Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/०७/२०२५

Article about city stresspass

बुलडोजर का मुंह एक बार अमिरोके अतिक्रमणपे भी घुमाओ. 


त्या मेकॅनिकचे "आमचा संसार उघड्यावर आला" हे उत्तर मनात घोळत होते. अनेक सुशिक्षित, धनवान, उच्चभ्रू लोकांनी केलेली अतिक्रमणे, त्यांनी बळकावलेल्या शासकीय जागा, इमारती हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या.

सध्या महाराष्ट्रात नेत्यांचा हिंदी मराठीचा वाद सुरू आहे. परंतु बहुतांश वेळा माझ्या मराठी लेखांचे शीर्षक हे मी हिंदीतच दिले आहे आणि कुणालाही कधीही ते गैर वाटल्याचे कोणी म्हटले नाही किंवा कुणी तशी प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. मातृभाषा म्हणून मला मराठीचा जितका अभिमान आहे तितकाच अभिमान राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा पण आहे आणि तो सर्वांनाच असावा, शिवाय देशात भाषेवरून वाद होणे योग्य नाही,  असो ! 
     नुकतीच खामगांव शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली किंबहुना अद्यापही ती सुरू आहे. शहरातील रस्ते एकदम मोकळे दिसू लागले, रस्त्यांना मोकळा श्वास घ्यायला जागा मिळाली, खामगांव रेल्वे स्थानकाच्या कुंपणाची भिंत तर अनेकांनी पहिल्यांदाच पहिली, बस स्थानक परिसर सुद्धा इतका मोकळा असू शकतो हे खामगांवकरांना अनुभवायला आले. काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाने आवाहन केल्यानंतर स्वतःहून अतिक्रमण काढले पण ज्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढले नव्हते त्यांचे अतिक्रमण हे बुलडोझरने काढल्यामुळे त्यांचे बरेचसे नुकसान झाले. अतिक्रमण ही सर्वच सर्वच शहरांची एक मोठी समस्या झालेली आहे. अनेक बेरोजगार युवक पुरेशा भांडवलाअभावी सरकारी जमिनीवर दुकान थाटून उद्योग व्यवसाय करतात. नोकरी मिळत नसल्याने छोट्या मोठ्या व्यवसायातून ते त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत असतात परंतु कितीही झाले तरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे हे बेकायदेशीरच आहे. अतिक्रमणामुळे रहदारीला अडचण, पार्किंग आणि इतरही अनेक समस्या येत असतात. अतिक्रमणांमधला कहर म्हणजे काही अतिक्रमणधारक हे केवळ दुकान थाटतात आणि इतरांना ते भाड्याने देतात. म्हणजे जागा सरकारची आणि भाडे फुकटात कमवायचे, अशी स्थिती देशात सर्वत्र आहे. खामगांव शहरात यावेळेस अतिक्रमण हटवतांना प्रशासन पूर्ण सज्ज असलेले आढळून आले. सर्व मोहीम शांततेत राबवली गेली शिवाय मोकळ्या झालेल्या जागेवर त्वरित आठ-दहा फुटांची झाडे सुद्धा लावण्यात आली. शहराच्या दृष्टीने म्हणाल तर ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु आता अतिक्रमण हटवल्यामुळे अनेकांची रोजी रोटी बुडाली आहे. ज्या दिवशी अतिक्रमण हटवले त्याच दिवशी नेमके माझ्या गाडीचे इग्निशन पाणी गेल्यामुळे खराब झाले होते. मी  अतिक्रमण हटाव मोहिमेत दुकान पाडलेल्या एका मेकॅनिकला "इग्निशन दुरुस्त करून देता का?" असे विचारल्यावर त्याने जे उत्तर दिले त्याने माझे मन हेलावले. तो म्हणाला, "साहेब सध्या काहीच करू शकत नाही तुम्ही बघताच आहात, आमचा संसार उघड्यावर आला आहे." ठीक आहे असे म्हणून मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो. थोडा प्रयत्न केल्यावर गाडी सुरू झाली. घरी येत असतांना माझ्या डोक्यात त्या मेकॅनिकचे "आमचा संसार उघड्यावर आला" हे उत्तर घोळत होते. अतिक्रमण आणि त्या संबंधित अनेक समस्या हे विषय माझ्या डोक्यात येऊ लागले. अनेक सुशिक्षित, धनवान, उच्चभ्रू लोकांनी केलेली अतिक्रमणे, त्यांनी बळकावल्या शासकीय जागा, इमारती हे सर्व मला आठवू लागले. अनेक सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित अशा लोकांनी “सर्विस लाईन” मध्ये अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांच्या पलीकडील भागातून येणा-या सांडपाण्याची समस्या निर्माण होते किंवा होईल याचेही भान ते ठेवत नाही शिवाय “आपल्याला कोण काय करणार?” अशी मग्रुरी असतेच. आणि हो खरंच ! कोणी काही करत नाही. यांच्या जवळच्या पैस्यामुळे हे सर्व काही ‘मॅनेज’ करीत असतात. त्यांच्या घराच्या आधी जी घरे आदी असतात तिकडून जे सांडपाणी येत असते ते कुठे जाणार? ते अडते आणि मग यांच्या घराच्या बाजूला पुन्हा अस्वच्छता निर्माण होते. काही सुशिक्षित  रस्त्यावर अतिक्रमण करतात. त्यांच्या कुंपणाच्या भिंती कश्या रस्त्यावर आल्या आहेत हे शेंबड्या पोरालाही समजते, परंतु प्रशासनास मात्र ते दिसत नाही. कुण्यातरी पक्षाचे सदस्य बनायचे किंवा अमक्या ढमक्या सेलचे पदाधिकारी म्हणून मिरवायचे आणि सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखे कृत्य करावयाचे. गरीब, झोपडपट्टी मध्ये राहणारे, रोजगार नसल्याने पोटासाठी अतिक्रमण व्यवसाय करणा-यांवर वेळप्रसंगी बुलडोजर फिरवले जाते परंतु सुशिक्षित(?) आणि धनदांडग्या सर्विस लाईन आणि रस्त्यांवर घराच्या कुंपणाच्या भिंती बांधून वाहतुकीची कुचंबणा करणा-यांवर प्रशासन मात्र क्वचितच कारवाई करतांना दिसून येते. थोड्या जमिनीचा लोभ ठेवून सुशिक्षित असूनही “सर्विस लाईन”, रस्ता अशा ठिकाणी अतिक्रमण करून, घराच्या गॅलरी मर्यादेपेक्षा बाहेर काढून, पायऱ्या रस्त्यावर काढून सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणा-यांना “तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावानुसार वर्तन करा परंतु तुमच्या जागेच्या लोभामुळे दूस-यास त्रास तर होत नाही आहे ना निदान याची तरी काळजी घ्या सुशिक्षित असूनही अशिक्षितपणा करू नका” हे आवर्जून सांगावेसे वाटते.
काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेश मधील इंदोर येथील एका रहिवाशी भागातील नागरिकांनी अतीक्रमण हटविण्यास आलेल्या कर्मचा-यांना स्वत;चे घर, दुकान पडत असूनही विकासासाठी चहा पाजून सहकार्य केले आणि आपले अतिक्रमण काढू दिले अशी घटना घडली होती. अशीच कायद्याचा सन्मान करण्याची सद्बुद्धी ईश्वर सर्वांना देवो. तसेच प्रशासनाला सुद्धा गरीब बेरोजगारांची अतिक्रमणे काढण्याबरोबरच सुशिक्षित, धनिक, उच्चविद्याविभूषित लोकांनी केलेली अतिक्रमणे सुद्धा काढण्याची बुद्धी आणि धमक ईश्वर प्रदान करो असे वाटते आणि म्हणूनच प्रशासनाला म्हणावेसे वाटते की, जरा "बुलडोझर का मुंह एक बार अमिरोके अतिक्रमणपे भी घुमाओ."

१९/०६/२०२५

Article about Hindi language.

 इंग्रजी चालते मग हिंदी का नाही ?

हिंदी ही भारतातील अनेक राज्यात बोलली जाणारी भाषा आहे तसेच तिला मराठीची "मौसेरी बहन" असे सुद्धा म्हटले जाते. भाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेवर प्रेम करून त्यावर प्रभुत्व मिळून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी असे बनवावे तसेच आपल्या पाल्यांना सुद्धा शिकवावे.

महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्याचे ठरले आणि हिंदी विरोधी सूर आवळले जाऊ लागले. हिंदी ही भारतातील अनेक राज्यात बोलली जाणारी भाषा आहे तसेच तिला मराठीची "मौसेरी बहन" असे सुद्धा म्हटले जाते. हिंदी आणि मराठी खूपच समान अशा भाषा आहे. त्यामुळे मराठी बोलणाऱ्याला हिंदी बोलणे सहज जमते आणि हिंदी भाषिक लोक सुद्धा मराठी  अस्खलितपणे बोलतात. हिंदी ही आपल्याच देशाची भाषा आहे मग ती उत्तरे कडील राज्यात बोलली जाते म्हणून आपल्याकडे तिची सक्ती नको हा तर्क काही योग्य वाटत नाही. तुम्हाला विदेशातली भाषा चालते मग उत्तरेकडील राज्यातील भाषा का चालत नाही ? आज संपूर्ण भारतात इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झालेला आहे. दगड उचलला की संपुर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आढळतात पालक सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी शाळांना गळती लागलेली आहे परंतु त्या विरोधात एकही नेता ब्र सुद्धा काढत नाही पण हिंदी सक्तीची झाल्यावर मात्र सर्रास विरोध होताना दिसतो आहे. हिंदी सक्तीची होते आहे पण मराठी भाषा कुठे बंद होते आहे हा सुद्धा विचार केला पाहिजे ना ! अनेक थोर पुरुषांचे तर असे म्हणणे आहे की मनुष्य हा बहुभाषिक असावा त्याला एक नव्हे तर अनेक भाषा अवगत असाव्या. आपण संभाजी महाराज यांचे नावे घेतो, त्यांचा आपल्याला अभिमान आहे, आणि असायलाचं पाहिजे.  पण त्या काळात काळात संभाजी महाराजांनी संस्कृत, इंग्रजी पारशी आदी अशा भाषांचा अभ्यास करून त्या भाषा ते शिकले होते त्यांनी इतर भाषांत ग्रंथ सुद्धा लिहिले होते. मग पाचशे वर्षांपूर्वी भाषेबद्दल द्वेष नव्हता आणि ज्यांना आपण आपले आदर्श मानतो ज्यांची नावे सतत घेतो ते लोक जर कोणत्या भाषेला विरोध करत नव्हते, परकीयांच्या भाषेला सुद्धा विरोध करत नव्हते तर मग आपण आपल्याच देशातील भाषेला विरोध का करावा ? आपल्या पाल्याला जर एकापेक्षा अनेक भाषा येत असेल येत असतील तर ते चांगलेच आहे ना !. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान उच्चविद्याविभूषित पी. व्ही. नरसिंहराव यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो. पी. व्ही. नरसिंहराव हे दक्षिणात्य होते परंतु ते राजकारणामुळे विविध राज्यात फिरस्ती करायचे त्याच कालावधीत त्यांनी त्या-त्या प्रदेशातील भाषा अवगत करून घेतल्या. पी.व्ही. नरसिंहराव अकरा भाषांमध्ये लिहू, वाचू, आणि बोलू शकत होते.

     इथे एकच म्हणावेसे वाटते की, आपल्या देशातील लोकांनी आणि नेत्यांनी भाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेवर प्रेम करून त्यावर प्रभुत्व मिळवून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी असे बनवावे तसेच आपल्या पाल्यांना सुद्धा शिकवावे.  लोकप्रतिनिधींनी तर उगाचच भाषा प्रांत यांचे मुद्दे उपस्थित करून राजकारण करू नये उलट विकासाचे मुद्दे काढून त्यावर बोलावे. भाषेचा द्वेष केल्यामुळे आपण आपल्याच देशातील बांधवांमध्ये द्वेष भावना पसरवत आहोत याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे. उद्या जर आपल्या मराठी भाषेला इतर राज्यात विरोध केला तर आपल्याला कसे वाटेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपले पंतप्रधान क्रोएशिया या देशात गेले होते याप्रसंगी त्या देशातील अनेक नागरिक  माध्यमांना मुलाखती देतांना हिंदीमध्ये बोलले. आणि आम्हाला हिंदी आवडते असेही म्हणाले. विदेशी माणसे जर हिंदी बोलत आहेत त्यांना हिंदी भाषा आवडते आहे तर मग आपण हिंदी भाषेचा द्वेष का करावा ? ती तर आपल्याच देशाची भाषा आहे. शेवटी एकच म्हणावेसे वाटते की, 

हिंद देश के निवासी सभी जन एक है,

रंग, रूप,वेष, भाषा चाहे अनेक है |

त्यामुळे सर्वांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्याला विदेशी भाषा इंग्रजी चालते तर मग हिंदी का चालायला नको ? असे वाटते.

१२/०६/२०२५

Article about Raja Raghuvanshi murder case

 कालाय तस्मै नमः 

सोशल मिडियामुळे  गेट-टुगेदर होण्याचे प्रस्थ सुद्धा वाढले आहे. अनेक वेळा गेट-टुगेदर मधून जुन्या प्रेम प्रकरणांना उजाळा मिळतो आहे. जे जुन्या काळात होऊ शकले नाही ते प्रेम पुनश्च भेटल्यानंतर उफाळून येत आहे आणि त्यातून मग वैवाहिक जीवनात नवीन पेच निर्माण होतो आहे.

उपनिषदांमध्ये सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे. एका राजाची कन्या सत्यवान नावाच्या लाकूडतोड्या सोबत लग्न करते. पुढे जंगलात वडाच्या झाडाखाली सत्यवान मृत्युमुखी पडतो. त्याचे प्राण यमराजकडून परत मिळवण्यासाठी सावित्री यमराजाच्या मागे जात राहते आणि त्याला तिच्या पतीचे प्राण परत करावे म्हणून विनंती करत राहते. तिच्यात आणि यमराज यांच्यात मोठा संवाद होतो. तो पुर्ण संवाद येथे दिल्यास लेख मोठा दिर्घ होईल आणि आजकाल अलक (अति लघु कथा) चा जमाना आहे. म्हणून इथे थोडक्यात सांगत आहे. शेवटी यमराज या युक्तिवादात पराभूत होतात आणि सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद देतात आणि सावित्री मग माझ्या पतीशिवाय मी पुत्रवती कशी होऊ शकेल ? म्हणून यमाराजाला पेचात पकडते आणि यमराज सत्यवानाचे प्राण परत करतो अशी ती कथा आहे. या गोष्टीचे स्मरण म्हणून भारतामध्ये दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत करते आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून ईश्वराजवळ प्रार्थना करते. आपली पत्नी आपल्यासाठी व्रत ठेवते याचा काही ना काही परिणाम पतीच्या वर्तणुकीवर सुद्धा होतच असतो. त्या दोघात प्रेमाची भावना वृद्धिंगत होत असते. तसेच या सणामुळे वृक्ष संवर्धन,  वृक्ष प्रेम याचा सुद्धा संदेश आपसुकच मिळतो. सत्यवान सावित्रीच्या कथेमुळे भारतातील स्त्रीला तिचा पती हा सर्वस्व आहे आणि तो तिला जीवनभर साथ देणार आहे म्हणून तो दीर्घायुषी असावा असा संदेश मिळतो.  शतकानुशतके भारतातील स्त्रिया हे व्रत साज-या करत आलेल्या आहे. भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा वडाचे झाड नसते म्हणून वडाच्या फांदीची, वडाच्या झाडाच्या प्रतिकृतीची पूजा NRI स्त्रिया करतात. 

    अशी ही सर्वांना ज्ञात असलेली वटसावित्रीची कथा जरी असली तरी आता मात्र काळ झपाट्याने बदलतो आहे. कुटुंब संस्कृती लोप पावत चालली आहे. अशातच सोशल माध्यमांमुळे स्त्री-पुरुषांची ओळख मोठ्या प्रमाणात होते आहे तसेच त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा साधला जातो आहे, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड कल्चर मोठ्या प्रमाणात फॉफावले आहे. लिव्ह इन रिलेशनशिप प्रकार पण बोकाळला आहे त्याबरोबरच सोशल मिडियामुळे जुनी मित्रमंडळी सुद्धा जोडल्या जात आहे. त्यांचे गेट-टुगेदरचे प्रस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाईलाही लाजवेल अशा जोशात, जल्लोषात  वाढले आहे. अनेक वेळा गेट-टुगेदर मधून जुन्या प्रेम प्रकरणांना उजाळा मिळतो आहे. जे जुन्या काळात होऊ शकले नाही ते प्रेम पुनश्च भेटल्यानंतर उफाळून येत आहे आणि त्यातून मग वैवाहिक जीवनात नवीन पेच निर्माण होतो आहे. सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या प्रकरणात सोशल मिडीयाचा किंवा गेट-टुगेदर वगैरेचा अद्याप तरी काही निष्कर्ष पोलिसांनी काढलेला नाही परंतु तरी इथे हा विषय मांडावासा वाटला.

    पुर्वीच्या पतीवर अवलंबून राहणाऱ्या स्त्रियांना पती हा परमेश्वर आहे अशी शिकवण दिली जात असे पण आता स्त्रिया या स्वावलंबी झालेल्या आहेत आणि त्यांना पतीवर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. या लेखात सर्वच स्त्रियांना दोष देण्याचा मुळीच उद्देश नाही उलट माधवी लता सारख्या काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच असा पूल बांधणाऱ्या तरुणी सुद्धा आजच्याच काळात आहे. परंतु गेल्या काही वर्षात असे अनेक गुन्हे घडले की ज्यामध्ये स्त्रियांनी त्यांच्या पतींची हत्या केली आहे. सौरभ नामक पतीला मारून त्याचे तुकडे टाकीत टाकून ती टाकी सिमेंटने बंद करून टाकणा-या मुस्कानची घटना सुद्धा ताजीच आहे आणि आता परवा वटपौर्णिमेच्याच आसपास सोनम रघुवंशी नामक नवविवाहितेने तिच्या पतीची मेघालयात मधुचंद्राच्या वेळेस हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सोनमने तिच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. सोनमला जर राजा रघुवंशी सोबत लग्नच करायचे नव्हते तर तिने ते का केले? लग्न केल्यावरही ती त्याला घटस्फोट देऊ शकत होती पण तिने तसे सुद्धा नाही केले आणि राजा रघुवंशीचा नाहक बळी गेला. भारतीय स्त्रिया, भारतीय पुरुष,  भारतीय कुटुंब यांच्या  विचारसरणीमध्ये झपाट्याने बदल झालेला आता दिसतो आहे. काहीही होऊ द्या आम्हाला फक्त एन्जॉय पाहिजे ही वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

    राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणांमधून तरुण मुला मुलींना हेच सांगावेसे वाटते की तुम्हाला जर का कोणी पसंत नाही तर त्याच्याशी लग्नच करू नका. लग्न केल्यावर पटत नसेल तर कायदेशीर रित्या विभक्त व्हा परंतु कट करून हत्या करणे, कुणाच्या कुटुंबाला दुःखाच्या सागरात बुडवणे यासारखे  कृत्य  करू नका. 

     आज-काल आपल्याच संस्कृतीला, कथांना सणांना नावे ठेवण्याची सवय झालेली आहे. अनेकांना सत्यवान सावित्रीच्या कथेचा येथे केलेला उल्लेख सुद्धा रुचणार नाही कुणी त्याला भाकडकथा ही म्हणेल परंतु या कथेमधून पती आणि पत्नी मधील प्रेम वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो हेही तितकेच खरे आहे. पत्नी जेव्हा पतीसाठी व्रत करते तेव्हा आपोआपच पतीला सुद्धा तिच्याबद्दल आदर वाटू लागतो, कुटुंब यशस्वीरित्या पुढे जात राहते. पती पत्नीत योग्य संवाद असेल तर त्या घरातील मुलांची मानसिक व शारीरिक वाढ सुद्धा योग्य प्रकारे होते. समाजात प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जातीत सुद्धा चांगल्या वाईट अशा प्रवृत्ती असतात हजारो वर्षांपूर्वी पतीचे प्राण यमराज कडून परत आणणारी स्त्री होऊन गेली आणि आता मात्र सोनमसारख्या तरुणीने तिच्या पतीस यमसदनी पाठवले आहे.  यावर कालाय तस्मै नमः नाही म्हणावे तर काय म्हणावे ?

०५/०६/२०२५

Article about increasing number ofaccidents

वाहन नियंत्रणात असावे


    वाहन म्हटले की स्टेअरिंग, इंजिन मधील अनेक चक्रे, गाडीची चाके हे आलेच. चाक म्हणजे चक्र. चक्र हे भगवान विष्णूच्या हाती असणारे आयुध त्यामुळे या चक्राला  आपल्या नियंत्रणात ठेवणे, त्याचा आदर करणे हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे.

आज भारतात चकचकीत रस्त्यांचे जाळे विणल्या गेलेले आहे. कधी नव्हे असे रस्ते भारतात निर्माण झाले आहे. या रस्त्यांसोबतच भारतात प्रचंड खप होतो तो म्हणजे वाहनांचा. निरनिराळ्या कंपन्यांच्या चार चाकी आणि  दुचाकी वाहनांचा मोठा खप भारतात दरवर्षी होत असतो. तसेच नवीन नवीन मॉडेल सुद्धा बाजारात उपलब्ध होत असतात. तरुणांना क्रेझ असते दुचाक्यांची अर्थात बाईकची. नाईट रायडर्स म्हणून एक संकल्पना सुद्धा भारतातील मोठ्या शहरांमध्ये चांगली फोफावली आहे. यामध्ये रात्री रस्ते सुनसान असताना वेगाने बाईक रायडिंग केले जाते. काही तरुण तर दिवस असो अथवा रात्र, गर्दी असो अथवा सुनसान रस्ता त्यांचे वाहन मात्र सुसाटच धावत असते. तरुण म्हटले की जोश उत्साह साहस हे सर्व आलेच परंतु या साहसामुळे, उत्साहामुळे, जोशामुळे इतरांच्या जीवावर संकट येता कामा नये. मी स्वतः अनेक तरुणांना भर रहदारीच्या रस्त्यावरून वेगाने वाहन चालवतांना पाहिले आहे.

     सुटाळा खामगाव, येथील शुभम दुतोंडे हा  रविवार 1 जुन रोजी स्पर्धा परिक्षेसाठी म्हणून  खामगावहून अकोला येथे जाण्यास निघाला. हायवेवर चढतांना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बाईकस्वारांनी शुभमच्या गाडीला जोरात धडक दिली, त्याला अकोला येथील  रुग्णालयात नेण्यात आले, मेंदूला जोरात मार लागला होता, शस्त्रक्रिया झाली, परंतू 4 तारखेला त्याची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. B.tek झालेला शुभम एम.पी.एस.सी ची तयारी करीत होता. खामगांवात अनेकांना परिचित अशा हिंदुस्तान लिव्हर मधील रामेश्वर दुतोंडे यांचा  शुभम हा तरुण मुलगा आज बाईक अपघातामुळे निधन पावला हे सर्वांसाठी मोठे शोकदायक आहे. शुभमसारख्या हुशार, तरुण मुलाचे निधन झाले. समोरून विरुद्ध दिशेने येणा-या दुचाकीस्वारांच्या चुकीमुळे या बाईक अपघातात शुभमचे निधन झाले असे वृत्त आले आहे. यावरून इतर तरुणांनी बोध घ्यावा. तरुणांच्या अकाली निधनाने समाजाची, देशाची न भरून निघणारी हानी होत असते शिवाय परीवारजनांना सुद्धा असा अकाली मृत्यू हा धक्कादायक आणि शोककारक असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा रस्त्यावरती अत्यंत सुंदर "संतुलित वेग सुरक्षित जीवन" , "सडक पे मस्ती जान नही सस्ती" , "नजर  हटी दुर्घटना घटी", अशा पाट्या लिहिल्या असतात. पण अशा पाट्यांकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि चकचकीत रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने हाकली जातात. तसे पाहिले तर नवीन  रस्ते हे दुभाजकांसह आहे परंतु अपघातांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे यावर सर्वांनीच विचार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे

     कोणतेही वाहन म्हटले की त्याला चाक आलेच.  चाक म्हणजे चक्र आणि चक्र हे भगवान विष्णूच्या हाती असणारे आयुध त्यामुळे या चक्राला आपल्या नियंत्रणात ठेवणे, त्याचा आदर करणे हे आपण नेहमीच ध्यानात ठेवले पाहिजे. या लेखाद्वारे सर्व तरुणांना हेच आवाहन करण्यात येते की त्यांनी  वाहन नियंत्रित वेगातच चालवावे. 

२९/०५/२०२५

Article about vaishanavi hagwane suicide.

 दुल्हा बिकता है 

कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली?

दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
ये जो संसार है चोर बाजार है
धोखा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दुल्हा बिकता है या चित्रपटातील हे उपरोक्त शीर्षक गीत अनेक वेळा आठवले आणि समाजात अनेक वर्षापासून चालत आलेली हुंडा प्रथा,  वधूचा छळ, हुंडाबळी अशी दुल्हा बिकता है ची स्थिती आजच्या बदललेल्या भारतातही कायमच असल्याचे जाणवले. 

     गेल्या काही दिवसापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडून भरमसाठ असा हुंडा वस्तू,  रोख आणि सोन्याच्या रूपात वसूल केला. यामध्ये आलिशान फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोने यांचा समावेश आहे. गौहर कानपुरी यांनी  1980 च्या दशकात रचलेल्या खालील ओळी किती समर्पक आहेत बघा

माल-ओ-जर भी मिले और मका दहेज मे
माँगते है जमी आस्मा दहेज मे
रिश्ते नातो के होते है सौदे यहा
पाँव पर गिर गयी पगड़िया दहेज मे
रस्म के नाम पे धर्म के नाम पे
दाता बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

वधू, घर, जमीन हे सगळे प्रथेच्या, धर्माच्या नावाखाली मागून नात्यांचा व्यापार केला जातो.  आज समाज एवढा पुढे गेला असतांनाही, स्त्रिया विविध क्षेत्रात पुढे गेल्या असतांनाही वैष्णवी सारख्या स्त्रीला सासरच्या जाचामुळे आत्महत्या करावी लागते आणि तिच्या मोठ्या जावेलाही तसाच त्रास सहन करावा लागतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. विवाह ठरल्यावर कुटुंबात किती आनंद असतो, वधूच्या मनी किती स्वप्ने असतात. पण जेंव्हा सासरची मंडळी जाच देतात तेंव्हा कवी गौहर कानपुरी यांना सनई जणू ओरडते आहे वाटते, डोली त्यांना वेश बदललेली अर्थी वाटते आणि बरेचदा दुर्दैवाने तसेच घडत सुद्धा असते.

चीखे शहनाई आगन से डोली चली
भेष बदले हुए जैसे अर्थी चली
बाप माँगे दुआ लाज रख ले खुदा
लाल जोड़े मे छुपके ग़रीबी चली
वक़्त है निर्दयी मा तो रोने लगी
परदा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

पोटची मुलगी नेहमीसाठी दूर जाणार म्हणून  आई बिचारी रडत असते, बाप पोरीच्या सुखासाठी देवाची करुणा भाकत असतो. वैष्णवीचे सुद्धा असेच झाले आधी आवडत्या मुलाच्या घरी तिची डोली तर गेली पण काही दिवसातच अर्थी सुद्धा निघाली.         

     आज कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे किंबहुना असे म्हटले तर हरकत नाही की कायदा इतका काही स्त्रियांच्या बाजूने आहे झाला आहे की पत्नी पिडित पतींची संघटना सुद्धा स्थापन झाली आहे. पतीला मारून टाकून त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने टाकीत बंद करून टाकणा-या निष्ठूर बायका आहे. यवतमाळच्या जंगलात पतीला जाळून मारणा-या स्त्री सारख्या स्त्रिया सुद्धा अनेक आहेत. हे वास्तव सुद्धा नाकारता येणार नाही. 

     पण कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली ? तर हगवणेसारखे मोठमोठे लागेबांधे असलेले अनेक दबंग कुटुंब आजही स्त्रियांवर अत्याचार करत असतात. त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना आजही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वैष्णवी, मयुरी या दबंग हगवणेच्या अशाच शिकार झाल्या.

     हुंडाबळी कधी बंद होणार ?  30-40 वर्षांपूर्वी हुंडाबळीच्या अनेक घटना घडल्या होत्या,  आजही घडत आहेत याला काय म्हणावे ?  याला अटकाव कसा होईल ? आजही हुंडा का द्यावा लागतो ? आजही फॉर्च्यूनर आणि 51 तोळे सोने देऊन नवरा मुलगा विकत का घ्यावा लागतो ? हुंडा न घेण्याचे प्रतिज्ञापत्र घेणे, आयकर नियमात हुंड्याबाबत काही करता येईल का ? यावर सरकारने विचार करणे अत्यावश्यक झाले आहे.  स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या हगवणेसारख्या लोकांना हगवण लागेल अशा शिक्षा करणे आवश्यक आहे.

कब तलक़ दुल्हनो की चढ़ेगी बली
मसली जाएगी कब तक ये नाज़ुक कली
ये है बेटी तेरी ये तेरी बहन है
राम गोपाल हो या शराफ़त अली
सब है बहरूपीए इनसे ये पूछिए
सपना बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
वैष्णवीसारख्या अशा आणखी किती मुलींचे बळी जाणार आहे ? किती अशा नाजूक कळ्यांना कुस्करल्या जाणार आहे ? सरकारने हगवणेसारख्या दबंग, हुंडा घेणाऱ्या, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना अशी काही चांगली अद्दल घडवली पाहिजे की, पुन्हा कुण्या वैष्णवीला आत्महत्या करावी लागणार नाही अशा काही उपाययोजना, कठोर नियमावली घालण्याची गरज झालेली आहे अन्यथा दुल्हा बिकता आहे प्रमाणे हुंडाबळी हे सर्व सुरूच राहील. 

      शेवटी आणखी एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते की, एरवी अनेक गोष्टींसाठी मोर्चे आंदोलने या महाराष्ट्रात होतात मग वैष्णवी आत्महत्या प्रकरणांमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, तोडफोड कशी काय झाली नाही ? ही सुद्धा तमाम महाराष्ट्र वासियांसाठी आश्चर्यजनक अशी बाब आहे.