Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०६/२०२६

Article on Tukaram Mundhe and his working style

 तुका झालासे कळस


कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले सकस अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे.

अन्न व औषधी प्रशासन या विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला आणि अन्न व औषधी प्रशासन हा सुद्धा एक विभाग असतो आणि हा विभाग अन्न आणि औषध यातील भेसळ, हॉटेलमधील पदार्थ तसेच हवाबंद पाकिटा मधील पदार्थ यांवर लक्ष ठेवून असतो हे अनेकांना प्रथमच ठाऊक झाले. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, कठोर शिस्तीचे आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. २००५ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असलेले मुंढे हे त्यांच्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धडक कारवायांसाठी महाराष्ट्रात 'युथ आयकॉन' आणि 'पीपल्स ऑफिसर' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कार्यशैली ही प्रामाणिक आणि शिस्तबद्ध आहे. ते कोणत्याही पदावर गेले तरी तेथील व्यवस्थेत सुधारणा घडवून आणतात. या प्रक्रियेत राजकीय नेते आणि भ्रष्ट घटकांचे हितसंबंध दुखावल्यामुळे "कुछ ही दिनो मे उनकी बदली हो जाती है, लेकीन इतनी बदलियो के बाद भी उनकी कार्यशैली नहीं बदली" त्यांच्या कारकीर्दीत म्हणजे २१ वर्षात  झालेली ही त्यांची पंचवीसावी बदली आहे. आजरोजी पावेतो त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यांमध्ये  विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, पीएमपीएमएल (PMPML) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,  दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव या पदांचा समावेश आहे आणि सद्यस्थितीत वर उल्लेखल्या प्रमाणे ते आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) या पदावर नियुक्त आहे.

     अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच  तुकाराम मुंढे यांनी धाडींचे सत्र  सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अन्न भेसळी बाबत,  अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्याबाबत बराच ऊहापोह होत आला आहे जनतेला कोणत्या पदार्थात कोणती भेसळ केली जाते,  कोणती फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर होतो हे सर्व ठाऊक आहे परंतु भेसळ करणाऱ्यांवर फक्त दिवाळी व सणासुदीच्या वेळेसच धाडी टाकल्या जातात इतर वेळेस मात्र काहीही कारवाई होत नाही. वास्तविक पाहता अन्न व औषध प्रशासन हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विभाग आहे. सरकारला जनतेच्या जीविताची, आरोग्याची काळजी असते किंवा त्यांनी ती करणे अपेक्षितच असते, त्यांची ती जबाबदारीच आहे.  कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले, सकस, भेसळ रहित अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे,  अनेकदा अन्नातून विषबाधा झाल्याची उदाहरणे ऐकायला येतात, विकतच्या पदार्थांमध्ये झुरळ, पाल, उंदीर आढळून येतात. मागे एकदा एका हॉटेलमध्ये अन्नात पाल दिसून आल्याचे वृत्त देशभर गाजले होते. परवाच ठाण्याला केक मध्ये सुया आढळून आल्या. अशा प्रकारची उदाहरणे हल्ली मोठ्या प्रमाणावर ऐकू येतात. तुकाराम मुंढे अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त होता बरोबरच त्यांनी धडक मोहीम हाती घेऊन अनेक ठिकाणी धाडी घातल्या. पदभार स्वीकारताच "मी जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही" असे म्हणत काही दिवसातच त्यांनी शेकडो ठिकाणी धाडी टाकून शंभर पेक्षा अधिक जणांना अटक केली. ८६ अस्थापना सील केल्या तर १ कोटी 58 लाख 26 हजाराचा भेसळयुक्त माल जप्त केला. या धाडींमध्ये गुटखा व्यवसायिक, दूध व्यवसायिक, फळ विक्रेते, हॉटेल चालक इत्यादींचा समावेश आहे. तसेच पतंजली ला सुद्धा दणका बसला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असे धाडसत्र राबवले गेले असावे. त्यांच्या या धडक कारवाई मुळे गुटखा तस्कर , भेसळ करणारे, रासायनिक द्रव्याद्वारे फळे पिकवणारे यांचे धाबे दणाणले आहे.      

      तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीही त्यांच्या आधीच्या विभागांमध्ये त्यांची कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा तसेच जनतेसाठीचे कार्य या गोष्टी सिद्ध केल्या आहेत आणि आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची सुरू असलेली धडाकेबाज मोहीम या सर्व गोष्टींमुळे इतर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहे शिवाय त्यांनी स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या मांदियाळी बाबत अभंग लिहितांना संत बहिणाबाई यांनी तुकाराम महाराजां बाबत "तुका झालासे कळस" असे वर्णन केले आहे त्याचप्रमाणे इतर भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तुलनेत व त्यांच्या मांदियाळीत जनहितार्थ कार्य, कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता, याबाबतीत मुंढे यांनी जणू उत्तुंग शिखर सर केले आहे. म्हणूनच त्यांच्या बाबतीत सुद्धा तुका झालासे कळस असे म्हणावेसे वाटते. तुकाराम मुंढे यांची कारवाई स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे. तुकाराम मुंढे यांचा सारखा कित्ता जर किमान पन्नास टक्के प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांनी गिरवला तरी या भारतात मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल.

ता. क. - नेपाळ सारख्या छोट्या व आपल्या लगतच्या देशाने सुद्धा रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे पिकवले जात असल्यामुळे भारतीय आंब्यांवर बंदी घातली आहे. त्यांनी भारतातून  त्यांच्या देशात होणाऱ्या आंबे आयातीवर रोक लावली आहे. ही आपल्या देशाची नामुष्की नाही का ? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा