Click "Follow" Button below To Follow this Blog

२३/०३/२०२३

Article about Lambretta , a old scooter.

 आठवण एका स्कूटरची


 स्कूटर म्हटली की तुम्हाला बजाजची आठवण येणार , परंतू ही स्कूटर बजाजच्याही कित्येक वर्षे आधीची अशी स्कूटर आहे. आजच्या पिढीतील अनेकांना ही स्कूटर व तीचे हे नांवही माहीत नसेल.  अनेकांना जुना काळ, Antic जुन्या गोष्टी , यांचे बाबत जिव्हाळा आहे . आजकालच्या use and throw च्या काळात त्यांच्या पूर्वीच्या पिढीने या वस्तूंची , वाहनांची जीवापाड घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली आहे.  त्यांना हे सारे हृदयस्पर्शी वाटते. त्यांचेसाठीच ही आठवण. 

    स्कूटर म्हटली की तुम्हाला बजाजची आठवण येणार , परंतू ही स्कूटर बजाजच्याही कित्येक वर्षे आधीची अशी स्कूटर आहे. आजच्या पिढीतील अनेकांना ही स्कूटर व तीचे नांवही माहीत नसेल. हे नांव आठवण्यास निमित्त घडले ते समाज माध्यमावर पाहिलेल्या एका जुन्या छायाचित्राचे. जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र, माला सिन्हाचे कृष्ण धवल असे हे चित्र होते. हे चित्र पाहिले आणि स्कूटर या विषयाची एक किक बसली, अनेक आठवणींची ट्रॅफिक डोक्यात सुरू झाली. विचारांनी पिक अप घेतला. शाळकरी विद्यार्थी असतांना माझ्या काकांनी माझ्या मोठ्या भावासाठी एक वेगळीच स्कूटर आणली. तेंव्हा बजाजची स्कूटर चांगलीच जोरात होती. राजदूत ही मोटर सायकल सुद्धा होती. त्या काळात ही वेगळीच लांब आकाराची स्कूटर पाहून आम्हाला आश्चर्य वाटले होते. पुढे या स्कूटरचे नांव लॅम्बरेटा आहे असे कळले. आम्ही ती स्कूटर खूप न्याहाळत असू. 4 गियर, समोरच्या सिट खाली छोटासा टुल बॉक्स व त्याच्या दोन्ही बाजूला कॉक व चोक, हॅंडल हालवल्यावर केवळ समोरचे चाक हालत असे त्यावरील मडगार्ड स्थिर असे, ते बॉडीलाच जोडलेले असे. नंतर आलेल्या बजाज स्कूटरचे मात्र तसे नव्हते. लॅम्बरेटाचे इंजिन हे मधोमध होते म्हणजे चालक व मागे बसणा-याच्या सिटच्या खाली. त्यामध्ये दुरूस्ती किंवा देखभाल करायची असल्यास दोन्ही बाजूची पॅनल उघडावी लागत असत.  या पॅनलच्याच बाजूने गाडीलाच जोडलेले असे फुटरेस्ट होते. मागे स्टेपनी लावण्यासाठी जागा होती. मला तऱ आमच्या त्या लॅम्बरेटाचा नंबर सुद्धा अजून लक्षात आहे. MMA 7178 असा तो नंबर होता. आम्ही तिला 7178 असेच म्हणत असू. माझा भाऊ ती गाडी मोठी जोरात चालवत असे तो महाविद्यालयातून घरी आला की दुरूनच जोरात टीर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा हॉर्न वाजवत असे मग आम्ही लगेच फाटक उघडायला धावत असू व तो झोकात गाडी अंगणात आणून उभी करत असे. त्याच्या त्या अशा थाटात एन्ट्रीचा आम्हालाच मोठा आनंद होत असे. मग आम्ही सारे एकमेकांकडे पाहून दिलखुलास हसत असू. 


    मध्यंतरी सोशल माध्यमांवर अनेक लॅम्बरेटा स्कूटर असलेले असे एक चित्र झळकले होते त्यात नव्या को-या अशा कित्येक लॅम्बरेटा स्कूटर जतन करून ठेवलेल्या दिसत होत्या. एकदा शम्मी कपूरच्या एका जुन्या गाण्यात नायक व त्याचे मित्र हे लॅम्बरेटावर बसून जात आहेत असे चित्रण केलेले दिसले होते  तर सदाबहार देव आनंदच्या गाजलेल्या तेरे घर के सामने चित्रपटात नायिकेला भेटायला म्हणून नायक दिल्ली ते सिमला असा लॅम्बरेटा ने प्रवास करतो असे दाखवले होते. खरे तर हे सर्व जेंव्हा पाहिले होते तेंव्हाच लॅम्बरेटा बद्दल लिहायचा विचार मनात डोकावला होता परंतू लॅम्बरेटा जशी मागे पडली तसा तो विषय सुद्धा मागेच पडून गेला. परवा जेंव्हा पुन्हा धर्मेंद्र, माला सिन्हाचे लॅम्बरेटावरचे कृष्ण धवल चित्र पाहण्यात आल्यावर हा विषय कागदावर उतरवलाच. आमच्या बालपणी आमच्याकडे तर लॅम्बरेटा होतीच तशीच ती गांवातील काही प्राध्यापक वृंदांकडे सुद्धा होती. घन सर, लिमये सर, अणे सर, व्यापारी बालकीसनदासजी पुरवार उपाख्य श्रीमानजी व इतर काही लॅम्बरेटा तेंव्हा आमच्या गर्दीहीन शहरात दिमाखाने फिरत असत. त्यावेळी लॅम्बरेटा ब्रॅंड, तिची कंपनी कोणत्या देशात उत्पन्न होते याबाबत काहीही माहिती नव्हती व तसा विचारही कधी मनात आला नाही. आजच्या पिढीतील लहान मुलांना मात्र नवीन गाड्या त्यांचे उत्पादन करणारे देश व कंपन्या  मुखोद्गत असतात. जाहिरातीमुळे नवीन पिढी बरीच चतुरस्त्र झाली आहे. पुढे मात्र लॅम्बरेटा म्हणजे इटली देशात उत्पादन होणारी इनोसेंटी या कंपनीची गाडी असल्याचे वाचनात आले होते. इटली मधील मिलान मधील लॅम्बरेट या जिल्ह्याच्या नांवावरून या स्कूटरचे  लॅम्बरेटा असे नामकरण केले होते. मला मात्र  बालसुलभ वयात लॅम्बरेटा या गाडीच्या लांब आकारावरूनच  काहीतरी जुळवून लॅम्बरेटा असे नामकरण केले असावे असे उगीचच वाटत असे. फर्डीनांडो इनोसेंटी या गृहस्थाने 1922 मध्ये  इनोसेंटी ही कंपनी स्थापन केली होती आणि दुस-या महायुद्धानंतर  लॅम्बरेटा हे स्कूटर उत्पादन करण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात तीचे उत्पादन 1947 मध्ये सुरू झाले होते. त्याच सुमारास व्हेस्पा या स्कूटरचे सुद्धा  उत्पादन सुरू झाले होते. तत्कालीन आर्थिक  दृष्ट्या कमजोर असलेल्या भारतात 1950 च्या सुमारास API (Automobile Products of India)  ने  लॅम्बरेटाचे असेंम्ब्लिंग सुरू केले होते. 1972 मध्ये इनोसेंटी कडून संपूर्ण हक्क घेऊन उत्तर प्रदेश मध्ये SIL ( स्कूटर इंडिया लिमिटेड ) ने लॅम्बरेटा सारखीच विजय डिलक्स ही स्कूटर बाजारात आणली होती.  व तद्नंतर बजाज स्कूटर भारतीय बाजारात उपलब्ध झाली. परंतू  सरकारने आता गाड्यांचे आयुर्मान 15 वर्षे ठरवले व त्यानंतर अनेक गाड्या भंगारात जाऊ लागल्या. आज बाजारात अनेक जुन्या गाड्या विक्रीस असतात. जुन्या/ नव्या कार विक्रीच्या अँप वरून कुणी व्यापारी अब्जाधीश सुद्धा झाला आहे म्हणे, असो !  वास्तविक पाहता तुम्ही कोणत्याही गाडीचा योग्य रखरखाव, देखभाल म्हणजेच Maintanance केले तर ती गाडी पंधराच काय तर अनेक वर्षे चांगली चालू शकते. आजही अनेक Ambessador, Fiat, मारुति 800 रस्त्यावर धावतांना दिसतात. जुनेच तेवढे चांगले असेही नाही अनेक नवीन, प्रवाशांच्या सुरक्षिततेची अत्यंत काळजी असलेल्या गाड्या आज बाजारात आहेत. काळाच्या ओघात अनेक गाड्या मागे पडल्या त्या खराब होत्या म्हणून मागे पडल्या असेही मात्र नाही.  परवा  धर्मेंद्र , माला सिन्हाचे लॅम्बरेटा वरचे ते कृष्ण धवल चित्र पाहून लॅम्बरेटाच्या या स्मृती जागृत झाल्या. स्मृतींच्या या प्रवासात तुम्हाला सुद्धा घेऊन जावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. आजकाल जुने कोणाला आवडते ?  आज जुन्या माणसांचीच किंमत केली जात नाही तर वस्तूंची तर दूरच. वृद्धाश्रमांची संख्या वाढतेच आहे, जेष्ठ नागरीक एकाकी होत आहे , प्रसंगी त्यांचेवर हल्ले होत आहेत, त्यांची फसवणूक होत आहे अशा या काळात जुन्या माणसांचीच किंमत नाही तर जुन्या वस्तू आणि वाहने तर कुणाच्याच खिजगणतीतच नसणार. तरीही अनेकांना जुना काळ, Antic जुन्या गोष्टी , यांचे बाबत जिव्हाळा आहे . आजकालच्या use and throw च्या काळात त्यांच्या पूर्वीच्या पिढीने या वस्तूंची , वाहनांची जीवापाड घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली आहे.  त्यांना हे सारे हृदयस्पर्शी वाटते. त्यांचेसाठीच ही लॅम्बरेटाची आठवण. 



२२/०३/२०२३

Article about educational condition since last 30 years in Buldhana District

बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थित्यंतरे 

शिवराय घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांंवर

तरुण भारत अकोला आवृत्ती वर्धापन दिन विशेष

बुलढाणा जिल्हा मातोश्री जिजामाता यांचे माहेर. या माऊलीने शिवरायांना जसे शिक्षण दिले, नैतिक शिक्षण दिले तसा आदर्श जिल्ह्यातील शैक्षीन संस्थांनी घेऊन शिवरायांसारखे आदर्श तरुण निर्माण करण्याचा वसा घेतला पाहिजे

शिक्षण विषय हा भारतातील एक महत्वाचा असा विषय आहे. या भारतवर्षात पुर्वी हजारो वर्षांपासून शिक्षणाची परंपरा सुरु आहे. ज्ञानाधिष्ठित अशी ही गुरुकुल परंपरा ऋषीमुनींच्या काळापासून सुरु आहे. नालंदा, तक्षशीला सारखी विद्यापीठे इथे होती, परदेशातील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत, मोठी ग्रंथसंपदा इथे होती. परंतू परकीय आक्रमकांनी हे सर्व उध्वस्त केले परंतू तरीही ईश्वरचंद्र विद्यासागर, माष्टर महाशय, महर्षी कर्वे, भगिनी निवेदिता, टिळक, आगरकर, फुले दाम्पत्य यांनी हा वसा घेतला व ही ज्ञानज्योत तेवती ठेवली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात मात्र मेकॉलेच्या धोरणानुसार शिक्षण देणे सुरु झाले. यात आपण आपला "स्व" विसरलो व आजच्या आपल्या शिक्षण प्रणालीचे स्वरूप आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. स्वातंत्रोत्तर काळात देशातील अनेक भाग हे अविकसित असेच होते, दुर्गम होते, दळणवळणाची साधने अत्यल्प होती. अशाच या अविकसित भागांपैकी एक जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा.

    बुलढाणा शहराला जिल्हा बनवण्याचे कारण म्हणजे गो-या साहेबांना मानवणारी व आवडणारी थंड हवा. खामगांव हे बुलढाणा शहरातील सर्वात मोठे शहर. स्वातंत्र्यपुर्व काळात या जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती ही इतर ठिकाणी होती तशीच होती. काही शासकीय शाळा या जिल्ह्यात त्या काळात होत्या. मात्र या लेखात आपण इंग्रजकालीन बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक स्थितीचे मुल्यांकन किंवा स्थिती वगैरे पाहणार नसून आजपासून सुमारे तीस वर्षांपुर्वीची बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती व आजच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहोत. तरीही स्वातंत्र्यपुर्व काळात खामगांव शहरात राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली होती. या शाळेस अनेक स्वतंत्रता सेनानी व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. व येथील अनेक माजी विद्यार्थी समाजात उत्कृष्ट कार्य करित आहेत. खामगांव या एकेकाळच्या कापसाच्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी गोविंदराम सक्सेरिया यांच्या मोठ्या आर्थिक मदतीने गो.से. महाविद्यालय स्थापन करण्यात आले त्याच सुमारास बुलढाणा येथे जिजामाता महाविद्यालय व तद्नंतर चिखली, मलकापूर, जळगांव जामोद, मेहकर याठिकाणी सुद्धा महाविद्यालये सुरु झाली परंतू ही सर्व महाविद्यालये ही कला, विज्ञान व वाणिज्य शाखेची होती. जिल्ह्यात अभियांत्रिकी, विधी, वैद्यकीय महाविद्यालये मात्र नव्हती. खामगांव येथे 1960 च्या दशकात शासकीय तंत्रनिकेतन मात्र सुरु झाले. काही तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे होती व खामगांव येथे पंचशील होमिओपॅथी महाविद्यालय सुद्धा त्याच काळात सुरु झाले होते. या महाविद्यालयात सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून विद्यार्थी येत असत व येतात. काही परदेशी विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षण घेण्यासाठी पुर्वी यायचे. 80 च्या दशकात शेगांव येथे संत गजानन महाराज संस्थानचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाले. प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या अनेक मराठी शाळा होत्या. बुलढाणा जिल्ह्यातील ही अशी शैक्षणिक स्थिती 1990 च्या दशकापर्यंत होती. अशी स्थिती असली तरी जिल्ह्यातील तत्कालीन अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरांकडे धाव घेतली व उच्चविद्याविभूषित सुद्धा झाले. जिल्ह्यात शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठ मोठ्या पदांवर सरकारी व खाजगी क्षेत्रात नोक-या केल्या. कुलगुरू, पोलिस अधिकारी, न्यायाधीश यांसारखी अनेक पदे बुलढाणा जिल्ह्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी विभूषित केली आहेत तर काही आजही कार्यरत आहेत. आजपासून सुमारे तीस/पस्तीस वर्षांपूर्वी मात्र जिल्ह्यात विकासाची गती वाढली. जिल्ह्यातील अनेक शहरात विविध उद्योगधंदे सुरु झाले, शेतीमध्ये आधुनिक तंत्र आले व शिक्षण क्षेत्र सुद्धा झपाट्याने आगेकूच करू लागले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन महाविद्यालये सुरु झाली, अनेक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या, इंग्रजी माध्यमांच्या शेकडो शाळा सुरु झाल्या. या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमुळे अनेक मराठी शाळा बंद पडल्या व काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आज प्रत्येक पालकास आपला पाल्य हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकावा अशी भावना दिसून येत आहे. ही परिस्थिती तर सर्वदूर आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात अनेक नवीन महाविद्यालये आहेत, अभियांत्रिकी, विधी, तंत्रनिकेतन अशी अनेक महाविद्यालये आहेत. आज शैक्षणिक संस्था अमाप झाल्या आहेत विद्यार्थ्यांना तिथपर्यन्त पोहोचण्यास दळणवळणाची साधने विपुल प्रमाणात आहेत. आज शिक्षण क्षेत्रात पुर्वीपेक्षा कैकपटीने अत्याधुनिक शैक्षणिक साधने सुद्धा उपलब्ध आहेत. पुर्वी जसे जिल्ह्यातील लहान गावातील विद्यार्थ्यास तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणून यावे लागत होते आज तसे नाही. सुरु झालेल्या अनेक संस्था ह्या ग्रामीण भागाला लागूनच आहेत शिवाय यातील काही संस्था तर अगदी "KG To PG" आहेत, त्यांच्याकडे चांगले "इन्फ्रास्ट्रक्चर" आहे. आज "इन्फ्रास्ट्रक्चर"कडे संस्थाचालकांचे पुरेपूर लक्ष असते कारण आज पालक सोयी सुविधा पाहूनच आपल्या पाल्याचा प्रवेश त्या संस्थेत करण्याचे पाहत असतात. पुर्वी "इन्फ्रास्ट्रक्चर" काहीच नसायचे परंतू संस्थांचा जो मुख्य हेतू आहे तो मात्र उच्चकोटीचा होता. पुर्वीच्या नगर कौलारू , पावसाळ्यात ठिकठीकाणी गळणा-या शाळा , बसायला पट्ट्या हे सर्व जाऊन आता शैक्षणिक संस्था कशा झकपक झाल्या आहेत शाळा/ महाविद्यालये यांचे बाह्यांग अत्यंत देखणे असे आहे परंतू अंतरंग , शिक्षणाचा दर्जा मात्र पुर्वीसारखा राहिला नसल्याचे अनेक जेष्ठ, सेवानिवृत्त व पालकांचे म्हणणे आहे. आज जिल्ह्यात अनेक संस्थात अनेक अत्याधुनिक शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत परंतू पदे भरण्यास मात्र मान्यता नसते, जिल्ह्यातील या अनेक महाविद्यालयातून तासिका तत्वावर शिकवणारे व नुकतेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अननुभवी विद्यार्थीच शिक्षक म्हणून दिसतात. विद्यापीठ , शासन यासंबंधीत सर्वांनी अनुभवी व कायमस्वरूपी शिक्षक प्राध्यापक वृंद कसे नियुक्त कर्ता येतील याबाबत विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. बहुतांश वेळी तासिका तत्वावर शिकवणारे शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांचे सिनियर असतात व त्यामुळे विद्यादानाचे कार्य हे तितकेसे उत्कृष्टपणे होतांना दिसत नाही. आज जिल्ह्यात कित्येक शाळा, महाविद्यालये, तांत्रिक विद्यालये, कौशल्य विद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत परंतू या शैक्षणिक संस्थांतील दर्जा हा अत्युत्कृष्ट असा असावा निव्वळ कारखान्यातून उत्पादन बाहेर येते त्याप्रकारे या शैक्षणिक संस्था या सुशिक्षित विद्यार्थ्यांचे उत्पादन बाहेर काढणा-या संस्था ण व्हाव्यात तर स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत अशा "मनुष्य निर्माण" करणा-या Man Making Education असणा-या असाव्यात. बुलढाणा जिल्हा मातोश्री जिजामाता यांचे माहेर. या माऊलीने शिवरायांना जसे शिक्षण दिले, नैतिक शिक्षण दिले तसा आदर्श जिल्ह्यातील शैक्षीन संस्थांनी घेऊन शिवरायांसारखे आदर्श तरुण निर्माण करण्याचा वसा घेतला पाहिजे. शैक्षणिक संस्थांची नुसती संख्या वाढवून, त्यांचे जाळे वाढवून आपला जिल्हा प्रगत झाला असे म्हणणे योग्य होणार नाही तर या संस्थांतून किती विद्यार्थी देशासाठी आगेकूच करत आहे ? सेवा भावनेने एखादे व्रत हाती घेत आहे ?, सामाजिक जाणीवा त्यांना आहेत काय ?, ते देशाचे आदर्श नागरीक आहेत काय ?, त्यांना जीवनाची दिशा या संस्था देतात काय ? हे सर्व पाहणे याचे चिंतन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. यातील काही संस्था निश्चितच अपवाद आहेत परंतू असे अपवाद अधिकाधिक वाढावेत तरच तो खरा विकास ठरेल , खरी प्रगती ठरेल.

विनय वि. वरणगांवकर 

खामगांव

7588416238

१६/०३/२०२३

Article about OPS in Maharashtra

जुनी पेन्शन नवीन टेन्शन


जुन्या पेन्शनसाठी राज्याचा महसूल कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. कोणाच्या तोंडचा घास काढण्याऐवजी अधिकाधिक जनतेच्या तोंडात घास कसा जाईल या दृष्टीने विचार करायला हवा. 

14 मार्चपासून 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुने पेन्शन मिळावे म्हणून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे जनसामान्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांना पेन्शन कशाला हवे? सरकारी कर्मचारी म्हणजे काही काम करत नाही, भ्रष्टाचार करतात, कार्यालयांमध्ये फाईलींचे ढिगच्या ढिग पडलेले असतात, पगार भरपूर वाढलेले आहेत, शिक्षकांवर तर जनता नेहमीच ताशेरे ओढते. शिक्षकांना काय भरपूर पगार असतात आणि सुट्टया असतात हेच सर्वसामान्य लोकांना दिसत असते मग कशाला हवी या कर्मचा-यांना पेन्शन ? अशा बहुतांश नकारात्मक स्वरूपाच्या प्रतिक्रिया खाजगी क्षेत्रात काम करणारे , व्यापारी,  किरकोळ विक्रेते व इतर काही जण सोशल माध्यमांवर व्यक्त करीत आहेत. परंतु आपण जर सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की अनेक इमाने इतबारे काम करणारे सरकारी कर्मचारी सुद्धा आहेत. अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये तन-मन-धनाने कार्य करत आहेत. जुन्या पेन्शन विरोधात बोलणा-यांनाही याच शिक्षकांनी घडवले आहे. अनेक कर्मचारी हे केवळ वेतनावर गुजराण करणारे आहेत. त्यांच्याजवळ त्यांच्या चरितार्थासाठी केवळ वेतन हेच एकमेव आहे व त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची संपूर्ण मदार ही पेन्शन वरच निर्भर आहे. त्यांच्या वृद्धापकाळी त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी जर पेन्शन नसेल तर ते काय करतील ? आज अशी लाखो कुटुंबे आहेत की ज्यांच्यातील तरुण हे बेरोजगार आहेत व त्यांची गुजराण ही त्यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्ती वेतनावर अर्थात पेन्शनवर होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा "सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हे मिळायलाच हवे" असे मत व्यक्त केले होते. सरकारने नवीन पेन्शन योजना आणली होती परंतु नवीन पेन्शन मधून अत्यंत तुुटपुंजी , हास्यास्पद अशी रक्कम कर्मचाऱ्यांना मिळते आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत अधिक विचार करू जाता असेही लक्षात येते की राज्यकर्ते हे स्वतःचे पेन्शन मात्र सुरूच ठेवत आहे. शिवाय त्यांना जनप्रतिनिधी म्हणून ते ज्या ज्या पदांवर निवडून गेले त्या सर्वच पदांचे पेन्शन सुद्धा  मिळते. स्वतःचे पेन्शन लागू करण्यासाठी सभागृहामध्ये यांना दोन मिनिटापेक्षाही कमी अवधी लागतो. राज्याच्या तिजोरीवर भार पडेल म्हणून त्यांना सरकारी कर्मचा-यांचे पेन्शन तेवढे दिसते राज्याच्या तिजोरीवर भार हा लोकप्रतिनिधींच्या पेन्शनमुळे पडत नाही का? यावरही विचार व्हायला नको का ? तरीही लोकप्रतिनिधींना पेन्शन मिळू नये असे मुळीच म्हणणे नाही. त्यांनी सुद्धा पेन्शन घ्यावे परंतु इतर कोणाचे पेन्शन बंद करून ते घेऊ नये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राजा म्हणजे एखाद्या कुटुंबप्रमुखासारखा असतो त्याला सर्व प्रजेकडे समदृष्टीने पहायचे असते, प्रजेचे हित लक्षात घ्यायचे असते, यात बालक, तरुण, महिला, शेतकरी, वृद्ध या सर्वांचीच काळजी सरकारला घ्यायची असते. मग सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची सुद्धा काळजी व्हायला हवी. हे सर्व मुद्दे सरकारने जरूर लक्षात घ्यावे. जर राज्याच्या तिजोरीवर ताण पडतच असेल तर सभागृहात भांडण करण्याऐवजी, विविध मुद्द्यांवर विवादास्पद वक्तव्ये करण्याऐवजी सरकारचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी आपला वेळ खर्च केला पाहिजे, नवीन उपाययोजना करायला पाहिजे. परंतु मायबाप सरकारला तसे सुचत नाही एकीकडे रस्त्यांची मोठी मोठी कामे होत आहेत, मेट्रो ट्रेन होत आहेत यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत, अनेक फुकट छाप योजना मधून पैशांची उधळपट्टी होते आहे मग "सबको बाट रहे और हमको डांट रहे" अशी भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. मायबाप सरकारने वरील सर्वांबाबत सकारात्मक विचार करावा, तज्ञांची समिती नेमावी, राज्याचा महसूल कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. कोणाच्या तोंडचा घास काढण्याऐवजी अधिकाधिक जनतेच्या तोंडात घास कसा जाईल या दृष्टीने विचार करायला हवा. सर्व कर्मचाऱ्यांनी आता एकच मिशन जुनी पेन्शन असे ठरवून टाकलेले आहे. जुनी पेन्शन मिळेल की नाही म्हणून कर्मचाऱ्यांना टेन्शन आहे तर जुन्या पेन्शनमुळे खुर्ची हलते की काय म्हणून राज्यकर्त्यांना नवीन टेन्शन आलेले आहे. 

नये जगत मे हुवा पुराना 

उंच नीच का किस्सा |

सब को मिले मेहनत के मुताबिक

अपना अपना हिस्सा |

इस देश मे सुख का बराबर

हो बटवारा, यही पैगाम हमारा |

असा गत पिढीतील ख्यातनाम कवी/गीतकार प्रदीप यांच्या एका गीतातील ओळींद्वारे सरकारला हाच "पैगाम" द्यावासा वाटतो.

२३/०२/२०२३

Article about meeting of a old college friend

..आणि ब्रिटिश सोल्जर भेटला

आमची नजरानजर झाली, काही क्षण थबकलो आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो तो चेहरा मला त्वरित आठवला त्याला पण  पूर्वाश्रमीचे सर्व दिवस आठवल्याने तो सुद्धा माझ्याकडे पाहून हसला आणि मी जोरात उद्गारलो "अरे , ब्रिटिश सोल्जर ! " मग तो दिलखुलास हसला.

हा ब्रिटिश सोल्जर म्हणजे काही खरोखरचा इंग्रज सैनिक नव्हे हे सुरुवातीलाच स्पष्ट करणे संयुक्तिक वाटते. महाविद्यालयीन जीवनात तो आमचा एक सहपाठी होता. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी. मध्ये आम्ही सोबत होतो. मला स्मरते आम्ही ज्युनिअर कॉलेजला होतो तर तो सिनियर कॉलेजला. एन.सी.सी. परेडमधे मात्र आम्ही सोबत येत असू. 90 च्या दशकात खामगावात गो.से. महाविद्यालयाव्यतिरिक्त  पदवीसाठी म्हणून एकही कॉलेज नव्हते त्यामुळे मोठी विद्यार्थी संख्या होती व तशीच संख्या एन.सी.सी. मध्ये सुद्धा असे. आम्ही जरी कनिष्ठ महाविद्यालयीन असलो तरी एन.सी.सी. मुळे वरीष्ठ महाविद्यालयातील अनेक मुलांशी मित्रत्व प्रस्थापित झाले होते. या मित्रांमध्ये अशफाक, सलीम बेग, फारूक, शेख शब्बीर शेख मन्नू, अब्दुल मतीन, पठाण, फरझान हाश्मी यांसारखी अनेक मुस्लिम मुले सुद्धा होती. एक लईक नावाचा मुलगा होता त्याला सर्व लैक्या म्हणत. डोळ्यात काजळ घालणारा हसतमुख अशफाक "चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" ही कव्वाली सुरेख गात असे. त्या एन.सी.सी.च्या दिवसात परेडमध्ये, कॅम्पमध्ये मुलांमध्ये मोठे खेळीमेळीचे वातावरण असे. एन.सी.सी.च्या गणवेशात सर्वच विद्यार्थी उठून दिसत असत, त्यांचे व्यक्तिमत्व खुलत असे, व प्रभावी वाटे. गणवेशात तीच जादू आहे. त्या सा-यातच वरीष्ठ महाविद्यालयातील तो सुद्धा एक होता. गोरापान वर्ण, तपकिरी पण विरळ केस, सरळ नाक, माध्यम उंंची आणि मजबूत बांधा अशी त्याची शरीरयष्टी मला आजही स्मरते. पु.लंच्या "नंदा प्रधान" या पात्राशी जवळपास साधर्म्य साधेल असा तो त्याकाळी दिसे. काळा गॉगल घातला की त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडत असे. एन.सी.सी.च्या  गणवेशात तर तो अधिकच सुंदर दिसत असे जणू काही इंग्रज अधिकारीच. तो आमच्या सोबतच परेड करीत असे. मधल्या सुटीत आमच्याशी जुजबी बोलणे पण होत असे. पण घनिष्ट अशी मैत्री मात्र काही झाली नाही. कदाचित तो वरिष्ठ महाविद्यालयात असल्याने तसे झाले असावे. एकदा एन.सी.सी.च्या मोकळ्या वेळेमध्ये माझा हरहुन्नरी व दिलखुलास मित्र धनंजय टाले हा त्याला प्रथमच पहात होता. रुबाबदार अशा दिसणा-या , त्याला पाहून "यार तुम तो ब्रिटिश सोल्जर ही दिखते हो" असे उत्स्फूर्तपणे तो म्हणाला व तेंव्हापासून आमचा गृप त्याला 'ब्रिटिश सोल्जर" असेच म्हणू लागला तो सुद्धा त्याला हसून दाद देत असे. "आछे दिन पाछे गये" याप्रमाणे ते महाविद्यालयीन दिवस हा हा म्हणता सरले जो तो आपापल्या रोजीरोटी शोधण्याच्या कामकाजास लागला. आयुष्यात आपले इप्सित ध्येेय गाठण्यासाठी पुढे सरसावू लागला. जीवनाच्या धकाधकीत कॉलेज जीवनातील मित्र विभक्त झाले, दुरावले, आपापल्या व्यापात गुंतले. पण देव्हा-यातील दिवा विझू नये म्हणून जसे जपतात तसेच प्रत्येकच तरुण/तरुणी शैक्षणिक जीवनातील, महाविद्यालयीन जीवनातील आपल्या आठवणी जपून ठेवत असतात. हा ब्रिटिश सोल्जर सुद्धा असाच आठवणीत जपल्या गेला, कायमचा लक्षात राहिला. त्याला आम्ही  ब्रिटिश सोल्जर असेच संबोधित होतो व त्याच नादात त्याचे मूळ नांव सुद्धा जाणून घेण्याचे भान राहिले नाही. कॉलेजमध्ये हाय हॅलो होत असे. कधीकाळी  थोडे बहुत बोलणे होई. आज गो. से. महाविद्यालय सोडून 25 वर्षे झाली परंतू हा ब्रिटिश सोल्जर मात्र कधी दिसला नाही. परंतू "छोटिसी ये दुनिया पहचाने रास्ते है , तुम कहीं तो मिलोगे , कभी तो मिलोगे, तो पुछेंंगे हाल"  या गीतकार शैलेन्द्रच्या ओळींची प्रचिती परवा आली. पण शैलेंद्रने या ओळी लिहिल्या त्यावेळी जग खरेच आजच्यासारखे सोशल मिडियामुळे जसे लहान झाले तसे नव्हते. पण तरीही उपरोक्त ओळीची प्रचिती येण्याचे निमित्त घडले ते बहिणीला सोडायला म्हणून बस स्टॅन्ड वर जाण्याचे. बस मध्ये आपली जागा पटकवण्यासाठी असलेल्या खास इंडियन शैलीचा  म्हणजे खिडकीतून रुमाल टाकून जागा मिळवण्याच्या पद्धतीचा वापर करून मी जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात माझ्या बाजूला डोक्यावरील केस थोडे कमी झालेला, गोरापान हसमुख चेह-याचा व्यक्ती सुद्धा तसाच प्रयत्न करत होता. आमची नजरानजर झाली, काही क्षण थबकलो आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो. तो चेहरा मला त्वरित आठवला त्याला पण पुर्वाश्रमीचे सर्व दिवस आठवल्याने तो सुद्धा माझ्याकडे पाहून हसला आणि मी जोरात उद्गारलो "अरे , ब्रिटिश सोल्जर ! " मग तो दिलखुलास हसला. अनेक  जुन्या आठवणी निघाल्या मोबाईल मध्ये असलेले मित्रांचे फोटो एकमेकांना दाखवले, एकमेकांची विचारपूस झाली कॉलेजमध्ये जरी आम्ही सोबत होतो तरी त्याचे नाव मला तेव्हा माहित नव्हते. त्याने नंबर दिला मी नांव टाईप करतांना थोडा बावचळलो, त्याचे लक्ष माझ्या मोबाईलच्या स्क्रीनकडेच होते,  डोक्यात काही तरी खान आहे असे पुसटसे आठवत होते काय टाईप करावे म्हणून मी ब्रिटीश... ही तीन अक्षरे टाईप करताच ,"भाई तू नाम भूल गया, अकील खान लिख" असे तो म्हणाला मी तसे लिहिले. तो भुसावळला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असल्याचे कळले. तोवर आम्ही इंडियन स्टाईल ने रिझर्व्ह केलेली सिट आमच्या दोघांच्याही नातेवाईकांना मिळाली होती, बस निघाली. अकील खान उपाख्य ब्रिटिश सोल्जरशी समारोपाचा संवाद साधला, सोबत जोडलेले स्वत:च काढलेले छायाचित्र काढले. दिड तासाने आलेल्या त्या बसमधे आटापिटा करून मिळवलेल्या जागेवर बसलेल्या प्रवाशांच्या मुखमंडलावर आनंद पसरला होता तर बाहेर पुनर्भेटीमुळे आमच्या, माझ्या व महाविद्यालयीन जीवनांत प्रेमाने ब्रिटिश सोल्जर असे नांव दिलेल्या त्याच्या. प्रवाशांना घेऊन बसने स्थानक सोडले व अनेक स्मृतींना घेऊन आम्ही. 

१३/०२/२०२३

Article on the occasion of "Gajanan Maharaj Pragat Din"

 शितें वेंचती दयाघन ।



आज गजानन महाराज प्रगट दिन, विदर्भात  अनेक ठिकाणी भंडारे होतात, जेवणावळी होतात. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये समस्त भाविक गण लीन होऊन जातात. मात्र या व इतरही  कार्यक्रमात आपल्याकडून अन्नाचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे.

आज गजानन महाराज प्रगट दिन माघ सप्तमी दिनी संत गजानन महाराज शेगावी प्रगटले.

बंकटलाल आगरवाला ।होता रस्त्यानें चालला ।

त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥

याप्रमाणे बंकटलालास  ते उष्ट्या पत्रावळीवरील शिते खातांना दिसून आले.

ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।

शोधन पत्रावळीचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥

उष्ट्या पत्रावळीवरील शिते खाणारा हा कोणीतरी श्रेष्ठ संत पुरुष दिसतो आहे अशी त्याची खात्री पटली.

शीत पडल्या दृष्टीप्रत।तें मुखीं उचलुनी घालीत ।

हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥

म्हणून बंकटलालाने त्या योगिराजास चांगले भोजन आणून दिले. ते सर्व भोजन या ब्रह्मांडनायक गजानन महाराजांनी एकत्र करून भक्षण केले आणि आणि अन्न हे पुर्णब्रह्म असल्याचे समस्तांना
निर्देशित केले.

कां कीं गर्जोन सांगे श्रुती। अन्न हेंच ब्रह्म निगुती ।

"अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥

दासगणू महाराज लिखित गजानन महाराजांच्या पोथीतील  या संदर्भातील ओळी आपण नेहमीच वाचत असतो, स्मरत असतो. भक्तप्रतिपालक गजानन महाराज मंदिरात जेव्हा आपण प्रसाद भक्षण करण्यासाठी जात असतो त्या ठिकाणी सुद्धा गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते खातांनाचे चित्र आपल्याला बरेच काही सांगून जाते. संत पुरुषांनी त्यांच्या कृतीने, त्यांच्या लिखाणाने आपणास खूप काही असे मार्गदर्शन केलेले आहे परंतु आज आपण समाजात पाहतो तर अन्नाचा म्हणावा तसा सन्मान होताना दिसत नाही. आज तरुणाई जेव्हा वाढदिवस साजरी करते तेव्हा एक केक हा निव्वळ तोंडाला फासण्यासाठी म्हणून घेतला जातो. तसेच ज्याचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्याच्या अंगावर टमाटे, अंडी व इतर काही खाद्य पदार्थांची फेकफाक केली जाते आणि अन्नाला
पुर्णब्रह्म समजणा-या आपल्या देशात अन्नाचा असा नाश होताना आपण पाहतो. शिवाय आजकाल विवाह कार्यामध्ये हळदीचे कार्यक्रम सुद्धा जोरात साजरे केले जातात. पुर्वी नवरदेव, नवरीस थोडीफार हळद लावून हा कार्यक्रम होत असे. परंतु आजकाल सर्वच सणसमारंभ साजरे करण्यामध्ये मोठा दिखावा, मोठी झकपक आलेली दिसते. हळदीच्या कार्यक्रमात सुद्धा हळद खेळण्याचा एक कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित नवरदेव नवरीसह उपस्थित सर्वांना सुद्धा हळदीने रंगवले जाते आणि यात हळद या खाद्यपदार्थाचे व पाण्याचे मोठे नुकसान होताना आपल्याला दिसते. परंतु त्यात कोणालाही वावगे असे वाटत नाही. आज गजानन महाराज प्रगट दिन आहे बुलढाणा जिल्ह्यात, विदर्भाच्या काही भागात अनेक ठिकाणी भंडारे आयोजित केले जातात. या भंडा-यात मोठ्या प्रमाणात जेवणावळी होतात. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये समस्त भाविक गण लीन होऊन जातात. मात्र या सर्व कार्यक्रमात  आपल्याकडून अन्नाचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे. रामदास स्वामींनी सुद्धा
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
असे आपणास सांगितले आहे त्यामुळे या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी वाढदिवस, हळद या कार्यक्रमांमध्ये अन्नाचा नाश कसा टाळता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या पानात सुद्धा जितके लागेल तितकेच अन्न आपण घ्यायला पाहिजे. असे जर आपण केले तर आपण संत गजानन महाराज यांनी दिलेली शिकवण थोडी का होईना आचारतो आहे याचे आपणास स्वतःला समाधान वाटेल व ते गजानन महाराजांना  जास्त आवडेल. 
गजानन महाराज की जय