०६/०८/२०२६

Article about Shalarth software of School

 कोणाची म्हैस अन कोणाला उठ - बैस 


अनेक ठिकाणी व अनेक वेळा शासनाच्या, कंपनीच्या अशा सदोष पद्धतीमुळे ज्यांचा काहीही दोष नसतो त्या कर्मचाऱ्यांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागतात. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस.

कोणाची म्हैस अन कोणाला उठ - बैस. या म्हणीचा प्रत्यय अनेकदा येत असतो. काम किंवा चुका  कुण्या इतरांच्या असतात आणि हेलपाटे मात्र दुसऱ्यांना घ्यावे लागतात असा या म्हणीचा आशय आहे. शासकीय कामात तर नेहमीच याचा प्रत्यय येत राहतो. अनेकदा काही लोकांकडून चुका होतात किंवा शासकीय यंत्रणेत त्रुटी असतात आणि त्या त्रुटींमुळे त्रास मात्र नागरिकांना होत असतो. असेच खाजगी क्षेत्रात सुद्धा आहे. बरेच वेळा कंपन्यांनी विकलेल्या गाड्या त्या गाड्यांमधील असलेल्या दोषांमुळे ग्राहकांकडून परत मागून घेतल्या गेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतील त्रुटींमुळे अनेक अर्ज सरकारने नंतर बाद केले. या योजनेतील त्रुटींमुळे असेही आढळून आले की काही अर्ज हे पुरुषांनी केले होते. असे कित्येक दाखले देता येतील. 

     असेच एक प्रकरण शिक्षण विभागात घडले. शिक्षण विभागात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे ऑनलाईन वितरित करण्यासाठी सुमारे बारा/तेरा वर्षांपूर्वी शालार्थ ही प्रणाली लागू करण्यात आली.  पगार बिले सादर करतांना सुद्धा शालार्थ मधूनच सादर करावी लागतात. शिवाय अजूनही ऑफलाइन पद्धत ही सुरूच असल्यामुळे सर्व लिपिकांना महिन्यातून एकदा शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने बिले सादर करण्यासाठी बिले घेऊन जावेच लागते. ऑनलाइन झाल्यामुळे अनेक कार्य ही सोपी झाली हे सर्वांसाठी नक्कीच फायदेशीर आहे पण शालार्थ प्रणाली ही शासनाने ज्या कंपनीकडून विकसित करून घेतली त्या कंपनीकडून ही प्रणाली विकसित करतांना त्यात एक त्रुटी राहून गेली. याच त्रुटीचा फायदा काही अवैध कार्य करणाऱ्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेतला. शासकीय पैसा लाटणाऱ्या अशा व्यक्ती व संस्थांनी शालार्थ  प्रणालीतील ही त्रुटी ओळखून त्यामध्ये बोगस शिक्षक शिक्षकेतर आयडी वापरून करोडो रुपयांची बिले काढली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर शासनाला जाग आली आणि ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये काहीही दोष नव्हता त्यांच्याकडून बँक केवायसी,  पॅन कार्ड,  आधार कार्ड,  चेक बुक ची झेरॉक्स अशा प्रकारच्या कागदपत्रांची वारंवार मागणी केली जात आहे याचा अर्थ जे दोषी आहेत त्यांना तर शासन जी काही शिक्षा करेल ती करेलच परंतु जे कर्मचारी इमाने इतबारे काम करत आहेत त्यांच्या कार्यात ही कागदपत्र गोळा करून सादर करण्याची आणखी एक वाढ झालेली आहे. शिवाय शालार्थ प्रणालीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला सदोष असलेली प्रणाली शासनाला विकल्याबद्दल त्या कंपनीवर काय कारवाई केली ? किंवा त्यांना त्या कंपनीला कोणता दंड आकारण्यात आला ? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. खरे म्हटले तर या शालार्थ प्रणालीमध्ये बोगस आयडी कोणालाही करताच आला नाही पाहिजे अशी तरतूद सुरुवातीपासूनच असायला हवी होती परंतु ती कंपनीने दिली नाही म्हणून कंपनी यात दोषी आहे. शालार्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीने  एक प्रकारे शासनाची दिशाभूल करून फसवणूकच केलेली आहे कारण त्यांनी शासनाला सदोष प्रणाली विकली आहे. शालार्थच्या या सदोष प्रणालीमुळे आणि शिक्षण विभागामुळे निर्दोष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागत आहे.  शासनाने व शिक्षण विभागाने यावर उपाययोजना करून ज्या शिक्षक शिक्षकेतर करणाऱ्याचा काहीही दोष नाही त्यांना विनाकारण कागदपत्रे आदीच्या मागे लावू नये शिवाय त्यांना कागदपत्रे सादर न केल्यास वेतन होणार नाही असे सुद्धा म्हणू नये. अनेक ठिकाणी व अनेक वेळा शासनाच्या, कंपनीच्या अशा सदोष पद्धतीमुळे ज्यांचा काहीही दोष नसतो त्या कर्मचाऱ्यांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागतात. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस.

 

३०/०७/२०२६

Article on abusing and vulgarllity in jantar mantar protest

 ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर 

जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात  तरुण तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात अनेक महान तरुण होऊन गेले.

लहानपणी अभ्यास न करता जी मुले निव्वळ खेळायला, हुंदडायला जाणाऱ्या मुलांना  वडील मंडळी शीर्षकात जी हिंदी भाषेतील म्हण दिली आहे ती ऐकवत असत. बरेच राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचे वॉलेंटियर बनावे म्हणून आवाहन करीत असतात. नुकत्याच नव्याने जन्म घेतलेल्या आणि अजब नांव धारण केलेल्या झुरळ पार्टीने सुद्धा तसे आवाहन त्यांच्या वेबसाईटवरून केलेले आहे. त्याच पार्टीने नीट पेपरफूट प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले आणि त्यासाठी लाखो Gen Z तरुण रस्त्यावर उतरले होते. आंदोलना दरम्यान या तरुणांनी मांडलेला उच्छाद अवघ्या जगाने पाहिला. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचलित झाले  तरुण-तरुणींच्या तोंडातून देशाच्या पंतप्रधानांना दिलेल्या शिव्यांची लाखोली ऐकून भारतातील सुज्ञ, विचारी, संस्कारी जनांना वाईट वाटले, वेदना झाल्या. शिव्याच नव्हे तर अश्लील हावभाव सुद्धा Gen  Z पिढीतील काही तरुण करत होते. एका महिला पत्रकाराचा विनयभंग सुद्धा या दरम्यान झाला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे काही गैर नाही. सरकार जर का काही चुकीचे करत असेल तर आंदोलन होणारच पेपरफुटीचे प्रकरण झाल्यावर cjp ने आंदोलन पुकारले परंतु नीट पेपरफुटीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर सरकारने कारवाई केलेली होती.  काहींना अटक सुद्धा झाली होती. तरीही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा तगादा सीजेपीने लावला व अखेर त्यांनी तो दिला. त्यांच्या  आंदोलनात काही समाजकंटक सहभागी झाले आणि त्यांनी शिव्या, अश्लील हावभाव, तोडफोड, पोलिसांवर हल्ले, सार्वजनिक संपत्तीची नासधूस अशी कृत्ये केली पण असे करणारे तरुण हे सीजेपीचे नव्हते असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. पण ते कोण होते हे आता हळूहळू पुढे येत आहेच. काही तरुणांची मजल तर भारतीय सेना, पोलीस यांच्याविरुद्ध अपशब्द काढण्यापर्यंत त्यांना धक्काबुक्की करणे व मारण्यापर्यंत गेली. कोण होते हे तरुण ? यांची एवढी हिंमत कशी काय होते ? यांना मदत करणारे कोण होते ? यांच्या मागे आतंकवादी , देशविघातक लोकं होते का ? याचा सर्व शोध तपास यंत्रणा आता घेतीलच. मोदींना हुकुमशहा म्हणत हे नतद्रष्ट तरुण त्यांना शिव्या देत होते. मोदी जर हुकूमशाह असते तर हे तरुण त्यांना अशा मोकाटपणे सुसाट शिव्या देऊ शकले असते का ? यांना हुकूमशहा कसा असतो ते दाखवण्यासाठी अफगाणिस्तान, उत्तर कोरिया सारख्या देशांमध्ये पाठवायला हवे. हिटलरची कृत्ये वाचायला द्यायला हवी. तेंव्हा यांना लोकनियुक्त पंतप्रधान आणि हुकुमशाह यातला फरक कळेल. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की जो लोकशाहीचे तंतोतंत अनुसरण करतो. या देशाने कित्येक असे तरुण पहिले आहे ज्यांनी अल्पायुष्यात मोठी प्रगल्भता दाखवून महान कार्ये केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तोरणा किल्ला जिंकला तेव्हा शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते, 

उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहतां प्रत्यया आल्या । यथातथ्य ॥
शिव्या दिल्या की त्या अंतरात्म्याला जाऊन लागतात असे सांगणारे रामदास स्वामी ऐन तारुण्यात घर सोडून बाहेर पडले होते व जगाला दासबोध सारखा ग्रंथ दिला, वयाच्या तिशीत  अमेरिकेमध्ये हिंदू धर्माची पताका फडकवून, भारताचा नावलौकिक वाढवून स्वामी विवेकानंद 39 व्या इहलोक सोडून गेले होते, वयाच्या चाळिशीत महापराक्रमी बाजीराव पेशव्याने 41 लढाया जिंकून शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार केला होता, सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू या तरुणांनी ऐन तारुण्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते, प्राण दिले होते. अशा या तरुणांची यादी केली तर त्या यादीनेच कितीतरी पाने भरून जातील. अशा या तरुणांच्या देशात जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात काही तरुण-तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण-तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात वर उल्लेखलेले महान तरुण होऊन गेले ? असा प्रश्न या देशवासीयांना हे आंदोलन पाहून पडला.
     Gen  Z पिढीतील अनेक तरुण हे चांगल्या इमारती, भरमसाठ फी, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळा महाविद्यालयातून शिकलेले आहे. त्यापैकीच काही या आंदोलनामध्ये समाविष्ट होते. मग यांना खरोखरच चांगले शिक्षण मिळाले आहे ? यांनी जिथे शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्था भरमसाठ फी घेऊनही यांना एक आदर्श विद्यार्थी का घडवू शकल्या नाहीत ? की खरे विद्यार्थी हे घरीच होते व  आंदोलनकर्त्यांमध्ये मध्ये सर्व समाजकंटक आणि देशविघातक प्रवृत्ती होत्या ?  मोठमोठ्या शहरांमधील इंग्रजी शाळांमधून, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य मिळत आहेत का ? असे काही प्रश्न या आंदोलनातील काही तरुण-तरुणींना अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करतांना पाहून तमाम देशवासीयांना पडले आहे. 
         विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांचा सत्ता प्रवेशासाठी मार्ग म्हणून उपयोग करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना या देशातील जनता "ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर" असेच आज म्हणत असेल.

२८/०७/२०२६

Article about ideal teacher, head mistress Aney madam

जानेवालो की याद आती है..


आज गुड पॅरेंटिंग और स्कूल मे न डाटना, न मारना, विद्यार्थीयोको सजा न देना इस कारण Gen Z पिढी के कई युवा बिगड गये है|आज की पिढीमे अणे मॅडम जैसे आदर्श शिक्षक ज्यादा से ज्यादा संख्यामे हो ऐसी उम्मीद है |
ऐसे आदर्श शिक्षक जो बालकोमे, युवाओमे
नया जोश, नयी उमंग और देशभक्ती भर  दे |

कल शाम साडेचार पाच बजे के करीब व्हाट्स ॲटप के एक गृपमे एक दुखद संदेश दिखाई दिया | वो संदेश था राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका हम सब की चहेती प्रधानाचार्या वनमाला अणे इनके निधन का | संदेश पढा और मै शोकाकुल तथा स्तब्ध हो गया | संदेश की खातरजमा करने के लिए मैने वनमाला अणेजी के सहकारी रहचुके स्व. प्रल्हाद कोरडे के सुपुत्र मेरे बालमित्र राधेश्याम कोरडे को फोन कर पुछा तब राधेश्याम कोरडे ने इस वृत्त की पुष्टी की | फिर कई सारे सोशल मीडिया गृपपर उनके निधन की वार्ता आने लगी और मेरे साथ अणे मॅडम के कार्यकालमे ए.के. नॅशनल हायस्कूल के विद्यार्थी रह चुके मेरे कई दोस्त भी गमके सागर मे डूब गये| एक दुसरे को फोन करके मॅडम के निधन का शोक जताने लगे |आखिर अणे मॅडम मे ऐसा क्या था की विद्यार्थी  इतने शोकाकुल हो गये थे ? मै ये सोचने लगा और मुझे मेरे पाठशाला मे बिताये हुए दिन याद आने लगे | नॅशनल हायस्कूल की प्रधानाचार्या एक अनुशासनप्रिय और एक सच्ची शिक्षका है यह देखकर मेरे पिताजी ने मुझे उस स्कुलमे दाखिल कर दिया था | मै उस दौरमें चला गया | प्रधानाचार्य को पूरी स्कूल का कार्य देखना होता है इस वजह से शिक्षकों की तुलनामें उसका विद्यार्थियों से संबंध कम आता है|ऐसा होने के बावजूद भी अणे मैडम विद्यार्थियोंमे इतनी प्रिय कैसे हो गई ? इसका उत्तर मैं सोचने लगा |  फिर मेरे मन ने जबाब दिया,  कोई भी व्यक्ति उसका कर्म सच्ची भावना और निष्ठासे  करता है, अपने कार्य को व्रत मानकर आगे बढ़ता है तो फिर सन्मान और लोकप्रियता उसके कदम छुती है | लोगों का प्यार उसे मिलता है और लोकप्रियता अपने आप उसके पीछे चली आती है | अणे मैडम का वैसा ही हुआ | कर्तव्यपथपर वह आगे बढ़ती गई और एक दिन ऐसा आया कि उन्हे उस समयके राष्ट्रपति शंकरदयाल शर्मा इनके करकमलो द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार भी प्राप्त हुवा| 

     आजसे दस साल पहले मैने उन्हे एक पत्र लिखा था जिसका जवाब उन्होंने मुझे दिया था| उन्होने उनके जवाब में मेरी सरहाना कर मुझे आशीर्वचन दिये थे | मैने उन्हे जो पत्र लिखा था उसमें उनकी कई यादे लिखी थी| यहाँ वो लिखी तो उनकी पुनरावृत्ती हो जायेगी और वो मैं नही करुंगा |

(अणे मॅडम को लिखा हुआ पत्र पढणे के लिए यहा क्लिक करे)

लेकिन उस पत्रमें जो यादे नही लिखी थी वो जरूर लिखुंगा|मुझे याद है मॅडम जब ऑफिस मे बैठी हुयी रहती थी तब किसी भी विद्यार्थी की मजाल नही थी की वो ऑफिस के सामने से जाये,  इतना आदरयुक्त डर विद्यार्थीयो के मनमे रहता था | वैसेही जब मॅडम स्कूल सुरू होने के बाद पुरे स्कूल का एक चक्कर लगाती थी तो सभी कक्षाओमें पिन ड्रॉप सायलेन्स रहता था, और बरामदे मे ऐसा वातावरण रहता था जैसे मानो कर्फ्यू ही लगा हुवा हो | मुझे खुशी है की कक्षा पाचवी मे ही मेरा और मॅडम का परिचय हुआ था मै मेरी कक्षा का वर्गनायक था और मॅडम ने मुझे वर्गनायक का बॅज लगाकर मेरा सन्मान किया था | मॅडमसे जुडी हुई ऐसी कई यादे कई विद्यार्थीयोको भी होगी|

शिक्षा क्षेत्रमे आने के कारण मुझे कई बार शिक्षा अधिकारी बुलढाणा कार्यालय मे जाने का मौका मिलता है और वहाँ जाने के बाद मै जब वहाँ लगी हुयी आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त शिक्षको की सूची पढता हुं और उसमें  हमारी अणे मॅडम का नाम देखता हुं, तो मुझे बडा ही गर्व प्रतीत होता है, और मेरे दिल में मॅडम के प्रति जो आदर है वो और भी बढ जाता है |

हम खुशनसीब है की हमे अणे मॅडम जैसी प्रधानाचार्या और कई ऐसे आदर्श शिक्षक गण मिले जिनसे हमे बहुत कुछ सिखने को मिला | आज हमारे पुत्र-पुत्री Gen Z पिढी के युवा है जिनके अपने विचार है | जो मोबाईल युग मे पैदा होने के कारण उन्हे सही दिशा मिल नही रही है वो आभासकोही सत्यता मान रहे है | आज गुड पॅरेंटिंग और स्कूल मे न डाटना, न मारना, उन्हे सजा न देना इस कारण Gen Z पिढी के कई युवा बिगड गये है  | आज की पिढीमे अणे मॅडम जैसे आदर्श शिक्षक ज्यादा से ज्यादा संख्यामे हो, ऐसे आदर्श शिक्षक जो बालकोमे, युवाओमे नया जोश, नयी उमंग और देशभक्ती भर  दे |

 ऐसी उम्मीद रखते हुए यहाँ समापन करता हुं| 

जानेवाले कभी नही आते,

जानेवालो की याद आती है |

अणे मॅडम की भी याद उनकी कार्यप्रणाली, कर्तव्यपरायणतासे हमेशा आती रहेंगी | अणे मॅडम को भावपूर्ण श्रद्धांजली |

१७/०७/२०२६

Article about big tree cutting.

झाडे तोडलियावरी दुःखास पारावर काये ?...

संग्रहित चित्र


यंत्रांच्या सहाय्याने तोडलेल्या, पडलेल्या त्या झाडांच्या मुळांकडे पाहून येत होती. पुर्वी ज्या रस्त्यावर नेहमी वृक्षांची गर्द सावली असे त्या रस्त्याकडे पाहून आता ओकं-ओकं वाटत होतं. तो रस्ता बोडखा वाटत होता.

12 जुलै, रविवार रोजी काही खरेदी निमित्ताने मेन रोडवर गेलो होतो. मोठ्या देवी चौकात विड्याची पाने घेण्यास थांबलो तर तिथे एक व्यक्ती आला. "काय राजेहो मोठी - मोठी झाडे तोडणं लावलं" असे खिन्नतेने पानवाल्यास उद्देशून म्हणाला. कुठली झाडे ? मी त्याला त्वरीत विचारले.  "जाऊन पाहा न पोलिस स्टेशन रोडनी तो उत्तरला. मोठी देवी चौक ते पोलिस स्टेशन या रस्त्याने मी निघालो. खिलोशिया उपहारगृहासमोर एक ट्री गार्ड तोडलेल्या एका भल्या मोठ्या झाडाच्या खोडासह बांधकाम सुरू असलेल्या त्या रस्त्याचे तात्पुरते दुभाजक म्हणून ठेवण्यात आले होते. आणखी पुढे गेल्यावर एका तयार कपड्यांच्या दुकानासमोरचे मोठे कडूनिंबाचे झाड, आदर्श हॉटेलच्या बाजूचे भले मोठे झाड व आणखी काही झाडे तोडणे सुरू होते, त्यांच्या भल्या मोठ्या फांद्या मालवाहू गाड्यांमध्ये भरणे सुरू होते. बालपणी मी कमान गेट म्हणजे अग्रसेन चौका जवळ राहत होतो. मला समजायला लागल्यापासून ही झाडे मी बघत आलो होतो. यानुसार ही झाडे शंभर दीडशे वर्षांपेक्षाही अधिक असावी असा अंदाज आहे. नवीन रस्ता निर्मिती कार्यात ही झाडे अडथळा ठरली होती. मुळावर घाव घालणे या म्हणीची प्रचिती मला त्या भल्या मोठ्या, कवेत न येऊ शकणाऱ्या परंतु आता यंत्रांच्या सहाय्याने तोडलेल्या, पडलेल्या त्या झाडांच्या मुळांकडे पाहून येत होती. पुर्वी ज्या रस्त्यावर नेहमी वृक्षांची गर्द सावली असे त्या रस्त्याकडे पाहून आता ओकं-ओकं वाटत होतं. तो रस्ता बोडखा वाटत होता, नवीन रस्ता असूनही सध्यातरी मनहूस भासत होता. कदाचित भविष्यात पुन्हा तो  boulevard (दुतर्फा झाडे असलेला रुंद रस्ता) बनेलही, तशी काही योजना पण केली असेल पण सध्या तरी भकास वाटतो आहे. 

     गेली कित्येक वर्षे या झाडांनी नागरिकांना, त्यांच्या दुचाकी, मोटारसायकल आदी वाहनांना, फेरीवाल्यांना थंडी छाया दिली होती. परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांना हवा दिली होती. त्याच रस्त्यावर त्यावेळी मला नैराश्य, स्मशान शांतता दिसत होती, भकास वाटत होते. ते दृश्य पाहणारे तेथे उपस्थित नागरिक, पादचारी स्तब्ध होऊन ते वृक्ष कत्तलीचे दृश्य बघत होते.  मान्य आहे विकास व्हावा परंतू इतकी मोठ-मोठाली झाडे तोडणं अटळच आहे का ? त्या झाडांच्या ठिकाणी थोडा रस्ता अरुंद झाला तर चालणारच नाही का ? मी असे ऐकले आहे की बंगळुरू शहरात झाडे न तोडता त्यांना वाचवून रस्ते, कुंपणाच्या भिंती, छप्पर तयार केले जाते. काही वर्षांपुर्वी संभाजीनगरला एका दुकानाच्या आत काऊंटरला लागून एक मोठे झाड दुसरा मजला पार करून तिसऱ्या मजल्यावर त्याच्या फांद्या गेल्याचे मी स्वत: पाहिलेले आहे. मग याप्रमाणे काही नाही का करता येऊ शकत ? झाडे तोडल्यावर आम्ही नवीन झाडे लावू असे म्हटले जाते पण नवीन झाडे तेवढी मोठी नसतात, किंवा सावली देणारी सुद्धा नसतात. मागच्या वर्षी घाटपुरी बायपासवर फॉक्स टेल पाम मोठ्या संख्येने लावली पण आपल्या भागातील ऊन, दुभाजका मधील निकृष्ट माती यांमुळे त्यातील निदान 80 टक्के तरी झाडे वाळून गेली. म्हणजे झाडही गेले आणि शासनाचा पैसाही. झाडे लावताना आपल्या भागातील वातावरणाचा अभ्यास करून मग ती झाडे लावली गेली पाहिजे. खामगाव सारख्या प्रचंड ऊन असलेल्या शहरात फॉक्स टेल पाम जगणे कठीण आहे.

  आपण सर्व शिवाजी महाराजांचे खूप नांव घेतो त्यांचा अभिमान बाळगतो. ते योग्यच आहे पण छत्रपतींनी दिलेला संदेश मात्र पार विसरून जातो. नोकरशाही , नेते मंडळी सुद्धा विसरतात म्हणून शिवाजी महाराजांनी दिलेल्या आज्ञापत्रातील काही अंश येथे देत आहे.

लाकडे आरमाराचे प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाऊ न द्यावा. काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दो वर्षाने होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहिसे होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानीही होते. याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊ द्यावी. कदाचित यखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तरी त्याचे धन्यास राजी करून त्याचे संतोषे तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’

या आज्ञापत्रावरून शिवाजी महाराज रयतेप्रती आणि स्वराज्यातील झाडांविषयी किती काळजी करत हे सहज लक्षात येते.

     विकासास कुणाचाच विरोध नाही, तो अवश्य व्हावा. खामगांव शहर कधी नव्हे एवढे विकसित होत आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. खामगांवातील उद्यानांनी आता कात टाकली आहे. काही नवीन उद्याने झाली आहे. ही उद्याने इतकी सुंदर झाली आहेत की, यात काढलेले फोटो कुण्या मोठ्या शहराच्या बगीच्यातील किंवा पर्यटन स्थळावरील वाटावीत अशी असतात. निसर्ग समृद्ध जनुना तलाव सुद्धा आता अत्याधुनिक खेळांच्या साधनासह, नूतनीकरणासह एक आनंददायी स्थळ म्हणून खामगांवकरांसाठी सज्ज होत आहे. 

    या लेखाचा उद्देश हाच आहे की, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मोठ-मोठाली झाडे न तोडण्याची आज्ञा दिली होती तशीच अंमलबजावणी सांप्रत प्रशासनाने सुद्धा करावी. अगदीच नाईलाज असल्यास मगच झाडे तोडावी. ती तोडलीच तर शोभेची झाडे न लावता तोडलेल्या झाडांच्या तोडीची नवीन झाडे लावावीत व ती जगवावी जेणे करून शिवाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "झाडे तोडलियावरी दुःखास पारावर काये ?"  याप्रमाणे दुःख होणार नाही.

२५/०६/२०२६

Artical about Ketan Agrawal murder bye Sia Goyal

रामचंद्र कह गए "सिया" से....

स्त्रिया शिक्षित झाल्या, स्वतंत्र झाल्या, त्यांना विविध अधिकार मिळाले, त्यांच्यासाठी आयोग गठीत झाला, सवलती मिळाल्या, त्यांच्या बाजूने कायदे झाले या सर्वांचा गैरफायदा सियासारख्या अनेक स्त्रिया घेऊ लागल्या आहेत.  स्वातंत्र्यानंतर स्त्रियांच्या वर्तनात  कमालीचा बदल घडलेला आहे. या देशात पत्नी पिडित पतींची सुद्धा संघटना निर्माण होईल अशी कल्पना तरी कोणी केली होती का ?

     खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दिलीपकुमारचा गोपी सिनेमा बघितला होता. या सिनेमातील रफीने गायलेले "सुखके सब साथी दुखमे ना कोई" हे जीवनातील वास्तव सांगणारे भजन तसेच 

रामचंद्र कह गये सियासे 

ऐसा कलजुग आयेगा, 

हंस चुगेगा दाना दुनका 

कौवा मोती खायेगा ||

हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं. कलियुगातील परिस्थितीचे वर्णन करणार अशी दोन सुंदर, श्रवणीय गीते लक्षात राहीली. आणि रामचंद्र कहे गये सियासे यातील सिया म्हणजेच सीता हे त्या बालवयात कुणीही न सांगता लक्षात आले होते. हिंदीमध्ये अनेक गीतांमध्ये, भजनांमध्ये सीतेला सिया असे म्हटले आहे या गीतात कलियुगाचे यथार्थ वर्णन केलेले आहे परंतु हे गीत आठवण्याचे कारण म्हणजे सिया हे नांव. परवा सिया नावाच्याच एका तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीचा जीव घेतला आणि सिया नांवाच्या अवतीभोवती माझे विचारचक्र फिरू लागले आणि हे गीत आठवले. परंतु कुठे ती रामचंद्रांची त्यागी सिया आणि कुठेही माथेफिरू भोगी सिया. या दोघींची तुलना वगैरे करायची नाही, होऊ तर मुळीच शकत नाही, परंतु केवळ नाम साधर्म्य तेवढे आहे. सियाच्या मातापित्यांनी कोणत्या हेतूने तिचे सिया हे नाव ठेवले असेल ? त्याचा अजूनही काही अर्थ असेल का ? देव जाणे. परंतु सिया या नांवामुळे हे गीत आठवले. 

     महाराष्ट्रातील लोहगड किल्ल्यावरून परवा एक तरुण दरीत पडल्याची घटना घडली. सुरुवातीला एक अपघात म्हणून त्याकडे पाहिले गेले. परंतु नंतर त्याच्या वाग्दत्त वधूनेच त्याला दरीत ढकलल्याचे निष्पन्न निघाले. पुण्यातील व्यापारी अग्रवाल यांचा एकुलता एक मुलगा केतन याचा विवाह व्यापारी गोयल परिवाराच्या सिया नावाच्या तरुणीसह निश्चित झाला होता. लग्नासाठी मोठे रिसॉर्ट सुद्धा आरक्षित करण्यात आले होते परंतु लग्नाच्या काही दिवस आधीच फिरायला जाण्यासाठी म्हणून केतन अग्रवाल आपली वाग्दत्त वधू सिया गोयल सोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. याच ठिकाणी सियाने केतनला दरीत ढकलून दिले असे पोलिस तपासांती लक्षात आले. केतन साडेचारशे फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा परिवार दुःख सागरात. 

     काय होते आहे हे ? काय झाले आहे आज कालच्या तरुणांना ? यापूर्वीही तरुणींनी त्यांच्या पतीला मारण्याचे किस्से भारतात घडले आहे सोनम रघुवंशीने पतीला असेच दरीत ढकलून मारले होते तर एका विवाहितेने तिच्या पतीला मारून त्याचा मृतदेह ड्रमात टाकून त्याला सिमेंटने पक्के करून मारले होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. तरुणींना हे काय झाले आहे ? समाज माध्यमांमुळे तरुण-तरुणी हे खूपच उच्छंकृल झाले आहेत, भरकटत चालले आहे, भौतिक सुखाच्या नादी लागले आहे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे सगळे खरेच समजून तसेच अनुसरण करीत आहे, आभासी विश्वात वावरत आहे, उच्चविद्याविभूषित होत आहे परंतु नीतिमत्ता मात्र शून्य झालेली आहे, शारीरिक आकर्षणाने दुष्कृत्ये घडत आहे. बॉयफ्रेंड सोबत एन्जॉय करायचा आणि नंतर बलात्काराचा आरोप करायचा अशी सुद्धा कित्येक कृत्ये घडली आहेत. ही सिया सुद्धा त्याच पठडीतील. केतन अग्रवाल सोबत लग्न ठरण्यापुर्वी तिचा चेतन चौधरी नामक बॉयफ्रेंड होता. या चेतन चौधरी सोबतच तिने केतन अग्रवालला मारण्याचा कट केला आणि केतनचा जीव घेतला. बाई तुला लग्न त्याच्याशी करायचे नव्हते  तर सांगायचे असते ना ! परिवाराला विश्वासात घ्यायचे, केतनला सांगायचे. ते सोडून एखाद्याचा जीव घेणे त्याच्या  परिवाराची वाताहत लावणे हे कितपत योग्य आहे ? स्त्रिया शिक्षित झाल्या, स्वतंत्र झाल्या, त्यांना विविध अधिकार मिळाले, त्यांच्यासाठी आयोग गठीत झाला, सवलती मिळाल्या, त्यांच्या बाजूने कायदे झाले या सर्वांचा गैरफायदा सियासारख्या अनेक स्त्रिया घेऊ लागल्या आहेत.  स्वातंत्र्यानंतर स्त्रियांच्या वर्तनात  कमालीचा बदल घडलेला आहे. या देशात पत्नी पिडित पतींची सुद्धा संघटना निर्माण होईल अशी कल्पना तरी कोणी केली होती का ?

     पत्नीने किंवा होणाऱ्या पत्नीने बॉयफ्रेंडच्या साह्याने पतीचा खून करणे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. याच्या उलट सुद्धा अनेक किस्से घडलेले आहेत, नाही असे नाही. त्यामुळे या अशा घटनांवर उपाययोजना म्हणून सरकार, सामाजिक संघटना, कुटुंब, स्त्री-पुरुष या सर्वांनी विचार करणे आवश्यक झाले आहे. शाळांमध्ये नैतिक शिक्षणावर मोठा भर देणं आवश्यक झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात तशी तरतूद  केली आहे. संघाने सांगितलेल्या पंचसूत्री मध्ये कुटुंब प्रबोधन हे सर्वात प्रथम क्रमांकावर सांगितले आहे. आज कुटुंबामध्ये संवाद राहिलेला नाही. मुलांवर संस्कार हे केवळ सांगण्याने, बोलण्याने होत नाही तर मोठ्यांच्या आचरणाने सुद्धा होत असतात त्यामुळे मोठ्यांचे आचरण तसे राहिले आहे का हा सुद्धा विचार आपण सर्वांनी, वाचकांसह लिहिणाऱ्याने सुद्धा करणे आवश्यक आहे. मुलींनी शिक्षण आवश्यक घ्यावे, पुढे जावे, प्रगती करावी, मित्र-मैत्रिणी सुद्धा आपल्या आवडीने करावीत परंतु कुणाला आयुष्यातून उठवून देणे, खून करणे हे मात्र कोणत्याही स्त्रीला न शोभणारे असे कृत्य आहे. 

      सियाने केतनला मारण्याचे अविचारी वृत्त करून केतनच्या परिवाराला उध्वस्त केले आहे. शिवाय स्वतःच्या आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याही परिवार परिवाराला उध्वस्त केले आहे त्यामुळे तमाम तरुणाईला इथे हेच सांगावेसे वाटते की, कोणतीही गोष्ट अविचाराने करू नये अन्यथा

बिना विचारे जो करे सो पीछे पछताये 

काम बिगाडो आपनो, जग मे होत हंसाय 

हे कलियुग आहे आणि ते सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी समाजात होताना आपण दररोज बघतो. रामचंद्र कह गये सियासे ऐसा कलजुग आयेगा या पंक्तीप्रमाणे कलियुगातील या सियाचे आपल्या वाग्दत्त वराला जीवे मारण्याचे कृत्य त्याला प्रमाण आहे.



१८/०६/२०२६

Article about less rain fall in India.

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा...


सर्वत्र जरी अल निनोचे कारण असले तरी आमच्या खामगांवात मात्र पाऊस उशिरा दाखल होण्याबाबतचा एक अजब समज आहे. तो म्हणजे आनंद मेला गावांत आला की पाऊस पडत नाही. अशी अंधश्रद्धा अनेक गावांमध्ये आहे. 

तसे पाहिले तर या गुरुवारी लिहिण्यासाठी म्हणून अनेक विषय होते. कारण शीर्षकात दिल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांत जनतेने प्रणित मोरे या स्टॅन्डअप  कॉमेडियनचे ; स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणण्यापेक्षा अश्लील कॉमेडियनचे, वाढत्या झुरळांचे, दलबदलू राजकारण्यांचे, पुरोगामी म्हणवणाऱ्या साहित्यिक असून जातिवाचक द्वेष भावना पसरविणाऱ्या महिलेचे व शिवाय इतरही अनेक असे तमाशे पाहिले आणि पाहतही आहे. परंतु "कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच" या म्हणीप्रमाणे उपरोक्त विषयांबाबत कितीही लिहा किंवा बोला वरील बाबींसारख्या गोष्टी या समाजात घडतच राहणार. मग अजून हा असा कोणता तमाशा आहे की जो लोक डोळे फाडून पाहत आहे ? तर हा तमाशा आहे पावसाचा. जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी अजूनही वरूण राजाचे आगमन नाही. "नेमेची येतो मग पावसाळा" ही म्हण सुद्धा आता पावसाळा पाळत नाही, आता पावसाचा काही नेमच राहिला नाही. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या पावसाबाबत अनेकांनी कविता लिहिल्या आहे, लेख लिहिले आहेत तसेच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा अनेक पाऊस गीते आहेत. यातील बहुतांश गीते ही प्रेमगीते आहेत. जुन्या जमान्यातील सिनेमात कथानकाच्या गरजेप्रमाणे ही गीते सिनेमात असत. 1980 च्या दशकापासून मात्र हिंदी सिनेमात पाऊस गीते ही घुसाडली जाऊ लागली हीरो,  हीरोईनला विशेषत: हीरोईनला लाल किंवा पांढऱ्या साडी मध्ये भिजवून , अंग प्रदर्शन, चुंबन दृश्ये दाखवून चित्रपट यशस्वी करण्यासाठी व गल्ला कमवण्यासाठी दिग्दर्शक पाऊस गीतांचा वापर  करू लागले. रोमँटिक पाऊस गीते जरी प्रचंड असली तरी दुष्काळाची किंवा पाऊस न पडल्यामुळे असलेल्या  गीतांची संख्या मात्र अत्यंत तुरळक आहे. पाऊस न पडण्याच्या सिच्युएशनवर एक गीत देवानंदच्या गाजलेल्या गाईड या सिनेमात आहे. गाईड असलेला राजूच्या जीवनात अचानक अनेक स्थित्यंतरे येतात आणि आकस्मिकपणे तो साधू बनतो व एका गावातील मंदिरामध्ये राहू लागतो. गावातील लोकांना तो पाऊस पडण्यासाठी उपवास करणाऱ्या एका महान व्यक्तीची गोष्ट सांगतो. नेमका त्या गावात सुद्धा दुष्काळ पडतो आणि लोक आता साधू बनलेल्या पूर्वाश्रमीच्या त्या राजू गाईडला पाऊस पडावा म्हणून उपवास धरण्यास सांगतात. आर. के. नारायण यांच्या कथेवर आधारित हा सिनेमा प्रचंड गाजला होता. राजूचे उपवास सुरू असतांना संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या आवाजातील हे गीत सुरू होते, 

रामा मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू शामा मेघ दे |

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा

हाय रे विश्वास मेरी हाय मेरी आशा ||

गीत ऐकताना आणि पडद्यावर ते दुष्काळाचे चित्र पाहताना दर्शकाला सुद्धा पाऊस पडावा असे वाटू लागते. 

     यंदा  भारतामध्ये सुद्धा पावसाने दडी मारली आहे. शेतकरीच नव्हे तर पांढरपेशा शहरी वर्ग सुद्धा पावसाची प्रतिक्षा करतो आहे. प्रचंड उन्हाने तापणारा विदर्भ तर पावसाची चातकासारखी  प्रतीक्षा करत असतो. मानवाने कितीही मोठी प्रगती केली चंद्रापर्यंत झेप घेतली तरी मनुष्य हा निसर्गावर निर्भर आहे आणि राहणारच. त्यामुळेच तमाम भारतीयांना सध्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट 2027 पर्यंत  धरणातील पाणी व पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार करण्याचे आदेश दिले आहे. सुपर अल निनोमुळे यंदाचा मान्सून लांबला आहे. नुकत्याच झालेल्या काही युद्धामुळे सुद्धा वातावरणावर  नक्कीच परिणाम झाला असेल. मान्सून सगळीकडेच उशिरा दाखल होत आहे. सर्वत्र जरी अल निनोचे कारण असले तरी आमच्या खामगांवात मात्र पाऊस उशिरा दाखल होण्या बाबतचा एक अजब समज आहे. नेमका याच वर्षी आमच्या खामगांवात तमाशा आला आहे. तमाशा अर्थात आनंद मेला. बऱ्याच इतर राज्यात आनंद मेला ला तमाशा, नुमाईश असे शब्द आहे. तर यंदा खामगांवात सुद्धा आनंद मेला दाखल झाला आहे. आनंद मेला गावांत आला की पाऊस पडत नाही अशी एक अंधश्रद्धा अनेक गावांमध्ये आहे. काही वर्षांपूर्वी तर खामगांवात आनंद मेला लोकांनी परतवून लावला होता. 

     आज अबालबुद्ध सर्वत्र पावसाची प्रतीक्षा करत आहे, परिस्थिती बिकट आहे, पेरण्या केव्हा होतील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल काही कल्पना करवत नाही. उकाड्याने सर्व त्रस्त झाले आहे, प्रदूषण एसी, सिमेंटचे रस्ते, जागोजागी लावल्या जात असलेले गट्टू यामुळे सर्वच शहरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. 

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त आहे, मानवी शरीराला सुद्धा पाण्याची जास्त गरज असते, पाणी हे सर्वांना प्रिय असते, हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा जलाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याला रत्न म्हटलेले आहे. 21 जून पासून पाऊस सुरू होणार असे वृत्त आज झाले आहे ते वृत्त खरे होवो म्हणजे 

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा

असा पाऊस न पडण्याचा तमाशा जनतेला पहावा लागणार नाही. तसेच 

हाय रे विश्वास मेरी हाय मेरी आशा || 

या गीतातील पुढील ओळी प्रमाणे सर्वच जाती धर्माच्या लोकांना ईश्वरावर भरोसा असतो, आशा असते. ईश्वर पावसाची वाट पहाणाऱ्या लोकांचा विश्वास खरा करो व त्यांची उशिराच खरा पण पाऊस येईल ही आशा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

११/०६/२०२६

Article on Tukaram Mundhe and his working style

 तुका झालासे कळस


कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले सकस अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे.

अन्न व औषधी प्रशासन या विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला आणि अन्न व औषधी प्रशासन हा सुद्धा एक विभाग असतो आणि हा विभाग अन्न आणि औषध यातील भेसळ, हॉटेलमधील पदार्थ तसेच हवाबंद पाकिटा मधील पदार्थ यांवर लक्ष ठेवून असतो हे अनेकांना प्रथमच ठाऊक झाले. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, कठोर शिस्तीचे आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. २००५ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असलेले मुंढे हे त्यांच्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धडक कारवायांसाठी महाराष्ट्रात 'युथ आयकॉन' आणि 'पीपल्स ऑफिसर' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कार्यशैली ही प्रामाणिक आणि शिस्तबद्ध आहे. ते कोणत्याही पदावर गेले तरी तेथील व्यवस्थेत सुधारणा घडवून आणतात. या प्रक्रियेत राजकीय नेते आणि भ्रष्ट घटकांचे हितसंबंध दुखावल्यामुळे "कुछ ही दिनो मे उनकी बदली हो जाती है, लेकीन इतनी बदलियो के बाद भी उनकी कार्यशैली नहीं बदली" त्यांच्या कारकीर्दीत म्हणजे २१ वर्षात  झालेली ही त्यांची पंचवीसावी बदली आहे. आजरोजी पावेतो त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यांमध्ये  विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, पीएमपीएमएल (PMPML) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,  दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव या पदांचा समावेश आहे आणि सद्यस्थितीत वर उल्लेखल्या प्रमाणे ते आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) या पदावर नियुक्त आहे.

     अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच  तुकाराम मुंढे यांनी धाडींचे सत्र  सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अन्न भेसळी बाबत,  अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्याबाबत बराच ऊहापोह होत आला आहे जनतेला कोणत्या पदार्थात कोणती भेसळ केली जाते,  कोणती फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर होतो हे सर्व ठाऊक आहे परंतु भेसळ करणाऱ्यांवर फक्त दिवाळी व सणासुदीच्या वेळेसच धाडी टाकल्या जातात इतर वेळेस मात्र काहीही कारवाई होत नाही. वास्तविक पाहता अन्न व औषध प्रशासन हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विभाग आहे. सरकारला जनतेच्या जीविताची, आरोग्याची काळजी असते किंवा त्यांनी ती करणे अपेक्षितच असते, त्यांची ती जबाबदारीच आहे.  कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले, सकस, भेसळ रहित अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे,  अनेकदा अन्नातून विषबाधा झाल्याची उदाहरणे ऐकायला येतात, विकतच्या पदार्थांमध्ये झुरळ, पाल, उंदीर आढळून येतात. मागे एकदा एका हॉटेलमध्ये अन्नात पाल दिसून आल्याचे वृत्त देशभर गाजले होते. परवाच ठाण्याला केक मध्ये सुया आढळून आल्या. अशा प्रकारची उदाहरणे हल्ली मोठ्या प्रमाणावर ऐकू येतात. तुकाराम मुंढे अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त होता बरोबरच त्यांनी धडक मोहीम हाती घेऊन अनेक ठिकाणी धाडी घातल्या. पदभार स्वीकारताच "मी जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही" असे म्हणत काही दिवसातच त्यांनी शेकडो ठिकाणी धाडी टाकून शंभर पेक्षा अधिक जणांना अटक केली. ८६ अस्थापना सील केल्या तर १ कोटी 58 लाख 26 हजाराचा भेसळयुक्त माल जप्त केला. या धाडींमध्ये गुटखा व्यवसायिक, दूध व्यवसायिक, फळ विक्रेते, हॉटेल चालक इत्यादींचा समावेश आहे. तसेच पतंजली ला सुद्धा दणका बसला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असे धाडसत्र राबवले गेले असावे. त्यांच्या या धडक कारवाई मुळे गुटखा तस्कर , भेसळ करणारे, रासायनिक द्रव्याद्वारे फळे पिकवणारे यांचे धाबे दणाणले आहे.      

      तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीही त्यांच्या आधीच्या विभागांमध्ये त्यांची कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा तसेच जनतेसाठीचे कार्य या गोष्टी सिद्ध केल्या आहेत आणि आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची सुरू असलेली धडाकेबाज मोहीम या सर्व गोष्टींमुळे इतर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहे शिवाय त्यांनी स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या मांदियाळी बाबत अभंग लिहितांना संत बहिणाबाई यांनी तुकाराम महाराजां बाबत "तुका झालासे कळस" असे वर्णन केले आहे त्याचप्रमाणे इतर भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तुलनेत व त्यांच्या मांदियाळीत जनहितार्थ कार्य, कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता, याबाबतीत मुंढे यांनी जणू उत्तुंग शिखर सर केले आहे. म्हणूनच त्यांच्या बाबतीत सुद्धा तुका झालासे कळस असे म्हणावेसे वाटते. तुकाराम मुंढे यांची कारवाई स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे. तुकाराम मुंढे यांचा सारखा कित्ता जर किमान पन्नास टक्के प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांनी गिरवला तरी या भारतात मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल.

ता. क. - नेपाळ सारख्या छोट्या व आपल्या लगतच्या देशाने सुद्धा रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे पिकवले जात असल्यामुळे भारतीय आंब्यांवर बंदी घातली आहे. त्यांनी भारतातून  त्यांच्या देशात होणाऱ्या आंबे आयातीवर रोक लावली आहे. ही आपल्या देशाची नामुष्की नाही का ? 

०४/०६/२०२६

Article about Maharashtra government scheme ladki bahin scheme

 सौ मे से अस्सी बेईमान....

अर्ज करणाऱ्या ८० लाख लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज पडताळणी नंतर  या अपात्र धनदांडग्या अर्जदारांच्या  इतक्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत की त्या अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  

         खूप वर्षांपूर्वी प्रवासात असतांना एका ट्रकच्या मागे लिहिलेले "सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान" असे एक वाक्य वाचले होते. ते वाक्य मनाला खूप भिडले होते. म्हणूनच ते लक्षात राहिले. आज ते वाक्य आठवले याचे कारण म्हणजे ८० हा आकडा आणि ८० आकडा आठवण्यास निमित्त ठरले ते लाडकी बहीण योजनेचे ८० लाख अर्ज अपात्र झाल्याचे वृत्त वाचण्याचे. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली याचा पुरेपूर फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. योजना सुरू झाली योजनेवर बहिणींनी आणि काही प्रत्यक्षात भाऊ असलेल्या परंतु लिंग न बदलता बहीण झालेल्या अशा डुप्लिकेट बहिणींनी फुकट पैसे मिळतात म्हणून उड्या मारल्या. फुकटचे काहीही मिळत असले की भारतीयांच्या उड्या पडतातच हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सरकारकडून काही मिळत असले की ते लाटण्यासाठी ज्या लोकांना त्याची काहीही आवश्यकता नसते अशा सुखवस्तू कुटुंबातील लोक सुद्धा काहीही विचार न करता त्या योजनांसाठी अर्ज दाखल करतात. ज्यांच्या घरी  खायप्यायची काही कमी नाही तेही लोक अशा फुकटछाप शासकीय योजनांवर उड्या मारतात. तसेच लाडकी बहीण योजनेतही झाले. ते होणारच होते याचा अंदाज होताच. योजना सुरू होताच करोडो अर्ज दाखल झाले परंतु जेव्हा सरकारी तिजोरीवर त्याचा बोजा वाढू लागला तेव्हा अर्जाची छाननी सुरू झाली आणि त्यामध्ये ८० लाख अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले. राज्यास २४ हजार ३०० रुपयांचा फटका बोगस बहिणींनी दिला. ८० लाख अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी निर्लज्जपणे येन केन प्रकारेण या योजनेत अर्ज दाखल केले. ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून सुरुवातीला सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर अर्ज स्वीकारले होते परंतु पडताळणी नंतर अनेक धक्कादायक अशा बाबी समोर आल्या. यातील काही धनदांडग्या अर्जदारांच्या तर इतक्या धक्कादायक बाबी आहेत की त्या लाडकी बहीण अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  त्यांच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सादर केलेल्या असत्य बाबी ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्यालाच लाजवतात अशा आहे. 

     या अपात्र केलेल्या लाडकी बहीण अर्जदारांमध्ये  १४ हजार अर्ज तर पुरुषांचे आहेत. म्हणजे महिला असल्याचे भासवून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि सरकारची फसवणूक केली. याहीपेक्षा पुढची उदाहरणे तर तोंडात बोट घालायला लावतील अशी आहे. 

     80 लाख अपात्र अर्जांपैकी दहा लाख अर्जदार प्राप्तिकर भरणारे आहे. आता बोला ! पाच लाख अर्जदार हे सरकारी कर्मचारी कुटुंबातील आहे. म्हणजे कामचुकारी करायची, सरकारी पगारही घ्यायचा, वरकमाई सुद्धा करायची आणि फुकट छाप शासकीय योजनांचाही लाभ घ्यायचा (काही सन्माननीय अपवाद वगळून). अशा पद्धतीने आपल्याच पात्रात तूप ओढून घ्यायचे, देशाचे ओरबाडून ओरबाडून खायचे देशाला मात्र द्यायचे काही नाही. 

     या पाच लाख सरकारी कर्मचारी कुटुंबीयांपैकी काहीं जवळ तर चारचाकी वाहने सुद्धा आहेत. म्हणजे बघा सर्व बाजूंनी देशाला कसे ओरबाडणे सुरू आहे, देशाचा पैसा असा लुटणे सुरू आहे. 

    लोकांना असे खोटे अर्ज सादर का करावेसे वाटतात त्याचीही अनेक कारणे आहेत. सर्वच लोक तर फायदा करून घेत आहेत तर मग मी का नाही करू ? नेते तर गब्बर होत आहे तर मग मी का नाही घेऊ ? पैसा तर सरकारीच आहे अशी मानसिकता नागरिकांची हळूहळू होऊ लागते आणि त्यातून मग अशा प्रकारे खोटे अर्ज सादर होत असतात

     या सरकारी फुकटच्या योजनांचा लाभ जे खरे लाभार्थी असतात त्यांना न होता जे बोगस लाभार्थी आहे तेच जास्त करून घेतात असे कित्येक वेळा समोर आलेले आहे. तरीही आपल्या देशातील नेते सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रकारची आमिषे जनतेला देत आले आहे आणि सत्तेचा मार्ग मोकळा करून घेत आले आहे हेच स्वातंत्र्यापासून सुरू आहे. तसे पाहता कोणतेही सरकार हे सर्वसामान्यांसाठी जनहिताच्या योजना राबवत असते परंतु त्या योजनांचा कोणी गैरफायदा घेणार नाही याचासुद्धा विचार सरकारने करायचा असतो. गैरफायदा घेतलाच तर त्याला अटकाव व कठोर कारवाई सुद्धा असायला हवी. फुकटछाप योजना ह्या दूरगामी विचार करता देशाच्या हिताच्या नसतात. परंतु देशाचे हित कोण पाहते? म्हणूनच तर लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख अर्ज अपात्र ठरले आहे. जनता सुद्धा भ्रष्ट मार्ग अवलंबून योजनांचा गैरफायदा करत आहे, अनुदान लाटत आहे. लाडकी बहीण योजना बोगस लाभार्थींच्या अर्जांची आता पुन्हा छाननी, चौकशी होईल. या  कार्यात सरकारी पैसे आणि सरकारी श्रम, वेळ यांचा व्यय होईल म्हणजे योजना लागू करूनही नुकसान मात्र सरकारचेच असे होणार आहे. बोगस लाभार्थीं कडून पैसे वसूल केले जातील असे म्हटले जात आहे. पैसे तर वसूल केलेच पाहिजे कारण ते जनतेचे आहे. शिवाय कायद्यात सुद्धा तरतूद केली पाहिजे. सरकारी कर्मचारी, प्राप्तिकर दाते, चार चाकी वाहन असणारे अशा लोकांनी जर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस अर्ज दाखल केलेच तर त्यांच्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाईचा असा एक कायदा निर्माण केला जावा जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, जनतेचे पैसे असे उधळले जाणार नाही, जनतेचा पैसा बोगस लाभार्थी लुटून घेणार नाही. दिवसेंदिवस बोगस लाभार्थी, भ्रष्ट लोक वाढत चालले आहे लाडकी बहीण योजनेचे 80 लाख बोगस लाभार्थी आढळल्याने पुनश्च हेच सुतोवाच करावेसे वाटते की,

सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान

टीप - अनेक प्रमाणिक, देशीहितैशी, श्रमिक असे नागरिक, सरकारी कर्मचारी, नेते आजही थोडे का होईना परंतु आहेत मात्र नक्की. अशा लोकांमुळेच हा देश टिकून आहे. अशा सन्माननीय लोकांनी या लेखातून स्वतःला वगळावे.

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगांव 

 







२८/०५/२०२६

Article about Savarkar

खामगावकरांना प्रेरणादायी ठरेल सावरकर स्मारक 


स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला  येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. या घटनांची आठवण म्हणून तसेच युवकांना प्रेरणा म्हणून
खामगावला सावरकरांचे एक स्मारक असावे ही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती. सावरकरांबद्दल आज रोजी पावतो अनेक लेख लिहून झाले परंतु वीर सावरकर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की, 

सब धरती कागज करू,  लेखणी सब वनराय,  

सात समुद्र की मसी करू, गुरू गुण लिखा न जाय|

या कबीराच्या दोह्याप्रमाणे सावरकरांचे गुण वर्णनास सुद्धा समस्त पृथ्वीचा कागद केला आणि सर्व वृक्षांपासून लेखण्या बनवल्या, सातही समुद्राची शाई जरी बनवली तरी सावरकरांचे गुणवर्णन करणे शक्य होणार नाही इतके विविध पैलू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती, कवी, लेखक, क्रांतिकारक, समाज सुधारक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू आहे. आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त खामगावच्या रायगड कॉलनी परिसरातील सावरकर उद्यानाजवळ जाणे झाले. या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याच ठिकाणी सावरकरांचा भव्य पुतळा व स्मारक व्हावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे केली असल्याचे कळले. ही मागणी तिथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना रास्तच वाटली कारण तिथे उत्स्फूर्तपणे तशा घोषणा देण्यात आल्या. 

      ज्या मनुष्याने बालपणापासून मारीता मारीता मरेतो झुंजेन असे म्हणून राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली, स्वतःचा परिवार देशोधडीला लावला. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली समाज सुधारण्याचे इतके  मोठे कार्य केले की, सावरकर स्वतःच म्हणाले होते की,  "एक वेळेस माझी समुद्रात मारलेली उडी लक्षात नाही ठेवली तरी चालेल परंतु माझे समाज सुधारण्याचे कार्य मात्र लक्षात ठेवावे". स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला सुद्धा येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. सावरकरांच्या या खामगाव नगरीला भेट देण्याच्या आठवणीसाठी म्हणून खामगावला निश्चितच सावरकरांचे एक स्मारक असावे ही जी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे झाली आहे त्या मागणीला समस्त खामगावकरांनी दुजोरा द्यावा असे वाटते. तसे खामगावला सावरकरांच्या नावाने रायगड कॉलनी परिसरात सावरकर उद्यान निर्मिती झालेलीच आहे  सुंदर असे हे उद्यान आहे. याच उद्यानाच्या जवळ रायगड कॉलनी परिसरात जर सावरकरांचे स्मारक झाले तर ते  सावरकरांच्या आत्म्याला प्रसन्न करणारे ठरेल कारण या परिसराचे नाव रायगड कॉलनी आहे. रायगड अर्थात शिवाजी महाराजांची राजधानी. त्या राजधानीचे नाव या परिसराला दिले आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त होते त्यांनी शिवाजी महाराजांची आरती सुद्धा लिहिली आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे साम्य सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मी समोर स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली होती. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आग्र्याहून सुटका करून घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी जहाजातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनीही  शत्रूला भूलवण्यासाठी पत्रे लिहिली होती असे बरेचसे साम्य दोघांच्या जीवनात आपल्याला आढळते. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असल्यामुळे अनेकांशी बोलणे झाले. काही खामगांव सोडून गेलेल्या मित्रांशी सोबत मित्रांशी सुद्धा बोलणे झाले त्यात अनेकांनी सावरकरांचे असे स्मारक झाले तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे असे म्हटले तसेच काहींनी स्मारका सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ग्रंथसंपदेचे एक ग्रंथालय सुद्धा असावे असे मत व्यक्त केले तर काहींनी याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध रोमहर्षक प्रसंगांच्या चित्रांचे सुद्धा एक दालन असावे असेही मत व्यक्त केले. खामगांव शहरात अनेक सावरकरप्रेमी आहेत या सर्वांचे मत सुद्धा या निमित्ताने घेण्यात यावे. सावरकरांच्या स्मारकाला सनदशीर मार्गाने परवानगी मिळाल्यावर पुतळा बांधकाम हे सुद्धा भव्य व उत्कृष्ट असावे, पुतळ्यावर एक छत्री सुद्धा असावी. सावरकरांचे काम भव्य दिव्य होते त्यांचा पुतळा पाहिल्यावर पाहणाऱ्याचे रोम रोम फुलले पाहिजे, त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले पाहिजे, सावरकरांचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे या प्रकारचे ते स्मारक असावे.

 विश्व हिंदू परिषदेने केलेल्या सावरकरांच्या स्मारकाच्या मागणीच्या अनुषंगाने खामगांवला व त्यातही रायगड कॉलनी परिसरात सावरकरांचे स्मारक कधी झाले तर ते खामगांवकर व युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

२१/०५/२०२६

Article about NEET paper leak and old movie Tere Mere Sapne

  नीट परीक्षा घोटाळा आणि  तेरे मेरे सपने 




 नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुट प्रकरणाने  तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणारे या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे,जनतेचे सहकार्य मिळावे,पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे तेरे मेरे सपने नाहीत का ?

     नीट परीक्षा 2026 पेपर फूट आणि घोटाळा  प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. काही नामांकित अशा क्लासेसचे संचालक तसेच मोठ्या नामांकित अशा महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच अनेक मध्यस्थी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वीही नीट परीक्षा घोटाळा हा बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवण्याच्या संदर्भात उघडकीस आला होता परंतु ते प्रकरण दाबले गेले. लाखो रुपये फी घेऊन आणि पेपर मिळवून देणाऱ्या पुन्हा लाखो रुपये घेऊन डॉक्टर बनवून देणाऱ्या गब्बर क्लासेसवाल्यांच्या माध्यमातून डॉक्टर बनणारे विद्यार्थी पेशंटचे काय भले करणार ? पेशंटला काय बरे करणार ? लाखो रुपये खर्च केल्यावर पहिले तर ते लाखो रुपये कसे काय वसूल होतील ? यामागे हे डॉक्टर लोक धावतील किंबहुना धावतही आहे हे कोणीही कोणीही सांगेल (काही सन्माननीय अपवाद अवश्य आहेत.) आजकाल सर्व विद्यार्थी केवळ डॉक्टर आणि इंजिनियर याच क्षेत्राकडे धाव घेत आहे. पालकांनाही कसेही करून मारून - मुटकून आपल्या पाल्याला डॉक्टरच करायचे आहे मग त्याची इच्छा बौद्धिक पातळी असो वा नसो. यासाठी प्रसंगी त्याला विदेशात सुद्धा पाठवले जाते. डॉक्टर बना इंजिनियर बना, जरूर बना परंतु जी शपथ तुम्ही डॉक्टर बनवण्याच्या वेळी घेता ती शपथ ध्यानात ठेवा, चांगल्या मार्गाने आणि सेवेसाठी डॉक्टर बना अशा वाम मार्गाने बनत असाल तर त्यापेक्षा न बनलेले बरे.

नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळा या विचारात असतांनाच जुन्या एका चित्रपटाची बातमी वाचनात आली. 13 मे रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनास 55 वर्षे झाली. हा चित्रपट म्हणजे नवकेतनचा “तेरे मेरे सपने”. हा चित्रपट म्हणजे एका डॉक्टरचीच कहाणी आहे. म्हणून याच विषयावर लिहिण्याचे नक्की केले शिवाय नुकताच जागतिक रुग्ण सेविका दिन सुद्धा झाला म्हणून मग लिहू लागलो. तेरे मेरे सपने माझ्या जन्माच्याही आधी प्रदर्शित झालेला सिनेमा आहे परंतू जुन्या चित्रपटांची, गाण्यांची, सुमधुर संगीताची आवड असल्याने मी लिहिता झालो. खुप वर्षांपूर्वी एका कडक उन्हाळ्यातील दुपारी मी हा चित्रपट दुरदर्शनवर पाहिला होता. यातील कर्णसुखद अशा संगीताने व गीतांनी विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यातील त्या दुपारी मला सुखद गारवा मिळाला होता. एस.डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलीली एकापेक्षा एक अशी नीरज यांची अवीट मधुर गीते आज 2026 मध्येही तितकीच ताजी आहेत जितकी 1971 मध्ये होती. एका तरुण कन्येस अनुरूप असा जोडीदार मिळाल्यावर, अनुरागामुळे तीच्यात तिलाच जाणवलेला बदल व्यक्त करणारे “जैसे राधाने माला जपी श्यामकी”, नवीन जोडप्याच्या आजीवन सोबत राहण्याची भावना व्यक्त करणारे “हे मैने कसम ली”, नवपरिणीत जोडप्याच्या जीवनवेलीवर जेंव्हा एक फुल उमलणार असते तेंव्हा त्यांच्या मनातील विचार मांडणारे “जीवन की बगीयाँ महकेगी” अशा कवी गोपालदास नीरज या देव आनंदचेच “फाईंड” असलेल्या सुमधुर रचना रसिकांना कर्णतृप्तीचा आनंद देतात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांबरोबर चित्रपटात वैद्यकीय व्यवसाय कशासाठी करावा ? हा संदेश हा चित्रपट देतो. 

 डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रास समर्पित असा हा विजय आनंद या प्रथितयश दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात जाऊन तेथील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे आदर्शवादी डॉ आनंद कुमार (देव आनंद) ठरवतो ( असे ध्येय प्रत्यक्ष जीवनात लाखोतून एखादा वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी ठरवत असावा.) त्याच्या या निर्णयावर समाजाची प्रतिक्रिया , टोमणे हे अगदी मार्मिकपणे दाखवणारा हा सिनेमा आहे. एका कोळशाच्या खाणीलगतच्या गावात हा डॉक्टर सेवा देण्यास जातो. याच गावात डॉ प्रसाद हे 35 वर्षांपूर्वीच आलेले असतात त्यांच्याकडे डॉ. आनंद रुजू होतो. डॉ आ


नंदच्याही 
35 वर्षे आधी या गावात आलेल्या डॉक्टरला परिस्थितीत काही विशेष बदल झालेला आहे असे वाटत नसल्याचे ते व्यक्त करतात. पुढे निशा (मुमताज) ही आनंदच्या जीवनात येते , अनेक रुग्ण, अपु-या वैद्यकीय व्यवस्था हे सर्व चित्र पाहून तो व्यथीत होतो, खेडेगावात रुग्णसेवेसाठी आलेल्या या डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या अपघातास जबाबदार असलेला आरोपी जेंव्हा लाच देऊन सुटतो त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  पुन्हा शहराकडे जावे लागते. या कथेत इतरही अनेक वळणे आहेत. पण सेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा मुख्य संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास काल 55 वर्षे पुर्ण झाली. हा चित्रपट ए. जे. क्रॉनीन यांच्या “सिटाडेल” या कथेवर आधारीत आहे. 

55 वर्षापुर्वीच्या अपु-या वैद्यकीय सुविधा , ग्रामीण रुग्णांचे होणारे हाल यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. चित्रपटात वैद्यकीय सुविधांची परिस्थिती 35 वर्षांपासून बदलेली नाही असा संवाद आहे. म्हणजे ती 35 व चित्रपट प्रदर्शित होऊन झालेली 55 अशा 90 वर्षांपासून आपण तिथेच आहोत का ? पैशांसाठी रुग्णांची अडवणूक, पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि रुग्णालयांच्या कित्येक बातम्या रोज येत असतात .

म्हणूनच तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणा-या या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत.  सुमार्गाने व्हावे घोटाळे करून नव्हे,  पेपर फोडून नव्हे. डॉक्टर बनले पाहिजे तर ते सेवेसाठी, आपल्या देशाला वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेण्यासाठी, ग्रामीण आदिवासी भागात जाऊन तेथील रुग्णांना तपासण्यासाठी. घोटाळे, फुटलेले पेपर देऊन मग पास होऊन  डॉक्टर बनणारे लोक काय कामाचे ? 

या देशात बुद्धिमान, सुमार्गाने पास होणारे  सेवाभावी असे डॉक्टर बनावे त्यांना शासनाचे व जनतेचे सहकार्य मिळावे, पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?

(2021 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची दुसरी आवृत्ती)

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगाव




१३/०५/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar Part 2

आठवणी नानाशास्त्रींच्या 

"हरीमामा" - भाग २

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य, परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या व त्यांच्या काही मित्रांच्या तसेच किस्स्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.

या मालिकेचा पहिला एक भाग प्रकाशित होऊन एक महिना उलटून गेला. दुसरा भाग तयार होता खरा पण            कार्यबाहुल्ल्यामुळे त्याला finishing touch देणे काही होत नव्हते. शेवटी आज हे कार्य पुर्णत्वास नेण्याचे ठरवूनच टाकले. त्यामुळे आता आज हा लेख प्रकाशित होईलच.

     ही आठवण तशी या मालिकेच्या पहिल्या लेखाच्या आधीची पण जलंबला प्रत्यक्ष गेल्याने प्रथम तेथील आठवणी लिहिल्या गेल्या आणि ते योग्यही झाले. वास्तविक पाहता आजचा हा दुसरा लेख मला नानाशास्त्री, त्यांचे मित्र, त्यांनी भेटी दिलेली छोटी-छोटी गावे यांची आठवण करून देणारा पहिला लेख होता, आज तो या मालिकेच्या दुसऱ्या क्रमांकावर सादर करीत आहे. शिवाय नानाशास्त्रींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा मी इयत्ता सहावीत होतो त्यामुळे मला स्मरण होतील तेवढ्या त्यांच्या आणि त्यांचे मित्र आदींच्या आठवणी या मालिकेत सादर करण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

      फेब्रुवारी 26 ची ती संध्याकाळ, निश्चित तारीख काही लक्षात नाही. माझ्या सासूबाईंना भेटण्यासाठी म्हणून सिल्वरसिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आयसीयू मध्ये जाता येईल या अनुषंगाने आयसीयू मधील पेशंटला भेटण्याच्या रुग्णालयाच्या निर्धारित वेळेवर मी गेलो होतो. मोठमोठ्या रुग्णालयाचे कर्मचारी, स्वागत कक्षातील कर्मचारी रुग्णाच्या नातेवाईकांशी अशा पद्धतीने वागतात, बोलतात त्यावरून सौजन्यपूर्वक वागणूक कशी नसते हे कळते. आयसीयू मध्ये गेल्यावर आणि सासूबाईंना भेटल्यानंतर तिथे एक 96 वर्षाचे गृहस्थ सुद्धा दाखल असल्याचे मला दिसले. त्यांच्यासाठी म्हणून त्यांचा साठीच्या घरात असलेला त्यांचा पुत्र सुद्धा होता. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राच्या आईला त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी म्हणून पुन्हा गेलो तर तो साठीतला गृहस्थ त्याच्या भावंडासमवेत आयसीयूच्या बाहेर खुर्चीवर बसलेला दिसला. इस्पितळात गेल्यावर लोकांचे उदास, केविलवाणे, चिंताग्रस्त, भयग्रस्त असे चेहरे पाहून मला सुद्धा बेचैन वाटत असते म्हणून मी कित्येकदा रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संवाद साधत असतो. त्यामुळे कालच्या त्या आयसीयू मधील वृद्ध गृहस्थाच्या मुलाशी मी सहज तब्येतीची चौकशी केली तेव्हा त्याने ठीक आहे म्हणून म्हटले. त्यानंतर कोण, कुठले म्हणून विचारपूस झाली. त्यांना त्यांचे गाव विचारले असता लांजूड असे ते उत्तरले. लांजूड येथे राहणारे ते धुमाळे बंधू होतें. 

धुमाळे बंधू, लांजूड 

लांजूड हे नाव ऐकताच कळ दाबल्याबरोबर गोळीला बंदुकीतून  सुटण्यास जसा एक क्षणही लागत नाही तसा मी क्षणात गतकाळात गेलो मला माझे आजोबा नानाशास्त्री, त्यांचे मित्र, त्यांनी भेटी दिलेली छोटी-छोटी खेडी, परवानाधारक शिकारी असल्याने त्यांनी केलेल्या शिकारींचे किस्से आठवू लागले. खामगांव-नांदुरा रोडवर खामगांव पासून आठ किमी अंतरावर लांजूड फाटा आहे. लांजूड मला लहानपणापासून ठाऊक होते पण लांजूडचे हे दहा-बारा किमीचे अंतर गाठण्यास मात्र मला चाळीशी पार करावी लागली. दहा-बारा वर्षांपूर्वी जेव्हा लांजूडला गेलो होतो तेंव्हा फाट्यापासून लांजूडपर्यंत जाणारा  सपाट जमिनीचा, दोन्ही बाजूस काळीशार जमीन,  चांगली शेती असलेला असा तो रस्ता आणि लांजूड गांव माझ्या मनात बसले होते. त्यावेळी मी माझ्या कामाने लांजूडला गेलो होतो. हरी मामांच्या घरी सुद्धा गेलो होतो.

      "काय साहेब कोणत्या विचारात पडले ?" त्या माणसाच्या या प्रश्नावरून मी पुन्हा भानावर आलो आणि त्यांना म्हटले हरी मामा कोळी ना ओळखता का ? "हाव" ते गृहस्थ उत्तरले. "तुम्ही कसं काय वळखता त्याइले?" मला उद्देशून त्यांनी प्रश्न केला. "ते शिकारी होते न ?" असा प्रश्न मी त्यांना करताच त्यांनी दोन क्षण मला न्याहाळले आणि म्हणाले "तुम्ही नानाशास्त्रीचे कोन?" त्यांनी एकदम माझ्या आजोबांचे नाव काढल्यामुळे मला आनंद झाला, आश्चर्यही वाटले. दवाखान्यात भरती असलेल्या त्यांच्या 96 वर्षीय  वडिलांच्या तोंडून त्यांनी माझे आजोबा नानाशास्त्री यांचे वर्णन, नाव आणि किस्से ऐकले होते. मग हरी मामा, त्यांचा मुलगा लक्ष्मण काका यांच्या आठवणी निघाल्या. 

        माझ्या डोळ्यासमोर हरी मामा उभे राहिले. काळाशार वर्ण, डोक्याला फेटा, मजबूत बांधा, करारी चेहरा, धोतर त्यावर कुर्ता, पायात जोडा, असे हरी मामा मला स्पष्ट आठवले. त्यांना माझ्या आजीने भाऊ मानले होते म्हणून आम्ही सर्व त्यांना हरी मामा म्हणत असू. ते आमच्याकडे आले की अंगणात खुर्ची असूनही जमिनीवरच बसत. आजोबा पूजादी कार्यात व्यस्त असले की ते त्यांच्या सदऱ्याच्या खिशातून कागदी वेष्टण असलेले बिडीचे पाकीट काढत आणि बीडीचे झुरके मारत बसत. मग आई किंवा काकू त्यांचा चहा ठेवत असे. थरथरत्या हातानी चहा पितांना हरी मामांची भरदार मिशी चहात बुडत असे. त्यांचा हात इतका थरथर कापत असे की आम्हा लहान मुलांना बशी पडते की काय असे वाटत असे. मग ते आम्हाला शिकारीच्या गोष्टी सांगत आम्ही त्यांच्याशी काही बोललो की ते ''होजी"  किंवा "जीहो" असे म्हणून प्रतिसाद देत असत. हरी मामा भालाफेकी मध्ये खूप निष्णात होते. अचूक नेम धरून त्यांनी भाला फेकला की रानडुक्कर पडलेच म्हणून समजा. असे माझे आजोबा सांगत असत. हरी मामांच्या आठवणीमुळे मी काही काळ स्तब्ध होतो.  

हरी मामा AI इमेज 

        "भाऊ आजकाल कोणी कोणाशी बोलत नाही तुम्ही बोलले म्हणून वळख निघाली" या धुमाळे यांच्या वाक्याने मी पुन्हा भानावर आलो. त्यांच्या वडिलांची प्रकृती बरी व्हावी म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. "लांजुड ले ये जा"  ते म्हणाले. धुमाळे यांच्याशी दवाखान्यात चार आपुलकीचे शब्द बोलल्यावर असा परिचय निघाला. नानाशास्त्रींनी सुद्धा अशीच आपुलकीची माणसे जोडली होती. आमचे आजोबा नानाशास्त्री, हरी मामा, लांजूड या आठवणी घेऊन मी रुग्णालयातून बाहेर पडलो. शेजारच्या चहाच्या दुकानातल्या रेडिओवर गीताच्या ओळी वाजत होत्या 

आते है लोग, जाते है लोग 

पानी  पे जैसे रेले 

जाने के बाद आते है याद 

गुजरे हुए वो मेले.....

... पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव


२६/०४/२०२६

Demanding Adhaar Card everywhere is really essential ?

 आधार कार्डचा अनावश्यक अट्टाहास

वर्ग सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बऱ्याच ठिकाणी ऐन वेळेवर आधार कार्ड घेऊन जाण्यास सांगितले ते खरोखर आवश्यक आहे का ? आधार कार्डच्या बाबतीत फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावर अथवा कपाळावरच आधार कार्ड नंबरचा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

आज वर्ग सातवीची महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. खामगावच्या विविध केंद्रांवर शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहे. परीक्षेस आवेदन करतांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरची माहिती अपलोड केली जाते शिवाय आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा घेतली जाते. शासनाने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वितरित केले जाते.  हे प्रवेश पत्र परीक्षेच्या केंद्रावर प्रवेश करण्यास आवश्यक तो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला म्हणजेच तो त्याच्या शाळेचा अधिकृत विद्यार्थी आहे, त्याने त्या शाळेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे,  त्या शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याला जी जी कागदपत्रे सांगितली आहे ती त्याने त्या शाळेत सादर केलेली आहे हे स्पष्ट आहे. तरीही ऐन शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना असे सूचित करण्यात आले की परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रवेशपत्रावर मात्र परीक्षेसाठी आधार कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे अशी कोणत्याही स्वरूपाची सूचना दिलेली नाही. तरीही काही शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे असे ऐनवेळी विद्यार्थ्यांना सूचित केले. ही सूचना मिळेपावेतो अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून सुद्धा दिले होते. ऐनवेळी सूचना प्राप्त झाल्यावर आपल्या पाल्य परीक्षेपासून वंचित न राहावा या काळजीने काही पालक घरी येऊन पुन्हा आधार कार्ड आधार कार्डची  झेरॉक्स घेऊन खामगावच्या रणरणत्या उन्हात, 42 डिग्री च्या तापमानात पुन्हा परीक्षा केंद्रावर गेले तेथे उपस्थित शिक्षकांना आधार कार्ड झेरॉक्स दिली असता,  "दिले तर चालेल" असे त्यांचे विधान होते म्हणजे निश्चित असे काही नाही तुम्ही आधार कार्ड आणले तर चालेल नाही आणले तर नाही तरी चालेल असाच त्यांचा अर्थ होता. म्हणजे एक स्पष्ट अशी सूचना दिली जात नाही आणि त्याने विद्यार्थी व पालकांची harrashment होते. 

    आज-काल जिथे नाही तिथे आधार कार्ड मागितले जाते. काही ठिकाणी स्पष्ट समजत असते की तो व्यक्ती अधिकृत ग्राहक आहे विद्यार्थी आहे. शिवाय तो व्यक्ती अधिकृततेचे  स्पष्ट होणारे सबळ पुरावे सुद्धा त्याच्याजवळ असतात पण तरीही आधार कार्डचा आग्रह धरला जातो. हे योग्य नाही. सर्वच क्षेत्रातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा आणि आवश्यक तेथेच आणि खरोखर जरुरी असल्यास आधार कार्डची मागणी करावी. या देशात घुसखोर येऊन राहतात, नोकऱ्या मिळवतात त्यांना काही होत नाही आणि अधिकृत नागरिकांना मात्र नाहक त्रास दिला जातो हा किती मोठा विरोधाभास आहे. आधार कार्डच्या बाबतीत तर फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावरच नाहीतर कपाळावर आधार कार्ड नंबर चा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

या लेखाद्वारे हेच सांगणे अभिप्रेत आहे की सर्व कागदपत्रांची शहानिशा झालेली असल्यावर विनाकारण आधार कार्डचा अट्टाहास करू नये. आधार कार्ड संबंधित समस्त प्रणाली व अधिकाऱ्यांनी याबाबतीत विचार करावा व तसे निर्देश सर्व खात्यांना देण्यात यावे. 

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव


०२/०४/२०२६

Article about memories of Hanuman janmotsav and bhandara

आठवणी हनुमान  जन्मोत्सवाच्या


गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. 

 आज हनुमान जन्मोत्सव.  1990 च्या सुमारास आमच्या रहिवासी भागात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. गल्लीतील नागरिकांच्या घरी, गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. रोडग्यांसाठी तयार केलेल्या केल्या जाणाऱ्या आहारासाठी गौऱ्या गोळा करून आणण्याची एक गंमत होती. त्यासाठी एक पथक रवाना होत असे. वाचकांपैकी या पथकात जे लोक गेलेले आहेत त्यांना त्या गोष्टीचे स्मरण होऊन नक्कीच हसू आले असेल. दुसऱ्या दिवशी भंडारा झाल्यानंतर भांडी घासण्याचा एक मोठा कंटाळवाणा कार्यक्रम होत असे. जेवण झाल्यानंतर भांडे घासण्याचा मला तरी अतिशय कंटाळा येत असे परंतु तरी सर्वजण मिळून भांडी घासत असत. एक माणूस उभे राहणे तर दूर कसाबसा बसू शकेल असे ते मंदिर होते एकदम साधे. "सबके लिए खुला है मंदिर ये हमारा" या तुकडोजी महाराजांच्या गीताप्रमाणे त्या मंदिराचे होते कुणीही या, केंव्हाही या आणि दर्शन घ्या, आपापल्या परीने बजरंगाची पूजा करा अन् जा. त्या हनुमान मंदिरामध्ये कुणाला कठीण वाटतील असे विशेष काही नियम, बंधन, नियमावली नव्हती परंतु हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मात्र सर्वजण एकत्र येत असत. रोडगे बनवण्यासाठी प्रमोद पाटील, स्व. मुकुंदा, पंचायत समिती निवासस्थानात राहणारे महादेव भाऊ हे लोक तज्ञ होते. मी त्यांना फक्त गोळे तयार करून देत असे. एक सुनील नामक मुलगा दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आमच्या गल्लीत दिसत असे इतर वेळी मात्र तो कुठेच दिसत नसे. तो कुठे राहायचा , कोणाचा मित्र होता, आमच्या गल्लीत का यायचा हे मला खूप वर्षे कळलेच नव्हते. रात्रभर जागल्यानंतर सुद्धा पुन्हा सकाळी सहा वाजता सर्वजण जन्मोत्सवासाठी हजर असत. पण हळूहळू सर्व मंडळी आपापल्या व्यापात मग्न होतील. सर्वांची लग्न झाली, मुले झाली आपापल्या संसारात सर्व मग्न झाले आणि हनुमान जन्मोत्सवाचा तो साध्यासुध्या पद्धतीचा भंडारा होणे बंद झाले. जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त बरेच जण हनुमंताची पूजा आदी करीत असे, मंदिर साफसफाई करीत असे. माझे वडील तर मंदिराचा परिसर रोज झाडत होते. भंडारा होणे बंद झाल्यावर  हनुमान मंदिर दुर्लक्षित झाले. आज आमच्या वेटाळात लोकसहभागातून नवीन शिवमंदिर उभारले आहे. प्रदीप मिश्रा यांच्या व्यापक आवाहनानंतर सध्या भोळे शंकर हे टॉपवर आलेले देव आहे. 'एक लोटा जल' या आवाहनाने शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली आहे. देव तर सर्व सारखेच आहे. सर्व देव त्यांच्या भक्तांचे भलेच करणार. असो ! आपल्या देशातील लोक भोळे आहेत देवभोळे आहेत कुणी काही आवाहन केले की ते लगेच स्विकारतात परंतु स्वतः भगवंतांनी दिलेला संदेश मात्र विसरतात.  स्वतः भगवंतांनी गीतेत म्हटले आहे

 आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | 

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

अर्थात ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे जल समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूलाच जाऊन मिळतो. 

या अर्थाने तुम्ही कोणत्याही देवाची आराधना केली तरी ती शेवटी विष्णूलाच अर्पण होत असते.

    आमच्या भागात हनुमान जन्मोत्सवाच्या काळात थोडा 'सुकून' होता, प्रत्येकाकडे वेळ असे, ट्युशन क्लासेस यांचे एवढे प्रस्थ नव्हते त्यामुळे सर्व एकत्र येत असत आणि सर्वांनुमते सर्व सहमतीने कार्यक्रम पार पडत असत. अमुक एक गोष्ट अशीच झाली पाहिजे आणि तशीच झाली पाहिजे असे काही बंधन नव्हते. "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" या ओळीनुसार आपापल्या भावानुसार सर्वजण हनुमंताचे दर्शन घेत असे. 

    आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या बाबी स्मरण झाल्या. तशा त्या प्रत्येकच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी स्मरण होत असतात म्हणा ! पण आज त्यावर लिहावेसे वाटले. लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आल्यावर आपापल्या परीने लोक दानधर्म करतात, काही लोक मंदिर उभारणीच्या बांधकामादी कार्यामध्ये सक्रिय सहभाग देतात. स्वतःचे घर तर सर्वजण बांधतात परंतु ईश्वराचे घर बांधणे, त्यासाठी निधी देणे पुण्यवंताच्याच भाग्यात असते. अशातून सुंदर, भव्य मंदिर निर्माण होते. याच प्रकारे आपल्या वेटाळात सुद्धा उभे राहिले आहे. शोले सिनेमात एक संवाद आहे "समाज और बिरादरी तो इंसान को अकेलेपन से छुडाने के लिए बनाई गई है, उसे अकेला रखने के लिए नही |" त्याचप्रमाणे मंदिरेही आपल्या बांधवांना एकत्र आणण्याचे एक ठिकाण आहे.

   आमच्या वेटाळात झालेले नवीन शिव मंदिर सुद्धा जुन्या हनुमान मंदिरप्रमाणे सर्वांना कायम एकत्रित ठेवेल, जिथे सर्व सहमतीने, सर्व सहभागाने आपापल्या भक्तिभावाने सर्वजण एकत्र येत राहतील, पुन्हा तसे हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी होणारे साधेसुधे भंडारे आयोजित होतील हिच आशा व  ईश्वरचरणी प्रार्थना.

०१/०४/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar

आठवणी नानाशास्त्रींच्या 

जलंब - भाग १ 

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य व परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.


नानाशास्त्री वरणगांवकर यांचा वाडा या ठिकाणी होता.

सुवर्ण व्यवसायी वर्मा यांचे जलंब मधील 1922 मध्ये सुरू केलेले दुकान.

नानाशास्त्री वरणगांवकर यांच्या जागेचे सध्याचे मालक
श्री घोपे काका 

काही जुनी, काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे, चुलत्यांचे, आत्याचे, बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार  माझ्या डोक्यात येत होते. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो.

"जलंब ग्रामाबद्दल मला बालपणापासून जिव्हाळा, आकर्षण आहे." जलंबला हिंदू संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून गेलो असता व्याख्यानाच्या सुरुवातीलाच वरील वाक्य आपसूकच माझ्या मुखातून निघाले. त्याचे कारण माझे आजोबा वैद्य दत्तात्रय रामचंद्र वरणगांवकर हे सुमारे 1940-50 च्या दशकात जलंबला वास्तव्यास होते, वैद्य असल्याने जलंब, खामगांव परिसरात ते नानाशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. व्याख्यानापुर्वी हनुमान मंदिराच्या जवळच राहणाऱ्या वानखेडे यांच्याकडे आम्हाला चहापाण्यास आमंत्रित केले होते. पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आहे की एखादे जुने गांव, जुनी वास्तू दिसली की एखादा जुना मित्र भेटला की जसा आनंद होतो तसा आनंद वाटत असतो. जलंबला आलो असल्याने माझ्या मनात सुद्धा मला माझे वाडवडील राहत असलेली जुनी वास्तू बघण्याची तीव्र इच्छा जागृत झाली असल्याने मी अनिल भाऊ यांचे जवळ माझे आजोबा इथे राहिलेले आहे, इथे आमचे घर होते, ते मला पाहायचे आहे असे सांगताच त्यांनी त्यांच्या वृद्ध वडीलांना विचारल्यावर त्यांचे वडिलांनी नानाशास्त्री वरणगांवकर कुठे राहत होते आणि आता तिथे कोण राहते ते सांगितले. तरी खात्रीसाठी म्हणून अनिल वानखेडे मला म्हणाले चला आता आमच्या गावाची इत्यंभूत माहिती असलेल्या "सायंटिस्ट"कडे घेऊन जातो. सायंटिस्ट म्हणजे खूप माहिती असलेले असे त्यांचे म्हणणे होते हे कळायला मला वेळ नाही लागला. त्यांच्या काकांकडे ते घेऊन गेले. माझे आजोबा जलंबला राहत होते हे म्हटल्यावर काही वेळातच त्यांना मी आपलासा वाटू लागलो. ते माझ्या सोबत अनवाणीच निघाले, मी त्यांना चप्पल घाला असे म्हटल्यावरही त्यांना मला माझ्या पूर्वजांचा वाडा दाखवण्याची घाई झाली होती, जलंबशी माझे नाते असल्याचे पाहून मी त्यांचा ग्राम बंधू वाटल्याने त्यांच्या अंगी सुद्धा उत्साह संचारलेला दिसला. वानखेडे यांच्या काकांना नानाशास्त्री म्हटल्याबरोबर "नानाशास्त्री काय भारदस्त माणूस होता. मी त्यांना पाहिलेले आहे. मोठ्या मिशा, चहे-यावर तेज, टोपी, गोरापान वर्ण, उंचेपुरे. जलंब गावात असा रुबाबदार माणूस एकच होता. त्यांच्याकडे बंदूक होती, नेमबाज. होते, परवाना धारक शिकारी तर होतेच, शिवाय वैद्य होते" एका दमात काकांनी माझ्या आजोबांचे वर्णन केले. ते तसेच होते. मी नानाशास्त्रींचा नातू आहे असे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला त्यांनी कौतुक सुद्धा केले, चहापाण्याचा खूप आग्रह केला परंतु वेळ कमी असल्याने फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही वाड्याच्या दिशेने जाऊ लागलो. काही जुनी तर काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे,  चुलत्यांचे, आत्याचे बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार माझ्या डोक्यात येत होते. माझी आत्या सांगत असे की आजोबा त्यांना खामगांवला खेळ (सिनेमा) पाहण्यासाठी बैलगाडीत घेऊन येत असत आणि अंजुमन शाळेच्या चारमिनार जवळ ते शिदोरी खात असत. हे मला आठवले. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो. खुप वर्षांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत जलंबला गेलो होतो. त्याचे वडील सुद्धा जलंबला राहत असत. ते माझ्या वडिलांचे बालमित्र होते. म्हणून आम्ही दोघे त्यावेळी जलंबला गेले होतो. त्यावेळी ते घर आजोबांच्या वेळी जसे होते तसेच होते पण आता मात्र ज्यांच्या मालकीचे ते घर आहे त्यांनी बरेच बदल केले आहे. मी नानाशास्त्रींचा नातू आहे हे ऐकल्यावर आमच्या घराचे आताचे मालक घोपे काका यांनी आमचे खूप आदराने स्वागत केले. घोपे काकांनी तर मला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि नानाशास्त्री यांचा मळा सुद्धा दाखवण्याचे आश्वासन दिले. तो मळा अजूनही तसाच आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. माझा जलंब गावाशी अगदी जुजबी संबंध, कधीकाळी आजोबांनी वास्तव्य केलेले पण आजही त्या गावात एवढे  प्रेम, माया, आपुलकी, आदर कसे काय मिळत होते ? तर जे पेराल ते उगवते या उक्ती नुसार माझ्या आजोबांनी येथे लोकांना चांगली वैद्यकीय सेवा दिली होती, आपुलकीने आयुर्वेदिक औषधे दिली होती, वन्यप्राण्यांच्या संकटातून त्यांना वाचवले होते त्यामुळे आजही त्यांचे नांव अनेक ज्येष्ठ जलंब ग्रामवासी जाणून आहे. तीन वेळ संध्या,  नित्यपूजा आणि गणपतीवर नितांत भक्ती असणा-या  माझ्या आजोबांनी काय कमवून ठेवले ते मला कळले. 

     माझे व्याख्यान चांगले झाले, परतीच्या प्रवासात माझ्या मनात जलंब भेटीमुळे आजोबांच्या अनेक स्मृती तरळत होत्या.  त्यात मला आजोबांचे मित्र त्यांनी भेटी दिलेली छोटी छोटी गांवे आठवली त्यातले एक लांजूड गांव आठवले. पण तूर्तास एवढेच लांजूडचा  किस्सा व इतर आठवणी या लेख मालिकेत  लवकरच वाचायला मिळतील.

  रामदास स्वामींनी सांगितले आहे की, पूर्वजांची कीर्ती सांगत बसण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. पण संत वचन माहित असूनही  वडीलांची अर्थात पूर्वजांची किर्ती, स्मरण या व आगामी काही लेखातून वाचकांना काही प्रेरणा मिळेल या हेतूने लिहित आहे.

...ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव