आठवणी हनुमान जन्मोत्सवाच्या
गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू.
आज हनुमान जन्मोत्सव. 1990 च्या सुमारास आमच्या रहिवासी भागात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. गल्लीतील नागरिकांच्या घरी, गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. रोडग्यांसाठी तयार केलेल्या केल्या जाणाऱ्या आहारासाठी गौऱ्या गोळा करून आणण्याची एक गंमत होती. त्यासाठी एक पथक रवाना होत असे. वाचकांपैकी या पथकात जे लोक गेलेले आहेत त्यांना त्या गोष्टीचे स्मरण होऊन नक्कीच हसू आले असेल. दुसऱ्या दिवशी भंडारा झाल्यानंतर भांडी घासण्याचा एक मोठा कंटाळवाणा कार्यक्रम होत असे. जेवण झाल्यानंतर भांडे घासण्याचा मला तरी अतिशय कंटाळा येत असे परंतु तरी सर्वजण मिळून भांडी घासत असत. एक माणूस उभे राहणे तर दूर कसाबसा बसू शकेल असे ते मंदिर होते एकदम साधे. "सबके लिए खुला है मंदिर ये हमारा" या तुकडोजी महाराजांच्या गीताप्रमाणे त्या मंदिराचे होते कुणीही या, केंव्हाही या आणि दर्शन घ्या, आपापल्या परीने बजरंगाची पूजा करा अन् जा. त्या हनुमान मंदिरामध्ये कुणाला कठीण वाटतील असे विशेष काही नियम, बंधन, नियमावली नव्हती परंतु हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मात्र सर्वजण एकत्र येत असत. रोडगे बनवण्यासाठी प्रमोद पाटील, स्व. मुकुंदा, पंचायत समिती निवासस्थानात राहणारे महादेव भाऊ हे लोक तज्ञ होते. मी त्यांना फक्त गोळे तयार करून देत असे. एक सुनील नामक मुलगा दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आमच्या गल्लीत दिसत असे इतर वेळी मात्र तो कुठेच दिसत नसे. तो कुठे राहायचा , कोणाचा मित्र होता, आमच्या गल्लीत का यायचा हे मला खूप वर्षे कळलेच नव्हते. रात्रभर जागल्यानंतर सुद्धा पुन्हा सकाळी सहा वाजता सर्वजण जन्मोत्सवासाठी हजर असत. पण हळूहळू सर्व मंडळी आपापल्या व्यापात मग्न होतील. सर्वांची लग्न झाली, मुले झाली आपापल्या संसारात सर्व मग्न झाले आणि हनुमान जन्मोत्सवाचा तो साध्यासुध्या पद्धतीचा भंडारा होणे बंद झाले. जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त बरेच जण हनुमंताची पूजा आदी करीत असे, मंदिर साफसफाई करीत असे. माझे वडील तर मंदिराचा परिसर रोज झाडत होते. भंडारा होणे बंद झाल्यावर हनुमान मंदिर दुर्लक्षित झाले. आज आमच्या वेटाळात लोकसहभागातून नवीन शिवमंदिर उभारले आहे. प्रदीप मिश्रा यांच्या व्यापक आवाहनानंतर सध्या भोळे शंकर हे टॉपवर आलेले देव आहे. 'एक लोटा जल' या आवाहनाने शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली आहे. देव तर सर्व सारखेच आहे. सर्व देव त्यांच्या भक्तांचे भलेच करणार. असो ! आपल्या देशातील लोक भोळे आहेत देवभोळे आहेत कुणी काही आवाहन केले की ते लगेच स्विकारतात परंतु स्वतः भगवंतांनी दिलेला संदेश मात्र विसरतात. स्वतः भगवंतांनी गीतेत म्हटले आहे
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
अर्थात ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे जल समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूलाच जाऊन मिळतो.
या अर्थाने तुम्ही कोणत्याही देवाची आराधना केली तरी ती शेवटी विष्णूलाच अर्पण होत असते.
आमच्या भागात हनुमान जन्मोत्सवाच्या काळात थोडा 'सुकून' होता, प्रत्येकाकडे वेळ असे, ट्युशन क्लासेस यांचे एवढे प्रस्थ नव्हते त्यामुळे सर्व एकत्र येत असत आणि सर्वांनुमते सर्व सहमतीने कार्यक्रम पार पडत असत. अमुक एक गोष्ट अशीच झाली पाहिजे आणि तशीच झाली पाहिजे असे काही बंधन नव्हते. "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" या ओळीनुसार आपापल्या भावानुसार सर्वजण हनुमंताचे दर्शन घेत असे.
आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या बाबी स्मरण झाल्या. तशा त्या प्रत्येकच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी स्मरण होत असतात म्हणा ! पण आज त्यावर लिहावेसे वाटले. लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आल्यावर आपापल्या परीने लोक दानधर्म करतात, काही लोक मंदिर उभारणीच्या बांधकामादी कार्यामध्ये सक्रिय सहभाग देतात. स्वतःचे घर तर सर्वजण बांधतात परंतु ईश्वराचे घर बांधणे, त्यासाठी निधी देणे पुण्यवंताच्याच भाग्यात असते. अशातून सुंदर, भव्य मंदिर निर्माण होते. याच प्रकारे आपल्या वेटाळात सुद्धा उभे राहिले आहे. शोले सिनेमात एक संवाद आहे "समाज और बिरादरी तो इंसान को अकेलेपन से छुडाने के लिए बनाई गई है, उसे अकेला रखने के लिए नही |" त्याचप्रमाणे मंदिरेही आपल्या बांधवांना एकत्र आणण्याचे एक ठिकाण आहे.
आमच्या वेटाळात झालेले नवीन शिव मंदिर सुद्धा जुन्या हनुमान मंदिरप्रमाणे सर्वांना कायम एकत्रित ठेवेल, जिथे सर्व सहमतीने, सर्व सहभागाने आपापल्या भक्तिभावाने सर्वजण एकत्र येत राहतील, पुन्हा तसे हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी होणारे साधेसुधे भंडारे आयोजित होतील हिच आशा व ईश्वरचरणी प्रार्थना.









