. त्यांचे एवढे मोठे पाणी रोखले जाणार आहे. 

     हा भ्याड अतिरेकी हल्ला झाल्यापासून नाना प्रकारचे विचार मनात घोळत आहेत. अतिरेक्यांची गोळी सहा एप्रिल रोजी लग्न झालेल्या नौसेनेच्या लेफ्टनंट मोजण्याचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा  जीव घेऊन गेली त्यांच्या पत्नीचा आक्रोष पाहावत नव्हता. श्रद्धांजली, सुन्न झालो, अशा प्रकारचे उद्गारच काय ते फक्त आपण काढू शकतो. जुन्या काळात बरे होते लगेच शस्त्र घेऊन निघता तरी येत होते, आता तसे करणे शक्य नाही. सामान्य नागरिकास  ईट जवाब पत्थर से असा काही आता देता येऊ शकत नाही पण मग त्यांनी निवडलेल्या सरकारने तरी तो द्यावा अशी या जनतेची इच्छा असते. भारताने काल जो अनपेक्षित असा सर्जिकल स्ट्राईक केला आहे तो सुद्धा पाकिस्तानला चांगलाच  झोंबणारा असा आहे.

     अशा प्रकारचे अतिरेकी हल्ले झाले की स्मरण होत असते ते ऐतिहासिक घटनांचे. काल रात्री या हल्ल्याचे विचार करता करता आणि भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला त्यामुळे स्मरण झाले ते अशाच एका लढाईचे ज्यात शत्रू सैन्याला पिण्यास पाणी मिळू नव्हते दिले. पाण्याअभावी शत्रुची मोठी कोंडी झाली होती व तो पराभूत झाला होता. 

    ही घटना आहे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची, एकही सैनिक न गमावता जिंकलेल्या एका लढाईची. बाजीराव पेशवे कर्नाटकात मोहिमेवर असताना ही संधी साधून निजामाने पुण्यावर आक्रमण केले आणि त्याला असे वाटले की आपण पेशव्यांना अर्थात शाहू महाराजांना चांगला शह देऊ परंतु बाजीरावांनी मात्र वेगळीच बाजी लावली. निजामाला अशी अपेक्षा होती की बाजीराव पुणे वाचवायला परत फिरतील परंतु बाजीरावांनी उलटीच खेळी खेळली. त्यांनी निजामाच्या राजधानीकडे कूच केले ते ऐकून निजाम हादरला आता आपली स्वतःची राजधानी वाचवायची की पुण्यावर हल्ला करायचा असा त्याला पेच पडला आणि तो माघारी फिरला. पण बाजीरावांचे सैन्य आणि निजामाचे सैन्य यांची गाठ संभाजीनगर जवळच्या पालखेड निपाणी जवळ पडली. असे सांगितले जाते की, ज्या पाण्याचा उपयोग निजामाचे सैनिक आणि जनावरे करत असत त्या पाणवठ्यालाच बाजीरावांनी वेढा टाकला. त्यामुळे निजामाची आणि त्याच्या सैन्याची मोठी कोंडी झाली. पाण्याअभावी त्यांची लाही लाही होऊ लागली आणि आपली युद्ध सामुग्री तिथेच सोडून  निजाम सैन्याने काढता पाय घेतला. ही लढाई बाजीरावांनी एकही सैनिक न गमावता जिंकली शिवाय निजामाच्या तोफा व इतर युद्ध सामुग्री बाजीरावांनी जप्त करून घेतली. 

    ज्याप्रमाणे बाजीरावांनी त्या काळात निजामाची पालखेडला पाणी अडवून कोंडी केली होती त्याच प्रकारची कोंडी आता  सिंधू पाणी करार स्थगित करून भारताने पाकिस्तानची केली आहे.  28 एप्रिलला थोरल्या बाजीराव पेशव्यांची पुण्यतिथी असते. बाजीरावांची ही युद्धनीती योगायोगाने का होईना पण मोदी सरकारने वापरली आहे. अखंड हिंदुस्तान वर भगवा झेंडा फडकवण्याचं ध्येय घेऊन, शिवाजी महाराजांचे स्वराज्य भारतभर विस्तार करण्यासाठी म्हणून मोहिमवर मोहिमा लढणा-या व एकही लढाई न हरणा-या थोरल्या बाजीरावांना सुद्धा स्वर्गात त्यांची युद्धनीती (विदेशी विद्यापीठात आजही पालखेडची लढाई एक strategic war चे उदाहरण म्हणून अभ्यासली जाते) वापरल्यामुळे निश्चितच आनंद झाला असेल, त्यांचा आत्मा धन्य झाला असेल.

  पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व देश बांधवांना श्रद्धांजली तसेच पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन आणि थोरले बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन.

२०/०४/२०२५

Article about a story of a self made man

असाही एक 'विजय'पथ

...कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. विजुभाऊ यांची ही स्टोरी  तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल... 

हा विजयपथ आहे एका जिद्दी होतकरू गरीबीतून वर येऊन व्यवसायात स्थापित होणाऱ्या एका तरुणाचा. खामगांव येथील टिळक स्मारक मंदिरचे तत्कालीन काळजीवाहक श्रीरामजी शिंदे यांना 20/4/1965 रोजी द्वितीय पुत्र प्राप्त झाला. नांव ठेवले विजय, विजय श्रीराम शिंदे. घरची परिस्थिती बेताचीच, कमीत कमी पैशात घरखर्च भागवावा लागे म्हणून मग श्रीराम शिंदे आणि भिकाबाई यांनी आपल्या मुलांचे  प्राथमिक शिक्षण न.प.शाळा आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मध्येच केले. आई वडिलांना मदत म्हणून लहानग्या विजयने इयत्ता चौथी मध्येच असतांना 50 पैसे रोजाने कामकाज करण्यात सुरुवात केली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. शिक्षण अर्धवटच राहिले. विजय आता तरुण झाला होता. घर खर्च वाढू लागला होता, तो भागवता यावा म्हणून विजयने मुंबई येथे कष्टात दिवस काढून शिवणकाम शिकले. लहानपणीच रोजाने काम केल्यामुळे व त्यातील चांगल्या वाईट अनुभवामुळे विजय शिंदे यांच्या डोक्यात नोकरीपेक्षा व्यवसायाच करावा असे ठसले होते त्यामुळेच मग 1984 मध्ये स्टेट बँकेमध्ये नोकरी मिळाली होती परंतु तेरा दिवस काम करून ती सोडून दिली आणि आपल्या शिवणलेच्या जोरावर 1986 मध्ये खामगांवातील तत्कालीन श्याम टॉकीज म्हणजेच आताच्या सनी पॅलेस जवळ टेलरिंगचे दुकान सुरू केले. हे दुकान विजय शिंदे यांनी पाच वर्ष चालवले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 1991 मध्ये विजयचे दोनाचे चार हात झाले नववधूच्या पायगुणामुळे जगदंबा चौकामध्ये टेलरिंगचा त्यांचा व्याप वाढला. विजय मग विजयराव/विजुभाऊ या नावाने ओळखला जाऊ लागला. चार वर्षे या ठिकाणी व्यवसाय केल्यानंतर पुढे विजुभाऊ शिंदे हे 1996 ते 99 सिल्लोड येथे गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी यशस्वी रीतीने टेलरिंग व्यवसाय केला. अर्थार्जनाचे आणखी काही मार्ग असावेत म्हणून 2001 मध्ये त्यांनी फटाक्याचे दुकान लावायला सुरुवात केली आणि 2006 पर्यंत ते फटाक्याचे दुकान लावत असत. व्यवसायात आवड असल्यामुळे आणि सतत नव्याचा ध्यास, जिद्द , उमेद असल्याने बोलका स्वभाव असलेले विजुभाऊ खामगांवात सुपरिचत झाले. पुढे काळात झालेला बदल लक्षात घेता व लोकांच्या खाद्याच्या अभिरुचीत झालेला बदल ध्यानात घेऊन त्यांनी 2002 मध्ये एलआयसी समोर फौजी कॉर्नर म्हणून खामगावातले पहिले चायनीज आणि पिझ्झाचे उपाहारगृह सुरू केले. त्यासाठी त्यांनी नेपाळी कारागीर आणले होते. त्या काळात खामगांवला साऊथ इंडियन पदार्थच तर क्वचितच मिळत असत आणि तेव्हा पिझ्झा आणल्यामुळे विविध क्लबच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा पिझ्झाचा स्टॉल लागत असे आणि म्हणून लहान मुलांमध्ये जे पिझ्झावाले अंकल किंवा पिझ्झा वाले मामा म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे 2006 मध्ये विजूभाऊंनी टेंभुर्णा फाट्यावर शिवराणा ढाबा सुरू केला आणि तो सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या अनेक वर्ष चालवला. पुढे वृद्धापकाळमुळे शिस्तप्रिय व टिळक स्मारकचे काम चोख बजावणारे श्रीराम शिंदे म्हणजे विजय शिंदे यांचे वडील हे टिळक स्मारकच्या व्यापामधून सेवानिवृत्त झाले आणि त्यामुळे टिळक स्मारकचे केअर टेकर म्हणून विजय शिंदे यांनी कार्यभार स्विकारला. हे करत असतानाच त्यांनी 2009 मध्ये घरपोच रॉकेल वितरण हा उपक्रम सुद्धा राबवला होता आणि 2011 मध्ये एक खिडकी योजनेचा सेतू हा उपक्रम मुलासह सुरू केला मुलाने व्यवस्थितरित्या पूर्ण कारभार सांभाळला. 2012 मध्ये विजुभाऊ यांनी कॅटरिंग व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे आणि खामगांव मध्ये शिंदे कॅटरर्स म्हणून नावाजलेला आहे. या व्यवसायात सुद्धा शिंदे यांनी चांगले नाव कमावले. सचोटीने आणि उत्कृष्ट भोजन लोकांना दिल्यामुळे या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आणि शिंदे कॅटरर्स हे नाव खामगांवतच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्ये ही ओळखले जाऊ लागले. त्यांना स्वतःलाच खाण्यापिण्याची प्रचंड आवड असल्यामुळे आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे ते हा व्यवसाय आनंदाने उत्साहाने चालवत आहेत. खामगांव सोबतच अहमदनगर,  संभाजीनगर, अमरावती, अकोला, चिखली, नांदुरा मलकापूर या गावांना सुद्धा त्यांनी कॅटरिंग सेवा पुरवली आहे. याशिवाय विजुभाऊ हे विविध सामाजिक उपक्रमात सुद्धा हीरहिरीने भाग घेत असतात. 80 च्या दशकात चंदनशेष गणेश मंडळाचे ते उत्साही सदस्य होते. त्यांच्या या विविध उपक्रमांमध्ये आणि या विविध व्यवसायांच्या प्रवासामध्ये पत्नी, परीवारजन आणि मुलाचे त्यांना चांगलेच पाठबळ आहे. शिंदे यांचे दिवाळीचे फराळाचे पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहे. 

     विजुभाऊ यांना त्यांच्या मनमिळाऊ व आपलेसे करण्याच्या स्वभावामुळे खामगांव मधील अनेक लोक ओळखतात आणि त्यांच्या परिवारात सुद्धा ते भाच्यांचे लाडके मामा, बहीण भावांचे लाडके भाऊ, पुतण्यांचे आवडते काका आणि हो आता तर त्यांना नातवंड सुद्धा झाली आहेत या नातवंडाचे ते आवडते बाबाजान आहे. आज हे बाबाजान अर्थात कष्टाळू, पडेल ते काम करण्याची तयारी असलेले विजुभाऊ वयाची साठ वर्षे पूर्ण करून एकसष्टीत पदार्पण करीत आहे. आजही तरुणाला लाजवेल असाच उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. कुणीही त्यांना भेटायला गेले की ते मोठ्या उत्साहाने त्याच्याशी संवाद साधतात आणि आपल्या दिलखुलास स्वभावामुळे वातावरण प्रफुल्लित ठेवतात. अशा या नांवातच विजय आणि "श्रीराम" असलेल्या व्यक्तीला लोकप्रियता आणि यश कसे नाही मिळणार ? 

     आज विजुभाऊ शिंदे हे नाव सर्वपरिचित असे झालेले आहे. विविध क्षेत्रातील राजकीय,  सामाजिक, सेवाभावी,  औद्योगिक अशा प्रत्येकच क्षेत्रात विजूभाऊंचे नांव आहे, चांगली ओळख आहे. "कर्तव्याने घडतो माणूस" या उक्ती प्रमाणे  विजुभाऊ आपले कर्तव्य पार पाडत गेले व आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले असे व्यक्तिमत्व आहे.

   अशा होतकरू, कष्टाळू, मोठा मित्रपरिवार  असलेल्या विजय शिंदे यांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा परिवार आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर  वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  आगामी कार्यकाळात त्यांचा व्यवसाय अधिकाधिक नांवलौकिक प्राप्त करो आणि त्यांना आरोग्यदायी असे दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

   विजय शिंदे यांनी लहानपणापासून कष्ट घेतले आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून अर्थार्जन करून आपले कुटुंब सांभाळले शिवाय त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना रोजगार सुद्धा मिळाला व मिळतो आहे. आजच्या शानशौकीत राहणाऱ्या तरुणांना विजय शिंदे यांची ही स्टोरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

   कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. त्यांना वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.  

माहिती स्त्रोत - भूषण शिंदे

शब्दांकन - विनय वि. वरणगांवकर, स्तंभलेखक


१७/०४/२०२५

Article about Bangal riots and Nation Building

 राष्ट्र उभारणीतील उणीवा


बंगालमध्ये सध्या जो हिंसाचार होतो आहे, जाळपोळ, हत्या होत आहेत व इतर वेळीही देशात अशा घटना घडतात. हिंसाचारी लोकांवर कठोर शिक्षा होईल अशा कायद्यांची आपल्या देशात नितांत आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांनी नाही का एका बलात्काऱ्याचा चौरंगा केला होता.

भारत स्वतंत्र होऊन 80 वर्षे होत आली. पारतंत्र्यात इंग्रज आपल्याला रेल्वे, तार, डाक खाते अशा काही सुविधा देऊन गेले आणि त्यामुळे आपला बराच मोठा फायदा झाला.  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भारतामध्ये उद्योग, व्यवसाय फारच मंद गतीने वाढले. बजाज स्कूटर, मारुती कार या भारतामध्येच निर्मित व्हायला बराच कालावधी जावा लागला. लायसन्स राज मोठ्या प्रमाणात होते. शेतीमध्ये सुद्धा भरमसाठ उत्पादन होण्यास बराच कालावधी लागला. स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती या उत्पादन क्रांत्या सुद्धा बऱ्याच वर्षांनी झाल्या. तदनंतर शेती व इतर उत्पादने वाढली. आपल्याच सोबत स्वतंत्र झालेले सिंगापूर हे विकासाच्या दृष्टीने आपल्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेले. तसेच आपल्या देशात शिस्त आणि कठोर कायद्यांचा सुद्धा अभाव आहे. त्यामुळे दंगली, जाळपोळ, बलात्कार यासारख्या गुन्ह्यात अडकलेल्या समाजकंटकांना म्हणावी तशी कठोर शिक्षा होत नाही आणि त्यामुळे काही दिवसातच या गुन्ह्याचे आरोपी हे जामिनावर सुटून पुन्हा आपल्या समाजकंटकी कारवाया सुरू करतात. आज आपण बंगाल जळतांना पाहतोच आहे. मुर्शिदाबाद, मालदा या ठिकाणी मुस्लिम म्हणा किंवा बांगलादेशी घुसखोर म्हणा यांनी मोठा उत्पात घातलाय. रोम जळत असतांना निरो बासरी वाजवत होता त्याप्रमाणे ममता बॅनर्जी मतपेढी नाराज होऊ नये म्हणून स्वतःचीच हेकी मिरवतांना दिसत आहे. स्वातंत्र्यानंतर आपण संघराज्य पद्धती अवलंबली लोकशाही दृष्ट्या ते योग्यच आहे परंतु अनेकदा आपण बघतो केंद्राने लागू केलेले कायदे काही राज्ये त्यांच्या राज्यात लागू करत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याच देशात कायद्यांच्या बाबतीत विरोधाभास दिसतो, विसंगती दिसून येते. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची पेन्शन केंद्राने बंद केल्यावर काही राज्यांनी पेन्शन सुरू ठेवले तर काही राज्यांनी पेन्शन बंद केले. एक देश, एक विधान, एक प्रधान असे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मत होते. परंतु आज काही राज्यांनी त्यांची राज्यगीते त्यांचा राज्यध्वज असे ठरवून टाकले आहे त्याप्रसंगी सुद्धा वाद निर्माण झाला होता. राज्या-राज्यातील संबंध, त्यांचे ध्वज, काही राज्यांची केंद्राच्या धोरणांविरुद्ध अशी भूमिका घेणे हे आपल्या देशाला फुटीरतेकडेच घेऊन जाण्याचे लक्षण आहे. शिक्षणाच्या बाबतीतील कायदे सुद्धा वेगवेगळी आहेत. समान नागरी कायदा अद्याप लागू झालेला नाही. इतर विकसित देशात सर्व नागरिकांना सारखेच नियम आहेत इथे मात्र स्वतंत्रता प्राप्तीनंतर तसे काही केलेच नाही.  आपल्या देशाने सर्वधर्मसमभाव अशी भूमिका घेतली पण  एकीकडे काही लोकांना अपत्यांबाबत काही नियम अटी नाही तर दुसरीकडे सरकार इतर काही लोकांना हम दो हमारे दो सारखी शिकवण देत राहिली. वक्फ सारखे नियम मुस्लिम राष्ट्रात नसतांनाही भारतात मात्र ते लागू झाले. इथेही तसेच, काही लोकांना कुठल्याही जमिनीवर हक्क सांगता येतो तर इतर लोकांना मात्र तसे अधिकार नाही. हा केवढा मोठा विरोधाभास आणि सर्वधर्म समभाव असतांना मग जमिनीबाबतचे असेच धोरण सर्वाँना हवे. पण तसे नाही मग हा इतर धर्मीयांवर हा अन्याय नाही का ?  हिंसाचार, बलात्कार करणाऱ्या विरोधात तर कठोरात कठोर कायदे पाहिजे म्हणजे पाहिजेच.  आपल्या देशात अनेकदा दुर्दैवाने असे चित्र दिसून येते की  मानव अधिकारवाले या हिंसाचाऱ्यांच्या बाजूने उभे ठाकतात. 

     आपल्या देशात राजकारण हे सदैव सत्ता केंद्रित राहिले आणि मग सत्तेसाठी लोकशाहीची शक्ले करून फक्त सत्ताप्राप्ती हेच नेत्यांचे ध्येय राहिले. आजही आपल्याला हेच चित्र दिसून येते. जनता सुद्धा मतदान करताना सक्षम उमेदवारास न पाहता आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करतात. राष्ट्रहिताच्या विधेयकांवर आपले राजकीय पक्ष एकत्र येतांना दिसत नाही. 370, तलाक यावेळी आपण असे चित्र बघितले आहेच.

    मुद्दा हा आहे की बंगाल मध्ये सध्या जो हिंसाचार होतो आहे, जाळपोळ, हत्या होत आहेत व इतर वेळीही अशा घटना घडतात त्यावेळी या लोकांवर कठोर शिक्षा होईल अशा कायद्यांची आपल्या देशात नितांत आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांनी नाही का एका बलात्काऱ्याचा चौरंगा केला होता. पण आपल्या देशात नेते मंडळी शिवाजी महाराजांचा फक्त राजकारणासाठी वापर करतात. शिवशाही प्रस्थापित करण्याचा मात्र प्रयत्न करत नाही. राष्ट्रीय मुद्द्यांवर राजकारण्यांचे एकत्र न येणे, राज्यांनी आडमुठी भूमिका घेणे,  हिंसाचा-यां विरुद्ध कठोर कायदे नसणे, जनतेने योग्य उमेदवार न निवडणे, भ्रष्टाचार, सर्वांना समान कायदा नसणे इ. अशा अनेक उणीवा आजही 80 वर्षानंतर शिल्लकच आहेत. इतरही अशा अनेक उणीवा असतील म्हणूनच आपल्या राष्ट्राची जशी उभारणी व्हायला पाहिजे होती तशी दुर्दैवाने होऊ शकली नाही. 

     इथे राष्ट्र उभारणी म्हणजे केवळ पायाभूत सुविधा, विकास हा अर्थ नसून नागरिकांना शिस्त आणि कठोर कायदे त्या कायद्यांची अंमलबजावणी असे आपल्या देशात होऊ शकले नाही आणि देशातील सर्व धर्मीयांना आपण समान कायद्या कायद्याखाली अद्याप आणू शकलो नाही असा अर्थ अभिप्रेत आहे.

१०/०४/२०२५

Eating cake is harmful ?

केक नव्हे भाकरच खा ! 

    
केकची तर आता प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केकसाखरपुडा असो कापा केकदुकान उद्घाटन असले की लाओ रे केकअशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. 

केक हा तसा विदेशी पदार्थ पण भारतात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतात केकची मागणी गेल्या काही वर्षांपासून खुप वाढली आहे. साहेबांच्या आगमनानंतर भारतातील लोकांना  बेकरीत बनत असलेल्या मैद्याच्या पदार्थांची ओळख झाली आणि आजकाल तर बेकरीचे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जात आहे. त्यातल्या त्यात केक तर खूपच लोकप्रिय झालेला आहे. पुर्वी वाढदिवस कधी येत आणि कधी जात हे  माहित सुद्धा पडत नसे. परंतु गत काही काळापासून वाढदिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खेड्यापाड्यात सुद्धा वाढदिवसाचे मोठे स्तोम माजलेले दिसते. गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्याचे सुद्धा वाढदिवसाचे मोठमोठाले फलक लागलेले दिसतात. किशोरवयीन मुले तर वाढदिवसाचा केक रस्त्यावरच कापतांना दिसतात. भारतात वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत तशी बरीच जुनी आहे पण ती फक्त उच्चभ्रू समाजातच होती आता ती सार्वत्रिक झाली आहे. आजकाल तर वाढदिवसच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये केक कापला जातो. केकची जणू प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केक, साखरपुडा असो कापा केक, दुकान उद्घाटन असले की लाओ रे केक, अशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. भविष्यात तर "अरे केक आणा रे, आपली प्रथा आहे ती, आपले बाबा, आजोबा कापत नव्हते का !" अशी वाक्ये सुद्धा आगामी पिढी उच्चारतांना दिसेल असे म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. हिंदुत्वाचा आपण मोठा अभिमान बाळगतो पण हिंदू धर्मात हा विदेशी पदार्थ केक बेमालूमपणे कसा घुसला ? त्याची आपण कशी काय प्रथा पाडून घेतली ? हा विचारही आपल्या मनास कधी शिवला नाही किंवा कार्यक्रम साजरे करीत असतांना उपस्थितांपैकी कोणीही, "अरे केक काही आवश्यक नाही, कशाला आणता ?" असे म्हणतांना सुद्धा दिसत नाही. तसे कुणी म्हटले तरी आताची पिढी ते कितपत ऐकेल हे देव जाणे, अशीही स्थिती आहे.  बरे हल्ली हा केक केवळ खातच नाही तर तो तोंडाला सुद्धा फासतात. आजकाल तर म्हणे तोंडाला फासण्याचा वेगळा केक सुद्धा मिळतो. काय ते तोंडाला केक फासणे, काय त्या बर्थ डे बंप ! या बर्थ डे बंपमुळे तर काही मुलांचा जीव सुद्धा गेला आहे.  

        आज हे केक प्रकरण यासाठी की, मित्रांनो दक्षिण भारतात विविध आणि सुप्रसिद्ध अशा बेकरींमधून केकचे 235 नमुने गोळा करण्यात आले. या तपासणीतून धक्कादायक असे वास्तव उघडकीस आले आहे. हे केक बनवण्यासाठी जे साहित्य ( इन्ग्रेडिएंट्स ) वापरले जाते ते मनुष्याच्या प्रकृतीला हानिकारक असे आढळून आले. यामध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात उदा. अँल्युरा रेड, सनसेट येलो, टारटाझाईन हे रंग शासनाने दिलेल्या मान्यतेपेक्षाही अधिक मात्रेत टाकल्याचे आढळून आले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे या रंगांना युरोप मध्ये बंदी आहे. भारतातही या बाबतीत निर्बंध आहे पण तरीही केक व इतरही पदार्थात हे रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पिढीला जे केक आवडतात त्या लोकप्रिय अशा ब्लँक फॉरेस्ट, रेड व्हेल्व्हेट या केकमध्ये तर या कृत्रिम व हानिकारक अशा रंगांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात तर असतेच शिवाय त्यात जी साखर वापरलेली असते ती अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर असते. इथे वाचकांना तसेच तरुणाईला वैधानिक इशारच द्यावासा वाटतो की, "अशा केकच्या वा इतर असे रंग व निकृष्ट दर्जाची साखर असलेलेल्या पदार्थांच्या सेवनाने तुमची बौद्धिक व शारीरिक क्षमता तर कमी होतेच शिवाय अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारख्या असाध्य आजारास सुद्धा आपणहून आमंत्रण दिले जात आहे." तेंव्हा हे पदार्थ टाळणेच हे आपल्या हिताचे आहे. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने या अशा हानिकारक रंगांना बंदी घातली आहे. मग तरीही बंदी असलेले हे रंग आणि इतरही पदार्थ सर्रास कसे काय वापरले जात आहेत 

        दक्षिण भारतात झालेल्या या सर्वेक्षणामुळे आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. सध्या मानवी आरोग्य हे तसेही लवकर बिघडते, अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णालय दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, पुण्याचे उदाहरण ताजे आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. तेंव्हा आपण सर्वानी त्यातल्या त्यात कमी अशा हानिकारक पदार्थांचे सेवन कसे होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. लहान मुले, तरुण यांच्यात सुद्धा जागृती करणे गरजेचे झाले आहे. 

        इतिहासात लोकांना खायला भाकरी नव्हती तेंव्हा फ्रान्सच्या राणीने त्यांना "भाकरी मिळत नसेल तर केक खा !" असे एक विधान केल्याचे सर्वश्रुत आहे. ( ब्रेड मिळत नसेल तर केक खा असे ते विधान होते पण इतिहासात असे खरोखर म्हटले होते की नाही याबाबत विविध मते मतांतरे आहेत ) आजच्या धकाधकीच्या व असल्या निकृष्ट दर्जाच्या, कृत्रिम व हानिकारक घटक असलेल्या बाहेरच्या, विकतच्या पदार्थांच्या काळात सर्वांना हेच सांगावेसे वाटते की मायबापहो केक नव्हे तर आपली भाकरच खात जा ! वाढदिवसादी काही  सेलेब्रेशन करायचेच असेल तर घरीच काहीतरी गोडाच बनवत जा.




०३/०४/२०२५

Article about telangana IT park issue.

किसी को उजाड़कर बसे तो क्या बसे....

चित्र स्त्रोत - आंतरजाल

वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन, त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग, इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ?

सध्या जगात सर्वत्र विकास कार्य मोठ्या जोरात सुरू आहे. सरकार तर विकास कार्य करतच आहे परंतु शहरीकरण सुद्धा झपाट्याने वाढते आहे. या शहरीकरणामुळे शेती कमी होत आहे, शिवाय अनेक ठिकाणी भूमाफिया जमिनीवर ताबा मिळवत आहे आणि मोठमोठ्या किमतीमध्ये घरे किंवा भूखंड विकत आहेत. अतिक्रणासाठी त्यांना नाले सुद्धा कमी पडत आहेत. शेती व वने असलेली जमीन ही रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तित होत असल्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावर सुद्धा होतो, पर्यावरणाचा -हास होतो. अनेकदा जंगली जनावरे शहरात आल्याच्या बातम्या वाचनात येतात. परवाच मुंबईला एक लांडगा आल्याचे वृत्त धडकले होते. वन्य प्राण्यांची हक्काची जमीन ही बळकावली जात असल्यामुळे त्यांचे रहिवासी क्षेत्र घटत आहे आणि  त्यामुळेच ते शहरांमध्ये घुसत आहेत. 

    हा सर्व ऊहापोह यासाठी आहे की, तेलंगणाच्या हैदराबाद विश्वविद्यालय (HCU) परिसरामध्ये आयटी पार्क विकसित करण्याची योजना आहे. त्या योजनेच्या विरोधात हैदराबाद विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि सरकारने त्यांना अटक करून पुन्हा सोडून दिले.  हैदराबाद विश्वविद्यालयाच्या लगत कांचा गचिबोवली ही चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती (floura fauna) आणि विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती वास्तव्य करतात. यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, हरणे तसेच इतर अनेक वन्यजीव सुद्धा वास्तव्य करतात. आता नेमके याच जागेवर नवीन आयटी पार्क होणार आणि या कामासाठी म्हणून गेल्या सोमवारी तेलंगणा सरकार तिथे खोदकाम सुरू करणार होते परंतु मोठमोठ्या मशीन (JCB) तिथे पोहोचल्यावर विरोध सुरू झाला. हा विरोध मुख्यत्वे करून विश्वविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या परिसरात  पर्यावरणासाठी काम करणारी वाटा फाऊंडेशन ही संस्था करत आहे. आयटी पार्क होणे, उद्योग प्रस्थापित होणे हे जरी वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून चांगले असले तरी त्यासाठी वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग , इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ? या पृथ्वीवर केवळ मनुष्याचा अधिकार नाही तर ही ईश्वराने रचलेली सृष्टी आहे आणि यावर मनुष्यासोबतच इतर चराचरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तेलंगणा सरकारला किंवा इतर कोणत्याही सरकारला उद्योग व्यवसायासाठी म्हणून जर जागा लागत असेल तर ती केवळ मोठ्या शहरालगतच न घेता वेगवेगळ्या छोट्या शहरात विभागून घेतली तर विकासाचा प्रादेशिक समतोल सुद्धा साधला जाऊ शकतो. मोठमोठ्या शहरांमध्येच उद्योगधंदे आणल्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम, गुन्हेगारी, झोपडपट्ट्या, अस्वच्छ वस्त्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच सर्वच ठिकाणच्या नेत्यांनी उद्योग व्यवसाय हे एकाच ठिकाणी केंद्रित न करता विविध शहरांमध्ये स्थापित होतील अशी पावले उचलली पाहिजे आणि त्यासाठी उजाड जमिनीचा वापर केला पाहिजे. शेती योग्य जमीन, वनांची जमीन यावर जर सरकारच्या किंवा बिल्डर लॉबीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली जाऊ लागली तर वन्यजीव व इतर प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे काय होईल? आपले जीवनचक्र कसे चालेल? भारतातल्या सर्वच संत मंडळींनी आपल्याला वनचरे ही आपली सोयरे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्यांची चिंता करायलाच पाहिजे. मोर तर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, काही वर्षांपुर्वी पंतप्रधान मोदी यांचा मोरांसोबतचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांवर झळकला होता. राष्ट्रपती भवन तसेच दिल्लीतील अनेक सरकारी निवासस्थानाच्या परिसरात मोरांचे वास्तव्य आहे. मग अशा या तेलंगणातील मोरांच्या हक्काच्या जागेवर  बुलडोझर कसे काय फिरणार? ही जमीन 1975 पासून सरकारी जमीन असल्याचे म्हटले आहे परंतु 2022 मध्ये सरकार जवळ या जमिनीची कागदपत्रे नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे आणि आगामी काही दिवस तिथे विकास कार्यास सुरुवात करण्यास स्थगिती दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या जमिनीमुळे विकास होणार आहे आणि रोजगार निर्माण होणार आहे असे म्हटले आहे आणि या विद्यार्थ्यांना कोणीतरी चिथावणी दिली असल्याचे म्हटले आहे.  

  तेलंगणा सरकार वनांची जागा, ज्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी तसेच इतर वन्यजीवांचे वास्तव्य आहे असे त्यांचे घर नष्ट करून त्या जागेवर त्या जागेवर आयटी पार्क उभारत आहे या पार्श्वभूमीवर त्यांना हेच म्हणावेसे वाटते की 

किसी का घर उजाडकर बसे तो क्या बसे 

किसी को रुलाकर हंसे तो क्या हंसे ?

✍️विनय वि. वरणगांवकर©

03/04/25

आभार - विनय नंदनपवार

२७/०३/२०२५

Article about statements of leaders on history

 इतिहास मत पूछो ! 

इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही  दिवसांत तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात संदर्भहीन भाष्ये करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या लेखाचे जे शीर्षक आहे ते वाक्य सतत आठवत आहे. माणसाच्या स्मरणात काय राहील काही सांगता येत नाही. या वाक्याचे सुद्धा तसेच आहे. माझा ज्येष्ठ बंधू कनिष्ठ महाविद्यालयात असतांना त्यांना संगारे सर इतिहास शिकवत असत. मी सुद्धा संगारे सरांचा विद्यार्थी राहिलेलो आहे ते इतिहास खूपच चांगला शिकवत असत. तर एकदा माझ्या ज्येष्ठ बंधूच्या इतिहासाच्या पिरेडला कुणीतरी विद्यार्थ्यांनी संगारे सर येण्याच्या आधीच फळ्यावर "इतिहास मत पूछो" असे लिहून ठेवले होते. सर आल्यावर त्यांनी त्या लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मी एकदा हे वाक्य एका ॲटोच्या मागे लिहिले असलेले सुद्धा पाहिल्याचे मला स्मरते. काही लोक भेटल्यावर अनेक गोष्टींची विचारणा, नसत्या चौकशा करत राहतात या उद्देशातून खरे तर हे इतिहास मत पूछो वाक्य म्हटले गेलेले आहे. पण आपल्या भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सतत ऐतिहासिक घटना, महापुरुष, खलनायक यांच्याबद्दल जी विधाने केली जातात त्यावरून हे  शीर्षकातील वाक्य नसती वक्तव्ये करणा-यांना उद्देशून म्हणावेसे वाटते. 

   खरे तर इतिहास आपल्याला बरेच काही शिकवत असतो. इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही दिवसांमध्ये अनेक तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्ये करीत आहेत. या भाष्यांमुळे काही थोर पुरुषांचा अपमान होत आहे तर काही क्रूर पुरुषांचा उदो उदो होत आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्रे यांबद्दल इतके बोलले जात आहे की जणू काही ही वक्तव्ये करणारी मंडळी तज्ञ इतिहासकार किंवा पुरातत्व तज्ञच आहे. माझ्या मागच्या छावा या चित्रपटासंबंधीत लेखात मी भाष्य केले होते की, यांना एवढेच जर का इतकेच इतिहास प्रेम असेल तर मग त्या इतिहासातील पात्रांचे गुण यांनी आपल्या अंगी बाणवायला नको का ! पण तसे मात्र आढळून येत नाही. कोणीही उठते आणि काहीही बोलून जाते परवाच काँग्रेसचे हुसैन दलवाई यांनी छ. संभाजी राजांना जी शिक्षा झाली ती शिक्षा मनुस्मृती नुसार झाली असे बेलगाम वक्तव्य केले. प्रत्यक्षात मनुस्मृती मध्ये देहदंडाबाबत काहीही सांगितलेले नाही असे तज्ञ मंडळी सांगतात. ही नाहक वक्तव्ये करणारी माणसे एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाचा रोष ओढवून घेतात, दुस-या समाजाला नाराज करून लोकशाही, संविधान यांचा सर्रास अपमान करतात. यामुळे सामाजिक एकोपा भंग पावतो. विनाकारणची उपटसुंभ वक्तव्ये करण्यापेक्षा राज्यातील प्रश्न, देशातील प्रश्न, प्लास्टिक निर्मूलन, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न यांबाबत भूमिका मांडायला नको का ? अनेक शहरात तर पाण्याची समस्या वर्षांनुवर्षांपासून तशीच आहे. इतिहासामध्ये जे काही चांगले घडले त्याचा अंगीकार सर्वांनी करायला पाहिजे तसेच जे धर्मांध, क्रूर, परकीय राजे होते त्यांचा सन्मान हा मुळीच करू नये. उगीच तो आपल्या समाजाचा होता म्हणून चांगलाच होता अशी भावना वृद्धिंगत होऊ देऊ नये. चांगल्या,  देशाभिमानी, प्रजाहितदक्ष अशा ऐतिहासिक पात्रांकडून,  घटनातून  काहीतरी बोध घेत घ्यावा. रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल खालील ओळी लिहिल्या आहेत.

 शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
समर्थ रामदास स्वामींच्या उपरोक्त ओळींप्रमाणे सांप्रत सर्वच नेते, प्राध्यापक, बुद्धीवादी यांनी इतिहासाची पाळेमुळे न  शोधता किंवा संदर्भ नसलेल्या गोष्टींबद्दल विधान करणे सोडून देऊन छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे, बाजीराव पेशवे , महाराणा प्रताप, छत्रसाल अशा थोर पुरुषांविषयी तारतम्य ठेवून वक्तव्ये करावीत. ते कसे होते ते बघावे, त्यांचे गुण घ्यावे, त्यांचा पराक्रम पाहावा. कोणीही येतो आणि छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल आधार नसलेली वक्तव्ये करून मोकळा होतो आणि मग शासन, जनता, माध्यमे हे सर्व त्यात विषयाभोवती घुटमळत राहतात, राजकारण विकास सोडून विनाकारण केलेल्या संदर्भहीन वक्तव्यांभोवती फिरत राहते. शिवाय नवीन पिढी, तरुण वर्ग संभ्रमात पडतो की, नक्की खरा इतिहास तो होता तरी काय? त्यामुळे जनतेने सध्याच्या तथाकथित नेत्यांच्या, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या इतिहासाबद्दलच्या ऐतिहासिक संदर्भ, आधार नसलेल्या विधानांकडे दुर्लक्ष करून खरा इतिहास, घटनांचा संदर्भ असलेली पुस्तके  वाचावीत. तसेच तमाम उपटसुंभ व आधारहीन वक्तव्ये करणाऱ्या लोकांना हेच म्हणावेसे वाटते की , विनाकारण इतिहास मत पूछो !
जे ज्ञात असेल व जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वक्तव्ये करावीत. उगीच कोणी काहीही विचारले नसतांना काहीही पिल्लू सोडून देऊ नये. 
अर्ल चेस्टरफिल्ड याने म्हटलेच आहे की, 
History is but a confused heap of facts.

२०/०३/२०२५

Article about Chhaava cinema

छावा , भिकार नव्हे तर सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट?

तीन टक्के समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर  इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे.

एका वृत्तपत्रात नुकताच प्रदर्शित झालेला व लोकप्रियतेचे उच्चांक गाठत असलेला छावा हा चित्रपट कसा भिकार आणि दिशाभूल करणारा आहे या आशयाचा एक दीर्घ लेख वाचनात झाला. या लेखात स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका कशी चांगली होती आणि छावा हा चित्रपट कसा वाईट आहे याचा ऊहापोह केल्या गेला होता. खरे तर चित्रपट वाईट आहे हे सांगतांना लेखकाने चित्रपटाचे संकलन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय व कथानक यामधील त्रुटी यांचा उल्लेख करणे आवश्यक होते पण त्यावर मात्र लेखात काही भाष्य केलेले नाही. त्या ऐवजी लेखकाने महाराष्ट्रातील तीन टक्के समाज व छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूस अनाजीपंत व इतर हेच कसे जबाबदार होते हे स्पष्ट करण्याचा अतोनात प्रयास केलेला दिसतो. लेखकानी शिर्के यांनी छ. संभाजी राजांना पकडून दिले याचे काही पुरावे नाही असे म्हटले आहे तेव्हा लेखकाला असे विचारावेसे वाटते की त्यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांनी छ. संभाजीराजांचा घात केला तर त्याचे काही पुरावे लेखकाजवळ आहेत का ? असल्यास मग ते संदर्भ का दिले नाही ? आज-काल महाराष्ट्रामध्ये विशेषतः 1 सप्टेंबर 1990 नंतर महाराष्ट्रातील तीन टक्के समाज म्हणजेच ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेतांना, ताशेरे ओढतांना काही तथाकथित नेते व काही पत्रकार, संपादक दिसतात. या समाजात बुद्धिवादी व शांत वृत्तीचे लोक असल्यामुळे कोणी विशेष काही विरोध करत नाही, आंदोलने वगैरे होत नाही त्यामुळे या समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर आज आपल्या देशाला इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे. परंतु जे स्वतःला निर्भीड नि:पक्ष वगैरे मोठी मोठी बिरूदे लावतात आणि एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करतात हे पत्रकारितेच्या माध्यमातून अशोभनीय असे आहे असे येथे नम्रपणे सांगावेसे वाटते. इतिहासातील चुका तत्कालीन एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे आजच्या समाजाला दोषी धरणे यापेक्षा ऐतिहासिक थोर पुरुषांमध्ये जे गुण होते ते अंगीकृत करणे, त्या गुणांचा प्रचार आणि प्रसार करणे हे खरे तर वृत्तपत्रांनी करायला पाहिजे परंतु "ये जो पब्लिक है ये सब जानती है" पब्लिकला सगळे माहित असते आणि त्यांच्या सगळेच स्मरणात सुद्धा असते. त्यांना महाराष्ट्रातील बड्या वृत्तपत्रांची मालकी कुणाकडे कशी आली हे पण स्मरणात असते शिवाय कोण लोक कोणत्या गुन्ह्यातून सहिसलामत कसे बाहेर पडले हे सुद्धा माहीत असते. सतत एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करून सवंग प्रसिद्धी प्राप्त करणे व आपल्या व आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवणे हे कितपत योग्य आहे? लेखकांनी त्यांच्या लेखात अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजावर मोठे ताशेरे ओढलेले आहे आणि छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू तुकाराम महाराजांचा मृत्यू याचे खापर सुद्धा ब्राह्मण समाजावरच फोडण्याचा प्रयत्न केला आहे पण औरंगजेबाने छ. संभाजी राजे आणि कवी कलश यांना हाल-हाल करून मारले त्याबद्दल मात्र काहीही भाष्य केलेले नाही. छावा चित्रपट वाईट कसा आहे हे सिद्ध करण्यापेक्षा लेखकाने ब्राह्मण समाजावरच तोंडसुख घेतले आहे. 

शेवटी म्हणणे हेच आहे की, सतत ब्राह्मण समाजावर ताशेरे ओढणे , तोंडसुख घेणे हे सोडून पत्रकार, संपादक अर्थात वृत्तपत्रांनी वर्तमान मुद्दे , समस्या या प्रकट कराव्या हेच इथे विनम्रपणे सांगावेसे वाटते.

तसेच हे सुद्धा सांगावेसे वाटते की, छावा हा सिनेमा भिक्कार आणि दिशाभूल करणारा नसून अभिनय, तंत्रज्ञान, चित्रीकरण, गनिमीकावा दृश्ये इ दृष्ट्या सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट आहे.

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 


१३/०३/२०२५

"मोठी विहीर"...श्रीकांत भुसारी यांच्या लेखाच्या निमित्ताने

खामगांवची मोठी विहीर 

सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ?

दिनांक 11 मार्च रोजी आमचे मित्र पत्रकार, समाजसेवक तथा पर्यावरणप्रेमी श्रीकांत भुसारी यांचा "आणि मोठी विहीर बोलायला लागली.... मला मोकळा श्वास घेऊ द्या ना"  हा लेख वाचनात आला आणि अनेक विचार मनात घोंगावू लागले. मोठी विहीर ही जवळपास सर्वच खामगावकरांना परिचित आहे. खामगावकरच नव्हे तर पंचक्रोशीतील इतर गावकऱ्यांना सुद्धा ही मोठी विहीर परिचित आहे परवाचीच गोष्ट मी बालाजी प्लॉट भागातून जात असतांना एका सत्तरीतल्या व्यक्तीने मला एका दवाखान्याचा पत्ता विचारला मी त्याला पत्ता सांगत असतांना मध्येच "म्हणजे मोठ्या हिरी जवळ का भाऊ" असे ते गृहस्थ म्हणाले "अगदी बरोबर काका , तिकडेच जा , तुम्हाला सापडेल दवाखाना" मी म्हटले. यावरून सहज लक्षात येते की त्या ग्रामीण भागातून आलेल्या मनुष्याला मोठी विहीर माहीत होती. ती आहेच खूप जुनी. या विहिरीचा विचार करतांना माझ्या डोळ्यासमोर नेहमी चित्र तरळते की इंग्रजांच्या काळात कोर्टासमोर शेती असेल, त्यात ही मोठी विहीर असेल, या विहिरी जवळच जांभळाच्या भल्यामोठ्या झाडाखाली ( भाटे वकिलांच्या घरासमोर ) सुद्धा एक लहान गोड पाण्याची विहीर आहे. या दोन्ही विहिरींनी तेंव्हा लगतच्या शेतातील पिकांना, परीसरातील  मनुष्यांना, जनावरांना जीवन दिले असेल. पुढे कोर्टासमोरच्या सर्व जागा तत्कालीन अधिवक्त्यांनी घेतल्या आणि मग या भागात वस्ती वाढली. अगदी काही वर्षे अलीकडेपर्यंत ही विहीर चांगल्या अवस्थेत होती. पण हळू-हळू ही विहीर खराब होऊ लागली. विहिरीवर जाळी लावलेली असूनही सुशिक्षित भागातील म्हणजे सिव्हील लाईन भागातील या विहिरीत निर्माल्य, कचरादी टाकले जाऊ लागले आणि या विहीरीची दुर्दशा होत गेली. माझ्या स्मरणानुसार 2002 च्या खामगांवच्या भीषण पाणी टंचाई काळात या विहिरीवर मोटार बसवून तात्पुरते नळ लाऊन पाणी पुरवठा केला गेला होता आणि त्या जल संकटाच्या काळात हीच माय माऊली मोठी विहीर अनेकांची तारणहार झाली होती. अशी ही आमची मोठी विहिर मी सर्वात प्रथम पाहिली  तेव्हा तर माझ्या बालदृष्टीला खूपच मोठी वाटली होती. मला स्पष्ट आठवते मी त्या विहिरीत तेव्हा डोकावून पाहिले होते. आजही कोणतीही विहीर दिसली की त्या विहिरीत डोकावून पाहण्याची मला का कोण जाणे पण इच्छा होत असते आणि मी पाहतोच.  मी अनेक लोकांना सुद्धा विहिरीत डोकावून पुढे जातांना बघितलेले आहे. लोक विहिरीत डोकावून पाहून मग पुढे जातात ते असे का करतात ? कारण विहिरीतले पाणी पाहिले की, "चला पाणी आहे बुवा"  असा त्यांच्या मनाला दिलासा मिळत असावा. शेवटी मनुष्याला पाहिजे तरी काय असते ? तो सर्व उपद्व्याप करतो तरी कशासाठी ?  तर अन्न पाण्यासाठीच आणि म्हणूनच जीवनावश्यक ते पाणी विहिरीत आहे की नाही ते पाहण्यासाठी विहिरीत डोकाऊन पाहण्याची सवय अनेकांना असते. बालपणी मी त्या मोठ्या विहिरीत डोकावून पाहिले होते तेव्हा मला स्पष्ट आठवते की नितळ पाणी आणि त्या पाण्यात आकाश आणि ढगांचे प्रतिबिंब दिसत होते. पुढे मग ही विहीर शिकवणीला वगैरे जातांना अनेकदा पाहण्यात आली. कधीकाळी त्यात मुलांना पोहतांना सुद्धा पाहिल्याचे स्मरते आणि पुढे चांगले दिवस पाहिलेल्या याच विहिरीची अवस्था अत्यंत खराब झालेली पाहण्याचे दुर्भाग्य सुद्धा माझ्या नशिबी आले. 

     आज देशात विकास कामांचा झपाटा लागलेला आहे रस्ते निर्माणाचा वेग अतिशय जोरात आहे परंतु हा विकास जसा जरुरी आहे तसेच जुने जलस्र्तोत टिकवून ठेवणे सुद्धा जरुरी आहे. फडणवीसांनी तशी योजना सुद्धा राबवण्याचे सुतोवाच केले आहे. मोठ्या विहिरीजवळून सुद्धा सिमेंटचा रस्ता निर्माण होत आहे. वाढती वाहन संख्या त्यामुळे वाढलेली वाहतूक यामुळे रुंद रस्ते आवश्यकच आहे परंतु मनुष्याला जगण्यासाठी जल, अन्न आणि प्राणवायू, तसेच चांगले बोलणे, वागणे यांची आवश्यकता आहे. या अनुषंगाने संस्कृत मधील एका सुभाषिताचे स्मरण होते. 

पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते'

अर्थात,  पृथ्वीवर जल, अन्न, आणि चांगले बोलणे अशी तीन रत्ने आहेत , परंतू मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला  रत्न संबोधतात. 

     आता नवीन रस्ता विहिरी जवळून जाणार आहे , विहिरीचे काय होणार माहित नाही ? पण बालवयापासून ही विहीर बघत आलो आहे त्यामुळे चिंता वाटते. भुसारी यांनी त्यांच्या लेखात खूप छान लिहिले आहे की , "माय म्हातारी झाली म्हणून मायच्या छातीवर पाय देऊन तिचा श्वास कोंडून केलेली प्रगती आम्हाला कशी काय लाभेल ?  हे वाक्य वाचल्यावर मला सुद्धा लिहायची प्रेरणा झाली. खामगांव शहरात तर दोन मोठ्या माय आहेत. एक मोठी देवी आणि दुसरी ही मोठी विहीर. त्यामुळेच शहरातील, परिसरातील अनेकांना सुद्धा चिंता वाटत आहे. विकासाच्या आड कोणी नाही परंतू आपल्या पूर्वजांनी दिलेले हे जलस्त्रोत टिकवून ठेवणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. मागे माहूर शहरात एक जुनी विहीर पुनश्च उपयोगात आणली गेली. आपल्या मोठ्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होत गेल्यास आपोआप ती सुद्धा पुर्वीसारखी  शुद्ध होईल. नुकताच जिजामाता मार्ग परीसरातील अशाच एका जुन्या विहिरीतील पाण्याचा राजीव गांधी उद्यानातील झाडांना पाण्यासाठी उपयोग झाला. मोठी विहीर वाचवण्यात, या विहिरीतून मागे एकदा पाणी पुरवठा करण्यात मोठी विहीर भागातील तरुण, नागरीक यांचे सुद्धा मोठे योगदान आहे अशी माहिती नुकतीच मिळाली तो  उल्लेख इथे करणे क्रमप्राप्त आहे व त्यांचा तो प्रयत्न स्तुत्यच आहे.

     मोठी विहीर ही पक्क्या पाण्याची विहीर आहे. मोठ्या देवी प्रमाणेच ती सुद्धा खामगांवकरांना जिव्हाळ्याची आहे. जीवनदायीनी  आहे. ती राहावी, तिची अवस्था चांगली राहावी हेच नागरिकांना वाटत आहे. सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ? मायबाप सरकारने जनभावना, जुने जलस्त्रोत, विकास या सर्वांचा सुवर्णमध्य साधून ज्या पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी जागोजागी विहिरी खोदल्या त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षात योग्य काय ते करावे हीच सर्व नागरीकांची  मनीषा आहे.  

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 

०६/०३/२०२५

Article on the occassion of World Wildlife Day and PM Modi visit to Vantara, animal rescue center, Jamnagar Gujrat.

मोदी, वनतारा आणि लहान वन्यजीव ? World Wildlife Day Special 

मोदी यांची वनतारा प्रकल्पास भेट आणि जागतिक वन्य प्राणी दिवस या अनुषंगाने 
रानससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट) असे  लहान वन्यजीव लुप्त होण्याच्या मार्गावर का आहे ? यांच्या शिकारी का व कशा होत आहे ?, कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात. 

दिनांक 2 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी जामनगर गुजराथ येथील वनतारा या उद्योगपती अंबानी यांच्या हजारो एकर परिसरात बनवलेल्या वन्यजीव उपचार. संवर्धन, संरक्षण प्रकल्पाचे उद्घाटन केले. 3000 एकरच्या रिलायंस रिफायनरीच्या परिसरात असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मानवी वस्तीत सापडलेल्या, जखमी झालेल्या तसेच ज्यांना उपचाराची गरज आहे अशा वन्य प्राण्यांवर उपचार केले जातील अशी सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून अंबानी करणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे वन्यजीव प्रेम सर्वश्रूत आहे. भारतातून चित्ते लुप्त झाले होते ते आणण्याचे कार्य मोदी यांच्याच कारकिर्दीत झाले. आता या आणलेल्या चित्त्यांची नवीन पिढी सुद्धा तयार झाली आहे. यापूर्वी सुद्धा मोदी यांची वन्यजीव, जंगल भेट, मोरांना खाऊ घालणे या प्रकारची चित्रे, चलचित्रे अनेकदा प्रसारित झाली आहेत. परवापासून मोदी यांच्या वनतारा भेटीच्या रील्स समाज माध्यमांवर लोकप्रिय होतांना दिसत आहे. वनतारा हा अंबानी यांचा वन्यजीव प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा आहे. 

    या भारतात अनादी अनंत काळापासून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण दिली गेली आहे. कण्व ऋषींची कन्या शकुंतला ही सुद्धा जखमी , अनाथ अशा हरणांच्या शावकांची देखभाल आश्रमात करीत असल्याचे महाकवी कालीदास यांच्या " अभिज्ञान शाकुंतलम" या ग्रंथात वर्णन आहे. चक्रधर स्वामींच्या मांडीवर वाघांची पिले येऊन बसत. भारतात वन्यजीव वा पाळीव प्राणी यांच्यावरील  प्रेमाचे कित्येक दाखले देता येतील  पण पुढे आधुनिक काळात भारतातून इंग्रजांच्या गच्छंतीपुर्वी मुघल सम्राट व इंग्रज यांनी भारताच्या समृद्ध जंगलातून वारेमाप शिकारी केल्या. शिकार करणे म्हणजे तत्कालीन मनोरंजनाचे साधन होते, एक खेळ होता. अनेक भारतीय राजे-महाराजे शिकारीसाठी म्हणून दूर-दूर जात, जंगलातच मुक्काम ठोकत. शिकार झाली की वाजत गाजत गावात येत व मोठ्या हौशेने वन्यप्राण्यांचे मुंडके आपल्या दरबारात लावत. त्यांचे कातडे आसन म्हणून वापरत. अशाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारींमुळे पट्टेदार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. अगदी गत महिन्यात सुद्धा चंद्रपूर जंगलात एक वाघांचा शिकारी पकडल्या गेला. चीन पर्यंत त्याचे धागे दोरे जुळले आहेत. यावर उपाय योजना म्हणून वाघांचे संवर्धन, टायगर प्रोजेक्ट निर्माण झाले. शिकारीवर बंदी आणली गेली, अभयारण्ये निर्माण केली गेली. जंगल कायदा मात्र तोच इंग्रजांनी तयार केलेला. अनेक मोठ्या जीवांचे संवर्धन झाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल, हरीण व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या एवढी वाढली की, शहरात बिबट व अस्वल घुसू लागली तर हरणे व रोही शेतक-यांची डोकेदुखी झाली. परंतू हे घडण्याचे कारण सुद्धा मानवच आहे कारण ज्या जमीनीवर पुर्वी वन्यजीवांचा हक्क होता त्या जमिनीवर आता मानवाने कब्जा केला आहे. त्यांच्याच जमिनीवर ते आले की आपल्याला ते आपल्या हद्दीत घुसले असे वाटते. कर्नाटकातील दोडामार्ग येथील हत्तींच्या मार्गात मानवी वस्त्या, शेती झाल्याने त्यांच्या पुर्वीच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवामुळे मग त्यांना निर्घुणपणे मारण्याच्या घटना सुद्धा घडतात. भारतात कितीतरी एकर जमीन जंगलांनी व्यापली आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त वन जमीन आपल्या विदर्भात आहे. परंतू निव्वळ जंगले असून चालणार नाही तर तेथील वन्यजीव संपदा सुद्धा टिकली पाहिजे ती टिकण्यासाठी सरकारसोबत जनतेला, वन्यजीव प्रेमींना सुद्धा अग्रेसर व्हावे लागेल. 

    03 मार्च हा दिवस "जागतिक वन्य प्राणी दिन" म्हणून साजरा केला जातो. वनतारा प्रकल्पास मोदी यांची भेट तसेच जागतिक वन्य प्राणी दिन या औचित्याने इथे असे निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की, वनविभाग व सरकार यांचे लक्ष हे केवळ मोठ्या वन्यजीवांच्या संवर्धनाकडेच असल्याचे दिसते. एकीकडे वाघबिबटअस्वलहरीणरोही यांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे मात्र रानससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट)  हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा होत आहे ? , कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठीजैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे लहान वन्यजीव नाहीत का तर लहान वन्यजीव सुद्धा आवश्यकच आहे परंतू केंद्र व राज्य सरकारचे मात्र लहान वन्यजीव संवर्धनाकडे मात्र  लक्ष नाही असे जाणवते. जंगल भ्रमंतीस गेल्यावर रानससा मुळी दिसतच नाही किंवा कुणाला दिसल्याचे ऐकीवात येत नाही. जंगल भ्रमंती करून आल्यावर समाज माध्यमांवर लोक जे फोटो पोस्ट करतात त्यात कधीही रानससा, साळीन्दर, टोयी (लहान पोपट ) तितर यांचे फोटो शेअर केल्याचे दिसत नाही. वन्यजीवांची जेंव्हा शिरगणती होते त्यात सुद्धा या प्राण्यांची संख्या दिलेली दिसत नाही. वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिकारी व दुर्लक्ष यामुळे आज चित्त्यासारखा चपळ, तेज, सुंदर प्राणी भारतातून केंव्हाच लुप्त झाला होता परंतू सरकारने आता काही चित्ते आफिकेतून आणले आहेत.  त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आज कित्येक फुलपाखरांच्या जाती लुप्त झाल्या आहेत.

 आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त लहान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सुद्धा पाऊले उचलली  गेली पाहिजेवन्यजीवप्रेमींनी सुद्धा यावर विचार करायला हवा.


दिनांक 03/03/2022 रोजी याच विषयावर लिहिलेल्या लेखाची ही नवीन आवृत्ती.


टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापर करू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये.