पहलगाम हल्ला, सिंधू करार स्थगित आणि स्मरण पालखेडच्या लढाईचे.
अशा प्रकारचे अतिरेकी हल्ले झाले की स्मरण होत असते ते ऐतिहासिक घटनांचे. काल रात्री या हल्ल्याचे विचार करता करता आणि भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला त्यामुळे स्मरण झाले ते अशाच एका लढाईचे ज्यात शत्रू सैन्याला पिण्यास पाणी मिळू नव्हते दिले. पाण्याअभावी शत्रुची मोठी कोंडी झाली होती व तो पराभूत झाला होता.
परवा दुपारी पहलगाम येथे हिंदू पर्यटकांना टार्गेट करून मारण्यात आले. काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर पर्यटन व्यवसाय चांगलाच जोरात सुरू झाला. 2023-24 मध्ये काश्मीर मधील पर्यटन व्यवसाय 16800 कोटी रुपयांचा असा झाला होता. अनेक स्थानिकांना पर्यटनामुळे तिथे चांगला रोजगार मिळाला. दल लेकमध्ये तर पंधराशेपेक्षा अधिक हाऊस बोटींचा व्यवसाय सुरू आहे. मोदी सरकार आल्यापासून देशात आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांवर केंद्र सरकारने मोठा अटकाव आणला आहे, तरीही परवा हा हल्ला झाला. यात 27 पर्यटकांची निर्घृण हत्या झाली, देश हादरला, पहलगाम आणि काश्मीर पुन्हा शांत झाले, पंतप्रधान मोदी हे सौदी अरब दौरा रद्द करून भारतात परत आले आणि विमानतळावरच तातडीची बैठक घेतली. गृहमंत्री काश्मीरमध्ये रवाना झाले. मोदी, शहा यांच्या देहबोलीवरून पुर्वीसारखाच सर्जिकल स्ट्राइक होतो की काय ? असे भारतीयांना वाटू लागले कारण मोदींचे "घरमे घुसकर मारेंगे" हे वाक्य आजही तमाम भारतीयांच्या लक्षात आहे. पण यावेळेस भारताने वेगळ्या पद्धतीचा सर्जिकल स्ट्राइक केला आणि या स्ट्राइक मध्ये 1960 मध्ये झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित करून टाकला. याशिवाय पाकिस्तानच्या नागरिकांचा विसा रद्द करून टाकला, पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना एका आठवड्यात देश सोडायला सांगितले, तसेच पाकिस्तानातील आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा भारतात परत बोलावले. असे अनेक निर्णय केंद्र सरकारने तातडीने घेतले.
सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान मोठ्या कोंडीत पकडल्या जाणार आहे. सिंधू नदी प्रणालीतील सुमारे २०% पाणी, म्हणजेच ३३ दशलक्ष एकर फूट (एमएएफ) भारताला त्याच्या विशेष वापरासाठी वाटप करण्यात आले आहे . उर्वरित ८०%, म्हणजेच १३५ एमएएफ, पाकिस्तानला वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान चांगलेच अडचणीत येणार आहे. त्यांचे एवढे मोठे पाणी रोखले जाणार आहे.
हा भ्याड अतिरेकी हल्ला झाल्यापासून नाना प्रकारचे विचार मनात घोळत आहेत. अतिरेक्यांची गोळी सहा एप्रिल रोजी लग्न झालेल्या नौसेनेच्या लेफ्टनंट मोजण्याचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा जीव घेऊन गेली त्यांच्या पत्नीचा आक्रोष पाहावत नव्हता. श्रद्धांजली, सुन्न झालो, अशा प्रकारचे उद्गारच काय ते फक्त आपण काढू शकतो. जुन्या काळात बरे होते लगेच शस्त्र घेऊन निघता तरी येत होते, आता तसे करणे शक्य नाही. सामान्य नागरिकास ईट जवाब पत्थर से असा काही आता देता येऊ शकत नाही पण मग त्यांनी निवडलेल्या सरकारने तरी तो द्यावा अशी या जनतेची इच्छा असते. भारताने काल जो अनपेक्षित असा सर्जिकल स्ट्राईक केला आहे तो सुद्धा पाकिस्तानला चांगलाच झोंबणारा असा आहे.
अशा प्रकारचे अतिरेकी हल्ले झाले की स्मरण होत असते ते ऐतिहासिक घटनांचे. काल रात्री या हल्ल्याचे विचार करता करता आणि भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला त्यामुळे स्मरण झाले ते अशाच एका लढाईचे ज्यात शत्रू सैन्याला पिण्यास पाणी मिळू नव्हते दिले. पाण्याअभावी शत्रुची मोठी कोंडी झाली होती व तो पराभूत झाला होता.
ही घटना आहे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची, एकही सैनिक न गमावता जिंकलेल्या एका लढाईची. बाजीराव पेशवे कर्नाटकात मोहिमेवर असताना ही संधी साधून निजामाने पुण्यावर आक्रमण केले आणि त्याला असे वाटले की आपण पेशव्यांना अर्थात शाहू महाराजांना चांगला शह देऊ परंतु बाजीरावांनी मात्र वेगळीच बाजी लावली. निजामाला अशी अपेक्षा होती की बाजीराव पुणे वाचवायला परत फिरतील परंतु बाजीरावांनी उलटीच खेळी खेळली. त्यांनी निजामाच्या राजधानीकडे कूच केले ते ऐकून निजाम हादरला आता आपली स्वतःची राजधानी वाचवायची की पुण्यावर हल्ला करायचा असा त्याला पेच पडला आणि तो माघारी फिरला. पण बाजीरावांचे सैन्य आणि निजामाचे सैन्य यांची गाठ संभाजीनगर जवळच्या पालखेड निपाणी जवळ पडली. असे सांगितले जाते की, ज्या पाण्याचा उपयोग निजामाचे सैनिक आणि जनावरे करत असत त्या पाणवठ्यालाच बाजीरावांनी वेढा टाकला. त्यामुळे निजामाची आणि त्याच्या सैन्याची मोठी कोंडी झाली. पाण्याअभावी त्यांची लाही लाही होऊ लागली आणि आपली युद्ध सामुग्री तिथेच सोडून निजाम सैन्याने काढता पाय घेतला. ही लढाई बाजीरावांनी एकही सैनिक न गमावता जिंकली शिवाय निजामाच्या तोफा व इतर युद्ध सामुग्री बाजीरावांनी जप्त करून घेतली.
ज्याप्रमाणे बाजीरावांनी त्या काळात निजामाची पालखेडला पाणी अडवून कोंडी केली होती त्याच प्रकारची कोंडी आता सिंधू पाणी करार स्थगित करून भारताने पाकिस्तानची केली आहे. 28 एप्रिलला थोरल्या बाजीराव पेशव्यांची पुण्यतिथी असते. बाजीरावांची ही युद्धनीती योगायोगाने का होईना पण मोदी सरकारने वापरली आहे. अखंड हिंदुस्तान वर भगवा झेंडा फडकवण्याचं ध्येय घेऊन, शिवाजी महाराजांचे स्वराज्य भारतभर विस्तार करण्यासाठी म्हणून मोहिमवर मोहिमा लढणा-या व एकही लढाई न हरणा-या थोरल्या बाजीरावांना सुद्धा स्वर्गात त्यांची युद्धनीती (विदेशी विद्यापीठात आजही पालखेडची लढाई एक strategic war चे उदाहरण म्हणून अभ्यासली जाते) वापरल्यामुळे निश्चितच आनंद झाला असेल, त्यांचा आत्मा धन्य झाला असेल.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व देश बांधवांना श्रद्धांजली तसेच पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन आणि थोरले बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन.