दुल्हा बिकता है
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
ये जो संसार है चोर बाजार है
धोखा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दुल्हा बिकता है या चित्रपटातील हे उपरोक्त शीर्षक गीत अनेक वेळा आठवले आणि समाजात अनेक वर्षापासून चालत आलेली हुंडा प्रथा, वधूचा छळ, हुंडाबळी अशी दुल्हा बिकता है ची स्थिती आजच्या बदललेल्या भारतातही कायमच असल्याचे जाणवले.
गेल्या काही दिवसापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडून भरमसाठ असा हुंडा वस्तू, रोख आणि सोन्याच्या रूपात वसूल केला. यामध्ये आलिशान फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोने यांचा समावेश आहे. गौहर कानपुरी यांनी 1980 च्या दशकात रचलेल्या खालील ओळी किती समर्पक आहेत बघा
वधू, घर, जमीन हे सगळे प्रथेच्या, धर्माच्या नावाखाली मागून नात्यांचा व्यापार केला जातो. आज समाज एवढा पुढे गेला असतांनाही, स्त्रिया विविध क्षेत्रात पुढे गेल्या असतांनाही वैष्णवी सारख्या स्त्रीला सासरच्या जाचामुळे आत्महत्या करावी लागते आणि तिच्या मोठ्या जावेलाही तसाच त्रास सहन करावा लागतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. विवाह ठरल्यावर कुटुंबात किती आनंद असतो, वधूच्या मनी किती स्वप्ने असतात. पण जेंव्हा सासरची मंडळी जाच देतात तेंव्हा कवी गौहर कानपुरी यांना सनई जणू ओरडते आहे वाटते, डोली त्यांना वेश बदललेली अर्थी वाटते आणि बरेचदा दुर्दैवाने तसेच घडत सुद्धा असते.
पोटची मुलगी नेहमीसाठी दूर जाणार म्हणून आई बिचारी रडत असते, बाप पोरीच्या सुखासाठी देवाची करुणा भाकत असतो. वैष्णवीचे सुद्धा असेच झाले आधी आवडत्या मुलाच्या घरी तिची डोली तर गेली पण काही दिवसातच अर्थी सुद्धा निघाली.
आज कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे किंबहुना असे म्हटले तर हरकत नाही की कायदा इतका काही स्त्रियांच्या बाजूने आहे झाला आहे की पत्नी पिडित पतींची संघटना सुद्धा स्थापन झाली आहे. पतीला मारून टाकून त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने टाकीत बंद करून टाकणा-या निष्ठूर बायका आहे. यवतमाळच्या जंगलात पतीला जाळून मारणा-या स्त्री सारख्या स्त्रिया सुद्धा अनेक आहेत. हे वास्तव सुद्धा नाकारता येणार नाही.
पण कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली ? तर हगवणेसारखे मोठमोठे लागेबांधे असलेले अनेक दबंग कुटुंब आजही स्त्रियांवर अत्याचार करत असतात. त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना आजही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वैष्णवी, मयुरी या दबंग हगवणेच्या अशाच शिकार झाल्या.
हुंडाबळी कधी बंद होणार ? 30-40 वर्षांपूर्वी हुंडाबळीच्या अनेक घटना घडल्या होत्या, आजही घडत आहेत याला काय म्हणावे ? याला अटकाव कसा होईल ? आजही हुंडा का द्यावा लागतो ? आजही फॉर्च्यूनर आणि 51 तोळे सोने देऊन नवरा मुलगा विकत का घ्यावा लागतो ? हुंडा न घेण्याचे प्रतिज्ञापत्र घेणे, आयकर नियमात हुंड्याबाबत काही करता येईल का ? यावर सरकारने विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या हगवणेसारख्या लोकांना हगवण लागेल अशा शिक्षा करणे आवश्यक आहे.
शेवटी आणखी एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते की, एरवी अनेक गोष्टींसाठी मोर्चे आंदोलने या महाराष्ट्रात होतात मग वैष्णवी आत्महत्या प्रकरणांमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, तोडफोड कशी काय झाली नाही ? ही सुद्धा तमाम महाराष्ट्र वासियांसाठी आश्चर्यजनक अशी बाब आहे.