झाडे तोडलियावरी दुःखास पारावर काये ?...
![]() |
| संग्रहित चित्र |
12 जुलै, रविवार रोजी काही खरेदी निमित्ताने मेन रोडवर गेलो होतो. मोठ्या देवी चौकात विड्याची पाने घेण्यास थांबलो तर तिथे एक व्यक्ती आला. "काय राजेहो मोठी - मोठी झाडे तोडणं लावलं" असे खिन्नतेने पानवाल्यास उद्देशून म्हणाला. कुठली झाडे ? मी त्याला त्वरीत विचारले. "जाऊन पाहा न पोलिस स्टेशन रोडनी तो उत्तरला. मोठी देवी चौक ते पोलिस स्टेशन या रस्त्याने मी निघालो. खिलोशिया उपहारगृहासमोर एक ट्री गार्ड तोडलेल्या एका भल्या मोठ्या झाडाच्या खोडासह बांधकाम सुरू असलेल्या त्या रस्त्याचे तात्पुरते दुभाजक म्हणून ठेवण्यात आले होते. आणखी पुढे गेल्यावर एका तयार कपड्यांच्या दुकानासमोरचे मोठे कडूनिंबाचे झाड, आदर्श हॉटेलच्या बाजूचे भले मोठे झाड व आणखी काही झाडे तोडणे सुरू होते, त्यांच्या भल्या मोठ्या फांद्या मालवाहू गाड्यांमध्ये भरणे सुरू होते. बालपणी मी कमान गेट म्हणजे अग्रसेन चौका जवळ राहत होतो. मला समजायला लागल्यापासून ही झाडे मी बघत आलो होतो. यानुसार ही झाडे शंभर दीडशे वर्षांपेक्षाही अधिक असावी असा अंदाज आहे. नवीन रस्ता निर्मिती कार्यात ही झाडे अडथळा ठरली होती. मुळावर घाव घालणे या म्हणीची प्रचिती मला त्या भल्या मोठ्या, कवेत न येऊ शकणाऱ्या परंतु आता यंत्रांच्या सहाय्याने तोडलेल्या, पडलेल्या त्या झाडांच्या मुळांकडे पाहून येत होती. पुर्वी ज्या रस्त्यावर नेहमी वृक्षांची गर्द सावली असे त्या रस्त्याकडे पाहून आता ओकं-ओकं वाटत होतं. तो रस्ता बोडखा वाटत होता, नवीन रस्ता असूनही सध्यातरी मनहूस भासत होता. कदाचित भविष्यात पुन्हा तो boulevard (दुतर्फा झाडे असलेला रुंद रस्ता) बनेलही, तशी काही योजना पण केली असेल पण सध्या तरी भकास वाटतो आहे.
गेली कित्येक वर्षे या झाडांनी नागरिकांना, त्यांच्या दुचाकी, मोटारसायकल आदी वाहनांना, फेरीवाल्यांना थंडी छाया दिली होती. परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांना हवा दिली होती. त्याच रस्त्यावर त्यावेळी मला नैराश्य, स्मशान शांतता दिसत होती, भकास वाटत होते. ते दृश्य पाहणारे तेथे उपस्थित नागरिक, पादचारी स्तब्ध होऊन ते वृक्ष कत्तलीचे दृश्य बघत होते. मान्य आहे विकास व्हावा परंतू इतकी मोठ-मोठाली झाडे तोडणं अटळच आहे का ? त्या झाडांच्या ठिकाणी थोडा रस्ता अरुंद झाला तर चालणारच नाही का ? मी असे ऐकले आहे की बंगळुरू शहरात झाडे न तोडता त्यांना वाचवून रस्ते, कुंपणाच्या भिंती, छप्पर तयार केले जाते. काही वर्षांपुर्वी संभाजीनगरला एका दुकानाच्या आत काऊंटरला लागून एक मोठे झाड दुसरा मजला पार करून तिसऱ्या मजल्यावर त्याच्या फांद्या गेल्याचे मी स्वत: पाहिलेले आहे. मग याप्रमाणे काही नाही का करता येऊ शकत ? झाडे तोडल्यावर आम्ही नवीन झाडे लावू असे म्हटले जाते पण नवीन झाडे तेवढी मोठी नसतात, किंवा सावली देणारी सुद्धा नसतात. मागच्या वर्षी घाटपुरी बायपासवर फॉक्स टेल पाम मोठ्या संख्येने लावली पण आपल्या भागातील ऊन, दुभाजका मधील निकृष्ट माती यांमुळे त्यातील निदान 80 टक्के तरी झाडे वाळून गेली. म्हणजे झाडही गेले आणि शासनाचा पैसाही. झाडे लावताना आपल्या भागातील वातावरणाचा अभ्यास करून मग ती झाडे लावली गेली पाहिजे. खामगाव सारख्या प्रचंड ऊन असलेल्या शहरात फॉक्स टेल पाम जगणे कठीण आहे.
आपण सर्व शिवाजी महाराजांचे खूप नांव घेतो त्यांचा अभिमान बाळगतो. ते योग्यच आहे पण छत्रपतींनी दिलेला संदेश मात्र पार विसरून जातो. नोकरशाही , नेते मंडळी सुद्धा विसरतात म्हणून शिवाजी महाराजांनी दिलेल्या आज्ञापत्रातील काही अंश येथे देत आहे.
लाकडे आरमाराचे प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाऊ न द्यावा. काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दो वर्षाने होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहिसे होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानीही होते. याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊ द्यावी. कदाचित यखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तरी त्याचे धन्यास राजी करून त्याचे संतोषे तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’
या आज्ञापत्रावरून शिवाजी महाराज रयतेप्रती आणि स्वराज्यातील झाडांविषयी किती काळजी करत हे सहज लक्षात येते.
विकासास कुणाचाच विरोध नाही, तो अवश्य व्हावा. खामगांव शहर कधी नव्हे एवढे विकसित होत आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. खामगांवातील उद्यानांनी आता कात टाकली आहे. काही नवीन उद्याने झाली आहे. ही उद्याने इतकी सुंदर झाली आहेत की, यात काढलेले फोटो कुण्या मोठ्या शहराच्या बगीच्यातील किंवा पर्यटन स्थळावरील वाटावीत अशी असतात. निसर्ग समृद्ध जनुना तलाव सुद्धा आता अत्याधुनिक खेळांच्या साधनासह, नूतनीकरणासह एक आनंददायी स्थळ म्हणून खामगांवकरांसाठी सज्ज होत आहे.
या लेखाचा उद्देश हाच आहे की, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मोठ-मोठाली झाडे न तोडण्याची आज्ञा दिली होती तशीच अंमलबजावणी सांप्रत प्रशासनाने सुद्धा करावी. अगदीच नाईलाज असल्यास मगच झाडे तोडावी. ती तोडलीच तर शोभेची झाडे न लावता तोडलेल्या झाडांच्या तोडीची नवीन झाडे लावावीत व ती जगवावी जेणे करून शिवाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "झाडे तोडलियावरी दुःखास पारावर काये ?" याप्रमाणे दुःख होणार नाही.
.jpeg)





