अमिताभायण
काल
अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने
गौरवले जाणार आहे असे वृत्त झळकले. देशविदेशात करोडो अबालवृद्धांच्या या आवडत्या
अभिनेत्याला हा पुरस्कार मिळणे ही सर्वांची मनोमन इच्छा होतीच. कारण या
पुरस्कारासाठी तो Deserving आहेच. भारतीय जनमानसाच्या ह्र्द्यसिंहासनावर अमिताभ
गेली कित्येक वर्षे अनभिषिक्त सम्राटा प्रमाणे राज्य करीत आहे. त्याच्या उतरत्या
वयातही त्याची क्रेझ आहे. वाल्मिकीचे रामायण, गदिमांचे गीत रामायण आणि
भविष्यात “अमिताभायण” सुद्धा लिहिले जाऊ शकते.
का नाही लिहिले जाऊ शकणार ? कारण त्याचे गारुड, त्याची मोहिनी
अबाल वृद्धांमध्ये गेल्या 47 वर्षांपासून कायम
आहे. “ये पुलिस
स्टेशन है तुम्हारे बाप
का घर नही” म्हणत जंजीर
मध्ये आपला राग प्रकट करणारा , सतत कार्यशील राहणारा
अमिताभ “देवी और सज्जनो”
असे आजही
“केबीसी” मध्ये म्हणत आपला कारेश्मा
राखून आहे. काल त्याला दादासाहेब फाळके सन्मान प्राप्त होणार
ही बातमी आली. माध्यमांवर संदेशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली
झाली. म्हणूनच अमिताभ विषयी
पुनश्च काहीतरी लिहिण्याची इच्छा झाली. अमिताभायण या शीर्षकानुसार म्हटले तर अमिताभवर
एक भलामोठा ग्रंथच
लिहावा लागेल. तूर्तास नाही अमिताभायण ग्रंथ तर निदान एक लेख तरी लिहावासा
वाटला. “कामयाबी की सिडी” पटापट चढत लोकप्रियतेचे
सर्व उच्चांक अमिताभने मोडले. त्याच्याशी तुलना करू पाहणारे सर्व “किंग” ,”बादशाह” आजही त्याच्या मागेच आहेत कारण “हम जहॉं खडे होते है लाईन
वहीं से शुरू होती है” अशी संवादफेक त्याने
कित्येक वर्ष आधी केली आहे. आणि खरच आजही लाईनमध्ये प्रथमस्थानी तोच आहे, सुपरस्टार आहे. सुरुवातीला अपयश मग सलीम-जावेद, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा इ सहका-या समवेत अनेक हिट सिनेमे अमिताभने दिले.
त्याच्यासाठी गायलेली किशोर कुमारच्या आवाजातील गाणी आजही लोक तितक्याच आवडीने
ऐकतात. डॉन सिनेमा आजही तितकाच ताजा वाटतो. नेहमी म्हटले जाते की सर्वात मुख्य काम
असते दिग्दर्शनाचे परंतू डॉन चा दिग्दर्शक चंद्रा बारोट होता किती जणांना माहीत
आहे? चंद्रा बारोट ने पुढे किती हिट सिनेमे दिले त्यासाठी शोध मोहीम हाती
घ्यावी लागेल. “सबकुछ अमिताभ” अशी स्थिती होती. उंच आहे म्हणून आमच्या कॅमेरात बसणार नाही, आवाज चांगला नाही असे म्हणून प्रथम हिणवल्या गेल्यावरही त्याने
त्याच्या त्याच बाजू जमेच्या म्हणून सिद्ध केल्या, ”पीटर तुम मुझे बाहर ढूंड
रहे थे और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था” हा संवाद कुणा इतर
अभिनेत्याच्या आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. “केबीसी” मध्ये सहभागी लोकांशी अत्यंत आपुलकी व आदराने वागणा-या अमिताभने त्याचे नांव रेखा सोबत जोडल्या गेल्यावर आजतायागत या बाबतीत किती संयमाने वर्तणूक केली आहे. हिंदी भाषेवर त्याचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे व प्रशंसनीय आहे. नाहीतर आजकाल किती इंग्रजाळलेले हिंदी व मराठी बोलतात. तो सलग एकच भाषा वापरून किती अस्खलीत बोलतो. पुढे राजकारणातील अपयश आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक असे त्याचे सिनेमे आपटले. “ए बी सी एल” चे दिवाळे निघाले. असे अपयशाचे हलाहल पचवून त्याने पुन्हा उभारी घेतली. “अंग्री यंग मॅन” या त्याच्या काळात आमचा जन्म झाला होता परंतू त्याची जादू आजही कायम असल्याने त्याचे सिनेमे, गाणी यांची कितीतरी पारायणे आमच्या पिढीतील अनेकांनी केली आहे. तो जेंव्हा मुकादम मै तुम्हारे इन भाईयों तट्टूओंको एक हाथ से मसलकर फेंक सकता हुं” असे म्हणायचा तेंव्हा पिटातील प्रेक्षकाला आपणच अन्याया विरुद्ध पेटून उठलो आहे असे वाटायचे. “मेरे पास ना बाप दादा की दौलत है ना फुटी कवडी लेकीन मै तुमको पांच दिन के अंदर पाच लाख रुपये दुंगा” असे तो संजीव कुमारला त्रिशूल मध्ये म्हणाला तेंव्हा त्याच्यातील आत्मविश्वास तरुणांना प्रेरित करून गेला. याच सिनेमात तो गुंडांना मारतांना गुंडांचा पराजय होईलच या आत्मविश्वासाने तो रुग्णवाहिका घेऊन जातो. या सिनेमात त्याने प्रथम गरीब आणि नंतर एकदम “कॉन्फीडंट” व प्रोफेशनल युवा बिल्डरची भूमिका किती सुरेख वठवली आहे. त्याच्या प्रेमापोटी एक नजर, आलाप, बन्सी बिरजू , गंगा की सौगंध, रस्ते का पत्थर असे त्याचे अपयशी चित्रपट सुद्धा पहिले आहेत. त्याच्या भरवश्यावर कितीतरी मिमिक्री कलाकारांनी आपली उपजीविका साधली आहे. राजू श्रीवास्तव त्याची कबुली देतो.परंतू अशा या “जादूगर” अमिताभच्या जेंव्हा अनिवासी भारतीय असल्याच्या बातम्या आल्या, बोफोर्स घोटाळ्यात नांव जोडल्या गेले, नुकतेच पनामा पेपर्स मध्ये नांव असल्याचा संशय व्यक्त केल्या गेला तेंव्हा त्याच्या चाहत्यांना दु:ख झाले परंतू त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. व.पु.काळे यांनी एका कथेत लेखकाची पत्नी व मुलगी कशा अमिताभसाठी वेड्या असतात आणि त्याचा लेखकाला कसा वीट येतो यावर फार सुंदर कथा लिहिली आहे. अमिताभवर लिहायचे म्हणजे ते “अमिताभायण”च होईल आणि त्यासाठी एक लेख पुरेसा ठरणार नाही.






