Click "Follow" Button below To Follow this Blog

२०/०४/२०२५

Article about a story of a self made man

असाही एक 'विजय'पथ

...कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. विजुभाऊ यांची ही स्टोरी  तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल... 

हा विजयपथ आहे एका जिद्दी होतकरू गरीबीतून वर येऊन व्यवसायात स्थापित होणाऱ्या एका तरुणाचा. खामगांव येथील टिळक स्मारक मंदिरचे तत्कालीन काळजीवाहक श्रीरामजी शिंदे यांना 20/4/1965 रोजी द्वितीय पुत्र प्राप्त झाला. नांव ठेवले विजय, विजय श्रीराम शिंदे. घरची परिस्थिती बेताचीच, कमीत कमी पैशात घरखर्च भागवावा लागे म्हणून मग श्रीराम शिंदे आणि भिकाबाई यांनी आपल्या मुलांचे  प्राथमिक शिक्षण न.प.शाळा आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मध्येच केले. आई वडिलांना मदत म्हणून लहानग्या विजयने इयत्ता चौथी मध्येच असतांना 50 पैसे रोजाने कामकाज करण्यात सुरुवात केली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. शिक्षण अर्धवटच राहिले. विजय आता तरुण झाला होता. घर खर्च वाढू लागला होता, तो भागवता यावा म्हणून विजयने मुंबई येथे कष्टात दिवस काढून शिवणकाम शिकले. लहानपणीच रोजाने काम केल्यामुळे व त्यातील चांगल्या वाईट अनुभवामुळे विजय शिंदे यांच्या डोक्यात नोकरीपेक्षा व्यवसायाच करावा असे ठसले होते त्यामुळेच मग 1984 मध्ये स्टेट बँकेमध्ये नोकरी मिळाली होती परंतु तेरा दिवस काम करून ती सोडून दिली आणि आपल्या शिवणलेच्या जोरावर 1986 मध्ये खामगांवातील तत्कालीन श्याम टॉकीज म्हणजेच आताच्या सनी पॅलेस जवळ टेलरिंगचे दुकान सुरू केले. हे दुकान विजय शिंदे यांनी पाच वर्ष चालवले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 1991 मध्ये विजयचे दोनाचे चार हात झाले नववधूच्या पायगुणामुळे जगदंबा चौकामध्ये टेलरिंगचा त्यांचा व्याप वाढला. विजय मग विजयराव/विजुभाऊ या नावाने ओळखला जाऊ लागला. चार वर्षे या ठिकाणी व्यवसाय केल्यानंतर पुढे विजुभाऊ शिंदे हे 1996 ते 99 सिल्लोड येथे गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी यशस्वी रीतीने टेलरिंग व्यवसाय केला. अर्थार्जनाचे आणखी काही मार्ग असावेत म्हणून 2001 मध्ये त्यांनी फटाक्याचे दुकान लावायला सुरुवात केली आणि 2006 पर्यंत ते फटाक्याचे दुकान लावत असत. व्यवसायात आवड असल्यामुळे आणि सतत नव्याचा ध्यास, जिद्द , उमेद असल्याने बोलका स्वभाव असलेले विजुभाऊ खामगांवात सुपरिचत झाले. पुढे काळात झालेला बदल लक्षात घेता व लोकांच्या खाद्याच्या अभिरुचीत झालेला बदल ध्यानात घेऊन त्यांनी 2002 मध्ये एलआयसी समोर फौजी कॉर्नर म्हणून खामगावातले पहिले चायनीज आणि पिझ्झाचे उपाहारगृह सुरू केले. त्यासाठी त्यांनी नेपाळी कारागीर आणले होते. त्या काळात खामगांवला साऊथ इंडियन पदार्थच तर क्वचितच मिळत असत आणि तेव्हा पिझ्झा आणल्यामुळे विविध क्लबच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा पिझ्झाचा स्टॉल लागत असे आणि म्हणून लहान मुलांमध्ये जे पिझ्झावाले अंकल किंवा पिझ्झा वाले मामा म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे 2006 मध्ये विजूभाऊंनी टेंभुर्णा फाट्यावर शिवराणा ढाबा सुरू केला आणि तो सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या अनेक वर्ष चालवला. पुढे वृद्धापकाळमुळे शिस्तप्रिय व टिळक स्मारकचे काम चोख बजावणारे श्रीराम शिंदे म्हणजे विजय शिंदे यांचे वडील हे टिळक स्मारकच्या व्यापामधून सेवानिवृत्त झाले आणि त्यामुळे टिळक स्मारकचे केअर टेकर म्हणून विजय शिंदे यांनी कार्यभार स्विकारला. हे करत असतानाच त्यांनी 2009 मध्ये घरपोच रॉकेल वितरण हा उपक्रम सुद्धा राबवला होता आणि 2011 मध्ये एक खिडकी योजनेचा सेतू हा उपक्रम मुलासह सुरू केला मुलाने व्यवस्थितरित्या पूर्ण कारभार सांभाळला. 2012 मध्ये विजुभाऊ यांनी कॅटरिंग व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे आणि खामगांव मध्ये शिंदे कॅटरर्स म्हणून नावाजलेला आहे. या व्यवसायात सुद्धा शिंदे यांनी चांगले नाव कमावले. सचोटीने आणि उत्कृष्ट भोजन लोकांना दिल्यामुळे या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आणि शिंदे कॅटरर्स हे नाव खामगांवतच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्ये ही ओळखले जाऊ लागले. त्यांना स्वतःलाच खाण्यापिण्याची प्रचंड आवड असल्यामुळे आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे ते हा व्यवसाय आनंदाने उत्साहाने चालवत आहेत. खामगांव सोबतच अहमदनगर,  संभाजीनगर, अमरावती, अकोला, चिखली, नांदुरा मलकापूर या गावांना सुद्धा त्यांनी कॅटरिंग सेवा पुरवली आहे. याशिवाय विजुभाऊ हे विविध सामाजिक उपक्रमात सुद्धा हीरहिरीने भाग घेत असतात. 80 च्या दशकात चंदनशेष गणेश मंडळाचे ते उत्साही सदस्य होते. त्यांच्या या विविध उपक्रमांमध्ये आणि या विविध व्यवसायांच्या प्रवासामध्ये पत्नी, परीवारजन आणि मुलाचे त्यांना चांगलेच पाठबळ आहे. शिंदे यांचे दिवाळीचे फराळाचे पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहे. 

     विजुभाऊ यांना त्यांच्या मनमिळाऊ व आपलेसे करण्याच्या स्वभावामुळे खामगांव मधील अनेक लोक ओळखतात आणि त्यांच्या परिवारात सुद्धा ते भाच्यांचे लाडके मामा, बहीण भावांचे लाडके भाऊ, पुतण्यांचे आवडते काका आणि हो आता तर त्यांना नातवंड सुद्धा झाली आहेत या नातवंडाचे ते आवडते बाबाजान आहे. आज हे बाबाजान अर्थात कष्टाळू, पडेल ते काम करण्याची तयारी असलेले विजुभाऊ वयाची साठ वर्षे पूर्ण करून एकसष्टीत पदार्पण करीत आहे. आजही तरुणाला लाजवेल असाच उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. कुणीही त्यांना भेटायला गेले की ते मोठ्या उत्साहाने त्याच्याशी संवाद साधतात आणि आपल्या दिलखुलास स्वभावामुळे वातावरण प्रफुल्लित ठेवतात. अशा या नांवातच विजय आणि "श्रीराम" असलेल्या व्यक्तीला लोकप्रियता आणि यश कसे नाही मिळणार ? 

     आज विजुभाऊ शिंदे हे नाव सर्वपरिचित असे झालेले आहे. विविध क्षेत्रातील राजकीय,  सामाजिक, सेवाभावी,  औद्योगिक अशा प्रत्येकच क्षेत्रात विजूभाऊंचे नांव आहे, चांगली ओळख आहे. "कर्तव्याने घडतो माणूस" या उक्ती प्रमाणे  विजुभाऊ आपले कर्तव्य पार पाडत गेले व आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले असे व्यक्तिमत्व आहे.

   अशा होतकरू, कष्टाळू, मोठा मित्रपरिवार  असलेल्या विजय शिंदे यांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा परिवार आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर  वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  आगामी कार्यकाळात त्यांचा व्यवसाय अधिकाधिक नांवलौकिक प्राप्त करो आणि त्यांना आरोग्यदायी असे दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

   विजय शिंदे यांनी लहानपणापासून कष्ट घेतले आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून अर्थार्जन करून आपले कुटुंब सांभाळले शिवाय त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना रोजगार सुद्धा मिळाला व मिळतो आहे. आजच्या शानशौकीत राहणाऱ्या तरुणांना विजय शिंदे यांची ही स्टोरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

   कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.  

माहिती स्त्रोत - भूषण शिंदे

शब्दांकन - विनय वि. वरणगांवकर, स्तंभलेखक


१७/०४/२०२५

Article about Bangal riots and Nation Building

 राष्ट्र उभारणीतील उणीवा


बंगालमध्ये सध्या जो हिंसाचार होतो आहे, जाळपोळ, हत्या होत आहेत व इतर वेळीही देशात अशा घटना घडतात. हिंसाचारी लोकांवर कठोर शिक्षा होईल अशा कायद्यांची आपल्या देशात नितांत आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांनी नाही का एका बलात्काऱ्याचा चौरंगा केला होता.

भारत स्वतंत्र होऊन 80 वर्षे होत आली. पारतंत्र्यात इंग्रज आपल्याला रेल्वे, तार, डाक खाते अशा काही सुविधा देऊन गेले आणि त्यामुळे आपला बराच मोठा फायदा झाला.  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भारतामध्ये उद्योग, व्यवसाय फारच मंद गतीने वाढले. बजाज स्कूटर, मारुती कार या भारतामध्येच निर्मित व्हायला बराच कालावधी जावा लागला. लायसन्स राज मोठ्या प्रमाणात होते. शेतीमध्ये सुद्धा भरमसाठ उत्पादन होण्यास बराच कालावधी लागला. स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती या उत्पादन क्रांत्या सुद्धा बऱ्याच वर्षांनी झाल्या. तदनंतर शेती व इतर उत्पादने वाढली. आपल्याच सोबत स्वतंत्र झालेले सिंगापूर हे विकासाच्या दृष्टीने आपल्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेले. तसेच आपल्या देशात शिस्त आणि कठोर कायद्यांचा सुद्धा अभाव आहे. त्यामुळे दंगली, जाळपोळ, बलात्कार यासारख्या गुन्ह्यात अडकलेल्या समाजकंटकांना म्हणावी तशी कठोर शिक्षा होत नाही आणि त्यामुळे काही दिवसातच या गुन्ह्याचे आरोपी हे जामिनावर सुटून पुन्हा आपल्या समाजकंटकी कारवाया सुरू करतात. आज आपण बंगाल जळतांना पाहतोच आहे. मुर्शिदाबाद, मालदा या ठिकाणी मुस्लिम म्हणा किंवा बांगलादेशी घुसखोर म्हणा यांनी मोठा उत्पात घातलाय. रोम जळत असतांना निरो बासरी वाजवत होता त्याप्रमाणे ममता बॅनर्जी मतपेढी नाराज होऊ नये म्हणून स्वतःचीच हेकी मिरवतांना दिसत आहे. स्वातंत्र्यानंतर आपण संघराज्य पद्धती अवलंबली लोकशाही दृष्ट्या ते योग्यच आहे परंतु अनेकदा आपण बघतो केंद्राने लागू केलेले कायदे काही राज्ये त्यांच्या राज्यात लागू करत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याच देशात कायद्यांच्या बाबतीत विरोधाभास दिसतो, विसंगती दिसून येते. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची पेन्शन केंद्राने बंद केल्यावर काही राज्यांनी पेन्शन सुरू ठेवले तर काही राज्यांनी पेन्शन बंद केले. एक देश, एक विधान, एक प्रधान असे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मत होते. परंतु आज काही राज्यांनी त्यांची राज्यगीते त्यांचा राज्यध्वज असे ठरवून टाकले आहे त्याप्रसंगी सुद्धा वाद निर्माण झाला होता. राज्या-राज्यातील संबंध, त्यांचे ध्वज, काही राज्यांची केंद्राच्या धोरणांविरुद्ध अशी भूमिका घेणे हे आपल्या देशाला फुटीरतेकडेच घेऊन जाण्याचे लक्षण आहे. शिक्षणाच्या बाबतीतील कायदे सुद्धा वेगवेगळी आहेत. समान नागरी कायदा अद्याप लागू झालेला नाही. इतर विकसित देशात सर्व नागरिकांना सारखेच नियम आहेत इथे मात्र स्वतंत्रता प्राप्तीनंतर तसे काही केलेच नाही.  आपल्या देशाने सर्वधर्मसमभाव अशी भूमिका घेतली पण  एकीकडे काही लोकांना अपत्यांबाबत काही नियम अटी नाही तर दुसरीकडे सरकार इतर काही लोकांना हम दो हमारे दो सारखी शिकवण देत राहिली. वक्फ सारखे नियम मुस्लिम राष्ट्रात नसतांनाही भारतात मात्र ते लागू झाले. इथेही तसेच, काही लोकांना कुठल्याही जमिनीवर हक्क सांगता येतो तर इतर लोकांना मात्र तसे अधिकार नाही. हा केवढा मोठा विरोधाभास आणि सर्वधर्म समभाव असतांना मग जमिनीबाबतचे असेच धोरण सर्वाँना हवे. पण तसे नाही मग हा इतर धर्मीयांवर हा अन्याय नाही का ?  हिंसाचार, बलात्कार करणाऱ्या विरोधात तर कठोरात कठोर कायदे पाहिजे म्हणजे पाहिजेच.  आपल्या देशात अनेकदा दुर्दैवाने असे चित्र दिसून येते की  मानव अधिकारवाले या हिंसाचाऱ्यांच्या बाजूने उभे ठाकतात. 

     आपल्या देशात राजकारण हे सदैव सत्ता केंद्रित राहिले आणि मग सत्तेसाठी लोकशाहीची शक्ले करून फक्त सत्ताप्राप्ती हेच नेत्यांचे ध्येय राहिले. आजही आपल्याला हेच चित्र दिसून येते. जनता सुद्धा मतदान करताना सक्षम उमेदवारास न पाहता आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करतात. राष्ट्रहिताच्या विधेयकांवर आपले राजकीय पक्ष एकत्र येतांना दिसत नाही. 370, तलाक यावेळी आपण असे चित्र बघितले आहेच.

    मुद्दा हा आहे की बंगाल मध्ये सध्या जो हिंसाचार होतो आहे, जाळपोळ, हत्या होत आहेत व इतर वेळीही अशा घटना घडतात त्यावेळी या लोकांवर कठोर शिक्षा होईल अशा कायद्यांची आपल्या देशात नितांत आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांनी नाही का एका बलात्काऱ्याचा चौरंगा केला होता. पण आपल्या देशात नेते मंडळी शिवाजी महाराजांचा फक्त राजकारणासाठी वापर करतात. शिवशाही प्रस्थापित करण्याचा मात्र प्रयत्न करत नाही. राष्ट्रीय मुद्द्यांवर राजकारण्यांचे एकत्र न येणे, राज्यांनी आडमुठी भूमिका घेणे,  हिंसाचा-यां विरुद्ध कठोर कायदे नसणे, जनतेने योग्य उमेदवार न निवडणे, भ्रष्टाचार, सर्वांना समान कायदा नसणे इ. अशा अनेक उणीवा आजही 80 वर्षानंतर शिल्लकच आहेत. इतरही अशा अनेक उणीवा असतील म्हणूनच आपल्या राष्ट्राची जशी उभारणी व्हायला पाहिजे होती तशी दुर्दैवाने होऊ शकली नाही. 

     इथे राष्ट्र उभारणी म्हणजे केवळ पायाभूत सुविधा, विकास हा अर्थ नसून नागरिकांना शिस्त आणि कठोर कायदे त्या कायद्यांची अंमलबजावणी असे आपल्या देशात होऊ शकले नाही आणि देशातील सर्व धर्मीयांना आपण समान कायद्या कायद्याखाली अद्याप आणू शकलो नाही असा अर्थ अभिप्रेत आहे.

१०/०४/२०२५

Eating cake is harmful ?

केक नव्हे भाकरच खा ! 

    
केकची तर आता प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केकसाखरपुडा असो कापा केकदुकान उद्घाटन असले की लाओ रे केकअशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. 

केक हा तसा विदेशी पदार्थ पण भारतात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतात केकची मागणी गेल्या काही वर्षांपासून खुप वाढली आहे. साहेबांच्या आगमनानंतर भारतातील लोकांना  बेकरीत बनत असलेल्या मैद्याच्या पदार्थांची ओळख झाली आणि आजकाल तर बेकरीचे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जात आहे. त्यातल्या त्यात केक तर खूपच लोकप्रिय झालेला आहे. पुर्वी वाढदिवस कधी येत आणि कधी जात हे  माहित सुद्धा पडत नसे. परंतु गत काही काळापासून वाढदिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खेड्यापाड्यात सुद्धा वाढदिवसाचे मोठे स्तोम माजलेले दिसते. गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्याचे सुद्धा वाढदिवसाचे मोठमोठाले फलक लागलेले दिसतात. किशोरवयीन मुले तर वाढदिवसाचा केक रस्त्यावरच कापतांना दिसतात. भारतात वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत तशी बरीच जुनी आहे पण ती फक्त उच्चभ्रू समाजातच होती आता ती सार्वत्रिक झाली आहे. आजकाल तर वाढदिवसच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये केक कापला जातो. केकची जणू प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केक, साखरपुडा असो कापा केक, दुकान उद्घाटन असले की लाओ रे केक, अशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. भविष्यात तर "अरे केक आणा रे, आपली प्रथा आहे ती, आपले बाबा, आजोबा कापत नव्हते का !" अशी वाक्ये सुद्धा आगामी पिढी उच्चारतांना दिसेल असे म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. हिंदुत्वाचा आपण मोठा अभिमान बाळगतो पण हिंदू धर्मात हा विदेशी पदार्थ केक बेमालूमपणे कसा घुसला ? त्याची आपण कशी काय प्रथा पाडून घेतली ? हा विचारही आपल्या मनास कधी शिवला नाही किंवा कार्यक्रम साजरे करीत असतांना उपस्थितांपैकी कोणीही, "अरे केक काही आवश्यक नाही, कशाला आणता ?" असे म्हणतांना सुद्धा दिसत नाही. तसे कुणी म्हटले तरी आताची पिढी ते कितपत ऐकेल हे देव जाणे, अशीही स्थिती आहे.  बरे हल्ली हा केक केवळ खातच नाही तर तो तोंडाला सुद्धा फासतात. आजकाल तर म्हणे तोंडाला फासण्याचा वेगळा केक सुद्धा मिळतो. काय ते तोंडाला केक फासणे, काय त्या बर्थ डे बंप ! या बर्थ डे बंपमुळे तर काही मुलांचा जीव सुद्धा गेला आहे.  

        आज हे केक प्रकरण यासाठी की, मित्रांनो दक्षिण भारतात विविध आणि सुप्रसिद्ध अशा बेकरींमधून केकचे 235 नमुने गोळा करण्यात आले. या तपासणीतून धक्कादायक असे वास्तव उघडकीस आले आहे. हे केक बनवण्यासाठी जे साहित्य ( इन्ग्रेडिएंट्स ) वापरले जाते ते मनुष्याच्या प्रकृतीला हानिकारक असे आढळून आले. यामध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात उदा. अँल्युरा रेड, सनसेट येलो, टारटाझाईन हे रंग शासनाने दिलेल्या मान्यतेपेक्षाही अधिक मात्रेत टाकल्याचे आढळून आले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे या रंगांना युरोप मध्ये बंदी आहे. भारतातही या बाबतीत निर्बंध आहे पण तरीही केक व इतरही पदार्थात हे रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पिढीला जे केक आवडतात त्या लोकप्रिय अशा ब्लँक फॉरेस्ट, रेड व्हेल्व्हेट या केकमध्ये तर या कृत्रिम व हानिकारक अशा रंगांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात तर असतेच शिवाय त्यात जी साखर वापरलेली असते ती अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर असते. इथे वाचकांना तसेच तरुणाईला वैधानिक इशारच द्यावासा वाटतो की, "अशा केकच्या वा इतर असे रंग व निकृष्ट दर्जाची साखर असलेलेल्या पदार्थांच्या सेवनाने तुमची बौद्धिक व शारीरिक क्षमता तर कमी होतेच शिवाय अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारख्या असाध्य आजारास सुद्धा आपणहून आमंत्रण दिले जात आहे." तेंव्हा हे पदार्थ टाळणेच हे आपल्या हिताचे आहे. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने या अशा हानिकारक रंगांना बंदी घातली आहे. मग तरीही बंदी असलेले हे रंग आणि इतरही पदार्थ सर्रास कसे काय वापरले जात आहेत 

        दक्षिण भारतात झालेल्या या सर्वेक्षणामुळे आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. सध्या मानवी आरोग्य हे तसेही लवकर बिघडते, अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णालय दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, पुण्याचे उदाहरण ताजे आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. तेंव्हा आपण सर्वानी त्यातल्या त्यात कमी अशा हानिकारक पदार्थांचे सेवन कसे होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. लहान मुले, तरुण यांच्यात सुद्धा जागृती करणे गरजेचे झाले आहे. 

        इतिहासात लोकांना खायला भाकरी नव्हती तेंव्हा फ्रान्सच्या राणीने त्यांना "भाकरी मिळत नसेल तर केक खा !" असे एक विधान केल्याचे सर्वश्रुत आहे. ( ब्रेड मिळत नसेल तर केक खा असे ते विधान होते पण इतिहासात असे खरोखर म्हटले होते की नाही याबाबत विविध मते मतांतरे आहेत ) आजच्या धकाधकीच्या व असल्या निकृष्ट दर्जाच्या, कृत्रिम व हानिकारक घटक असलेल्या बाहेरच्या, विकतच्या पदार्थांच्या काळात सर्वांना हेच सांगावेसे वाटते की मायबापहो केक नव्हे तर आपली भाकरच खात जा ! वाढदिवसादी काही  सेलेब्रेशन करायचेच असेल तर घरीच काहीतरी गोडाच बनवत जा.




०३/०४/२०२५

Article about telangana IT park issue.

किसी को उजाड़कर बसे तो क्या बसे....

चित्र स्त्रोत - आंतरजाल

वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन, त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग, इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ?

सध्या जगात सर्वत्र विकास कार्य मोठ्या जोरात सुरू आहे. सरकार तर विकास कार्य करतच आहे परंतु शहरीकरण सुद्धा झपाट्याने वाढते आहे. या शहरीकरणामुळे शेती कमी होत आहे, शिवाय अनेक ठिकाणी भूमाफिया जमिनीवर ताबा मिळवत आहे आणि मोठमोठ्या किमतीमध्ये घरे किंवा भूखंड विकत आहेत. अतिक्रणासाठी त्यांना नाले सुद्धा कमी पडत आहेत. शेती व वने असलेली जमीन ही रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तित होत असल्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावर सुद्धा होतो, पर्यावरणाचा -हास होतो. अनेकदा जंगली जनावरे शहरात आल्याच्या बातम्या वाचनात येतात. परवाच मुंबईला एक लांडगा आल्याचे वृत्त धडकले होते. वन्य प्राण्यांची हक्काची जमीन ही बळकावली जात असल्यामुळे त्यांचे रहिवासी क्षेत्र घटत आहे आणि  त्यामुळेच ते शहरांमध्ये घुसत आहेत. 

    हा सर्व ऊहापोह यासाठी आहे की, तेलंगणाच्या हैदराबाद विश्वविद्यालय (HCU) परिसरामध्ये आयटी पार्क विकसित करण्याची योजना आहे. त्या योजनेच्या विरोधात हैदराबाद विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि सरकारने त्यांना अटक करून पुन्हा सोडून दिले.  हैदराबाद विश्वविद्यालयाच्या लगत कांचा गचिबोवली ही चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती (floura fauna) आणि विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती वास्तव्य करतात. यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, हरणे तसेच इतर अनेक वन्यजीव सुद्धा वास्तव्य करतात. आता नेमके याच जागेवर नवीन आयटी पार्क होणार आणि या कामासाठी म्हणून गेल्या सोमवारी तेलंगणा सरकार तिथे खोदकाम सुरू करणार होते परंतु मोठमोठ्या मशीन (JCB) तिथे पोहोचल्यावर विरोध सुरू झाला. हा विरोध मुख्यत्वे करून विश्वविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या परिसरात  पर्यावरणासाठी काम करणारी वाटा फाऊंडेशन ही संस्था करत आहे. आयटी पार्क होणे, उद्योग प्रस्थापित होणे हे जरी वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून चांगले असले तरी त्यासाठी वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग , इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ? या पृथ्वीवर केवळ मनुष्याचा अधिकार नाही तर ही ईश्वराने रचलेली सृष्टी आहे आणि यावर मनुष्यासोबतच इतर चराचरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तेलंगणा सरकारला किंवा इतर कोणत्याही सरकारला उद्योग व्यवसायासाठी म्हणून जर जागा लागत असेल तर ती केवळ मोठ्या शहरालगतच न घेता वेगवेगळ्या छोट्या शहरात विभागून घेतली तर विकासाचा प्रादेशिक समतोल सुद्धा साधला जाऊ शकतो. मोठमोठ्या शहरांमध्येच उद्योगधंदे आणल्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम, गुन्हेगारी, झोपडपट्ट्या, अस्वच्छ वस्त्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच सर्वच ठिकाणच्या नेत्यांनी उद्योग व्यवसाय हे एकाच ठिकाणी केंद्रित न करता विविध शहरांमध्ये स्थापित होतील अशी पावले उचलली पाहिजे आणि त्यासाठी उजाड जमिनीचा वापर केला पाहिजे. शेती योग्य जमीन, वनांची जमीन यावर जर सरकारच्या किंवा बिल्डर लॉबीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली जाऊ लागली तर वन्यजीव व इतर प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे काय होईल? आपले जीवनचक्र कसे चालेल? भारतातल्या सर्वच संत मंडळींनी आपल्याला वनचरे ही आपली सोयरे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्यांची चिंता करायलाच पाहिजे. मोर तर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, काही वर्षांपुर्वी पंतप्रधान मोदी यांचा मोरांसोबतचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांवर झळकला होता. राष्ट्रपती भवन तसेच दिल्लीतील अनेक सरकारी निवासस्थानाच्या परिसरात मोरांचे वास्तव्य आहे. मग अशा या तेलंगणातील मोरांच्या हक्काच्या जागेवर  बुलडोझर कसे काय फिरणार? ही जमीन 1975 पासून सरकारी जमीन असल्याचे म्हटले आहे परंतु 2022 मध्ये सरकार जवळ या जमिनीची कागदपत्रे नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे आणि आगामी काही दिवस तिथे विकास कार्यास सुरुवात करण्यास स्थगिती दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या जमिनीमुळे विकास होणार आहे आणि रोजगार निर्माण होणार आहे असे म्हटले आहे आणि या विद्यार्थ्यांना कोणीतरी चिथावणी दिली असल्याचे म्हटले आहे.  

  तेलंगणा सरकार वनांची जागा, ज्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी तसेच इतर वन्यजीवांचे वास्तव्य आहे असे त्यांचे घर नष्ट करून त्या जागेवर त्या जागेवर आयटी पार्क उभारत आहे या पार्श्वभूमीवर त्यांना हेच म्हणावेसे वाटते की 

किसी का घर उजाडकर बसे तो क्या बसे 

किसी को रुलाकर हंसे तो क्या हंसे ?

✍️विनय वि. वरणगांवकर©

03/04/25

आभार - विनय नंदनपवार

२७/०३/२०२५

Article about statements of leaders on history

 इतिहास मत पूछो ! 

इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही  दिवसांत तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात संदर्भहीन भाष्ये करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या लेखाचे जे शीर्षक आहे ते वाक्य सतत आठवत आहे. माणसाच्या स्मरणात काय राहील काही सांगता येत नाही. या वाक्याचे सुद्धा तसेच आहे. माझा ज्येष्ठ बंधू कनिष्ठ महाविद्यालयात असतांना त्यांना संगारे सर इतिहास शिकवत असत. मी सुद्धा संगारे सरांचा विद्यार्थी राहिलेलो आहे ते इतिहास खूपच चांगला शिकवत असत. तर एकदा माझ्या ज्येष्ठ बंधूच्या इतिहासाच्या पिरेडला कुणीतरी विद्यार्थ्यांनी संगारे सर येण्याच्या आधीच फळ्यावर "इतिहास मत पूछो" असे लिहून ठेवले होते. सर आल्यावर त्यांनी त्या लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मी एकदा हे वाक्य एका ॲटोच्या मागे लिहिले असलेले सुद्धा पाहिल्याचे मला स्मरते. काही लोक भेटल्यावर अनेक गोष्टींची विचारणा, नसत्या चौकशा करत राहतात या उद्देशातून खरे तर हे इतिहास मत पूछो वाक्य म्हटले गेलेले आहे. पण आपल्या भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सतत ऐतिहासिक घटना, महापुरुष, खलनायक यांच्याबद्दल जी विधाने केली जातात त्यावरून हे  शीर्षकातील वाक्य नसती वक्तव्ये करणा-यांना उद्देशून म्हणावेसे वाटते. 

   खरे तर इतिहास आपल्याला बरेच काही शिकवत असतो. इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही दिवसांमध्ये अनेक तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्ये करीत आहेत. या भाष्यांमुळे काही थोर पुरुषांचा अपमान होत आहे तर काही क्रूर पुरुषांचा उदो उदो होत आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्रे यांबद्दल इतके बोलले जात आहे की जणू काही ही वक्तव्ये करणारी मंडळी तज्ञ इतिहासकार किंवा पुरातत्व तज्ञच आहे. माझ्या मागच्या छावा या चित्रपटासंबंधीत लेखात मी भाष्य केले होते की, यांना एवढेच जर का इतकेच इतिहास प्रेम असेल तर मग त्या इतिहासातील पात्रांचे गुण यांनी आपल्या अंगी बाणवायला नको का ! पण तसे मात्र आढळून येत नाही. कोणीही उठते आणि काहीही बोलून जाते परवाच काँग्रेसचे हुसैन दलवाई यांनी छ. संभाजी राजांना जी शिक्षा झाली ती शिक्षा मनुस्मृती नुसार झाली असे बेलगाम वक्तव्य केले. प्रत्यक्षात मनुस्मृती मध्ये देहदंडाबाबत काहीही सांगितलेले नाही असे तज्ञ मंडळी सांगतात. ही नाहक वक्तव्ये करणारी माणसे एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाचा रोष ओढवून घेतात, दुस-या समाजाला नाराज करून लोकशाही, संविधान यांचा सर्रास अपमान करतात. यामुळे सामाजिक एकोपा भंग पावतो. विनाकारणची उपटसुंभ वक्तव्ये करण्यापेक्षा राज्यातील प्रश्न, देशातील प्रश्न, प्लास्टिक निर्मूलन, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न यांबाबत भूमिका मांडायला नको का ? अनेक शहरात तर पाण्याची समस्या वर्षांनुवर्षांपासून तशीच आहे. इतिहासामध्ये जे काही चांगले घडले त्याचा अंगीकार सर्वांनी करायला पाहिजे तसेच जे धर्मांध, क्रूर, परकीय राजे होते त्यांचा सन्मान हा मुळीच करू नये. उगीच तो आपल्या समाजाचा होता म्हणून चांगलाच होता अशी भावना वृद्धिंगत होऊ देऊ नये. चांगल्या,  देशाभिमानी, प्रजाहितदक्ष अशा ऐतिहासिक पात्रांकडून,  घटनातून  काहीतरी बोध घेत घ्यावा. रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल खालील ओळी लिहिल्या आहेत.

 शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
समर्थ रामदास स्वामींच्या उपरोक्त ओळींप्रमाणे सांप्रत सर्वच नेते, प्राध्यापक, बुद्धीवादी यांनी इतिहासाची पाळेमुळे न  शोधता किंवा संदर्भ नसलेल्या गोष्टींबद्दल विधान करणे सोडून देऊन छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे, बाजीराव पेशवे , महाराणा प्रताप, छत्रसाल अशा थोर पुरुषांविषयी तारतम्य ठेवून वक्तव्ये करावीत. ते कसे होते ते बघावे, त्यांचे गुण घ्यावे, त्यांचा पराक्रम पाहावा. कोणीही येतो आणि छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल आधार नसलेली वक्तव्ये करून मोकळा होतो आणि मग शासन, जनता, माध्यमे हे सर्व त्यात विषयाभोवती घुटमळत राहतात, राजकारण विकास सोडून विनाकारण केलेल्या संदर्भहीन वक्तव्यांभोवती फिरत राहते. शिवाय नवीन पिढी, तरुण वर्ग संभ्रमात पडतो की, नक्की खरा इतिहास तो होता तरी काय? त्यामुळे जनतेने सध्याच्या तथाकथित नेत्यांच्या, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या इतिहासाबद्दलच्या ऐतिहासिक संदर्भ, आधार नसलेल्या विधानांकडे दुर्लक्ष करून खरा इतिहास, घटनांचा संदर्भ असलेली पुस्तके  वाचावीत. तसेच तमाम उपटसुंभ व आधारहीन वक्तव्ये करणाऱ्या लोकांना हेच म्हणावेसे वाटते की , विनाकारण इतिहास मत पूछो !
जे ज्ञात असेल व जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वक्तव्ये करावीत. उगीच कोणी काहीही विचारले नसतांना काहीही पिल्लू सोडून देऊ नये. 
अर्ल चेस्टरफिल्ड याने म्हटलेच आहे की, 
History is but a confused heap of facts.