Click "Follow" Button below To Follow this Blog

२३/०५/२०२४

Article about kalyani nagar, Pune porsche car accident case.

 सडक पे मस्ती जान नही सस्ती 

निव्वळ तरुणांचा देश म्हणून गौरव मिरवण्यात काही अर्थ नाही. देशातील तरुण कसे आहेत याचा सद्धा विचार करणे आवश्यक आहे. पैसा आहे म्हणून मुलांना गाड्या देणे, ते कुठे जातात त्यावर लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे यामुळे पालकांवरच पुढे दुःख व संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या लेखाच्या शीर्षका सारख्या अनेक पाट्या सार्वजनिक बांधकाम विभागाने  रस्त्यांवरती लावलेल्या असतात. या पाट्या चालकाला सावध करीत असतात, वेग नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन करीत असतात. परंतु या पाट्या सामान्यतः दुर्लक्षिल्या जातात. हल्लीचे तरुण तर या पाट्या वाचण्याकडे साफ दुर्लक्ष करत असतील. शिवाय मद्यधुंद अवस्थेतील चालक पाट्या वाचण्याचे तर  सोडाच वाहन सुद्धा बेजबाबदार पद्धतीने चालवत असतात. लहान मुलांच्या हाती गाड्या देण्याचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. परवा  पुण्यात झालेल्या अपघातामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वी हिट अँड रन च्या अनेक केसेस झालेल्या आहेत, त्यातील सलमान खानची केस तर सर्वश्रुत आहे. सलमान खानने अशीच बेदरकारपणे गाडी चालवून ती फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर नेली होती आणि सलमान त्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर आलेला आहे. परवा पुण्याला विशाल अग्रवाल या बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा हा सुद्धा रात्री दोन-दोन हॉटेलमध्ये पार्ट्या साज-या करून मद्यधुंद अवस्थेत (माध्यमांवर दाखवलेल्या व्हिडिओ नुसार) कल्याणी नगर परिसर पुणे या भागातून बेदरकारपणे पोर्शा कंपनीची मोटार गाडी चालवत जात होता व त्याने दोन दुचाकीस्वारांना उडवले. त्यात एक तरुण व एक तरुणी हे मृत्युमुखी पडले. Porsche हे एका जर्मन उद्योजकांचे आडनांव असून त्याच्या कंपनीची निर्मित ही कार आहे. Porsche या शब्दाचा पोशा असा उच्चार आहे) आपल्याकडे सर्व या गाडीला पोर्शे असे म्हणतात. ही गाडी दोन सेकंदात शून्यावरून 100 असा वेग पकडू शकते. या गाडीची किंमत अडीच कोटी आहे. ही झाली या गाडीची थोडक्यात माहिती. कोट्याधीश असलेल्या विशाल अग्रवाल ने त्याच्या मुलाला ही गाडी घेऊन दिली होती. स्वतः विशाल अग्रवालला सुद्धा निरनिराळ्या गाड्यांचा छंद आहे. विशाल अग्रवालचा  मुलगा वेदांत हा 17 वर्षाचा असूनही मद्य पितो, मद्य पिऊन, RTO कडे नोंदणी न झालेली पोर्शा कार सर्व नियम धाब्यावर ठेऊन बेदरकारपणे चालवतो, म्हणजे मद्य पिण्यास तो पात्र नाही, त्यामुळे त्याच्याकडे मद्य पिण्याचा परवाना तर नसेलच, गाडी पण नोंदणीकृत नाही तरीही बेकायदेशीर कृत्ये काय करतो आणि पोलीस ठाण्यात नेल्यावर त्याला पोलीस शिक्षा म्हणून निबंध काय लिहिण्यास सांगतात, जमानत काय मिळते ? याचे तमाम जनतेला मोठे आश्चर्य वाटत आहे. असाच अपघात जर का एखाद्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय चालकांकडून झाला असता किंवा रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकाकडून झाला असता तर पोलिसांची त्याच्यासोबत वागणूक कशी राहिली असती ? असा प्रश्न पडतो. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतास वेगळा न्याय ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. या अपघातात जो तरुण आणि जी तरुणी दगावली त्यांच्या आप्तांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना करवत नाही. आज आपल्या देशात सर्वत्र गुळगुळीत आणि मोठाले रस्ते होत आहेत. परंतु त्याच प्रमाणात अपघात सुद्धा होत आहेत. समृद्धी महामार्गावर सुद्धा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात झालेले सर्वांनी पाहिले आहे. हे अपघात जर टाळायचे असतील तर वाहतूक अधिनियमाची अंमलबजावणी ही अत्यंत कठोर पद्धतीने होणे गरजेचे झालेले आहे. आज आपण पाहतो की वाहन चालक परवाना मिळण्याची पद्धत कशी झाली आहे. 1960 च्या दशकात एखाद्याला वाहन चालवण्याचा पक्का परवाना  मिळवायचा असेल तर त्याला आरटीओ वेगवेगळ्या पद्धतीने वाहन चालवण्यास लावायचे. त्याच्या वाहन चालवण्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जायचे. आज पक्का वाहन चालक परवाना मिळवतांना अशा काही परीक्षा घेतल्या जातात का? तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. केवळ स्टेरिंग वर बसून पंचवीस तीस फुटापर्यंत गाडी चालवून दाखवली की मिळाला वाहन चालक परवाना अशी पद्धत आहे. याबरोबरच पब, हॉटेल, बार हे सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. हे सुरू करण्याचे परवाने सुद्धा इतके सहज कसे काय प्राप्त होतात? पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरात पहाटे तीन-तीन, चार-चार वाजेपर्यंत पुण्यात शिकायला किंवा नोकरीच्या निमित्ताने आलेले हे तरुण काय दिवे लावत असतात ? असे अनेक प्रश्न व अनेक विचार या अपघातामुळे जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. मायबाप सरकारने  राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, आरटीओ या सर्वच विभागाकडून कायद्याची कठोर अंमलबजावणी करवून घेणे जरुरीचे झाले आहे. केवळ तरुणांचा देश म्हणून गौरव मिरवण्यात काही अर्थ नाही. देशातील तरुण कसे आहेत याचा सद्धा विचार करणे आवश्यक आहे. पैसा आहे म्हणून मुलांना गाड्या देणे, ते कुठे जातात त्यावर लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे यामुळे पालकांवरच पुढे दुःख व संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशाल अग्रवाल यांनी मोठी संपत्ती मिळवली परंतु त्या पैशांचा उपयोग वेदांत कडून चुकीचा होत होता आणि त्यामुळे वेदांतच्या गाडीखाली निरपराध तरुण मुले दगावल्या गेली. या प्रसंगावरून सर्वच तरुण वाहन चालकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की वाहन हे मर्यादित वेगानेच व मद्य प्राशन न करता चालवले गेले पाहिजे तसेच पालकांनी सुद्धा आपल्या अल्पवयीन मुला-मुलींना गाड्या देऊ नये, पोलिसांनी सुद्धा अल्पवयीन वाहन चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्याकडून दंड वसूल करून शासनाच्या तिजोरीत भर घालायला पाहिजे. तुम्ही वेगाने गाडी चालवता तेव्हा स्वतःचा तर जीव धोक्यात घालताच पण दुसऱ्यांचा जीव सुद्धा धोक्यात घालता याचे भान तरुणाईला असले पाहिजे. म्हणूनच तरुण वाहन चालकांनी आपल्या डोक्यात पक्के भरून घ्यावे की सडक पे मस्ती जान नही सस्ती.

०२/०५/२०२४

Article about maratha worrier great bajirao peahwe

 जो जीता वो बाजीराव 

सिकंदर तो विदेशी था, हम उसको याद रखते पर मुघलो को डरानेवाले, 41 युद्ध जितनेवाले पेशवा बाजीरावजी को हम याद नही रखते|

यंदाची 28 एप्रिल तारीख जवळ येत होती थोरले बाजीराव पेशवे यांचा 28 एप्रिल हा स्मृतिदिन असल्याने त्या दिवशी काहीतरी अभिवादनपर कार्यक्रम घ्यावा का ? किंवा व्याख्यान घ्यावे का? असे काहीसे वाटू लागले होते परंतु दैनंदिन कार्य व जबाबदाऱ्या यामुळे अनेक वेळा संकल्पित केलेल्या, विचाराधीन असलेल्या गोष्टी मागे पडून जातात. 28 एप्रिल जवळ येत होती तेवढ्यात माझे मित्र धनंजय टाले हे पुण्याहून आले व त्यांनी ओंकारेश्वरला जाण्याची तीव्र इच्छा प्रकट केली. मी व्यस्त असल्यामुळे त्यांनी 28 एप्रिल हीच तारीख सुचवली. त्या दिवशी रविवार पण होता. मला ओंकारेश्वर पासून 41 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या महापराक्रमी पुरुषाचे समाधी स्थळ खुणावू लागले. आमच्या ओंकारेश्वरच्या यात्रेमध्ये रितेश काळे व विशाल देशमुख हे सुद्धा सहभागी झाले. आम्ही सर्वांनी मिळून ओंकारेश्वर, रावेरखेडी आणि सियाराम बाबाजींचे भट्टयाण या स्थळांना जाण्याचे नक्की केले. सकाळी पाच वाजताच म्हणजे "पौ फटनेसे पहले" अर्थात पहाट होण्यापूर्वी. हिंदीत भल्या पहाटेस "पौ फटनेसे पहले" असे म्हणतात. ज्या सूर्यासम बाजीराव पेशव्यांचे तेज होते त्या सूर्यनारायणाची किरणे अद्याप भूमातेवर पडायचीच होती आणि आमची गाडी ब-हाणपूरच्या रस्त्याने लागली.

ब-हाणपूर, अशीरगढ किल्ला म्हणजे  "दख्खन का दरवाजा", मुघलांच्या ताब्यातील तत्कालीन मुख्य शहर, संभाजी महाराजांनी लुटलेले. अशा आठवणी मनात येत होत्या. कुठल्याही ऐतिहासिक स्थळी जातांना माझ्या मनात आपले राजे, महाराजे, सरदार, सैन्य हे धर्मरक्षणासाठी ऊन, वारा, पावसात कसे जात असतील ? जंगल, पहाडी भागातून जाणा-या अशा बिकट वाटेतून ते कसे जात असतील ?, आज आपल्याला 20 रू मध्ये कुठेही पाणी मिळते, आपल्या त्या महान पुर्व जांना सर्व सैन्य, हत्ती, घोडे, बैल यांच्या पिण्याच्या  पाण्याच्या सोयीसाठी नदी आल्याशिवाय मुक्काम ठोकता येत नसेल. असे विचार माझ्या मनात नेहमीच घोळावतात. ओंकारेश्वरच्या दिशेने आम्ही आगेकूच करीत होतो. प्रवासास लवकरच सुरुवात केल्यामुळे रस्त्याने वाहनांची वर्दळ अतिशय कमी होती. सुखकर प्रवास करून आम्ही लवकरच ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथे दर्शन झाल्यानंतर मग आम्ही रावेरखेडीला प्रयाण केले. ओंकारेश्वर ते रावेरखेडी हा 41 किलोमीटरचा रस्ता आहे. रावेरखेडीला पोहोचल्यावर आम्हाला कळले की  तिथे नुकताच बाजीराव पेशवे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होऊन गेला होता. त्या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री येऊन गेले होते. रावेरखेडीला माझी ही दुसरी भेट होती पण माझ्या समवेतच्या मित्रांची मात्र ही पहिलीच भेट होती त्यामुळे ते तिघे तर जास्त उत्सुक व उत्साही दिसत होते. आम्ही त्या अशा एकमेवाव्दितीय महान अपराजित योद्धयाच्या समाधीचे दर्शन घेतले की जो 41 मैदानी लढायांमध्ये हारला नव्हता. एकही सैनिक न गमावता बाजीरावांनी जिंकलेली पालखेडची लढाई तर आजही विदेशी इतिहासात शिकवली जाते. अशा बाजीरावांच्या समाधीच्या जवळच्याच पेशवा टी स्टॉलच्या दयाराम पवार यांनी स्वतःहून दिलेली रक्त पुष्पे बाजीरावांच्या समाधी स्थळी अर्पण करून त्यांना नमन केले नंतर आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळला.

"गंगा पुण्य कनखले, सरस्वती कुरुक्षेत्रे

ग्रामे वा अरण्ये, रेवा सर्वत्र पुज्यते"

अशा नर्मदा नदीच्या विस्तीर्ण पात्रावरून दृष्टी हटत  नव्हती. तिथून निघणार तोच आम्हाला बाजीरावांचे चित्र टी-शर्ट वर असलेले काही तरुण दिसले. माझी उत्सुकता वाढली, मी चौकशी केली असता, "जय बाजीराव, मैं संतोष तिवारी, आफ्रिकासे आया हुं |" माझी उत्सुकता आणखी वाढली अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, "मै कई सालोसे बाजीरावजी की समाधीपर उनकी पुण्यतिथी के दिन रावेरखेडी को आफ्रिका से आता हुं| वैसे मैं भिलाई से हुं|" असे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेतच्या काही तरुण व किशोरवयीन मुलांनी सुद्धा बाजीरावांचे चित्र असलेला टी-शर्ट परिधान केला होता. त्यातील मथुरेच्या एका तरुणानी मला सांगितले की आम्ही एक नवीन नारा बनवला आहे तो म्हणजे "जो जीता वो बाजीराव" त्यांनी आमच्याकडून तसे म्हणवून सुद्धा घेतले. "सिकंदर तो विदेशी था, हम उसको याद रखते पर मुघलो को डरानेवाले, 41 युद्ध जीतनेवाले पेशवा बाजीरावजी को हम याद नही रखते" अशी अत्यंत समर्पक पुष्टी त्यांनी केली. त्यांचे म्हणणे अगदी खरे होते थोरल्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार केला. भारतभर मराठा साम्राज्य प्रस्थापित केले, मुघलांना जेरीस आणले, एकही लढाई हरले नाही अशा बाजीरावांची महाराष्ट्रात मात्र नेहमीच उपेक्षा झाली आहे. बाजीरावांबद्दल अत्यल्प अशी माहिती महाराष्ट्रवासीयांना आहे. त्यांची समाधी रावेरखेडी येथे आहे हे सुद्धा अनेकांना ठाऊक नाही. परंतु त्याच वेळी देशाच्या इतर राज्यातून आलेले अमराठी तरुण मात्र बाजीरावांच्या पराक्रमाने भारावलेले असे दिसत होते. गत काही वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील थोरपुरुष, महापुरुष, लढवय्ये ऐतिहासिक पराक्रमी पुरुष यांना विविध जातींमध्ये विभागले गेले. परंतु महाराष्ट्रातील पराक्रमी लोकांबद्दल इतर राज्यातील अमराठी लोकांना मात्र नितांत आदर आहे. याचे अजून एक उदाहरण म्हणजे सावरकरांवरील सिनेमा. सावरकर हा सिनेमा हरियाणातला रणदीप हुडा काढतो आणि महाराष्ट्रातीलच काही नतद्रष्ट मात्र उगीच सावरकरांची अवहेलना करीत असतात. त्याचप्रमाणे बाजीरावांच्या पुण्यतिथीला देशाच्या इतर राज्यातून तरुण येतात परंतु महाराष्ट्रातले तरुण मात्र तिथे अभावानेच आढळतात. संतोष तिवारी यांना मी त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्याबद्दल विचारले असता त्यांनी त्यांच्या फेसबुक खात्याचे नाव "बाजीराव बल्लाळ" आहे असे सांगितले. हे ऐकून तर मी अवाकच झालो. मला त्यांच्याबद्दल अधिकच आदर वाटू लागला. श्री तिवारी फेसबुक या समाज माध्यमाचा उपयोग बाजीरावांचा महिमा, त्यांची कीर्ती जगापुढे यावी म्हणून करीत आहे हे किती कौतुकास्पद आहे, नाही का ? समाधी स्थळाचा कारभार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी काही सूचना दिलेल्या आम्हाला दिसल्या. या ठिकाणी एका आश्रमात आम्हाला चविष्ट असे बाजीराव भोजन सुद्धा मिळाले. झुणका आणि पोळी असे ते साधे जेवण मोठे रुचकर लागले. पत्रावळीवर ते भोजन करतांना मला हातावर हुर्डा खाणारे व पुढच्या मोहिमेवर जाणारे बाजीराव आठवत होते. भोजनोपरांत काशीबाई यांच्यासाठी बाजीरावांनी बांधलेल्या शिवमंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सियाराम बाबा यांच्या भट्टयाण या ठिकाणी गेलो. तपमान भरपूर होते आणि वेळ पण सकाळी ज्याचे आगमन होण्यापूर्वी आम्ही निघालो होतो त्या सुर्यास्ताची झाली होती. अंगात ताप  असतांना नर्मदा नदीत कशाची तमा न बाळगता बाजीराव पोहण्यासाठी झेपावले होते त्याच नर्मदा मायीत बाजीरावांचे स्मरण करत, त्यांना वंदन करीत आम्ही सुद्धा झेपावलो. क्षणात सर्व उष्मा दूर झाला. मासोळ्या अंग चाटून जाऊ लागल्या, नर्मदेच्या त्या थंडगार पाण्यातून बाहेर निघावे वाटत नव्हते. नर्मदेच्या त्या पाण्यामुळे  अंगी नवचैतन्य आले, थकवा लांब पळाला आणि "जो जीता वो बाजीराव" हा मंत्र ध्यानी घेऊन आम्ही  गच्छंतीचा प्रवास सुरू केला.

२५/०४/२०२४

Article about constitution and it's features

स्मरण घटनेच्या वैशिष्ट्यांचे


सध्या  सत्ताधारी व विरोधक यांच्या घटना बदलाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या निमित्ताने घटनेच्या वैशिष्ट्यांचे विशेषतः एका वैशिष्ट्याचे प्रकर्षाने स्मरण होत आहे.

खरे तर आपण सर्व शालेय जीवनात घटनेची वैशिष्ट्ये शिकलो आहोत पण तरीही शाळेत शिकलेल्या अनेक बाबींचे जीवनाच्या रहाटगाडग्यात विस्मरण होत असते. या बाबी पुनश्च आठवल्यावर मात्र अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो आणि त्या गोष्टींचा खुलासा होण्यास मदत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घटना बदलाबाबत बराच उहापोह व मोठा गदारोळ होत आहे म्हणून या पार्श्वभूमीवर स्मरण होते ते आपल्या घटनेच्या वैशिष्ट्यांचे. या निवडणुकीत भाजपाने अबकी बार 400 पार असा नारा दिला आहे व म्हणून विरोधी पक्ष काँग्रेस 400 चा आकडा हा घटनेत बदल करण्यासाठी म्हणून सत्ताधा-यांना हवा आहे असा कांगावा करीत आहे. तसे पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळात आजरोजीपावेतो कित्येक वेळा राजकीय फायदा होईल या हेतूने घटनेत बदल केले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका भाषणात घटनेत 80 वेळा बदल झाल्याचे सांगितले आहे. विरोधकांच्या घटना बदलाच्या कांगाव्यास सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास "घटनेत बदल करणार" , ही विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे असे म्हणत आहे. दोन्ही पक्षांचे दावे-प्रतिदावे हे काही असू देत. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या घटनेच्या मसुदा समिती मधील चमूने अथक प्रयत्न करून, विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून सर्वांग सुंदर, जगातील सर्वात मोठी लिखित अशी घटना आपल्या देशाला अर्पण केली आहे व या घटनेचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. या समितीमध्ये एकाहून एक बुद्धिजीवी, अभ्यासू असे सात सदस्य होते. तसेच संविधान सभेतील एकूण 289 सभासदांपैकी 15 सभासद ह्या गार्गी, मैत्रेयी या विदुषीं प्रमाणे बुद्धिमान असलेल्या हुशार महिला सुद्धा होत्या. घटना समिती, मसुदा समिती, संविधान सभा यांच्या अथक प्रयत्नातून निर्मित आपल्या घटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांबाबत विस्तृतपणे लिहायला गेलो  तर मोठा प्रदीर्घ लेख होईल म्हणून त्या वैशिष्ट्याचा थोडक्यात आढावा इथे घेऊ आणि नंतर आज घटना बदलाच्या उहापोहाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विरोधक आणि सत्त्ताधारी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपामुळे ज्या वैशिष्ट्याची विशेष आठवण झाली असे आपल्या घटनेला काळानुरूप अधिक प्रगत किंवा आजच्या भाषेत update/upgrade करता येईल अशा आपल्या घटनेच्या एका मोठ्या वैशिष्ट्याबाबत सुद्धा पाहू. 

     जगातील सर्वात मोठी व लिखित अशी आपली राज्यघटना आहे. राज्यघटनेची निर्मिती ही विविध स्त्रोतांपासून झाली आहे. लोककल्याणकारी राज्य अपेक्षित असणारी व नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करणारी तसेच नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये सुद्धा असल्याचे सांगणारी आणि मार्गदर्शक तत्वे सांगणारी, संसदीय शासनपद्धतीचा अवलंब करणारी व न्यायव्यवस्थेस स्वतंत्रता प्रदान करणारी, आणि न्यायव्यवस्थेस महत्वाचा दर्जा देणारी, आपल्या देशात ज्यामुळे प्रजेच्या हाती सत्तेची चावी आलेली आहे ती प्रजासत्ताक पद्धती असणारी अशी आपल्या घटनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. 

      या वैशिष्ट्यांशिवाय ज्या एका महत्वाच्या वैशिष्ट्याचे घटना बदलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या निमित्ताने प्रकर्षाने स्मरण होत आहे त्या विषयी थोडक्यात पाहू. घटनेचे ते वैशिष्ट्य आहे "घटनेची लवचिकता". आपली राज्य घटना ही पुरेशी लवचिक व ताठर अशी आहे. अमेरिकन राज्यघटना ही ताठर आहे त्यामुळे त्या घटनेत बदल करणे किंवा ती बदलणे हे कठीण आहे. पण आपली राज्यघटना ही स्वत: घटना निर्मात्यांनी पुरेशी लवचिक अशी बनवली आहे म्हणजे भविष्यात घटनेत काही ना काही तरी बदल करणे आवश्यक असल्यास ते करता येऊ शकतील अशी दूरदृष्टी त्यांची होती. म्हणूनच पुरेशी लवचिकता हे आपल्या राज्यघटनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. घटनेत भविष्यात बदल करावे लागतील अशी खुद्द घटना निर्मिती करणा-या कुशाग्र, तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या  बाबासाहेबांना व तशाच त्यांच्या हुशार सहकाऱ्यांना नक्कीच ज्ञात होते. मग जर पुरेशी लवचिकता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे असे वैशिष्ट्य आहे तर घटनेत बदल होतो आहे असा कांगावा करणे म्हणजे जनतेची एक प्रकारे दिशाभूल करणे असेच कृत्य आहे. तसेच घटनेत मुळीच बदल करणार नाही असे म्हणणे सुद्धा चुकीचेच नाही का ? काळानुरूप आवश्यक, सर्व जनतेस हितकारक, राष्ट्रहिताचे असे काही बदल हे होतच असतात किंवा करावे लागतात असे अनेक थोर व्यक्ती व राष्ट्रपुरुषांनी सुद्धा म्हटले आहे. असे बदल भविष्यात करावे लागतीलच म्हणूनच कदाचित आपल्या घटनेस "पुरेशी लवचिक" अशी बनवली आहे.

     विरोधक म्हणत असलेल्या घटना बदलाच्या पार्श्वभूमीवर वरील सर्व बाबींचे स्मरण झाले. त्यातही "पुरेशी लवचिक" या आपल्या घटनेच्या  महत्वपुर्ण अशा वैशिष्ट्याचे स्मरण झाले म्हणून ते वाचकांसमोर प्रकट करावेसे वाटले त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी जनतेने सुज्ञतेने, अभ्यासू पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांवर विचार करावा हेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिप्रेत आहे.

१८/०४/२०२४

Article about sand smuggling

अवैध रेती मुळे होणारी प्राणहानी कशी रोखणार?

अवैध धंदे करायचे व शासन कारवाईसाठी आले की प्राणघातक हल्ले करायचे. प्रशासनास, अधिका-यांना, कायदेशीर कारवाईला हे लोक घाबरत कसे नाही ?

काल संग्रामपूर तालुक्यात रेतीची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर चालवला आणि त्यात लक्ष्मण भिकाजी अस्वार नावाच्या कोतवालाचा दुर्दैवी अंत झाला. अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये यापुर्वी सुद्धा घडल्या घडल्या आहे व घडत आहे. नदीतून अमाप रेती अवैधरित्या काढून तिची विक्री करण्यात येते. नद्यांमधून बेसुमार पद्धतीने रेतीचा उपसा केल्यामुळे त्या नद्या संकटात आल्या आहेत आणि भविष्यात त्या नष्टही होऊ शकतात. गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे सरकारने महसूल कर्मचाऱ्यांना रेती तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार अनेक ठिकाणी तहसीलदार तथा महसूल कर्मचारी रेती तस्करांवर कारवाईसाठी जातात आणि त्यांच्यावरच संकट ओढवते. यात कुठे ना कुठे पाणी नक्कीच पाणी मुरत असते व त्यामुळे रेती तस्कर हे महसूल अधिकारी , कर्मचारी यांच्यावर थेट जीवघेणे हल्ले करतात, त्यांच्यावर गाड्या चालवतात, त्यांना धमक्या देतात. या रेती तस्करांना कायद्याचा काहीही एक धाक उरलेला नाही का ? आपल्याला कोणी काही करू शकत नाही आणि आपले काहीही होणार नाही असे त्यांना का वाटते? यामुळे नाना प्रकारच्या शंका जनमानसात निर्माण झाल्या आहेत. अवैध धंदे करायचे व शासन कारवाईसाठी आले की प्राणघातक हल्ले करायचे. प्रशासनास, अधिका-यांना, कायदेशीर कारवाईला हे लोक घाबरत कसे नाही ? महसूल विभागावर सुद्धा अनेक शंका या प्रकरणात केल्या जात आहेत. सरकारला जर रेतीचा अवैध उपसा होणे टाळायचे असेल तर निव्वळ तस्करांना पकडून चालणार नाही तर रेती खरेदी करण्यावर सुद्धा काही ना काही निर्बंध लावणे आवश्यक आहे किंवा खरेदी करणाऱ्यावर रेती वरती वाढीव स्वरूपात कर आकारला गेला पाहिजे. मध्यंतरी रेती तस्करांचे होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने स्वतः रेती विकण्याचे ठरवले आणि तसेच सुरूही केले परंतु तरीही छुप्या पद्धतीने, रात्रीच्या अंधारात रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर भरून भरून रेती विक्री केली जाते. अवैध प्रकार, तस्करी हे प्रकार अनेक व्यवसायात होतात आणि त्यावरती रोख लावण्यासाठी  कठोर कायदे निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवरती थेट ट्रॅक्टर व तत्सम वाहने चालून त्यांची हत्या करण्याची या तस्करांची इतकी हिंमत होतेच कशी काय ? त्यांना कुणाचे पाठबळ आहे हे सुद्धा उघडकीस आले पाहिजे. अनेक प्रसंगी तहसीलदार तथा त्यांचे पथक जीव धोक्यात घालून या रेती तस्करांच्या मागे धावतात जीवाची तमा  न करता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही जणांचा जीव हा हकनाक जातो त्याचे कुटुंब वाऱ्यावर येते सरकार मग त्या कर्मचाऱ्यासाठी काय करते ? त्याला काय मदत होते ? याबाबत मात्र जनसामान्यात अनभिज्ञता असते. पुन्हा दैनंदिन व्यवहार सुरू होतात. पुन्हा तीच नदी आणि तेच तस्कर इतर माणसांच्या माध्यमातून तोच अवैध धंदा राजरोसपणे सुरू ठेवतात वाळूची तस्करी होणे व त्यावर कारवाई होणे यासाठी महसूल विभागाला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची तरतूद सरकारने करायला हवी तहसीलदार / नायब तहसीलदाराला आत्मसंरक्षणासाठी बंदूक बाळगण्यास परवानगी दिली गेली पाहिजे. खाण व खनिज अधिनियमात नवीन तरतुदी करणे सुद्धा आवश्यक आहे. अशा काही तरतुदी करणे आवश्यक आहे की जेणेकरून रेती तस्कर हे महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यास धजावले नाही पाहिजे. 1980- 90 च्या दशकात रेती उपसा, गौण खनिज याकडे सरकारचे म्हणावे तसे लक्ष नव्हते आणि त्यामुळे महसूल विभाग अवैध रेती उपसाकडे किंवा गौणखनीज उपज यांकडे (हेतुपुरस्सर) कानाडोळा करीत होता आणि त्यामुळे आणि आज जेंव्हा वाळू उपसा करणा-यांवर कारवाया होतात तेंव्हा हे रेती तस्कर चवताळले आहे. या व्यवसायात अनेक गरीब मजूर आहेत ज्यांना या अवैध व्यवसायामुळे रोजगार मिळतो हा पण एक भाग आहे. एकीकडून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा  असे सरकारचे प्रेशर व कारवाई केल्यावर जीव जाण्याची भीती अशी द्विधा स्थिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्या अनुषंगाने सरकारने त्वरित एखादी विशेष मोहीम हाती घेऊन यावर मार्ग काढावा असेच महसूल कर्मचारी व जनतेला वाटते आहे जेणेकरून लक्ष्मण अस्वार सारख्या इतर कुण्या कर्मचाऱ्याचा जीव जाणार नाही. अवैध रेती उपसा करणा-या तस्करांमुळे होणारी प्राणहानी कशी रोखता येईल हा सरकार समोरचा एक मोठा प्रश्न आहे. 

०४/०४/२०२४

Article about indian freedom revolutionary Shyamji Krushna Warma

श्यामजी कृष्ण वर्मा...महान तरीही उपेक्षित

कोंबडा कितीही झाकला तरी तो दिवस निघाला की आरवणारच. तसा दिवस आता निघू लागला आहे, खरा इतिहासरुपी झाकलेला कोंबडा आता आरवू लागला आहे. नुकत्याच आलेल्या काही सिनेमांमुळे लोकांना अनेक गोष्टी कळल्या आहे.  श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतींना सावरकर सिनेमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला.

श्यामजी कृष्ण वर्मा भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक अविस्मरणीय असे नांव. परंतू तरीही अनेकांना हे नांव ज्ञात असेलच असे नाही. 22 मार्च रोजी सावरकर हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात श्यामजी कृष्ण वर्मा यांना सुद्धा दर्शविले गेले आहे. नव्हे तर श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर सिनेमात दाखवणे क्रमप्राप्तच होते कारण त्यांनी ब्रिटन मध्ये क्रांतिकारकांना राहण्यासाठी "इंडिया हाऊस" नांवाची वास्तू उपलब्ध करून दिली होती. (शालेय पाठयपुस्तकात त्यांचा इतकाच उल्लेख असतो. शिवाय त्यांची जयंती, पुण्यस्मरण पण कधी कुठे होत नाही किंवा झाल्याचे ऐकिवात पण नाही.) कोण होते हे श्यामजी कृष्ण वर्मा ? लंडन मध्ये क्रांतिकारकांना त्यांनी निवासाची सोय कशी काय करून दिली ? असे प्रश्न सावरकर सिनेमा पाहिल्यावर पडले. तत्पूर्वी त्यांच्या उपरोक्त जुजबी माहितीवर समाधान मानून घेतले होते असेच म्हणावे लागेल. पण सावरकर सिनेमा पाहिल्यावर मात्र श्यामजी कृष्ण वर्मा हे नांव डोक्यात फिरू लागले. 

सावरकर सिनेमातील श्यामजी कृष्ण वर्मा

    त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले म्हणून मग घरी उपलब्ध असलेल्या सावरकर विषयक पुस्तकात त्यांच्याबाबत काही माहिती धुंडाळली व काही आंतरजालावर (Internet) शोधली. श्यामजींचा जन्म गुजरात मध्ये मांडवी कच्छ येथे 4 ऑक्टो 1857 रोजी झाला होता. शालेय शिक्षणानंतर त्यांनी अजमेर येथे वकिली केली व सोबतच स्वतंत्रता कार्यात सुद्धा सहभाग घेतला. ते बुद्धिमान व क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांच्यावर लोकमान्य टिळक व दयानंद सरस्वती यांचा प्रभाव होता. जात्याच हुशार असल्याने त्यांनी जर्मनी, इंग्लंड येथील शैक्षणिक संमेलनात सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी इंग्लंड मध्ये "द इण्डियन सोशियोलोजिस्ट" नामक मासिक सुद्धा काढले होते. ते इंग्लंड मध्ये असतांना त्यांनी हुशार भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देऊन त्यांची इंग्लंड मध्ये राहण्याची सोय केली होती. भारतात आल्यावर त्यांनी 1905 मध्ये क्रान्तिकारक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इण्डियन होम रूल सोसायटी सुद्धा स्थापित केली होती. ते संस्कृत विषयात सुद्धा चांगलेच पारंगत होते व त्यामुळेच ते ऑक्सफोर्ड विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून सुद्धा नियुक्त झाले होते. हुतात्मा मदनलाल धिंग्रा त्यांचे आवडते विद्यार्थी होते. सावरकर यांना सुद्धा वर्मांनी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. क्रांतीकारक तरुणांना मार्गर्शन, शिष्यवृत्ती, निवासादी सोय उपलब्ध करून देत असल्याने त्यांना क्रांतीगुरू असे सुद्धा म्हणत असत. नुकतीच त्यांची पुण्यतिथी झाली. 31 मार्च 1930 रोजी त्यांचे जिनेव्हा येथे निधन झाले. 1989 मध्ये जरी त्यांचे टपाल तिकीट निघाले असले तरी त्यांच्या अस्थी जिनेव्हा येथेच होत्या. त्या नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये परत भारतात आणल्या गेल्या. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगांवी म्हणजेच मांडवी येथे त्यांचे स्मारक सुद्धा बनवले गेले ज्याचे राष्ट्रार्पण 2010 मध्ये झाले. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की बुद्धिमान, क्रांतिकारी देशभक्तांची किती अवहेलना आपल्याच देशातील नेत्यांनी स्वतंत्रता प्राप्तीनंतर केली. श्यामजी कृष्ण वर्मा सारख्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन तसेच विदेशात इंडिया हाऊस ही निवासाची सोय करणा-या महान देशभक्ताच्या अस्थी विदेशातून आणण्यास आपल्याला 73 वर्षे लागली. त्यांचे स्मारक बनवण्यास 80 वर्षे लागली. सावरकरांची मालमत्ता सुद्धा जप्त झाली होती. स्वतंत्र भारतात सुद्धा सावरकरांना अटक करण्याचे दुष्कृत्य, महापातक स्वतंत्र भारताच्या आपल्याच सरकारने दोन वेळा केले होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बाबत सुद्धा किती कमी माहिती जनमानसांत आहे. याला कारण म्हणजे स्वातंत्र्य फक्त काही लोकांमुळेच व त्यांच्याच तत्वांमुळे मिळाले हे सिद्ध करण्याचा स्वातंत्र्योत्तर काळात केलेला अट्टाहास. परंतू असे करणे, खरा इतिहास दडपून  टाकण्याचा प्रयत्न करणे हे काही चिरकाल टिकणारे नसते. कोंबडा कितीही झाकला तरी तो दिवस निघाला की आरवणारच. तसा आता दिवस निघू लागला आहे, खरा इतिहासरुपी झाकलेला कोंबडा आता आरवू लागला आहे. 370 , काश्मीर फाईल, केरला स्टोरी, सावरकर यांसारख्या सिनेमांमुळे लोकांना अनेक गोष्टी कळल्या आहे. लोक विचार करू लागले आहेत. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतींना सावरकर सिनेमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. नुकतीच वर्मा यांची  पुण्यतिथी झाली. वर्मा यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. आजच्या काळात सुद्धा अनेक भारतीय विदेशात जात आहेत परंतु त्यांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारा श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासारखा तिकडे कुणी नाही. असेल का ? असल्यास त्याला नमन. श्यामजी कृष्ण वर्मा यांना विनम्र अभिवादन.