Click "Follow" Button below To Follow this Blog

२०/११/२०२५

Article about various works assigned to school teachers

शिक्षक की डेटा एन्ट्री ऑपरेटर ?


माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर , उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. अशा रीतीने शिक्षकांना निव्वळ ऑनलाईन कार्यास जुंपून टाकले आहे.

परवा शिक्षकांना अचानकपणे खान अकॅडमीसाठी विद्यार्थ्यांची नांवे पाठवण्याचा आदेश दाखल झाला. आदेश दिला त्याच दिवशी व वेळेच्या मर्यादेत नांवे अपलोड करण्याचे सांगितले गेले. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आपापली शैक्षणिक कार्ये थांबवून खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याचे कार्य पुर्ण केले. याबाबत अनेकांना ही माहिती का पाठवली जात आहे वगैरे अशी काही इत्यंभूत माहिती मिळाली नाही. काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये खाजगी परीक्षा घेणारे, स्पर्धा घेणारे अशांना , अशा संस्थांना शाळेत त्यांच्या परीक्षांची व स्पर्धांची जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मग आज शासन स्वतः खाजगी संस्था असलेल्या खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती कशी काय पाठवण्यास सांगत आहे ? माहिती सुद्धा अत्यंत घाईघाईत पाठवण्याचे काय ' खास '  कारण आहे ? असा प्रश्न तमाम शाळांना पडला आहे. 

     शिक्षण क्षेत्रात येता-जाता नवीन-नवीन काहीतरी प्रयोग केले जात आहे आणि रोजच काही ना काही माहिती अपलोड करण्याचे सांगितले जात आहे. शिक्षकांना सोपवल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत अनेकदा उहापोह होतो व झालेला आहे. अशैक्षणिक कामासोबतच शिक्षकांना शिक्षण विभागा अंतर्गतच दिल्या जाणा-या शैक्षणिक कामांचा सुद्धा अतिरिक्त बोजा सद्यस्थितीत खूपच वाढलेला आहे. शिक्षकांवर सोपवल्या जाणाऱ्या अनेक कार्यामुळे ज्या मुख्य कार्यासाठी शिक्षकांना नियुक्त केले जाते ते शिकवण्याचे, विद्यादानाचे कार्य शिक्षक सध्या नीटपणे करू शकत नाही आणि त्यामुळेच जशी पाहिजे तशी शैक्षणिक प्रगती साध्य होत नाही. ती साध्य होत नसल्यामुळे पुन्हा नवनवीन प्रयोगांचा भडीमार केल्या जातो आणि शिक्षकांना आणखी इतर नवीन कार्यास जुंपले जाते. दिर्घकालीन अशी कोणतीही प्रणाली किंवा उपाययोजना केल्या जात नाही. धोरणे नियम बनवतात आणि त्वरित बदलले जातात. आठवी पास नापासचे उदाहरण ताजेच आहे. नवीन सरकार आले की, जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलवून टाकते. 

     इंटरनेट आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत बरीच कार्ये ऑनलाईन व्हायला लागली त्यात शाळांचाही समावेश झाला. सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांना अनेक ऑनलाईन  कार्ये करावी लागत आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर सुद्धा होत आहे, पण याचा शासन विचार करते की नाही ?  व्हॉट्स ॲपमुळे त्वरित संदेश पाठवला जातो आणि त्यामुळे आजकाल त्वरित म्हणजे अगदी वेळेवर आदेश देऊन कार्य करण्यास सांगितले जाते जसे काही शिक्षकांकडे, शाळांकडे सर्व माहिती नेहमी अगदी तयारच असते. अगदी वेळेवर माहिती मागितल्याचे परवाचे खान अकॅडमीचे उदाहरण वर दिलेच आहे. आजच आदेश पाठवला जातो आणि आजच माहिती मागवली जाते. मग ती माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर ,उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. कधी शासनाचे पेपराचे मार्क अपलोड कर, तर कधी हजेरी अपलोड कर,  शाळांचे फोटो अपलोड कर , मां के नाम पेड चे फोटो अपलोड कर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. विशेष म्हणजे प्रश्न हा पडतो की एवढा सगळा डेटा अपलोड होत आहे तर तो तपासतो कोण? तो तपासल्यावर त्याच्याबद्दल कुठे काही आकडेवारी व माहिती सुद्धा प्रसिद्ध होत नाही, ती झाली तरी त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही मग हा रोजच माहिती पाठवण्याचा, डेटा अपलोड करण्याचा अट्टाहास का ? ऑनलाइन झाले म्हणून हुरळून जाऊन सर्वच माहिती पोर्टलवर टाकण्याची खरंच काही आवश्यकता आहे का ? ती टाकल्यावर त्यांनी शाळांची प्रगती होत आहे का, किंवा होईल का ? बरे शासनाने माहिती भरण्यासाठी जी पोर्टल दिली असतात त्यांचे सर्व्हर स्ट्रॉंग नसतात. मग कित्येकदा वेबसाईटवर ते कार्य होत नाही, वेबसाईट चालत नाही किंवा हळूहळू चालते याकडे पण शासनाचे लक्ष नाही. शासनाला जर ऑनलाईन माहिती हवीच असेल तर मग तसे स्ट्रॉंग सर्व्हर सुद्धा शासनाने ठेवले पाहिजे. शालार्थ या वेतनाच्या पोर्टलमधे असलेल्या एका तृटीमुळे शाळांनी खोटे कर्मचारी आयडी दाखवून पगार उचलला. त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली परंतु शालार्थ प्रणाली पुरवणाऱ्या कंपनीवर काय कारवाई झाली हे काही कुठे वाचनात आले नाही. 

     शिक्षण क्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. समाजाची सद्यस्थिती पाहता शिक्षणाचा दर्जा एकदम उच्च कोटीचा असणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे बालमनावर वाईट परिणाम होत आहे. नको त्या गोष्टींचे ज्ञान त्यांना नको त्या वयात होत आहे त्यामुळे बालकांकडे अधिकाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून शासनाने शिक्षकांना शिक्षकच राहू द्यावे डेटा एन्ट्री ऑपरेटर बनवू नये जेणेकरून ते या बालकांकडे चांगले लक्ष देतील आणि मोबाईलमुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम रोखल्या जाऊन त्यांच्यावर शिक्षणाद्वारे चांगले संस्कार रुजवू शकतील.


३०/१०/२०२५

Article about craze of photos and beauty parlour

 ब्युटी पार्लर मे जा जा के...

हल्लीच्या झकपक लग्न समारंभात वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात. माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो.

किशोरवयात चित्रपट, गाणी हा विषय मला आवडू लागला होता. तसा त्या वयात तो विषय बहुतेकांना आवडत असतो म्हणा. त्या काळात दूरदर्शनला पर्याय म्हणून केबलद्वारे विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण होणे सुरू झाले होते. व्हीसीआर हे नवीन गॅजेट उपलब्ध झाले होते, टॉकीज तर होत्या आणि गाणी ऐकण्यासाठी रेडिओ आणि कॅसेट प्लेयर सुद्धा होतेच. त्यामुळे कित्येक चित्रपट व गाण्यांच्या उजळण्या सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे काही संवाद, गाणी लक्षात राहिली तर काही गाण्यांच्या एखाद दोन ओळीच लक्षात राहिल्या.  या लेखाचे शीर्षक असलेली त्यापैकीच अशी एका गाण्याची ओळ. एखाद वेळी प्रसंगानुरूप आपल्याला सहजच एखादे गीत आठवून जाते. काल वृत्तपत्रात आलेल्या एका ब्युटी पार्लरच्या पत्रकामुळे "ब्युटी पार्लर मे जा जा के वक्त अपना ना जाया करो" अशी ही ओळ मला आठवली. पण ही ओळ कोणत्या गाण्यातील आहे हे मात्र मी साफ विसरलो होतो. कारण नव्वदच्या दशकातील ते गीत काही फार सुंदर रचना वगैरे असे असणारे गीत नव्हते तर उडत्या चालीचे बी ग्रेड सिनेमाचे ते गीत होते. ओळ आठवत होती पण गीत काही आठवत नव्हते त्यामुळे डोक्यात किडा वळवळू लागला आणि मग युट्युबवर या ओळी टाकून सर्च केले  आणि ते गीत सापडले. हे सर्व या लेखात सांगणे हे क्रमप्राप्तच आहे अन्यथा या लेखाचे वाचक विशेषत: महिला वाचक म्हणतील की लेखक मनानेच काहीतरी सांगून ब्युटी पार्लर विरोधी विचार मांडत आहे. मी गीत शोधल्यावर ते ऐकले त्यातील ओळी या अशा खालील प्रमाणे आहे.  

तुम वैसे ही इतनी हसीं हो
मेकअप ना लगाया करो,
ब्यूटी पार्लर में जा जा के
वक़्त यूँही न जाया करो |

ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपला वेळ वाया जातो असे प्रतीत करणाऱ्या या ओळी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर महिला वाचकांना कदाचित ते रुचणार नाही. आजकालच्या काळात कुणाला काही सल्ला देणे किंवा तत्सम लिखाण करणे हे कठीणच आहे कारण आजकालच्या लोकांची विशेषतः तरुणांची सहनशक्ती ही कमी झाली आहे. पण कोणाचा विरोध किंवा कोणाच्या व्यवसायाची अवहेलना हा या लेखाचा मुळीच उद्देश नाही. सोशल मिडिया आल्यापासून फोटो, सेल्फी काढण्याची खूपच क्रेझ वाढलेली आहे सोशल मिडियाच्या आधी सुद्धा फोटो काढले जात असत परंतु फोटो काढणे, मग तो डेव्हलपिंगला टाकणे असे बरेच सोपस्कार पार पाडल्यावर ते फोटो मिळत असत. शिवाय काढलेले फोटो हे फक्त घरचीच मंडळी बघत असत. आता फोटो काढल्यावर ते सोशल मिडियावर पण टाकावे लागतात, ते सर्वजण बघतात मग त्यांचे लाईक, कमेंट मिळवण्यासाठी ते फोटो मेकअप करून काढले जातात, इफेक्ट वगैरे दिले जातात. नवरात्र आदी समारंभात तर तरुण-तरुणी,  चाळीशीतील बायका या मोठ्या सजून धजून तयार होत असतात. हल्ली प्री-वेडिंग शूट, पोस्ट विडींग शूट यांची मोठी टूम लग्नप्रसंगी निघाली आहे. हे करण्यासाठी कॅमेरा आणि इतर सामग्री असे सर्व तामझाम घेऊन विविधी लोकेशनवर फोटोग्राफर आणि फोटो काढणारे तरुण-तरुणी दिसतात. जणू काही चित्रपटाचे शूटिंग होत आहे की काय असे दृश्य असते. हे फोटो आणि त्या फोटोसाठी करावा लागणारा मेकअप यासाठी मग ब्युटी पार्लरची आवश्यकता भासते आणि  सौंदर्य खुलवण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी मग ब्युटी पार्लरला मोठा वेळ द्यावा लागतो. हल्लीच्या लग्न समारंभात तर विधींपेक्षा फोटोंनाच अधिक प्राधान्य असते. एकेका विधीनंतर गुरुजी सुद्धा सांगायला लागले की चला आता फोटो काढा. काही वेळेस तर अक्षरशः विधी बाजूला टाकून दिले जातात आणि फोटो काढले जातात. वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो. एकदा तर एका लग्नात एक स्त्री येऊन माझ्याशी बोलायला लागली प्रथम तर मी तिला ओळखलेच नाही पण काही क्षणातच माझ्या लक्षात आले. "अरे मी तर तुम्हाला प्रथम ओळखलेच नाही" मी म्हणालो. ही माझी खरी, उत्स्फूर्त व नैसर्गिक, सहज स्वाभाविक प्रतिक्रिया होती परंतु त्यांना ती त्यांची स्तुती वाटली कारण इश्श !इतका चांगला मेकअप झालाय का माझा ? असे त्या म्हणाल्या.  (तसं तर हल्लीच्या काळात कोणतीही स्त्री इश्श वगैरे काही म्हणत नाही, पुरुषांवरच आता इश्श म्हणावं अशी वेळ आलेली आहे पण लेखात थोडी रंगत यावी म्हणून इश्श हा शब्दप्रयोग केला आहे.) तर त्या सभ्य महिला माझ्या परिचित असल्याने  त्यांचा नेहमीचा, (म्हणजे विना मेकअपचा) चेहरा माझ्या लक्षात होता पण खूप मेकअपमुळे मी त्यांना खरोखर ओळखले नव्हते. एखाद्या चित्रपट किंवा रील मध्ये दाखवल्या जाणाऱ्या किश्शांसारखाच हा प्रकार घडला होता. 

     आपण सुंदर दिसायला पाहिजे ही तमाम स्त्री पुरुषांची इच्छा असते किंवा बालपणापासून त्यांना तसेच शिकवले जाते त्यामुळे बहुतांश जणांना आपल्या बाह्य सौंदर्याची काळजी अधिक असते. परंतु आंतरिक सौंदर्य मात्र दुर्लक्षिले जाते. आताशा तर आंतरिक सौंदर्य हा पण काही प्रकार आहे असतो हे सुद्धा तरुणाईस ठाउक आहे की नाही अशी परिस्थिती आहे.

  ज्याचे विचार चांगले असतात, विविध विषयांचे ज्ञान असते, अभ्यास असतो जो सर्वांना समदृष्टीने पाहत असतो तो सर्वाँना आपोआपच सुंदर दिसायला लागतो. त्याला बाह्य मेकअप, ब्युटी पार्लर किंवा यूनिसेक्स सलून आदी भानगडींची काही गरज वाटत नाही. परंतु सहसा अभ्यास, ज्ञान, विचार, सकारात्मकता या गोष्टींनी आपले सौंदर्य खुलवण्याऐवजी विविध रसायनांनी युक्त अशी सौंदर्यप्रसाधने वापरून आपले बाह्य सौंदर्य फुलविण्याचा प्रयत्न आजकाल खुप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेष म्हणजे ही सौंदर्यप्रसाधने अत्यंत महागडी असतात पण तरीही मेकअप करण्यावर मोठा खर्च होत आहे. लग्नाच्या फोटोंचा खर्च सुद्धा आजकाल खिशाला मोठी कात्री लावणारा झाला आहे. तसे पाहता स्त्रिया त्यांच्या सौंदर्याकडे अनादी काळापासून लक्ष देत आलेल्या आहे. आपण सुंदर दिसलो पाहिजे अशी प्रत्येक स्त्रीची स्त्रीसुलभ अभिलाषा असते. परंतु जुन्या काळात सौंदर्यप्रसाधने ही शुद्ध दुध, हळद, तूप आदी नैसर्गिक पदार्थांची अशी होती. 

      तर मुद्दा हा आहे की, केवळ मेकअप केल्यानेच कुणी सुंदर दिसतो असे काही नाही. काही व्यक्ती या जात्याच सुंदर असतात. त्यांना सुंदर दिसण्यासाठी म्हणून काही विशेष उपद्व्याप करावे लागत नाही. काही स्त्री पुरुष हे बिना मेकअपचे सुद्धा सुंदर दिसतात प्रहार या सिनेमात माधुरी दीक्षित ही विना मेकअपची होती आणि ती त्या सिनेमात खूप सुंदर सुद्धा दिसली आहे. साधेपणात सुद्धा एक सौंदर्य असते. काही स्त्री पुरुष हे त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. उदाहरणार्थ मेट्रो प्रकल्प प्रमुख अश्विनी भिडे आपल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि काश्मीर मधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल निर्मिती प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. जी. माधवी लता या त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. अशी आणखीही भरपूर उदाहरणे आहेत. 

मेकअपचा खर्च, सौंदर्य प्रसाधनांवर होणारा खर्च त्यासाठी वाया जाणारा वेळ कदाचित यावरूनच वर दिलेल्या ओळी, ते गीत कवीला सुचले असावे आणि म्हणूनच तो म्हणतो की,

तुम वैसे ही इतनी हसीं हो
मेकअप ना लगाया करो
ब्यूटी पार्लर में जा जा के
वक्त युंही ना जाया करो |

 टीप - सद्यस्थितीतील फोटो, मेकअप बाबतची ही वस्तुस्थिती कथन केली आहे. लेखक कुणालाही फोटो न काढण्याचा किंवा मेकअप न करण्याचा आग्रह करत नाही. शेवटी घटनेने आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहेच. त्यामुळे लेखातून आपल्याला पटते तेवढे घ्यावे ही विनम्र सूचना 

२७/१०/२०२५

Trubuting article for Asrani #asrani

 आसरानीची "छोटीसी बात"


प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेता येतील अशा बाबी  त्याच्याकडे असतात व त्याला सुद्धा या बाबींचा  प्रभाला पटवण्यासाठी चांगला उपयोग होईल याचा विश्वास असतो. आसरानीने नागेशची ही भूमिका त्याच्या अंगभूत अभिनयाने सुरेख वठवली आहे. 

देशभर दिवाळी साजरी होत असतानाच आसरानीच्या निधनाची दुःखद बातमी येऊन टपकली. लहानपणापासून पाहत असलेल्या अनेक सिनेमांमध्ये विनोदी कलाकार म्हणून आसरानी हा दिसायचाच. जुन्या जमान्यातील मेहमूद, राजेंद्रनाथ, आय.एस. जोहर, मोहन चोटी या विनोदी कलाकारांचे युग संपुष्टात येत असताना आसरानीचा चित्रपटांमध्ये प्रवेश झाला. आसरानी हा सपोर्टिंग कलाकार त्यामुळे त्याचा पाहिलेला पहिला चित्रपट निश्चितच आठवत नाही पण बहुदा शोलेच असावा. आसरानीच्या निधनानंतर बहुतांश जणांना त्याने बेसुमार गाजलेल्या शोले सिनेमात केलेल्या जेलरच्याच भूमिकेच स्मरण झालं. ती भूमिका होती सुद्धा तशीच आसरानीला साजेशी. हिटलरसारख्या मेकअप मध्ये शोलेत फक्त काही रीळांची असलेली जेलरची भूमिका अगदी उत्कृष्ट वठवली होती. शोलेतील अगदी छोट्या छोट्या भूमिका सुद्धा रसिकांच्या आजही लक्षात आहे. आसरानीची शोलेतील भूमिका ही निर्विवादपणे चांगली आहे, त्याने त्या भूमिकेत प्राण ओतले आहे तरी मला मात्र आसरानीच्या निधनाची वृत्ते वाचतांना आसरानीच्या विविध भूमिका आठवू लागल्या. त्यातल्या त्यात सर्वात प्रथम मला आठवली ती छोटीसी बात या बासू चॅटर्जी निर्देशित सिनेमात आसरानीने साकारलेली नागेश शास्त्रीची भूमिका आणि नंतर मग अभिमान सिनेमातील अमिताभच्या सेक्रेटरीची भूमिका, ऋषिकेश मुखर्जी यांच्या बावर्ची सिनेमातील संगीतप्रेमी तरुणाची भूमिका आणि अगदी अलीकडच्या काळातील धमाल सिनेमातील पारशी बापाची भूमिका, मालामाल विकली मधील हत्तीवाल्याची रितेश देशमुखच्या गरीब बापाची भूमिका. पण त्यातही मला स्वतःला आवडलेली म्हणजे नागेश शास्त्रीची भूमिका. बासू चॅटर्जी यांचे सिनेमे म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांच्याप्रमाणे साधे सरळ मध्यमवर्गीय सामान्य माणसाचे जीवन दर्शविणारे सिनेमे असायचे यातीलच एक छोटीसी बात हा सिनेमा. अशोककुमार, अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि आसरानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा. या सिनेमामध्ये नागेश शास्त्री बनलेल्या आसरानी आणि अरुण नांव असलेल्या अमोल पालेकर या दोघांनाही चित्रपटात प्रभा बनलेली विद्या सिन्हा ही नायिका आवडत असते परंतु अमोल पालेकर हा सुरुवातीला आत्मविश्वासहीन असा तरुण दाखवलेला आहे तर त्यासोबत प्रभा हीच्या कार्यालयात नोकरीला असलेला नागेश शास्त्री हा अतिशय कॉन्फिडंट, चतुर थोडक्यात एखाद्या तरुणीला सहज आकर्षित करू शकेल असा बेधडक युवक दाखवलेला आहे. त्याच्या तुलनेत अमोल पालेकर हा म्हणजे अगदीच लाजाळू,  श्यामळू असा तरुण दाखवला आहे. आसरानीने नागेशच्या भूमिकेत चांगले रंग भरलेले या सिनेमात आपल्याला दिसतात. त्याने नागेशची भूमिका उत्कृष्टरित्या वठवली आहे. नागेश टेबल-टेनिसपटू असतो, चांगला बोलघेवडा असतो शिवाय त्याच्याकडे स्कूटर सुद्धा असते. या प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेता येतील अशा बाबी  त्याच्याकडे असतात व त्याला सुद्धा या बाबींचा  प्रभाला पटवण्यासाठी चांगला उपयोग होईल याचा विश्वास असतो असे या सिनेमात दाखवले आहे. आसरानीने नागेशची ही भूमिका त्याच्या अंगभूत अभिनयाने सुरेख वठवली आहे. नागेशच्या भूमिकेतील आसरानीचा अस्सल अभिनय दर्शकांना दिसतो. चित्रपटात लव्ह गुरु बनलेल्या अशोककुमार कडून चित्रपटात  अरुण बनलेला अमोल पालेकर हा प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासंबंधी मार्गदर्शन प्राप्त करून येतो आणि त्यानंतर मग अंगी बळावलेल्या आत्मविश्वासाने प्रभाला प्राप्त करण्याच्या दोघांच्या चढाओढीत नागेशला मागे टाकतो आणि मग नागेशची होणारी फजिती, गंमत, त्रागा हे सर्व आसरानीने अतिशय सुंदर साकारले आहे. "ये दिन क्या आये" या गाण्यात दर्शकांना ते दिसते.  अमोल पालेकर त्याला अगदी frustrate करून टाकतो. नागेशच्या त्या frustration चा अभिनय आसरानीच करु जाणे. 

     छोटीसी बात हा तसा मध्यमवर्गीय प्रेक्षकाला आकर्षित करणारा असा  लो बजेट सिनेमा. यात सर्वांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टरित्या वठवल्या आहे, यात अमिताभ बच्चन धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहे परंतु नागेश शास्त्री या आसरानीच्या पात्रामुळे या चित्रपटात खरी गंमत येते. त्यामुळे छोटीशी बात हा जसा अशोककुमार, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांचा सिनेमा आहे  तेवढाच तो आसरानीचा सुद्धा आहे.

     नुकतेच महाभारत या गाजलेल्या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणाऱ्या पंकज धीरचे  निधन झाले, अभिनेत्री संध्याचे निधन झाले आणि काल सतीश शहा या आणखी एका चांगल्या विनोदी अभिनेत्याचे निधन झाले. रसिकांना त्यांचे दुःख क्षणभर का होईना विसरायला लावणाऱ्या अशा या सर्व गुणी कलाकारांना विनम्र श्रद्धांजली. या गुणी कलाकारांपैकीच एक म्हणजे आसरानी सुद्धा होता त्याचेही परवा निधन झाले म्हणूनच आसरानी यांची ही एक छोटीसी बात.

 


०९/१०/२०२५

Article about a organisation and its centenary and some memories.

100 वर्षांचा तरुण आणि माझ्या आठवणी

आता हा तरुण कोण आणि या तरुणाशी माझा परिचय कसा झाला ? या बाबतच्या  काही घटना तसेच या तरुणाविषयी व तो त्याच्या शंभरीतही कसा तरुण आहे, त्याचा आणि त्या बाबतीत माझ्या काही आठवणींचा ठळक लेखाजोखा.

     शंभर वर्षाचा हा तरुण माझ्यापेक्षा 50 वर्षांनी मोठा आहे. माझा जन्म 1975 चा तर याचा 1925 चा म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा याने त्याच्या वयाची  पन्नाशी सुद्धा गाठली होती. या शंभर वर्षाच्या तरुणाशी माझा परिचय माझे वय दहा-बारा वर्षाचे असताना झाला. म्हणजे मी जेव्हा दहा-बारा वर्षाचा असेल तेव्हा हा तरुण त्याच्या साठीत होता. आता असा हा शंभर वर्षांचा तरुण कोण ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल त्यामुळे आता हा तरुण कोण आणि या तरुणाशी माझा परिचय कसा झाला या बाबतच्या  काही घटना तसेच या तरुणाविषयी व तो त्याच्या शंभरीतही कसा तरुण आहे, त्याचा शंभरी पर्यंतचा प्रवास या बाबतच्या काही ठळक बाबी या लेखात देत आहे. 

      मी बालपणी पाहिलेल्या काही जुन्या फोटोत मला माझ्या आजोबांनी काळी टोपी परिधान केलेली दिसत असे. त्यांची टोपी काळी का ? असा प्रश्न माझ्या बालपणी मला पडत असे. पुढे त्याचे उत्तर मिळाले. आजोबा दरवर्षी विजयादशमीला आमच्याकडून शस्त्र पूजन करून घेत आणि शस्त्रांना प्रणाम करवून घेत. माझे काका नेहमी तरुण भारत वृत्तपत्र वाचत असल्याचे मला आठवते. त्यामुळे संघाचे बाळकडू घरीच मिळाले होते. पण त्या काळात सरकारी नोकर हे संघात उघड उघड जाण्यास कचरत असत.  आमच्या घरची सर्व वडीलधारी मंडळी ही नेमकी सरकारी खात्यातच होती त्यामुळे संघ आणि आम्ही यात थोडे अंतरच होते. असो ! पण आता मात्र वाचकांचा हा शंभरीतला तरुण कोण ? हा प्रश्न सुटला असेल. होय हा शंभरीतला तरुण म्हणजे यंदा शताब्दी वर्ष साजरे करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच. मी या माझ्याहून पन्नास वर्षे ज्येष्ठ असलेल्या संघाकडे कसा ओढल्या गेलो त्या काही घटना संघाच्या शताब्दी वर्षात विजयादशमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका वाटत असतांना माझ्या डोळ्यासमोर येत होत्या.

     घरीच संघाचे बाळकडू मिळाल्यावर पुढे माझ्या शाळेच्याच म्हणजेच नॅशनल हायस्कूलच्या समोरच्या छोट्या मैदानात काही समवयस्क तसेच काही वयाने मोठ्या मुलांसोबत शाखेत गेल्याचे आठवते. 

     दुसरी घटना म्हणजे पुढे माझा रहीवासी पत्ता बदलल्यावर झुनझुनवाला प्लॉट मधील केशव शाखा मला जवळ पडत असे. आम्ही आमच्या कॉलनीत खेळत असू तेंव्हा या शाखेचे स्वयंसेवक संतोष दादा हे आमच्या कॉलनीत संघाचे अधिकारी अरविंद नेटके सर राहत असत त्यांचेकडे येत असत तेंव्हा ते आम्हाला शाखेत घेऊन जात. संतोष दादा म्हणजे संतोष देशमुख, ते आता खामगांव तालुका संघचालक आहे.

     असा थोडा-थोडा परिचय संघाशी, शाखेशी झाला. काही बौद्धिके ऐकण्यात आली. पुढे एकदा माझा मित्र श्रीकांत करंदीकर यांच्या घरी काही निमित्ताने जाणे झाले तेंव्हा त्याच्या त्या नीटनेटक्या आणि टापटीप घरात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या तसविरी सर्वप्रथम पाहिल्या. राणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्या पण तसविरी होत्या. त्याचे वडील म्हणजे निष्ठावंत, हाडाचे स्वयंसेवक यशवंत उपाख्य बापू करंदीकर यांचेशी परिचय झाला. ड्युटी झाल्यावर ते संघ कार्यासाठी खेड्यापाड्यात सायकलवर जात. आजही काही खेड्यात गेलो की तेथील सर्व ज्येष्ठ मंडळी बापू  करंदीकर यांचे नांव मोठ्या आदराने घेतात. बापू करंदीकर यांचा मुलगा माझा मित्र असल्याने बापूंना जवळून पाहिले त्यांची साधी जीवनशैली, त्यांच्या वागणुकीचा नकळत माझ्यावर कुठेतरी काही ना काही तरी परीणाम झाला असावा असे मला वाटते. बापू आजही वयाच्या 80 व्या वर्षातही संघात तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने सक्रिय आहेत.

     याच दरम्यान धाकट्या बहिणीचे लग्न झाले तिच्या सासरचे सर्वच संघवाले, मोठा भाऊ ABVP चा सक्रीय कार्यकर्ता, एक भाऊ घोषात सक्रिय होता, माझ्या मोठ्या वहिनींच्या माहेरचे सुद्धा संघाचेच घराणे, एक वहिनी विद्यार्थी परिषद सदस्य. असे असल्याने संघाशी संबंध अधिक दृढ झाले.

      दिवसामागून दिवस जात होते. मी कॉलेज मध्ये गेलो. संघ आता मला ब-यापैकी समजला होता. मी गद्धे पंचविशीत असतांना संघ अमृत महोत्सवी वर्षात होता. त्यावेळी मी जळगांव खान्देश येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. जळगांवला माझे मामा प्रभाकर नाईक हे संघाचे तालुका कार्यवाह होते. ते रोज रस्त्यावरच्या विविध फलकांवर सुविचार लिहिण्यास जात. त्या सुविचारांचे "परागकण" अशा समर्पक नावाने माझ्या मामीनी सुदर्शनजी यांचे कडून प्रकाशन करून घेतले होते. याच ठिकाणी माझ्या मित्राला नोकरी मिळण्यासाठी म्हणून संघाचे भास्कर वासुदेव जोशी यांनी मोठे प्रयत्न केल्याचे सुद्धा आठवते. मामा, भास्कर वासुदेव जोशी अशा लोकांना पाहून मला संघाचे लोक कसे कर्तव्यतत्पर, राष्ट्रहितैशी आणि मदतीस धाऊन जाणारे असतात हे लक्षात आले. 

    दहा पंधरा वर्षांपूर्वी मात्र जेंव्हा माझ्याकडे जे. व्ही. मेहता नवयुग विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वृंद सुनीलजी जोशी, नगर संघचालक प्रल्हादजी निमकंडे, विकासजी कुळकर्णी, शंकरजी अनासाने  हे संगणक शिकण्यासाठी म्हणून येत त्यांचेशी ब-याच चर्चा होत. तदनंतर संजयजी बोरे सुद्धा संपर्कात आले. अशी ही पुर्वी पासूनच परिचित असलेली संघ मंडळी संपर्कात आली. त्यातूनच पुढे काही कार्यक्रमात जाणे झाले आणि मग मात्र संघाने मला त्याच्या चुंबकीय शक्तीने कायमचे ओढून घेतले.

     विजयादशमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका वाटतांना असे संघ आठवणींचे चलचित्र माझ्या चक्षू पटलांवर दिसत होते. एखाद्या मनुष्याने शंभरी गाठली तर तो वृद्ध म्हणवला जातो, त्याची शारीरिक, बौद्धिक कार्यक्षमता  घटते पण संघ हा शंभरीत सुद्धा मला माझ्या वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षात जसा दिसला होता तसाच दिसतो. तोच उत्साह, तेच खेळ, त्याच नित्य शाखा, तीच संघगीते, तीच सर्व समावेशकता, तेच जाती धर्माचा लवलेश नसणे, तेच चैतन्य, राष्ट्राय स्वाहा म्हणून आपले जीवन संघाला अर्पण करणारे प्रचारक, राष्ट्र प्रथम हे मानणारे स्वयंसेवक, संघाच्या विविध आयामांच्या माध्यमातून होणारी कार्ये, सेवा कार्ये, विदेशात HSS चे वाढणारे कार्य हे सर्व आजही तितकेच तरुण आहे जेवढे पुर्वी होते. 

     दहा-बारा लोकांना सोबत घेऊन डॉ हेडगेवार यांनी हे संघरुपी रोपटे लावले, गुरुजींनी, बाळासाहेब देवरसांनी संघबंदीच्या कठीण काळातही अथक परिश्रमाचे खतपाणी घालून या रोपट्याचा मोठा वृक्ष केला. असा  हा संघ आज शंभरीत असूनही तरुणच आहे आणि चिरतरुणच राहील. कारण त्याला चिरतरुण राखण्यास "वयं अमृतस्य पुत्र" असा स्वामी विवेकानंद यांचा मंत्र मानणा-या स्वयंसेवकांच्या निष्ठेचे, कार्याचे, सेवेचे, त्यागाचे अमृत त्याला सतत मिळत राहणार आहे. डॉ हेडगेवार यांनी नागपूरात लावलेल्या या रोपट्याचा आता जगभर विस्तार असलेला भलामोठा वृक्ष झाला आहे आणि हा वृक्ष आचंद्रसुर्य राहणार आहे.



२५/०९/२०२५

Article about death, moksha etc.

 मोक्ष मिळवून देणारा मृत्यू

रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हते. पण तरीही ईश्वरी कार्य करतांना त्यांच्या मृत्यू झाला त्यामुळे त्या विषयी लिहावेसे वाटले.

     रामायणात राजा दशरथाचा शोकावस्थेत मृत्यू झाला होता. त्याच दशरथ राजाची रामलीलेत भूमिका करणाऱ्या अमरेश महाजन यांचा काल रामलीलेत अभिनय करतांनाच मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू हा केव्हा आणि कसा होईल हे कोणालाही सांगणे अशक्य आहे. मृत्यूचे वर्णन अनेक लेखकांनी व कवींनी केलेले आहे. कुणी मृत्यूला कविता म्हटले आहे तर कुणी मृत्यूला एक गाढ निद्रा असे संबोधले आहे. रामदास स्वामींनी सुद्धा

एक मरे त्याचा  दुजा शोक वाहे 

अकस्मात तोही पुढे जात आहे 

असे मृत्यूबाबत म्हटले आहे. 

जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता

 राहील कार्य काय

ही भा. रा. तांबे यांची कविता सुद्धा प्रसिद्ध आहे. मृत्यूनंतर काहीही उरत नाही. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी संपत्ती इथेच सोडून मनुष्य अंतिम प्रवासाला जातो. मनुष्याचा अंत होण्याच्या सुद्धा अनेक पद्धती आहेत. कुणी अपघाती मृत्यू पावतो, तर कुणी नैसर्गिकरित्या मृत्यू पावतो. हल्ली तर ताण तणाव आणि सकस अन्न खायला मिळत नसल्याने ऐन तारुण्यात सुद्धा अनेकांचे निधन होतांना आपण बघतच आहोत. अशाच एका मृत्यूची हिमाचल प्रदेशातील चंबा या ठिकाणची ही कथा आहे. या ठिकाणच्या रामलीलेमध्ये अमरेश महाजन नामक अभिनेते गेल्या चाळीस वर्षांपासून दशरथ राजाची भूमिका वठवतात. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हेत. ते स्थानिक पातळीवरचे अभिनेते होते परंतु तरीही त्यांच्या मृत्यू बाबत लिहावेसे वाटले कारण की त्यांचे निधन हे ईश्वरा संबंधित कार्य म्हणजेच नाट्य म्हणजेच रामलीला  सुरू असतांना झाले आणि म्हणून त्याबाबत लिहिणे महत्वाचे वाटले. चंबा येथे  यंदाची रामलीला आयोजित झाली होती. लीला सुरू झाली दशरथ राजाच्या भूमिकेतील अमरेश महाजन आपली भूमिका वाठवू लागले, संवाद म्हणू लागले. अयोध्या नगरी, प्रजा यांविषयी त्यांची संवादफेक सुरू होती. आपल्या संवादात ते एका ठिकाणी भरलेल्या दरबाराच्या दृश्यात "मैं अपनी प्रजा के लिये अपने प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" हा संवाद म्हणू लागले आणि शेजारच्या पात्राच्या खांद्यावर त्यांनी आपले डोके टेकवले. थोडा वेळ सर्वत्र शांतता झाली. दर्शकांना व सहपात्रांना सुद्धा ते पुढचा संवाद म्हणतील असे वाटू लागले पण या "प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" संवादा बरोबरच त्यांचे प्राण पाखरू उडून गेले होते. सुरुवातीला प्रेक्षकांना व सहकलाकारांना अमरेश महाजन हे अभिनयच करत आहे असे वाटले पण त्यांचे डोके त्या सह कलाकाराच्या खांद्यावर वाजवीपेक्षा जास्त वेळ राहिल्याने काहीतरी वेगळे होत आहे हे उपस्थितांच्या लक्षात आले. रामलीलेत प्राण तक न्योच्छावर कर दुंगा असे म्हणत असतांनाच अमरेश महाजन यांचे निधन झाले. आता वर लिहिल्याप्रमाणे अमरेश महाजन यांच्या मृत्यूबाबत लिहिणे का महत्त्वाचे वाटले ते पाहू.

     आपल्या भारतीय संस्कृतीत असे म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी व्यक्ती जर का नामस्मरणामध्ये किंवा साधन, भजन, भक्ती मध्ये रत असेल किंवा ईश्वर चिंतन करीत असेल तर त्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच नामस्मरण करण्याबाबत सर्वच संतांनी सत्पुरुषांनी आपल्याला सांगितले आहे. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा नामस्मरणाचे महात्म्य सांगितले आहे. पुराणांमध्ये अजामेळाच्या  कथेत सुद्धा अजामेळ हा त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या मुलाचे "नारायण" असे नांव घेतो आणि त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मुलाचे नांव नारायण म्हणजेच ईश्वराचे नांव आणि त्याच्या नामोच्चरणामुळे त्याला मुक्ती मिळते अशी कथा आहे. 

अजमेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठासी

असे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे.

अमरेश महाजन हे रामलीला मध्ये गेल्या अनेक वर्षापासून दशरथ राजाची भूमिका वठवत होते. रामायणात राजा दशरथाचा पुत्र वियोगाने मृत्यू होतो आणि चंबा येथील रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला यात कुठेतरी साधर्म्य वाटले. दशरथ राजाची भूमिका वठवतानाच काल त्यांचे निधन झाले त्यामुळे अमरेश महाजन यांना सुद्धा मुक्तीच मिळाली.  अमरेश महाजन हे रामलीलेच्या निमित्ताने एकप्रकारे ईश्वरी कार्यात मग्न होते म्हणजेच त्यांचा मृत्यू हा  त्यांना मोक्ष मिळवून देणारा असा आहे. अमरेश महाजन यांच्या अशा मृत्यूमुळे मृत्यू, मुक्ती, नामस्मरण, अजामेळ याचे स्मरण झाले आणि ते वाचकांसमोर मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.