लाकडामंदी कोरलाय भक्तीभाव.

खामगांवच्या लाकडी गणपती बद्दल विविध जाती धर्माच्या सर्व खामगांवकरांना प्रचंड आत्मीयता आहे. खामगांवातील गरीब, श्रीमंत सर्वांचा लाकडी गणपती आधार आहे. त्याच्या मंदिरात सर्वजण रमतात.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहर म्हणजे कापसासाठी प्रसिद्ध असे शहर, कापसाची मोठी बाजारपेठ येथे होती. देशभरातील कापसाचा भाव खामगांवातून ठरायचा असे जुने जाणकार लोक सांगत असतात, सिल्वरसिटी ही तशी खामगांवची अलीकडची प्रसिद्धी. पण ज्याप्रमाणे येथे चांदीच्या कलात्मक वस्तू बनतात त्याचप्रमाणे येथे उत्कृष्ट शिल्पकलेचे सुद्धा दर्शन घडते. येथील नटराज गार्डन आणि जनुना तलाव उद्यानातील आकर्षक शिल्पे, राष्ट्रीय शाळेतील लक्षवेधक शिल्पे याची साक्ष देतात. अशा कलेची जोपासना करणाऱ्या गावातील ग्रामदैवत लाकडी गणपती सुद्धा काष्ठशिल्पाचा जबरदस्त नमुना आहे. हा मानाचा लाकडी गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. साधारणत: एकशे तीस वर्षांपूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तेंव्हापासून आजपर्यंत येथील गणेशोत्सव व वर्षभरातील कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्राच्या विविध भागातील भाविकांसोबत मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड येथील भाविकही या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. अतिशय रेखीव व तेवढीच देखणी असलेली ही गणेश मूर्ती लाकडातून साकारण्यात आली आहे. सहा फूट उंच ही गणेश मूर्ती काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. लाकडी गणपतीचे मुकुट त्याचे कान, सोंडेवरील नक्षीकाम आणि मूषकराज हे चांदीने मढवण्यात आले आहे. त्यामुळे मुर्तीच्या देखणेपणात आणखी भर पडली आहे. संपूर्ण लाकडापासून तयार केलेली अशी गणेशाची मूर्ती महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात क्वचितच आढळेल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दुरूनच या गणेशाचे दर्शन घडते. पाहता क्षणीच ही मूर्ती मनात घर करते. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय आनंदी आणि मनाला शांती देणारे आहे गणेशोत्सव काळात मूर्तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असतात अशीही काही भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती कसा तयार झाला याच्या दोन आख्यायिका सांगितल्या जातात.
काहींच्या मते एकशे तीस वर्षांपूर्वी खामगांव शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला (आताच्या फरशी नाल्याला ) मोठा पूर आला होता. त्या पुरात लाकडाचा एक मोठा ओंडका वाहत आला. तो फरशी जवळ अडकला. तेंव्हा गावकऱ्यांना तो ओंडका गणपतीच्या आकाराचा असल्याचा जाणवला. तो पाण्यातून बाहेर काढला असता हुबेहूब गणपतीच असल्याचे आढळल्याने गावकऱ्यांनी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार खामगांवातील फरशी भागातील अय्याची कोठी भागात दक्षिणेकडून आलेले आचारी राहत होते. त्याकाळी गॅस आदी उपकरणे नसल्याने स्वयंपाक हा चुलीवर होत असे त्यामुळे हे आचारी लोक मोठमोठी लाकडे आणत असत, त्यातील काही लाकडांमध्ये त्यांना गणपतीचे अवयव भासले व तशा लाकडांपासून त्यांनी हा सुरेख गणपती तयार करून घेतला आणि अय्याची कोठी भागातच त्याची प्रतिष्ठापना केली.
नंतरच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत त्याला मानाचे स्थान देण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत लाकडी गणपती पहिल्या क्रमांकावर असतो पण त्याचे विसर्जन केले जात नाही त्या दिवशी केवळ हलविला जातो. ठरलेल्या मार्गावरून शोभायात्रा फिरल्यानंतर हा गणपती परत मंदिरात आणण्यात येतो. खामगांवातील गणेशोत्सव अतिशय शांततेत कसा पार पडेल आणि अन्य गणेश मंडळांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत लाकडी गणपती निर्धारित वेळेतच फरशीवर आणण्यात येतो सर्व गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे नेतृत्व याच गणपतीकडे असल्याने ते निर्विघ्न आणि वेळेत पार पडण्याची काळजी लाकडी गणेश मंडळ घेते. एरवी मिरवणुकीत जल्लोष असतो "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" असा जयघोष होतो, उत्सवाचा अतिरेक मात्र केला जात नाही. शिस्तीत, जल्लोष आणि शांततेत उत्सव साजरा करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळते. या गणपतीची विसर्जनाची प्रतीकात्मक मिरवणूक ही पुर्वी बैलगाडीत निघत असे आता मात्र काही अंतरापर्यंत गाडी बैल ओढतात व नंतर मात्र सुशोभित ट्रॅक्टर मधून गणपतीला नेले जाते.
![]() |
| लाकडी गणपती मिरवणुकीचा जुना फोटो |
लाकडी गणपती बाबत एक कटू व विसरली जाणार नाही अशी आठवण सुद्धा आहे जी इथे सांगितल्या वाचून राहवत नाही. ती आठवण म्हणजे, 1956 मधील दंग्यात गणपतीस इजा पोहचली होती. त्या काळात झालेला हा भीषण दंगा होता. ज्याचे वृत्त BBC रेडिओ ने दिले होते. अल्पावधीतच लाकडी गणपतीस जिथे क्षती पोहचली होती तो भाग पुनर्निर्मित केला गेला. असे जुन्या पिढीतील जाणकार लोकांकडून ऐकले आहे.
स्वातंत्र्यानंतर खामगांवकरांनी या गणपतीकडे विशेष लक्ष दिले. त्यावेळी खामगांवातील व्यापारी मंडळी विशेषतः अडत व्यापाऱ्यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला. त्यावेळच्या विश्वस्त मंडळात जयनारायण नंदलाल, माताशरण दुबे, दत्तात्रय उर्फ वैद्य नानासाहेब वरणगांवकर, एकनाथ जयराम, गंगाधरराव पिवळटकर, भिकाजी निंबाजी आणि त्र्यंबकलाल पूरवार यांनी काम पाहिले. 1995 मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी आर. बी. अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना या मंदिराचे व्यवस्थापन सोपवले. सध्या या लाकडी गणपती मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरज अग्रवाल हे असून शेखर पुरोहित, अधिवक्ता धनंजय भेरडे, अमित गोयनका, संजय झुनझुनवाला असे पदाधिकारी व इतर सदस्य निष्ठेने कार्य करीत आहे.
सुरुवातीला छोट्या जागेत असलेल्या या मंदिराचा 1997 या वर्षी पहिला जिर्णोद्धार करण्यात आला. पण तरीही वाढती लोकसंख्या आणि मंदिराचा वाढता कारभार पाहून ही जागा सुद्धा कमी पडत होती म्हणून गतवर्षी म्हणजे 20/08/2025 रोजी मंदिराचा पुन्हा विस्तार करण्यात आला यासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या जागा काही मंडळींनी दान केल्या त्यात गिरजापुरे कुटुंबीयांचा यांचा मोठा वाटा आहे. आता मंदिर हे अधिक प्रशस्त व नजरेत भरेल असे झाले आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त भाविकांना सामावून घेणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
![]() |
| लाकडी गणपती मंदिराच्या आधुनिक स्वरूप |
मंदिर परिसर चिंचोळा असला तरी भाविकांना कमीत कमी त्रास होतो दर्शनाच्या वेळी शिस्त पाळली जाते. रांगेतील भाविक अन्य भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस भाविकांची गर्दी असते. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला सुद्धा मोठी गर्दी असते. खामगांवकरांचे आराध्य दैवत असलेल्या लाकडी गणपतीशी भाविकांच्या भावना जुळल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सव काळात बाहेरगांवी नोकरी व्यवसाय निमित्त गेलेले नागरिक लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.
लाकडी गणपती खामगांवाचा सामाजिक सहभाग :-
१. अन्नदान -
लाकडी गणपती मंदिर संस्थान खामगावात अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमात सामाजिक उपक्रम राबवत आले आहे. 1980-90 च्या दशकात भाविकांना प्रसाद वितरण तसेच अन्नकुटाचे आयोजन करण्यात येत असे चतुर्थीच्या दिवशीचा प्रसाद हा काही भक्त स्वतःच्या घरी बनवून भाविकांना वितरित करत असत. गणेशोत्सवात जनतेसाठी अन्नकुटाचे आयोजन सुद्धा अनेक वेळा झाले आहे.
२. पर्यावरण जन जागृती
लाकडी गणपती संस्थानचा गणेशोत्सव अधिकाधिक निसर्गप्रेमी व स्मरणात राहणारा असावा म्हणून या मंडळाचे काम सुरू असते. एरवी गणेशोत्सव म्हटला की दरवर्षी पीओपी, ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण असे विषय चर्चेत येतात परंतु खामगांवच्या या मानाच्या लाकडी गणपती मंडळाने मिरवणुकीत साधेपणाचा अंगीकार करून ध्वनी प्रदूषणास आळा घालण्यास हातभार लावला आहे. संस्थान पर्यावरण रक्षणाचे कार्य अनेक सुद्धा अनेक वर्षापासून करत आले आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाला मोठा हातभार लागणार नाही यासाठी व्यवस्थापन काळजी घेते. शहरातील इको फ्रेंडली गणेश उत्सवालाही प्रोत्साहन देते.
३. आरोग्य शिबिरे-
याशिवाय या लाकडी गणेश मंदिराचे विश्वस्त विविध सामाजिक कार्याला हातभार लावतात. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याबरोबरच आरोग्य सेवेसाठी मंदिर व्यवस्थापन शिबिरांचे आयोजन करत असते. खऱ्या गरजूंना उपचारासाठी मदतही दिली जाते.
४. रक्तदान शिबिरे-
दरवर्षी गणेश जयंतीच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केले जाते गतवर्षी यात 117 युवकांनी रक्तदान केले होते. विशेष म्हणजे रक्तदात्यांचा सन्मान सुद्धा विश्वस्त मंडळ करत असते.
५. संस्कृती जतन-
आपली भारतीय संस्कृती परंपरा जतन व्हावी म्हणून तसेच संस्कृत लोक नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना यावे म्हणून धार्मिक पुस्तकांची व श्लोकांची पुस्तके किशोरवयीन विद्यार्थ्यांना व तरुणांना मोफत वितरित केली जातात. आज पर्यंत शेकडो अथर्वशीर्ष पुस्तकाचे वितरण या गणपती संस्थांनी केले आहे.
आगामी काळात भाविकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासोबतच येणाऱ्या मिळकतीतून मोठे सामाजिक कार्य उभे करण्याचा मानस येथील व्यवस्थापन मंडळाने केला आहे.
खामगांवच्या लाकडी गणपती बद्दल विविध जाती धर्माच्या सर्व खामगांवकरांना प्रचंड आत्मीयता आहे. खामगांवातील गरीब श्रीमंत सर्वांचा लाकडी गणपती आधार आहे. त्याच्या मंदिरात सर्वजण रमतात म्हणून शेवटी असे म्हणावेसे वाटते की,
लाकडामंदि कोरलाय भक्ती भाव
रमती इथे रंका संगती राव.
- समाप्त -
👉 हाच लेख ७ सप्टे २०२६ च्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रकाशित झाला आहे. साप्ताहिक विवेकची लिंक👇 https://www.evivek.com/Encyc/2026/9/9/article-on-lakdi-ganpati-temple-khamgaon.html
✍️ विनय वि. वरणगांवकर©
9403256736
खामगांव





