Click "Follow" Button below To Follow this Blog

१९/१२/२०२४

Article about crowd gathered to see pushpa 2 screening.

 क्रेझी किया रे ! 

बलम सामी हे गाणे खूप गाजले होते. विविध अंगविक्षेप असणारी उत्तेजक अशी गाणी आजकालच्या gen z पिढीतील तरुणाईला तर खूपच आवडतात. परंतु  स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवावर बेतणारी अती आवड सुद्धा नको. भारतीयांच्या अशाच चित्रपट आवडीबाबत अर्थात क्रेजबाबत थोडेसे....

भारतात चित्रपट निर्मिती ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली आहे. चित्रपट तेव्हा चित्रपटच होता, त्याचा बोलपट झालेला नव्हता. म्हणजे बोलपट होण्याच्याही आधीपासून  चित्रपटांचे वेड हे भारतीय जनतेला लागले. कारण त्या काळात हे तंत्र नवीनच होते. पडद्यावर कुणीतरी आपल्यासारखीच हालचाल करतांना दिसते आहे, हे पाहणे म्हणजे तत्कालीन जनतेसाठी नवलाईचीच बाब होती. ते नवल पाहण्यासाठी म्हणून अबाल-वृद्ध, गरीब-श्रीमंत सर्वच लोक गर्दी करू लागले. आज जसे जनतेला तरुणांना मोबाईलचे वेड आहे, तसे तेंव्हा चित्रपट वेड होते असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे चित्रपटवेड अधिकच वाढत गेले, कारण चित्रपट बोलू लागला होता, अर्थात त्यात आवाज, संगीत, गीतांचा समावेश होऊन तो बोलपट झाला होता. चांगली गाणी, संगीत यांचा समावेश झाल्याने व पुढे हा चित्रपट रंगीत झाल्यावर तर चित्रपटांचे वेड अधिकच वाढले. ज्या गावात टॉकीज नव्हत्या त्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने अथवा सायकलने सुद्धा मोठ्या शहरात डबे घेऊन चित्रपट पाहण्यासाठी जात असत. मला आठवते मी लहान असतांना राजकारणात गेलेला अमिताभ जेंव्हा पुन्हा चित्रपटात प्रवेश करता झाला त्यावेळी त्याचा शहेनशहा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा शो सकाळी सहा वाजेपासून ठेवण्यात आला होता. खामगावच्या मोहन टॉकीज मध्ये हा चित्रपट तेंव्हा लागला होता. तेव्हा सकाळी सहाच्या शोसाठी पाच वाजेपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अशी आठवण आजही तत्कालीन तरुण सांगतात. अशी चित्रपटाची प्रचंड क्रेझ , वेड, दिवानगी भारतीयांना आहे.

 जनतेचे हे चित्रपटवेड चित्रपट निर्मात्यांना सुद्धा लक्षात आले व ते सुद्धा लोकांना आवडतील असे चित्रपट बनवू लागले. चित्रपटांचे वाढते वेड यावर आधारित सुद्धा चित्रपट निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ गुड्डी आणि रंगीला या चित्रपटांमध्ये चित्रपटवेड्या तरुणी चित्रपटासाठी किंवा त्या अभिनेत्यासाठी, त्याला भेटण्यासाठी म्हणून काय-काय प्रयत्न करतात. पण ते कसे खुळेपणाचे आहे भुलवणारे आहे हे नंतर त्यांच्या लक्षात येते. दिग्दर्शकांनी चित्रपट, अभिनेते यांच्याप्रती त्या दोन चित्रपटातील तरुणींना वाटणारे वेडे प्रेम, आकर्षण हे अत्यंत उत्तम रीतीने दाखवले आहे. पण तरीही चित्रपटवेड हे अजून काही कमी झालेले नाही आज मोबाईल, ओटीटी, विविध वाहिन्या यांच्या गदारोळात सुद्धा चित्रपट हे तग धरून आहे आणि आजही अनेक चित्रपट हे गर्दी खेचतात. नुकताच पुष्पा 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला. पुष्पाचा पहिला भाग व त्यातील गाणे खूप गाजल्याने तसेच पुष्पा 2 या सिनेमातील एक गाणे सुद्धा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप गाजल्याने लोक पुष्पा 2 या सिनेमाची वाटच पाहत होते. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा 2 या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चार डिसेंबर रोजी मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यात रेवती नामक एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा श्रीतेज नावाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला. तो इतका गंभीर जखमी झाला की, आता त्याचा ब्रेनडेड झालेला आहे. या स्क्रीनिंगच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने तिथे एकच झुंबड उडाली व चेंगराचेंगरी झाली. त्यामध्येच श्रीतेज जखमी झाला. त्याला आता आवश्यक ती मदत सरकार देणार आहे. स्क्रीनिंगच्या वेळी चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन तिथे उपस्थित झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी म्हणून चाहत्यांनी गर्दी केली होती.  या घटनेत  दोषी म्हणून अल्लू अर्जुन तुरुंगवासात सुद्धा जाऊन आला.

चित्रपटांचे एवढे वेड भारतीयांना का आहे? हा ही एक प्रश्नच आहे. अमिताभ बच्चनच्या काळात प्रस्थापित सरकार, गुंड यांच्याविरोधात आवाज उठवणारा तरुण पाहिला की, लोक त्यात स्वतःलाच बघत असत. ते जे प्रत्यक्षात करू शकत नव्हते ते हा पडद्यावरील तरुण करतो आहे यातच त्यांना समाधान वाटत होते. याच देमार पठडीतल्या, अँग्री यंग मॅन हिरोटाईप सिनेमांना लोक गर्दी करत असत. आज सिनेमा निर्मिती व तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत, मनोरंजनाची अनेक नवीन साधने आलेली आहेत परंतु भारतीयांचे चित्रपटवेड तसेच पूर्वीसारखे कायम आहे पण चित्रपट पाहण्यास जातांना, एखाद्या स्टार मागे धावतांना ते आपल्या जीवावर तर बेतणार नाही याची काळजी जनतेने घेणे सुद्धा आवश्यक आहे. पडद्यावर खूप चांगली भूमिका वठवणारा स्टार हा प्रत्यक्ष जीवनात चांगला असेलच याची खात्री देता येत नाही. पुष्पा व पुष्पा 2 हे दोन्ही सिनेमे मी काही बघितलेले नाही परंतु पुष्पा या सिनेमात नायक हा डॉन असतो, गुंडा का स्मगलर असतो पण तरीही तो कसा चांगला आहे हे दिग्दर्शकाने व्यवस्थित रंगवले आहे. याचा वाईट परिणाम समाजावर व लहान मुलांवर होत असतो हे सुद्धा जनतेने विशेषतः चित्रपटप्रेमी जनतेने समजून घेतले पाहिजे. जुन्या काळात व आजही अनेक चित्रपट समाजाला काहीतरी शिकवण देणारे, बोधप्रद असे होते. आजही तसे काही क्वचित निर्माण होतात परंतु दुर्दैवाने असे सिनेमे जनतेला सुद्धा विशेष आवडत नाही. चित्र-विचित्र हावभाव, अश्लील हालचाली,  शेकडो अतिरिक्त कलाकार घेऊन चित्रित केली जाणारी तशीच अश्लील गाणी हे मात्र जनतेला खूप आवडते. बलम सामी हे गाणे तर खूप गाजले होते. विविध अंगविक्षेप असणारी उत्तेजक अशी गाणी आजकालच्या gen z पिढीतील तरुणाईला तर खूपच आवडतात. प्रत्येकाला आपली आपली आवड असते, त्याने ती जपली सुद्धा पाहिजे. परंतु आपल्या आवडीमुळे आपल्यासह इतरांवर सुद्धा संकट येत असेल तर अशी आवड जपतांना आपण विचार करणे आवश्यक आहे. चित्रपटांची आवड नसावी असे म्हणणे नाही परंतु चित्रपटांची अति आवड अति वेड, खुळा नाद नसावा की ज्यामुळे आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतेल म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यातच खरी हुशारी आहे. शिवाय पहिल्या काही दिवसातच करोडोंचा गल्ला गोळा करणारे हे स्टार आणि निर्माते यामुळे समाजाला काय फायदा होतो याचाही विचार होणे गरजेचे आहे. चित्रपट बघूच नाही असा या लेखाचा उद्देश नाही. चांगले चित्रपट जरूर पाहावे परंतु त्याचे अतिवेड, अति क्रेझ नसावे की ज्यामुळे आपल्या जीवावर संकट येईल.

१२/१२/२०२४

Article about old pension in Maharashtra

देवाभाऊ तुमी आले, जुनी पेन्शन बी आना.

देवाभाऊ राजेहो तुमच्या आमदार लोकाईच असते का असं शाळा कर्मचा-याईसारखं ? की कोनाले कमी आणि कोनाले जास्त मानधन ? मले तुमी सांगा यखादा आमदार 2005 च्या नंतर आमदार झाला तर मग त्याले काय कमी फॅसिलिट्या देते काय सरकार ?

23 नोव्हेंबर रोजी महायुती लयी मोठ्या मताईन निवडून आली. देवाभाऊ तुमी मराठी अन् हिंदी दोनी भाषेत पुना येईन असं म्हनलं होतं अन् तस तुमी आले बी. महायुतीन अन् पवार सायबाच्या महाआघाडी न बयनींसाठी योजनाईच आश्वासन देलतं या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर लई तान पडला हाय असं बी हे ते तज्ञ कां कोन असतात ते लोक म्हनू रायले राजा. पण देवाभाऊ तुमी म्हनता की सरकारवर काईबी तान येनार नाई, सारं बरोबर होईन. बयनी बी लयी खुश हायेत.  वाढीव पैसे भेटतीन न बापा आता. पन जे सरकारी कर्मचारी हायेत त्याईचं काय भाऊ ?    सा-याईले पैसे भेटू राहिले कुन्या ना कुन्या योजनेतून. पन सरकारी कर्मचाऱ्याईला राजकारनी लोक काऊन दाटू रायले कोन जाने ? 17 नोव्हेंबर 2005 ले एक जी आर काढला अन् जुनी पेन्शन योजना लागे बंदच केली अन् सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेन्शनवर तवाच्या सरकारंन गदा आनली राजेहो. साऱ्या लोकायले तुमी लोक हे योजनाईतून फुकटछाप पैसे वाटता अन् लागे सरकारी कर्मचाऱ्याईचे पेन्शनच तुमाले म्हंजे तवाच्या सरकारले दिसलं बंद क-याले. काय तर म्हने त्याईच्यासाठी म्हंजे कर्मचाऱ्याईसाठी डीसीपीएस आणि यन. पी. एस. या योजना आनल्या. डीसीपीएसचा बदल बी लगे यनपीएस मदे केला. बाबू लोकाईले शाळेचे मास्तर इचारू लागले मी कायच्यात बसतो डीसीपीएस की यनपीएस मदे ? कोनी मास्तर म्हनते, "मी अजूक 20% वरच हाय राजेहो, मी रिटायर होईलोक 20% वरच राहील का हो बावा ? "काही पेन्शन भेटन की नायी तुम्हाले जवाईबापू" असं राजा सासरा बी विचारते मले, निरा परेशान झालो ना मी.  कोनाले ईचाराव त त्यालेबी काई  माहीत नसते. कोनी म्हनते ते शेयर बाजार का काय असते ना त्यात आपले पैसे टाकतात मंग यनपीएस न लय फायदा होते. भाऊले म्हनल नीरा कन्फुज करून टाकलं न हो ! एकपरी सा-या पार्ट्या संविधान-संविधान म्हनतात , सारा भारत यक हाय म्हनतात अन् दुसरीकडे एका राज्यात जुनी पेन्शन त एका राज्यात नवीन पेन्शन. कायची समानता हो ? बायको म्हनते तुम्हाले पेन्शन नायी पन मले मात्र माझ्या भावान चालू केले मले पैसे.  आजकाल तर मास्तर लोकायले सारेच बोलून घेतात भाऊ. जो उठला तो मास्तरलेच बोलते. ते तुमचे कोन हाय ते आमदार प्रशांत बंब त्याईच्या आडनांवापरमानं बम बोलून घेतात मास्तर लोकायले. त्याईले हे दिसत नायी की त्याईले बी एका मास्तरनच शिकवेल हाय. अनुदानित शाळा मास्तरचा लयीच खार करते राजा हे बंब सायेब. देवाभाऊ तुमीच मले सांगा आता आमदार लोकाईले सारे लोक सारे कर्मचारी सारखेच हाय का नायी? तशी शपत बी घेतात ना ते ! मंग  मास्तर लोकाईशी या बंब बुवाची कायच दुश्मनी हाय कोन जाने? या बंब भाऊले दुसर कायी दिसत नाही सदानकदा मास्तर लोकायईरुद्ध बोलत रायतात.  माय म्हनन हे हाय की तुम्ही सा-याईले वाटू रायले त मंग कर्मचाऱ्याला काऊन दाटू रायले ? मले हे सांगा पयले कर्मचाऱ्याईन तुमचं काय घोडं मारल हो?कर्मचारी हा बिचारा गरीब असते अन् मास्तरची जात तर बेजाच गरीब. सरकारन काई नवं टुमन आनल की मास्तर भेते , त्याच्याच मागं लावतात न हो नवे टुमने. मास्तर हा घाबरते हे तुमाले चांगलं माहित आहे मंग देता त्याच्याच मागं लाऊन. राजेहो तुमच्यासारखा मानूस करू शकते हे पेन्शनच काम. तुमी यकदा म्हनलं बी होतं की, "जुनी पेन्शन आम्हीच देऊ शकतो" पायजा मागचा व्हिडिओ यखादा. बरं  जुनी पेन्शन बंद केली तर केली त्यात अजून एक पॉईंट काढला ज्या शाळा 2005 च्या अगोदर अंशत: अनुदानावर हाय अन् नंतर शंभर टक्केवर आल्या त्या शाळा कर्मचा-याईले बी पेन्शन नायी, अन्  पहिल्यापासून ज्या शंभर टक्के वर आहे त्याईले पेन्शन.  हे असं काढणारा लयीच  दिमागबाज  दिसते मले. कुठून त्यांन हे आयडिया काढली कोन जाने. मले त वाटते त्याले साऱ्या कर्मचाऱ्याईन साष्टांग दंडवत घाल्याच एक आंदोलनच करावं. देवाभाऊ राजेहो तुमच्या आमदार लोकाईच असते का असं की कोनाले कमी आणि कोनाले जास्त मानधन ? मले तुमी सांगा एखादा आमदार 2005 च्या नंतर आमदार झाला तर मग त्याले काय कमी फॅसिलिट्या देते काय सरकार ? काय राजे हो संविधान म्हनते समानता हाय मंग कर्मचा-याईले अलग न्याय अन् आमदाराईले अलग? काही समजत नाही राजेहो. देवाभाऊ, तुमच्यावर लोकाईचा लयी ईश्वास हाय. विरोधी पक्षबी तुमाले मानते, मोदी शहा सायबाचे बी तुमी लाडके हाय, जमवा न मंग आमचं काम ! कायी बी म्हना  तुमचा सोशिक स्वभाव लोकाईले समजला हाय. तुमाले लोकाईनं कायी-कायी श्या दिल्या, कायी बी बोलले पन तरी तुमी शांत रायले. तुमचा स्वभाव दुस-याला समजून घेनारा,  दुस-याईच दु:ख समजून घेनारा हाय. आमचं बी दु:ख समजून घ्या. भाऊ बस जस तुमी पुना आले तस आमची जुनी पेन्शन बी पुना द्या आता. तुमाले साऱ्या कर्मचाऱ्याईच्या वतीन हात जोडून विनंती. 

०५/१२/२०२४

Article about devendra fadanvis

"...है वोही सच्चा सोना"

राजकारणात आल्यावर गब्बर झालेले अनेक नेते आपण बघितले आहेत. परंतु निवडणूक आयोगासमोर फडणवीस यांनी त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती बघून कोणालाही आश्चर्यच वाटेल.

आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तिस-यांदा शपथ घेणार आहे. हा लेख वाचकांपर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित शपथविधी  झालेला सुद्धा असेल. पण पुन्हा येईन असे त्यांनी म्हटले होते ते प्रत्यक्षात आले आहे म्हणून हा लेखन प्रपंच.

     पाच वर्षांपुर्वी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे  आपल्या वडीलांची विचारसरणी आणि पक्षाची  भूमिका यांना गाठोड्यात गुंडाळून माळोच्यावर ठेवून आणि एक शिवसैनिक म्हणून स्वत: शरद पवार व कॉंग्रेसच्या कुबड्या घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत "मी पुन्हा येईन" ही कविता म्हटली होती. त्यावरून बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी त्या शब्दांवरून सुसंस्कृत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली सुद्धा उडवली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशा मोठ-मोठ्या पदांवर राहिलेल्या देवेंद्र  फडणवीस यांच्यावर गतकाळात अनेकांनी शिवराळ भाषेत, महाराष्ट्राला न शोभणा-या अशा भाषेत टीका केली, शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या पत्नीवर सुद्धा गलिच्छ भाषेत टीका केली. शरीरावरून सुद्धा टीका केली परंतू देवेंद्र यांनी त्याला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी प्रत्युत्तर न देऊन त्यांच्यावर टीका करणा-यांना, त्या शिव्या देणा-या तमाम लोकांना नेटक-यांना त्यांची लायकी दाखवून दिली. इतिहास हा शिव्या देणा-यांना नव्हे तर कर्तुत्वाला, कर्तुत्ववान लोकांनाच लक्षात ठेवतो हे देवेंद फडणवीस यांनी एका भाषणात म्हटल्यावर त्यांची राजकीय उंची व विचारसरणी महाराष्ट्राने पाहिली. आपण सर्व भारतवासी जरी विविध जाती-धर्मांचे असू तरी सर्वप्रथम आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे मागील काही काळामध्ये सत्ता प्राप्तीसाठी महाराष्ट्रातील जनतेमध्ये जातीभेदाचे विष काही राजकारणी लोकांनी पेरण्याचे काम केले, त्याला खतपाणी सुद्धा घातले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे गढूळ वातावरण निर्माण झाले. जनता सुद्धा एकमेकांना जातीच्या चष्म्यातून पाहू लागली. समाज माध्यमांवर तर गलिच्छ स्तरावर जातीवाचक उल्लेख करून फडणवीससारख्या नेत्यांची हेटाळणी करताना लोक दिसून येतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वात जास्त गलिच्छ भाषा जर कुणाबद्दल वापरली गेली असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे होत. पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामाला प्राधान्य दिले पक्षाला वाढवण्यास प्राधान्य दिले आणि त्याची परतफेड म्हणून जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिले. या निवडून देण्यावर सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून विरोधी पक्ष शंका-कुशंका घेत आहेत.  त्यांच्या हे लक्षात येत नाही किंवा ते मुद्दामच जाणून घेत नाही की, या निवडणुकीत त्यांची आमदार संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. 2014 मध्ये फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात अनेक विकास कामे सुरु झाली व पार पडली यात काहीच दुमत नाही परंतू नंतर युतीचा काडीमोड झाला आणि तद्नंतर उद्धव ठाकरे यांची बदलेली भूमिका, टोमणे मारणे, फडणवीस यांच्या काळात सुरु झालेल्या योजनांना खीळ घालण्याचे एकमेव काम केले. 2019 मध्ये पण जनतेने फडणवीस यांनाच कौल दिला होता परंतू हा कौल हिसकावून घेतल्या गेला हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेने पाहिले आहे. काल भाजपा कोअर कमिटी व वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नांव आता गटनेता आणि तदनुषंगाने मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले याचा आनंद तमाम महाराष्ट्रवासियांना झाला आहे. आता "तू पुन्हा येशील तर मी पण पुन्हा बसेल" असे म्हणणारे, एकेरी भाषेत बोलणारे फडतूस कलंक अशी विशेषणे फडणवीस यांना लावणारे काही विघ्नसंतोषी लोक तर आहेतच म्हणा. ती तर आता आणखी चवताळतील. ते निव्वळ शिवीगाळ व जात धर्मावरून हेटाळणी करणारी विधाने करतील, त्यांना तेवढेच काय ते येते. पण अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.  पण ते लोक हे सुद्धा मानायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही. वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर राजकारणात आलेले असे लोक कुठे, तर वयाच्या 22 व्या वर्षापासून स्वतःच्या जोरावर राजकारणात आलेले  नगरसेवक, आमदार व मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले कर्तुत्ववान देवेंद्र फडणवीस कुठे. देवेंद्र फडणवीस हे पद, प्रतिष्ठेकरीता राजकारणात आलेले व्यक्ती नाही. इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी कुठल्याही संस्था वगैरे उघडलेल्या नाही. राजकारणात आल्यावर गब्बर झालेले अनेक नेते आपण बघितले आहेत. परंतु निवडणूक आयोगासमोर फडणवीस यांनी त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती बघून कोणालाही आश्चर्यच वाटेल. त्यांच्या नावावर दोन घरे, शेती, काही लाख रुपयांचे सोने व 62 लाख रुपये कर्ज आहे. अशा स्वच्छ प्रतिमा असलेल्या, सुसंस्कृत असलेल्या व्यक्तीला केवळ दोष देण्याचे, शिव्या देण्याचे कार्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे आणि दुर्दैवाने नेटकरी जनतेने सुद्धा केलेले आहे. त्यांनी फडणवीस यांची एवढी हेटाळणी केली की जनतेला सुद्धा ती आवडली नाही आणि जनतेने महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिले. "आगमे जलकेभी जो निखरे है वही सच्चा सोना" या एका गीतातील ओळीप्रमाणे शिव्यांची लाखोली, विविध दोषारोपणे, त्यांच्या पत्नीबाबत केलेली गलिच्छ विधाने, त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून केलेली विधाने, मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने त्यांना फडतूस, कलंक, नालायक असे संबोधणे या अशा हेटाळणीरुपी आगीतून फडणवीस हे तावून सुलाखून सोन्याप्रमाणे पूर्वीपेक्षा अधिक उजळून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे "ते पुन्हा आले" आहे.