कालाय तस्मै नमः
सोशल मिडियामुळे गेट-टुगेदर होण्याचे प्रस्थ सुद्धा वाढले आहे. अनेक वेळा गेट-टुगेदर मधून जुन्या प्रेम प्रकरणांना उजाळा मिळतो आहे. जे जुन्या काळात होऊ शकले नाही ते प्रेम पुनश्च भेटल्यानंतर उफाळून येत आहे आणि त्यातून मग वैवाहिक जीवनात नवीन पेच निर्माण होतो आहे.
उपनिषदांमध्ये सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे. एका राजाची कन्या सत्यवान नावाच्या लाकूडतोड्या सोबत लग्न करते. पुढे जंगलात वडाच्या झाडाखाली सत्यवान मृत्युमुखी पडतो. त्याचे प्राण यमराजकडून परत मिळवण्यासाठी सावित्री यमराजाच्या मागे जात राहते आणि त्याला तिच्या पतीचे प्राण परत करावे म्हणून विनंती करत राहते. तिच्यात आणि यमराज यांच्यात मोठा संवाद होतो. तो पुर्ण संवाद येथे दिल्यास लेख मोठा दिर्घ होईल आणि आजकाल अलक (अति लघु कथा) चा जमाना आहे. म्हणून इथे थोडक्यात सांगत आहे. शेवटी यमराज या युक्तिवादात पराभूत होतात आणि सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद देतात आणि सावित्री मग माझ्या पतीशिवाय मी पुत्रवती कशी होऊ शकेल ? म्हणून यमाराजाला पेचात पकडते आणि यमराज सत्यवानाचे प्राण परत करतो अशी ती कथा आहे. या गोष्टीचे स्मरण म्हणून भारतामध्ये दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत करते आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून ईश्वराजवळ प्रार्थना करते. आपली पत्नी आपल्यासाठी व्रत ठेवते याचा काही ना काही परिणाम पतीच्या वर्तणुकीवर सुद्धा होतच असतो. त्या दोघात प्रेमाची भावना वृद्धिंगत होत असते. तसेच या सणामुळे वृक्ष संवर्धन, वृक्ष प्रेम याचा सुद्धा संदेश आपसुकच मिळतो. सत्यवान सावित्रीच्या कथेमुळे भारतातील स्त्रीला तिचा पती हा सर्वस्व आहे आणि तो तिला जीवनभर साथ देणार आहे म्हणून तो दीर्घायुषी असावा असा संदेश मिळतो. शतकानुशतके भारतातील स्त्रिया हे व्रत साज-या करत आलेल्या आहे. भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा वडाचे झाड नसते म्हणून वडाच्या फांदीची, वडाच्या झाडाच्या प्रतिकृतीची पूजा NRI स्त्रिया करतात.
अशी ही सर्वांना ज्ञात असलेली वटसावित्रीची कथा जरी असली तरी आता मात्र काळ झपाट्याने बदलतो आहे. कुटुंब संस्कृती लोप पावत चालली आहे. अशातच सोशल माध्यमांमुळे स्त्री-पुरुषांची ओळख मोठ्या प्रमाणात होते आहे तसेच त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा साधला जातो आहे, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड कल्चर मोठ्या प्रमाणात फॉफावले आहे. लिव्ह इन रिलेशनशिप प्रकार पण बोकाळला आहे त्याबरोबरच सोशल मिडियामुळे जुनी मित्रमंडळी सुद्धा जोडल्या जात आहे. त्यांचे गेट-टुगेदरचे प्रस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाईलाही लाजवेल अशा जोशात, जल्लोषात वाढले आहे. अनेक वेळा गेट-टुगेदर मधून जुन्या प्रेम प्रकरणांना उजाळा मिळतो आहे. जे जुन्या काळात होऊ शकले नाही ते प्रेम पुनश्च भेटल्यानंतर उफाळून येत आहे आणि त्यातून मग वैवाहिक जीवनात नवीन पेच निर्माण होतो आहे. सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या प्रकरणात सोशल मिडीयाचा किंवा गेट-टुगेदर वगैरेचा अद्याप तरी काही निष्कर्ष पोलिसांनी काढलेला नाही परंतु तरी इथे हा विषय मांडावासा वाटला.
पुर्वीच्या पतीवर अवलंबून राहणाऱ्या स्त्रियांना पती हा परमेश्वर आहे अशी शिकवण दिली जात असे पण आता स्त्रिया या स्वावलंबी झालेल्या आहेत आणि त्यांना पतीवर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. या लेखात सर्वच स्त्रियांना दोष देण्याचा मुळीच उद्देश नाही उलट माधवी लता सारख्या काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच असा पूल बांधणाऱ्या तरुणी सुद्धा आजच्याच काळात आहे. परंतु गेल्या काही वर्षात असे अनेक गुन्हे घडले की ज्यामध्ये स्त्रियांनी त्यांच्या पतींची हत्या केली आहे. सौरभ नामक पतीला मारून त्याचे तुकडे टाकीत टाकून ती टाकी सिमेंटने बंद करून टाकणा-या मुस्कानची घटना सुद्धा ताजीच आहे आणि आता परवा वटपौर्णिमेच्याच आसपास सोनम रघुवंशी नामक नवविवाहितेने तिच्या पतीची मेघालयात मधुचंद्राच्या वेळेस हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सोनमने तिच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. सोनमला जर राजा रघुवंशी सोबत लग्नच करायचे नव्हते तर तिने ते का केले? लग्न केल्यावरही ती त्याला घटस्फोट देऊ शकत होती पण तिने तसे सुद्धा नाही केले आणि राजा रघुवंशीचा नाहक बळी गेला. भारतीय स्त्रिया, भारतीय पुरुष, भारतीय कुटुंब यांच्या विचारसरणीमध्ये झपाट्याने बदल झालेला आता दिसतो आहे. काहीही होऊ द्या आम्हाला फक्त एन्जॉय पाहिजे ही वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे.
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणांमधून तरुण मुला मुलींना हेच सांगावेसे वाटते की तुम्हाला जर का कोणी पसंत नाही तर त्याच्याशी लग्नच करू नका. लग्न केल्यावर पटत नसेल तर कायदेशीर रित्या विभक्त व्हा परंतु कट करून हत्या करणे, कुणाच्या कुटुंबाला दुःखाच्या सागरात बुडवणे यासारखे कृत्य करू नका.
आज-काल आपल्याच संस्कृतीला, कथांना सणांना नावे ठेवण्याची सवय झालेली आहे. अनेकांना सत्यवान सावित्रीच्या कथेचा येथे केलेला उल्लेख सुद्धा रुचणार नाही कुणी त्याला भाकडकथा ही म्हणेल परंतु या कथेमधून पती आणि पत्नी मधील प्रेम वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो हेही तितकेच खरे आहे. पत्नी जेव्हा पतीसाठी व्रत करते तेव्हा आपोआपच पतीला सुद्धा तिच्याबद्दल आदर वाटू लागतो, कुटुंब यशस्वीरित्या पुढे जात राहते. पती पत्नीत योग्य संवाद असेल तर त्या घरातील मुलांची मानसिक व शारीरिक वाढ सुद्धा योग्य प्रकारे होते. समाजात प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जातीत सुद्धा चांगल्या वाईट अशा प्रवृत्ती असतात हजारो वर्षांपूर्वी पतीचे प्राण यमराज कडून परत आणणारी स्त्री होऊन गेली आणि आता मात्र सोनमसारख्या तरुणीने तिच्या पतीस यमसदनी पाठवले आहे. यावर कालाय तस्मै नमः नाही म्हणावे तर काय म्हणावे ?