Click "Follow" Button below To Follow this Blog

२९/०५/२०२५

Article about vaishanavi hagwane suicide.

 दुल्हा बिकता है 

कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली?

दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
ये जो संसार है चोर बाजार है
धोखा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दुल्हा बिकता है या चित्रपटातील हे उपरोक्त शीर्षक गीत अनेक वेळा आठवले आणि समाजात अनेक वर्षापासून चालत आलेली हुंडा प्रथा,  वधूचा छळ, हुंडाबळी अशी दुल्हा बिकता है ची स्थिती आजच्या बदललेल्या भारतातही कायमच असल्याचे जाणवले. 

     गेल्या काही दिवसापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडून भरमसाठ असा हुंडा वस्तू,  रोख आणि सोन्याच्या रूपात वसूल केला. यामध्ये आलिशान फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोने यांचा समावेश आहे. गौहर कानपुरी यांनी  1980 च्या दशकात रचलेल्या खालील ओळी किती समर्पक आहेत बघा

माल-ओ-जर भी मिले और मका दहेज मे
माँगते है जमी आस्मा दहेज मे
रिश्ते नातो के होते है सौदे यहा
पाँव पर गिर गयी पगड़िया दहेज मे
रस्म के नाम पे धर्म के नाम पे
दाता बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

वधू, घर, जमीन हे सगळे प्रथेच्या, धर्माच्या नावाखाली मागून नात्यांचा व्यापार केला जातो.  आज समाज एवढा पुढे गेला असतांनाही, स्त्रिया विविध क्षेत्रात पुढे गेल्या असतांनाही वैष्णवी सारख्या स्त्रीला सासरच्या जाचामुळे आत्महत्या करावी लागते आणि तिच्या मोठ्या जावेलाही तसाच त्रास सहन करावा लागतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. विवाह ठरल्यावर कुटुंबात किती आनंद असतो, वधूच्या मनी किती स्वप्ने असतात. पण जेंव्हा सासरची मंडळी जाच देतात तेंव्हा कवी गौहर कानपुरी यांना सनई जणू ओरडते आहे वाटते, डोली त्यांना वेश बदललेली अर्थी वाटते आणि बरेचदा दुर्दैवाने तसेच घडत सुद्धा असते.

चीखे शहनाई आगन से डोली चली
भेष बदले हुए जैसे अर्थी चली
बाप माँगे दुआ लाज रख ले खुदा
लाल जोड़े मे छुपके ग़रीबी चली
वक़्त है निर्दयी मा तो रोने लगी
परदा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

पोटची मुलगी नेहमीसाठी दूर जाणार म्हणून  आई बिचारी रडत असते, बाप पोरीच्या सुखासाठी देवाची करुणा भाकत असतो. वैष्णवीचे सुद्धा असेच झाले आधी आवडत्या मुलाच्या घरी तिची डोली तर गेली पण काही दिवसातच अर्थी सुद्धा निघाली.         

     आज कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे किंबहुना असे म्हटले तर हरकत नाही की कायदा इतका काही स्त्रियांच्या बाजूने आहे झाला आहे की पत्नी पिडित पतींची संघटना सुद्धा स्थापन झाली आहे. पतीला मारून टाकून त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने टाकीत बंद करून टाकणा-या निष्ठूर बायका आहे. यवतमाळच्या जंगलात पतीला जाळून मारणा-या स्त्री सारख्या स्त्रिया सुद्धा अनेक आहेत. हे वास्तव सुद्धा नाकारता येणार नाही. 

     पण कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली ? तर हगवणेसारखे मोठमोठे लागेबांधे असलेले अनेक दबंग कुटुंब आजही स्त्रियांवर अत्याचार करत असतात. त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना आजही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वैष्णवी, मयुरी या दबंग हगवणेच्या अशाच शिकार झाल्या.

     हुंडाबळी कधी बंद होणार ?  30-40 वर्षांपूर्वी हुंडाबळीच्या अनेक घटना घडल्या होत्या,  आजही घडत आहेत याला काय म्हणावे ?  याला अटकाव कसा होईल ? आजही हुंडा का द्यावा लागतो ? आजही फॉर्च्यूनर आणि 51 तोळे सोने देऊन नवरा मुलगा विकत का घ्यावा लागतो ? हुंडा न घेण्याचे प्रतिज्ञापत्र घेणे, आयकर नियमात हुंड्याबाबत काही करता येईल का ? यावर सरकारने विचार करणे अत्यावश्यक झाले आहे.  स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या हगवणेसारख्या लोकांना हगवण लागेल अशा शिक्षा करणे आवश्यक आहे.

कब तलक़ दुल्हनो की चढ़ेगी बली
मसली जाएगी कब तक ये नाज़ुक कली
ये है बेटी तेरी ये तेरी बहन है
राम गोपाल हो या शराफ़त अली
सब है बहरूपीए इनसे ये पूछिए
सपना बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
वैष्णवीसारख्या अशा आणखी किती मुलींचे बळी जाणार आहे ? किती अशा नाजूक कळ्यांना कुस्करल्या जाणार आहे ? सरकारने हगवणेसारख्या दबंग, हुंडा घेणाऱ्या, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना अशी काही चांगली अद्दल घडवली पाहिजे की, पुन्हा कुण्या वैष्णवीला आत्महत्या करावी लागणार नाही अशा काही उपाययोजना, कठोर नियमावली घालण्याची गरज झालेली आहे अन्यथा दुल्हा बिकता आहे प्रमाणे हुंडाबळी हे सर्व सुरूच राहील. 

      शेवटी आणखी एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते की, एरवी अनेक गोष्टींसाठी मोर्चे आंदोलने या महाराष्ट्रात होतात मग वैष्णवी आत्महत्या प्रकरणांमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, तोडफोड कशी काय झाली नाही ? ही सुद्धा तमाम महाराष्ट्र वासियांसाठी आश्चर्यजनक अशी बाब आहे.

२७/०५/२०२५

Small article about Sawarkar

मुलांना ओघवती भाषा कशी येईल ? 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या 142 व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. पु. ल. देशपांडे यांनी सावरकर पुण्यतिथी निमित्त 26 फेब्रुवारी 1983 रोजी अंदमान येथे दिलेल्या भाषणातील अंश येथे देत आहे.

सावरकरांनी किती त-हांची श्रीमंती आपल्याला दिली आहे. भाषेवरून मला आठवतंय सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो. ते आपल्याला माहिती नसतं. सुरुवातीला जेंव्हा ते आले, तेंव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली. परंतु ते सरकारी खात्यांनं रूढ केलेले शब्द नव्हते. तर एका प्रतिभावंत कवीनं रूढ केलेले शब्द होते. या दोनात फरक असतो ! 'मोले घातले रडाया' म्हणून सरकारात भाषाशुद्धीचे लोक बसवलेले असतात. इकडची डिक्शनरी घेऊन इकडे शब्द घाल, अस त्यांचा चालू असतं. पण हा प्रतिभासंपन्न कवी होता. 'रिपोर्टर'च भाषांतर करताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं. वार्तांच, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा,  तो वार्ताहर... इथे  प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते. आज महाराष्ट्र किंवा अगदी पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरीसुद्धा 'मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो. संपादक आणि वृत्तपत्रातील बाकीचे पदाधिकारी त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्द सावरकरांनी दिलेत. चित्रपटसृष्टीतल्या लोकांचे तर सगळे शब्द सावरकरच देत आहेत. दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला. संकलक हा शब्द त्यांनी दिला. अशा तऱ्हेनं त्यांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे.

     आजही जर मुलांना ओघवती भाषा शिकवायची असेल, त्यांचं बोलणं जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे निबंध रोज मोठ्याने वाचून घ्यावेत म्हणजे वैचारिकदृष्ट्याही तो मुलगा मोठा होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनंही तो मुलगा मोठा होईल.

👉प्रेम वैद्य यांच्या 'स्वातंत्र्यवीर' या 2007 च्या दिवाळी अंकातील अंदमानच्या कोठडीतून या  लेखावरून साभार.

👉 प्रेम वैद्य यांना उपरोक्त माहिती 'हिंदू अस्मिता' 16, एम.आय.जी. ( शॉप कम रेसिडेन्स ) नंदा नगर, मेन रोड इंदोर - 452011 दिनांक 16 मे 2000 च्या अंकातून प्राप्त झाली आहे.

संकलक - विनय वरणगांवकर

मुक्त पत्रकार तथा स्तंभलेखक , खामगांव


२२/०५/२०२५

36 banglow demolished in PuneLand mafia

36 बंगले जमीनदोस्त


खरेदी-विक्री, टाऊन प्लॅनिंग, महसूल विभाग अशा बांधकाम संबंधित कार्यालयात अवैध परवानगी देणाऱ्यांवर तसेच अवैध बांधकाम करणाऱ्या भू माफियांवर कठोर कारवाई करणे आवश्यक झाले. आहे नाहीतर या लोकांमुळे जंगले, नद्या, डोंगर लवकरच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.


     जमिनीसाठी मुंबई, पुणे तसेच इतरही अनेक शहरात अनेक गैरकायदेशीर कृत्ये घडली आहेत, घडत आहेत. येथे मोठ्या संख्येने भूमाफियांचे जाळे निर्माण झाले आहे. आदर्श घोटाळा हा सुद्धा सदनिकांच्या मोहातूनच घडला होता. आज आदर्श इमारत भकास आहे.  विकासक व भूमाफिया जमिनीसाठी कुठल्याही थरास जाण्यास तयार आहेत. मग ते एखाद्याचा जीव घेणे असो किंवा मग नदी, नाल्यांमध्ये अतिक्रमण करून पर्यावरणास क्षती पोहोचवणे असो. 
     मागे एकदा रवी तिवारी यांनी पवईत डोंगर हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पवई येथे काही दिवसांपूर्वी डोंगर होता परंतू अल्पावधीतच हा डोंगर कसा काय पोखरला जाऊ शकतो? असे म्हटले होते. पवईतील नागरिकांना या डोंगरामुळे जो काही निसर्गाचा आनंद मिळत होता. त्या आनंदास ते आता मुकले आहेत. 
   परवा पुण्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने  36 आलिशान बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केल्याचे वृत्त झळकले. 31 मे पर्यंत ही बंगले पाडण्याची कारवाई सुरू राहणार आहे. गट नंबर 90, चिखली, ता. हवेली, जि. पुणे इथे "रिवर विला हाउसिंग सोसायटी" या अंतर्गत नदीच्या पात्रामध्ये विकासकाने (बिल्डर) येथे 36 बंगल्यांचे अवैध बांधकाम केले होते. ज्या इंद्रायणी नदीतून तुकाराम महाराजांचे अभंग जसेच तसे प्राप्त झाली होते,  ज्या इंद्रायणी काठी देवाची आळंदी आहे, ज्ञानेशाची समाधी लागली आहे त्या इंद्रायणीच्या पात्रातच या अवैध बंगल्यांचे बांधकाम झाले होते. या अवैध बांधकामाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी देतांना सुप्रीम कोर्टाने बंगले पाडण्याचा आदेश दिला तसेच मालकांना पाच कोटी रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला. ज्या लोकांनी या बंगल्यांमध्ये गुंतवणूक केली होती मेहनतीचे पैसे लावले होते आज त्यांच्यावर रडकुंडीची वेळ आलेली आहे. 
     आता मुद्दा हा आहे की गृह कर्ज हे तात्काळ उपलब्ध असल्यामुळे घर लवकर बांधता येते.  पुर्वी लोक वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहात कारण इझी लोन नव्हते. आता या इझी लोन मुळे फ्लॅट, प्लॉट, घर यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रियल इस्टेट असल्यामुळे लोक त्यात गुंतवणूक करतात आणि लोकांची घराची मागणी असल्यामुळे मग बांधकाम व्यवसायिक सुद्धा अल्प मोबदल्यात शेती विकत घेतात आणि तेथे ले-आउट निर्माण करतात. यात गैरकायदेशीर पद्धतीने सुद्धा कामकाज केले जाते, विकासक त्याचे पैसे प्राप्त करून मोकळा होऊन जातो पण पुढे घरमालकाला मात्र सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा नाहक त्रास  होतो. 
   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने हे बंगले निर्माण होण्यापूर्वीच जर कडक धोरण स्वीकारले असते तर कदाचित इथे बंगलेच निर्माण झालेच नसते परंतु झारीतील शुक्राचार्यांमुळे हे बंगले उभे राहिले आणि आता ते पाडण्याचे काम सुरू आहे. 
   भूमाफिया, विकासक हे नियम, कायदे यांची सर्रास पायमल्ली करण्यास कसे काय धजाऊ शकतात ? झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? भूमाफिया, विकासक यांनी कायदे, नियमांचा भंग करण्यासाठी दिलेल्या नजराण्यांमुळे अशी अवैध बांधकाम करण्याची कृत्ये घडतात. हे असेच जर घडत राहिले तर पुढील पिढ्यांना नदी पात्रे, डोंगर, पर्वत तर चित्रातूनच दाखवावे लागतील. कर्मचा-यांशी साटेलोटे करून अत्यल्प मोबदल्यात शासकीय जमिनी, डोंगर, वन जमिनी लाटायच्या व त्यावरील भूखंड, सदनिका अव्वाच्या सव्वा भावात विकून गब्बर बनायचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. पवईच्या घटनेबाबत भाष्य करतांना तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते खरे परंतू प्रत्यक्षात तसे घडेल की नाही ईश्वर जाणे. आज अर्धा डोंगर पोखरल्या गेला आहे प्रत्यक्ष कारवाई होईतो कदाचित संपूर्ण डोंगरच पोखरला जाण्याची शक्यता नाकारत येत नाही. तसेच आता पुण्यातील हे 36 बंगले पाडले जातील आणि अनेक वर्ष ही जागा तशीच पडलेली राहील.
 आता पुण्यात काही भागातच डोंगर, नदीपात्रे शिल्लक राहिली आहेत. भूमाफिया, विकासक यांची वक्रदृष्टी त्यावर आता पडलीच आहे. त्यांच्या या वक्रदुष्टीवर शासनाने डोळेझाक करून चालणार नाही. जमिनी लाटण्याचा हा उद्योग बंद पाडण्यासाठी विकासाचा समतोल साधून महाराष्ट्रात इतरत्र सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण करणे अत्यावश्यक झाले आहे. तसे जर झाले तर दररोज पुण्या-मुंबईकडे येणारे लोंढेच्या लोंढे कमी होतील.  डोंगर पोखरणे, नद्यांची जागा लाटणे अशा विकासक, भूमाफिया यांच्या बेकायदेशीर कृत्त्यांकडे दुर्लक्ष करून नोकरदार, अधिकारी, राजकारणी यांचेकडे पैशाचे डोंगर उभे राहत असतील तर मग इंद्रायणी नदीतील जमीन जशी लाटण्याचा प्रयत्न झाला तसा इतरही ठिकाणी होतच राहील आणि मग नद्यांवर अतिक्रमण करून घरे बांधल्याने भविष्यात पुराच्या त्रासामुळे नागरिकांनाच त्रास होईल. (मुंबई मिठी नदी प्रकोप)
     आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे पुण्यातल्या या अवैध बांधकामाला अटकाव मिळाला आहे खरा परंतु तरीही अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये नदी नाल्यांमध्ये सर्रास अतिक्रमणे सुरू आहे. सरकारने यासंबंधीचे नियम अधिक कठोर करायला पाहिजे आणि खरेदी-विक्री, टाऊन प्लॅनिंग, महसूल विभाग अशा बांधकाम संबंधित कार्यालयात अवैध परवानगी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे नाहीतर या लोकांमुळे जंगले, नद्या, डोंगर लवकरच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Story of a struggle of a young man of 1980s

 असाही एक 'विजय'पथ

...कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. विजुभाऊ यांची ही स्टोरी  तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल... 

हा विजयपथ आहे एका जिद्दी होतकरू गरीबीतून वर येऊन व्यवसायात स्थापित होणाऱ्या एका तरुणाचा. खामगांव येथील टिळक स्मारक मंदिरचे तत्कालीन काळजीवाहक श्रीरामजी शिंदे यांना 20/4/1965 रोजी द्वितीय पुत्र प्राप्त झाला. नांव ठेवले विजय, विजय श्रीराम शिंदे. घरची परिस्थिती बेताचीच, म्हणून मग श्रीराम शिंदे आणि भिकाबाई यांनी आपल्या मुलांचे  प्राथमिक शिक्षण न.प.शाळा आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मध्येच केले. आई वडिलांना मदत म्हणून लहानग्या विजयने इयत्ता चौथी मध्येच असतांना 50 पैसे रोजाने कामकाज करण्यात सुरुवात केली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. शिक्षण अर्धवटच राहिले. विजय आता तरुण झाला होता. घर खर्च वाढू लागला होता, तो भागवता यावा म्हणून विजयने मुंबई येथे कष्टात दिवस काढून शिवणकाम शिकले. लहानपणीच रोजाने काम केल्यामुळे व नोकरीतील चांगल्या वाईट अनुभवामुळे विजय शिंदे यांच्या डोक्यात नोकरीपेक्षा व्यवसायाच करावा असे ठसले होते त्यामुळेच आपल्या शिवणकलेच्या जोरावर 1986 मध्ये खामगांवातील तत्कालीन श्याम टॉकीज म्हणजेच आताच्या सनी पॅलेस जवळ टेलरिंगचे दुकान सुरू केले. हे दुकान विजय शिंदे यांनी पाच वर्ष चालवले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 1991 मध्ये विजयचे दोनाचे चार हात झाले नववधूच्या पायगुणामुळे जगदंबा चौकामध्ये टेलरिंगचा त्यांचा व्याप वाढला. विजय मग विजयराव/विजुभाऊ या नावाने ओळखला जाऊ लागला. अर्थार्जनाचे आणखी काही मार्ग असावेत म्हणून ते फटाक्याचे दुकान लावत असत. व्यवसायात आवड असल्यामुळे आणि सतत नव्याचा ध्यास, जिद्द, उमेद असल्याने बोलका स्वभाव असलेले विजुभाऊ खामगांवात सुपरिचत झाले. पुढे काळात व लोकांच्या खाद्याच्या अभिरुचीत झालेला बदल ध्यानात घेऊन त्यांनी 2002 मध्ये एलआयसी समोर फौजी कॉर्नर म्हणून खामगावातले पहिले चायनीज आणि पिझ्झाचे उपाहारगृह सुरू केले. त्यासाठी त्यांनी नेपाळी कारागीर आणले होते. त्या काळात खामगांवला त्यांनी पिझ्झा व्यवसाय सुरू केला होता. लहान मुलांमध्ये ते पिझ्झावाले अंकल किंवा पिझ्झावाले मामा म्हणून ओळखले जात होते. पुढे टिळक स्मारकचे केअर टेकर म्हणून विजय शिंदे यांनी कार्यभार स्विकारला. हे करत असतानाच त्यांनी 2009 मध्ये घरपोच रॉकेल वितरण, 2011 मध्ये एक खिडकी योजनेचा सेतू हा उपक्रम मुलासह सुरू केला, 2012 मध्ये विजुभाऊ यांनी कॅटरिंग व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे आणि शिंदे कॅटरर्स म्हणून प्रसिद्ध आहे. सचोटीने आणि उत्कृष्ट भोजन लोकांना दिल्यामुळे या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आणि शिंदे कॅटरर्स हे नाव खामगांवतच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्ये ही ओळखले जाऊ लागले. त्यांना  दुसऱ्यांना खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे ते हा व्यवसाय आनंदाने उत्साहाने चालवत आहेत. 80 च्या दशकात चंदनशेष गणेश मंडळाचे ते उत्साही सदस्य होते. त्यांच्या विविध व्यवसायांच्या वाटचालीत त्यांना परीवारजनाचे  त्यांना भक्कम पाठबळ आहे. 

     विजुभाऊ यांना त्यांच्या मनमिळाऊ  स्वभावामुळे खामगांव मधील अनेक लोक ओळखतात आणि त्यांच्या परिवारात सुद्धा ते भाच्यांचे लाडके मामा, बहीण भावांचे लाडके भाऊ, पुतण्यांचे आवडते काका आणि नातवंडाचे आवडते बाबाजान आहे. आज या बाबाजाननी एकसष्टीत पदार्पण केले आहे. तरुणाला लाजवेल असाच उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. अशा नांवातच विजय आणि "श्रीराम" असलेल्या व्यक्तीला लोकप्रियता आणि यश कसे नाही मिळणार ? 

      कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. आजच्या शानशौकीत राहणाऱ्या तरुणांना विजय शिंदे यांची ही स्टोरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.  

माहिती स्त्रोत - भूषण शिंदे

शब्दांकन - विनय वि. वरणगांवकर, स्तंभलेखक