Click "Follow" Button below To Follow this Blog

१०/०४/२०२५

Eating cake is harmful ?

केक नव्हे भाकरच खा ! 

    
केकची तर आता प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केकसाखरपुडा असो कापा केकदुकान उद्घाटन असले की लाओ रे केकअशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. 

केक हा तसा विदेशी पदार्थ पण भारतात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतात केकची मागणी गेल्या काही वर्षांपासून खुप वाढली आहे. साहेबांच्या आगमनानंतर भारतातील लोकांना  बेकरीत बनत असलेल्या मैद्याच्या पदार्थांची ओळख झाली आणि आजकाल तर बेकरीचे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जात आहे. त्यातल्या त्यात केक तर खूपच लोकप्रिय झालेला आहे. पुर्वी वाढदिवस कधी येत आणि कधी जात हे  माहित सुद्धा पडत नसे. परंतु गत काही काळापासून वाढदिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खेड्यापाड्यात सुद्धा वाढदिवसाचे मोठे स्तोम माजलेले दिसते. गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्याचे सुद्धा वाढदिवसाचे मोठमोठाले फलक लागलेले दिसतात. किशोरवयीन मुले तर वाढदिवसाचा केक रस्त्यावरच कापतांना दिसतात. भारतात वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत तशी बरीच जुनी आहे पण ती फक्त उच्चभ्रू समाजातच होती आता ती सार्वत्रिक झाली आहे. आजकाल तर वाढदिवसच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये केक कापला जातो. केकची जणू प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केक, साखरपुडा असो कापा केक, दुकान उद्घाटन असले की लाओ रे केक, अशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. भविष्यात तर "अरे केक आणा रे, आपली प्रथा आहे ती, आपले बाबा, आजोबा कापत नव्हते का !" अशी वाक्ये सुद्धा आगामी पिढी उच्चारतांना दिसेल असे म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. हिंदुत्वाचा आपण मोठा अभिमान बाळगतो पण हिंदू धर्मात हा विदेशी पदार्थ केक बेमालूमपणे कसा घुसला ? त्याची आपण कशी काय प्रथा पाडून घेतली ? हा विचारही आपल्या मनास कधी शिवला नाही किंवा कार्यक्रम साजरे करीत असतांना उपस्थितांपैकी कोणीही, "अरे केक काही आवश्यक नाही, कशाला आणता ?" असे म्हणतांना सुद्धा दिसत नाही. तसे कुणी म्हटले तरी आताची पिढी ते कितपत ऐकेल हे देव जाणे, अशीही स्थिती आहे.  बरे हल्ली हा केक केवळ खातच नाही तर तो तोंडाला सुद्धा फासतात. आजकाल तर म्हणे तोंडाला फासण्याचा वेगळा केक सुद्धा मिळतो. काय ते तोंडाला केक फासणे, काय त्या बर्थ डे बंप ! या बर्थ डे बंपमुळे तर काही मुलांचा जीव सुद्धा गेला आहे.  

        आज हे केक प्रकरण यासाठी की, मित्रांनो दक्षिण भारतात विविध आणि सुप्रसिद्ध अशा बेकरींमधून केकचे 235 नमुने गोळा करण्यात आले. या तपासणीतून धक्कादायक असे वास्तव उघडकीस आले आहे. हे केक बनवण्यासाठी जे साहित्य ( इन्ग्रेडिएंट्स ) वापरले जाते ते मनुष्याच्या प्रकृतीला हानिकारक असे आढळून आले. यामध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात उदा. अँल्युरा रेड, सनसेट येलो, टारटाझाईन हे रंग शासनाने दिलेल्या मान्यतेपेक्षाही अधिक मात्रेत टाकल्याचे आढळून आले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे या रंगांना युरोप मध्ये बंदी आहे. भारतातही या बाबतीत निर्बंध आहे पण तरीही केक व इतरही पदार्थात हे रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पिढीला जे केक आवडतात त्या लोकप्रिय अशा ब्लँक फॉरेस्ट, रेड व्हेल्व्हेट या केकमध्ये तर या कृत्रिम व हानिकारक अशा रंगांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात तर असतेच शिवाय त्यात जी साखर वापरलेली असते ती अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर असते. इथे वाचकांना तसेच तरुणाईला वैधानिक इशारच द्यावासा वाटतो की, "अशा केकच्या वा इतर असे रंग व निकृष्ट दर्जाची साखर असलेलेल्या पदार्थांच्या सेवनाने तुमची बौद्धिक व शारीरिक क्षमता तर कमी होतेच शिवाय अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारख्या असाध्य आजारास सुद्धा आपणहून आमंत्रण दिले जात आहे." तेंव्हा हे पदार्थ टाळणेच हे आपल्या हिताचे आहे. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने या अशा हानिकारक रंगांना बंदी घातली आहे. मग तरीही बंदी असलेले हे रंग आणि इतरही पदार्थ सर्रास कसे काय वापरले जात आहेत 

        दक्षिण भारतात झालेल्या या सर्वेक्षणामुळे आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. सध्या मानवी आरोग्य हे तसेही लवकर बिघडते, अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णालय दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, पुण्याचे उदाहरण ताजे आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. तेंव्हा आपण सर्वानी त्यातल्या त्यात कमी अशा हानिकारक पदार्थांचे सेवन कसे होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. लहान मुले, तरुण यांच्यात सुद्धा जागृती करणे गरजेचे झाले आहे. 

        इतिहासात लोकांना खायला भाकरी नव्हती तेंव्हा फ्रान्सच्या राणीने त्यांना "भाकरी मिळत नसेल तर केक खा !" असे एक विधान केल्याचे सर्वश्रुत आहे. ( ब्रेड मिळत नसेल तर केक खा असे ते विधान होते पण इतिहासात असे खरोखर म्हटले होते की नाही याबाबत विविध मते मतांतरे आहेत ) आजच्या धकाधकीच्या व असल्या निकृष्ट दर्जाच्या, कृत्रिम व हानिकारक घटक असलेल्या बाहेरच्या, विकतच्या पदार्थांच्या काळात सर्वांना हेच सांगावेसे वाटते की मायबापहो केक नव्हे तर आपली भाकरच खात जा ! वाढदिवसादी काही  सेलेब्रेशन करायचेच असेल तर घरीच काहीतरी गोडाच बनवत जा. 

०३/०४/२०२५

Article about telangana IT park issue.

किसी को उजाड़कर बसे तो क्या बसे....

चित्र स्त्रोत - आंतरजाल

वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन, त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग, इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ?

सध्या जगात सर्वत्र विकास कार्य मोठ्या जोरात सुरू आहे. सरकार तर विकास कार्य करतच आहे परंतु शहरीकरण सुद्धा झपाट्याने वाढते आहे. या शहरीकरणामुळे शेती कमी होत आहे, शिवाय अनेक ठिकाणी भूमाफिया जमिनीवर ताबा मिळवत आहे आणि मोठमोठ्या किमतीमध्ये घरे किंवा भूखंड विकत आहेत. अतिक्रणासाठी त्यांना नाले सुद्धा कमी पडत आहेत. शेती व वने असलेली जमीन ही रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तित होत असल्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावर सुद्धा होतो, पर्यावरणाचा -हास होतो. अनेकदा जंगली जनावरे शहरात आल्याच्या बातम्या वाचनात येतात. परवाच मुंबईला एक लांडगा आल्याचे वृत्त धडकले होते. वन्य प्राण्यांची हक्काची जमीन ही बळकावली जात असल्यामुळे त्यांचे रहिवासी क्षेत्र घटत आहे आणि  त्यामुळेच ते शहरांमध्ये घुसत आहेत. 

    हा सर्व ऊहापोह यासाठी आहे की, तेलंगणाच्या हैदराबाद विश्वविद्यालय (HCU) परिसरामध्ये आयटी पार्क विकसित करण्याची योजना आहे. त्या योजनेच्या विरोधात हैदराबाद विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि सरकारने त्यांना अटक करून पुन्हा सोडून दिले.  हैदराबाद विश्वविद्यालयाच्या लगत कांचा गचिबोवली ही चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती (floura fauna) आणि विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती वास्तव्य करतात. यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, हरणे तसेच इतर अनेक वन्यजीव सुद्धा वास्तव्य करतात. आता नेमके याच जागेवर नवीन आयटी पार्क होणार आणि या कामासाठी म्हणून गेल्या सोमवारी तेलंगणा सरकार तिथे खोदकाम सुरू करणार होते परंतु मोठमोठ्या मशीन (JCB) तिथे पोहोचल्यावर विरोध सुरू झाला. हा विरोध मुख्यत्वे करून विश्वविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या परिसरात  पर्यावरणासाठी काम करणारी वाटा फाऊंडेशन ही संस्था करत आहे. आयटी पार्क होणे, उद्योग प्रस्थापित होणे हे जरी वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून चांगले असले तरी त्यासाठी वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग , इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ? या पृथ्वीवर केवळ मनुष्याचा अधिकार नाही तर ही ईश्वराने रचलेली सृष्टी आहे आणि यावर मनुष्यासोबतच इतर चराचरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तेलंगणा सरकारला किंवा इतर कोणत्याही सरकारला उद्योग व्यवसायासाठी म्हणून जर जागा लागत असेल तर ती केवळ मोठ्या शहरालगतच न घेता वेगवेगळ्या छोट्या शहरात विभागून घेतली तर विकासाचा प्रादेशिक समतोल सुद्धा साधला जाऊ शकतो. मोठमोठ्या शहरांमध्येच उद्योगधंदे आणल्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम, गुन्हेगारी, झोपडपट्ट्या, अस्वच्छ वस्त्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच सर्वच ठिकाणच्या नेत्यांनी उद्योग व्यवसाय हे एकाच ठिकाणी केंद्रित न करता विविध शहरांमध्ये स्थापित होतील अशी पावले उचलली पाहिजे आणि त्यासाठी उजाड जमिनीचा वापर केला पाहिजे. शेती योग्य जमीन, वनांची जमीन यावर जर सरकारच्या किंवा बिल्डर लॉबीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली जाऊ लागली तर वन्यजीव व इतर प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे काय होईल? आपले जीवनचक्र कसे चालेल? भारतातल्या सर्वच संत मंडळींनी आपल्याला वनचरे ही आपली सोयरे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्यांची चिंता करायलाच पाहिजे. मोर तर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, काही वर्षांपुर्वी पंतप्रधान मोदी यांचा मोरांसोबतचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांवर झळकला होता. राष्ट्रपती भवन तसेच दिल्लीतील अनेक सरकारी निवासस्थानाच्या परिसरात मोरांचे वास्तव्य आहे. मग अशा या तेलंगणातील मोरांच्या हक्काच्या जागेवर  बुलडोझर कसे काय फिरणार? ही जमीन 1975 पासून सरकारी जमीन असल्याचे म्हटले आहे परंतु 2022 मध्ये सरकार जवळ या जमिनीची कागदपत्रे नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे आणि आगामी काही दिवस तिथे विकास कार्यास सुरुवात करण्यास स्थगिती दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या जमिनीमुळे विकास होणार आहे आणि रोजगार निर्माण होणार आहे असे म्हटले आहे आणि या विद्यार्थ्यांना कोणीतरी चिथावणी दिली असल्याचे म्हटले आहे.  

  तेलंगणा सरकार वनांची जागा, ज्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी तसेच इतर वन्यजीवांचे वास्तव्य आहे असे त्यांचे घर नष्ट करून त्या जागेवर त्या जागेवर आयटी पार्क उभारत आहे या पार्श्वभूमीवर त्यांना हेच म्हणावेसे वाटते की 

किसी का घर उजाडकर बसे तो क्या बसे 

किसी को रुलाकर हंसे तो क्या हंसे ?

✍️विनय वि. वरणगांवकर©

03/04/25

आभार - विनय नंदनपवार

२७/०३/२०२५

Article about statements of leaders on history

 इतिहास मत पूछो ! 

इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही  दिवसांत तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात संदर्भहीन भाष्ये करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या लेखाचे जे शीर्षक आहे ते वाक्य सतत आठवत आहे. माणसाच्या स्मरणात काय राहील काही सांगता येत नाही. या वाक्याचे सुद्धा तसेच आहे. माझा ज्येष्ठ बंधू कनिष्ठ महाविद्यालयात असतांना त्यांना संगारे सर इतिहास शिकवत असत. मी सुद्धा संगारे सरांचा विद्यार्थी राहिलेलो आहे ते इतिहास खूपच चांगला शिकवत असत. तर एकदा माझ्या ज्येष्ठ बंधूच्या इतिहासाच्या पिरेडला कुणीतरी विद्यार्थ्यांनी संगारे सर येण्याच्या आधीच फळ्यावर "इतिहास मत पूछो" असे लिहून ठेवले होते. सर आल्यावर त्यांनी त्या लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मी एकदा हे वाक्य एका ॲटोच्या मागे लिहिले असलेले सुद्धा पाहिल्याचे मला स्मरते. काही लोक भेटल्यावर अनेक गोष्टींची विचारणा, नसत्या चौकशा करत राहतात या उद्देशातून खरे तर हे इतिहास मत पूछो वाक्य म्हटले गेलेले आहे. पण आपल्या भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सतत ऐतिहासिक घटना, महापुरुष, खलनायक यांच्याबद्दल जी विधाने केली जातात त्यावरून हे  शीर्षकातील वाक्य नसती वक्तव्ये करणा-यांना उद्देशून म्हणावेसे वाटते. 

   खरे तर इतिहास आपल्याला बरेच काही शिकवत असतो. इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही दिवसांमध्ये अनेक तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्ये करीत आहेत. या भाष्यांमुळे काही थोर पुरुषांचा अपमान होत आहे तर काही क्रूर पुरुषांचा उदो उदो होत आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्रे यांबद्दल इतके बोलले जात आहे की जणू काही ही वक्तव्ये करणारी मंडळी तज्ञ इतिहासकार किंवा पुरातत्व तज्ञच आहे. माझ्या मागच्या छावा या चित्रपटासंबंधीत लेखात मी भाष्य केले होते की, यांना एवढेच जर का इतकेच इतिहास प्रेम असेल तर मग त्या इतिहासातील पात्रांचे गुण यांनी आपल्या अंगी बाणवायला नको का ! पण तसे मात्र आढळून येत नाही. कोणीही उठते आणि काहीही बोलून जाते परवाच काँग्रेसचे हुसैन दलवाई यांनी छ. संभाजी राजांना जी शिक्षा झाली ती शिक्षा मनुस्मृती नुसार झाली असे बेलगाम वक्तव्य केले. प्रत्यक्षात मनुस्मृती मध्ये देहदंडाबाबत काहीही सांगितलेले नाही असे तज्ञ मंडळी सांगतात. ही नाहक वक्तव्ये करणारी माणसे एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाचा रोष ओढवून घेतात, दुस-या समाजाला नाराज करून लोकशाही, संविधान यांचा सर्रास अपमान करतात. यामुळे सामाजिक एकोपा भंग पावतो. विनाकारणची उपटसुंभ वक्तव्ये करण्यापेक्षा राज्यातील प्रश्न, देशातील प्रश्न, प्लास्टिक निर्मूलन, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न यांबाबत भूमिका मांडायला नको का ? अनेक शहरात तर पाण्याची समस्या वर्षांनुवर्षांपासून तशीच आहे. इतिहासामध्ये जे काही चांगले घडले त्याचा अंगीकार सर्वांनी करायला पाहिजे तसेच जे धर्मांध, क्रूर, परकीय राजे होते त्यांचा सन्मान हा मुळीच करू नये. उगीच तो आपल्या समाजाचा होता म्हणून चांगलाच होता अशी भावना वृद्धिंगत होऊ देऊ नये. चांगल्या,  देशाभिमानी, प्रजाहितदक्ष अशा ऐतिहासिक पात्रांकडून,  घटनातून  काहीतरी बोध घेत घ्यावा. रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल खालील ओळी लिहिल्या आहेत.

 शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
समर्थ रामदास स्वामींच्या उपरोक्त ओळींप्रमाणे सांप्रत सर्वच नेते, प्राध्यापक, बुद्धीवादी यांनी इतिहासाची पाळेमुळे न  शोधता किंवा संदर्भ नसलेल्या गोष्टींबद्दल विधान करणे सोडून देऊन छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे, बाजीराव पेशवे , महाराणा प्रताप, छत्रसाल अशा थोर पुरुषांविषयी तारतम्य ठेवून वक्तव्ये करावीत. ते कसे होते ते बघावे, त्यांचे गुण घ्यावे, त्यांचा पराक्रम पाहावा. कोणीही येतो आणि छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल आधार नसलेली वक्तव्ये करून मोकळा होतो आणि मग शासन, जनता, माध्यमे हे सर्व त्यात विषयाभोवती घुटमळत राहतात, राजकारण विकास सोडून विनाकारण केलेल्या संदर्भहीन वक्तव्यांभोवती फिरत राहते. शिवाय नवीन पिढी, तरुण वर्ग संभ्रमात पडतो की, नक्की खरा इतिहास तो होता तरी काय? त्यामुळे जनतेने सध्याच्या तथाकथित नेत्यांच्या, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या इतिहासाबद्दलच्या ऐतिहासिक संदर्भ, आधार नसलेल्या विधानांकडे दुर्लक्ष करून खरा इतिहास, घटनांचा संदर्भ असलेली पुस्तके  वाचावीत. तसेच तमाम उपटसुंभ व आधारहीन वक्तव्ये करणाऱ्या लोकांना हेच म्हणावेसे वाटते की , विनाकारण इतिहास मत पूछो !
जे ज्ञात असेल व जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वक्तव्ये करावीत. उगीच कोणी काहीही विचारले नसतांना काहीही पिल्लू सोडून देऊ नये. 
अर्ल चेस्टरफिल्ड याने म्हटलेच आहे की, 
History is but a confused heap of facts.

२०/०३/२०२५

Article about Chhaava cinema

छावा , भिकार नव्हे तर सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट?

तीन टक्के समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर  इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे.

एका वृत्तपत्रात नुकताच प्रदर्शित झालेला व लोकप्रियतेचे उच्चांक गाठत असलेला छावा हा चित्रपट कसा भिकार आणि दिशाभूल करणारा आहे या आशयाचा एक दीर्घ लेख वाचनात झाला. या लेखात स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका कशी चांगली होती आणि छावा हा चित्रपट कसा वाईट आहे याचा ऊहापोह केल्या गेला होता. खरे तर चित्रपट वाईट आहे हे सांगतांना लेखकाने चित्रपटाचे संकलन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय व कथानक यामधील त्रुटी यांचा उल्लेख करणे आवश्यक होते पण त्यावर मात्र लेखात काही भाष्य केलेले नाही. त्या ऐवजी लेखकाने महाराष्ट्रातील तीन टक्के समाज व छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूस अनाजीपंत व इतर हेच कसे जबाबदार होते हे स्पष्ट करण्याचा अतोनात प्रयास केलेला दिसतो. लेखकानी शिर्के यांनी छ. संभाजी राजांना पकडून दिले याचे काही पुरावे नाही असे म्हटले आहे तेव्हा लेखकाला असे विचारावेसे वाटते की त्यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांनी छ. संभाजीराजांचा घात केला तर त्याचे काही पुरावे लेखकाजवळ आहेत का ? असल्यास मग ते संदर्भ का दिले नाही ? आज-काल महाराष्ट्रामध्ये विशेषतः 1 सप्टेंबर 1990 नंतर महाराष्ट्रातील तीन टक्के समाज म्हणजेच ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेतांना, ताशेरे ओढतांना काही तथाकथित नेते व काही पत्रकार, संपादक दिसतात. या समाजात बुद्धिवादी व शांत वृत्तीचे लोक असल्यामुळे कोणी विशेष काही विरोध करत नाही, आंदोलने वगैरे होत नाही त्यामुळे या समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर आज आपल्या देशाला इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे. परंतु जे स्वतःला निर्भीड नि:पक्ष वगैरे मोठी मोठी बिरूदे लावतात आणि एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करतात हे पत्रकारितेच्या माध्यमातून अशोभनीय असे आहे असे येथे नम्रपणे सांगावेसे वाटते. इतिहासातील चुका तत्कालीन एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे आजच्या समाजाला दोषी धरणे यापेक्षा ऐतिहासिक थोर पुरुषांमध्ये जे गुण होते ते अंगीकृत करणे, त्या गुणांचा प्रचार आणि प्रसार करणे हे खरे तर वृत्तपत्रांनी करायला पाहिजे परंतु "ये जो पब्लिक है ये सब जानती है" पब्लिकला सगळे माहित असते आणि त्यांच्या सगळेच स्मरणात सुद्धा असते. त्यांना महाराष्ट्रातील बड्या वृत्तपत्रांची मालकी कुणाकडे कशी आली हे पण स्मरणात असते शिवाय कोण लोक कोणत्या गुन्ह्यातून सहिसलामत कसे बाहेर पडले हे सुद्धा माहीत असते. सतत एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करून सवंग प्रसिद्धी प्राप्त करणे व आपल्या व आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवणे हे कितपत योग्य आहे? लेखकांनी त्यांच्या लेखात अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजावर मोठे ताशेरे ओढलेले आहे आणि छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू तुकाराम महाराजांचा मृत्यू याचे खापर सुद्धा ब्राह्मण समाजावरच फोडण्याचा प्रयत्न केला आहे पण औरंगजेबाने छ. संभाजी राजे आणि कवी कलश यांना हाल-हाल करून मारले त्याबद्दल मात्र काहीही भाष्य केलेले नाही. छावा चित्रपट वाईट कसा आहे हे सिद्ध करण्यापेक्षा लेखकाने ब्राह्मण समाजावरच तोंडसुख घेतले आहे. 

शेवटी म्हणणे हेच आहे की, सतत ब्राह्मण समाजावर ताशेरे ओढणे , तोंडसुख घेणे हे सोडून पत्रकार, संपादक अर्थात वृत्तपत्रांनी वर्तमान मुद्दे , समस्या या प्रकट कराव्या हेच इथे विनम्रपणे सांगावेसे वाटते.

तसेच हे सुद्धा सांगावेसे वाटते की, छावा हा सिनेमा भिक्कार आणि दिशाभूल करणारा नसून अभिनय, तंत्रज्ञान, चित्रीकरण, गनिमीकावा दृश्ये इ दृष्ट्या सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट आहे.

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 


१३/०३/२०२५

"मोठी विहीर"...श्रीकांत भुसारी यांच्या लेखाच्या निमित्ताने

खामगांवची मोठी विहीर 

सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ?

दिनांक 11 मार्च रोजी आमचे मित्र पत्रकार, समाजसेवक तथा पर्यावरणप्रेमी श्रीकांत भुसारी यांचा "आणि मोठी विहीर बोलायला लागली.... मला मोकळा श्वास घेऊ द्या ना"  हा लेख वाचनात आला आणि अनेक विचार मनात घोंगावू लागले. मोठी विहीर ही जवळपास सर्वच खामगावकरांना परिचित आहे. खामगावकरच नव्हे तर पंचक्रोशीतील इतर गावकऱ्यांना सुद्धा ही मोठी विहीर परिचित आहे परवाचीच गोष्ट मी बालाजी प्लॉट भागातून जात असतांना एका सत्तरीतल्या व्यक्तीने मला एका दवाखान्याचा पत्ता विचारला मी त्याला पत्ता सांगत असतांना मध्येच "म्हणजे मोठ्या हिरी जवळ का भाऊ" असे ते गृहस्थ म्हणाले "अगदी बरोबर काका , तिकडेच जा , तुम्हाला सापडेल दवाखाना" मी म्हटले. यावरून सहज लक्षात येते की त्या ग्रामीण भागातून आलेल्या मनुष्याला मोठी विहीर माहीत होती. ती आहेच खूप जुनी. या विहिरीचा विचार करतांना माझ्या डोळ्यासमोर नेहमी चित्र तरळते की इंग्रजांच्या काळात कोर्टासमोर शेती असेल, त्यात ही मोठी विहीर असेल, या विहिरी जवळच जांभळाच्या भल्यामोठ्या झाडाखाली ( भाटे वकिलांच्या घरासमोर ) सुद्धा एक लहान गोड पाण्याची विहीर आहे. या दोन्ही विहिरींनी तेंव्हा लगतच्या शेतातील पिकांना, परीसरातील  मनुष्यांना, जनावरांना जीवन दिले असेल. पुढे कोर्टासमोरच्या सर्व जागा तत्कालीन अधिवक्त्यांनी घेतल्या आणि मग या भागात वस्ती वाढली. अगदी काही वर्षे अलीकडेपर्यंत ही विहीर चांगल्या अवस्थेत होती. पण हळू-हळू ही विहीर खराब होऊ लागली. विहिरीवर जाळी लावलेली असूनही सुशिक्षित भागातील म्हणजे सिव्हील लाईन भागातील या विहिरीत निर्माल्य, कचरादी टाकले जाऊ लागले आणि या विहीरीची दुर्दशा होत गेली. माझ्या स्मरणानुसार 2002 च्या खामगांवच्या भीषण पाणी टंचाई काळात या विहिरीवर मोटार बसवून तात्पुरते नळ लाऊन पाणी पुरवठा केला गेला होता आणि त्या जल संकटाच्या काळात हीच माय माऊली मोठी विहीर अनेकांची तारणहार झाली होती. अशी ही आमची मोठी विहिर मी सर्वात प्रथम पाहिली  तेव्हा तर माझ्या बालदृष्टीला खूपच मोठी वाटली होती. मला स्पष्ट आठवते मी त्या विहिरीत तेव्हा डोकावून पाहिले होते. आजही कोणतीही विहीर दिसली की त्या विहिरीत डोकावून पाहण्याची मला का कोण जाणे पण इच्छा होत असते आणि मी पाहतोच.  मी अनेक लोकांना सुद्धा विहिरीत डोकावून पुढे जातांना बघितलेले आहे. लोक विहिरीत डोकावून पाहून मग पुढे जातात ते असे का करतात ? कारण विहिरीतले पाणी पाहिले की, "चला पाणी आहे बुवा"  असा त्यांच्या मनाला दिलासा मिळत असावा. शेवटी मनुष्याला पाहिजे तरी काय असते ? तो सर्व उपद्व्याप करतो तरी कशासाठी ?  तर अन्न पाण्यासाठीच आणि म्हणूनच जीवनावश्यक ते पाणी विहिरीत आहे की नाही ते पाहण्यासाठी विहिरीत डोकाऊन पाहण्याची सवय अनेकांना असते. बालपणी मी त्या मोठ्या विहिरीत डोकावून पाहिले होते तेव्हा मला स्पष्ट आठवते की नितळ पाणी आणि त्या पाण्यात आकाश आणि ढगांचे प्रतिबिंब दिसत होते. पुढे मग ही विहीर शिकवणीला वगैरे जातांना अनेकदा पाहण्यात आली. कधीकाळी त्यात मुलांना पोहतांना सुद्धा पाहिल्याचे स्मरते आणि पुढे चांगले दिवस पाहिलेल्या याच विहिरीची अवस्था अत्यंत खराब झालेली पाहण्याचे दुर्भाग्य सुद्धा माझ्या नशिबी आले. 

     आज देशात विकास कामांचा झपाटा लागलेला आहे रस्ते निर्माणाचा वेग अतिशय जोरात आहे परंतु हा विकास जसा जरुरी आहे तसेच जुने जलस्र्तोत टिकवून ठेवणे सुद्धा जरुरी आहे. फडणवीसांनी तशी योजना सुद्धा राबवण्याचे सुतोवाच केले आहे. मोठ्या विहिरीजवळून सुद्धा सिमेंटचा रस्ता निर्माण होत आहे. वाढती वाहन संख्या त्यामुळे वाढलेली वाहतूक यामुळे रुंद रस्ते आवश्यकच आहे परंतु मनुष्याला जगण्यासाठी जल, अन्न आणि प्राणवायू, तसेच चांगले बोलणे, वागणे यांची आवश्यकता आहे. या अनुषंगाने संस्कृत मधील एका सुभाषिताचे स्मरण होते. 

पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते'

अर्थात,  पृथ्वीवर जल, अन्न, आणि चांगले बोलणे अशी तीन रत्ने आहेत , परंतू मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला  रत्न संबोधतात. 

     आता नवीन रस्ता विहिरी जवळून जाणार आहे , विहिरीचे काय होणार माहित नाही ? पण बालवयापासून ही विहीर बघत आलो आहे त्यामुळे चिंता वाटते. भुसारी यांनी त्यांच्या लेखात खूप छान लिहिले आहे की , "माय म्हातारी झाली म्हणून मायच्या छातीवर पाय देऊन तिचा श्वास कोंडून केलेली प्रगती आम्हाला कशी काय लाभेल ?  हे वाक्य वाचल्यावर मला सुद्धा लिहायची प्रेरणा झाली. खामगांव शहरात तर दोन मोठ्या माय आहेत. एक मोठी देवी आणि दुसरी ही मोठी विहीर. त्यामुळेच शहरातील, परिसरातील अनेकांना सुद्धा चिंता वाटत आहे. विकासाच्या आड कोणी नाही परंतू आपल्या पूर्वजांनी दिलेले हे जलस्त्रोत टिकवून ठेवणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. मागे माहूर शहरात एक जुनी विहीर पुनश्च उपयोगात आणली गेली. आपल्या मोठ्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होत गेल्यास आपोआप ती सुद्धा पुर्वीसारखी  शुद्ध होईल. नुकताच जिजामाता मार्ग परीसरातील अशाच एका जुन्या विहिरीतील पाण्याचा राजीव गांधी उद्यानातील झाडांना पाण्यासाठी उपयोग झाला. मोठी विहीर वाचवण्यात, या विहिरीतून मागे एकदा पाणी पुरवठा करण्यात मोठी विहीर भागातील तरुण, नागरीक यांचे सुद्धा मोठे योगदान आहे अशी माहिती नुकतीच मिळाली तो  उल्लेख इथे करणे क्रमप्राप्त आहे व त्यांचा तो प्रयत्न स्तुत्यच आहे.

     मोठी विहीर ही पक्क्या पाण्याची विहीर आहे. मोठ्या देवी प्रमाणेच ती सुद्धा खामगांवकरांना जिव्हाळ्याची आहे. जीवनदायीनी  आहे. ती राहावी, तिची अवस्था चांगली राहावी हेच नागरिकांना वाटत आहे. सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ? मायबाप सरकारने जनभावना, जुने जलस्त्रोत, विकास या सर्वांचा सुवर्णमध्य साधून ज्या पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी जागोजागी विहिरी खोदल्या त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षात योग्य काय ते करावे हीच सर्व नागरीकांची  मनीषा आहे.  

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 

०६/०३/२०२५

Article on the occassion of World Wildlife Day and PM Modi visit to Vantara, animal rescue center, Jamnagar Gujrat.

मोदी, वनतारा आणि लहान वन्यजीव ? World Wildlife Day Special 

मोदी यांची वनतारा प्रकल्पास भेट आणि जागतिक वन्य प्राणी दिवस या अनुषंगाने 
रानससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट) असे  लहान वन्यजीव लुप्त होण्याच्या मार्गावर का आहे ? यांच्या शिकारी का व कशा होत आहे ?, कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात. 

दिनांक 2 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी जामनगर गुजराथ येथील वनतारा या उद्योगपती अंबानी यांच्या हजारो एकर परिसरात बनवलेल्या वन्यजीव उपचार. संवर्धन, संरक्षण प्रकल्पाचे उद्घाटन केले. 3000 एकरच्या रिलायंस रिफायनरीच्या परिसरात असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मानवी वस्तीत सापडलेल्या, जखमी झालेल्या तसेच ज्यांना उपचाराची गरज आहे अशा वन्य प्राण्यांवर उपचार केले जातील अशी सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून अंबानी करणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे वन्यजीव प्रेम सर्वश्रूत आहे. भारतातून चित्ते लुप्त झाले होते ते आणण्याचे कार्य मोदी यांच्याच कारकिर्दीत झाले. आता या आणलेल्या चित्त्यांची नवीन पिढी सुद्धा तयार झाली आहे. यापूर्वी सुद्धा मोदी यांची वन्यजीव, जंगल भेट, मोरांना खाऊ घालणे या प्रकारची चित्रे, चलचित्रे अनेकदा प्रसारित झाली आहेत. परवापासून मोदी यांच्या वनतारा भेटीच्या रील्स समाज माध्यमांवर लोकप्रिय होतांना दिसत आहे. वनतारा हा अंबानी यांचा वन्यजीव प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा आहे. 

    या भारतात अनादी अनंत काळापासून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण दिली गेली आहे. कण्व ऋषींची कन्या शकुंतला ही सुद्धा जखमी , अनाथ अशा हरणांच्या शावकांची देखभाल आश्रमात करीत असल्याचे महाकवी कालीदास यांच्या " अभिज्ञान शाकुंतलम" या ग्रंथात वर्णन आहे. चक्रधर स्वामींच्या मांडीवर वाघांची पिले येऊन बसत. भारतात वन्यजीव वा पाळीव प्राणी यांच्यावरील  प्रेमाचे कित्येक दाखले देता येतील  पण पुढे आधुनिक काळात भारतातून इंग्रजांच्या गच्छंतीपुर्वी मुघल सम्राट व इंग्रज यांनी भारताच्या समृद्ध जंगलातून वारेमाप शिकारी केल्या. शिकार करणे म्हणजे तत्कालीन मनोरंजनाचे साधन होते, एक खेळ होता. अनेक भारतीय राजे-महाराजे शिकारीसाठी म्हणून दूर-दूर जात, जंगलातच मुक्काम ठोकत. शिकार झाली की वाजत गाजत गावात येत व मोठ्या हौशेने वन्यप्राण्यांचे मुंडके आपल्या दरबारात लावत. त्यांचे कातडे आसन म्हणून वापरत. अशाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारींमुळे पट्टेदार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. अगदी गत महिन्यात सुद्धा चंद्रपूर जंगलात एक वाघांचा शिकारी पकडल्या गेला. चीन पर्यंत त्याचे धागे दोरे जुळले आहेत. यावर उपाय योजना म्हणून वाघांचे संवर्धन, टायगर प्रोजेक्ट निर्माण झाले. शिकारीवर बंदी आणली गेली, अभयारण्ये निर्माण केली गेली. जंगल कायदा मात्र तोच इंग्रजांनी तयार केलेला. अनेक मोठ्या जीवांचे संवर्धन झाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल, हरीण व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या एवढी वाढली की, शहरात बिबट व अस्वल घुसू लागली तर हरणे व रोही शेतक-यांची डोकेदुखी झाली. परंतू हे घडण्याचे कारण सुद्धा मानवच आहे कारण ज्या जमीनीवर पुर्वी वन्यजीवांचा हक्क होता त्या जमिनीवर आता मानवाने कब्जा केला आहे. त्यांच्याच जमिनीवर ते आले की आपल्याला ते आपल्या हद्दीत घुसले असे वाटते. कर्नाटकातील दोडामार्ग येथील हत्तींच्या मार्गात मानवी वस्त्या, शेती झाल्याने त्यांच्या पुर्वीच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवामुळे मग त्यांना निर्घुणपणे मारण्याच्या घटना सुद्धा घडतात. भारतात कितीतरी एकर जमीन जंगलांनी व्यापली आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त वन जमीन आपल्या विदर्भात आहे. परंतू निव्वळ जंगले असून चालणार नाही तर तेथील वन्यजीव संपदा सुद्धा टिकली पाहिजे ती टिकण्यासाठी सरकारसोबत जनतेला, वन्यजीव प्रेमींना सुद्धा अग्रेसर व्हावे लागेल. 

    03 मार्च हा दिवस "जागतिक वन्य प्राणी दिन" म्हणून साजरा केला जातो. वनतारा प्रकल्पास मोदी यांची भेट तसेच जागतिक वन्य प्राणी दिन या औचित्याने इथे असे निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की, वनविभाग व सरकार यांचे लक्ष हे केवळ मोठ्या वन्यजीवांच्या संवर्धनाकडेच असल्याचे दिसते. एकीकडे वाघबिबटअस्वलहरीणरोही यांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे मात्र रानससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट)  हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा होत आहे ? , कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठीजैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे लहान वन्यजीव नाहीत का तर लहान वन्यजीव सुद्धा आवश्यकच आहे परंतू केंद्र व राज्य सरकारचे मात्र लहान वन्यजीव संवर्धनाकडे मात्र  लक्ष नाही असे जाणवते. जंगल भ्रमंतीस गेल्यावर रानससा मुळी दिसतच नाही किंवा कुणाला दिसल्याचे ऐकीवात येत नाही. जंगल भ्रमंती करून आल्यावर समाज माध्यमांवर लोक जे फोटो पोस्ट करतात त्यात कधीही रानससा, साळीन्दर, टोयी (लहान पोपट ) तितर यांचे फोटो शेअर केल्याचे दिसत नाही. वन्यजीवांची जेंव्हा शिरगणती होते त्यात सुद्धा या प्राण्यांची संख्या दिलेली दिसत नाही. वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिकारी व दुर्लक्ष यामुळे आज चित्त्यासारखा चपळ, तेज, सुंदर प्राणी भारतातून केंव्हाच लुप्त झाला होता परंतू सरकारने आता काही चित्ते आफिकेतून आणले आहेत.  त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आज कित्येक फुलपाखरांच्या जाती लुप्त झाल्या आहेत.

 आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त लहान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सुद्धा पाऊले उचलली  गेली पाहिजेवन्यजीवप्रेमींनी सुद्धा यावर विचार करायला हवा.


दिनांक 03/03/2022 रोजी याच विषयावर लिहिलेल्या लेखाची ही नवीन आवृत्ती.


टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापर करू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 

२७/०२/२०२५

हॅप्पी मराठी डे


मराठी साहित्य समाज माध्यमातून अधिकाधिक प्रसारित करायला हवे हेच आज सांगावेसे वाटते. अन्यथा मग "हॅप्पी मराठी डे" सारखे इंग्रजाळलेले मराठी ऐकण्याचा, बोलण्याचा, वाचनाचा नाईलाजास्तव  सराव करून घ्यावा लागेल.

या आधीचा लेख हा 17 जानेवारीला लिहिला होता परंतु त्यानंतर विविध कामांमध्ये व्यस्त झालो आणि महिनाभर काही लेखन झाले नाही. खरे तर रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, "दिसामाजी काहीतरी लिहीत जावे" यानुसार  लिहायला तर पाहिजे होते पण शक्य झाले नाही. आज मराठी भाषा गौरव दिन आहे असे समाज माध्यमांवर आलेल्या संदेशांमुळे लक्षात आले आणि  आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने आजपासून आपल्या लिखाणकामाचा शिरस्ता पुनश्च नियमित करावा असे मनात आले आणि लिहायला बसलो. 

    अनेक थोर संतांची परंपरा लाभलेल्या, साहित्यिकांची मांदियाळी असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठीची आता या लेखाच्या शीर्षकाप्रमाणेच गत झालेली दिसते. "माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" असे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आणि मराठी भाषेची थोरवी, या भाषेचा गोडवा सांगितला. परंतु याच ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि इतर थोर संतांच्या महाराष्ट्रात आज मराठीची दैना कशी झाली आहे हे आपण सर्व पाहतच आहोत. मराठी भाषिक महाराष्ट्रात 1990 च्या दशकापासून इंग्रजी शाळांचा सुळसुळाट सुरू झाला. थोर लहान सर्वांनाच आपल्या पाल्याला फाडफाड इंग्रजी आले पाहिजे आणि इंग्रजी भाषा बोलता आली म्हणजे तो हुशार झाला या भावने पोटी इंग्रजी शाळांमध्ये दाखला मिळवून देण्याची एक फॅशनच सुरू झाली. मराठी शाळा ओस पडू लागल्या आणि कॉन्व्हेन्ट मध्ये मात्र भरमसाठ फी आणि देणग्या देऊनही प्रवेश क्षमतेपेक्षाही जास्त प्रवेश होऊ लागले. इंग्रजी शाळातून शिकून पुढे गेलेल्यांपैकी भावी जीवनात अत्युच्च गुणवत्ताधारक असे किती निर्माण झाले हाही एक संशोधनाचा विषय आहे किंवा असे संशोधन व्हायला पाहिजे. इंग्रजी शाळांमध्ये शिकून त्या विद्यार्थ्यांनी यशाचे अत्युच्च शिखर गाठो अथवा न गाठो किंवा त्यांना इंग्रजी येवो अथवा न येवो परंतु या इंग्रजी शाळातून शिकणाऱ्या मराठी भाषिक  मुलांचे मराठी मात्र पुरते बिघडले. तसेच बहुतांश इंग्रजी शाळांमध्ये हिंदी भाषिक मुले व शिक्षक वृंद आहे त्यामुळे या इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांचे मराठी हे इंग्रजी आणि हिंदी मिश्रित झालेले दिसते. अनेक मराठी विद्यार्थ्यांना मराठी मधील अंक कळत नाही त्यांना अंक हे इंग्रजीत सांगावे लागतात. तसेच मराठी बोलतांना त्यांच्या बोलण्यामध्ये पन्नास टक्के तरी हिंदी व इंग्रजी शब्द असतात. उदाहरणार्थ "अगर तू गेला तर" असे हल्लीचे मुलं बोलतांना दिसतात. मराठीमध्ये "जर तू गेला तर" असे म्हणण्याऐवजी ही मुले जर च्याऐवजी अगर वापरतांना दिसतात. एक कोकणी नेता सुद्धा जर म्हणण्याऐवजी अगर असा शब्दप्रयोग करतो. तसेच आणखी एक उदाहरण ज्याप्रमाणे आपण मराठीत "असं थोडी असते" असा शब्दप्रयोग करतो तर आता अनेक मराठी मुले "असं थोडीही ना असते" हे हिंदी भाषेतल्या "ऐसे थोडीही ना रहता है" याप्रमाणे बोलतांना दिसतात. अनेक वेळा दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात, सरकारी कामकाजात मराठी भाषेचा प्रयोग व्हावा असे मुद्दे उपस्थित केले जातात परंतु प्रत्यक्षात त्यावर कारवाई होतांना मात्र दिसत नाही. शिवाय आम्ही मराठी लोक आपल्या भाषेत बोलतांना आग्रही सुद्धा नसतो. बाजारात गेलो असता आपणच दुकानदाराशी फळ विक्रेत्याशी हिंदी भाषेत बोलायला सुरुवात करतो. प्रसंगी असेही आढळते की तो फळ विक्रेता किंवा दुकानदार हा सुद्धा मराठी असतो. रिक्षा ठरवतांना किंवा बस मध्ये वाहकासोबत ही आपण हिंदीतच संवाद सुरू करतो. आपण मराठी जन इतर भाषा सहज अंगीकृत करून घेतो आणि आपली माय भाषा मराठी मात्र साफ विसरून जातो. इतर भाषिक मात्र त्यांच्याच भाषेत बोलतांना आपल्याला दिसतात. इतर भाषिकांचे भाषा प्रेम हे मराठी भाषेच्या मातृभाषा प्रेमापेक्षा नक्कीच जास्त आहे असे वाटते. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला 'मराठी राजभाषा दिवस' साजरा केला जातो. आज आपण कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषेचा अधिकाधिक वापर कसा होईल ?, इंग्रजी आणि हिंदी शब्द मराठी बोलतांना कसे वगळता येतील ?,  मराठी वाचन अधिक कसे करता येईल ? यावर नक्कीच विचार करायला हवा. आपल्या नवीन पिढीला वाढदिवसाची भेट देतांना एखादे  मराठी पुस्तक दिले पाहिजे. आज आंतरजालावर इतर भाषांच्या तुलनेत मराठी मधील लेख व माहिती ही अत्यल्प आहे त्यामुळे मराठी भाषेत लिखाण करून, काव्य करून ते समाज माध्यमातून अधिकाधिक प्रसारित करायला हवे हेच आज सांगावेसे वाटते. अन्यथा मग "हॅप्पी मराठी डे" सारखे इंग्रजाळलेले मराठी ऐकण्याचा, बोलण्याचा, वाचनाचा नाईलाजास्तव  सराव करून घ्यावा लागेल.

१७/०१/२०२५

Article about Panipat third war

 काळा आंबा


जातिभेदाचा जराही लवलेश न ठेवता अठरा पगड जातीचे आपले पुर्वज शेकडो किलोमीटर पायपीट करून शत्रूशी टक्कर देण्यासाठी पानिपतला गेले आणि आपण मात्र आजही जातिभेद करतो ही शोकांतिकाच नव्हे का ?

दर गुरुवारी लेख लिहिण्याचा माझा नेम. पण काही कार्य बाहुल्यामुळे 2025 च्या वर्षारंभीच्या पहिल्याच दोन गुरुवारी लेखन होऊ शकले नाही. त्यामुळे चुकचुकल्यासारखे वाटत होते. परवा 14 जानेवारी रोजी संक्रांत साजरी झाली. सुर्यनारायण जेंव्हा मकर राशीत प्रवेश करतात त्या या संक्रांतीच्या दिनी स्मरण होत असते एका भीषण रणसंग्रामाचे,  हरूनही पुरून उरलेल्या पराक्रमी मराठ्यांचे,  शत्रू असलेल्या मराठ्यांची शक्ती, राष्ट्रनिष्ठा ओळखून, तेच दिल्लीचा अर्थात भारताचा कारभार सांभाळू शकतात असे पत्र देणाऱ्या अहमदशहा अब्दाली या दुर्राणीचे. खरे तर या विषयावर यापुर्वीही लेख लिहिला आहे परंतु "युद्धस्य कथा रम्य:" हा या उक्तीप्रमाणे युद्ध कथा ऐकण्यात जसा रस येतो तसाच त्या   लिहिण्यात सुद्धा रस येत असतो.

14 जानेवारी 1761 रोजी आजच्या हरियाणातील पानिपत येथे पुण्याहून मराठा फौज बाजार बुणग्यांसह  हल्लीच्या अफगाणिस्तान मधील अहमदशाह अब्दाली या दूर्राणी वंशातील सुलतानाला टक्कर देण्यासाठी , त्याच्यापासून दिल्लीला वाचवण्यासाठी म्हणून येऊन ठेपले होते. यमुनेचा उतार पाहून पुढे निघालेल्या मराठा सैन्याने अब्दालीसोबत निकराचा लढा दिला. पानिपतला भीषण रणसंग्राम झाला. या युद्धाने भारत देश हा अखंड देश असल्याचे दृढ झाले. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे बिरूद रूढ झाले ते या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमुळेच. ही लढाई सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वामध्ये लढली गेली. पहिले बाजीराव पुत्र नानासाहेब यांनी सदाशिवराव भाऊ यांना पानिपतच्या लढाईसाठी पाठवतांना विश्वासराव या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला सुद्धा सोबत दिले. विश्वासरावांच्या मातेने म्हणजे गोपिकाबाई यांनी निडरतेने, धैर्याने आपल्या तरुण ज्येष्ठ पुत्राला पानिपतच्या युद्धास पाठवण्याचा आग्रह केला. धन्य त्या मातेची ज्यांनी आपल्या पुत्रास युद्धाची, पराक्रमाची, राष्ट्र रक्षणाची प्रेरणा दिली. नाहीतर आज आपण आपल्या मुलांना किती जपतो, बाबू बाबू करून त्यांचे लाड करतो, त्यांना कुठे जवळपासही एकटे जाण्यास मज्जाव करतो.  त्यामुळे त्यांच्यात संकटांचा सामना करण्याचे धैर्य येत नाही, ते थोड्याही संकटाने, अपयशाने खचून जातात. विश्वासराव, सदाशिवरावभाऊ यांचे समवेत शिंदे, होळकर, पवार, गायकवाड असे मातब्बर सरदार सुद्धा होतेच. 14 जानेवारी रोजी ही भीषण लढाई झाली. या लढाईत तरुण पेशवा विश्वासराव कामी आले. सदाशिवरावभाऊ हे सुद्धा हुतात्मा झाले. परंतु सदाशिवरावभाऊ यांच्या निधनाविषयी अनेक मतेमतांतरे आहेत. लढाई संपल्यावर "दोन मोत्ये गेली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा तर अगणित गेला" असे सांकेतिक भाषेतील पत्र पुण्याला धाडण्यात आले. पानिपतच्या लढाईमुळे काही म्हणी सुद्धा रूढ झाल्या जसे विश्वासाबद्दल बोलायचे झाल्यास "विश्वास तर पानिपतातच गेला" , भरपूर नुकसान झाल्यास "पानिपत झाले" अशा म्हणी आजही लोक बोली भाषेत वापरत असतात. पेशव्यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या लढाईत महाराष्ट्रातील अठरापगड जातीचे लोक एकत्रित झाले होते, एकत्र होऊन लढले होते. पण आज अत्याधुनिक काळात, बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात मात्र जातीभेद हा कमी होण्याऐवजी दुर्दैवाने अधिक वाढलेला दिसतो. आपल्यासाठी जातिभेदाचा जराही लवलेश न ठेवता आपले पुर्वज शेकडो किलोमीटर पायपीट करून शत्रूशी टक्कर देण्यासाठी पानिपतला गेले आणि आपण मात्र आजही जातिभेद करतो ही शोकांतिकाच नव्हे का ? पानिपतच्या लढाईमध्ये जर उत्तरेकडील सर्वच सत्ताधीशांनी मराठ्यांना सहकार्य केले असते तर कदाचित भारताच्या इतिहासाचे चित्रच बदलले असते. परंतु जाट, रोहिले, राजपूत यांनी मराठ्यांना तेंव्हा साथ दिली नाही. सर्वांनी जर मराठ्यांना साथ दिली असती तर पुढील काळ हा भारताचे भविष्य बदलणारा ठरला असता. मुघल साम्राज्य तर तेंव्हा नावालाच होते आणि इंग्रजांना सुद्धा मोठा अटकाव झाला असता.

आपल्या या पराक्रमी इतिहासाची, पराक्रमी, लढवैय्या पुर्वजांची आठवण करून देणा-या संक्रांतीचे स्वरूप आता किती बदलले आहे. पतंगबाजी मोठ्या प्रमाणात होते, पतंग उडवतांना  मोठमोठ्या आवाजात गाणी लावली जातात. ज्या वयात विश्वासराव पेशवे शत्रूशी युद्ध करण्यासाठी गेले त्या वयातील तरुण ज्या पतंगांमुळे, मांजामुळे लोकांचे जीव जात आहेत, अपघात होत आहेत त्या पतंगबाजीत गुंतलेले पाहून खंत वाटते.  तत्कालीन मराठ्यांनी लढाईत पराक्रम गाजवले. आजच्या तरुणांवर पराक्रम गाजवण्यासाठी लढाई नसली तर त्यांनी अभ्यासात किंवा खेळात पराक्रम गाजवायला नको का ? असा प्रश्न पडतो. पानिपतचा युद्धसंग्राम इतका भीषण होता की लाखाहून अधिक मराठी या लढाईत हुतात्मा झाले महाराष्ट्रात एक लाख चुडा फुटला. पानिपत येथे मराठ्यांचे एवढे रक्त सांडले की येथील एक लहान आम्र रोपटे काळे ठिक्कर पडले. मोठा झाल्यावर सुद्धा तो आम्र तरू तसाच काळा राहिला त्यामुळे या स्थळाला "काला अंब" अर्थात काळा आंबा असे नांव पडले अशी एक कथा या भागात प्रचलित आहे. पानिपतला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. आपल्या पुर्वजांच्या रक्ताने तरुवर काळे पडले होते पण त्यांनी केलेल्या पराक्रमाने, प्राणांची आहुती देल्याने आपण आज स्वातंत्र्याची मधुर फळे चाखत आहोत किंबहुना फुकट मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे दिवसेंदिवस अधिकच उच्छृंखल होत आहोत, बेछूट होत चाललो आहोत. आगामी प्रत्येक संक्रांतीला आपल्याला केवळ पतंग, पतंगबाजी न आठवता पेशवे, मराठे, त्यांचा पराक्रम व काळा आंबा अर्थात पानिपत हे स्थळ व मराठ्यांचा पराक्रम आठवायला पाहिजे. पानिपत तमाम वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली.