Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०५/२०२३

जुवा किसिका ना हुवा


तरुणांना उच्चभ्रू लोकांसाठी सारखी जीवनशैली जगायची ओढ लागली आहे. परंतु त्यासाठी मेहनत करणे मात्र त्यांना नको आहे. असे तरुण मग या ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे आकर्षित होत आहेत.

अनेक व्यसनांसोबत एक व्यसन जुगाराचे सुद्धा असते. जुगार खेळणे हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. फक्त जुगार खेळण्याच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. तसे तर हा विषय अनेकदा चर्चिला जातो आणि यावर बरेच लिखाण सुद्धा झाले आहे तरीही याच विषयावर लिहिण्याचे ठरवले. या विषयावर अधिकाधिक लिखाण आणि उद्बोधन झाल्यास कदाचीत ते नवीन पिढीस कुठेतरी विचार करण्यास भाग पाडेल व ते जुगारासारख्या महाभयंकर अशा विषसर्पाच्या विळख्यात अडकणार नाही असे वाटले व हाच विषय लिहायला घेतला.            

कोणतेही व्यसन किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणे हे चांगले नसते "अति सर्वत्र वर्ज्यते " असे जे म्हटले आहे ते यासाठीच. आजकाल आपण पाहतो भौतिक सुखाची वा भौतिक सुख भोगण्याची लालसा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वस्तूंमध्ये सुख असते असे वाटून नाना प्रकारच्या चैनीच्या वस्तू , गॅजेट्स यांची खरेदी केली जाते. सुलभ कर्ज योजना सुद्धा याला कारणीभूत आहेत. आज अनेक लोक या सुलभ मिळणा-या कर्जावर वाहने आदी वस्तू खरेदी करतात व चार-पाच वर्षात त्या विक्रीस काढतात. जुन्या वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याचे हेच कारणं आहे. अनेक प्रसंगी या वस्तू भविष्यात टाकाऊ होऊन जातात आणि मग पृथ्वीवर कचरा वाढत जातो.  भौतिक सुखे भोगण्यासाठी वित्ताची गरज असते आणि वित्त मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या धडपडी मग केल्या जातात. चरितार्थाचे एक साधन असूनही मनुष्य इतर अनेक साधने शोधू लागतो आणि आपली शांती गमावून बसतो. या इतर अनेक साधनांमध्ये सध्या मोबाईलसारखी, इंटरनेट रेडी पीसीसारखी साधने त्यांना पालक सुद्धा मोठ्या हौसेने घेऊन देत आहेेेत. टीव्ही,  मोबाईल ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराची मोठ्या प्रमाणात जाहिरात होताना दिसतात आहे आणि या जाहिराती चक्क नावाजलेले नट करत आहेत. या जाहिराती करताना तरुणांना पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते आणि त्यांना जुगाराकडे आकर्षित केले जाते. याच जाहिरातीमध्ये कुठेतरी असा जुगार खेळणे एक जबाबदारीचे काम असते आणि त्यात नुकसानही होऊ शकते असे कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेले असते. तरुणांना आजकाल शानशौकीत राहण्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. विविध प्रकारच्या गाड्या दामटायच्या,  उंची वस्त्रे परिधान करायची आणि उच्चभ्रू लोकांसारखी जीवनशैली जगायची अशी ओढ त्यांना लागली आहे. परंतु त्यासाठी मेहनत करणे मात्र त्यांना नको आहे. असे तरुण मग या ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे आकर्षित होत आहेत. अनेक प्रसंगी असे दिसून आले आहे की या जुगार खेळण्यामुळे अनेक तरुणांना, किशोरवयीन मुलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही लहान मुलांनी हा जुगार अर्थात ऑनलाईन रम्मी खेळून आपल्या पालकांच्या बँकेच्या खात्यातील लाखोच्या घरात असलेली रक्कम गमावली आहे.  असे असतांनाही या जुगाराच्या जाहिराती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा काय केल्या जातात ? जुगारामुळे केवढा मोठा फटका बसतो हे आपल्या भारतीयांना किती चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. यासाठी आपल्या महाभारतात एवढे मोठे उदाहरण महर्षी व्यासांनी दिलेले आहे. जुगार म्हणजे तत्कालीन द्युत. हा द्युत खेळ खेळण्यास तत्कालीन क्षत्रिय नकार देत नसत अशी महाभारतकालीन प्रथा होती. दुर्योधन धर्मराजाला द्युत खेळण्यासाठी आमंत्रित करतो व त्यात धर्मराज आपले राज्य, धन, प्रिय बंधू, पत्नी या सर्वांना गमावून बसतो आणि पुढील महाभारत घडते. परंतु ही उदाहरणे लहान मुले व तरुण यांच्यापर्यंत आपण पोहोचवतच नाहीये. अशी उदाहरणे जर त्यांना वारंवार सांगितली गेली तर कदाचित हे रम्मी, ऑनलाईन जुगार व त्याच्या जाहिराती कमी होण्याची शक्यता किंवा त्या बंद होणे शक्यच नाहीच का ? नवीन पिढीपर्यन्त जे पोहोचते आहे ते आपल्या राष्ट्रासाठी भविष्यात नक्कीच हानिकारक आहे अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. महाभारत या मालिकेमध्ये अनेक प्रसंगानुरूप अशी महेंद्र कपूर यांच्या आवाजातील समर्पक गीते लागत असत याच गीतामध्ये पुढील एक गीत होते.

जुवा किसिका ना हुवा

इसमे जीत ना हार |

सर्वनाश का खेल है,

मिटे कई घरबार ||

सिख बनती है युगोसे, नये युग का करे स्वागत ||

वरील गीत पंक्ती पालक, शिक्षक व तसेच सर्वांनी लक्षात घेऊन आपआपल्या मोबाईलधारक पाल्यांना , विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्या  तरच आपल्या देशाचे आधारस्तंभ असलेली आपली भावी पिढी जुगारासारख्या महाभयंकर अशा विषसर्पाच्या विळख्यात अडकणार नाही असे वाटते.

२७/०४/२०२३

Article about english city banners

महापुरुष पुतळे, सौंदर्यीकरण फलक आणि मराठी भाषेस फाटा



शहरात इंग्रजीतील फलकांऐवजी, लव चे बदाम अर्थात "दिल" चे चिन्ह असलेल्या फलकांऐवजी मराठी भाषेत फलक लावता येणार नाही का? तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ त्यांनी उद्गारलेले सुप्रसिद्ध असे त्यांचे वाक्य लावले तर ते अधिक समर्पक व प्रेरणादायी ठरणार नाही का?

काही दिवसांपूर्वी खामगांव शहरात आय  लव्ह खामगांव ,  आय  लव्ह सिल्व्हरसिटी , आय  लव्ह कॉटनसिटी खामगांव. अशा आशयाचे विद्युतदिव्यांचे फलक लागले. या फलकातील लव्ह या शब्दाच्या ठिकाणी  लाल बदामचा आकार जो दिल अर्थात हृदयासाठी वापरला जातो त्याचा वापर केला आहे. हा आकार सहसा प्रेमीजीवांच्या प्रेमासाठी सांकेतिक पद्धतीने केला जातो. तसे तर असे फलक आजकाल अनेक शहरात लागलेले आहेत. परंतू  खामगांव शहरात हे फलक लागल्यावर विहिंपचे पालक  मा. बापूसाहेब करंदीकर यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर किंवा त्यांच्या नावे असलेल्या सुंदर स्थानांच्या जागी असे तरुणांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले लव्हचे चिन्ह वापरण्याऐवजी त्या महापुरुषांची सुप्रसिद्ध वाक्ये लावावी जेणे करून ती वाक्ये नवीन पिढीला सुद्धा कळतील अशा आशयाचा एक लेख लिहिला होता. हा लेख कुणालाही पटेल असाच होता. याच संबधीत अनेक जेष्ठ नागरीक व तरुणांनी मला महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर किंवा त्यांच्या नावे असलेल्या सुंदर स्थानांच्या जागी असे लव्ह चे चिन्ह असलेले फलक नसावेत असे फोन करून सांगितले. सर्वच स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी , क्रांतिकारकांनी पहिले प्रेम देशावर केले  परंतू त्यांनी तसे प्रेम असल्याचे फलक नाही लावले तर आपल्या कृतीतून  त्यांनी त्यांचे मातृभूमीवर किती प्रेम आहे हे सिद्ध करून दाखवले. आपला देश, आपले शहर हे सर्वांनाच प्रिय असते म्हणूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या  स्वा. सावरकरांना आपल्या मातृभूमीची आठवण येऊन 

"नभी नक्षत्रे बहुत एक परि प्यारा, मज भरतभूमीचा तारा" , प्रासाद इथे भव्य परि मज भारी आईची झोपडी प्यारी" 

असे काव्य त्यांना स्फुरले. केवळ जागोजागी इंग्रजीतील शहरांवरील प्रेमाचे फलक लावल्याने शहारावरचे प्रेम वाढेल का? त्या फलकाजवळ जाऊन सेल्फी काढणारे तरुण व प्रशासन शहरावरील प्रेमापोटी एखादी स्वच्छता मोहीम , पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील का? शहर सुंदर दिसावे त्यासाठी सौंदर्यीकरण स्थाने , आकर्षक वाहतूक बेटे असावीत , विद्युत रोषणाई असावी. आय लव्ह खामगांव सारख्या फलकांना सुद्धा अगदीच विरोध नाही परंतू ते फलक महापुरुषांच्या फुतळ्याजवळ नसावेत. तिथे महापुरुषांची सुप्रसिद्ध वाक्येच असणे जास्त समर्पक आहे. शिवाय आपल्याला आपल्या भाषेचा काही अभिमानच उरला नाही, इंग्रजी शाळांना विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे तर मराठी शाळा बंद पडत आहे, दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्या म्हणून आग्रह आणि इकडे सरकारच शहरांमध्ये आय लव्ह व त्यापुढे शहरांचे नांव असलेले इंग्रजीतील फलक लावते याला काय म्हणावे? महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आय लव्ह खामगांव प्रमाणे असलेल्या इंग्रजी फलकांऐवजी मराठी भाषेत फलक का लावले जात नाही ? त्या त्याबाबत कोणी काही मागणीही करत नाही किंवा आणि आजपावेेेतो कुणी केलीही नाही. एरवी मराठी मराठी करणारे राजकीय पक्ष व संघटना सुद्धा याबाबतीत मूग गिळून बसले आहेत. शहरावर प्रेम असल्याचे फलक इंग्रजीत लावण्याऐवजी मराठी सुद्धा लावता येऊ शकतात आणि तसेे काही शहरात लावलेले सुद्धा आहेत. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात "आम्ही वरणगावकर" असा फलक लावला आहे. याप्रमाणे इतरही शहरात इंग्रजीतील फलकांऐवजी, लव चे चिन्ह असलेल्या फलकांऐवजी मराठी भाषेत फलक लावता येणार नाही का? तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ त्यांनी उद्गारलेले सुप्रसिद्ध असे त्यांचे वाक्य लावले तर ते अधिक योग्य ठरेल व नवीन पिढीस प्रेरणादायी सुद्धा ठरेल असा विचार प्रशासनाने करायला नको का ? तसेेेच  मा बापूूूसाहेब करंदीकर यांच्या लेखानुसार महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर "अहिंसा परमो धर्म" टिळकांच्या पुतळ्या समोर "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे" असे फलक लावले असते तर ते जास्त संयुक्तिक वाटले असते व त्या महापुरुषांना ती खरी श्रद्धांजली झाली असती.

२०/०४/२०२३

article about mafia in UP , Encounter of Asad and killing of Atik and Ashraf

खळांची व्यंकटी सांडो 

गुन्हेगार मग तो कुणी का असेना त्याची व्यंकटी ही सुटलीच पाहिजे.  गुन्हेगारांचा "विनाशायच दुष्कृताम" याप्रमाणे नायनाट हा व्हायलाच हवा तेंव्हाच इतरांना सुद्धा कायद्याचा धाक वाटेल व ते दुष्कृत्ये करण्यास धजावणार नाही व त्यामुळे  या विश्वातील सर्व जीवांचे मैत्र जडेल. अशीच प्रार्थना माऊली करतात. 

गत आठवड्यात उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद अहमद याचा झांशी येथे एसटीएफच्या चकमकीत अंत झाला. त्याला पकडून देणा-यास पाच लाखाचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले होते. तदनंतर पोलिसांच्या ताब्यात असलेले त्याचे वडील अतिक अहमद व काका अशरफ अहमद या अनेक गुन्ह्यांचे दोषारोपण माथ्यावर असलेल्या दोघांवर माध्यमांचे चित्रीकरण सुरु असतांना व पोलिसांच्या ताब्यात असतांना तीन मारेक-यांनी पत्रकारांच्या वेषात येऊन अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना यमसदनी पाठवले व स्वत: पोलिसांना शरण आले. हे मारेकरी सुद्धा गुन्हेगारच असल्याचे कळते. असद, अतिक, अशरफ या गुन्हेगार, माफियांचा अशाप्रकारे अंत झाल्यावर समाज माध्यमे, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यांच्यातून बातम्यांना ऊत आला व अतिक आणि त्याच्या कुटुंबियांच्या गुन्ह्यांचे अनेक किस्से जनतेसमोर आले. अनेक गुन्ह्यात आरोपी असूनही बीबीसी या "वृत्तवाहिनीने मात्र माजी आमदाराची हत्या" असे शीर्षक असलेली अशी बातमी दिली. यावरून बीबीसीचा खरा दिसून येतो. अतिक हा आपल्या दबदब्याच्या जोरावर निवडून सुद्धा आला होता. अतिक हा अगदी तरुण वयातच गुन्हेगारी जगतात शिरला. त्याच्या वडीलांचा टांग्याचा व्यवसाय होता. अगदी तरूण असतांना म्हणजे केवळ 17 वर्षाचा असतांना चांदबाबा नावाच्या एका डॉनचा दबदबा होता. या चांदबाबाशी अतिकने टक्कर देणे सुरु केले व त्यामुळे त्याच्या मागे अनेक लोक उभे राहिले. पुढे अतिकवर अनेक हत्यांचे आरोप झाले, लोकांच्या जमिनी त्याने बळकावल्या असे अनेक प्रकारचे उपदव्याप त्याने सुरु केले. गुन्हेगार व राजकारण यांचे संबंध कसे येतात व ते चांगले प्रस्थापित कसे होतात हा एक प्रश्नच आहे. एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल असा या अतिकचा गुन्हेगारी जीवनपट आहे. अतिक पुढे राजकारणात सक्रिय झाला व 1989 या वर्षी चक्क आमदार सुद्धा झाला. केवळ एकदाच नव्हे तर वर्ष 2004 पर्यंत तो पाचवेळा आमदार झाला, संसदेवर सुद्धा निवडून आला. पुढे ज्यावेळी चांदबाबाची हत्या झाली व संशयाची सुई अतिककडे फिरली होती. प्रयागराज पोलीस खात्यात अनेक गुन्हे अतिक व त्याच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी लावले.  राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होणे व त्याला कोणत्या का मार्गाने होईना समाजमान्यता मिळणे ही आपल्या लोकशाहीची शोकांतिकाच आहे. 2006 मध्ये राजू पालची हत्या व यातील साक्षीदार उमेश पाल याची 2023 मध्ये हत्या हा सर्व कट अतिकनेच रचला होता. परवा अतिक व त्याच्या भावाची हत्या झाली आणि अतिकची गुन्हेगारी संपुष्टात आली. अतिकमुळे त्याचे सर्व कुटुंबीयच एक माफिया कुटुंब झाले. त्याचा एक मुलगा अद्यापही तुरुंगातच आहे. अतिकची बायको शाईस्ता परवीन ही सुद्धा एक लेडी डॉनच आहे. सध्या ती फरार आहे. अतिकच्या स्थावर मालमत्ता आणि सावकारी प्रकरणे व काळ्या पैशांचा व्यवहार शाईस्ताच पाहते असे म्हटले जाते. शाईस्ताची नणंद सुद्धा नेमबाज असल्याचे बोलले जाते. आज शाईस्ता तोंड लपवत इकडे तिकडे फिरत आहे. प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. तसेच कर्म चांगले असो वा वाईट त्याचे फळ मिळणे हे क्रमप्राप्तच असते. असदवर 101 गुन्हे आहे. भगवंताने शिशुपालचे सुद्धा १०० अपराध माफ केले होते. त्याने जेंव्हा 101 वा अपराध केला तेंव्हा भगवंताने त्याचा शिरच्छेद केला होता. असदचा सुद्धा 101 अपराधांचा घडा भरला व तो फुटला.  अनेक लोक याचा संबंध मा. योगी हे मुख्यमंत्री असल्याने धर्माशी जोडत आहे व अतिकचा मुलगा असदला मारायला नको होते अशी ओरड त्याचे शेजारी पाजारी करीत आहेत परंतू गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला कोणता धर्म नसतो. अतिक या गुन्हेगाराविषयी सहानुभूती बाळगणा-यांनी अतिकने ज्यांच्या हत्या केल्या, ज्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांच्या नातेवाईकांवर काय परिस्थिती आली असेल याचा सुद्धा विचार करावा. 1985 पासून सुरुवातीला किरकोळ गुन्हे, अपहरण, हत्येचे कट करणे,  हत्या करणे, खंडणी व नंतर जमिनी बळकावून आपले गुन्हेगारी विश्वाचे साम्राज्य उभे करणा-या असदला त्याच्या  कर्माचे फळ हे मिळाले. माऊलींनी विश्वाच्या कल्याणाकरीता जे पसायदान मागितले आहे त्यात ते हेच म्हणतात की 

जे खळांची व्यंकटी सांडो 

तया सत्कर्मी रती वाढो

अर्थात खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. म्हणजे सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी.

    गुन्हेगार मग तो कुणी का असेना त्याची व्यंकटी ही सुटलीच पाहिजे. गुन्हेगारांचा "विनाशायच दुष्कृताम" याप्रमाणे नायनाट हा व्हायलाच हवा तेंव्हाच इतरांना सुद्धा कायद्याचा धाक वाटेल व ते दुष्कृत्ये करण्यास धजावणार नाही व त्यामुळे  या विश्वातील सर्व जीवांचे मैत्र जडेल. अशीच प्रार्थना माऊली करतात. 

१३/०४/२०२३

Article about use of an old nostalgic song in a advertise of male undergarments

 ह्रदयस्पर्शी गाण्यांचा खून

जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी अशा गीतांचा वापर हा अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत करणे, त्यात तोकड्या कपड्यातील कलाकारांना विक्षिप्त आविर्भाव प्रकट करतांना दाखवणे  म्हणजे त्या परीश्रमपूर्वक व प्रसंगानुरूप बनवलेल्या गीतांचा खूनच करणे नाही का ? 

आम्ही हायस्कूल मध्ये शिकत असतांना माझ्या बहिणी संगीत शिकत असत. त्यांच्या संगीत क्लास मध्ये कुण्या विद्यार्थ्याने गायनात हरकती घेतांना चुका केल्या तर त्यांचे संगीत शिक्षक त्या विद्यार्थ्याला उद्देशून "तू गाण्याचा खून केला" असे वाक्य म्हणायचे. या वाक्याची आठवण काल झाली. परंतू आजच्या लेखात ज्या गीतासंबंधी लिहीत आहे त्या गाण्यात अथवा गायनात कुठे चूक झालेली नसून एका जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी गीताचा वापर चुकीच्या पद्धतीने करून मूळ गाण्यात प्रेमाची जी उत्कट भावना व्यक्त झाली आहे तीला छेद देऊन त्या शब्दांचा उपयोग वेगळ्याच भावनांसाठी व्यक्त होतांना दाखवला आहे. म्हणून गाण्याचा खून हा त्या संगीत शिक्षकांचा शब्दप्रयोग लेखात व शीर्षकात करावासा वाटला.  

आजकालच्या सिनेमातून क्वचितच चांगली गाणी ऐकायला मिळतात. जी जुनी चांगली गीते आहेत त्यांचे "टिन कनस्तर पीट पीट कर गला फाड कर चिल्लाना"  या पठडीत नव्याने निर्माण केलेले रिमिक्स व्हर्जन्स व तशीच काहीशी नवीन गीते असे आजकालच्या गीतांचे स्वरूप असते. दुर्दैवाने गीते, चित्रपट, साहित्य, नाटके यांची उत्तमोत्तम अशी निर्मिती दिवसागणिक कमीच होत आहे. जाहिरात क्षेत्रात सुद्धा तेच. आपल्या उत्पादनाचा खप व्हावा म्हणून निर्माते जाहिराती करतात , जाहिरातीचे युगच आहे असे म्हटले जाते. जाहिरातीस काही विरोध नाही परंतू जाहिराती तयार करतांना जाहीरात निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीच्या भरा-या पाहून आश्च्रर्य वाटते. लहान मुलांच्या गोळ्यांच्या जाहिरातीत एक माणूस टीव्हीवर त्या गोळ्यांची जाहिरात पाहतो व "टेम्पटेशन" होऊन टीव्हीलाच चाटतो असे दाखवले आहे. दुस-या एका चॉकलेटच्या जाहिरातीत एक वृद्ध इसम लहान मुलाला चॉकलेट न देता त्याच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेतांना दाखवले आहे. तो वृद्ध म्हणजे त्या मुलाचे आजोबाच असावेत. आपल्या भारतात आजी आजोबा हे नातवंडांना दुधावरची साय समजून त्यांच्यावर स्वत:च्या मुलांपेक्षाही अधिक  प्रेम  करतात. काही जाहिरातीत हिंदू देवी देवता सुद्धा व्यंगात्मक पद्धतीने चित्रित केलेले दाखवले आहे. आणखी एका जाहिरातीत "Thank You यार तुने कूछ नही किया" असा संवाद आहे. "They only live who live for others" अशी शिकवण देणा-या स्वामी विवेकानंदांच्या या देशात दुस-यासाठी काहीतरी करावे, दुस-याच्या मदतीस जावे, कर्म करून योग साधावा अशी शिकवण  दिली जात असतांना हे "Thank You यार तुने कूछ नही किया" म्हणजे कर्म न करणे चांगले असेच काहीसे  नवीन पिढीच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे हेतुपुरस्सर आहे का असा प्रश्न पडतो. अंतर्वस्त्रांच्या जाहिराती करतांना तर जाहिरात निर्मात्यांच्या कल्पनेच्या भरा-या उत्तुंगतेच्या सीमा गाठतात. अशा या जाहिराती असतात. आता जाहिरातीत झालेल्या गाण्याच्या खूनाच्या मुद्द्यावर येऊ. परवा बातम्या पाहतांना ब्रेक मध्ये एक पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची जाहिरात लागली. तसे तर अंतर्वस्त्रे म्हणजे खाजगी बाब पण त्यांच्या जाहिरातीने लिहीण्यास भाग पाडले. पुरुष अंतर्वस्त्रे एका ललनेस आकर्षित करतात हे दाखवतांना जाहिरात बनविणा-याने त्या जाहिरातीत 50 च्या दशकातील यहुदी चित्रपटाच्या एका श्रवणीय, हृदयस्पर्शी व आजही हिट असलेल्या मुकेशने गायलेल्या एका गीताचा वापर केला आहे.  हे गीत म्हणजे "ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरूर". अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत या गीताचा वापर म्हणजे या गीताचा खूनच म्हणता येईल. यहुदी म्हणजे माझ्या जन्माच्याही 25 वर्षे अगोदरचा सिनेमा तो पाहिला नाही परंतू जुनी सिनेगीते अमर आहेत, त्यांचा गोडवा अमीट आहे त्यामुळेच ती आजच्या पिढीला सुद्धा माहीत आहे. 

"ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरूर

 तू न पहचाने तो ये है तेरी नजरोका कुसूर " 

हे गीत कित्येकदा ऐकले आहे. प्रेमात ठोकर खाल्लेला एक यहुदी युवक आपल्या प्रेमाच्या तरल भावना या गीतातून व्यक्त करतो. 

दिल को तेरीही तमन्ना, दिल को है तुझसेही प्यार

 चाहे तू आये ना आये , हम करेंगे इंतजार 

आपल्या प्रेमिकेला तो म्हणतो की तू ये किंवा नको येऊ मी तुझी वाट बघतच राहील. काळाच्या ओघात हे असे प्रेम नष्ट झाले. गुलाब दिला की आठवड्याभरातच ब्रेक अप पण होते. अशा या पिढीला ही गीते व त्यातील भावना, त्या गीताचा दर्जा, गीतकाराची काव्य प्रगल्भता ती काय समजणार ? आणि म्हणूनच याच पिढीतील या जाहिरात निर्मात्यांना अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीसाठी या उपरोक्त गीताचा वापर करावासा वाटतो. "गाढवाला गुळाची चव काय" ही म्हण या उपरोक्त जाहिरात निर्मात्यांना तंतोतंत लागू पडते. या गीताप्रमाणे इतरही अनेक जुन्या गीतांचा वापर जाहिरातीत चुकीच्या पद्धतीने अनेक वेळा केल्या गेला आहे. मागे एका अंतर्वस्त्राच्या जाहिरातीवर सरकारने बंदी सुद्धा आणली होती. माहिती व प्रसारण खात्याने उपरोक्त जाहिरातीप्रमाणे असणा-या इतरही अनेक जाहिरातींवर बंदी आणून अशा जाहिरात निर्मात्यांच्या थोबाडीत लगावली पाहिजे. गीत गायन करतांना एकवेळेस हरकती घेतांना झालेल्या चुका क्षम्य आहे परंतू जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी अशा गीतांचा वापर हा अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत करणे, त्यात तोकड्या कपड्यातील कलाकारांना विक्षिप्त आविर्भाव प्रकट करतांना दाखवणे म्हणजे त्या परीश्रमपूर्वक व प्रसंगानुरूप बनवलेल्या गीतांचा खूनच करणे नाही का ? 

👉 जुन्या गीतांच्या चाहत्यांसाठी गाण्याची लिंक 

 https://www.youtube.com/watch?v=jBxDcoFVdVQ              

३०/०३/२०२३

Article about Orange City Warud city( California of Vidarbha Region) of Amravati District, Maharashtra, India

विदर्भाचा कॅलिफोर्निया - वरुड 


अत्युत्कृष्ट,सुमधुर असलेल्या संत्र्यांमुळे वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखतात. संत्रे म्हटले की नागपुरी संत्र असे म्हटले जाते. परंतू वरुड मध्ये पिकणारी संत्री हीच सर्वात चविष्ट असल्याचे जाणकार व जुनी माणसे सांगतात. एकदा एका स्वामीजींना मी वरुडची संत्री अर्पण केल्यावर त्यांनी ती आनंदाने भक्षण केली होती व वरुडच्या संत्र्याचे महत्व सांगितले होते.

वरुड,अमरावतीच्या पुढे 80-85 किमी अंतरावरील गांव. मध्यप्रदेशच्या सीमेलगतचे एक छोटे परंतू टुमदार गांव. अमरावतीहून नागपूरला जायचे असेल तर कोंढाळी, कारंजा घाटगे या मार्गाप्रमाणेच मोर्शी-वरुड-काटोल या मार्गाने सुद्धा जाता येते. अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तालुका स्थान असलेले हे शहर रेल्वेच्या नकाशावर सुद्धा आले. या शहराशी माझा संबंध आला तो 25/26 वर्षांपुर्वी, माझ्या बहिणीच्या विवाहोपरांत. हे शहर सुद्धा नात्यात आले, काहींशी चांगले मैत्र्य जडले. तत्पूर्वी वरुड हे नांव केवळ ऐकिवात होते. अमरावती, नागपूर या शहरांत गेलो होतो मात्र मोर्शी, वरुड या भागांत मात्र जाण्याचे कधी काही कामच पडले नव्हते. नंतर मात्र कित्येकदा जाणे झाले. आता काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या कॅलिफोर्निया म्हटल्या जाणा-या वरुडला जाणे झाले. अमरावती मागे टाकून बस वरुड रस्त्याला लागली होती, नुकत्याच सुरु झालेल्या उन्हाळ्यात नैसर्गिक थंड वारा खिडकीतून सुखद दिलासा देत होता. प्रवासात एकटाच असल्याने वरुड, वरुडच्या आठवणी , रम्य परिसर असे  विचार मनात घोळत होते. अमरावती- वरुड मार्ग आता काही वर्षांपुर्वी चांगला सिमेंटचा, रुंद व गुळगुळीत झाला. मला पुर्वीचा 

हिरवी श्यामल भवती शेती , पाऊलवाटा अंगणी मिळती 

नव फुलवंती , जुई शेवंती , शेंदरी आंबा सजे मोहरू 

अशा वरुडच्या वाटा आठवू लागल्या. दोन्ही बाजूंनी गर्द कडूनिंबांची झाडे, हिरवीगार शेती  व संत्रा बगीचे असलेला. (शेती अगदी लुप्तच झाली असेही नाही) तेंव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर रस्ता सुरक्षेबाबतची अनेक चांगली अशी घोषवाक्ये सुद्धा लिहिलेली होती. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कैक वर्षे जुन्या असलेल्या त्या भल्या मोठ्या कडूनिंबांच्या झाडांवार यांत्रिक करवती कराकरा फिरल्या होत्या त्यावेळी मन खिन्न झाले होते. रस्त्या वरून मला बोरांग आठवले. या भागात गाडरस्त्याला बोरांग म्हणतात. मला बस मध्ये हे आठवत होते. अमरावती सोडले की माहुली या गावाच्या पुढे गेलो की आजूबाजूने संत्र्यांच्या बागा दिसू लागतात. रात्रीच्या शेवटच्या बसने मी जात होतो. अंधार असला तरी मला बसच्या हेडलाईटमुळे  बरेच ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला नवीन वृक्षारोपण झालेले दिसले, परतीच्या , दिवसाच्या प्रवासात ही किशोरवयीन झाडे पाहून मला फार आनंद झाला. पुनश्च हा रस्ता पूर्वीसारखाच boulevard  होईल असे वाटले. यंदाच्या माझ्या वरुड प्रवासात वरुड शहरात मला खुप बदल झालेले जाणवले. मी एकटाच असल्याने व माझा प्रवास हा कोणतेही कारणरहित सहज व निचंतीचा असल्याने हे बदल मी निरक्षित होतो. अमरावतीहून वरुडला येत असतांना वरुडच्या अगदी अगोदर जरुड हे गांव येते नंतर वरुड. वरुडच्या पंचक्रोशीत येताच काही शासकीय निवासस्थाने व शासकीय विश्राम गृह आपल्याला दिसते.  याच भागात 25 वर्षांपुर्वी संत्रा बागा दिसत त्यांची जागा आता नवीन ले-आऊट ने घेतलेली दिसली , काही ठिकाणी नवीन घरे सुद्धा झालेली दिसली. दिवसागणिक NA/ आकृषक  जमिन वाढतच चालली आहे किंवा करवून घेतल्या जात आहे. लाखो करोडोंची उलाढाल होते आहे. NA , ले आऊट , बांधकाम क्षेत्र , यांमुळे पुर्वाश्रमीच्या कास्तकाराकडे बक्कळ पैसा आला. परंतू काही कास्तकार एकरकमी आलेल्या या लक्ष्मीचा चांगला विनियोग करु शकले नाहीत व ते देशोधडीला लागल्याच्या बातम्या वाचल्याचे मला स्मरले. या सर्वांमुळे व शेतीबाबत अनुत्साही असलेल्या तरुण पिढीमुळे शेत जमिनीचे भविष्य काय ? हा प्रश्न मनाला शिऊन गेला. हा रस्ता राज्य परीवहन मंडळ बस स्थानकाकडे जातो. एक सहप्रवासी एका थांब्यावर उतरल्याने माझ्या विचारांत खंड पडला. आता हा रस्ता चांगलाच रुंद झालेला दिसला. विश्राम गृहाजवळून गावाकडे जाणारा एक जुना रस्ता सुद्धा आहे. या ठिकाणी आता "I Love Warud" अशी विद्युत दिव्यांची पाटी लावलेली दिसली. बस स्थानक ते गावाकडे जाणा-या रस्त्याने आता आधुनिक स्वरूप धारण केले आहे. मोठ्या मोठ्या शो रूम, दिमाखदार अशी मोठाली व आकर्षक दुकाने,  दवाखाने , पेट्रोल पंप, मोठ्या इमारती असे दृश्य आता दिसते. पुर्वी हा रस्ता विरळ होता. येथूनच गावाकडे जातांना एक रस्ता नागपूर, एक भिलाई तर डावीकडचा एक मुलताईकडे जातो. वरुड हे रोड जंक्शन आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते इथून जातात. गावात केदारेश्वर मंदिर , देशबंधू दास वाचनालय , विठ्ठल मंदिर अशी काही जुनी प्रतिष्ठाने आहेत. तर गावाजवळ सालबर्डी, नागठाणा अशी निसर्गरम्य देवस्थाने आहेत. गावात प्रवेश केल्यावर केदार टॉकीज म्हणजेच केदार चौक आहे. टॉकीज आता राहिली नाही, मोठे व्यापारी संकुल झाले आहे. अनिल कपूरचा कुठलातरी सिनेमा या टॉकीज मध्ये पाहिल्याची आठवण मला उगीचच त्या व्यापारी संकुलाकडे पाहिल्यावर झाली. एकेकाळी हजारोंचे मनोरंजन करणारा, लाखोंची तिकीट विक्री व मनोरंजन कर भरणारा टॉकीज व्यवसाय बघता बघता डबघाईस गेला. रात्री भोजनोपरांत विश्राम केला. सकाळी आन्हीके आटोपल्यावर सहज म्हणून गच्चीवर गेलो. इथे गच्चीला गच्चा असे म्हणतात. अनेक शब्दांचे उच्चारण इथे थोडे वेगळ्या पद्धतीने करतात.  वरूडला गेलो की बरेचदा गच्चीवर जातोच. यंदा तर ब-याच दिवसांनी वरुडला जाणे झाले होते. वरून चौफेर नजर फिरवल्यावर सकाळी बाजारपेठेत झालेला बदल दिसलाच होता व आता गच्चीवरून वरुड शहरातील घरांमध्ये झालेला लक्षणीय बदल सुद्धा जाणवला. नव्या घराच्या मागे लगतच बहिणीचा जुना माडीचा वाडा दिसतो. 

चौकटीवर बाल गणपती , चौसोपी खण स्वागत करती , 

झोपाळ्यावर अभंग कातर , सवे लागती कड्या करकरू     

असा तो वाडा जावाई बुवा व त्यांच्या बंधूंनी अजूनही चांगला राखून ठेवला आहे. झोपाळा म्हणजेच बंगई सुद्धा आहे. याच बंगईवर बहिणीचे रुबाबदार सासरे गोपाळराव लोहकरे बसत असत. गच्चीवरून दूरवर सातपुड्याच्या पर्वत रांगा दिसतात. कौलारू घरे व त्याच्या पार्श्वभूमीला सातपुडा पर्वत व आदित्यराजाच्या  सांजवेळीच्या रंगछटा असे ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत असे. पुर्वी दिसणा-या कौलारू घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतलेली दिसली. पुर्वी दिसणा-या कौलारू घरांचेच दृश्य मला अधिक भावत असे परंतू बदलाला कोण रोखू शकते. दूरवर दिसणा-या त्या निळसर सातपुड्याच्या रांगांचे निरीक्षण करता करता 

"आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु , 

खेड्या मधले घर कौलारू 

या गदिमांच्या कवितेच्या ओळी व कविता आठवली. आता वरुड मध्ये अत्यल्प झाली असली तरी लगतच्या खेड्यांमध्ये मात्र आजही जुनी कौलारू घरे दिसतात. अत्युत्कृष्ट, सुमधुर

असलेल्या संत्र्यांमुळे वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखतात. संत्रे म्हटले की नागपुरी संत्र असे म्हटले जाते. परंतू वरुड मध्ये पिकणारी संत्री हीच सर्वात चविष्ट असल्याचे जाणकार व जुनी माणसे सांगतात व खाणा-याला सुद्धा त्वरित लक्षात येते. एकदा एका स्वामीजींना मी वरुडची संत्री अर्पण केल्यावर त्यांनी ती आनंदाने भक्षण केली होती व वरुडचीच संत्री सर्वोत्तम असल्याचे सांगीतले होते, माझ्याकडे ती कशी आली याची विचारणा केली होती. अशी ही वरुडची संत्री. शहरांचे आकर्षण, जागतिक उष्णता वाढ, जगात  झपाट्याने होणा-या बदलांसोबत बदलत जाणारे वरुड मी न्याहाळले. आज येथील नवीन पिढी शिक्षण , नोकरी अनुषंगाने दूरदेशी गेली आहे. 

"माजघरातील उजेड मिणमिण , वृद्ध कांकणे करिती किणकिण

किणकिण ती हळू, ये कुरवाळू दूरदेशीचे प्रौढ लेकरू   

नोकरी निमित्त येथून गेलेले शहरी, विदेशी चमकधमक भावलेले  तरुण पुनश्च येथे येतील का ? हा विचार सुद्धा मनी दाटला. माझी आता वरुड भेट संपुष्टात आली होती. मी बस मधे बसलो. वरुड शहराचा काही भाग न्याहाळता न्याहाळताच माझी बस गावापासून खुप लांब आली. ज्याप्रमाणे वरुड मधील कौलारू घरे लुप्त झाली तसे आगामी काळात होणा-या बदलांमुळे येथील संत्रा बागांचे सुद्धा काय होणार ? माझ्या मनात भीतीयुक्त शंका आली . एवढ्यात हिवरखेड गावाजवळच्या एका संत्र्याच्या मोठ्या नर्सरीत मला काही लहान मुले संत्र्याची रोपे घेऊन जात असलेली दिसली व हा संत्रा आगामी काळात सुद्धा बहरतच राहील असा सकारात्मक विचार माझ्या मनात चमकून गेला. शासनाने सुद्धा संत्रा बागायतदारांसाठी पुढाकार घ्यावा असे वाटले. वरुड केंव्हाच मागे पडले होते. 25 वर्षांपूर्वीचे वरुड व आताचे बदललेले वरुड अशी स्मृतीचित्रे आणि वरुडची संत्री सोबत घेतलेल्या मला ती बस माझ्या  गंतव्यस्थानाकडे घेऊन धाऊ लागली.  

✍️विनय वि. वरणगांवकर©

1 नवीन पिढीसाठी 

गदिमा - गजानन दिगंबर माडगुळकर (प्रख्यात कवी, लेखक,  गीत रामायण रचयिते)

boulevard = दुतर्फा झाडे असलेला रस्ता