खामगावकरांना प्रेरणादायी ठरेल सावरकर स्मारक
आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती. सावरकरांबद्दल आज रोजी पावतो अनेक लेख लिहून झाले परंतु वीर सावरकर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की,
सब धरती कागज करू, लेखणी सब वनराय,
सात समुद्र की मसी करू, गुरू गुण लिखा न जाय|
या कबीराच्या दोह्याप्रमाणे सावरकरांचे गुण वर्णनास सुद्धा समस्त पृथ्वीचा कागद केला आणि सर्व वृक्षांपासून लेखण्या बनवल्या, सातही समुद्राची शाई जरी बनवली तरी सावरकरांचे गुणवर्णन करणे शक्य होणार नाही इतके विविध पैलू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती, कवी, लेखक, क्रांतिकारक, समाज सुधारक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू आहे. आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त खामगावच्या रायगड कॉलनी परिसरातील सावरकर उद्यानाजवळ जाणे झाले. या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याच ठिकाणी सावरकरांचा भव्य पुतळा व स्मारक व्हावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे केली असल्याचे कळले. ही मागणी तिथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना रास्तच वाटली कारण तिथे उत्स्फूर्तपणे तशा घोषणा देण्यात आल्या.
ज्या मनुष्याने बालपणापासून मारीता मारीता मरेतो झुंजेन असे म्हणून राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली, स्वतःचा परिवार देशोधडीला लावला. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली समाज सुधारण्याचे इतके मोठे कार्य केले की, सावरकर स्वतःच म्हणाले होते की, "एक वेळेस माझी समुद्रात मारलेली उडी लक्षात नाही ठेवली तरी चालेल परंतु माझे समाज सुधारण्याचे कार्य मात्र लक्षात ठेवावे". स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला सुद्धा येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. सावरकरांच्या या खामगाव नगरीला भेट देण्याच्या आठवणीसाठी म्हणून खामगावला निश्चितच सावरकरांचे एक स्मारक असावे ही जी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे झाली आहे त्या मागणीला समस्त खामगावकरांनी दुजोरा द्यावा असे वाटते. तसे खामगावला सावरकरांच्या नावाने रायगड कॉलनी परिसरात सावरकर उद्यान निर्मिती झालेलीच आहे सुंदर असे हे उद्यान आहे. याच उद्यानाच्या जवळ रायगड कॉलनी परिसरात जर सावरकरांचे स्मारक झाले तर ते सावरकरांच्या आत्म्याला प्रसन्न करणारे ठरेल कारण या परिसराचे नाव रायगड कॉलनी आहे. रायगड अर्थात शिवाजी महाराजांची राजधानी. त्या राजधानीचे नाव या परिसराला दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त होते त्यांनी शिवाजी महाराजांची आरती सुद्धा लिहिली आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे साम्य सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मी समोर स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली होती. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आग्र्याहून सुटका करून घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी जहाजातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनीही शत्रूला भूलवण्यासाठी पत्रे लिहिली होती असे बरेचसे साम्य दोघांच्या जीवनात आपल्याला आढळते. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असल्यामुळे अनेकांशी बोलणे झाले. काही खामगांव सोडून गेलेल्या मित्रांशी सोबत मित्रांशी सुद्धा बोलणे झाले त्यात अनेकांनी सावरकरांचे असे स्मारक झाले तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे असे म्हटले तसेच काहींनी स्मारका सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ग्रंथसंपदेचे एक ग्रंथालय सुद्धा असावे असे मत व्यक्त केले तर काहींनी याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध रोमहर्षक प्रसंगांच्या चित्रांचे सुद्धा एक दालन असावे असेही मत व्यक्त केले. खामगांव शहरात अनेक सावरकरप्रेमी आहेत या सर्वांचे मत सुद्धा या निमित्ताने घेण्यात यावे. सावरकरांच्या स्मारकाला सनदशीर मार्गाने परवानगी मिळाल्यावर पुतळा बांधकाम हे सुद्धा भव्य व उत्कृष्ट असावे, पुतळ्यावर एक छत्री सुद्धा असावी. सावरकरांचे काम भव्य दिव्य होते त्यांचा पुतळा पाहिल्यावर पाहणाऱ्याचे रोम रोम फुलले पाहिजे, त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले पाहिजे, सावरकरांचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे या प्रकारचे ते स्मारक असावे.
विश्व हिंदू परिषदेने केलेल्या सावरकरांच्या स्मारकाच्या मागणीच्या अनुषंगाने खामगांवला व त्यातही रायगड कॉलनी परिसरात सावरकरांचे स्मारक कधी झाले तर ते खामगांवकर व युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
.jpeg)






