Click "Follow" Button below To Follow this Blog

०४/०६/२०२६

Article about Maharashtra government scheme ladki bahin scheme

 सौ मे से अस्सी बेईमान....

अर्ज करणाऱ्या ८० लाख लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज पडताळणी नंतर  या अपात्र धनदांडग्या अर्जदारांच्या  इतक्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत की त्या अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  

         खूप वर्षांपूर्वी प्रवासात असतांना एका ट्रकच्या मागे लिहिलेले "सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान" असे एक वाक्य वाचले होते. ते वाक्य मनाला खूप भिडले होते. म्हणूनच ते लक्षात राहिले. आज ते वाक्य आठवले याचे कारण म्हणजे ८० हा आकडा आणि ८० आकडा आठवण्यास निमित्त ठरले ते लाडकी बहीण योजनेचे ८० लाख अर्ज अपात्र झाल्याचे वृत्त वाचण्याचे. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली याचा पुरेपूर फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. योजना सुरू झाली योजनेवर बहिणींनी आणि काही प्रत्यक्षात भाऊ असलेल्या परंतु लिंग न बदलता बहीण झालेल्या अशा डुप्लिकेट बहिणींनी फुकट पैसे मिळतात म्हणून उड्या मारल्या. फुकटचे काहीही मिळत असले की भारतीयांच्या उड्या पडतातच हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सरकारकडून काही मिळत असले की ते लाटण्यासाठी ज्या लोकांना त्याची काहीही आवश्यकता नसते अशा सुखवस्तू कुटुंबातील लोक सुद्धा काहीही विचार न करता त्या योजनांसाठी अर्ज दाखल करतात. ज्यांच्या घरी  खायप्यायची काही कमी नाही तेही लोक अशा फुकटछाप शासकीय योजनांवर उड्या मारतात. तसेच लाडकी बहीण योजनेतही झाले. ते होणारच होते याचा अंदाज होताच. योजना सुरू होताच करोडो अर्ज दाखल झाले परंतु जेव्हा सरकारी तिजोरीवर त्याचा बोजा वाढू लागला तेव्हा अर्जाची छाननी सुरू झाली आणि त्यामध्ये ८० लाख अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले. राज्यास २४ हजार ३०० रुपयांचा फटका बोगस बहिणींनी दिला. ८० लाख अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी निर्लज्जपणे येन केन प्रकारेण या योजनेत अर्ज दाखल केले. ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून सुरुवातीला सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर अर्ज स्वीकारले होते परंतु पडताळणी नंतर अनेक धक्कादायक अशा बाबी समोर आल्या. यातील काही धनदांडग्या अर्जदारांच्या तर इतक्या धक्कादायक बाबी आहेत की त्या लाडकी बहीण अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  त्यांच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सादर केलेल्या असत्य बाबी ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्यालाच लाजवतात अशा आहे. 

     या अपात्र केलेल्या लाडकी बहीण अर्जदारांमध्ये  १४ हजार अर्ज तर पुरुषांचे आहेत. म्हणजे महिला असल्याचे भासवून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि सरकारची फसवणूक केली. याहीपेक्षा पुढची उदाहरणे तर तोंडात बोट घालायला लावतील अशी आहे. 

     80 लाख अपात्र अर्जांपैकी दहा लाख अर्जदार प्राप्तिकर भरणारे आहे. आता बोला ! पाच लाख अर्जदार हे सरकारी कर्मचारी कुटुंबातील आहे. म्हणजे कामचुकारी करायची, सरकारी पगारही घ्यायचा, वरकमाई सुद्धा करायची आणि फुकट छाप शासकीय योजनांचाही लाभ घ्यायचा (काही सन्माननीय अपवाद वगळून). अशा पद्धतीने आपल्याच पात्रात तूप ओढून घ्यायचे, देशाचे ओरबाडून ओरबाडून खायचे देशाला मात्र द्यायचे काही नाही. 

     या पाच लाख सरकारी कर्मचारी कुटुंबीयांपैकी काहीं जवळ तर चारचाकी वाहने सुद्धा आहेत. म्हणजे बघा सर्व बाजूंनी देशाला कसे ओरबाडणे सुरू आहे, देशाचा पैसा असा लुटणे सुरू आहे. 

    लोकांना असे खोटे अर्ज सादर का करावेसे वाटतात त्याचीही अनेक कारणे आहेत. सर्वच लोक तर फायदा करून घेत आहेत तर मग मी का नाही करू ? नेते तर गब्बर होत आहे तर मग मी का नाही घेऊ ? पैसा तर सरकारीच आहे अशी मानसिकता नागरिकांची हळूहळू होऊ लागते आणि त्यातून मग अशा प्रकारे खोटे अर्ज सादर होत असतात

     या सरकारी फुकटच्या योजनांचा लाभ जे खरे लाभार्थी असतात त्यांना न होता जे बोगस लाभार्थी आहे तेच जास्त करून घेतात असे कित्येक वेळा समोर आलेले आहे. तरीही आपल्या देशातील नेते सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रकारची आमिषे जनतेला देत आले आहे आणि सत्तेचा मार्ग मोकळा करून घेत आले आहे हेच स्वातंत्र्यापासून सुरू आहे. तसे पाहता कोणतेही सरकार हे सर्वसामान्यांसाठी जनहिताच्या योजना राबवत असते परंतु त्या योजनांचा कोणी गैरफायदा घेणार नाही याचासुद्धा विचार सरकारने करायचा असतो. गैरफायदा घेतलाच तर त्याला अटकाव व कठोर कारवाई सुद्धा असायला हवी. फुकटछाप योजना ह्या दूरगामी विचार करता देशाच्या हिताच्या नसतात. परंतु देशाचे हित कोण पाहते? म्हणूनच तर लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख अर्ज अपात्र ठरले आहे. जनता सुद्धा भ्रष्ट मार्ग अवलंबून योजनांचा गैरफायदा करत आहे, अनुदान लाटत आहे. लाडकी बहीण योजना बोगस लाभार्थींच्या अर्जांची आता पुन्हा छाननी, चौकशी होईल. या  कार्यात सरकारी पैसे आणि सरकारी श्रम, वेळ यांचा व्यय होईल म्हणजे योजना लागू करूनही नुकसान मात्र सरकारचेच असे होणार आहे. बोगस लाभार्थीं कडून पैसे वसूल केले जातील असे म्हटले जात आहे. पैसे तर वसूल केलेच पाहिजे कारण ते जनतेचे आहे. शिवाय कायद्यात सुद्धा तरतूद केली पाहिजे. सरकारी कर्मचारी, प्राप्तिकर दाते, चार चाकी वाहन असणारे अशा लोकांनी जर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस अर्ज दाखल केलेच तर त्यांच्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाईचा असा एक कायदा निर्माण केला जावा जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, जनतेचे पैसे असे उधळले जाणार नाही, जनतेचा पैसा बोगस लाभार्थी लुटून घेणार नाही. दिवसेंदिवस बोगस लाभार्थी, भ्रष्ट लोक वाढत चालले आहे लाडकी बहीण योजनेचे 80 लाख बोगस लाभार्थी आढळल्याने पुनश्च हेच सुतोवाच करावेसे वाटते की,

सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान

टीप - अनेक प्रमाणिक, देशीहितैशी, श्रमिक असे नागरिक, सरकारी कर्मचारी, नेते आजही थोडे का होईना परंतु आहेत मात्र नक्की. अशा लोकांमुळेच हा देश टिकून आहे. अशा सन्माननीय लोकांनी या लेखातून स्वतःला वगळावे.

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगांव 

 







२८/०५/२०२६

Article about Savarkar

खामगावकरांना प्रेरणादायी ठरेल सावरकर स्मारक 


स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला  येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. या घटनांची आठवण म्हणून तसेच युवकांना प्रेरणा म्हणून
खामगावला सावरकरांचे एक स्मारक असावे ही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती. सावरकरांबद्दल आज रोजी पावतो अनेक लेख लिहून झाले परंतु वीर सावरकर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की, 

सब धरती कागज करू,  लेखणी सब वनराय,  

सात समुद्र की मसी करू, गुरू गुण लिखा न जाय|

या कबीराच्या दोह्याप्रमाणे सावरकरांचे गुण वर्णनास सुद्धा समस्त पृथ्वीचा कागद केला आणि सर्व वृक्षांपासून लेखण्या बनवल्या, सातही समुद्राची शाई जरी बनवली तरी सावरकरांचे गुणवर्णन करणे शक्य होणार नाही इतके विविध पैलू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती, कवी, लेखक, क्रांतिकारक, समाज सुधारक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू आहे. आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त खामगावच्या रायगड कॉलनी परिसरातील सावरकर उद्यानाजवळ जाणे झाले. या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याच ठिकाणी सावरकरांचा भव्य पुतळा व स्मारक व्हावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे केली असल्याचे कळले. ही मागणी तिथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना रास्तच वाटली कारण तिथे उत्स्फूर्तपणे तशा घोषणा देण्यात आल्या. 

      ज्या मनुष्याने बालपणापासून मारीता मारीता मरेतो झुंजेन असे म्हणून राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली, स्वतःचा परिवार देशोधडीला लावला. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली समाज सुधारण्याचे इतके  मोठे कार्य केले की, सावरकर स्वतःच म्हणाले होते की,  "एक वेळेस माझी समुद्रात मारलेली उडी लक्षात नाही ठेवली तरी चालेल परंतु माझे समाज सुधारण्याचे कार्य मात्र लक्षात ठेवावे". स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला सुद्धा येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. सावरकरांच्या या खामगाव नगरीला भेट देण्याच्या आठवणीसाठी म्हणून खामगावला निश्चितच सावरकरांचे एक स्मारक असावे ही जी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे झाली आहे त्या मागणीला समस्त खामगावकरांनी दुजोरा द्यावा असे वाटते. तसे खामगावला सावरकरांच्या नावाने रायगड कॉलनी परिसरात सावरकर उद्यान निर्मिती झालेलीच आहे  सुंदर असे हे उद्यान आहे. याच उद्यानाच्या जवळ रायगड कॉलनी परिसरात जर सावरकरांचे स्मारक झाले तर ते  सावरकरांच्या आत्म्याला प्रसन्न करणारे ठरेल कारण या परिसराचे नाव रायगड कॉलनी आहे. रायगड अर्थात शिवाजी महाराजांची राजधानी. त्या राजधानीचे नाव या परिसराला दिले आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त होते त्यांनी शिवाजी महाराजांची आरती सुद्धा लिहिली आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे साम्य सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मी समोर स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली होती. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आग्र्याहून सुटका करून घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी जहाजातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनीही  शत्रूला भूलवण्यासाठी पत्रे लिहिली होती असे बरेचसे साम्य दोघांच्या जीवनात आपल्याला आढळते. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असल्यामुळे अनेकांशी बोलणे झाले. काही खामगांव सोडून गेलेल्या मित्रांशी सोबत मित्रांशी सुद्धा बोलणे झाले त्यात अनेकांनी सावरकरांचे असे स्मारक झाले तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे असे म्हटले तसेच काहींनी स्मारका सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ग्रंथसंपदेचे एक ग्रंथालय सुद्धा असावे असे मत व्यक्त केले तर काहींनी याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध रोमहर्षक प्रसंगांच्या चित्रांचे सुद्धा एक दालन असावे असेही मत व्यक्त केले. खामगांव शहरात अनेक सावरकरप्रेमी आहेत या सर्वांचे मत सुद्धा या निमित्ताने घेण्यात यावे. सावरकरांच्या स्मारकाला सनदशीर मार्गाने परवानगी मिळाल्यावर पुतळा बांधकाम हे सुद्धा भव्य व उत्कृष्ट असावे, पुतळ्यावर एक छत्री सुद्धा असावी. सावरकरांचे काम भव्य दिव्य होते त्यांचा पुतळा पाहिल्यावर पाहणाऱ्याचे रोम रोम फुलले पाहिजे, त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले पाहिजे, सावरकरांचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे या प्रकारचे ते स्मारक असावे.

 विश्व हिंदू परिषदेने केलेल्या सावरकरांच्या स्मारकाच्या मागणीच्या अनुषंगाने खामगांवला व त्यातही रायगड कॉलनी परिसरात सावरकरांचे स्मारक कधी झाले तर ते खामगांवकर व युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

२१/०५/२०२६

Article about NEET paper leak and old movie Tere Mere Sapne

  नीट परीक्षा घोटाळा आणि  तेरे मेरे सपने 




 नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुट प्रकरणाने  तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणारे या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे,जनतेचे सहकार्य मिळावे,पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे तेरे मेरे सपने नाहीत का ?

     नीट परीक्षा 2026 पेपर फूट आणि घोटाळा  प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. काही नामांकित अशा क्लासेसचे संचालक तसेच मोठ्या नामांकित अशा महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच अनेक मध्यस्थी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वीही नीट परीक्षा घोटाळा हा बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवण्याच्या संदर्भात उघडकीस आला होता परंतु ते प्रकरण दाबले गेले. लाखो रुपये फी घेऊन आणि पेपर मिळवून देणाऱ्या पुन्हा लाखो रुपये घेऊन डॉक्टर बनवून देणाऱ्या गब्बर क्लासेसवाल्यांच्या माध्यमातून डॉक्टर बनणारे विद्यार्थी पेशंटचे काय भले करणार ? पेशंटला काय बरे करणार ? लाखो रुपये खर्च केल्यावर पहिले तर ते लाखो रुपये कसे काय वसूल होतील ? यामागे हे डॉक्टर लोक धावतील किंबहुना धावतही आहे हे कोणीही कोणीही सांगेल (काही सन्माननीय अपवाद अवश्य आहेत.) आजकाल सर्व विद्यार्थी केवळ डॉक्टर आणि इंजिनियर याच क्षेत्राकडे धाव घेत आहे. पालकांनाही कसेही करून मारून - मुटकून आपल्या पाल्याला डॉक्टरच करायचे आहे मग त्याची इच्छा बौद्धिक पातळी असो वा नसो. यासाठी प्रसंगी त्याला विदेशात सुद्धा पाठवले जाते. डॉक्टर बना इंजिनियर बना, जरूर बना परंतु जी शपथ तुम्ही डॉक्टर बनवण्याच्या वेळी घेता ती शपथ ध्यानात ठेवा, चांगल्या मार्गाने आणि सेवेसाठी डॉक्टर बना अशा वाम मार्गाने बनत असाल तर त्यापेक्षा न बनलेले बरे.

नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळा या विचारात असतांनाच जुन्या एका चित्रपटाची बातमी वाचनात आली. 13 मे रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनास 55 वर्षे झाली. हा चित्रपट म्हणजे नवकेतनचा “तेरे मेरे सपने”. हा चित्रपट म्हणजे एका डॉक्टरचीच कहाणी आहे. म्हणून याच विषयावर लिहिण्याचे नक्की केले शिवाय नुकताच जागतिक रुग्ण सेविका दिन सुद्धा झाला म्हणून मग लिहू लागलो. तेरे मेरे सपने माझ्या जन्माच्याही आधी प्रदर्शित झालेला सिनेमा आहे परंतू जुन्या चित्रपटांची, गाण्यांची, सुमधुर संगीताची आवड असल्याने मी लिहिता झालो. खुप वर्षांपूर्वी एका कडक उन्हाळ्यातील दुपारी मी हा चित्रपट दुरदर्शनवर पाहिला होता. यातील कर्णसुखद अशा संगीताने व गीतांनी विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यातील त्या दुपारी मला सुखद गारवा मिळाला होता. एस.डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलीली एकापेक्षा एक अशी नीरज यांची अवीट मधुर गीते आज 2026 मध्येही तितकीच ताजी आहेत जितकी 1971 मध्ये होती. एका तरुण कन्येस अनुरूप असा जोडीदार मिळाल्यावर, अनुरागामुळे तीच्यात तिलाच जाणवलेला बदल व्यक्त करणारे “जैसे राधाने माला जपी श्यामकी”, नवीन जोडप्याच्या आजीवन सोबत राहण्याची भावना व्यक्त करणारे “हे मैने कसम ली”, नवपरिणीत जोडप्याच्या जीवनवेलीवर जेंव्हा एक फुल उमलणार असते तेंव्हा त्यांच्या मनातील विचार मांडणारे “जीवन की बगीयाँ महकेगी” अशा कवी गोपालदास नीरज या देव आनंदचेच “फाईंड” असलेल्या सुमधुर रचना रसिकांना कर्णतृप्तीचा आनंद देतात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांबरोबर चित्रपटात वैद्यकीय व्यवसाय कशासाठी करावा ? हा संदेश हा चित्रपट देतो. 

 डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रास समर्पित असा हा विजय आनंद या प्रथितयश दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात जाऊन तेथील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे आदर्शवादी डॉ आनंद कुमार (देव आनंद) ठरवतो ( असे ध्येय प्रत्यक्ष जीवनात लाखोतून एखादा वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी ठरवत असावा.) त्याच्या या निर्णयावर समाजाची प्रतिक्रिया , टोमणे हे अगदी मार्मिकपणे दाखवणारा हा सिनेमा आहे. एका कोळशाच्या खाणीलगतच्या गावात हा डॉक्टर सेवा देण्यास जातो. याच गावात डॉ प्रसाद हे 35 वर्षांपूर्वीच आलेले असतात त्यांच्याकडे डॉ. आनंद रुजू होतो. डॉ आ


नंदच्याही 
35 वर्षे आधी या गावात आलेल्या डॉक्टरला परिस्थितीत काही विशेष बदल झालेला आहे असे वाटत नसल्याचे ते व्यक्त करतात. पुढे निशा (मुमताज) ही आनंदच्या जीवनात येते , अनेक रुग्ण, अपु-या वैद्यकीय व्यवस्था हे सर्व चित्र पाहून तो व्यथीत होतो, खेडेगावात रुग्णसेवेसाठी आलेल्या या डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या अपघातास जबाबदार असलेला आरोपी जेंव्हा लाच देऊन सुटतो त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  पुन्हा शहराकडे जावे लागते. या कथेत इतरही अनेक वळणे आहेत. पण सेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा मुख्य संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास काल 55 वर्षे पुर्ण झाली. हा चित्रपट ए. जे. क्रॉनीन यांच्या “सिटाडेल” या कथेवर आधारीत आहे. 

55 वर्षापुर्वीच्या अपु-या वैद्यकीय सुविधा , ग्रामीण रुग्णांचे होणारे हाल यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. चित्रपटात वैद्यकीय सुविधांची परिस्थिती 35 वर्षांपासून बदलेली नाही असा संवाद आहे. म्हणजे ती 35 व चित्रपट प्रदर्शित होऊन झालेली 55 अशा 90 वर्षांपासून आपण तिथेच आहोत का ? पैशांसाठी रुग्णांची अडवणूक, पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि रुग्णालयांच्या कित्येक बातम्या रोज येत असतात .

म्हणूनच तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणा-या या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत.  सुमार्गाने व्हावे घोटाळे करून नव्हे,  पेपर फोडून नव्हे. डॉक्टर बनले पाहिजे तर ते सेवेसाठी, आपल्या देशाला वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेण्यासाठी, ग्रामीण आदिवासी भागात जाऊन तेथील रुग्णांना तपासण्यासाठी. घोटाळे, फुटलेले पेपर देऊन मग पास होऊन  डॉक्टर बनणारे लोक काय कामाचे ? 

या देशात बुद्धिमान, सुमार्गाने पास होणारे  सेवाभावी असे डॉक्टर बनावे त्यांना शासनाचे व जनतेचे सहकार्य मिळावे, पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?

(2021 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची दुसरी आवृत्ती)

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगाव




१३/०५/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar Part 2

आठवणी नानाशास्त्रींच्या 

"हरीमामा" - भाग २

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य, परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या व त्यांच्या काही मित्रांच्या तसेच किस्स्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.

या मालिकेचा पहिला एक भाग प्रकाशित होऊन एक महिना उलटून गेला. दुसरा भाग तयार होता खरा पण            कार्यबाहुल्ल्यामुळे त्याला finishing touch देणे काही होत नव्हते. शेवटी आज हे कार्य पुर्णत्वास नेण्याचे ठरवूनच टाकले. त्यामुळे आता आज हा लेख प्रकाशित होईलच.

     ही आठवण तशी या मालिकेच्या पहिल्या लेखाच्या आधीची पण जलंबला प्रत्यक्ष गेल्याने प्रथम तेथील आठवणी लिहिल्या गेल्या आणि ते योग्यही झाले. वास्तविक पाहता आजचा हा दुसरा लेख मला नानाशास्त्री, त्यांचे मित्र, त्यांनी भेटी दिलेली छोटी-छोटी गावे यांची आठवण करून देणारा पहिला लेख होता, आज तो या मालिकेच्या दुसऱ्या क्रमांकावर सादर करीत आहे. शिवाय नानाशास्त्रींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा मी इयत्ता सहावीत होतो त्यामुळे मला स्मरण होतील तेवढ्या त्यांच्या आणि त्यांचे मित्र आदींच्या आठवणी या मालिकेत सादर करण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

      फेब्रुवारी 26 ची ती संध्याकाळ, निश्चित तारीख काही लक्षात नाही. माझ्या सासूबाईंना भेटण्यासाठी म्हणून सिल्वरसिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आयसीयू मध्ये जाता येईल या अनुषंगाने आयसीयू मधील पेशंटला भेटण्याच्या रुग्णालयाच्या निर्धारित वेळेवर मी गेलो होतो. मोठमोठ्या रुग्णालयाचे कर्मचारी, स्वागत कक्षातील कर्मचारी रुग्णाच्या नातेवाईकांशी अशा पद्धतीने वागतात, बोलतात त्यावरून सौजन्यपूर्वक वागणूक कशी नसते हे कळते. आयसीयू मध्ये गेल्यावर आणि सासूबाईंना भेटल्यानंतर तिथे एक 96 वर्षाचे गृहस्थ सुद्धा दाखल असल्याचे मला दिसले. त्यांच्यासाठी म्हणून त्यांचा साठीच्या घरात असलेला त्यांचा पुत्र सुद्धा होता. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राच्या आईला त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी म्हणून पुन्हा गेलो तर तो साठीतला गृहस्थ त्याच्या भावंडासमवेत आयसीयूच्या बाहेर खुर्चीवर बसलेला दिसला. इस्पितळात गेल्यावर लोकांचे उदास, केविलवाणे, चिंताग्रस्त, भयग्रस्त असे चेहरे पाहून मला सुद्धा बेचैन वाटत असते म्हणून मी कित्येकदा रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संवाद साधत असतो. त्यामुळे कालच्या त्या आयसीयू मधील वृद्ध गृहस्थाच्या मुलाशी मी सहज तब्येतीची चौकशी केली तेव्हा त्याने ठीक आहे म्हणून म्हटले. त्यानंतर कोण, कुठले म्हणून विचारपूस झाली. त्यांना त्यांचे गाव विचारले असता लांजूड असे ते उत्तरले. लांजूड येथे राहणारे ते धुमाळे बंधू होतें. 

धुमाळे बंधू, लांजूड 

लांजूड हे नाव ऐकताच कळ दाबल्याबरोबर गोळीला बंदुकीतून  सुटण्यास जसा एक क्षणही लागत नाही तसा मी क्षणात गतकाळात गेलो मला माझे आजोबा नानाशास्त्री, त्यांचे मित्र, त्यांनी भेटी दिलेली छोटी-छोटी खेडी, परवानाधारक शिकारी असल्याने त्यांनी केलेल्या शिकारींचे किस्से आठवू लागले. खामगांव-नांदुरा रोडवर खामगांव पासून आठ किमी अंतरावर लांजूड फाटा आहे. लांजूड मला लहानपणापासून ठाऊक होते पण लांजूडचे हे दहा-बारा किमीचे अंतर गाठण्यास मात्र मला चाळीशी पार करावी लागली. दहा-बारा वर्षांपूर्वी जेव्हा लांजूडला गेलो होतो तेंव्हा फाट्यापासून लांजूडपर्यंत जाणारा  सपाट जमिनीचा, दोन्ही बाजूस काळीशार जमीन,  चांगली शेती असलेला असा तो रस्ता आणि लांजूड गांव माझ्या मनात बसले होते. त्यावेळी मी माझ्या कामाने लांजूडला गेलो होतो. हरी मामांच्या घरी सुद्धा गेलो होतो.

      "काय साहेब कोणत्या विचारात पडले ?" त्या माणसाच्या या प्रश्नावरून मी पुन्हा भानावर आलो आणि त्यांना म्हटले हरी मामा कोळी ना ओळखता का ? "हाव" ते गृहस्थ उत्तरले. "तुम्ही कसं काय वळखता त्याइले?" मला उद्देशून त्यांनी प्रश्न केला. "ते शिकारी होते न ?" असा प्रश्न मी त्यांना करताच त्यांनी दोन क्षण मला न्याहाळले आणि म्हणाले "तुम्ही नानाशास्त्रीचे कोन?" त्यांनी एकदम माझ्या आजोबांचे नाव काढल्यामुळे मला आनंद झाला, आश्चर्यही वाटले. दवाखान्यात भरती असलेल्या त्यांच्या 96 वर्षीय  वडिलांच्या तोंडून त्यांनी माझे आजोबा नानाशास्त्री यांचे वर्णन, नाव आणि किस्से ऐकले होते. मग हरी मामा, त्यांचा मुलगा लक्ष्मण काका यांच्या आठवणी निघाल्या. 

        माझ्या डोळ्यासमोर हरी मामा उभे राहिले. काळाशार वर्ण, डोक्याला फेटा, मजबूत बांधा, करारी चेहरा, धोतर त्यावर कुर्ता, पायात जोडा, असे हरी मामा मला स्पष्ट आठवले. त्यांना माझ्या आजीने भाऊ मानले होते म्हणून आम्ही सर्व त्यांना हरी मामा म्हणत असू. ते आमच्याकडे आले की अंगणात खुर्ची असूनही जमिनीवरच बसत. आजोबा पूजादी कार्यात व्यस्त असले की ते त्यांच्या सदऱ्याच्या खिशातून कागदी वेष्टण असलेले बिडीचे पाकीट काढत आणि बीडीचे झुरके मारत बसत. मग आई किंवा काकू त्यांचा चहा ठेवत असे. थरथरत्या हातानी चहा पितांना हरी मामांची भरदार मिशी चहात बुडत असे. त्यांचा हात इतका थरथर कापत असे की आम्हा लहान मुलांना बशी पडते की काय असे वाटत असे. मग ते आम्हाला शिकारीच्या गोष्टी सांगत आम्ही त्यांच्याशी काही बोललो की ते ''होजी"  किंवा "जीहो" असे म्हणून प्रतिसाद देत असत. हरी मामा भालाफेकी मध्ये खूप निष्णात होते. अचूक नेम धरून त्यांनी भाला फेकला की रानडुक्कर पडलेच म्हणून समजा. असे माझे आजोबा सांगत असत. हरी मामांच्या आठवणीमुळे मी काही काळ स्तब्ध होतो.  

हरी मामा AI इमेज 

        "भाऊ आजकाल कोणी कोणाशी बोलत नाही तुम्ही बोलले म्हणून वळख निघाली" या धुमाळे यांच्या वाक्याने मी पुन्हा भानावर आलो. त्यांच्या वडिलांची प्रकृती बरी व्हावी म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. "लांजुड ले ये जा"  ते म्हणाले. धुमाळे यांच्याशी दवाखान्यात चार आपुलकीचे शब्द बोलल्यावर असा परिचय निघाला. नानाशास्त्रींनी सुद्धा अशीच आपुलकीची माणसे जोडली होती. आमचे आजोबा नानाशास्त्री, हरी मामा, लांजूड या आठवणी घेऊन मी रुग्णालयातून बाहेर पडलो. शेजारच्या चहाच्या दुकानातल्या रेडिओवर गीताच्या ओळी वाजत होत्या 

आते है लोग, जाते है लोग 

पानी  पे जैसे रेले 

जाने के बाद आते है याद 

गुजरे हुए वो मेले.....

... पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव


२६/०४/२०२६

Demanding Adhaar Card everywhere is really essential ?

 आधार कार्डचा अनावश्यक अट्टाहास

वर्ग सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बऱ्याच ठिकाणी ऐन वेळेवर आधार कार्ड घेऊन जाण्यास सांगितले ते खरोखर आवश्यक आहे का ? आधार कार्डच्या बाबतीत फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावर अथवा कपाळावरच आधार कार्ड नंबरचा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

आज वर्ग सातवीची महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. खामगावच्या विविध केंद्रांवर शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहे. परीक्षेस आवेदन करतांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरची माहिती अपलोड केली जाते शिवाय आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा घेतली जाते. शासनाने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वितरित केले जाते.  हे प्रवेश पत्र परीक्षेच्या केंद्रावर प्रवेश करण्यास आवश्यक तो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला म्हणजेच तो त्याच्या शाळेचा अधिकृत विद्यार्थी आहे, त्याने त्या शाळेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे,  त्या शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याला जी जी कागदपत्रे सांगितली आहे ती त्याने त्या शाळेत सादर केलेली आहे हे स्पष्ट आहे. तरीही ऐन शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना असे सूचित करण्यात आले की परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रवेशपत्रावर मात्र परीक्षेसाठी आधार कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे अशी कोणत्याही स्वरूपाची सूचना दिलेली नाही. तरीही काही शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे असे ऐनवेळी विद्यार्थ्यांना सूचित केले. ही सूचना मिळेपावेतो अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून सुद्धा दिले होते. ऐनवेळी सूचना प्राप्त झाल्यावर आपल्या पाल्य परीक्षेपासून वंचित न राहावा या काळजीने काही पालक घरी येऊन पुन्हा आधार कार्ड आधार कार्डची  झेरॉक्स घेऊन खामगावच्या रणरणत्या उन्हात, 42 डिग्री च्या तापमानात पुन्हा परीक्षा केंद्रावर गेले तेथे उपस्थित शिक्षकांना आधार कार्ड झेरॉक्स दिली असता,  "दिले तर चालेल" असे त्यांचे विधान होते म्हणजे निश्चित असे काही नाही तुम्ही आधार कार्ड आणले तर चालेल नाही आणले तर नाही तरी चालेल असाच त्यांचा अर्थ होता. म्हणजे एक स्पष्ट अशी सूचना दिली जात नाही आणि त्याने विद्यार्थी व पालकांची harrashment होते. 

    आज-काल जिथे नाही तिथे आधार कार्ड मागितले जाते. काही ठिकाणी स्पष्ट समजत असते की तो व्यक्ती अधिकृत ग्राहक आहे विद्यार्थी आहे. शिवाय तो व्यक्ती अधिकृततेचे  स्पष्ट होणारे सबळ पुरावे सुद्धा त्याच्याजवळ असतात पण तरीही आधार कार्डचा आग्रह धरला जातो. हे योग्य नाही. सर्वच क्षेत्रातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा आणि आवश्यक तेथेच आणि खरोखर जरुरी असल्यास आधार कार्डची मागणी करावी. या देशात घुसखोर येऊन राहतात, नोकऱ्या मिळवतात त्यांना काही होत नाही आणि अधिकृत नागरिकांना मात्र नाहक त्रास दिला जातो हा किती मोठा विरोधाभास आहे. आधार कार्डच्या बाबतीत तर फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावरच नाहीतर कपाळावर आधार कार्ड नंबर चा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

या लेखाद्वारे हेच सांगणे अभिप्रेत आहे की सर्व कागदपत्रांची शहानिशा झालेली असल्यावर विनाकारण आधार कार्डचा अट्टाहास करू नये. आधार कार्ड संबंधित समस्त प्रणाली व अधिकाऱ्यांनी याबाबतीत विचार करावा व तसे निर्देश सर्व खात्यांना देण्यात यावे. 

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव