Click "Follow" Button below To Follow this Blog

१२/०२/२०२६

Tribute to Durdarshan News Anchor Sarala Maheshvari

 उन्होने कहा....

तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती.

गेल्या बारा वर्षापासून दर गुरुवारी लेख लिहिण्याचा माझा शिरस्ता आहे. या शिरस्त्यानुसार प्रत्येक गुरुवारी निदान एक लेख लिहिला जातो. तो लिहिण्यासाठी सुद्धा एक दोन दिवस आधीपासून तयारी करावी लागते. क्वचित प्रसंगी एकदम वेळेवर सुद्धा लिखाण होते. परंतु आजचा हा  गुरुवार असा उजाडला की आजच्या दिवशी प्रथमच दुसरा लेख सुद्धा लिहिला. हा लेख लिहायला भाग पडण्याचे कारण सुद्धा तसेच होते. किमान माझ्या दृष्टीने तरी. आजच्या गुरुवारी हा दुसरा लेख लिहिण्याचे कारण असे की, फेसबुक वर दूरदर्शनवरील जुन्या हिंदी वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांच्या निधनाची फोटोसह असलेली बातमी वाचनात आली. धक्का बसला. सरला माहेश्वरी यांच्या ज्या काही असतील त्या आठवणी ताज्या झाल्या. किशोर वयात असताना  टीव्हीवरील अर्थातच  दूरदर्शनवरील एक वृत्त निवेदिका हाच काय तो त्यांच्याशी असलेला संबंध. त्या काळात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असल्यामुळे जो कार्यक्रम दूरदर्शन दाखवत असे तो पाहणे क्रमप्राप्त असे. मग त्यात बातम्या सुद्धा आल्या आणि त्यामुळे बातम्याही पाहिल्या जात असाव्यात. आम्ही शाळेत असताना माझ्या काकांनी टीव्ही विकत घेतला होता. हे मोठा अँन्टेना घरावर लावला होता. आम्ही सर्व एकत्र बसून टीव्ही बघत असू. बातम्या सुद्धा. दुरदर्शनवर इंग्रजी आणि हिंदी बातम्या देणारे अनेक वृत्त निवेदक होते. रोडका सुमित टंडन,  मिनू,  शुभेंदू अमिताभ, गीतांजली अय्यर,  अविनाश कौर सरीन, मक्ख चेहऱ्याने बातम्या सांगणारी सलमा सुलतान अशी काही नावे आठवतात. यातच सर्वांना आवडणारी आणि या सर्वांमध्ये सौंदर्यात  सरस असणारी, सौंदर्यातच नव्हे तर बातम्या सादर करण्यात सुद्धा सरस असणारी सरला माहेश्वरी. साधी राहणी, सोज्वळ चेह-याची, नेहमी साडी परिधान केलेली, बहुधा तेंव्हा निवेदिकेस साडी अनिवार्यच असावी अशी ही सरला माहेश्वरी बातम्या देण्यास आली की दर्शक खुश होत असत. सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची एक विशिष्ट अशी लकब होती. अस्खलित हिंदीत त्या बातम्या देत असत. सरला माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत्त वाचून धक्का बसला. तशी त्यांच्या बाबत विशेष अशी काही माहिती नव्हती. परंतू निधनाच्या बातमीच्या खात्रीसाठी म्हणून  काही बातम्या आणखी पाहिल्यावर पत्रकार असलेल्या सरला माहेश्वरी ह्या 1990 ते 2005 या कालावधीत त्या राज्यसभा सदस्य होत्या , कम्युनिस्ट होत्या असे समजले. त्यांचा जन्म बिकानेर येथे 1954 मध्ये झाला होता. 

        तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती. शब्दांचे स्पष्ट उच्चारण, योग्य ठिकाणी विराम घेणे , अस्खलित हिंदी बोलणे अशी सरला माहेश्वरी यांची वैशिष्ट्ये होती. त्यातही त्यांचे माझ्या स्मरणात राहिलेले आणखी एक वैशिष्ट्ये आहे मात्र हे  वैशिष्ट्य हेरले होते माझ्या वडीलांनी. माझे वडील काका दोघानांही सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची शैली आवडत असे. कुणी नेते काही म्हणाले अशा आशयाची बातमी असेल तर तेंव्हा त्या "उन्होने कहा" खूपच विशिष्ट प्रकारे म्हणत असत. माझ्या वडीलांनी आम्हा सर्वांच्या हे लक्षात आणून दिले होते आणि आम्हाला सुद्धा त्यांची ती  "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत भावली होती. त्यांची ती विशिष्ट प्रकारे "उन्होने कहा" असे म्हणण्याची शैली त्याकाळी गाजली सुद्धा होती. तेंव्हाच्या बातम्या सांगण्याची पद्धत खूपच साधी आणि संयमित , स्पष्ट , गंभीर अशी होती. आज मात्र बातम्यांच्या विविध वाहिन्यांवर निव्वळ गोंधळ , आक्रस्ताळेपणा चाललेला असतो. 

      सरला माहेश्वरी यांच्या निधनावर अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दूरदर्शन ने सुद्धा त्यांना एक्स  या समाज माध्यमाव्दारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

        विविध व्यक्तींच्या किती नाना प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त-हा  असतात साहेबाच्या भाषेत स्टाईल असते. आणि त्या व्यक्तीच्या त्या विशिष्ट शैलीमुळे, स्टाईलमुळे ते व्यक्ती कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची साधी राहणी , स्पष्ट उच्चारण , हिंदीवर प्रभुत्व अशी शैली होती आणि आणखी म्हणजे लक्षात राहिलेली  अशी त्यांची "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत. म्हणूनच त्यांचे ते गाजलेले  "उन्होने कहा" असे म्हणणे हेच शीर्षक या लेखास द्यावेसे वाटले. 

 आते है लोग , जाते है लोग 

पानी के जैसे रेले , जाने के बाद , 

आते है याद ,गुजरे हुये वो मेले 

सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

Article on the occasion of Valentine Day 2026

प्यार को प्यार ही रहने दो....

  व्हॅलेंटाईन डे  बाबत अनभिज्ञता होती. शिवाय 1960 च्या दशकातील "जो दिलमें है ओठोपे लाना भी मुश्कील" ते 90 च्या दशकातील "छुपाना भी नाही आता जताना भी नही आता" अशी हिंदी गीते सुद्धा प्रेमाची एक उदात्त अशी भावना तरुणांना शिकवत होते. आताच्या पिढीचे प्रेम म्हणजे आज प्रेम आणि उद्या ब्रेक अप असे प्रेम पुर्वी नव्हते.

हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू

हात से छू के इन्हे रिश्तोका इल्जाम ना दो |

व्हॅलेंटाईन डे समीप आला, प्रेमाची कबुली करण्याचा, प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेल्या तरुणाईच्या या दिवसाने पश्चिमी देशातून आपल्या देशात हळूच शिरकाव केला. शिरकाव होऊनही बरीच वर्षे झाली. आम्ही हायस्कूल मध्ये असतांना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर एक छोटीसी जाहिरात येत असे. त्यात व्हॅलेंटाईन डे बाबत काहीबाही लिहिलेले असे, असे मला पुसटसे स्मरते. मग दुस-या दिवशी शाळेत काय असते बे हे व्हॅलेंटाईन डे ? असा प्रश्न कुणी विचारत असे. त्यावर "अबे शहरात असते ते काही तरी कॉलेजातल्या पोरा पोरींचा प्रेमाचा दिवस असते बुवा"  असे म्हणत दुसरा आपले ज्ञान पाजळत असे.  त्या काळात अनेकांच्या घरी वृत्तपत्रे येत आणि मुले सुद्धा पेपर वाचत असत. आता मात्र लहान वयातच मुलांना बरेच वाजवी व अवाजवी ज्ञान प्राप्त झालेले असते. व्हॅलेंटाईन डे हा दिवस म्हणजे नक्की असतो तरी काय? हे समजण्यासाठी आम्हाला पार हायस्कुलपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत यावे लागले होते. आमच्या या अज्ञानामुळे आमचे नुकसान झाले की फायदा हे निश्चित सांगता येणार नाही. पण आताच्या पिढी प्रमाणे मात्र तेंव्हा आणि आमच्याही आधीच्या पिढ्यांना प्रेम व्यक्त करणे काही जमत नव्हते आणि या दिवसाबाबत अनभिज्ञता पण होती. शिवाय 1960 च्या दशकातील "जो दिलमें है ओठोपे लाना भी मुश्कील" ते 90 च्या दशकातील "छुपाना भी नाही आता जताना भी नही आता" अशी हिंदी गीते सुद्धा प्रेमाची एक उदात्त अशी भावना तरुणांना शिकवत होते. प्रेम व्यक्तच नाही झाले किंवा व्यक्त करता नाही आले तर "वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा" अशीही शिकवण देणारी गीते होतीच. आताच्या पिढीचे प्रेम म्हणजे आज प्रेम आणि उद्या ब्रेक अप असे प्रेम पुर्वी नव्हते. प्रेमाचा अव्हेर केला म्हणून कुणाला जीवेच मारून टाकणे असेही नव्हते किंवा पतीला मारून मग त्याचा मृतदेह ड्रम मध्ये टाकून त्यात सिमेंट भरून टाकणे असेही नव्हते. जगाला प्रेमाची शिकवण देणा-या भारतात आता मात्र प्रेम, प्रेमाची व्याख्या सर्वच बदलून गेले आहे. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडीत होय" असे सांगणा-या संत कबीरांपासून अनेक संत मंडळी ते कवी गीतकारांनी  त्यांच्या त्यांच्या शब्द सामर्थ्याने आपल्याला  प्रेम काय असते याची शिकवण दिली आहे.

      परवा येणा-या  व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने अशीच गीते , दोहे, भारताने जगाला दिलेले अनेक उदात्त प्रेमाचे दाखले हे विचार लेखासाठी म्हणून मनात येत होते, त्यातच आठवण झाली ती स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या, हेमंतकुमार या धीर गंभीर आवाजाच्या गायकाने स्वरबद्ध केलेल्या आणि कवी कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या संपूर्णसिंह कालरा यांनी लिहिलेल्या नितांत सुंदर अशा प्रेमगीताची. संपूर्णसिंह कालरा म्हणजे आपले गुलजार बर का ! 

    1969 या वर्षी झळकलेल्या खामोशी या चित्रपटात एक नितांत सुंदर, श्रवणीय, हृदयस्पर्शी असे गीत आहे. लेखाच्या शीर्षकात आणि सुरुवातीला याच गीताच्या ओळींचा उपयोग केला आहे. हे गीत म्हणजे        

हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू 

हातसे छू के इसे रिश्तो का इल्जाम न दो,    

 एक अहसास है ये रूह से महसूस करो

प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो | 

अध्यात्मिक टच असलेल्या या गीतात कवी सुरुवातीलाच म्हणतो की आंखो की खुशबू .... आता डोळ्यातून खुशबू  या कवी कल्पनेतच आपणास गुलजारची प्रतिभा दिसते. डोळ्यातून प्रेम स्पष्टपणे दिसते याच अर्थाने कवीने आंखो की खुशबू असे म्हटले आहे.  या अशा डोळ्यातून व्यक्त होणा-या निस्सीम, निस्वार्थ प्रेमाला स्पर्श किंवा कोणत्याही नात्यात अडकवू नये असे कवी म्हणतो. प्रेम म्हणजे फक्त एक जाणीव आहे, अहसास आहे त्याला रूह अर्थात आत्म्यापासून आपण जाणले पाहिजे, समजले पाहिजे. आणि प्रेमाला कोणतेही नांव न द्यावे (आजच्या भाषेत BF, GF) असेही कवी सांगतो.

     याच गीतात पुढील दोन कडव्यात कवी यावर प्रकाश टाकतो की, खऱ्या आत्मिक प्रेमात आवाज नसतो, काही बोलणे नसते तर एक शांतता, अव्यक्तता,  एक खामोशी असते ही अव्यक्तताच सर्व काही सांगून जात असते, ऐकत असते. ही अव्यक्तता म्हणजे जणू काही युगानुयुगांपासून, परमात्म्या पासून आलेला नूर की बुंद अर्थात दिव्य प्रकाशाचा एक थेंबच आहे जो कधीच थांबलेला नाही, डोळ्यांवर एक विशिष्ट चमक येते, डोळ्यात हास्याची लकेर उठते. ओठ बंदच असतात, व्यक्त होऊ शकत नाही परंतू थरथरणा-या ओठांत मात्र कितीतरी अव्यक्त अशा भावना, कथा थांबून राहिलेल्या असतात.

     प्रेमाला हाथ से छू के इसे रिश्तो का इल्जाम ना दो अर्थात प्रेमाला स्पर्शरहीत, पवित्र कोणत्याही नात्यात न अडकवणारी अशी उपमा गुलजार यांनी दिली आहे. आजची भौतिक सुखाकडे आकृष्ट होणारी, महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या  म्हणजेच प्रेम आहे असे समजणा-या या पिढीला गुलजार यांनी वरील गीतात प्रकट केलेले हे प्रेम कितपत पचनी पडेल देव जाणे ? 

गीत👇

हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
हम ने देखी है ...

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ...

मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने खामोश से अफ़साने रुके रहते हैं
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ..

२२/०१/२०२६

Article about sahar shekh viral statement "kaisa haraaya"

 कैसा हरायाssssss !


ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली तरी या निकालावरून आगामी वाटचालीचा अंदाज जनतेला आला आहे. सर्वच पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा अंदाज सुद्धा या निकालामुळे आला असेलच व या यातून ठाण्यातील शरद पवार गट थोडा तरी बोध घेतील असे वाटते.

ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड नंबर 30 मधील मुंब्रा मधून एआयएमआयएमच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक जिंकलेल्या युनूस शेख या शरद पवार गटाच्या एकेकाळच्या चांगल्या सहका-याच्या कन्येचा अर्थात सहर शेख यांचा  "कैसा हरायाssss" हा व्हिडिओ सोशल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यामुळे युनूस शेख यांनी त्यांच्या कन्येला एआयएमआयएमची उमेदवारी मिळवून दिली होती. एम आय एम चा उमेदवार मुंब्र्यात निवडून येणे यात तसे काही विशेष असे नाही मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग झाला आहे. एम आय एम चा उमेदवार तिथे निवडून येणे यात काही विशेष असा आनंद नाही. परंतु ज्या नेत्याला उद्देशून सहर शेख "कैसा हराया" असे म्हणाल्या त्या नेत्याला निवडणुकीत बसलेल्या फटका-याबद्दल तसेच सहर शेख आणि युनूस शेख यांनी जाहीर सभेतून केलेल्या शाब्दिक फटकारीबद्दल मात्र अनेकांना हायसे वाटले. ते नेते नेहमीच कोणत्यातरी गुर्मीत, कोणत्यातरी आवेशात, कोणत्यातरी अहंकारात वक्तव्ये करीत असतात. त्यांच्या मतदारसंघात असलेल्यांना खुश करण्यासाठी ते इतरांवर मात्र शाब्दिक वार करत असतात, तोंडसुख घेत असतात. त्यामुळे कैसा हराया ही चित्रफित खूप लोकप्रिय झाली आहे. लोकप्रिय होण्याचे कारण हेच आहे की ज्या नेत्याला उद्देशून ते म्हटले आहे त्या नेत्याला असे जाहीर सभेत असे कोणीतरी डिवचले आहे. आपल्या भाषणात सहर शेख यांनी "उनके घमंड की धज्जिया उडायी" असे सुद्धा म्हटले. आणि खरोखर ज्यांच्यावर त्या टीका करत होत्या, ज्यांचा  खरपूस समाचार घेत होत्या त्या नेत्यांचा अहंकार त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत असतो.

काही वर्षांपूर्वीचे अनंत कुरमुसे प्रकरण जनता अजून विसरलेली नाही. समाज माध्यमावर अनंत कुरमुसे यांनी या नेत्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केले होते तेव्हा या व्यक्तीच्या पाठीवर त्याला बंगल्यावर आणून कोरडे ओढले गेले होते. त्यानंतरही त्यांची अशी  गैरवर्तणूकीची प्रकरणे घडल्याचे बोलले जाते. अशी प्रकरणी झाल्यानंतर सुद्धा माझेच कसे बरोबर आहे हे रेटण्यासही हे नेते मागे हटले नव्हते. एका गरीब व्यक्तीवर अन्याय करणे सोपे असते. या अशा नेत्याचे एकेकाळचे मित्र असलेल्या शरद पवार गटाच्या युनुस शेख यांनी म्हटले की, "अल्लाहने हिजाबवाली बेटी को पुरे भारत मे फेमस कर दिया" पण  निवडणुकीत निवडून येणाऱ्या सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बेटी हिजाबवाली असो किंवा नसो कार्य मात्र जनतेसाठी झाले पाहिजे, देशासाठी झाले पाहिजे पण नेमके हेच होताना दिसत नाही.

आज युनूस शेख हे त्यांना जाहीर सभेत अर्वाच्य भाषेत बोलले, शिवीगाळ केली तेव्हा अनंत कुरमुसेच्या पाठीवर फटके मारल्याचा आरोप झालेले हे नेते आता युनूस शेख यांचे काय वाकडे करणार आहेत ते त्याकडे जनतेचे डोळे लागले आहे.

सहर शेख यांचे पूर्ण मुंब्रा आता हिरवा करायचा आहे. हे विधान सुद्धा वादग्रस्त असल्याचे माध्यमांमध्ये झळकल्यावर त्याबाबत सुद्धा बरीच चर्चा होत आहे. मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग आहे परंतु लोकशाही असलेल्या या देशात एखाद्या विशिष्ट समाजाचे साम्राज्य असावे असली भाषा करणे योग्य नाही. नंतर मात्र सहर शेख यांनी सारवासारव  केली आणि त्यांच्या पक्षाचा रंग हिरवा असल्या म्हणून तसे म्हटले असे त्या म्हणाल्या. पक्षाचा रंग भगवा असता तर भगवा म्हटले असते असे सुद्धा त्या म्हणाल्या. तसेच सहर शेख जेंव्हा अल्लाह मुळे निवडून आली असे म्हणाल्या त्याचबरोबर त्यांनी, त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार हा संविधानामुळे मिळाला आणि ही संविधानाची सुद्धा ताकद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्या निवडून आल्या असे सुद्धा म्हणायला पाहिजे होते. असे जर म्हटले असते तर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली असती आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा आणखी व्हायरल झाला असता.

या ठिकाणी हेच सांगावेसे वाटते की एखादा मतदारसंघ किंवा एखादा भाग, प्रभाग हा आपलीच सत्ता आहे असे समजून तेथील जनतेला गृहीत धरून नेत्यांची वागणूक असू नये. जनता केंव्हा फटका मारेल याची काहीच शाश्वती नसते. असाच फटका मारत,  कैसा हराया असे म्हणत  सहर शेख यांनी त्यांना डिवचले. चार ठिकाणी एमआयएमच्या जागा आल्यावर एक प्रकारे युनूस शेख यांच्या करवी विरोधकाला फटकारच बसली आहे. ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली तरी या निकालावरून आगामी वाटचालीचा अंदाज जनतेला लागला आहे. सर्वच पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा अंदाज सुद्धा या निकालामुळे आला असेलच व या यातून ठाण्यातील शरद पवार गट थोडा तरी बोध घेतील असे वाटते.

१५/०१/२०२६

Article about new changes in NEET PG exam marks

 नीट पण कशाला घेता ?


सरकारला जर वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवायच्या असतील तर त्या खुशाल वाढवाव्यात परंतू तेथे प्रवेशांसाठी नीट मधील गुणांची पात्रता इतकीही कमी करू नये की जेणे करून  भारतातील भविष्यातील आरोग्य व्यवस्था ही मोडकळीस येईल.

     नीट पीजी परीक्षांमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट या पात्रता परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची पर्सेंटाईलची जी अट होती, जे निकष होते म्हणजेच  जो कट ऑफ असतो त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे.  काही वर्गवारीसाठी शून्य पर्सेंटाईल वर म्हणजेच  -40 गुण असलेल्या विद्यार्थ्यास सुद्धा आता प्रवेश मिळणार आहे. असेच निकषांचे बदल इतर वर्गवारीसाठी सुद्धा करण्यात आले आहे परंतु इतर वर्गवारीस मात्र 7  पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळवावे लागणार आहे. भरपूर उपलब्ध जागा हे कारण या बदलांसाठी दाखवण्यात आले आहे. 

     शिक्षण क्षेत्रात निव्वळ प्रयोगांचा भडीमार लावलेला आहे वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्था यात व्यवसाय पाहून अनेक दिग्गजांनी उड्या घेतलेल्या आहे. यातील व्यवसाय पाहूनच या क्षेत्रासाठी लागणारे वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य यांच्या किमतीत सुद्धा मोठी भरमसाठ वाढ झाली आहे व दरवर्षी होत आहे. शाळा, कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस यांचे शिक्षण शुल्क हे गगनाला भिडले आहे. सामान्य माणसाला त्याच्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवणे आज अशक्य झालेले आहे. आणि जरी त्याला बनवायचे असले तरी त्याला पैशांसाठी खूप आटापिटा करावा लागतो. असे चित्र सध्या भारतभर दिसत आहे. 

     नीट बद्दल बोलायचे झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर येणारा विद्यार्थी हा इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारा, वैद्यकीय सेवा देणारा असा डॉक्टर म्हणून काम करणारा होणार असतो. मनुष्याच्या शरीरात काय घडते आहे, काय नाही ? याचे अचूक निदान त्याला करायचे असते. त्यामुळे त्याला मनुष्य शरीरशास्त्राचा, विविध आजारांचा सूक्ष्म असा अभ्यास करणे जरुरी असते शिवाय त्यात निष्णात बनायचे असते तरच तो रुग्णाची योग्य पद्धतीने तपासणी व रोगाचे निदान करू शकणारा असा तज्ञ डॉक्टर होऊ शकतो. शून्य टक्के पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात जबरदस्तीने आणून भविष्यात रुग्णाच्या जिवाशी खेळणारा डॉक्टर बनवण्यात सरकारला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे ? हा प्रश्न जनतेला नक्कीच पडणार आहे. स्पेशालिस्ट म्हणून रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर खरोखर तो डॉक्टर स्पेशालिस्ट झालेला असा असेल का ? त्याची डॉक्टर बनण्याची पात्रता नसतानाही त्याला फक्त जागा भरपूर आहे म्हणून जबरदस्तीने डॉक्टर बनवण्यात काय अर्थ ? 

     वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांचे अनेक प्रताप आपल्याला वाचनात येत असतात. कधी पोटात कैची विसरणे तर कधी कापूस विसरणे कधी ज्या ठिकाणचे ऑपरेशन करायचे त्या ठिकाणाऐवजी भलतेच ऑपरेशन करणे, दुखणारा दात काढण्याऐवजी न दुखणारा दात काढणे तर कधी मृत व्यक्तीला दवाखान्यात दाखल ठेवून पेशंटकडून बिल उकळणे असे अनेक किस्से, अनेक घटना वाचनात येतच असतात. आता असे मायनस मध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी डॉक्टर बनणार तर मग अशा किस्स्यांमध्ये आणखीनच मोठी वाढ होण्याची संभावना आहे.

      वरील अनुषंगाने येथे हे नमूद करावेसे वाटते की, सरकारला जर वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवायच्या असतील तर त्या खुशाल वाढवाव्यात परंतू तेथे प्रवेशांसाठी नीट मधील गुणांची पात्रता इतकीही कमी करू नये की जेणे करून  भारतातील भविष्यातील आरोग्य व्यवस्था ही मोडकळीस येईल.  आज quality अर्थात गुणवत्तेचा जमाना आहे. लोक जास्त पैसे मोजायला तयार आहे परंतु त्यांना मग तशा सुविधा, त्या सुविधा देणारे तसे तज्ञ व निष्णात लोक सुद्धा पाहिजे असतात. आरोग्य यंत्रणेकडे मात्र अशा लोकांची वानवा होईल आणि ही वानवा केंद्र सरकारच्या या नीट पीजीच्या पात्रतेच्या गुणांच्या शिथिलतेमुळे निर्माण होणार आहे.

     भारतात वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रात विनाकारण कमी गुण मिळणारे व उच्च गुणवत्ताधारक यांना एकाच रांगेत आणण्याचा प्रयत्न केला जातो. गुणांचे निकष एवढेच कमी करायचे असतील तर कशालाच ती नीट परीक्षा ठेवता ? सर्वांनाच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश खुले करून टाका ना ! असेच येथे म्हणावेसे वाटते.

०१/०१/२०२६

Article about kalpataru divas

स्मरण कल्पतरू दिवसाचे


आजचा दिवस हा इंग्रजी वर्षाचा प्रारंभ होणारा दिवस असला तरी तो भारतात मोठ्या उत्साहात  साजरा होतो. परंतु या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे याच दिवशी 1886 रोजी एक महत्त्वपूर्ण अशी चमत्कारिक, अध्यात्मिक घटना काशीपूर (कोसीपोर) उद्यानामध्ये घडली होती.

आज इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच एक जानेवारी 2026. या दिवशी जगभर लोक नवीन वर्षाचे स्वागत करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. हा जरी इंग्रजी वर्षाचा प्रारंभ होणारा दिवस असला तरी भारतामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अतिउत्साहात म्हटले तरी वावगे होणार नाही. परंतु या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे याच दिवशी 1886 रोजी एक महत्त्वपूर्ण अशी अध्यात्मिक घटना काशीपूर (कोसीपोर) उद्यानामध्ये घडली होती. काशीपूर उद्यान हे कोलकात्या जवळ आहे आणि याचे महत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांनी याच उद्यानात त्यांच्याभोवती उपस्थित शिष्यांना  शिष्य तसेच भक्तमंडळीला आशीर्वाद दिले होते. रामकृष्ण परमहंस हे गायन, भजन करता-करता समाधीमध्ये लीन होऊन जात असत. त्यांची ती भावावस्था पाहूनच स्वामी विवेकानंद यांच्याकडे आकृष्ट झाले होते आणि उच्चविद्याविभूषित असूनही त्यांनी अल्पशिक्षित अशा रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानले होते. रामकृष्ण परमहंस यांच्या तशा अनेक कथा प्रचलित आहे. ते राणी रासमणी स्थापित काली मंदिरात पुजारी होते. कालीमातेचे निस्सिम भक्त होते. ईश्वर हा सर्वांमध्येच असतो असे त्यांचे म्हणणे असे. ते पूजा करता-करता पूजेत एवढे तल्लीन होऊन जात असत की पूजा करता-करता देवाशी बोलत असत आणि तर कित्येकदा देवीऐवजी स्वतःच्याच डोक्यावर फुल वाहत असत.  इतकी त्यांची तल्लीनता असे. केशवचंद्रसेन, ईश्वरचंद विद्यासागर, मास्टर महाशय असे सर्व ज्ञानी, उच्चविद्याविभूषित मंडळी त्यांना मान देत असत, त्यांचा आदर करत असत. 

     एक दिवस म्हणजेच एक जानेवारी 1886 रोजी श्री रामकृष्ण परमहंस काशीपूर उद्यानात आपल्या शिष्यांसमवेत बसले होते काहीतरी भजन, कीर्तन, प्रवचन सुरू होते. त्याच दरम्यान सर्व उपस्थित शिष्यांना त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये आध्यात्मिक चेतना जागृत झाली आणि त्यांना मुक्तीचा मार्ग मिळाला. ज्याप्रमाणे कल्पतरू खाली बसल्यावर व कोणतीही इच्छा प्रगट केल्यावर तो कल्पतरू, तो वृक्ष ती इच्छा पूर्ण करतो असे म्हटले जाते त्याचप्रमाणे भक्तांची आध्यात्मिक चेतना जागृतीची आणि मुक्तीची जी इच्छा होती ती रामकृष्ण परमहंस यांनी पूर्ण केली म्हणून या दिवसाला कल्पतरू दिवस असे म्हटले जाते. हा दिवस रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन तसेच विवेकानंद केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

     या दिनी उपरोक्त ठिकाणी विशेष पूजा, वैदिक मंत्रोच्चार, भजन प्रवचन तसेच रामकृष्ण कथामृताचे पठण केले जाते. याशिवाय याच दिवशी भक्त एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करतात. 

    हा दिवस आध्यात्मिक चेतना जागृतीचा, नवीन वर्ष हे आध्यात्मिक वर्ष व्हावे अशी इच्छा प्रगट करणारा असावा म्हणून अशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. 

     आज इंग्रजी  वर्षारंभ आहे. 31 डिसेंबर पासून बहुतांश लोक हे विविध पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन करीत असतात, एन्जॉयमेंट चे वेध त्यांना लागलेले असतात. असते तर इंग्रजी नवीन वर्ष पण त्याचा उत्साह, ते साजरे करण्याचा जोम,  हा इंग्रजांपेक्षा आपल्या भारतीयांमध्येच जास्त दिसून असतो. अशा या दिवशी म्हणजेच 1 जाने 1886 ला रामकृष्ण परमहंस यांनी काशीपूर उद्यानात भक्तांची अध्यात्मिक चेतना जागृत केली होती , तेथे उपस्थित सर्वांनाच मुक्ती मिळवून दिली होती. आज एक जानेवारी रोजी या घटनेचे स्मरण व्हावे म्हणून हा लेख लिहावासा वाटला. 

     इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह सर्वांना रामकृष्ण परमहंस, माँ  सारदा, स्वामी विवेकानंद यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे हीच सदिच्छा.