कैसा हरायाssssss !
ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली तरी या निकालावरून आगामी वाटचालीचा अंदाज जनतेला आला आहे. सर्वच पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा अंदाज सुद्धा या निकालामुळे आला असेलच व या यातून ठाण्यातील शरद पवार गट थोडा तरी बोध घेतील असे वाटते.
ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड नंबर 30 मधील मुंब्रा मधून एआयएमआयएमच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक जिंकलेल्या युनूस शेख या शरद पवार गटाच्या एकेकाळच्या चांगल्या सहका-याच्या कन्येचा अर्थात सहर शेख यांचा "कैसा हरायाssss" हा व्हिडिओ सोशल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यामुळे युनूस शेख यांनी त्यांच्या कन्येला एआयएमआयएमची उमेदवारी मिळवून दिली होती. एम आय एम चा उमेदवार मुंब्र्यात निवडून येणे यात तसे काही विशेष असे नाही मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग झाला आहे. एम आय एम चा उमेदवार तिथे निवडून येणे यात काही विशेष असा आनंद नाही. परंतु ज्या नेत्याला उद्देशून सहर शेख "कैसा हराया" असे म्हणाल्या त्या नेत्याला निवडणुकीत बसलेल्या फटका-याबद्दल तसेच सहर शेख आणि युनूस शेख यांनी जाहीर सभेतून केलेल्या शाब्दिक फटकारीबद्दल मात्र अनेकांना हायसे वाटले. ते नेते नेहमीच कोणत्यातरी गुर्मीत, कोणत्यातरी आवेशात, कोणत्यातरी अहंकारात वक्तव्ये करीत असतात. त्यांच्या मतदारसंघात असलेल्यांना खुश करण्यासाठी ते इतरांवर मात्र शाब्दिक वार करत असतात, तोंडसुख घेत असतात. त्यामुळे कैसा हराया ही चित्रफित खूप लोकप्रिय झाली आहे. लोकप्रिय होण्याचे कारण हेच आहे की ज्या नेत्याला उद्देशून ते म्हटले आहे त्या नेत्याला असे जाहीर सभेत असे कोणीतरी डिवचले आहे. आपल्या भाषणात सहर शेख यांनी "उनके घमंड की धज्जिया उडायी" असे सुद्धा म्हटले. आणि खरोखर ज्यांच्यावर त्या टीका करत होत्या, ज्यांचा खरपूस समाचार घेत होत्या त्या नेत्यांचा अहंकार त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत असतो.
काही वर्षांपूर्वीचे अनंत कुरमुसे प्रकरण जनता अजून विसरलेली नाही. समाज माध्यमावर अनंत कुरमुसे यांनी या नेत्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केले होते तेव्हा या व्यक्तीच्या पाठीवर त्याला बंगल्यावर आणून कोरडे ओढले गेले होते. त्यानंतरही त्यांची अशी गैरवर्तणूकीची प्रकरणे घडल्याचे बोलले जाते. अशी प्रकरणी झाल्यानंतर सुद्धा माझेच कसे बरोबर आहे हे रेटण्यासही हे नेते मागे हटले नव्हते. एका गरीब व्यक्तीवर अन्याय करणे सोपे असते. या अशा नेत्याचे एकेकाळचे मित्र असलेल्या शरद पवार गटाच्या युनुस शेख यांनी म्हटले की, "अल्लाहने हिजाबवाली बेटी को पुरे भारत मे फेमस कर दिया" पण निवडणुकीत निवडून येणाऱ्या सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बेटी हिजाबवाली असो किंवा नसो कार्य मात्र जनतेसाठी झाले पाहिजे, देशासाठी झाले पाहिजे पण नेमके हेच होताना दिसत नाही.
आज युनूस शेख हे त्यांना जाहीर सभेत अर्वाच्य भाषेत बोलले, शिवीगाळ केली तेव्हा अनंत कुरमुसेच्या पाठीवर फटके मारल्याचा आरोप झालेले हे नेते आता युनूस शेख यांचे काय वाकडे करणार आहेत ते त्याकडे जनतेचे डोळे लागले आहे.
सहर शेख यांचे पूर्ण मुंब्रा आता हिरवा करायचा आहे. हे विधान सुद्धा वादग्रस्त असल्याचे माध्यमांमध्ये झळकल्यावर त्याबाबत सुद्धा बरीच चर्चा होत आहे. मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग आहे परंतु लोकशाही असलेल्या या देशात एखाद्या विशिष्ट समाजाचे साम्राज्य असावे असली भाषा करणे योग्य नाही. नंतर मात्र सहर शेख यांनी सारवासारव केली आणि त्यांच्या पक्षाचा रंग हिरवा असल्या म्हणून तसे म्हटले असे त्या म्हणाल्या. पक्षाचा रंग भगवा असता तर भगवा म्हटले असते असे सुद्धा त्या म्हणाल्या. तसेच सहर शेख जेंव्हा अल्लाह मुळे निवडून आली असे म्हणाल्या त्याचबरोबर त्यांनी, त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार हा संविधानामुळे मिळाला आणि ही संविधानाची सुद्धा ताकद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्या निवडून आल्या असे सुद्धा म्हणायला पाहिजे होते. असे जर म्हटले असते तर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली असती आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा आणखी व्हायरल झाला असता.
या ठिकाणी हेच सांगावेसे वाटते की एखादा मतदारसंघ किंवा एखादा भाग, प्रभाग हा आपलीच सत्ता आहे असे समजून तेथील जनतेला गृहीत धरून नेत्यांची वागणूक असू नये. जनता केंव्हा फटका मारेल याची काहीच शाश्वती नसते. असाच फटका मारत, कैसा हराया असे म्हणत सहर शेख यांनी त्यांना डिवचले. चार ठिकाणी एमआयएमच्या जागा आल्यावर एक प्रकारे युनूस शेख यांच्या करवी विरोधकाला फटकारच बसली आहे. ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली तरी या निकालावरून आगामी वाटचालीचा अंदाज जनतेला लागला आहे. सर्वच पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा अंदाज सुद्धा या निकालामुळे आला असेलच व या यातून ठाण्यातील शरद पवार गट थोडा तरी बोध घेतील असे वाटते.


.jpeg)

.jpeg)
