Click "Follow" Button below To Follow this Blog

०२/०४/२०२६

Article about memories of Hanuman janmotsav and bhandara

आठवणी हनुमान  जन्मोत्सवाच्या

गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. 

 आज हनुमान जन्मोत्सव.  1990 च्या सुमारास आमच्या रहिवासी भागात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. गल्लीतील नागरिकांच्या घरी, गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. रोडग्यांसाठी तयार केलेल्या केल्या जाणाऱ्या आहारासाठी गौऱ्या गोळा करून आणण्याची एक गंमत होती. त्यासाठी एक पथक रवाना होत असे. वाचकांपैकी या पथकात जे लोक गेलेले आहेत त्यांना त्या गोष्टीचे स्मरण होऊन नक्कीच हसू आले असेल. दुसऱ्या दिवशी भंडारा झाल्यानंतर भांडी घासण्याचा एक मोठा कंटाळवाणा कार्यक्रम होत असे. जेवण झाल्यानंतर भांडे घासण्याचा मला तरी अतिशय कंटाळा येत असे परंतु तरी सर्वजण मिळून भांडी घासत असत. एक माणूस उभे राहणे तर दूर कसाबसा बसू शकेल असे ते मंदिर होते एकदम साधे. "सबके लिए खुला है मंदिर ये हमारा" या तुकडोजी महाराजांच्या गीताप्रमाणे त्या मंदिराचे होते कुणीही या, केंव्हाही या आणि दर्शन घ्या, आपापल्या परीने बजरंगाची पूजा करा अन् जा. त्या हनुमान मंदिरामध्ये कुणाला कठीण वाटतील असे विशेष काही नियम, बंधन, नियमावली नव्हती परंतु हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मात्र सर्वजण एकत्र येत असत. रोडगे बनवण्यासाठी प्रमोद पाटील, स्व. मुकुंदा, पंचायत समिती निवासस्थानात राहणारे महादेव भाऊ हे लोक तज्ञ होते. मी त्यांना फक्त गोळे तयार करून देत असे. एक सुनील नामक मुलगा दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आमच्या गल्लीत दिसत असे इतर वेळी मात्र तो कुठेच दिसत नसे. तो कुठे राहायचा , कोणाचा मित्र होता, आमच्या गल्लीत का यायचा हे मला खूप वर्षे कळलेच नव्हते. रात्रभर जागल्यानंतर सुद्धा पुन्हा सकाळी सहा वाजता सर्वजण जन्मोत्सवासाठी हजर असत. पण हळूहळू सर्व मंडळी आपापल्या व्यापात मग्न होतील. सर्वांची लग्न झाली, मुले झाली आपापल्या संसारात सर्व मग्न झाले आणि हनुमान जन्मोत्सवाचा तो साध्यासुध्या पद्धतीचा भंडारा होणे बंद झाले. जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त बरेच जण हनुमंताची पूजा आदी करीत असे, मंदिर साफसफाई करीत असे. माझे वडील तर मंदिराचा परिसर रोज झाडत होते. भंडारा होणे बंद झाल्यावर  हनुमान मंदिर दुर्लक्षित झाले. आज आमच्या वेटाळात लोकसहभागातून नवीन शिवमंदिर उभारले आहे. प्रदीप मिश्रा यांच्या व्यापक आवाहनानंतर सध्या भोळे शंकर हे टॉपवर आलेले देव आहे. 'एक लोटा जल' या आवाहनाने शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली आहे. देव तर सर्व सारखेच आहे. सर्व देव त्यांच्या भक्तांचे भलेच करणार. असो ! आपल्या देशातील लोक भोळे आहेत देवभोळे आहेत कुणी काही आवाहन केले की ते लगेच स्विकारतात परंतु स्वतः भगवंतांनी दिलेला संदेश मात्र विसरतात.  स्वतः भगवंतांनी गीतेत म्हटले आहे

 आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | 

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

अर्थात ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे जल समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूलाच जाऊन मिळतो. 

या अर्थाने तुम्ही कोणत्याही देवाची आराधना केली तरी ती शेवटी विष्णूलाच अर्पण होत असते.

    आमच्या भागात हनुमान जन्मोत्सवाच्या काळात थोडा 'सुकून' होता, प्रत्येकाकडे वेळ असे, ट्युशन क्लासेस यांचे एवढे प्रस्थ नव्हते त्यामुळे सर्व एकत्र येत असत आणि सर्वांनुमते सर्व सहमतीने कार्यक्रम पार पडत असत. अमुक एक गोष्ट अशीच झाली पाहिजे आणि तशीच झाली पाहिजे असे काही बंधन नव्हते. "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" या ओळीनुसार आपापल्या भावानुसार सर्वजण हनुमंताचे दर्शन घेत असे. 

    आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या बाबी स्मरण झाल्या. तशा त्या प्रत्येकच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी स्मरण होत असतात म्हणा ! पण आज त्यावर लिहावेसे वाटले. लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आल्यावर आपापल्या परीने लोक दानधर्म करतात, काही लोक मंदिर उभारणीच्या बांधकामादी कार्यामध्ये सक्रिय सहभाग देतात. स्वतःचे घर तर सर्वजण बांधतात परंतु ईश्वराचे घर बांधणे, त्यासाठी निधी देणे पुण्यवंताच्याच भाग्यात असते. अशातून सुंदर, भव्य मंदिर निर्माण होते. याच प्रकारे आपल्या वेटाळात सुद्धा उभे राहिले आहे. शोले सिनेमात एक संवाद आहे "समाज और बिरादरी तो इंसान को अकेलेपन से छुडाने के लिए बनाई गई है, उसे अकेला रखने के लिए नही |" त्याचप्रमाणे मंदिरेही आपल्या बांधवांना एकत्र आणण्याचे एक ठिकाण आहे.

   आमच्या वेटाळात झालेले नवीन शिव मंदिर सुद्धा जुन्या हनुमान मंदिरप्रमाणे सर्वांना कायम एकत्रित ठेवेल, जिथे सर्व सहमतीने, सर्व सहभागाने आपापल्या भक्तिभावाने सर्वजण एकत्र येत राहतील, पुन्हा तसे हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी होणारे साधेसुधे भंडारे आयोजित होतील हिच आशा व  ईश्वरचरणी प्रार्थना.

०१/०४/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar

आठवणी नानाशास्त्रींच्या 

जलंब - भाग १ 

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य व परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.


नानाशास्त्री वरणगांवकर यांचा वाडा या ठिकाणी होता.

सुवर्ण व्यवसायी वर्मा यांचे जलंब मधील 1922 मध्ये सुरू केलेले दुकान.

नानाशास्त्री वरणगांवकर यांच्या जागेचे सध्याचे मालक
श्री घोपे काका 

काही जुनी, काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे, चुलत्यांचे, आत्याचे, बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार  माझ्या डोक्यात येत होते. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो.

"जलंब ग्रामाबद्दल मला बालपणापासून जिव्हाळा, आकर्षण आहे." जलंबला हिंदू संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून गेलो असता व्याख्यानाच्या सुरुवातीलाच वरील वाक्य आपसूकच माझ्या मुखातून निघाले. त्याचे कारण माझे आजोबा वैद्य दत्तात्रय रामचंद्र वरणगांवकर हे सुमारे 1940-50 च्या दशकात जलंबला वास्तव्यास होते, वैद्य असल्याने जलंब, खामगांव परिसरात ते नानाशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. व्याख्यानापुर्वी हनुमान मंदिराच्या जवळच राहणाऱ्या वानखेडे यांच्याकडे आम्हाला चहापाण्यास आमंत्रित केले होते. पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आहे की एखादे जुने गांव, जुनी वास्तू दिसली की एखादा जुना मित्र भेटला की जसा आनंद होतो तसा आनंद वाटत असतो. जलंबला आलो असल्याने माझ्या मनात सुद्धा मला माझे वाडवडील राहत असलेली जुनी वास्तू बघण्याची तीव्र इच्छा जागृत झाली असल्याने मी अनिल भाऊ यांचे जवळ माझे आजोबा इथे राहिलेले आहे, इथे आमचे घर होते, ते मला पाहायचे आहे असे सांगताच त्यांनी त्यांच्या वृद्ध वडीलांना विचारल्यावर त्यांचे वडिलांनी नानाशास्त्री वरणगांवकर कुठे राहत होते आणि आता तिथे कोण राहते ते सांगितले. तरी खात्रीसाठी म्हणून अनिल वानखेडे मला म्हणाले चला आता आमच्या गावाची इत्यंभूत माहिती असलेल्या "सायंटिस्ट"कडे घेऊन जातो. सायंटिस्ट म्हणजे खूप माहिती असलेले असे त्यांचे म्हणणे होते हे कळायला मला वेळ नाही लागला. त्यांच्या काकांकडे ते घेऊन गेले. माझे आजोबा जलंबला राहत होते हे म्हटल्यावर काही वेळातच त्यांना मी आपलासा वाटू लागलो. ते माझ्या सोबत अनवाणीच निघाले, मी त्यांना चप्पल घाला असे म्हटल्यावरही त्यांना मला माझ्या पूर्वजांचा वाडा दाखवण्याची घाई झाली होती, जलंबशी माझे नाते असल्याचे पाहून मी त्यांचा ग्राम बंधू वाटल्याने त्यांच्या अंगी सुद्धा उत्साह संचारलेला दिसला. वानखेडे यांच्या काकांना नानाशास्त्री म्हटल्याबरोबर "नानाशास्त्री काय भारदस्त माणूस होता. मी त्यांना पाहिलेले आहे. मोठ्या मिशा, चहे-यावर तेज, टोपी, गोरापान वर्ण, उंचेपुरे. जलंब गावात असा रुबाबदार माणूस एकच होता. त्यांच्याकडे बंदूक होती, नेमबाज. होते, परवाना धारक शिकारी तर होतेच, शिवाय वैद्य होते" एका दमात काकांनी माझ्या आजोबांचे वर्णन केले. ते तसेच होते. मी नानाशास्त्रींचा नातू आहे असे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला त्यांनी कौतुक सुद्धा केले, चहापाण्याचा खूप आग्रह केला परंतु वेळ कमी असल्याने फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही वाड्याच्या दिशेने जाऊ लागलो. काही जुनी तर काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे,  चुलत्यांचे, आत्याचे बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार माझ्या डोक्यात येत होते. माझी आत्या सांगत असे की आजोबा त्यांना खामगांवला खेळ (सिनेमा) पाहण्यासाठी बैलगाडीत घेऊन येत असत आणि अंजुमन शाळेच्या चारमिनार जवळ ते शिदोरी खात असत. हे मला आठवले. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो. खुप वर्षांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत जलंबला गेलो होतो. त्याचे वडील सुद्धा जलंबला राहत असत. ते माझ्या वडिलांचे बालमित्र होते. म्हणून आम्ही दोघे त्यावेळी जलंबला गेले होतो. त्यावेळी ते घर आजोबांच्या वेळी जसे होते तसेच होते पण आता मात्र ज्यांच्या मालकीचे ते घर आहे त्यांनी बरेच बदल केले आहे. मी नानाशास्त्रींचा नातू आहे हे ऐकल्यावर आमच्या घराचे आताचे मालक घोपे काका यांनी आमचे खूप आदराने स्वागत केले. घोपे काकांनी तर मला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि नानाशास्त्री यांचा मळा सुद्धा दाखवण्याचे आश्वासन दिले. तो मळा अजूनही तसाच आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. माझा जलंब गावाशी अगदी जुजबी संबंध, कधीकाळी आजोबांनी वास्तव्य केलेले पण आजही त्या गावात एवढे  प्रेम, माया, आपुलकी, आदर कसे काय मिळत होते ? तर जे पेराल ते उगवते या उक्ती नुसार माझ्या आजोबांनी येथे लोकांना चांगली वैद्यकीय सेवा दिली होती, आपुलकीने आयुर्वेदिक औषधे दिली होती, वन्यप्राण्यांच्या संकटातून त्यांना वाचवले होते त्यामुळे आजही त्यांचे नांव अनेक ज्येष्ठ जलंब ग्रामवासी जाणून आहे. तीन वेळ संध्या,  नित्यपूजा आणि गणपतीवर नितांत भक्ती असणा-या  माझ्या आजोबांनी काय कमवून ठेवले ते मला कळले. 

     माझे व्याख्यान चांगले झाले, परतीच्या प्रवासात माझ्या मनात जलंब भेटीमुळे आजोबांच्या अनेक स्मृती तरळत होत्या.  त्यात मला आजोबांचे मित्र त्यांनी भेटी दिलेली छोटी छोटी गांवे आठवली त्यातले एक लांजूड गांव आठवले. पण तूर्तास एवढेच लांजूडचा  किस्सा व इतर आठवणी या लेख मालिकेत  लवकरच वाचायला मिळतील.

  रामदास स्वामींनी सांगितले आहे की, पूर्वजांची कीर्ती सांगत बसण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. पण संत वचन माहित असूनही  वडीलांची अर्थात पूर्वजांची किर्ती, स्मरण या व आगामी काही लेखातून वाचकांना काही प्रेरणा मिळेल या हेतूने लिहित आहे.

...ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव



२६/०३/२०२६

Article about Ashok Kharat , Nashik

बुवा तिथे मूर्ख बाया 

'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला. आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज. किती नावे घेऊ? मग तरीही अशा भोंदू बाबांच्या नादी लोक का लागतात?

    खरे तर बुवा तिथे बाया हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे गाजलेले विनोदी नाटक. वास्तविक पाहता केवळ आचार्य अत्रे लिहिले तरी चालले असते पण 'जेन झी' पिढीतील युवकांना गुगल, किंवा 'chat gpt' वर आचार्य अत्रे कोण ? असा  शोध घेण्याचे काम न पडावे म्हणून मी आधीच पुर्ण नांव लिहून टाकले. 'जेन झी' पिढी ही वाचनापासून दूर झालेली पिढी असल्याने या पिढीतील तरुण ब्लॉग वा वृत्तपत्रातील लेख वाचत असावेत की नाही ही सुद्धा एक शंकाच आहे. "लेकीन अपना तो काम है लिखना" असा विचार करून लिहायला सुरुवात केली. अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी मी त्यात अत्रेंचा सन्मान राखून बुवा तिथे मूर्ख बाया असा बदल केला आहे. 

    बुवा तिथे बाया हे नाटक आठवण्याचे निमित्त ठरले ते नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघडकीस आल्यावर. खरातला अटक केल्यावर या नाटकाचे प्रकर्षाने स्मरण झाले. हे नाटक मी काही पाहिलेले नाही. परंतू सुविख्यात लेखक, नाटककार असलेल्या अत्रे यांनी लिहिलेले असल्याने ते माहित होते. इतक्या वर्षांपुर्वी अत्रेंनी हा विषय मांडला हे तेंव्हा धाडसाचे काम होते. कारण त्या काळी अंधश्रद्धा ही आजच्या पेक्षा जास्तच होती. पण अत्रे इंग्लंड मधून शिकून आले होते, विद्वान होते, वक्ता दशसहस्त्रेशू होते. त्यांचा बुवाबाजीवर मुळीच विश्वास नव्हता म्हणून त्यांनी लोकांच्या देवभोळेपणाचा काही लोक कसा फायदा घेतात हे या नाटकात मांडले आहे. असाच फायदा  चतुर, लबाड खरातने घेतला. आता खरात चतुर म्हणा किंवा लोक, बायका हे भोळे किंवा अंधश्रद्धाळू म्हणा. खरातचे अनेक किस्से अनेक चित्रफिती मग समोर यायला लागल्या. त्याचे ते कवडीमोल असलेले चिंचोके लोकांना लाखात विकणे, नाग बोलावणे, बायकांना अपत्य होण्यासाठी मंतरलेले त्याचे मुत्र मिश्रीत पाणी देणे, पुरुषांना आणखी कोणतेतरी पाणी देणे असे त्याचे एक ना अनेक किस्से अजूनही पुढे येतच आहे. खरातने बायकांचे शोषण केले असे म्हटले जात आहे पण काही चित्रफितीत महिलांचा त्याला काही विरोध होताना दिसत नाही. 

    या महिला अशा बाबा लोकांच्या आहारी कशाच काय जातात ?  या बुवांमध्ये बायकांना असे काय दिसते ? त्या त्यांच्याकडे इतक्या आकृष्ट का होतात ? ते म्हणतील तसे या बायका कशा काय करतात ? हा खरे तर संशोधनाचा विषयच आहे. सगळ्याच बायका बुवांच्या आहारी जातात असे मी म्हणत नाही किंवा अत्रेंनाही तसे अभिप्रेत नसेल पण बुवांच्या मागे बायका जास्त जातांना दिसतात हे कोणी नाकारू शकत नाही. ब-याच वर्षांपूर्वी मी वाचलेल्या एका लेखात याच प्रकारचा उहापोह केला होता. तेंव्हा त्या लेखकाने ज्या बायका एकाकी झालेल्या असतात. विवाह उपरांत काही कालावाधी नंतर पती कडून दुर्लक्षिल्या गेल्या असतात त्या बायका अशा भोंदू बाबांकडे आकर्षिल्या जातात आणि मग फसवल्या जातात त्यानंतर पश्चातापाने दग्ध होऊन अश्रू ढाळतात. असे मत त्या लेखकाने मांडले होते.

    नैराश्यग्रस्त लोक सुद्धा अशा भोंदू बाबांच्या नादी लागतात. आपल्याला काही तरी मानसिक बळ मिळेल, बाबा आपली सगळी संकटे दूर करतील असे त्यांना वाटत असते. परंतू एकदा का अशा बाबाचे बिंग फुटले की मग ते भानावर येतात. आपल्या देशात अशा अनेक भोंदू बाबा, महाराज यांच्यावर कारवाया होऊन, काहींना तर अटक झालेली पाहुनही आपले भारतीय लोक , इतकेच काय तर राजकारणी, मंत्री, एवढेच काय तर महिलांसाठी कार्य करणा-या महिला आयोगाच्या अध्यक्षा असे लोक या भोंदू लोकांच्या आहारी जातात हे पाहून खंत वाटते. 'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला.

     आपल्या देशात महाराज, भोंदू बाबा व राजकीय लोकांचे संबंध असल्याची खरातसारखी अनेक उदाहरणे यापुर्वीही घडली आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेवेळी धीरेंद्र ब्रह्मचारी या तांत्रिकाची मोठी वट होती, चाळीसगाव परिसरात जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करणारा धर्मभास्कर वाघ याचेही प्रकरण खुप गाजले होते. राजकारणात त्यानेही दबदबा निर्माण केला होता. राम रहीम, आसाराम बापू ही उदाहरणे तर ताजीच आहे. बरेच वेळा हे भोंदू बाबा अंधश्रद्धाळू राजकीय लोकांना हेरून मग त्यांनाच हाताशी धरून आपले बस्तान बसवत असतात. 

   अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी आज भारतीय नारी सुज्ञ, सुशिक्षित झालेली आहे. अनेक चांगल्या महिला चांगले कार्य करीत आहे त्यांना खऱ्या-खोट्याची चांगली जाण आलेली आहे त्यामुळे अशा बुवा लोकांच्या नादी काही मूर्ख महिला लागतात म्हणून बुवा तिथे बाया म्हणण्याऐवजी बुवा तिथे मूर्ख बाया असा म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

     आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु लोक होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज किती नावे घेऊ? एवढे सारे संत आजही आपल्या सोबत ग्रंथरूपाने अस्तित्वात आहे. 

माझी काया आणि वाणी।गेली म्हणाल अंतः करणी।

परी मी आहे जगजीवनी।निरंतर। 

आत्माराम दासबोध।माझे स्वरूप स्वतःसिद्ध। 

असता न करावा हो खेद।भक्तजनी ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

असे रामदास स्वामींनी तर म्हटले आहे. मग आपल्याला वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त असे वाटत असल्यास आपण या अशा थोर संतांच्या वचनांचा त्यांच्या ग्रंथांचा आधार का घेऊ नये ? त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतल्यास, त्यांना शरण गेल्यास आपल्याला या खरात सारख्या भोंदू बाबांचे खरे रूप समजण्यास जराही वेळ लागणार नाही.   


०५/०३/२०२६

Article about iran , some memories and agitation in India

 इराण, इराणी आणि इराणी चहा .

इराण मधून पारशी लोक आले ते इथलेच झाले, इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, इथल्या मोठा विकासास हातभार लावला त्याप्रमाणे या देशात झालेल्या इतरांनीही त्याचे अनुकरण करायला नको का ?

इराणवर अमेरिका आणि इजरायलने हल्ले केल्यानंतर इराण बाबत त्वरीत उहापोह सुरु झाला. आजकाल मिडीया सोशल मिडीयावर इतकी भाऊगर्दी झाली आहे की विचारता सोय नाही. सर्वच विषयांवर एका पाठोपाठ एक असे लिखाण, मथळे येतं राहतात. इराणवरील आक्रमणाबाबत सुद्धा तसेच झाले. इराण, पर्शिया, तेलसाठे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल, युद्धात सामील देशांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, इराणनी लपवून ठेवलेली युद्ध सामग्री सगळे-सगळे मिडीया व सोशल मिडीयावर धडाधड येऊन धडकले. म्हटले आता या अशा इराणी भाऊगर्दीत आपण काय लिहावे ? आणि बस इराणी शब्द डोक्यात आला आणि देवा शपथ खरे सांगतो खोटे सांगणार नाही या उक्ती प्रमाणे सर्वात पहिले आठवली ती अरुणा इराणी आता तुम्ही म्हणालं अरुणा इराणी मध्ये असे काय आठवण्यासारखे ? तर अगदी बरोबर आहे, पण बऱ्याच सिनेमात ती दिसली आणि इराण विषयावरून आठवली. तशी ती काही एकदमच वाईटही होती असेही नाही. सहनायिकेच्या भूमिका चांगली करायची बिचारी. आता मनुष्याला कोणत्या वेळी नेमकी कोणती गोष्ट आठवेल याच्यावर काही नियंत्रण नसते त्यामुळे इराण विषयाने इराण, इराणी असे शब्द आठवल्यावर पहिले अरुणा इराणी, 

मग त्यानंतर आठवला तो बोमन इराणी. बोमन इराणीचा चित्रपटात प्रवेश तसा त्याच्या वयाच्या उशिरानेच झाला परंतु त्याने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला. त्याही पूर्वी हिंदी सिनेमांमध्ये हनी इराणी आणि डेझी इराणी अशा दोन बालकलाकार होत्या. हनी आणि डेझी या दोघी एकच होत्या की वेगवेगळ्या ? हा आणखी अधिकचा शोध लावण्याच्या भानगडीत मी काही पडलो नाही परंतु कुठेतरी हनी इराणी ही सुप्रसिद्ध चित्रपट कथा लेखक जावेद अख्तर यांची पत्नी असल्याचे वाचले होते तसेच तिने काही चित्रपटांच्या कथा सुद्धा लिहिल्या होत्या हेही आठवले. आणि हो एवढेच काय तर मानेक इराणी सुद्धा आठवला. 

याचे नांव मानेक होते की माणिक हे सुद्धा हाडाचे सिने अभ्यासकच सांगू शकतील. पण इराणी म्हटल्यावर मानेक हेच त्याचे नांव असावे कारण माणिक हा मराठी शब्द. तर हा मानेक इराणी म्हणजे कोण ? हा अनेकांना प्रश्न पडला असेल पण बऱ्याच वाचकांना बिल्ला म्हटल्यावर नक्कीच तो नक्कीच आठवेल याची मला खात्री वाटते. गाजलेल्या हिरो सिनेमात व्हिलनचा असिस्टंट दाखवलेला बिल्ला याचे खरे नाव मानेक इराणी होते पण हिरो सिनेमामुळे सर्व लोक त्याला बिल्ला म्हणूनच ओळखू लागले. तर असे हे इराण वरून पडलेल्या इराणी नावा संबंधीचे पुराण.

     दुसरी आठवलेली गोष्ट म्हणजे भारतीयांचे आवडते पेय अर्थात चहाची. इराणी आणि चहा या योगाची. आपला भारत देश म्हणजे इतर अनेक देशातील नागरिकांचा आश्रयदाता. इतका आश्रयदाता की पिढ्यांपिढ्या पासून येथे राहत असलेल्या मूळ भारतीय नागरिकांना आता त्याचा त्रास व्हायला लागला. तसेच पूर्वाश्रमीच्या पर्शिया मधून म्हणजेच आताच्या इराण मधून इराणचे मूळ रहिवासी असलेले जे पारशी लोक होते त्यांना मुस्लिमांनी निष्कासित केल्यावर या लोकांनी आवो जावो घर तुम्हारा असे असलेल्या आपल्या भारतात आश्रय घेतला. पण हे पारशी लोक इतर घुसखोरांसारखे नव्हते हे इथे राहिले आणि यांनी या देशाच्या विकासात सुद्धा हातभार लावला. भारतात त्यांना इराणी म्हणून ओळखले जाऊ लागले. या इराणी लोकांनी मग भारतातील काही शहरांमध्ये निरनिराळे  व्यवसाय सुरू केले त्यातच एक व्यवसाय होता चहाचा, इराणी चहा. विशेषतः मुंबईत स्थायिक झालेल्या इराण्यांनी त्यांच्याकडच्या  पद्धतीचा चहा त्यांच्या हॉटेल मधून ग्राहकांना देणे सुरू केले. हा इराणी चहा खूप लोकप्रिय झाला. आजही काही इराणी चहाची दुकाने मोठ्या शहरांमध्ये टिकून आहेत. हा चहा लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे. चहाची पत्ती "दम' अर्थात मंद आचेवर पाण्यामध्ये बराच वेळ उकळून नंतर त्यात आटवलेले दूध, साखर मिसळायचे आणि मग तो चहा प्यायचा. या पद्धतीचा चहा लोकांना आवडला. या चहा सोबत इराणी चहावाले बन मस्का सुद्धा देत असत. यांची चहाची दुकाने सुद्धा त्यांची संस्कृती दाखवत असत.

   इराण वरील हल्ल्यामुळे तत्संबंधीत अनेक बाबी आठवल्या असल्या तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अयातुल्ला खामनेई या इराणच्या अध्यक्षाला अमेरिका व इजरायलने ठार केल्यावर आणि विशेष म्हणजे काही मुस्लिम देश अमेरिकेच्या बाजूने असल्यावरही खामनेई प्रति उफाळून आलेले भारतातील  मुस्लिमांचे प्रेम. हजारो किलोमीटर दूर असलेला माणूस आपल्या भारतातील लोकांचा रहबर कसा असू शकतो ? इथले अनुदान, इथल्या सुविधा, इथल्या योजना यांचा लाभ घ्यायचा आणि रहबर मात्र अन्य कुणी ! आमचा बाप मेला असे ते कसे म्हणू शकतात ? त्याच्याविषयी प्रेम दाखवणाऱ्या त्या छाती पिटून विलाप करणा-या महिलांना त्या देशात पाठवले तर त्यांच्या लक्षात येईल की तिथे महिलांची काय स्थिती आहे. आपल्या देशाप्रमाणे तेथील महिलांना मोकळीक किंवा हक्क आहेत का ?

     या इराण पुराणा वरून शेवटी हेच म्हणावेसे वाटते की ज्याप्रमाणे अनेक वर्षांपूर्वी येथे इराण मधून पारशी लोक आले ते इथलेच झाले, इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, इथल्या मोठा विकासास हातभार लावला त्याप्रमाणे या देशात आलेल्या इतरांनीही त्याचे अनुकरण करायला नको का ? त्यांच्यापासून काही बोध घ्यायला नको का ?

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव

9403256736

१२/०२/२०२६

Tribute to Durdarshan News Anchor Sarala Maheshvari

 उन्होने कहा....

तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती.

गेल्या बारा वर्षापासून दर गुरुवारी लेख लिहिण्याचा माझा शिरस्ता आहे. या शिरस्त्यानुसार प्रत्येक गुरुवारी निदान एक लेख लिहिला जातो. तो लिहिण्यासाठी सुद्धा एक दोन दिवस आधीपासून तयारी करावी लागते. क्वचित प्रसंगी एकदम वेळेवर सुद्धा लिखाण होते. परंतु आजचा हा  गुरुवार असा उजाडला की आजच्या दिवशी प्रथमच दुसरा लेख सुद्धा लिहिला. हा लेख लिहायला भाग पडण्याचे कारण सुद्धा तसेच होते. किमान माझ्या दृष्टीने तरी. आजच्या गुरुवारी हा दुसरा लेख लिहिण्याचे कारण असे की, फेसबुक वर दूरदर्शनवरील जुन्या हिंदी वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांच्या निधनाची फोटोसह असलेली बातमी वाचनात आली. धक्का बसला. सरला माहेश्वरी यांच्या ज्या काही असतील त्या आठवणी ताज्या झाल्या. किशोर वयात असताना  टीव्हीवरील अर्थातच  दूरदर्शनवरील एक वृत्त निवेदिका हाच काय तो त्यांच्याशी असलेला संबंध. त्या काळात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असल्यामुळे जो कार्यक्रम दूरदर्शन दाखवत असे तो पाहणे क्रमप्राप्त असे. मग त्यात बातम्या सुद्धा आल्या आणि त्यामुळे बातम्याही पाहिल्या जात असाव्यात. आम्ही शाळेत असताना माझ्या काकांनी टीव्ही विकत घेतला होता. हे मोठा अँन्टेना घरावर लावला होता. आम्ही सर्व एकत्र बसून टीव्ही बघत असू. बातम्या सुद्धा. दुरदर्शनवर इंग्रजी आणि हिंदी बातम्या देणारे अनेक वृत्त निवेदक होते. रोडका सुमित टंडन,  मिनू,  शुभेंदू अमिताभ, गीतांजली अय्यर,  अविनाश कौर सरीन, मक्ख चेहऱ्याने बातम्या सांगणारी सलमा सुलतान अशी काही नावे आठवतात. यातच सर्वांना आवडणारी आणि या सर्वांमध्ये सौंदर्यात  सरस असणारी, सौंदर्यातच नव्हे तर बातम्या सादर करण्यात सुद्धा सरस असणारी सरला माहेश्वरी. साधी राहणी, सोज्वळ चेह-याची, नेहमी साडी परिधान केलेली, बहुधा तेंव्हा निवेदिकेस साडी अनिवार्यच असावी अशी ही सरला माहेश्वरी बातम्या देण्यास आली की दर्शक खुश होत असत. सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची एक विशिष्ट अशी लकब होती. अस्खलित हिंदीत त्या बातम्या देत असत. सरला माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत्त वाचून धक्का बसला. तशी त्यांच्या बाबत विशेष अशी काही माहिती नव्हती. परंतू निधनाच्या बातमीच्या खात्रीसाठी म्हणून  काही बातम्या आणखी पाहिल्यावर पत्रकार असलेल्या सरला माहेश्वरी ह्या 1990 ते 2005 या कालावधीत त्या राज्यसभा सदस्य होत्या , कम्युनिस्ट होत्या असे समजले. त्यांचा जन्म बिकानेर येथे 1954 मध्ये झाला होता. 

        तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती. शब्दांचे स्पष्ट उच्चारण, योग्य ठिकाणी विराम घेणे , अस्खलित हिंदी बोलणे अशी सरला माहेश्वरी यांची वैशिष्ट्ये होती. त्यातही त्यांचे माझ्या स्मरणात राहिलेले आणखी एक वैशिष्ट्ये आहे मात्र हे  वैशिष्ट्य हेरले होते माझ्या वडीलांनी. माझे वडील काका दोघानांही सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची शैली आवडत असे. कुणी नेते काही म्हणाले अशा आशयाची बातमी असेल तर तेंव्हा त्या "उन्होने कहा" खूपच विशिष्ट प्रकारे म्हणत असत. माझ्या वडीलांनी आम्हा सर्वांच्या हे लक्षात आणून दिले होते आणि आम्हाला सुद्धा त्यांची ती  "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत भावली होती. त्यांची ती विशिष्ट प्रकारे "उन्होने कहा" असे म्हणण्याची शैली त्याकाळी गाजली सुद्धा होती. तेंव्हाच्या बातम्या सांगण्याची पद्धत खूपच साधी आणि संयमित , स्पष्ट , गंभीर अशी होती. आज मात्र बातम्यांच्या विविध वाहिन्यांवर निव्वळ गोंधळ , आक्रस्ताळेपणा चाललेला असतो. 

      सरला माहेश्वरी यांच्या निधनावर अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दूरदर्शन ने सुद्धा त्यांना एक्स  या समाज माध्यमाव्दारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

        विविध व्यक्तींच्या किती नाना प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त-हा  असतात साहेबाच्या भाषेत स्टाईल असते. आणि त्या व्यक्तीच्या त्या विशिष्ट शैलीमुळे, स्टाईलमुळे ते व्यक्ती कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची साधी राहणी , स्पष्ट उच्चारण , हिंदीवर प्रभुत्व अशी शैली होती आणि आणखी म्हणजे लक्षात राहिलेली  अशी त्यांची "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत. म्हणूनच त्यांचे ते गाजलेले  "उन्होने कहा" असे म्हणणे हेच शीर्षक या लेखास द्यावेसे वाटले. 

 आते है लोग , जाते है लोग 

पानी के जैसे रेले , जाने के बाद , 

आते है याद ,गुजरे हुये वो मेले 

सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली