बुवा तिथे मूर्ख बाया
'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला. आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज. किती नावे घेऊ? मग तरीही अशा भोंदू बाबांच्या नादी लोक का लागतात?
खरे तर बुवा तिथे बाया हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे गाजलेले विनोदी नाटक. वास्तविक पाहता केवळ आचार्य अत्रे लिहिले तरी चालले असते पण 'जेन झी' पिढीतील युवकांना गुगल, किंवा 'chat gpt' वर आचार्य अत्रे कोण ? असा शोध घेण्याचे काम न पडावे म्हणून मी आधीच पुर्ण नांव लिहून टाकले. 'जेन झी' पिढी ही वाचनापासून दूर झालेली पिढी असल्याने या पिढीतील तरुण ब्लॉग वा वृत्तपत्रातील लेख वाचत असावेत की नाही ही सुद्धा एक शंकाच आहे. "लेकीन अपना तो काम है लिखना" असा विचार करून लिहायला सुरुवात केली. अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी मी त्यात अत्रेंचा सन्मान राखून बुवा तिथे मूर्ख बाया असा बदल केला आहे.
बुवा तिथे बाया हे नाटक आठवण्याचे निमित्त ठरले ते नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघडकीस आल्यावर. खरातला अटक केल्यावर या नाटकाचे प्रकर्षाने स्मरण झाले. हे नाटक मी काही पाहिलेले नाही. परंतू सुविख्यात लेखक, नाटककार असलेल्या अत्रे यांनी लिहिलेले असल्याने ते माहित होते. इतक्या वर्षांपुर्वी अत्रेंनी हा विषय मांडला हे तेंव्हा धाडसाचे काम होते. कारण त्या काळी अंधश्रद्धा ही आजच्या पेक्षा जास्तच होती. पण अत्रे इंग्लंड मधून शिकून आले होते, विद्वान होते, वक्ता दशसहस्त्रेशू होते. त्यांचा बुवाबाजीवर मुळीच विश्वास नव्हता म्हणून त्यांनी लोकांच्या देवभोळेपणाचा काही लोक कसा फायदा घेतात हे या नाटकात अत्रेंनी मांडले आहे. असाच फायदा चतुर, लबाड खरातने घेतला. आता खरात चतुर म्हणा किंवा लोक, बायका हे भोळे किंवा अंधश्रद्धाळू म्हणा. खरातचे अनेक किस्से अनेक चित्रफिती मग समोर यायला लागल्या. त्याचे ते कवडीमोल असलेले चिंचोके लोकांना लाखात विकणे, नाग बोलावणे, बायकांना अपत्य होण्यासाठी मंतरलेले त्याचे मुत्र मिश्रीत पाणी देणे, पुरुषांना आणखी कोणतेतरी पाणी देणे असे त्याचे एक ना अनेक किस्से अजूनही पुढे येतच आहे. खरातने बायकांचे शोषण केले असे म्हटले जात आहे पण काही चित्रफितीत महिलांचा त्याला काही विरोध होताना दिसत नाही.
या महिला अशा बाबा लोकांच्या आहारी कशाच काय जातात ? या बुवांमध्ये बायकांना असे काय दिसते ? त्या त्यांच्याकडे इतक्या आकृष्ट का होतात ? ते म्हणतील तसे या बायका कशा काय करतात ? हा खरे तर संशोधनाचा विषयच आहे. सगळ्याच बायका बुवांच्या आहारी जातात असे मी म्हणत नाही किंवा अत्रेंनाही तसे अभिप्रेत नसेल पण बुवांच्या मागे बायका जास्त जातांना दिसतात हे कोणी नाकारू शकत नाही. ब-याच वर्षांपूर्वी मी वाचलेल्या एका लेखात याच प्रकारचा उहापोह केला होता. तेंव्हा त्या लेखकाने ज्या बायका एकाकी झालेल्या असतात. विवाह उपरांत काही कालावाधी नंतर पती कडून दुर्लक्षिल्या गेल्या असतात त्या बायका अशा भोंदू बाबांकडे आकर्षिल्या जातात आणि मग फसवल्या जातात त्यानंतर पश्चातापाने दग्ध होऊन अश्रू ढाळतात. असे मत त्या लेखकाने मांडले होते.
नैराश्यग्रस्त लोक सुद्धा अशा भोंदू बाबांच्या नादी लागतात. आपल्याला काही तरी मानसिक बळ मिळेल, बाबा आपली सगळी संकटे दूर करतील असे त्यांना वाटत असते. परंतू एकदा का अशा बाबाचे बिंग फुटले की मग ते भानावर येतात. आपल्या देशात अशा अनेक भोंदू बाबा, महाराज यांच्यावर कारवाया होऊन, काहींना तर अटक झालेली पाहुनही आपले भारतीय लोक , इतकेच काय तर राजकारणी, मंत्री, एवढेच काय तर महिलांसाठी कार्य करणा-या महिला आयोगाच्या अध्यक्षा असे लोक या भोंदू लोकांच्या आहारी जातात हे पाहून खंत वाटते. 'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला.
आपल्या देशात महाराज, भोंदू बाबा व राजकीय लोकांचे संबंध असल्याची खरातसारखी अनेक उदाहरणे यापुर्वीही घडली आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेवेळी धीरेंद्र ब्रह्मचारी या तांत्रिकाची मोठी वट होती, चाळीसगाव परिसरात जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करणारा धर्मभास्कर वाघ याचेही प्रकरण खुप गाजले होते. राजकारणात त्यानेही दबदबा निर्माण केला होता. राम रहीम, आसाराम बापू ही उदाहरणे तर ताजीच आहे. बरेच वेळा हे भोंदू बाबा अंधश्रद्धाळू राजकीय लोकांना हेरून मग त्यांनाच हाताशी धरून आपले बस्तान बसवत असतात.
अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी आज भारतीय नारी सुज्ञ, सुशिक्षित झालेली आहे. अनेक चांगल्या महिला चांगले कार्य करीत आहे त्यांना खऱ्या-खोट्याची चांगली जाण आलेली आहे त्यामुळे अशा बुवा लोकांच्या नादी काही मूर्ख महिला लागतात म्हणून बुवा तिथे बाया म्हणण्याऐवजी बुवा तिथे मूर्ख बाया असा म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु लोक होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज किती नावे घेऊ? एवढे सारे संत आजही आपल्या सोबत ग्रंथरूपाने अस्तित्वात आहे.
माझी काया आणि वाणी।गेली म्हणाल अंतः करणी।
परी मी आहे जगजीवनी।निरंतर।
आत्माराम दासबोध।माझे स्वरूप स्वतःसिद्ध।
असता न करावा हो खेद।भक्तजनी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
असे रामदास स्वामींनी तर म्हटले आहे. मग आपल्याला वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त असे वाटत असल्यास आपण या अशा थोर संतांच्या वचनांचा त्यांच्या ग्रंथांचा आधार का घेऊ नये ? त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतल्यास, त्यांना शरण गेल्यास आपल्याला या खरात सारख्या भोंदू बाबांचे खरे रूप समजण्यास जराही वेळ लागणार नाही.






