Click "Follow" Button below To Follow this Blog

१४/०६/२०२२

Article about "I am not Savarkar I am Rahul Gandhi" banner in rally while Rahul Gandhi went for ED enquiry

तुम्ही सावरकर नाहीच !

तुम्ही सावरकर तर नाहीच व होऊ सुद्धा शकणार नाही कारण हजारो वर्षात एक सावरकर जन्म घेतो. सावरकर होण्यासाठी कष्ट, यातना सहन कराव्या लागतात, धैर्य अंगी बाणवावे लागते, मातृभूमीविषयी अतोनात प्रेम असावे लागते, त्याग , तपस्विता, तेज, तारुण्य , तळमळ हे सावरकरांचे अटलजींनी कथन केलेले गुण अंगी असावे लागतात...

नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र पंडीत नेहरू स्थापित असोसिएटेड जर्नल लिमिटेड नामक कंपनी  चालवले जात असे. या कंपनीस सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी यंग इंडिया लिमिटेड हि कंपनी स्थापन करून काबीज (Take over) केले व कंपनीच्या देशभरातील करोडो रुपयांच्या जमिनीचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ईडी ला सामोरे जाताना राहुल गांधी हे मोठ्या लावाजाम्यासह चालत गेले. आपल्या समर्थकांसह ईडी चौकशीस जातांना या मोर्चाला त्यांनी सत्याग्रह म्हटले. याच प्रकरणात जमानतीवर असलेले राहुल व त्यांचे समर्थक यांचा आविर्भाव असा होता जणू काही  ते अत्यंत निरपराध व निरागस आहेत परंतू डाळीत काही न काही काळे असल्याशिवाय कुणालाही ईडी चौकशीस बोलवले जात नाही. या मोर्चात विविध फलक सुद्धा झळकवले गेले. यातील एका फलकावर "आय एम नॉट सावरकर आय एम राहुल गांधी" असे इंग्रजीत लिहिले होते. हे जे लिहिले होते ते बरोबरच आहे. सावरकर होणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. याच फलकाला अनुसरून राहुल गांधी यांना खालील मुद्द्यांन्वये सांगावेसे वाटते. 

1. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वसामान्य घरातून आले होते तुमच्यासारखे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मले नव्हते. तुम्हाला तुमच्या बाल्यावस्थेपासून कधीही काहीही त्रास झाला नाही परंतु सावरकरांना त्यांच्या बालपणापासून आयुष्यभर अनेक संकटे, अनेक यातना यांचा सामना करावा लागला.

2. सावरकर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी विदेशात गेले तिथे ग्रंथलेखन केले भारताचा दबदबा दाखवून दिला याउलट तुम्ही मात्र कर्तृत्वाशिवाय कधी सुटी घालवायला तर कधी विविध कार्यप्रसंगी विदेशात जाऊन भारताविषयी अपमानजनक अशी वक्तव्ये केली आहेत.   

3. सावरकर हे भाषाप्रभू होते त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, काव्य केली, लावण्या लिहिल्या, शेरोशायरी लिहिली. तुम्हाला मात्र एकदा एके ठिकाणी साधा अभिप्राय लिहिणे सुद्धा जमले नव्हते.

4. सावरकरांची मालमत्ता जी जप्त झाली होती ती तुमच्या पणजोबांच्या काळात त्यांना परत देण्यास हरकत घेतली गेली होती आणि  तुम्हाला तर इतरांची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले जाते. सावरकरांनी देशाला सर्वस्व दिले आणि तुम्ही मात्र देशाचे लाटण्याचा प्रयत्न करीत आहात

5. सावरकरांना गांधी हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले गेले होते पण ते डगमगले नाही आणि त्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडले. तुमच्यावर मात्र गैरव्यवहार करण्याचा आरोप झाल्यामुळे तुम्ही किती विचलीत झाले आहात हे तुमच्या कालच्या गतिविधीं वरून दिसून येते. याचाच अर्थ प्रकरणात तथ्य आहे व त्यामुळे भय निर्माण झाले आहे.

6. सावरकर आणि गांधीजी दोघांचीही विचारसरणी अत्यंत निराळी होती परंतू सावरकरांनी कधीही गांधीजींचा अपमान केला नाही तुम्ही मात्र तुमच्यावर आरोप झालेला असतांनाही  समर्थक बोलावले त्यांना सत्याग्रह हे नाव देऊन चौकशीला गेलात. तुमच्यावर गैरव्यवहाराचा ठपका असतांनाही तुमच्या मोर्चाला सत्याग्रह म्हणत तुम्ही गांधीजींचा सुद्धा अपमान करीत आहात.

    राहुलजी वरील सहा मुद्द्यांव्यतिरिक्त आणखीही इतर अनेक मुद्दे देता येतील ज्या व्दारे तुम्ही जे I am not Sawarkar म्हणता ते स्पष्ट होईल.

    राहुलजी तुम्ही कोणत्या उद्देशाने I am not Sawarkar म्हणता ते चांगलेच ठाऊक आहे. परंतू घाबरलो आहे असे दर्शवून अफजलखानास चकमा देण्यात शिवाजी महाराजांची जी दुरदृष्टी होती तशीच इंग्रजांना चकमा देण्याची सावरकरांची होती. परंतु  राहुलजी या देशाचा इतिहास तुम्हाला नीट ठाऊकच नाही व पुर्वग्रह दुषित अशी तुमची दृष्टी असल्याने तुम्हाला सावरकरांविषयी  आकस आहे.  तुम्ही सावरकर तर नाहीच व होऊ सुद्धा शकणार नाही कारण हजारो वर्षात एक सावरकर जन्म घेतो. सावरकर होण्यासाठी कष्ट, यातना सहन कराव्या लागतात, धैर्य अंगी बाणवावे लागते, मातृभूमीविषयी अतोनात प्रेम असावे लागते, त्याग , तपस्विता, तेज, तारुण्य , तळमळ हे सावरकरांचे अटलजींनी कथन केलेले गुण अंगी असावे लागतात. 

 "झालेत बहु , होतील बहु परी या सम हाच"  असे सावरकर होते. 

राहुलजी वरील सर्वार्थाने तुम्ही सावरकर नाहीच आणि म्हणून तुमच्या मोर्चात  "आय एम नॉट सावरकर आय एम राहुल गांधी" असा जो फलक होता तो योग्यच होता.

०९/०६/२०२२

Article about Subhash Desai statement in Aurangabad

विक्रमादित्याचे नांव घेण्यापेक्षा विकासाचा विक्रम सांगावा

मविआ सरकारने  खरोखर  अनेक विक्रम केले आहेत. त्यात वाझे प्रकरण अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे,अनिल परब, खोटी कागदपत्रे सादर करण्याचे प्रकरण अशा नाना विक्रमांचा समावेश आहे.

राज ठाकरे यांची सभा , त्यानंतर जल आक्रोश मोर्चा यानंतर संभाजीनगर येथे काल शिवसेनेची स्वाभिमान सभा संपन्न झाली. संभाजीनगर नामांतरण प्रश्न कसा निकाली काढावा हा संभ्रमच असल्याने संभाजी महाराज यांचा मोठा पुतळा तेवढा व्यासपीठावर ठेवण्यात आला होता. नामंतरणापेक्षा रोजगार, पाणी इ प्रश्न मोठे आहे असे अबू आझमी यांच्या वक्तव्याशी मिळते जुळते विधान मुख्यमंत्र्यानी केले. या सभेला उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काही नेत्यांनी संबोधित केले. यात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सुद्धा समावेश होता. सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून सुभाष देसाई यांनी अत्यानंदीत होऊन आपल्या भाषणात शिवसेनेने शिवसेनेच्याच सभेला होणा-या गर्दीचा विक्रम मोडला असे म्हटले व या अनुषंगाने हिंदू चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य राजाच्या नावाचा विशेषण म्हणूूून सुद्धा उपयोग केला. पण हिंदूंच्या त्या चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्याने एकट्याने साम्राज्य प्रस्थापित केले होते त्यासाठी लाचारी , अभद्र आघाड्या केल्या नव्हत्या याचे देसाईंना स्मरण आहे की नाही देव जाणे. तसे पाहिले तर सभांना होणाऱ्या गर्दीचा विक्रम करण्यापेक्षा भारतीय राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांच्या  विकास कामांचा विक्रम स्थापित करायला हवा व तो जाहीर सभांमधून सांगायला हवा. राजकीय पक्षांच्या सभा होतात त्यात कुरघोड्या ,टोमणे,एकमेकांवर टीका-टिपणी, शेेेलके शब्दप्रयोग हे करण्यापेक्षा आपल्या पक्षाने कोण-कोणती विकास कामे केली, समाजासाठी काय केले, कोणते उपक्रम राबवले जाहीरनाम्यातील वचने पूर्ण केली का? हे जनतेला सांगायला हवे. विक्रमादित्य राजाचा सुभाष देसाई यांनी केलेल्या उल्लेखामुळे विक्रमादित्य या भारतीय इतिहासातील एक थोर, अत्यंत उदार व न्यायप्रिय राजाचे स्मरण झाले. तो त्याच्या रत्नजडित सिंहासनावर बसून न्यायदान करीत असे. विक्रमादित्यानंतर त्याचा वंशज राजा भोज हा एकदा शिकारीला गेला असता त्याला जंगलात एक मुलगा एका उंच मातीच्या ढिगाऱ्यावर बसून त्याच्या मित्रांमधील तंटा सोडवत होता व उत्कृष्ट न्यायदान करत होता असे दृश्य दिसले. त्याला वाटले की एवढा लहान मुलगा इतके चांगले न्यायदान कसे करू शकतो? यात काही स्थान महात्म्य तर नाही ना? म्हणून त्याने तो मुलगा ज्या मातीच्या ढिगार्‍यावर बसून न्यायदान करीत असे तो मातीचा ढिगारा खोदून काढला. तेव्हा त्याला त्या ढिगाऱ्याखाली विक्रमादित्याचे सिंहासन सापडले. विक्रमादित्याच्या नि:पक्ष न्यायदानामुळे त्या सिंहासनास तेवढे पावित्र्य प्राप्त झाले होते. पुढे जेव्हा त्या सिंहासनावर राजा भोज आरूढ होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उधार व न्यायप्रिय असलेल्या विक्रमादित्याच्या त्या सिंहासनावर बसण्यास त्याला  सिंहासनावरील प-या प्रकट होऊन तुझ्या मध्ये सुद्धा जर विक्रमादित्यासारखेच गुण असतील तर तू या सिंहासनावर बसण्याचा अधिकारी ठरशील असे राजा भोज यास म्हणतात. राजा भोज आत्मपरीक्षण करू लागतो. असे आत्मपरीक्षण सांप्रतकालीन नेत्यांनी सुद्धा करणे आवश्यक झाले आहे. सभेला झालेल्या गर्दीचा विक्रम या अनुषंगाने देसाईंनी विक्रमादित्याचा उल्लेख केला असे जरी असले तरी मविआ सरकारने मात्र खरोखर  अनेक विक्रम केले आहेत. त्यात वाझे प्रकरण अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे,अनिल परब, खोटी कागदपत्रे सादर करण्याचे प्रकरण अशा नाना विक्रमांचा समावेश आहे यात इतरही काही जणांचा समावेश आहे. यांच्याबाबत कारवाई करतांना नायप्रिय राजा विक्रमादित्याप्रमाणे त्वरित  व 
न्याय्य कारवाई का केली गेली नाही? कारवाई करतांना विलंब का झाला? निव्वळ न्यायी राजा विक्रमादित्याचे नांव घ्यायचे, विशेषण लावायचे परंतू कृती मात्र अगदी उलट. मविआ सरकार वरीलपैकी काही व्यक्तींवर केंद्र सरकार हे इडी, सीबीआयच्या माध्यमातून ही कारवाई हेतुपुरस्सर करत आहे असे जरी म्हणत असले तरी या सरकारमधील व्यक्तींची काही जुनी प्रकरणे मात्र निश्चितच आहेत, कारण काही दिवसांपुर्वी संजय राऊत सुद्धा "काही जुनी  प्रकरणे उकरून काढली जात आहेत" असे म्हणाले होते. याचाच अर्थ प्रकरणे आहेत. खंडणी, भ्रष्टाचार, अनैतिकता इ अनेक विक्रम करणा-या मविआ सरकार मधील नेत्यांच्या नावावर नोंदवले जात असतांना देसाई साहेबांनी केवळ सभेला झालेल्या गर्दीला हुरळून त्या गर्दीचा विक्रम सांगण्यापेक्षा व न्यायप्रिय, चक्रवर्ती हिंदू राजा विक्रमादित्यच्या नावाचा विशेषण म्हणून उपयोग न करता आपल्या विकास कामांचा विक्रम जनतेला सांगावा.

०५/०५/२०२२

500th Article

 लिखता चला जाऊं , Article 500


जननिनाद मधील स्तंभ व तदनंतर ब्लॉग सुरु करून 8 वर्षे झाली.लेखन सुरु केले त्यावेळी असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु वाचकांचा उदंड प्रतिसादवेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रियाप्रेरणा यामुळे आजच्या या पाचशेव्या लेखापर्यंत येऊन पोहचलो
प्रतिसादाबद्दल खामगाव परिसरातील 
वाचकवर्ग तसेच वृत्तपत्र इंटरनेट आवृत्तीब्लॉग, फेसबुकच्या 
माध्यमातून वाचणारे तसेच जन-निनाद , तरुण भारत, वृत्तकेसरी, देशोन्नतीचे संपादक, आणि 
कर्मचारीवृन्दांचे आभार.

     कुणीही कोणतेही कार्य सुरू केले , ते अविरत सुरूच ठेवले , त्या कार्यास वर्षपुर्ती झाली , 25 वर्षे झाले , 50 वर्षे झाले की मग  झालेली ती वर्षपुर्ती, गाठलेला तो टप्पा साजरा करण्याची प्रथा सर्वदूर आहे. विविध संस्था, कार्यालये, राजकीय पक्ष सुद्धा असे करतात.  आजकाल वाढदिवस तर मोठया जोशात साजरे केले जातात. ही प्रस्तावना देण्याचे प्रयोजन असे की, 2013 पासून दर गुरुवारी एक लेख याप्रमाणे आजचा हा 500 वा लेख आहे. वृत्तपत्र व ब्लॉग मिळून हे 500 लेख आहेत. लिखाण सुरु केल्यावर काही कालांतराने  ब्लॉग लिहिणे सुरु केले त्यामुळे या 500 लेखांपैकी 433 लेख हे ब्लॉगवर आहेत, सुरुवातीचे 67 लेख ब्लॉगवर पोस्ट झाले नाहीत. कोणतेही एक कार्य नियमित करावे असे म्हटले जाते इतर माहीत नाही परंतु लेखन कार्य का कोण जाणे मी नियमित करू लागलो. कदाचित समाजातील विघटनवाद, निराशावाद, अपप्रवृत्ती, नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, भ्रष्ट नेते, नोकरशहा अशा बाबी व अनेक सकारात्मक बाबींनी लेखनास प्रवृत्त केले व या कार्यात नियमितता आजपावेतो तरी राखू शकलो. सहज म्हणून एक लेख लिहिला, लेख काय 15-20 ओळी रखडल्या होत्या. पण ते लिखाण सांज दैनिक जन निनादचे आमचे मित्र अ‍ॅड. अनिल चांडक यांना आवडले, तो दिवस गुरुवार होता, ते म्हणाले, ”छान लिहिले आता दर गुरुवारी लिहीत जा” , “काय लिहिणार एवढे ?” असे मी उत्तरल्यावर ,”भरपूर विषय असतात , लिहा” चांडक यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पहिलाच लेख स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लिहिल्या गेला व चांगला प्रारंभ झाला. मग दुसरा, तिसरा असे लेख दर गुरुवारी नेमाने लिहीत गेलो, कित्येकदा गुरुवार व्यतिरिक्त सुद्धा काही प्रासंगिक लेख लिहिले, तरुण भारत , देशोन्नती, लोकमत, वृत्तकेसरी, साप्ताहिक जनमंगल  या वृत्तपत्रातून सुद्धा लेख प्रकाशित झाले. दोन लेख ई-बुक मध्ये सुद्धा प्रकाशित झाले. लेख प्रकाशित होत होते, या लेखातील विचार माझ्या मनातून प्रसवले जात होते, मी जरी लिहीत असलो तरी संत तुकाराम ज्याप्रमाणे “गोविंद वदवी तेच म्हणे” असे म्हणाले होते या ओळींचे स्मरण मला कित्येकदा व्हायचे , नव्हे होतच असते. तसेच माझ्या या लेखांच्या लिहवित्यास सुद्धा मी मनोमन नमन करत होतो. कित्येकदा वरीष्ठांच्या मुखाने ऐकलेले “आपण केवळ निमित्तमात्र असतो” हे वाक्य सुद्धा स्मरणात आहेच. लेखामागून लेख लिहिल्या गेले, वाचकांचे चांगले अभिप्राय येत गेले, त्यातून आणखी लिहिण्याची उर्मी होत गेली व लेखनाचे जणू व्यसनच जडले. खामगांव शहरातील जुन्या परंतू आता भग्न, भकास झालेल्या स्थळांबद्दलची, खामगांवातील खाद्य संस्कृतीची, वेड्यांविषयीची अशा तीन लेख मालिका सुद्धा लिहिल्या. वाचकांच्या प्रतिक्रिया येतच होत्या ज्या मला आणखी लिहिण्यास भाग पाडत होत्या. मी लहान शहरातील एका सांज दैनिकातून लिहीत असल्याने माझ्या लेखांचे वाचक हे निमशहरी व ग्रामीण आहेत ,हो पण सोशल मीडियामुळे, माझ्या ब्लॉगमुळे व जन निनादच्या इंटरनेट आवृत्तीमुळे माझे लेख देश-विदेशातील उच्चशिक्षित लोक सुद्धा वाचत आहेत. पण पंक्चर दुरुस्तीच्या दुकानदाराने, ऊसाच्या रसाच्या गाडीवाल्याने टँकर वाल्याने वा इतर किरकोळ विक्रेत्यांनी किंवा तळागाळातील वाचकांनी जेंव्हा माझ्या लेखांबद्दल मला प्रतिक्रिया दिली तेंव्हा मला विशेष आनंद झाला. कारण खरा भारत ग्रामीण भागातच दिसतो असे म. गांधींनी म्हटले होते, व त्याच ग्रामीण भागातील हे लोक होते. यातील काहींनी त्यांना माझ्या कित्येक लेखातील सर्वांना घेऊन चालण्याची भाषा, जातीभेद न पाळण्याबाबत केलेले आवाहन, संत व थोर पुरुष हे सर्वांचेच आहेत, आपली विचारसारणी कोणती का असेना पण राष्ट्र प्रथम असले पाहिजे असे उल्लेख खुप भावल्याचे व्यक्त केले. मंगळवार/बुधवार आला की आगामी लेखासंबंधीत विचार मनात येण्यास सुरुवात व्हायला लागते व गुरुवारी लेख प्रकाशित होतो. लेख प्रकाशित झाल्यावर सोशल मिडीयावर तो शेअर पण करतो. ते आवश्यक आहे की नाही माहीत नाही कारण भगवंताने गीतेत सांगून ठेवले आहे की , “...मा कर्मफलहेतुर्भुर्मा..” अर्थात हे अर्जुना कर्माच्या फळाप्रती आसक्ती ठेवू नको. माझ्या लेखातून मात्र मला आपण निर्मिलेली गोष्ट इतरांना कळावी, त्यांना ती आवडावी ही ईच्छा म्हणजे एक प्रकारची फलप्राप्तीची सुप्त आशा कुठेतरी असतेच, लोकेषणाच ती. त्यामुळे मी करीत असलेले लेखन हे ईश्वरपर्यावसायी होत नव्हते व हे लेखन कर्म लौकिक अर्थाने जरी यशस्वी वाटत असले तरी आध्यात्मिक दृष्टीकोनातून मात्र कदाचित वाया जाणारे कर्म आहे. असे सर्व विचार हा 500 वा लेख लिहितांना मनात आले व लेखनाचा हा छंद जडल्यावर “जीवनभर लिखता चला जाऊं” असेच वाटत आहे फक्त या कर्मातून अहंकार निर्माण न होवो हेच भगवंताकडे निवेदन. 

   हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला ते  वाचकवृंद व ज्यांच्यामुळे हे लेख वाचकांपर्यंत पोहचू शकले त्या सर्व वृत्तपत्रांच्या संपादक महोदय व कर्मचारी वृंद यांचे मनस्वी आभार.

२८/०४/२०२२

Leaders should start movement for public problems

 एक नजर इधर भी.....

दुस-याच्या घरासमोर हनुमान चालिसा , आपल्या नेत्याविरुद्ध कुणी तक्रार करत असेल तर कर त्याच्यावर हल्ला , इडी चौकशी करीत असलेल्या नेत्यांचे स्वागत , नेत्यांसाठी व पक्षासाठी आंदोलने , एकमेकांची उणीदुणी , भ्रष्टाचार हे करण्यापेक्षा नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत आंदोलने करावीत. जनतेची पाणी समस्या , भारनियमन यासंबंधी तोडगा काढण्याचे प्रयत्न करावे.

नुकतेच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलन छेडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ते मुंबईला पोहोचल्यावर त्यांना अडवण्यासाठी कित्येक शिवसैनिक ठाण मांडून बसले होते. त्यापुर्वी राज्यात विरोधी पक्ष व मविआ यांच्यात एकमेकांवर शाब्दिक हल्ले , कुरघोड्या एकमेकांच्या नेत्यांच्या तक्रारी , त्यावरून पुन्हा खडाजंगी कुणाच्या मागे इडी तर कुणाच्या मागे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग असे मविआ सत्तेत आल्यापासून सुरुच आहे. कुणी कुणाचा बंगला पाडण्यास निघते तर कुणी हनुमान चालिसा म्हणण्यास. राज्य शासन सुद्धा राज्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विरोधकांना निस्तरण्यातच जास्त व्यस्त आहे. मुख्यमंत्री  घंटाधारी / गदाधारी हिंदू असा हिंदूंमध्ये भेद करतात तर सरकार मधील मंत्री जातीयवादी भाषणे , हिंदू समाज व हिंदू विधी यांची खिल्ली उडवतात व त्या खिल्लीवर उपस्थित मंत्री खळखळून हसतात व तद्नंतर केविलवाणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात. विरोधक सत्ताधा-यांचे गुंडांशी संबंध असल्याचे सांगतात तर सत्ताधारी विरोधकांचेच गुंडांशी संबंध असल्याचे सांगतात. ते म्हणतात यांचे दाऊदशी व्यवहार आहे तर हे म्हणतात राणा दाम्पत्याने लकडावाला कडून कर्ज घेतले आहे. काय चालले काय आहे राज्यात ? जनतेला हा प्रश्न पडला आहे. जनता लोकप्रतिनिधींचा हा कलगीतुरा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे? एकमेकांवर होणारे यांचे आरोप प्रत्यारोप पाहून कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाही हे जनतेला या नेत्यांनीच लक्षात आणून दिले आहे. या लोकप्रतिनिधींना जनता का निवडून देते ? तर जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून , विकास व्हावा म्हणून परंतू हे त्याकडे काहीही लक्ष न देता बहुतांश वेळ एकमेकांची प्रकरणे काढण्यात खर्ची घालतात , सभागृहात शांततेत चर्चा न करता राज्याच्या कित्येक प्रश्नांकडे कानाडोळा करतात , एकमेकांवर आरोप , गोंधळ यातच हे सभागृहाचा बहुमोल वेळ खर्ची घालत असतात. 

        उन्हाळा सुरु आहे राज्यात अनेक ठिकाणी पाणी प्रश्न आहे , काही ठिकाणी धरणात पाणी असूनही भारनियमनामुळे टाक्या भरल्या जात नाहीत व नळ वेळेवर येत नाही. काही शहरात बसवलेले नवीन मिटरचे नळ शोभेची वस्तू बनले आहेत, काही पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्या आहे. उन्हाळ्यात वीज व पाण्याची वाढती मागणी असतांना वीज कंपन्यांना दीड/ दोन दिवसांचा कोळसा शिल्लक असतांना जाग येते. उन्हाची काहिली सुरु असतांना जनता घामाच्या धारात भिजत असते नेते मात्र वातानुकुलीत गाड्या व वातानुकुलीत कक्षात बसलेले असतात. भारनियमन , पाणी यांसह बेरोजगारी , आरोग्य , स्वच्छता , कर्मचा-यांचे प्रश्न , पेट्रोलवर राज्याचा कर , असे कित्येक प्रश्न आहेत.  लोकप्रतिनिधींना प्रकृती स्वास्थ्य खराब असेल तर निधी मिळतो , आमदारांना घरे देण्याची सुद्धा कल्पना यांच्या सुपीक डोक्यातून निघाली होती. स्वत:च्या पात्रात तुप ओढणे यांना बरोबर जमते कर्मचा-यांना, शिक्षकांना जुनी पेन्शन देतांना मात्र पैसे नसतात. जनता हे सर्व जाणून आहे परंतू जनतेने आता लोकप्रतिनिधी निवडतांनाचे आपले जुने विचार त्यागून काम करणा-यास निवडून देणे आवश्यक झाले आहे, चांगल्या देशप्रेमी तरुणांनी सुद्धा राजकारणात येण्याचा विचार करावा.

      दुस-याच्या घरासमोर हनुमान चालिसा , आपल्या नेत्याविरुद्ध कुणी तक्रार करत असेल तर कर त्याच्यावर हल्ला , इडी चौकशी करीत असलेल्या नेत्यांचे स्वागत , नेत्यांसाठी व पक्षासाठी आंदोलने , एकमेकांची उणीदुणी , भ्रष्टाचार हे करण्यापेक्षा नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत आंदोलने करावीत. जनतेची पाणी समस्या , भारनियमन यासंबंधी तोडगा काढण्याचे प्रयत्न करावे. जनतेच्या प्रश्नांसाठी प्राथमिकता द्यावी हेच जनतेला अपेक्षित आहे. निव्वळ आम्ही असे तुम्ही तसे हे घसा फाडून , रोज सकाळी पत्रकारांसमक्ष येऊन , पत्रकार परिषदा घेऊन सांगण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना हात घातल्या गेला पाहिजे , त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, हे जनतेला अपेक्षित आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकाणाचा स्तर हा पुर्वीसारखाच राखल्या गेला पाहिजे. सत्तेचा उपयोग शिवाजी महाराज जसा रयतेसाठी करीत तसा सत्ताधा-यांनी सुद्धा जनता जनार्दनासाठी करणे महत्वाचे नाही का? विरोधक व सत्ताधारी दोघेही एकमेकांची प्रकरणे / भ्रष्टाचार / चौकशी यातच मश्गुल आहेत जनतेच्या अनेक प्रश्नांकडे  त्यांची साफ डोळेझाक होत आहे. त्यांची नजर केवळ आणि केवळ सत्त्तेकडे आहे म्हणूनच त्यांना एक नजर इधर भी... अर्थात जनतेकडे व जनतेच्या प्रश्नांकडे सुद्धा एक नजर असू द्या असे सांगावेसे वाटते.

०७/०४/२०२२

Article about Raj Thackray Speech on Gudhi Padawa 2022

 ...क्या बहिरा हुवा खुदाय ? 




संत कबीर यांच्या 550 वर्षांपुर्वीच्या दोह्यात शीर्षकातील हा प्रश्न उपस्थित केला होता.या दोह्याची आठवण राज ठाकरे यांच्या भाषणामुळे झाली.विविध जात,पंथ,धर्म असलेल्या या भारत वर्षात सर्वांनाच समान अधिकार, वागणूक , न्याय, ईश्वर आराधना इ. सर्वांत समानता असावी असेच राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. देवाची प्रार्थना एकाची भल्या मोठ्या आवाजात तर दुस-यास मात्र ती अनुमती नाही मग कुठे गेले आपले समानतेचे तत्व ? 

     परवाच्या राज ठाकरे यांच्या भाषणांवरुन सध्या चांगलाच वाद पेटलाय. संत कबीर यांच्या 550 वर्षांपुर्वीच्या दोह्यात शीर्षकातील हा प्रश्न उपस्थित केला होता.या दोह्याची आठवण राज ठाकरे यांच्या भाषणामुळे झाली. राज यांचे भाषण अनेकांच्या जिव्हारी लागलेले दिसते.  म्हणूनच त्यानंतर नेत्यांना रंग बदलणारा सरडा , अक्कल दाढ , वस्तरा , भोंगा , बी टिम, सी टिम अशा प्रकाराच संज्ञा आठवायला लागल्या आहेत. राज ठाकरे हे काल मशिदी वरील भोंग्यांबाबत बोलले. हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यांवरून म्हटला जावा असेही भाष्य त्यांनी केले. याच मुद्द्यावरून अबु आझमी यांनी सुद्धा हिंदू उत्सवात वाजणा-या डिजेवर आक्षेप घेतला. सर्वांनाच ज्याचा-त्याचा धर्म, भाषा, संस्कृती ,देव हे प्रिय असतात, त्यांच्याविषयी अभिमान आणि भावना जोडलेल्या असतात परंतू घराबाहेर पडतांना आपल्या जाती धर्माला घरीच सोडून बाहेर निघाले पाहिजे. "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो" या सावरकरांच्या वचनाचा विसर आता सर्वांनाच पडलेला दिसतो म्हणूनच देशाचा विकास, देशहित याबाबत बोलण्यापेक्षा आपल्या भारतात राजकारणी धर्म , जात केंद्रीतच राजकारण करतांना दिसतात. परंतू राज ठाकरे जे बोलले ते कित्येक सर्वसामान्यांच्या मनात आहेच. विविध जात,पंथ,धर्म असलेल्या या भारत वर्षात सर्वांनाच समान अधिकार, वागणूक , न्याय, ईश्वर आराधना इ. सर्वांत समानता असावी असेच राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. देवाची प्रार्थना एकाची भल्या मोठ्या आवाजात तर दुस-यास मात्र ती अनुमती नाही मग कुठे गेले आपले समानतेचे तत्व ? हेच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे गुणप्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया यात विद्यार्थ्यांना कुठे समानतेने पाहिले जाते ? पण असे कुणी स्पष्ट बोलले , लिहिले की मग वाद निर्माण होतो, विविध प्रतिक्रिया व्यक्त होतात, त्या प्रतिक्रियांची सुद्धा चर्चा होऊ लागते व मुख्य मुद्दा मात्र बाजूस पडतो. हे आपल्या देशात होतच आले आहे. राज ठाकरे बोलल्यानंतर नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात जानवे सुद्धा आलेच. एक बोलला की त्यावर प्रतिक्रिया द्यायची व मध्ये तिस-यालाच विनाकारण घुसडायचे हे सुद्धा राजकारणी हेतुपुरस्सर करीत असतात. तुलसीदास रचित हनुमान चालिसा यावर कुण्या जातीचा अधिकार नाही तो सर्वच हिंदू गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणत आले आहे मग जानवे मध्येच का आणायचे? या दशकात राजकारणात जेंव्हा नवीन पिढी येऊ लागली तेंव्हा असे वाटले होते की हे उच्चविद्याविभूषित, परदेशात शिकून आलेले तरुण विकासाभिमुख राजकारण करतील परंतू ते सुद्धा पुर्वापार चालत आलेल्या राजकारणाचीच री ओढत आहेत हे दुर्दैवी आहे. जात,पंथ, धर्म केंद्रीत राजकारण तुष्टीकरण, मतपेढीसाठी लांगूलचालन हे आपल्या देशातून कधी हद्दपार होईल देव जाणे. एकास एक न्याय व दुस-यास वेगळा असे व्हायला नको. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहीलेल्या आपल्या घटनेत सुद्धा समानता हे तत्व आहे मग त्या तत्वाचे अनुसरण होतांना का दिसत नाही? प्रत्येक धर्मियांनी व त्यांच्या नेतृत्वाने यावर सखोल विचार करणे अत्यंत जरूरी आहे. आपआपले देव , धर्म यांना घरातच ठेवले पाहिजे व बाहेर आपण सर्व भारतीय असल्याची भावना रूजवली गेली पाहिजे. आपल्या देशातील सर्व धर्मियांतील संत महात्म्यांनी सुद्धा आपल्याला “जे जे भेट भूत तया जाणिजे भगवंत” अशी शिकवण दिली आहे. ईश्वरची आराधना करण्याचे मार्ग सुद्धा सांगितले आहेत. या आराधनेत दिखावा नको असेच सर्व संत महात्म्यांनी सांगितले आहे. म्हणूनच संत कबीर म्हणतात,

कांकर , पाथर जोडी के

मस्जिद देयी चुनाय |

तां चढी मुल्ला बांग देयी,

क्या बहिरा हुवा खुदाय ?

म्हणूनच सर्वांनी आपआपल्या धर्माचे आचरण करावे परंतू त्याचा त्रास आपल्याच देशबांधवांना होऊ नये याची काळजी घ्यावी व “देहा कडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” या सावरकरांच्या विचाराचे सुद्धा स्मरण ठेवावे.