रामचंद्र कह गए "सिया" से....

स्त्रिया शिक्षित झाल्या, स्वतंत्र झाल्या, त्यांना विविध अधिकार मिळाले, त्यांच्यासाठी आयोग गठीत झाला, सवलती मिळाल्या, त्यांच्या बाजूने कायदे झाले या सर्वांचा गैरफायदा सियासारख्या अनेक स्त्रिया घेऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्त्रियांच्या वर्तनात कमालीचा बदल घडलेला आहे. या देशात पत्नी पिडित पतींची सुद्धा संघटना निर्माण होईल अशी कल्पना तरी कोणी केली होती का ?
खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दिलीपकुमारचा गोपी सिनेमा बघितला होता. या सिनेमातील रफीने गायलेले "सुखके सब साथी दुखमे ना कोई" हे जीवनातील वास्तव सांगणारे भजन तसेच
रामचंद्र कह गये सियासे
ऐसा कलजुग आयेगा,
हंस चुगेगा दाना दुनका
कौवा मोती खायेगा ||
हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं. कलियुगातील परिस्थितीचे वर्णन करणार अशी दोन सुंदर, श्रवणीय गीते लक्षात राहीली. आणि रामचंद्र कहे गये सियासे यातील सिया म्हणजेच सीता हे त्या बालवयात कुणीही न सांगता लक्षात आले होते. हिंदीमध्ये अनेक गीतांमध्ये, भजनांमध्ये सीतेला सिया असे म्हटले आहे या गीतात कलियुगाचे यथार्थ वर्णन केलेले आहे परंतु हे गीत आठवण्याचे कारण म्हणजे सिया हे नांव. परवा सिया नावाच्याच एका तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीचा जीव घेतला आणि सिया नांवाच्या अवतीभोवती माझे विचारचक्र फिरू लागले आणि हे गीत आठवले. परंतु कुठे ती रामचंद्रांची त्यागी सिया आणि कुठेही माथेफिरू भोगी सिया. या दोघींची तुलना वगैरे करायची नाही, होऊ तर मुळीच शकत नाही, परंतु केवळ नाम साधर्म्य तेवढे आहे. सियाच्या मातापित्यांनी कोणत्या हेतूने तिचे सिया हे नाव ठेवले असेल ? त्याचा अजूनही काही अर्थ असेल का ? देव जाणे. परंतु सिया या नांवामुळे हे गीत आठवले.
महाराष्ट्रातील लोहगड किल्ल्यावरून परवा एक तरुण दरीत पडल्याची घटना घडली. सुरुवातीला एक अपघात म्हणून त्याकडे पाहिले गेले. परंतु नंतर त्याच्या वाग्दत्त वधूनेच त्याला दरीत ढकलल्याचे निष्पन्न निघाले. पुण्यातील व्यापारी अग्रवाल यांचा एकुलता एक मुलगा केतन याचा विवाह व्यापारी गोयल परिवाराच्या सिया नावाच्या तरुणीसह निश्चित झाला होता. लग्नासाठी मोठे रिसॉर्ट सुद्धा आरक्षित करण्यात आले होते परंतु लग्नाच्या काही दिवस आधीच फिरायला जाण्यासाठी म्हणून केतन अग्रवाल आपली वाग्दत्त वधू सिया गोयल सोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. याच ठिकाणी सियाने केतनला दरीत ढकलून दिले असे पोलिस तपासांती लक्षात आले. केतन साडेचारशे फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा परिवार दुःख सागरात.
काय होते आहे हे ? काय झाले आहे आज कालच्या तरुणांना ? यापूर्वीही तरुणींनी त्यांच्या पतीला मारण्याचे किस्से भारतात घडले आहे सोनम रघुवंशीने पतीला असेच दरीत ढकलून मारले होते तर एका विवाहितेने तिच्या पतीला मारून त्याचा मृतदेह ड्रमात टाकून त्याला सिमेंटने पक्के करून मारले होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. तरुणींना हे काय झाले आहे ? समाज माध्यमांमुळे तरुण-तरुणी हे खूपच उच्छंकृल झाले आहेत, भरकटत चालले आहे, भौतिक सुखाच्या नादी लागले आहे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे सगळे खरेच समजून तसेच अनुसरण करीत आहे, आभासी विश्वात वावरत आहे, उच्चविद्याविभूषित होत आहे परंतु नीतिमत्ता मात्र शून्य झालेली आहे, शारीरिक आकर्षणाने दुष्कृत्ये घडत आहे. बॉयफ्रेंड सोबत एन्जॉय करायचा आणि नंतर बलात्काराचा आरोप करायचा अशी सुद्धा कित्येक कृत्ये घडली आहेत. ही सिया सुद्धा त्याच पठडीतील. केतन अग्रवाल सोबत लग्न ठरण्यापुर्वी तिचा चेतन चौधरी नामक बॉयफ्रेंड होता. या चेतन चौधरी सोबतच तिने केतन अग्रवालला मारण्याचा कट केला आणि केतनचा जीव घेतला. बाई तुला लग्न त्याच्याशी करायचे नव्हते तर सांगायचे असते ना ! परिवाराला विश्वासात घ्यायचे, केतनला सांगायचे. ते सोडून एखाद्याचा जीव घेणे त्याच्या परिवाराची वाताहत लावणे हे कितपत योग्य आहे ? स्त्रिया शिक्षित झाल्या, स्वतंत्र झाल्या, त्यांना विविध अधिकार मिळाले, त्यांच्यासाठी आयोग गठीत झाला, सवलती मिळाल्या, त्यांच्या बाजूने कायदे झाले या सर्वांचा गैरफायदा सियासारख्या अनेक स्त्रिया घेऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्त्रियांच्या वर्तनात कमालीचा बदल घडलेला आहे. या देशात पत्नी पिडित पतींची सुद्धा संघटना निर्माण होईल अशी कल्पना तरी कोणी केली होती का ?
पत्नीने किंवा होणाऱ्या पत्नीने बॉयफ्रेंडच्या साह्याने पतीचा खून करणे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. याच्या उलट सुद्धा अनेक किस्से घडलेले आहेत, नाही असे नाही. त्यामुळे या अशा घटनांवर उपाययोजना म्हणून सरकार, सामाजिक संघटना, कुटुंब, स्त्री-पुरुष या सर्वांनी विचार करणे आवश्यक झाले आहे. शाळांमध्ये नैतिक शिक्षणावर मोठा भर देणं आवश्यक झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात तशी तरतूद केली आहे. संघाने सांगितलेल्या पंचसूत्री मध्ये कुटुंब प्रबोधन हे सर्वात प्रथम क्रमांकावर सांगितले आहे. आज कुटुंबामध्ये संवाद राहिलेला नाही. मुलांवर संस्कार हे केवळ सांगण्याने, बोलण्याने होत नाही तर मोठ्यांच्या आचरणाने सुद्धा होत असतात त्यामुळे मोठ्यांचे आचरण तसे राहिले आहे का हा सुद्धा विचार आपण सर्वांनी, वाचकांसह लिहिणाऱ्याने सुद्धा करणे आवश्यक आहे. मुलींनी शिक्षण आवश्यक घ्यावे, पुढे जावे, प्रगती करावी, मित्र-मैत्रिणी सुद्धा आपल्या आवडीने करावीत परंतु कुणाला आयुष्यातून उठवून देणे, खून करणे हे मात्र कोणत्याही स्त्रीला न शोभणारे असे कृत्य आहे.
सियाने केतनला मारण्याचे अविचारी वृत्त करून केतनच्या परिवाराला उध्वस्त केले आहे. शिवाय स्वतःच्या आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याही परिवार परिवाराला उध्वस्त केले आहे त्यामुळे तमाम तरुणाईला इथे हेच सांगावेसे वाटते की, कोणतीही गोष्ट अविचाराने करू नये अन्यथा
बिना विचारे जो करे सो पीछे पछताये
काम बिगाडो आपनो, जग मे होत हंसाय
हे कलियुग आहे आणि ते सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी समाजात होताना आपण दररोज बघतो. रामचंद्र कह गये सियासे ऐसा कलजुग आयेगा या पंक्तीप्रमाणे कलियुगातील या सियाचे आपल्या वाग्दत्त वराला जीवे मारण्याचे कृत्य त्याला प्रमाण आहे.





.jpeg)