Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०९/२०२५

Article about developing khamgaon

 दिल गार्डन गार्डन हो गया

खामगांवकरांचे हृदय बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया सारखी का झाली आहे ते या लेखात वाचा.

90 च्या दशकामध्ये गुलशन ग्रोवर हा खलनायक म्हणून प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या वेशभूषेत दिसणे ही गुलशन ग्रोवरची खासियत असे शिवाय त्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्या सिनेमांमध्ये त्याच्या तोंडी एक विशिष्ट असा डायलॉग वारंवार दिलेला असे. जसे "गन्ना चुसके" , "गई भैंस पानीमे" , "बॅड मॅन" असे संवाद त्याच्या मुखी दिलेले असत.  प्रत्येक संवादामध्ये ठराविक अंतराने असे डायलॉग पालुपदासारखे तो पुन्हा पुन्हा म्हणतांना सिनेमात दिसत असे.  यातलाच एक डायलॉग म्हणजे 'दिल गार्डन गार्डन हो गया'. कुठल्यातरी एका सिनेमामध्ये त्याच्या तोंडी दिल गार्डन गार्डन हो गया असा संवाद होता त्याचा हा संवाद पुढे एवढा लोकप्रिय झाला की दिल गार्डन गार्डन हो गया असे एक गाणे सुद्धा कुण्या गीतकाराने लिहिले होते. 

      आता हे दिल गार्डन गार्डन हो गया आणि गुलशन ग्रोवर पुराण आज का बरं बुवा ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल. या संवादाची आठवण होण्याचे कारण म्हणजे खामगांव शहरांमध्ये मा. ना. आकाश फुंडकर यांच्या कारकिर्दीमध्ये व नेतृत्वाखाली नगरपरिषदेने अनेक नवीन बागा निर्माण केल्या तसेच जुन्या बगीच्यांना नवीन स्वरूप दिले. सावरकर उद्यान , छकुली उद्यान यांसारखी इतरही अनेक नवीन उद्याने खामगांव शहरात निर्माण केली याशिवाय भारतरत्न राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन याचे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नटराज गार्डन या जुन्या उद्यानांचे नूतनीकरण केले गेले. या उद्यानांमुळे खामगांव शहराला कसा ' फ्रेश लुक ' आला आहे. तसे तर या नवीन आणि नूतनीकरण झालेल्या उद्यानांबाबत समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ पूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. नवीन निर्माण केलेली उद्याने चांगली तर आहेच परंतु टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन यांची अवस्था फार खराब झाली होती नटराज गार्डन पेक्षाही टॉवर गार्डन अधिकच खराब झाले होते त्या उद्यानाकडे पाहवले सुद्धा जात नव्हते इतकी त्याची दुर्दशा झाली होती परंतु ऑगस्ट 2025 मध्ये या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण झाले आणि खामगांवकर नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. आज जर का आपण टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला अतिशय आल्हाददायक, नयनरम्य शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही प्राणवायूने परिपूर्ण असे वातावरण मिळते. शिवाय जागोजागी योग्य ती शिल्पे, भिंतींवरती सुंदर चित्रे, व्यायामासाठी जागा आणि साधने, फिरण्यासाठी जागा आणि साधने, लहान मुलांसाठी खेळणी, समाजाला, कुटुंबाला ज्यांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची नेहमीच गरज असते अशा ज्येष्ठ  नागरिकांना बसण्यासाठी बाक, लॉन इत्यादी अनेक सुविधा या दोन्ही गार्डनमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे आता सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी आपल्याला या उद्यानांमध्ये दिसून येते. नटराज गार्डनच्या दुरावस्थेमुळे येथील भव्य नटराजाची मुर्ती सुद्धा उदास वाटत होती परंतु आज या नटराजाची मुद्रा कशी छान फुललेली दिसून येत आहे. त्याच्या समोरील पूर्वी जे छोटे कमळाचे टाके होते ते आता मोठे केले आहे. ही उद्याने रात्री सुद्धा खुप सुंदर दिसतात. जनुना तलावाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार जुन्या काळात बनवलेले आहे.  नूतनीकरण करतांना त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल  न करता याच दरवाजाला पुनश्च चांगले स्वरूप देण्यात आले हे फार चांगले झाले कारण या प्रवेशद्वारावरील मुर्त्या या स्थानिक राष्ट्रीय शाळेतील कलाकारांनी बनवलेल्या होत्या आणि त्या आजही खूपच सुंदर दिसतात म्हणून त्या तशाच राहू देणे गरजेचे होते आणि त्या तशाच राहू दिल्यामुळे व त्यांना रंग दिल्यामुळे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार आता अधिक आकर्षक दिसते. रात्रीची रोषणाई सुद्धा बघणाऱ्याला सुखद अनुभव देते.

रात्रीच्या वेळेचे नटराज गार्डन

   मध्यंतरी खामगांवला उद्याने असूनही नसल्यासारखीच होती. खामगांवकरांचा एकमेव पिकनिक स्पॉट जनुना तलाव याची सुद्धा अवस्था चांगली नव्हती. त्यामुळे खामगांवात येणाऱ्या पाहुण्यांना कुठे घेऊन जाण्यासाठी चांगले ठिकाणास नव्हते आणि खामगांवकरांना मोकळा श्वास घेता येईल असे सुद्धा कोणतेही ठिकाण खामगाव मध्ये नव्हते. सर्वत्र गर्दी आणि अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता परंतु आज मात्र नवीन निर्माण झालेल्या उद्यानांमुळे आणि जुन्या नूतनीकरण केलेल्या उद्यानांमुळे खामगांवकर नागरिकांना मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. उद्याने म्हणजे शहराची फुफ्फुसे असतात. गतकाळात खामगांव  मतदारसंघाचे तरुण नेतृत्व मा. ना. आकाशभाऊ फुंडकर, खामगांव नगरपरिषद सीओ प्रशांत शेळके, यांनी खामगांव शहराचा कायापालट करण्याचा निश्चयच घेतलेला दिसतो. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी खामगांवात होतांना दिसत आहे. यशवंत टॉवरवर बसवलेल्या घड्याळामुळे सुद्धा खामगांवकरांना मोठा आनंद झालेला आपण पाहिला, रस्ते सुद्धा चांगले होत आहेत. एक पाण्याची समस्या तेवढी दूर होणे आवश्यक आहे. ती सुद्धा लवकरच मार्गी काढण्यात येईल असे काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे तोही प्रश्न लवकरात संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत. 

 आज खामगांवकरांना घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी खामगांवतील अनेक गार्डन उपलब्ध आहे.  अशी गार्डन निर्माण झाल्यामुळे आणि एकूणच चांगले बदल होत असलेले बघतांना खामगांवकरांचे हृदय बगीच्या प्रमाणे बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया याप्रमाणे झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

०४/०९/२०२५

Article about Khamgaon ganpati festival

 आठवणी खामगांवच्या गणेशोत्सवाच्या 

आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे.

काल मुलाने गणपती बघायला घेऊन चला म्हणून हट्ट केला आणि म्हणून त्याला घेऊन गणपती पाहण्यास गेलो. त्याला विविध गणेश मंडळांचे गणपती दाखवतांना विशेषत: वंदेमातरम मंडळाचा  रामायणातील लंका दहनाच्या प्रसंगाचा देखावा पाहतांना खामगावात पूर्वी होत असलेल्या  देखाव्यांच्या आणि येथील गणपती मंदिरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या. आम्ही गणपती पाहण्यास  राष्ट्रीय गणेश मंडळापासून सुरुवात केली. राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हातून झालेली आहे. खामगांव शहर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक जुने आणि मोठे शहर असल्याने राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेनंतर खामगांवला अनेक थोर पुरुषांनी भेटी दिलेल्या आहे. तसेच खामगांवला अनेक वर्षापासून गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ, तानाजी गणेशोत्सव मंडळ, रामदल ही गणेश मंडळे अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. सामाजिक संदेश देणारे तसेच धार्मिक उद्बोधन करणारे मोठमोठे देखावे, सामाजिक उपक्रम ही खामगांवच्या गणेशोत्सव मंडळांची वैशिष्ट्ये. वरील गणेश मंडळानंतर वंदेमातरम, राणा, जय संतोषी मां, चंदनशेष, त्रिशूल, नेताजी, हनुमान, एकता, आत्मशक्ती अशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे खामगांवात स्थापित झाली. गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते त्याचप्रमाणे खामगांव शहरात सुद्धा गणपतीचे आगमन मोठ्या थाटात होते आणि त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्व लोक करत असतात. खामगांव शहरात लाकडी गणपती हा मानाचा गणपती म्हणून मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी असतो. खामगांव शहरातील गणेशोत्सवाचा तसा भला मोठा इतिहास आहे. तसेच या उत्सवामध्ये सामाजिक सलोखा, शांतता चांगल्या पद्धतीने जपल्या गेल्याची अनेक उदाहरणे सुद्धा आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जगदीशजी जोशी यांनी आठवण सांगितली की, या गणेश मंडळाचे श्री तय्यबजी नामक एक मुस्लिम अध्यक्ष सुद्धा होऊन गेले आहे. अशी खामगावच्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 1980 च्या दशकात आम्ही लहान असतांना चंदनशेष गणेशोत्सव मंडळ हे आमच्या घराजवळच असल्याने आम्ही तेथील गणपती आवर्जून व अनेकदा बघत असू. हे गणेश मंडळ जेंव्हा गणेश स्थापनेच्या काही दिवस आधीपासून देखावे बनवण्याचे कार्य करीत असे तेंव्हा आम्ही पडदा बाजूला करून ते काम बघत असू. चंदनशेष मंडळाने केलेले साक्षरतेवर आधारीत गणपती उंदरांना शिकवत असल्याचा देखावा, हनुमान राक्षसिणीच्या तोंडात जाऊन कसा चटकन बाहेर येतो हे दाखवणारा देखावा, उंदरांचा देखावा, नवनाथांचा देखावा असे अनेक देखावे आजही स्मरणात आहे. या मंडळाचे तत्कालीन तरुण कार्यकर्ते तेंव्हापासून परिचित झाले. टिळक पुतळ्याजवळ मधु ऑटो जवळ दरवर्षी भूतांचा देखावा असलेला एक गणपती बसत असे. आमच्या घराजवळ आझाद गणेश मंडळ म्हणून एक गणेश मंडळ 80 च्या दशकात सुरू झाले होते तसेच पुरवार गल्लीत सुद्धा एक गणेश मंडळ होते. पुरवार गल्लीतील गणेश मंडळानी एकदा सुपारीचा गणपती बनवला होता तसेच पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा देखावा सादर केला होता. ही गणेश मंडळे नंतर बंद झाली. अशा खामगांवच्या गणेश मंडळाच्या कित्येक आठवणी आजही आहेत काही कटू आठवणी सुद्धा आहेत परंतु त्यांचा उल्लेख न केलेलाच बरा. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एक पागोट्या नामक व्यक्ती दरवर्षी वेगळीच लक्षवेधक अशी वेशभूषा करून सर्वत्र फिरत असे. या पागोट्या व्यक्तीचे खरे नांव मला आजरोजी पर्यंत कळले नाही. आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे. पठाण आता हयात आहे की नाही कुणास ठाऊक. खामगांवचा गणेशोत्सव हा राज्यभर प्रसिद्ध आहे. येथील राणा गणेश मंडळाने खामगांवचा राजा नामक गणपतीची स्थापना केलेली आहे. खामगांव हे चांदीची बाजारपेठ असल्यामुळे  या गणपतीच्या अंगावर चांदीची विविध आभूषणे आहे.  ज्याप्रमाणे इथे लाकडी गणपतीचे मंदिर आहे तसेच शिवाजी वेसकडे जातांना सुटाळपुरा भागात सुद्धा एक अत्यंत प्राचीन असे गणपती मंदिर आहे, सितला माता मंदिरात सुद्धा अनेक वर्षापासून स्थापित  केलेला गणपती आहे. बहुतांश खामगांवकरांना माहीत नसलेले गणपती मंदिर म्हणजे गर्गे यांचे मंदिर. गर्गे यांच्या घरातच त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केलेला गणपती आहे, हे मंदिर म्हणजे एक घरच आहे आणि या घराच्या दिवाणखान्यात आपल्याला गणेश मूर्ती दिसते. या मंदिरात सुद्धा खूप प्रसन्न वाटते मूर्ती सुद्धा आकर्षक आहे. गणेश उत्सवाबरोबरच खामगांवातील ही गणपती मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी काल ताज्या झाल्या. यंदा खामगांवात गणपती हा विविध रूपांमध्ये दिसला. तानाजी व्यायाम मंडळाचा धनगराच्या वेषातील गणपती बर्डे प्लॉटमधील गजानन महाराजांच्या वेषातील गणपती तसेच अमरलक्ष्मी मंडळाचा शिवाजी महाराजांच्या वेषातील गणपती बघायला मिळाला. सर्व मूर्ती उत्कृष्ट होत्या परंतु आगामी काळात पूर्वीसारखेच देखावे सुद्धा या मंडळांनी करावे असे वाटते. देखाव्यातून सामाजिक उद्बोधन होते, बालगोपालांना  धार्मिक देखाव्यातून आपल्या धर्माची माहिती मिळते त्यामुळे देखावे हे असायला  पाहिजे. अशाप्रकारे गणेशोत्सव बघून आम्ही घरी परतलो. आजही गणेशोत्सवात गणपती बघायला जातांना तोच उत्साह कायम आहे आणि खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सुद्धा कायम आहेत.

२८/०८/२०२५

Article about lakadi ganpati khamgaon

बिन डोर खिचा जाता हुं....


 तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे  गणपती मंदिर होत व हा गणपती होता.  पण आता मात्र हे मंदिर खूपच सुंदर, लक्षवेधक, प्रसन्न वाटेल असे झाले आहे...

तसे पाहिले तर आज शाळेत पोहोचण्यास थोडा उशीर होत होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून एका ठिकाणी जाण्याची सतत इच्छा मनात येत होती.  म्हटले आज या ठिकाणी जाण्याची इच्छा पूर्ण करूनच घ्यावी. टेलिपॅथी म्हणून एक प्रकार असतो तसे झाले की काय कोण जाणे कदाचित ते ठिकाण सुद्धा मला खुणवत होते. म्हणून मी त्या ठिकाणी पोहचलो आणि त्या ठिकाणाचे बदललेले स्वरूप पाहून मला अत्यानंद झाला. ते ठिकाण म्हणजे खामगावचे लाकडी गणपती देवस्थान. बुद्धीची देवता गणपतीबद्दल बालपणापासून जसे सर्वांना असते तसेच प्रेम, भक्ती, आकर्षण मला सुद्धा आहे. त्यामुळेच लाकडी गणपतीबद्दल सुद्धा तशाच भावना आहे. कदाचित त्याचे कारण माझे आजोबा आणि वडील हे असावेत. माझे आजोबा वैद्य दत्तात्रय उपाख्य नानासाहेब वरणगांवकर गणपतीचे निस्सिम भक्त होते तसेच लाकडी गणपतीच्या  प्रथम संचालक मंडळात सुद्धा ते होते आणि माझे वडील या मंडळाचे कार्यकर्ते होते. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लाकडी गणपतीच्या समोर पुर्वी मोठा नगारा असे तो नगारा माझे वडील आणि त्यांचे मित्र वाजवत असत. आजच्या डीजेच्या बेसूर आणि कर्णकर्कश्श आवाजाच्या ऐवजी तत्कालीन नगाऱ्याचा आणि लेझीमचा आवाज भक्तांना किती कर्णप्रिय आणि भक्तीभाव पुर्ण वाटत असेल नाही का ? आजोबांचे आणि वडिलांचे लाकडी गणपती मंदिर, मिरणूक यांत असलेल्या योगदानामुळेच कदाचित लाकडी गणपतीबद्दल मला वरील भावना असाव्यात असेही असू शकते कारण गणपती तर सर्वत्र सारखाच किंवा एकच असतो. लाकडी गणपतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे हे काही महिन्यांपूर्वीच कळले होते त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या लाकडी गणपतीच्या अरुंद आणि जीव घुसमटणाऱ्या मंदिराचे नवीन स्वरूप कसे असेल हे बघण्यासाठी माझी बऱ्याच दिवसापासूनची उत्कंठा होती. आज ती उत्कंठा पूर्णत्वास गेली आणि मला ते नवीन मंदिर बघून खूप आनंद झाला लाकडी गणपती मंदिराचा सभामंडप आता चांगलाच रुंद झाला आहे शिवाय इतरही अनेक गोष्टी जसे दरवाजा कोरीव काम, गाभारा लाकडी गणपतीचे संपूर्ण मंदिरच अतिशय सुंदर झाले आहे. माझ्याच प्रमाणे खामगांवकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या गणपतीबद्दल खामगांवचे नागरिक तसेच खामगांव सोडून गेलेले नागरिक यांनासुद्धा अतिशय आकर्षण भक्ती आणि प्रेम आहे. कारण आजही जेव्हा समाज माध्यमांवर खामगांवचे नागरिक लाकडी गणपतीचे फोटो, व्हिडिओ, रील टाकतात तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद येतांना आपल्याला दिसतो. लाकडी गणपतीची स्थापना शंभरहून अधिक वर्षांपूर्वी झालेली आहे असे ज्येष्ठ मंडळींकडून ऐकलेले आहे. याबाबत मागेही एका लेखात मी लिहिले आहे की, हा लाकडी गणपती तत्कालीन बोर्डी नदीच्या पुरामध्ये वाहून आला आणि भुसाऱ्याजवळच्या पुलामध्ये अडकला तेव्हा अय्याची कोठी या वेटाळातील  गंगाधरराव पिवळटकर, नानासाहेब वरणगांवकर, गिरजापुरे, त्र्यंबकलाल पुरवार, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी यांनी मिळून या गणपतीला अय्याच्या कोटीतील सद्य ठिकाणी स्थापित केले. असे काहींचे म्हणणे आहे. तर काही लोक असेही म्हणतात की, अय्याची कोठी  या भागामध्ये अय्या लोक म्हणजेच आचारी लोक राहत असत आणि स्वयंपाक करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लाकडे लागत असत. याच लाकडांमध्ये काही विशिष्ट आकारांची लाकडे बघून तत्कालीन काही कलाप्रेमींना त्यातून गणपती बनू शकतो असे वाटले आणि त्यांनी त्या लाकडांचा गणपती बनवला असेही काही जुने नागरिक म्हणतात. कथा कोणतीही असो परंतु या लाकडी गणपतीवर खामगावकरांची श्रद्धा मात्र अगाध आहे. 1956 च्या एका कटू प्रसंगात या लाकडी गणपतीला समाजकंटकांकडून दुखापत सुद्धा झाली होती असेही काही नागरिक सांगतात. त्यावेळी खामगांवकर दुखावले होते. तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे लाकडी गणपती मंदिर होत व हा गणपती होता. 


पुढे मात्र हा काष्ठ रूपातील गणरायास खामगांव शहर हे चांदीची मोठी  बाजारपेठ असल्यामुळे काही धनाढ्य लोकांनी चांदीच्या दागिन्यांनी सजवले. त्या साजानंतर हा लंबोदर अधिकच आकर्षित दिसू लागला. पुर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बैलगाडीवर या गणपतीची मिरवणूक निघत असे. परंतु आता काही अंतरापर्यंतच बैल असतात आणि नंतर मात्र ट्रॅक्टरवर या गणपतीला नेले जाते. असा बदल गत दोन वर्षापासून झाला आहे. सुरज अग्रवाल, भेरडे, चंद्रशेखर पुरोहित तसेच इतर सर्व संचालक मंडळ सुद्धा या  मंदिराची चांगली देखरेख व कारभार करीत आहे असे दिसून येते. मी काही कधी देवाला नवस करत नाही परंतु अनेकांच्या नवसाची पूर्ती या लाकडी गणपतीने केली आहे असे अनेक नागरिक सांगतात. खामगांवातून बाहेर गेलेले नागरिक खामगांवला आले की हमखास लाकडी गणपतीच्या दर्शनाला जातात. लाकडी गणपती म्हणजे खामगावचे असे दैवत आहे की सर्वांनाच त्याच्या दर्शनासाठी जावेसे वाटते. सर्वानाच त्याची ओढ असते आणि म्हणूनच "बिन डोर खिंचा जाता हुं..." अशी भक्तांची अवस्था होऊन श्रद्धेमुळे अनेकदा अनेकांची पावले न कळत या मंदिराकडे खेचली जातात.  


२१/०८/२०२५

Article about DJ and Shravan Somwar kavad Yatra

 डीजेच्या गोंगाटात लुप्त झाले "हर बोलाsss..... हर महादेवsss"


आपण जर शंकराचे कोणतेही चित्र डोळ्यासमोर आणले तर  एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेला देवांचा देव महादेव हेच चित्र आपल्याला आठवते. या चित्रावरून बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे, कोलाहलापासून दूर राहणे त्यांना आवडते. अशा शांतताप्रिय निळकंठाच्या कावडयात्रेत हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात डीजेचा गोंगाट वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ? 

यंदाचा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी प्रकृती ठीक नसल्याने मी घरीच होतो. दुपारनंतर डीजेचा भला मोठा आवाज कानावर आदळू लागला. तो आवाज  कावडयात्रेतील डीजेचा आहे याचे स्मरण सौ. ने करून दिले. मी घरीच असल्यामुळे माझे मन भूतकाळात गेले. मला पुर्वीच्या कावड यात्रांचे  स्मरण झाले.

साधारणतः 35 ते 40 वर्षांपूर्वीचे ते दिवस असतील श्रावणात आई घरीच महादेवाला "शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा..." असे पुटपुटत शिवमुठ वाहायची. सकाळी सकाळी बेsssलपुडाsss अशी आरोळी गल्ली गल्लीत धूमू लागे. पुर्वी मोजक्याच असलेल्या परंतू प्राचीन अशा महादेव मंदिरात लोक आपापला भाव घेऊन दर्शनाला जात, एक लोटा जल चे स्तोम हे आताआताचे. श्रावणात शंकराच्या पूजेचे महात्म्य असते हे बालवयात कळायला लागले. सकाळी शाळा किंवा शिकवणीस जातांना कधी एखाद-दोन तर कधी चार-पाचच्या घोळक्यात खांद्यावरील बांबूला छोटे पितळी तांबे किंवा तांब्याचे भांडे बांधून गावात येणारे युवक दिसत. ते दिसण्यापुर्वीच त्यांची "हर बोलाsss हर महादेवsss" अशी महादेवाला भक्ती भावाने घातलेली साद लांबूनच ऐकू येऊ लागायची. हे युवक पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असत. हे कावडधारी युवक नदीचे पवित्र जल आणून गावातील शिव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात असे पुढे ज्ञात झाले होते. आता नद्यांचे जल किती निर्मळ, शुद्ध आहे हे महादेवचं जाणे. पण किती साधी-सरळ भक्ती होती पूर्वी. किती शुद्ध भाव होता. पण आता मात्र या शुद्ध भावाचे किंवा भक्तीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहे आजच्या कावड यात्रांचे स्वरूप पाहता ती भक्तांची एक "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" अशी यात्रा आहे की, निव्वळ डीजेच्या कान फाडणा-या, शरीरात कंप निर्माण करणाऱ्या भल्या मोठ्या आवाजाच्या तालावर गोंगाट, कोलाहल करीत जाणारा, सण म्हणजे सुद्धा एन्जॉय समजणारा केवळ एक जत्था आहे असे सामान्यजनांना वाटू लागते.

     हिंदू धर्मामध्ये पूर्वापार अनेक सणसमारंभ, रितीरिवाज चालत आलेले आहेत. हे सणसमारंभ चलीरीती, परंपरा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडले जात असत. शंकर भगवान हे पूर्वीपासूनच भोळे म्हणून ओळखले जातात. वनातील कोणतीही पत्री त्यांना वाहिली तरी चालते असेच आपण सर्व लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत.  कुण्या एका शंकराच्या पुस्तकात एक मनुष्य रात्री जंगलात काही आसरा नसतांना शंकराच्या पिंडीवर पाय देऊन रात्रभर त्या झाडावर बसतो. बसल्या-बसल्या एक-एक पान तोडून खाली टाकतो. ते पान नेमके खालच्या पिंडीवर पडते. पिंडीवर बिल्व पत्राचा आपसूकच अभिषेक होतो व त्यामुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न होतात अशी एक कथा आहे. या कथेवरून समजते की शंकर इतका भोळा आहे की, त्याच्याच पिंडीवर पाय देऊन चढलेल्या आणि सहज रात्री काही काम नाही म्हणून झाडावरून एक एक पान खाली टाकणा-याचे पान पिंडीवर पडले म्हणून त्याला सुद्धा तो प्रसन्न झाला. परंतु आता मात्र शंकराला बेलच पाहिजे, हे पान नको अन् ते फुल नको असे उगीचच सांगितले जाते. झेंडूचे फुल नको असे नवीन ऐकायला मिळत आहे. पण काही भक्त झेंडूचे हार शंकराच्या पिंडीला घालतात आणि झेंडूचे फुल मात्र नको म्हणतात. हरतालिकेला तर पत्री अर्थात कोणत्याही झाडांची पाने तोडून भोळ्या शंकरास वाहात असतात. तसेच अनेक लोक भक्ती भावाने मंदिरे उभारतात. त्या मंदिरांमुळे एकता स्थापित होणे गरजेचे आहे. परंतु बरेच वेळा दुर्दैवाने तसे न होता वाद होत असल्याचे दिसते. असो ! हा भाग वेगळा परंतु आताशा भक्तीचे अवडंबर होतांना दिसत आहे. भगवंताच्या आराधनेमध्ये भक्तीपेक्षा दिखावाच जास्त दिसून येत आहे. श्रावणात निघणाऱ्या कावडयात्रांमध्ये मोठमोठे, देखावे आणि तत्सम इतर अनेक गोष्टींचे प्रमाण फार फोफावले आहे. सणांमुळे हिंदू समाज एकत्रित येतो, सामाजिक सलोखा, एकोपा वाढतो तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि सामाजिक संघटन निर्माण होते. हे सर्व जरी खरे असले तरी कुठेतरी हे सण समारंभ सुव्यवस्थितपणे इतरांना त्रास न होतील अशा पद्धतीने, नशा विरहित, अमली पदार्थ विरहित पद्धतीने साजरे व्हावे असे वाटते. मोठी मिरवणूक काढण्यास काही हरकत नाही परंतु कर्णकर्कश्श असे डीजे मात्र टाळायलाच हवे. भगवान शंकराचे कुठलेही चित्र आपण बघितले तर आपल्याला एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेले देवांचे देव महादेव हेच चित्र आठवते. या चित्रावरून असे बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे. कोलाहलापासून त्यांना दूर राहणे आवडते. अशा शांतताप्रिय  निळकंठाच्या कावडयात्रेमध्ये  हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात गोंगाट  वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ?  तशी भक्ती शंकराला प्रिय होईल का ? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यामुळे यावर तरुणांनी व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्यांनी अवश्य विचार करावा असे वाटते. परंतु आजकाल हा सर्व विचार केला जात नाही. लोकशाहीमध्ये संख्येला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जिथे संख्या आहे तिथे राजकारणी सुद्धा त्या संख्येच्या बाजूने कललेले दिसतात. 35-40 वर्षांपूर्वी अत्यंत कमी संख्येने जाणारे कावडधारी दिसले की मनाला प्रसन्न वाटे. त्यांना पाहून नागरिकांचा भक्ती भाव सुद्धा जागृत होत असे. तसेच त्यांनी दिलेली "हर बोला हर महादेव" ही आरोळी सुद्धा भगवान महेशाचे स्मरण येणाऱ्या जाणाऱ्यांना करून देई. परंतु आता मात्र भल्यामोठ्या कावड यात्रांच्या मधून मार्ग काढत नागरिक कसेबसे जातात, डीजेपासून अंतर राखून किंवा कानात बोटे घालून जातात. त्यांना ना शंकराचे स्मरण होत असावे, ना त्यांच्या मनात भक्तीभाव जागृत होत असावा किंवा प्रसन्नता सुद्धा वाटत नसावी.  

    बऱ्याच वेळाने मला ऐकू येत असलेला डीजेचा आवाज आता थांबला होता. मी मनोमन त्या केदारनाथास, त्या ओंकारेश्वरास नमन केले. मनात प्रश्न आला की, काळाच्या ओघात डीजेच्या कर्णकर्कश्श अशा आवाजात कुठेतरी हरवलेली "हर बोला हर महादेव" ही घोषणा पुन्हा ऐकू येईल का ?.

१४/०८/२०२५

Article about philanthropy, rockfeller and swami vivekanand

तुमच्या संपत्तीचे विश्वस्त व्हा, मालक नव्हे !


"तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नसून ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्याने मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून  संताप आला.

परवाच्या वर्तमानपत्रात एक वृत्त वाचले. वृत्त  कर्नाटकातील होते.  कर्नाटकातील रायचूर येथील 60 वर्षीय भिकारीण रंगम्माने एका मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख त्र्यांशी हजारांचे दान केल्याचे ते वृत्त होते. हे वृत्त वाचून आश्चर्य व कौतुक दोन्ही वाटले. अनेक दानशूर व्यक्तींच्या कथा, नांवे आठवली. आणखी एक किस्सा आठवला तो म्हणजे रॉकफेलर आणि स्वामी विवेकानंदांच्या भेटीचा. 

     भारतात स्वामी विवेकानंद माहीत नसतील असा मनुष्य विरळाच असेल. परंतु स्वामी विवेकानंद म्हटले की एक योगी, अगाध ज्ञानी, योद्धा संन्यासी असे चित्र डोळ्यासमोर येते तसेच त्यांचे अमेरिकेत धर्मसभेसाठी जाणे, ती धर्मसभा जिंकणे आणि हिंदू धर्माचे पताका विश्वभर फडकवणे अशा काही जुजबी गोष्टीच ज्ञात असतात परंतु स्वामीजींच्या अनेक प्रेरणादायी अशा कथा, त्यांच्या जीवनातील प्रसंग आहेत की जे आजही मनुष्याला प्रेरणा देऊन जातात, अंतर्मुख करतात. अमेरिकेत त्यांचे झालेले हाल, त्यांना झालेला त्रास, कोलंबो ते अल्मोडा या भ्रमणातील अनुभव हे आजही काही निवडक, मोजक्याच लोकांना माहीत असावेत. स्वामीजींनी काही लोकांना केलेल्या मार्गदर्शनाच्या त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, ज्या आजही तितक्याच प्रासंगिक आणि उपयुक्त आहेत. स्वामीजींनी गडगंज संपत्ती असलेल्या रॉकफेलरला केलेल्या अशाच एका मार्गदर्शनाची कथा इथे आज देत आहे. 

      अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांमध्ये अनेक शक्तींचा विकास झाला होता केवळ दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातल्या गतीविधींची ओळख किंवा जाणीव त्यांना होत असे. ज्यांना कोणाला स्वामीजी या गोष्टी सांगत असत ते लोक त्यांचे शिष्य होऊन जात असत. स्वामीजींनी ज्यांचे मन ओळखले होते त्यापैकी एक व्यक्ती होता जॉन डी. रॉकफेलर. हा मनुष्य अमेरिकेतील तत्कालीन स्टॅंडर्ड ऑइलचा संस्थापक होता. आज हीच कंपनी एक्सान मोबाईल नावाने ओळखले जाते. व्यापारातील अनिष्ट कृत्ये आणि एकाधिकारशाही या जोरावर रॉकफेलरने मोठी धनसंपत्ती अर्जित केली होती. रॉकफेलरला पुढे अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्या, त्याची प्रकृती खालावत जात होती. त्याला आपला मृत्यू समिप आला आहे असेही वाटू लागले होते. रॉकफेलर यांस मग स्वामी विवेकानंद यांना भेटण्याची प्रेरणा झाली कारण ज्या काही लोकांच्या घरी स्वामीजींनी वास्तव्य केले होते ते रॉकफेलरचे मित्र होते व त्यांनी रॉकफेलरला स्वामीजींच्या योग शक्ती बाबत सांगितले होते. रॉकफेलर स्वामीजींच्या भेटीस आला तेव्हा स्वामीजींनी त्याला त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या ज्या केवळ त्यालाच ठाऊक होत्या. त्या गोष्टी ऐकून रॉकफेलर प्रभावित झाला. स्वामीजींनी त्याला म्हटले की, "तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नाही तर ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्यानी मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून  संताप आला त्याला प्रथमच कोणी असा उपदेश करत होते. तो तिथून बाहेर पडला. 

     परंतु एक आठवड्याने तो स्वामीजींकडे परत आला आणि एका संस्थेला मोठे दान करीत असल्याचा एक कागद किंवा चेक म्हणा तो स्वामीजींचे पुढे ठेवला आणि म्हणाला आता तुम्हाला संतोष वाटत असेल आता तुम्ही मला धन्यवाद द्या. तेंव्हा स्वामीजी म्हणाले की, "तुम्हीच मला धन्यवाद द्या कारण तुम्ही दान केलेल्या रकमेपेक्षा जास्त समाधान, अनमोल असा मानसिक आनंद तुम्हाला या दानामुळे प्रथमच मिळाले आहे. तुम्ही ज्यांना दान केले त्यांच्यापेक्षा तुमचेच अधिक कल्याण झाले आहे.

     यानंतर रॉकफेलरचे हृदय परिवर्तन झाले पुढे तो एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने पुढील काळात अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक विश्वविद्यालय, दवाखाने यांना त्यानी मदत केली त्याच्यामध्ये सकारात्मक बदल झाला त्याची प्रकृती सुद्धा सुधारली आणि तो वयाच्या 97 व्या वर्षापर्यंत जगला.

कर्नाटक मध्ये भिकरिणीने केलेल्या दानाच्या बातमीमुळे ही रॉकफेलरची  वरील गोष्ट आज आठवली. भगवद्गीते मध्ये सुद्धा

यज्ञो दानं तपश्चैव न त्याज्यं इतीचापरे ||

यज्ञ, दान आणि तप ही कर्मे मनुष्याने कधीही त्यागू नयेत. बदलत्या जीवनशैलीमुळे यज्ञ आणि तप करणे सामान्य माणसाला कठीण आहे परंतु तो दान करून मात्र मनाचे मोठे समाधान तसेच पुण्य  प्राप्त करू शकतो कारण स्वामीजी म्हणाले होते की "वोही जीते है जो दुसरोके लिये जिते है" त्याचप्रमाणे स्वामीजींनी रॉकफेलरला जसे "तुम्ही तुमच्या संपत्तीचे विश्वस्त आहात मालक नव्हे" हा संदेश समस्त मानवजातीला सुद्धा लागू पडतो.