Click "Follow" Button below To Follow this Blog

३१/०७/२०२५

Artical about behaviour of leaders

लोकप्रतिनिधींना झाले तरी काय ?

गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींची अचाट कृत्ये महाराष्ट्रवासीयांना चकित करून सोडत आहेत.  कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणे,  कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करणे   ,  बेताल वक्तव्ये करणे, सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होणे, लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य पद्धतीने न बोलणे असे हे प्रकार आहे. 

खरे तर या विषयावर अनेक वेळा लिखाण झालेले आहे परंतु जसे जसे आपण पुढे जात आहोत विकास करीत आहोत तसे असे राजकारण मात्र गढूळ होत चालले आहे. त्यामुळे पुन्हा-पुन्हा त्याच- त्याच विषयावर लिखाण करावे लागते. कर्मचाऱ्यांना मारणे, गलिच्छ भाषा वापरणे असे कित्येक प्रकार लोकप्रतिनिधींकडून होत असतात. पुर्वी महाराष्ट्राचे राजकारण हे देशभरात सुसंस्कृत राजकारण म्हणून ओळखले जात असे महाराष्ट्रात होऊन गेलेले अनेक संतपुरुष तसेच अनेक प्रथित यश नामांकित असे लेखक कवी, नाटककार यामुळे महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये उठून दिसत होता. महाराष्ट्राची भारतभरात एक वेगळी छाप होती, पण दुर्दैवाने आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. 

     गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींची अचाट कृत्ये महाराष्ट्रवासीयांना चकित करून सोडत आहेत. यात खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला नव्हता म्हणून मंत्रालयातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणे, विधानभवनातच कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करणे एकमेकांना शिवीगाळ करणे, कृषीमंत्र्यांनी बेताल वक्तव्ये करणे आणि सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा त्यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होणे, लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य पद्धतीने न बोलणे असे अनेक प्रकार घडले. 

      खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला नव्हता म्हणून मंत्रालयातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारताना हा सुद्धा विचार केला नाही की आपण कोणत्या अवतारात आहोत आणि काय करत आहोत. तुम्हाला जेवण चांगले मिळाले नाही तर एवढा राग येतो पण तुम्ही राज्य करत असलेल्या राज्यातील जनतेला जेवणासाठी काय मिळते आहे ?, त्यांना जेवण मिळत आहे की नाही ? मिळत असल्यास त्याचा दर्जा चांगला आहे की नाही ? शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी चांगल्या दर्जाची मिळते आहे की नाही ? हे याची सुद्धा जाणीव लोकप्रतिनिधींना असली पाहिजे. जनतेला जर पौष्टिक धान्य, दोन्ही वेळचे जेवण मिळत नसेल तर ते कसे मिळेल याच्यावर विचार करायला पाहिजे. परंतु स्वतःला चांगले पदार्थ मिळाले नाही याची भयंकर चीड येते पण जनतेला काही मिळते आहे की नाही ? त्यांना उपाशी झोपावे लागते आहे का? याबद्दल मात्र काहीही काळजी नाही.   

      याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या हाणामारीबद्दल सुद्धा म्हणता येईल. कार्यकर्ते हे असे कसे असतात की यांना आपण कुठे आहोत काय करत आहोत याचे सुद्धा भान राहात नाही. यांच्या अंगात एवढा जोर कसा येतो की हे विधान भवन सुद्धा मारामारी करायला धजावतात ? 

     महाराष्ट्रवासियांना सर्वात जास्त आश्चर्य वाटले जेंव्हा मंत्री महोदयांचा सभागृहात ऑनलाइन रमी खेळतांनाचा व्हिडिओ माध्यमांवर झळकू लागला. जनता तुम्हाला कशासाठी निवडून देते तुम्ही तिथे जाऊन काय करता, तुमची योग्य खाते मिळाले नाही म्हणून नाराजी आहे तर म्हणून काय जे खाते मिळाले तेथे चांगले काम करायचे नाही आणि बेताल वक्तव्य करायचे असे असते का ?

त्याचप्रमाणे पोलिसांना कायदा व सूव्यवस्था राखायची असते. त्यामुळे पोलिसांची भाषा ही रफ झालेली असते. कायदा व सुव्यवस्था राखतांना पोलीस मोठ्या आवाजात बोलले तर लोकप्रतिनिधींना ते सहन होत नाही मग हे लोकप्रतिनिधी पोलिसांशी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही जनतेच्या रक्षणासाठी जे पोलीस आहेत त्यांना सुद्धा हे दटावतात त्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आले आहे. यावेळी पोलिसांची मानहानी होत असते आणि जनतेच्या नजरेतून पोलिसांचा मान कमी होत असतो.

     अशी ही लोकप्रतिनिधींची वर्तणूक बघून जनसामान्य आश्चर्यचकित झाले आहे. आपण ज्यांना निवडून दिले ते लोक कसे आहेत याची प्रचिती जनतेला येत आहे. सत्ता, खुर्ची मिळाली की मीच सर्वस्व आहे आणि मी काहीही केले तरी चालते असे लोकप्रतिनिधींना वाटता कामा नये. पण नेमके तसेच होते. जनतेने लोकप्रतिनिधींना सत्ता दिली आहे, खुर्ची दिली आहे तेव्हा ती खुर्ची त्यांना हे राज्य सांभाळण्यासाठी दिली आहे, जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी दिली आहे. एकमेकांशी भांडणासाठी, मारामाऱ्यांसाठी, शिवीगाळ करण्यासाठी दिलेली नाही. परंतु याचे भान ठेवतील तर ते लोकप्रतिनिधी कसले ? काल माननीय मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त कृत्ये केलेल्या सर्व संबंधित मंत्र्यांची आमदारांची कान उघडणी केली असल्याचे वृत्त आले आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा कृषिमंत्र्यांना दटावले आहे. परंतु असे जरी केले तरी लोकप्रतिनिधींची वागणूक ही पुन्हा जैसे थे अशीच राहते.          त्यामुळे इथे हेच म्हणणे आहे की लोकप्रतिनिधींनी हे सदैव ध्यानात ठेवावे की त्यांना सत्ता जनतेमुळे मिळालेली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. त्या अर्थाने ते जनतेचे सेवक आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा प्रथमच निवडून आल्यानंतर ते प्रधानसेवक असल्याचे म्हटले होते. तेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे अनुसरण करून आपण जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेलो आहोत हे भान लोकप्रतिनिधींना ठेवायला पाहिजे. सत्ता डोक्यात न जाऊ देणे किंवा डोक्यात जाणार नाही हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. 

१७/०७/२०२५

Article about Khamgaon city.

 मी कात टाकली...

यशवंत टॉवरवरचे घड्याळ

विविध सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यावर ट्रिगार्डसह लावलेली झाडे, त्या झाडांची कटाई करीत असलेली माणसे हे न्याहाळत मी पुढे गेलो. बस स्टॅन्डसमोर गेलो असता तिथे कवी ना. धो. महानोर यांनी रचलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध "मी रात टाकली मी कात टाकली" हे गीत मोठ्या आवाजात सुरू होते. 

पावसाळ्यात रिमझिम पावसात भिजत-भिजत फेरफटका मारणे मला खूप आवडते. अशाच एका निवांत संध्याकाळच्या पावसात    भिजत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. घराजवळचेच सुंदर होत असलेले राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन, पंचायत समितीच्या त्या यशवंत टॉवरवर मा. ना. आकाश फुंडकर यांनी तातडीने निर्देश देऊन बी.डी.ओ. आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांने लागलेले नवीन घड्याळ, महाराणाप्रताप पुतळा त्या समोरचे  सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यावर ट्रिगार्डसह लावलेली झाडे, त्या झाडांची कटाई करीत असलेली माणसे हे न्याहाळत पुढे गेलो. बस स्टॅन्डसमोर गेलो असता तिथे कवी ना. धो. महानोर यांनी रचलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले लता मंगेशकर यांनी गायलेले "मी रात टाकली मी कात टाकली" हे गीत मोठ्या आवाजात सुरू होते. बस स्टॅन्ड मध्ये बससाठी प्रवेश करण्यासाठी जे गेट आहे त्या गेटच्या अगदी समोर एक सायकल स्टोअर आहे. तिथे अजूनही सायकल भाड्याने मिळते. तुर्तास अतिक्रमण हटवल्यामुळे ते सायकल स्टोअर तिथे  नाही पण त्या सायकल स्टोअरचे मालक नेहमी मोठ्या आवाजात जुनी गीते लावत. गेल्या काही दिवसात माझे त्या रस्त्याने बरेच वेळा येणे जाणे झाले. त्यामुळे तिथे लागलेली जुनी गीते माझ्या कानावर पडत. त्या दिवशी पावसात हे वरील गीत कानावर पडले. मी परत मागे वळलो नगरपरिषद जवळ झालेले भव्य सभागृह आणि त्याच्या समोरचे सौंदर्यीकरण दृष्टीस पडले, रेल्वे स्थानकाचे झालेले नवीन गेट दिसले. पुढे नटराज गार्डन कडून गेलो नटराज गार्डनचा तर कायापालटच झालेला मला दिसला. तसा तर तो कायापालट आधीच दिसला होता पण यावेळी मी निवांत असल्यामुळे तो परिसर चांगल्यारीतीने बघितला. पुर्वीचे, आम्ही लहानपणी पाहिलेले नटराज गार्डन सुद्धा सुंदरच होते पण मध्यंतरीच्या काळात त्याची अवस्था फार वाईट झाली होती. आज खूपच सुंदर, प्रेक्षणीय, झालेले नटराज गार्डन बघीतले. का कोण जाणे पण तेथील भव्य नटराजाच्या चेहऱ्यावरील भाव मला प्रसन्न असल्यासारखे  वाटले. नंतर माझ्या डोळ्यासमोर यापुर्वीच विकसित  झालेले नाना-नानी पार्क, छकुली गार्डन, सावरकर उद्यान ही सुंदर उद्याने आली. नवीन सार्वजनिक प्रसाधन गृहे सुद्धा चांगली बनवली गेली आहेत. ती चांगली ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे. 

     अनेक नव्याने झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांवरून माझी गाडी जात होती. खामगांवात बरेच चांगले बदल झालेले नागरिक बघत आहे. शासकीय यंत्रणेतून तर बदल होतच आहे परंतु रोटरी, लायन्स यासारख्या सामाजिक संस्था सुद्धा खामगावात चांगले कार्य करत आहे. खामगावातील मिशन ओटू ही संस्था सुद्धा वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी मोठा पुढाकार घेत आहे शंभो-शंभो गृपने सुद्धा जनुना तलाव परिसरात अनेक वृक्ष लावली आहेत. तरुणाई फाऊंडेशन सुद्धा उत्कृष्ट कार्य करत आहे. मिशन ओटूचे संस्थापक डॉक्टर के. एम. थानवी यांनी तर त्यांच्या गाडीवरच छोटी पाण्याची टाकी लावली आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकण्यासाठी ते ही गाडी घेऊन जातात आणि झाडांना पाणी टाकतात. अशा प्रकारचे त्यांचे हे वृक्ष संवर्धनाचे कार्य अनेकांना प्रेरणा देऊन जात आहे. शासनाच्या माध्यमातून खामगांवात विकास होत आहेच पण वर उल्लेखित सामाजिक संस्था तशाच इतरही काही संस्थांच्या माध्यमातून खामगांव शहर हिरवेगार होत आहे. वृक्षांमुळे शहरातील प्रदूषण सुद्धा आटोक्यात आहे. माझे नोकरी निमित्त इतर शहरात गेलेले मित्र आल्यावर खामगांवची हवा अजूनही शुद्ध असल्याचे सांगतात. सोशल मीडियावर खामगांवच्या द्रोणच्या माध्यमातून  घेतलेल्या अनेक चित्रफिती आलेल्या आहेत त्यात खामगाव खूपच सुंदर दिसते आहे. मध्यंतरी खामगाव शहरातून गेलेल्या नाल्यांचे सुद्धा सौंदर्यीकरण होणार आहे असे ऐकले आहे. ते जर झाले तर खामगांवच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे. पण नवीन उद्योग खामगांवात यावे तसेच पाणीपुरवठा सुद्धा नियमित व दैनंदिन असावा याचीही नागरिकांना प्रतीक्षा आहे. पाणीपुरवठा दैनंदिन करण्यामध्ये गत काळात अनेक समस्या आल्या होत्या परंतु आता वाढीव पाणीपुरवठा लवकरच होण्याची चिन्हे दिसत आहे. 

खामगांव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे अनेक बदल बघत बघत एव्हाना मी पुनश्च माझ्या घराकडे जात होतो. यशवंत टॉवर आले  पुन्हा त्या टॉवरवरच्या घड्याळाने माझी नजर खेचली आणि थोड्या वेळापूर्वी ऐकलेले "मी रात टाकली, मी कात टाकली" हे गीत मला आठवू लागले. शहरात होत असलेल्या अनेक बदल बघून खामगाव शहराने सुद्धा आता कात टाकली असा विचार माझ्या मनात आला आणि देहाने मी मानसिक आनंदाने भिजलेला मी घरी पोहचलो.

१०/०७/२०२५

Article about my lt. aunty

 वोही जीते है जो दुसरो के लिए जीते है |


मनुष्य आयुष्यभर जे काही जमा करतो ते सोबत घेऊन जात नाही पण पुण्यकर्म मात्र सोबत घेऊन जात असतो. आयुष्यभर इतरांसाठी घेतलेले कष्ट आणि धार्मिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या यामुळे मामींना निश्चितच सद्गती मिळाली असेल. 

बालपणी थोडे फार कळायला लागल्यावर "मामाच्या गावाला जाऊ या" हे वाचता / म्हणता येऊ लागले. मग कधीतरी आईसोबत मामाच्या गावाला जळगांवला मी गेलो असेल. त्या आठवणी तर आता खूपच धूसर झाल्या आहेत. मात्र त्या काळात नवी पेठ जळगांव खांदेश येथील रत्नपारखी चाळीतील तिस-या मजल्यावरील दोन खोल्यांचे प्रवेश करतांनाच स्वयंपाकघर असलेले, जाळीचा दरवाजा असलेले मागे गॅलरी असलेले छोटेखानी घर, विहीर स्पष्टपणे स्मरणात आहे, विहिरीतून रोज पाणी ओढून भरावे लागे. याच सोबत स्मरणात आहे त्या स्वयंपाकघरात आणि पुढे स्वत:च्या घरात नेहमी सर्वांसाठी कष्टत, झटत आलेल्या आमच्या मामी, प्रवरा मामी म्हणजेच प्रवरा प्रभाकर नाईक. कष्ट आणि मामी हे जणू समीकरणच होते पण इतके कष्ट करूनही ना कधी तक्रारीचा सूर आणि ना कधी उदासवाणा चहेरा. मामींना मी नेहमी हसतमुखच पाहिले. चार जुलै रोजी मामींच्या दु:खद निधनाची वार्ता आल्यावर मामींबाबतच्या अशा आठवणी झरझर डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी खामगांवहून निघालो. खामगांव ते जळगांव हा रस्ता तसा बालपणापासून परिचित पण यावेळी तो रस्ता, आजूबाजूंची गावे याकडे मुळी लक्षच गेले नाही. मनात येत होत्या त्या केवळ मामींच्या आठवणी. 
        बळीराम पेठेतील गरीब कुळकर्णी कुटुंबात जन्मलेली ही कन्या माझ्या अंदाजाप्रमाणे 60 च्या दशकात कोर्टात नोकरी करणा-या माझे  मधले मामा प्रभाकर नाईक यांची पत्नी झाली. घरी खाणारी पाच सहा तोंडे होती, ईश्वराने मामींना काही अपत्य सुख दिले नाही पण  पुतणी, पुतणे होते त्यांचा सांभाळ त्यांनी केला. आजोबांची तुटपुंजी पेन्शन, मामांचा पगार हे पुरेसे नव्हते म्हणून मामींनी आजी व मामांकडून नोकरीची अनुमती घेतली. आजी मोठी कडक सोवळ्याची होती "नोकरी करते म्हणून घरच्या पुजादी कामात हयगय चालणार नाही" या आजीच्या अटीवर ज्या शाळेत मामी शिकल्या होत्या त्याच विद्या विकास प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या, पुढे "जिस स्कुलमे तुम पढते हो हम उसके हेडमास्तर है" या फिल्मी डायलॉगप्रमाणे त्याच शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा झाल्या. हाडाच्या शिक्षिका असलेल्या मामी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रिय अशा शिक्षिका तर होत्याच पण आम्हा सर्व भाचे, पुतणे मंडळीसाठी त्या जणू जीवनशिक्षण देणा-या चालत्या-बोलत्या विद्यापीठच  होत्या. आम्ही उन्हाळ्यात मामींकडे गेलो की मामी शाळेतून लहान मुलांची पुस्तके घेऊन येत असत. गोष्टींच्या त्या पुस्तकांचा आम्ही फडशा पाडत असू. मामींनी आम्हाला खुप खाऊपिऊ घातले. सातूचे पीठ तर त्या अप्रतिम बनवत. आमची खाण्यापिण्याची तर चंगळ असे. जेवणात विविध पदार्थ, वरणावर घरचे साजूक तूप. "तूप मोरीत नाही गेले पाहिजे" अशी ताकीद असे त्यामुळे आम्ही तूप निपटून खात असू. मला बेरी आवडते म्हणून त्या आवर्जून माझ्यासाठी साखर घालून बेरी ठेवत असत. "मामाची बायको सुगरण" या गीत पंक्तीप्रमाणे त्या चांगल्या सुगरण होत्या त्यांच्या हातचे लाडू, त्यांचा हातचा चिवडा, भाज्या, इतकेच काय साधे वरण सुद्धा अप्रतिम असे. कुकर ऐवजी त्या भांड्यातच भात शिजवत. अंतिम दर्शनासाठी जाताना गाडीत माझ्यासोबत मामींच्या भावजयीचे भाऊ सुद्धा होते त्यांनी चहाची आठवण काढली त्यामुळे आठवणींच्या गर्दीतून मी भानावर आलो आणि मला चहावरून मामींची चहा बनवण्याची  निराळीच पद्धत आठवली.  त्या भरपूर चहा देत असत त्यांनी चहाने शिगोशीग भरलेला कप आणला की, "एवढा चहा तर दिवसभर पुरेल" असे माझे वडील गमतीने म्हणत. आम्ही आणि आमच्या सोबत येत असलेल्या मामींच्या आठवणी असे जळगांवात दाखल झालो, मामींचे घर आले. त्या दिवशी जळगांवला प्रथमच आता देहरुपातून आणि त्यांच्या घरातूनही कायमच्या निघून गेलेल्या त्या "रामपद", 4-B, शंकरवाडी, जेडीसीसी बँके जवळ, रींग रोड जळगांव या पत्त्यावरील घरात मी येऊन पोहोचलो होतो. कदाचित त्या घराला आता ही माझी शेवटचीच भेट असेल. माझ्या मामांनी चाळीस वर्षांपुर्वी मोठ्या हौसेने कोरीव अक्षरात लिहिलेले घराचे "रामपद" हे नांव न्याहाळले. मामीचे अंतिम दर्शन घेतले, त्या दिवशी सकाळपासून आभाळ पण रडत होते. "एक समय पर दो बरसाते एक बदलीसे एक नैनोसे " अशी सर्वांचीच गत झाली होती. मामींच्या घरात समोरच्या खोलीत बसल्यावर पुन्हा मला मी शिक्षण, नोकरी निमित्त जळगांवला राहत असतानाचे दिवस आठवले. 
     मी मामांकडे न राहता खोली करून मित्रांसोबत राहत असे. मी मामांकडे न राहिल्याने मला मामा, आजी आणि मामींनी रोज त्यांच्या घरी हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. तो आदेश मी काटेकोर पाळला होता. माझ्या मित्रांसह मी मामांकडे जात असे, मामी रोज काही खायला देत, चहा करत मग गप्पा गोष्टी झाल्या की आम्ही खोलीवर परतत असू. मी रोज माझ्या मामाकडे मित्रांना घेऊन जातो म्हणून एकदा शेजारच्या खोलीतील एक मुलगा मला म्हणाला, "कोण आहे रे तुझे मामा मामी की जिथे तुम्ही रोज जाता ? मला पण त्यांना बघायचे" म्हणून एक दिवस तो पण आला समीर देसाई त्याचे नाव. त्या दिवशी समीरसाठी खास बेत केला होता. समीरची आणि त्यांची ओळख करून दिली. मामा-मामींनी केलेले यथोचित स्वागत आणि त्यांची आपुलकीची वागणूक बघून समीरला अतिशय आनंद वाटला होता. त्याला आम्ही तिथे रोज का जातो हे आता कळून चुकले होते. जळगावच्या तीन वर्षाच्या कालावधीत दरवर्षी मला मामींनी ड्रेस घेऊन दिला. मला मी कधीही घरापासून दूर आलेलो आहे असे जाणवू दिले नाही.
     मामा आणि मामी दोघेही तसे लढाऊ बाण्याचे होते मामी मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या परंतु तरीही त्यांची मान्यता काही आली नव्हती. ही एक मोठी चूक होती. हे जेव्हा कळले तेव्हा मामांनी कठोर परिश्रम घेऊन लोकायुक्त, मुंबईपर्यंत जाऊन त्यांची मान्यता आणून त्यांची पेन्शन सुरू करून दिली होती. मामा रोज सकाळी लवकर उठून संघाचा गणवेश घालून रिंग रोड परिसरातील अनेक सुविचार फलकांवर सुविचार लिहीत असत ऊन, वारा, पाऊस काहीही असो त्यांचा हा नियम होता. पुढे मामा वारल्यावर मामींनी त्या सुविचारांचे "परागकण" नावाचे एक पुस्तक छापले. मामींची अशी इच्छा होती की त्या पुस्तकाचे विमोचन तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी यांच्याकडून करून घ्यावे. योगायोगाने सुदर्शनजी जळगाव खान्देशच्या दौऱ्यावर आले होते  मामींनी संघ कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. विनंती केली व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ मिळणे अवघड होते पण तरीही मामींनी जिद्द सोडली नाही आणि येनकेन प्रकारेण त्यांनी सुदर्शनजी यांच्याशी संपर्क साधला आणि मामांचे परागकण हे पुस्तक त्यांच्या हस्ते विमोचित करून घेतले आजही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे. 
     मामा आणि मामी यांनी अनेकांना भरभरून मदत केली मग ते त्यांचे नातेवाईक असोत किंवा नित्यपरिचित लोक असोत. दूधवाला, भांडेवाली, भाजीवाली अशा सर्वांना त्यांनी भरपूर मदत केली. अखेरच्या दिवसात मामी त्या काळात त्यांच्या भावजयीकडे राहण्यास गेल्या होत्या त्यामुळे भांडेवालीचे काम नव्हते, निराधार अशा तिला आता तिचा पगार मिळणार नाही याची चिंता लागली होती. तिने तसे सांगितल्यावर "तुला काम नसले तरी मी पगार देईल असे मामी तिला म्हणाल्या आणि तिला त्यांनी दर महिन्याचा पगार मोफत दिला. मामांना स्वतःचे घर संघाला दान करावे असे खूप वाटत होते परंतु काही अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही. मामी सर्वांसाठीच आयुष्यभर झटत राहिल्या. "इदं न मम" म्हणत सर्वांना सदैव देतच राहील्या, सर्वांना भरभरून प्रेमही दिले. अनेक अडचणी जीवनात आल्या तरीही त्यांना कधी नैराश्याने ग्रासले नाही त्या सदैव शांत आणि हसतमुखच राहिल्या. कुणाला दोष देण्याचा हेतू नाही पण काळाचा महिमा बघा कसा असतो. मामी सर्वांसाठी झटत राहिल्या पण त्यांच्या अनेक आप्तांना आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, व्यस्त, किंवा पूर्वनियोजित अशा कार्यक्रमांमुळे किंवा अन्य अडचणींमुळे मामींच्या अंतिम दर्शनासाठी सुद्धा येणे अशक्य झाले.      
     स्वामी विवेकानंदांनी दिलेला "वोही जीते है जो दुसरो के लिए जीते है" हा संदेश मामा आणि मामी प्रत्यक्ष जगले. त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था, खामगांव यांना सुद्धा भरघोस मदत निधी दिला. अध्यात्मिक, धार्मिक कार्यासाठी त्यांनी ज्या काही देणग्या दिल्या त्या सोबत घेऊन त्या इहलोक सोडून गेल्या. कारण मनुष्य आयुष्यभर जे काही जमा करतो ते सोबत घेऊन जात नाही पण पुण्यकर्म मात्र सोबत घेऊन जात असतो. आयुष्यभर इतरांसाठी घेतलेले कष्ट आणि धार्मिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या यामुळे मामींना निश्चितच सद्गती मिळाली. त्यांचा सर्वच नातेवाईकांना एक भावनिक असा आधार होता तो आधार कायमचा नष्ट झाला त्यामुळे जणू काही एखादा भला मोठा आधारवडच कोसळला असे वाटते आहे. मामींना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

०३/०७/२०२५

Article about city stresspass

बुलडोजर का मुंह एक बार अमिरोके अतिक्रमणपे भी घुमाओ. 


त्या मेकॅनिकचे "आमचा संसार उघड्यावर आला" हे उत्तर मनात घोळत होते. अनेक सुशिक्षित, धनवान, उच्चभ्रू लोकांनी केलेली अतिक्रमणे, त्यांनी बळकावलेल्या शासकीय जागा, इमारती हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या.

सध्या महाराष्ट्रात नेत्यांचा हिंदी मराठीचा वाद सुरू आहे. परंतु बहुतांश वेळा माझ्या मराठी लेखांचे शीर्षक हे मी हिंदीतच दिले आहे आणि कुणालाही कधीही ते गैर वाटल्याचे कोणी म्हटले नाही किंवा कुणी तशी प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. मातृभाषा म्हणून मला मराठीचा जितका अभिमान आहे तितकाच अभिमान राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा पण आहे आणि तो सर्वांनाच असावा, शिवाय देशात भाषेवरून वाद होणे योग्य नाही,  असो ! 
     नुकतीच खामगांव शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली किंबहुना अद्यापही ती सुरू आहे. शहरातील रस्ते एकदम मोकळे दिसू लागले, रस्त्यांना मोकळा श्वास घ्यायला जागा मिळाली, खामगांव रेल्वे स्थानकाच्या कुंपणाची भिंत तर अनेकांनी पहिल्यांदाच पहिली, बस स्थानक परिसर सुद्धा इतका मोकळा असू शकतो हे खामगांवकरांना अनुभवायला आले. काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाने आवाहन केल्यानंतर स्वतःहून अतिक्रमण काढले पण ज्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढले नव्हते त्यांचे अतिक्रमण हे बुलडोझरने काढल्यामुळे त्यांचे बरेचसे नुकसान झाले. अतिक्रमण ही सर्वच सर्वच शहरांची एक मोठी समस्या झालेली आहे. अनेक बेरोजगार युवक पुरेशा भांडवलाअभावी सरकारी जमिनीवर दुकान थाटून उद्योग व्यवसाय करतात. नोकरी मिळत नसल्याने छोट्या मोठ्या व्यवसायातून ते त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत असतात परंतु कितीही झाले तरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे हे बेकायदेशीरच आहे. अतिक्रमणामुळे रहदारीला अडचण, पार्किंग आणि इतरही अनेक समस्या येत असतात. अतिक्रमणांमधला कहर म्हणजे काही अतिक्रमणधारक हे केवळ दुकान थाटतात आणि इतरांना ते भाड्याने देतात. म्हणजे जागा सरकारची आणि भाडे फुकटात कमवायचे, अशी स्थिती देशात सर्वत्र आहे. खामगांव शहरात यावेळेस अतिक्रमण हटवतांना प्रशासन पूर्ण सज्ज असलेले आढळून आले. सर्व मोहीम शांततेत राबवली गेली शिवाय मोकळ्या झालेल्या जागेवर त्वरित आठ-दहा फुटांची झाडे सुद्धा लावण्यात आली. शहराच्या दृष्टीने म्हणाल तर ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु आता अतिक्रमण हटवल्यामुळे अनेकांची रोजी रोटी बुडाली आहे. ज्या दिवशी अतिक्रमण हटवले त्याच दिवशी नेमके माझ्या गाडीचे इग्निशन पाणी गेल्यामुळे खराब झाले होते. मी  अतिक्रमण हटाव मोहिमेत दुकान पाडलेल्या एका मेकॅनिकला "इग्निशन दुरुस्त करून देता का?" असे विचारल्यावर त्याने जे उत्तर दिले त्याने माझे मन हेलावले. तो म्हणाला, "साहेब सध्या काहीच करू शकत नाही तुम्ही बघताच आहात, आमचा संसार उघड्यावर आला आहे." ठीक आहे असे म्हणून मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो. थोडा प्रयत्न केल्यावर गाडी सुरू झाली. घरी येत असतांना माझ्या डोक्यात त्या मेकॅनिकचे "आमचा संसार उघड्यावर आला" हे उत्तर घोळत होते. अतिक्रमण आणि त्या संबंधित अनेक समस्या हे विषय माझ्या डोक्यात येऊ लागले. अनेक सुशिक्षित, धनवान, उच्चभ्रू लोकांनी केलेली अतिक्रमणे, त्यांनी बळकावल्या शासकीय जागा, इमारती हे सर्व मला आठवू लागले. अनेक सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित अशा लोकांनी “सर्विस लाईन” मध्ये अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांच्या पलीकडील भागातून येणा-या सांडपाण्याची समस्या निर्माण होते किंवा होईल याचेही भान ते ठेवत नाही शिवाय “आपल्याला कोण काय करणार?” अशी मग्रुरी असतेच. आणि हो खरंच ! कोणी काही करत नाही. यांच्या जवळच्या पैस्यामुळे हे सर्व काही ‘मॅनेज’ करीत असतात. त्यांच्या घराच्या आधी जी घरे आदी असतात तिकडून जे सांडपाणी येत असते ते कुठे जाणार? ते अडते आणि मग यांच्या घराच्या बाजूला पुन्हा अस्वच्छता निर्माण होते. काही सुशिक्षित  रस्त्यावर अतिक्रमण करतात. त्यांच्या कुंपणाच्या भिंती कश्या रस्त्यावर आल्या आहेत हे शेंबड्या पोरालाही समजते, परंतु प्रशासनास मात्र ते दिसत नाही. कुण्यातरी पक्षाचे सदस्य बनायचे किंवा अमक्या ढमक्या सेलचे पदाधिकारी म्हणून मिरवायचे आणि सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखे कृत्य करावयाचे. गरीब, झोपडपट्टी मध्ये राहणारे, रोजगार नसल्याने पोटासाठी अतिक्रमण व्यवसाय करणा-यांवर वेळप्रसंगी बुलडोजर फिरवले जाते परंतु सुशिक्षित(?) आणि धनदांडग्या सर्विस लाईन आणि रस्त्यांवर घराच्या कुंपणाच्या भिंती बांधून वाहतुकीची कुचंबणा करणा-यांवर प्रशासन मात्र क्वचितच कारवाई करतांना दिसून येते. थोड्या जमिनीचा लोभ ठेवून सुशिक्षित असूनही “सर्विस लाईन”, रस्ता अशा ठिकाणी अतिक्रमण करून, घराच्या गॅलरी मर्यादेपेक्षा बाहेर काढून, पायऱ्या रस्त्यावर काढून सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणा-यांना “तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावानुसार वर्तन करा परंतु तुमच्या जागेच्या लोभामुळे दूस-यास त्रास तर होत नाही आहे ना निदान याची तरी काळजी घ्या सुशिक्षित असूनही अशिक्षितपणा करू नका” हे आवर्जून सांगावेसे वाटते.
काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेश मधील इंदोर येथील एका रहिवाशी भागातील नागरिकांनी अतीक्रमण हटविण्यास आलेल्या कर्मचा-यांना स्वत;चे घर, दुकान पडत असूनही विकासासाठी चहा पाजून सहकार्य केले आणि आपले अतिक्रमण काढू दिले अशी घटना घडली होती. अशीच कायद्याचा सन्मान करण्याची सद्बुद्धी ईश्वर सर्वांना देवो. तसेच प्रशासनाला सुद्धा गरीब बेरोजगारांची अतिक्रमणे काढण्याबरोबरच सुशिक्षित, धनिक, उच्चविद्याविभूषित लोकांनी केलेली अतिक्रमणे सुद्धा काढण्याची बुद्धी आणि धमक ईश्वर प्रदान करो असे वाटते आणि म्हणूनच प्रशासनाला म्हणावेसे वाटते की, जरा "बुलडोझर का मुंह एक बार अमिरोके अतिक्रमणपे भी घुमाओ."

१९/०६/२०२५

Article about Hindi language.

 इंग्रजी चालते मग हिंदी का नाही ?

हिंदी ही भारतातील अनेक राज्यात बोलली जाणारी भाषा आहे तसेच तिला मराठीची "मौसेरी बहन" असे सुद्धा म्हटले जाते. भाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेवर प्रेम करून त्यावर प्रभुत्व मिळून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी असे बनवावे तसेच आपल्या पाल्यांना सुद्धा शिकवावे.

महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्याचे ठरले आणि हिंदी विरोधी सूर आवळले जाऊ लागले. हिंदी ही भारतातील अनेक राज्यात बोलली जाणारी भाषा आहे तसेच तिला मराठीची "मौसेरी बहन" असे सुद्धा म्हटले जाते. हिंदी आणि मराठी खूपच समान अशा भाषा आहे. त्यामुळे मराठी बोलणाऱ्याला हिंदी बोलणे सहज जमते आणि हिंदी भाषिक लोक सुद्धा मराठी  अस्खलितपणे बोलतात. हिंदी ही आपल्याच देशाची भाषा आहे मग ती उत्तरे कडील राज्यात बोलली जाते म्हणून आपल्याकडे तिची सक्ती नको हा तर्क काही योग्य वाटत नाही. तुम्हाला विदेशातली भाषा चालते मग उत्तरेकडील राज्यातील भाषा का चालत नाही ? आज संपूर्ण भारतात इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झालेला आहे. दगड उचलला की संपुर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आढळतात पालक सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी शाळांना गळती लागलेली आहे परंतु त्या विरोधात एकही नेता ब्र सुद्धा काढत नाही पण हिंदी सक्तीची झाल्यावर मात्र सर्रास विरोध होताना दिसतो आहे. हिंदी सक्तीची होते आहे पण मराठी भाषा कुठे बंद होते आहे हा सुद्धा विचार केला पाहिजे ना ! अनेक थोर पुरुषांचे तर असे म्हणणे आहे की मनुष्य हा बहुभाषिक असावा त्याला एक नव्हे तर अनेक भाषा अवगत असाव्या. आपण संभाजी महाराज यांचे नावे घेतो, त्यांचा आपल्याला अभिमान आहे, आणि असायलाचं पाहिजे.  पण त्या काळात काळात संभाजी महाराजांनी संस्कृत, इंग्रजी पारशी आदी अशा भाषांचा अभ्यास करून त्या भाषा ते शिकले होते त्यांनी इतर भाषांत ग्रंथ सुद्धा लिहिले होते. मग पाचशे वर्षांपूर्वी भाषेबद्दल द्वेष नव्हता आणि ज्यांना आपण आपले आदर्श मानतो ज्यांची नावे सतत घेतो ते लोक जर कोणत्या भाषेला विरोध करत नव्हते, परकीयांच्या भाषेला सुद्धा विरोध करत नव्हते तर मग आपण आपल्याच देशातील भाषेला विरोध का करावा ? आपल्या पाल्याला जर एकापेक्षा अनेक भाषा येत असेल येत असतील तर ते चांगलेच आहे ना !. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान उच्चविद्याविभूषित पी. व्ही. नरसिंहराव यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो. पी. व्ही. नरसिंहराव हे दक्षिणात्य होते परंतु ते राजकारणामुळे विविध राज्यात फिरस्ती करायचे त्याच कालावधीत त्यांनी त्या-त्या प्रदेशातील भाषा अवगत करून घेतल्या. पी.व्ही. नरसिंहराव अकरा भाषांमध्ये लिहू, वाचू, आणि बोलू शकत होते.

     इथे एकच म्हणावेसे वाटते की, आपल्या देशातील लोकांनी आणि नेत्यांनी भाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेवर प्रेम करून त्यावर प्रभुत्व मिळवून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी असे बनवावे तसेच आपल्या पाल्यांना सुद्धा शिकवावे.  लोकप्रतिनिधींनी तर उगाचच भाषा प्रांत यांचे मुद्दे उपस्थित करून राजकारण करू नये उलट विकासाचे मुद्दे काढून त्यावर बोलावे. भाषेचा द्वेष केल्यामुळे आपण आपल्याच देशातील बांधवांमध्ये द्वेष भावना पसरवत आहोत याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे. उद्या जर आपल्या मराठी भाषेला इतर राज्यात विरोध केला तर आपल्याला कसे वाटेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपले पंतप्रधान क्रोएशिया या देशात गेले होते याप्रसंगी त्या देशातील अनेक नागरिक  माध्यमांना मुलाखती देतांना हिंदीमध्ये बोलले. आणि आम्हाला हिंदी आवडते असेही म्हणाले. विदेशी माणसे जर हिंदी बोलत आहेत त्यांना हिंदी भाषा आवडते आहे तर मग आपण हिंदी भाषेचा द्वेष का करावा ? ती तर आपल्याच देशाची भाषा आहे. शेवटी एकच म्हणावेसे वाटते की, 

हिंद देश के निवासी सभी जन एक है,

रंग, रूप,वेष, भाषा चाहे अनेक है |

त्यामुळे सर्वांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्याला विदेशी भाषा इंग्रजी चालते तर मग हिंदी का चालायला नको ? असे वाटते.