Click "Follow" Button below To Follow this Blog

२२/०१/२०२६

Article about sahar shekh viral statement "kaisa haraaya"

 कैसा हरायाssssss !


ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली तरी या निकालावरून आगामी वाटचालीचा अंदाज जनतेला आला आहे. सर्वच पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा अंदाज सुद्धा या निकालामुळे आला असेलच व या यातून ठाण्यातील शरद पवार गट थोडा तरी बोध घेतील असे वाटते.

ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड नंबर 30 मधील मुंब्रा मधून एआयएमआयएमच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक जिंकलेल्या युनूस शेख या शरद पवार गटाच्या एकेकाळच्या चांगल्या सहका-याच्या कन्येचा अर्थात सहर शेख यांचा  "कैसा हरायाssss" हा व्हिडिओ सोशल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यामुळे युनूस शेख यांनी त्यांच्या कन्येला एआयएमआयएमची उमेदवारी मिळवून दिली होती. एम आय एम चा उमेदवार मुंब्र्यात निवडून येणे यात तसे काही विशेष असे नाही मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग झाला आहे. एम आय एम चा उमेदवार तिथे निवडून येणे यात काही विशेष असा आनंद नाही. परंतु ज्या नेत्याला उद्देशून सहर शेख "कैसा हराया" असे म्हणाल्या त्या नेत्याला निवडणुकीत बसलेल्या फटका-याबद्दल तसेच सहर शेख आणि युनूस शेख यांनी जाहीर सभेतून केलेल्या शाब्दिक फटकारीबद्दल मात्र अनेकांना हायसे वाटले. ते नेते नेहमीच कोणत्यातरी गुर्मीत, कोणत्यातरी आवेशात, कोणत्यातरी अहंकारात वक्तव्ये करीत असतात. त्यांच्या मतदारसंघात असलेल्यांना खुश करण्यासाठी ते इतरांवर मात्र शाब्दिक वार करत असतात, तोंडसुख घेत असतात. त्यामुळे कैसा हराया ही चित्रफित खूप लोकप्रिय झाली आहे. लोकप्रिय होण्याचे कारण हेच आहे की ज्या नेत्याला उद्देशून ते म्हटले आहे त्या नेत्याला असे जाहीर सभेत असे कोणीतरी डिवचले आहे. आपल्या भाषणात सहर शेख यांनी "उनके घमंड की धज्जिया उडायी" असे सुद्धा म्हटले. आणि खरोखर ज्यांच्यावर त्या टीका करत होत्या, ज्यांचा  खरपूस समाचार घेत होत्या त्या नेत्यांचा अहंकार त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत असतो.

काही वर्षांपूर्वीचे अनंत कुरमुसे प्रकरण जनता अजून विसरलेली नाही. समाज माध्यमावर अनंत कुरमुसे यांनी या नेत्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केले होते तेव्हा या व्यक्तीच्या पाठीवर त्याला बंगल्यावर आणून कोरडे ओढले गेले होते. त्यानंतरही त्यांची अशी  गैरवर्तणूकीची प्रकरणे घडल्याचे बोलले जाते. अशी प्रकरणी झाल्यानंतर सुद्धा माझेच कसे बरोबर आहे हे रेटण्यासही हे नेते मागे हटले नव्हते. एका गरीब व्यक्तीवर अन्याय करणे सोपे असते. या अशा नेत्याचे एकेकाळचे मित्र असलेल्या शरद पवार गटाच्या युनुस शेख यांनी म्हटले की, "अल्लाहने हिजाबवाली बेटी को पुरे भारत मे फेमस कर दिया" पण  निवडणुकीत निवडून येणाऱ्या सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बेटी हिजाबवाली असो किंवा नसो कार्य मात्र जनतेसाठी झाले पाहिजे, देशासाठी झाले पाहिजे पण नेमके हेच होताना दिसत नाही.

आज युनूस शेख हे त्यांना जाहीर सभेत अर्वाच्य भाषेत बोलले, शिवीगाळ केली तेव्हा अनंत कुरमुसेच्या पाठीवर फटके मारल्याचा आरोप झालेले हे नेते आता युनूस शेख यांचे काय वाकडे करणार आहेत ते त्याकडे जनतेचे डोळे लागले आहे.

सहर शेख यांचे पूर्ण मुंब्रा आता हिरवा करायचा आहे. हे विधान सुद्धा वादग्रस्त असल्याचे माध्यमांमध्ये झळकल्यावर त्याबाबत सुद्धा बरीच चर्चा होत आहे. मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग आहे परंतु लोकशाही असलेल्या या देशात एखाद्या विशिष्ट समाजाचे साम्राज्य असावे असली भाषा करणे योग्य नाही. नंतर मात्र सहर शेख यांनी सारवासारव  केली आणि त्यांच्या पक्षाचा रंग हिरवा असल्या म्हणून तसे म्हटले असे त्या म्हणाल्या. पक्षाचा रंग भगवा असता तर भगवा म्हटले असते असे सुद्धा त्या म्हणाल्या. तसेच सहर शेख जेंव्हा अल्लाह मुळे निवडून आली असे म्हणाल्या त्याचबरोबर त्यांनी, त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार हा संविधानामुळे मिळाला आणि ही संविधानाची सुद्धा ताकद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्या निवडून आल्या असे सुद्धा म्हणायला पाहिजे होते. असे जर म्हटले असते तर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली असती आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा आणखी व्हायरल झाला असता.

या ठिकाणी हेच सांगावेसे वाटते की एखादा मतदारसंघ किंवा एखादा भाग, प्रभाग हा आपलीच सत्ता आहे असे समजून तेथील जनतेला गृहीत धरून नेत्यांची वागणूक असू नये. जनता केंव्हा फटका मारेल याची काहीच शाश्वती नसते. असाच फटका मारत,  कैसा हराया असे म्हणत  सहर शेख यांनी त्यांना डिवचले. चार ठिकाणी एमआयएमच्या जागा आल्यावर एक प्रकारे युनूस शेख यांच्या करवी विरोधकाला फटकारच बसली आहे. ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली तरी या निकालावरून आगामी वाटचालीचा अंदाज जनतेला लागला आहे. सर्वच पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा अंदाज सुद्धा या निकालामुळे आला असेलच व या यातून ठाण्यातील शरद पवार गट थोडा तरी बोध घेतील असे वाटते.

१५/०१/२०२६

Article about new changes in NEET PG exam marks

 नीट पण कशाला घेता ?


सरकारला जर वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवायच्या असतील तर त्या खुशाल वाढवाव्यात परंतू तेथे प्रवेशांसाठी नीट मधील गुणांची पात्रता इतकीही कमी करू नये की जेणे करून  भारतातील भविष्यातील आरोग्य व्यवस्था ही मोडकळीस येईल.

     नीट पीजी परीक्षांमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट या पात्रता परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची पर्सेंटाईलची जी अट होती, जे निकष होते म्हणजेच  जो कट ऑफ असतो त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे.  काही वर्गवारीसाठी शून्य पर्सेंटाईल वर म्हणजेच  -40 गुण असलेल्या विद्यार्थ्यास सुद्धा आता प्रवेश मिळणार आहे. असेच निकषांचे बदल इतर वर्गवारीसाठी सुद्धा करण्यात आले आहे परंतु इतर वर्गवारीस मात्र 7  पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळवावे लागणार आहे. भरपूर उपलब्ध जागा हे कारण या बदलांसाठी दाखवण्यात आले आहे. 

     शिक्षण क्षेत्रात निव्वळ प्रयोगांचा भडीमार लावलेला आहे वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्था यात व्यवसाय पाहून अनेक दिग्गजांनी उड्या घेतलेल्या आहे. यातील व्यवसाय पाहूनच या क्षेत्रासाठी लागणारे वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य यांच्या किमतीत सुद्धा मोठी भरमसाठ वाढ झाली आहे व दरवर्षी होत आहे. शाळा, कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस यांचे शिक्षण शुल्क हे गगनाला भिडले आहे. सामान्य माणसाला त्याच्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवणे आज अशक्य झालेले आहे. आणि जरी त्याला बनवायचे असले तरी त्याला पैशांसाठी खूप आटापिटा करावा लागतो. असे चित्र सध्या भारतभर दिसत आहे. 

     नीट बद्दल बोलायचे झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर येणारा विद्यार्थी हा इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारा, वैद्यकीय सेवा देणारा असा डॉक्टर म्हणून काम करणारा होणार असतो. मनुष्याच्या शरीरात काय घडते आहे, काय नाही ? याचे अचूक निदान त्याला करायचे असते. त्यामुळे त्याला मनुष्य शरीरशास्त्राचा, विविध आजारांचा सूक्ष्म असा अभ्यास करणे जरुरी असते शिवाय त्यात निष्णात बनायचे असते तरच तो रुग्णाची योग्य पद्धतीने तपासणी व रोगाचे निदान करू शकणारा असा तज्ञ डॉक्टर होऊ शकतो. शून्य टक्के पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात जबरदस्तीने आणून भविष्यात रुग्णाच्या जिवाशी खेळणारा डॉक्टर बनवण्यात सरकारला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे ? हा प्रश्न जनतेला नक्कीच पडणार आहे. स्पेशालिस्ट म्हणून रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर खरोखर तो डॉक्टर स्पेशालिस्ट झालेला असा असेल का ? त्याची डॉक्टर बनण्याची पात्रता नसतानाही त्याला फक्त जागा भरपूर आहे म्हणून जबरदस्तीने डॉक्टर बनवण्यात काय अर्थ ? 

     वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांचे अनेक प्रताप आपल्याला वाचनात येत असतात. कधी पोटात कैची विसरणे तर कधी कापूस विसरणे कधी ज्या ठिकाणचे ऑपरेशन करायचे त्या ठिकाणाऐवजी भलतेच ऑपरेशन करणे, दुखणारा दात काढण्याऐवजी न दुखणारा दात काढणे तर कधी मृत व्यक्तीला दवाखान्यात दाखल ठेवून पेशंटकडून बिल उकळणे असे अनेक किस्से, अनेक घटना वाचनात येतच असतात. आता असे मायनस मध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी डॉक्टर बनणार तर मग अशा किस्स्यांमध्ये आणखीनच मोठी वाढ होण्याची संभावना आहे.

      वरील अनुषंगाने येथे हे नमूद करावेसे वाटते की, सरकारला जर वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवायच्या असतील तर त्या खुशाल वाढवाव्यात परंतू तेथे प्रवेशांसाठी नीट मधील गुणांची पात्रता इतकीही कमी करू नये की जेणे करून  भारतातील भविष्यातील आरोग्य व्यवस्था ही मोडकळीस येईल.  आज quality अर्थात गुणवत्तेचा जमाना आहे. लोक जास्त पैसे मोजायला तयार आहे परंतु त्यांना मग तशा सुविधा, त्या सुविधा देणारे तसे तज्ञ व निष्णात लोक सुद्धा पाहिजे असतात. आरोग्य यंत्रणेकडे मात्र अशा लोकांची वानवा होईल आणि ही वानवा केंद्र सरकारच्या या नीट पीजीच्या पात्रतेच्या गुणांच्या शिथिलतेमुळे निर्माण होणार आहे.

     भारतात वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रात विनाकारण कमी गुण मिळणारे व उच्च गुणवत्ताधारक यांना एकाच रांगेत आणण्याचा प्रयत्न केला जातो. गुणांचे निकष एवढेच कमी करायचे असतील तर कशालाच ती नीट परीक्षा ठेवता ? सर्वांनाच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश खुले करून टाका ना ! असेच येथे म्हणावेसे वाटते.

०१/०१/२०२६

Article about kalpataru divas

स्मरण कल्पतरू दिवसाचे


आजचा दिवस हा इंग्रजी वर्षाचा प्रारंभ होणारा दिवस असला तरी तो भारतात मोठ्या उत्साहात  साजरा होतो. परंतु या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे याच दिवशी 1886 रोजी एक महत्त्वपूर्ण अशी चमत्कारिक, अध्यात्मिक घटना काशीपूर (कोसीपोर) उद्यानामध्ये घडली होती.

आज इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच एक जानेवारी 2026. या दिवशी जगभर लोक नवीन वर्षाचे स्वागत करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. हा जरी इंग्रजी वर्षाचा प्रारंभ होणारा दिवस असला तरी भारतामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अतिउत्साहात म्हटले तरी वावगे होणार नाही. परंतु या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे याच दिवशी 1886 रोजी एक महत्त्वपूर्ण अशी अध्यात्मिक घटना काशीपूर (कोसीपोर) उद्यानामध्ये घडली होती. काशीपूर उद्यान हे कोलकात्या जवळ आहे आणि याचे महत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांनी याच उद्यानात त्यांच्याभोवती उपस्थित शिष्यांना  शिष्य तसेच भक्तमंडळीला आशीर्वाद दिले होते. रामकृष्ण परमहंस हे गायन, भजन करता-करता समाधीमध्ये लीन होऊन जात असत. त्यांची ती भावावस्था पाहूनच स्वामी विवेकानंद यांच्याकडे आकृष्ट झाले होते आणि उच्चविद्याविभूषित असूनही त्यांनी अल्पशिक्षित अशा रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानले होते. रामकृष्ण परमहंस यांच्या तशा अनेक कथा प्रचलित आहे. ते राणी रासमणी स्थापित काली मंदिरात पुजारी होते. कालीमातेचे निस्सिम भक्त होते. ईश्वर हा सर्वांमध्येच असतो असे त्यांचे म्हणणे असे. ते पूजा करता-करता पूजेत एवढे तल्लीन होऊन जात असत की पूजा करता-करता देवाशी बोलत असत आणि तर कित्येकदा देवीऐवजी स्वतःच्याच डोक्यावर फुल वाहत असत.  इतकी त्यांची तल्लीनता असे. केशवचंद्रसेन, ईश्वरचंद विद्यासागर, मास्टर महाशय असे सर्व ज्ञानी, उच्चविद्याविभूषित मंडळी त्यांना मान देत असत, त्यांचा आदर करत असत. 

     एक दिवस म्हणजेच एक जानेवारी 1886 रोजी श्री रामकृष्ण परमहंस काशीपूर उद्यानात आपल्या शिष्यांसमवेत बसले होते काहीतरी भजन, कीर्तन, प्रवचन सुरू होते. त्याच दरम्यान सर्व उपस्थित शिष्यांना त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये आध्यात्मिक चेतना जागृत झाली आणि त्यांना मुक्तीचा मार्ग मिळाला. ज्याप्रमाणे कल्पतरू खाली बसल्यावर व कोणतीही इच्छा प्रगट केल्यावर तो कल्पतरू, तो वृक्ष ती इच्छा पूर्ण करतो असे म्हटले जाते त्याचप्रमाणे भक्तांची आध्यात्मिक चेतना जागृतीची आणि मुक्तीची जी इच्छा होती ती रामकृष्ण परमहंस यांनी पूर्ण केली म्हणून या दिवसाला कल्पतरू दिवस असे म्हटले जाते. हा दिवस रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन तसेच विवेकानंद केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

     या दिनी उपरोक्त ठिकाणी विशेष पूजा, वैदिक मंत्रोच्चार, भजन प्रवचन तसेच रामकृष्ण कथामृताचे पठण केले जाते. याशिवाय याच दिवशी भक्त एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करतात. 

    हा दिवस आध्यात्मिक चेतना जागृतीचा, नवीन वर्ष हे आध्यात्मिक वर्ष व्हावे अशी इच्छा प्रगट करणारा असावा म्हणून अशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. 

     आज इंग्रजी  वर्षारंभ आहे. 31 डिसेंबर पासून बहुतांश लोक हे विविध पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन करीत असतात, एन्जॉयमेंट चे वेध त्यांना लागलेले असतात. असते तर इंग्रजी नवीन वर्ष पण त्याचा उत्साह, ते साजरे करण्याचा जोम,  हा इंग्रजांपेक्षा आपल्या भारतीयांमध्येच जास्त दिसून असतो. अशा या दिवशी म्हणजेच 1 जाने 1886 ला रामकृष्ण परमहंस यांनी काशीपूर उद्यानात भक्तांची अध्यात्मिक चेतना जागृत केली होती , तेथे उपस्थित सर्वांनाच मुक्ती मिळवून दिली होती. आज एक जानेवारी रोजी या घटनेचे स्मरण व्हावे म्हणून हा लेख लिहावासा वाटला. 

     इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह सर्वांना रामकृष्ण परमहंस, माँ  सारदा, स्वामी विवेकानंद यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे हीच सदिच्छा. 



१८/१२/२०२५

Article about Jujube, Chinese date, Ber

"जुजुबे"चे दिवस आणि आठवणी

आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ?

      हे काय नवीन जुजुबे ? असा प्रश्न ब्लॉग वाचकांना पडला असेल. तर तो आता हा लेख वाचला की उलगडेलच.

का रे तुम्ही काही बोरं, सुर्यफुलाच्या बिया खात नाही का रे ? शाळेमध्ये वाढणारा चिप्स, कुरकुरे आणि तत्सम पदार्थाच्या पाकिटांचा कचरा पाहून मी माझ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थी अनुत्तरीत होते. पुर्वी शाळांमध्ये विद्यार्थी बोरे, चिंचा, आवळे, सुर्यफुलांच्या बिया असे पदार्थ खात व त्यामुळे बोरांच्या आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ? का त्यांना या रानमेव्या पेक्षा मॅगी, पिझ्झा, बर्गर इ. असे फास्ट फूड आवडू लागले ? असा प्रश्न मला पडला. दुसऱ्या दिवशी माझ्या परिचित रस्त्याने शाळेत जातांना नित्य परिचित अशी ठिकाणे दृष्टीस पडत होती. अनेक स्थानांमध्ये नवीन बदल झाले होते. कालच्या मुलांना विचारलेला  अनुत्तरीत प्रश्न माझ्या मनात घोळत होताच. शाळेत जातांना मी लहान असताना ज्या ठिकाणी बोरं विकणारी लोक बसत ती ठिकाणे सुद्धा मला दिसली परंतु आता त्या ठिकाणी एकही बोरं विक्रेता माझ्या काही दृष्टीपथास आला नाही. सरकारच्या फुकटछाप योजनांमुळे पूर्वीचे अनेक व्यवसाय लोकांनी जवळपास सोडूनच दिले आहे. अगदी नगण्य अशा संख्येत काही विक्रेते मात्र आजही टिकून आहे. माझ्या लक्षात आले की हा रानमेवा विकणारे लोकच जर नसतील तर मुले असा रानमेवा घेणार तरी कुठून ? आम्ही शाळेत असतांना प्रत्येक शाळेच्या बाहेर रानमेवा, विकणारे गुळपट्टी आदी घरी बनवलेली पदार्थ विकणारे लोक असत. आता मात्र जास्तीत जास्त प्रमाणात पॅकड फूड विकणारेच शाळा परिसरात विक्रीला आलेले दिसतात. महाविद्यालयात असतांना आमच्या महाविद्यालयाच्या मागे कित्येक अशी बोरांची झाडे होती. आम्ही त्यांचा खूप आस्वाद घेत असू. कुणाला कच्ची बोरे आवडत तर कुणाला पिकलेली, कुणाला चण बोरं (एकदम बारीक आणि लाल बोरं ) आवडत. काहींना शेंबडी बोरे आवडत असत. ज्या बोरांमध्ये द्रवरूप असा मगस असतो अशा बोरांना कुणीतरी, कधीतरी शेंबडे बोर असे नांव पाडले असावे. या बोरांच्या बिया मग काही व्रात्य पोरे शाळा, महाविद्यालयाच्या भिंतीवर फेकून त्या भिंतीला चिटकवत असत. आता बोरांच्या ऋतूत बोरे काही विकायला येत नाही. गावाच्या बाहेर लदबदलेल्या बोरीच्या झाडांभोवती पोरांची गर्दी दिसत नाही. असा पण काय हा बदल व्हावा ? का असा बदल व्हावा ? मी शाळेत पोहोचलो, शाळा सुटल्यावर घरी जातांना गावातून गाडी घेतली आणि कोण जाणे कसा एक व्यक्ती बोरं घेऊन बसलेला मला दिसला... "लॉ ऑफ ॲट्रक्शन"  का कशामुळे तो तिथे आला असावा असा प्रश्न मला पडला. मी आनंदाने त्याच्याकडे गाडी घेतली....माझ्या अचानक गाडी वळवल्याने एका व्यक्तीला अडचण सुद्धा झाली. मी मानेनेच त्याला माफीचा इशारा केला त्यानेही तो उदार मनाने स्वीकारला. बोरं विक्रेत्याकडून बोरे घेतली...पुर्वी दिसणारी मापे आता मात्र नव्हती... बोरं विक्रेत्याची चौकशी केली. त्यांचे नांव रमेश बोदडे असे होते. "मी अनेक रानभाज्या व फळे आणतो सर" त्यांच्या या उद्गारावर "हो तुमच्याकडून मी अनेकदा भाज्या इ घेतले आहे" असे मी म्हटल्यावर त्यांनी ओळखले. त्याच्याकडे नागपुरी बोरे होती. आपोआप माझा हात खिशात गेला आणि मी मोबाईलवर त्यांचा फोटो घेतला.


     बालपणीच्या जुन्या बोरं विक्रेत्याच्याच जागी म्हणजे एकबोटे चौक, संत पाचलेगांवकर महाराज मार्ग खामगांव या ठिकाणी हा नवीन बोरं विक्रेता मला दिसला होता. इतर जुन्या बोरं विक्रेत्यांच्या जागा जशा नॅशनल हायस्कूल, सहा नंबर शाळा, अलका लॉज समोरील जागा या जागा मात्र हल्ली बोरांच्या दिवसात रिक्तच असतात. गतवर्षी जिल्हा परिषद शाळेसमोर सुद्धा एक बोरं विक्रेता दिसला होता त्यावेळी मी त्याची चित्रफित बनवली होती. घरी जातांना माझ्या मनात बोरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या होत्या. माझे वडील फळ फळावळांचे चाहते, त्यामुळे ते आम्हाला विविध प्रकारची फळे खाऊ घालत, बोरं पण खूप आणत. माझे मामा जळगांवला राहत ते आमच्यासाठी मेहरुणची बोरे आणत. मेहरूणची बोरे गोड म्हणजे गोडच असत. नागपुरी बोरं असतात गोड पण किडके जास्त असतात. हल्ली नवीन निघालेली ॲपल बोरं ज्यांनी गावरान बोरं चाखली आहे त्यांना आवडत नाही. आयुर्वेदात सर्वच फळांचे जसे महत्व सांगितले आहे तसेच बदर अर्थात बोर. बोराचे सुद्धा पित्त, वात नाशक, शक्तीवर्धक, उष्णता रोधक म्हणून महत्व सांगितले आहे. बोरकुट हा एक चांगला पदार्थ सुद्धा आता दुर्मिळ झाला आहे. मला दिसलेल्या त्या विक्रेत्याकडून मुलांसाठी थोडी बोरे घेऊन घरी गेलो.  बोरांच्या दिवसात अशा बोरांबाबतच्या स्मृती ताज्या झाल्या. बोरांना इंग्रजीत jujube असा हा शब्द आहे. जुजुबे हा शब्द डेट्स म्हणजेच पेंड खजूर साठी सुद्धा काही प्रदेशात वापरला जातो.  बोरे, बोरकुट असा हा रानमेवा बाजारात पुन्हा जोरदार उपलब्ध व्हावा सर्वांनी तो खावा आणि आपल्या बालगोपालांना सुद्धा त्याची गोडी लावावी असे मला वाटले.

     दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो मधल्या सुटीत एक विद्यार्थी माझ्या जवळ आला आणि सर तुमच्यासाठी एक गंमत आणली म्हणून एक पुडके माझ्यापुढे ठेवले. मी उत्साहाने ते उघडले त्यात बोरं होती...मी त्याच्याकडे कौतुकाने, आनंदाने बघत राहिलो. या मुलांना अशीच अस्सल पदार्थांची गोडी वाटत राहावी असे माझ्या मनात आले मी त्याने दिलेल्या बोरांतील चार - पाच बोरे उचलून उरलेली बोरे इतर विद्यार्थ्यांना वाटण्यास सांगितली. 


 

११/१२/२०२५

Article about increasing no of leopards and their attack.

 बिबटे उदंड जाहले


बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेषात आले तर मग ही भिती किती वाटेल हे विचारूच नका. बिबट्यांच्या वाढत्या संख्ये बाबत हा ऊहापोह.

गत बुधवारी नागपूरच्या पारडी भागात बिबट्याने पाच ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. महाराष्ट्रात आणि देशातही गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये, गाव-खेड्यांमध्ये बिबटे घुसण्याचे प्रमाण  वाढले आहे.  गत एक दोन वर्षात तर हे प्रमाण फारच वाढले आहे. काही अभ्यासकांचे तर असेही म्हणणे आहे की, प्रत्येकच शहरात दररोज रात्री बिबटे येत असतात आणि उकर्ड्यावरचे मांसाचे तुकडे, कोंबड्या, शेळ्या खात असतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांना सुद्धा त्यांनी फस्त केले आहे. यावर संपूर्ण राज्यात, विधानसभेत गदारोळ सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सुद्धा मांडली. परंतु बिबट्या हा प्राणी केंद्रीय सुचीत येत असल्याने राज्याला त्याबाबत निर्णय घेण्यास मर्यादा येतात. तरीही केंद्राने काही बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले.शहरात बिबट्या आल्याच्या बातम्या आता नित्याच्याच  झाल्या आहे.बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण असेही सांगितले जाते की मादी बिबट ही वर्षातून दोन वेळा पिल्ले देते आणि बहुतांश वेळी ऊसाच्या शेतात पिल्ले दिल्यामुळे ती पिल्ले सुरक्षित राहतात आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांच्या शहरात घुसण्याच्या प्रकारावर उपाययोजना म्हणून नाना प्रकारचे उपाय सुचवले जात आहे. उदाहरणार्थ बिबट्यांची नसबंदी, जंगलामध्ये शेळ्या सोडणे हा सुद्धा एक अजब उपाय सांगण्यात आला, भिंती/कुंपण घालणे असे उपाय अभ्यासक, लोक सुचवत आहेत. विद्यार्थी सुद्धा त्यांच्या शालेय प्रकल्पांमध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे व मानवांचे संरक्षण कसे करावे या प्रकारचे प्रकल्प बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बिबट्यांची संख्या कशी वाढते आहे यावर त्यांच्या शैलीमध्ये भाष्य केले, तसेच काल बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात ज्यांचा वचक असतो ज्यांचेकडे अधिकार असतात ते  लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेशात आले तर मग हा वचक किती वाटेल हे विचारूच नका. म्हणून मग सभापतींनी त्यांना समज दिली. असो ! वरील विविध उपाययोजना बिबट्यांना रोखण्यासाठी अनेकांकडून सुचवल्या गेल्या. जंगलात शेळ्या सोडणे हा ही एक उपाय त्यात आला, पण त्या फुकटच्या शेळ्या पकडून माणसेच तर त्यावर ताव मारणार नाहीत ना ! अशीही भीती आहे. वन्यजीव शहरात घुसण्याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि सोयीस्कररित्या मिळणारे गृह कर्ज यामुळे घरे बांधण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि मनुष्य वस्ती वाढत चालली आहे त्यामुळे जंगलांचे प्रमाण घटत आहे मग ते वन्यजीव कुठे जातील ? कोणे एकेकाळी जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशाच्या ठिकाणी आज मानवाने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आता मनुष्य राहायला लागला आहे, शेती करू लागला आहे. त्यांच्या हक्काची जागा मनुष्यानेच हिरावून घेतलेली आहे आणि आता जें व्हा ते मनुष्यवस्तीत येत आहे  तेव्हा आपण ते वन्यजीव आपल्या वस्ती झाल्याची तक्रार करीत असतो. बिबट्यांप्रमाणेच हरणे आणि रोही सुद्धा शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पिके उद्ध्वस्त करीत असतात. 

     या सर्व उपाययोजना व अशी पार्श्वभूमी असतांना खालील  काही उपाययोजना सुचावाव्याशा वाटतात

१. महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात प्राणिसंग्रहालयांना परवानगी दिल्यास अनेक बिबट्यांना त्यात ठेवता येईल व बिबटे आटोक्यात येतील , त्यांच्यासाठी पिंजरे सुद्धा प्रशस्त ठेवावे.

२. ज्याप्रमाणे आपण विदेशातून चित्ते आणले त्याप्रमाणे कुण्या देशाला बिबट्यांची आवश्यकता असेल तर त्यांना आपण बिबटे पाठवले पाहिजे. 

३. अन्य राज्यात जिथे मांसभक्षक प्राणी कमी असतील व शाकाहारी वन्यजीव जास्त असतील अशा राज्यातील जंगलात बिबटे सोडणे.

     उदंड जाहलेल्या या बिबट्यांच्या संख्येमुळे व त्यांच्या शहरात येण्यामुळे न घाबरता, त्यांना न घाबरता सकारात्मक पद्धतीने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे, आवश्यक ती काळजी घेणे हेच नागरिकांना करावे लागेल असे वाटते. याप्रसंगी वरील काही उपाय मनात आले त्यावर राज्य सरकार , केंद्र सरकार यांनी यावर विचार करावा असे वाटते.