आधार कार्डचा अनावश्यक अट्टाहास

वर्ग सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बऱ्याच ठिकाणी ऐन वेळेवर आधार कार्ड घेऊन जाण्यास सांगितले ते खरोखर आवश्यक आहे का ? आधार कार्डच्या बाबतीत फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावर अथवा कपाळावरच आधार कार्ड नंबरचा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही.
आज वर्ग सातवीची महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. खामगावच्या विविध केंद्रांवर शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहे. परीक्षेस आवेदन करतांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरची माहिती अपलोड केली जाते शिवाय आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा घेतली जाते. शासनाने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वितरित केले जाते. हे प्रवेश पत्र परीक्षेच्या केंद्रावर प्रवेश करण्यास आवश्यक तो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला म्हणजेच तो त्याच्या शाळेचा अधिकृत विद्यार्थी आहे, त्याने त्या शाळेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे, त्या शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याला जी जी कागदपत्रे सांगितली आहे ती त्याने त्या शाळेत सादर केलेली आहे हे स्पष्ट आहे. तरीही ऐन शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना असे सूचित करण्यात आले की परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रवेशपत्रावर मात्र परीक्षेसाठी आधार कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे अशी कोणत्याही स्वरूपाची सूचना दिलेली नाही. तरीही काही शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे असे ऐनवेळी विद्यार्थ्यांना सूचित केले. ही सूचना मिळेपावेतो अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून सुद्धा दिले होते. ऐनवेळी सूचना प्राप्त झाल्यावर आपल्या पाल्य परीक्षेपासून वंचित न राहावा या काळजीने काही पालक घरी येऊन पुन्हा आधार कार्ड आधार कार्डची झेरॉक्स घेऊन खामगावच्या रणरणत्या उन्हात, 42 डिग्री च्या तापमानात पुन्हा परीक्षा केंद्रावर गेले तेथे उपस्थित शिक्षकांना आधार कार्ड झेरॉक्स दिली असता, "दिले तर चालेल" असे त्यांचे विधान होते म्हणजे निश्चित असे काही नाही तुम्ही आधार कार्ड आणले तर चालेल नाही आणले तर नाही तरी चालेल असाच त्यांचा अर्थ होता. म्हणजे एक स्पष्ट अशी सूचना दिली जात नाही आणि त्याने विद्यार्थी व पालकांची harrashment होते.
आज-काल जिथे नाही तिथे आधार कार्ड मागितले जाते. काही ठिकाणी स्पष्ट समजत असते की तो व्यक्ती अधिकृत ग्राहक आहे विद्यार्थी आहे. शिवाय तो व्यक्ती अधिकृततेचे स्पष्ट होणारे सबळ पुरावे सुद्धा त्याच्याजवळ असतात पण तरीही आधार कार्डचा आग्रह धरला जातो. हे योग्य नाही. सर्वच क्षेत्रातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा आणि आवश्यक तेथेच आणि खरोखर जरुरी असल्यास आधार कार्डची मागणी करावी. या देशात घुसखोर येऊन राहतात, नोकऱ्या मिळवतात त्यांना काही होत नाही आणि अधिकृत नागरिकांना मात्र नाहक त्रास दिला जातो हा किती मोठा विरोधाभास आहे. आधार कार्डच्या बाबतीत तर फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावरच नाहीतर कपाळावर आधार कार्ड नंबर चा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही.
या लेखाद्वारे हेच सांगणे अभिप्रेत आहे की सर्व कागदपत्रांची शहानिशा झालेली असल्यावर विनाकारण आधार कार्डचा अट्टाहास करू नये. आधार कार्ड संबंधित समस्त प्रणाली व अधिकाऱ्यांनी याबाबतीत विचार करावा व तसे निर्देश सर्व खात्यांना देण्यात यावे.
विनय वि. वरणगांवकर©
खामगांव








