Click "Follow" Button below To Follow this Blog

०५/११/२०२०

Problems in the heart of the city area of Khamgaon

मध्यवस्तीतील उपेक्षित वॉर्ड

जिजामाता रोड खामगांव शहरातील मध्य वस्तीतील भाग,  न्यायालय, जि.प. बांधकाम विभागपंचायत समिती  उपनिबंधक कार्यालय ,   नझुल कार्यालय , प्रशासकीय ईमारत , विदर्भ साहित्य संघांचे साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेले कोल्हटकर स्मारक , न्यायधीश निवासस्थाने , सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांचे निवासस्थान , राजीव गांधी उद्यान व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेला जयस्तंभ , बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती बँक, तलाठी कार्यालय , विद्युत कर्मचा-यांच्या संघटनेचे कार्यालय अशी सर्व कार्यालये व ईमारती असलेला हा परिसर नांदुरा रोडला लागून आहे. या परिसराच्या पलीकडे सुद्धा एलआयसी तसेच अनके बँका आहेत. असा हा खामगांव शहरातील मध्यवर्ती भाग , अनेक सरकारी कार्यालयांचा म्हणजेच महत्वाचा असा भाग आहे परंतू स्थानिक प्रशासनाचे मात्र या भागाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे. या भागाच्या अनेक समस्या आहेत. पाणी , नाल्या , रस्ते ,पथदिवे इत्यादी परंतू स्थानिक प्रशासन डोळे बंद करून बसले आहे. त्यातील काही समस्यांबाबत अनेकदा बोलणे झाले परंतू त्या समस्यांचे काही निराकरण झाले नाही. या भागातील जेष्ठ नागरीकांनी सुद्धा या समस्यांबाबत पाठपुरावा केला परंतू स्थिती “जैसे थे” च आहे. या समस्या पुढील प्रमाणे आहेत.

     नुकताच नांदुरा रोड रुंद झाला , रस्त्याच्या मध्ये दिवे लागले , त्याचे कौतुक झाले व सुरु आहे. हा रस्ता रुंद झाला हे चांगलेच झाले. याच रस्त्याला विविध रहिवासी भागातून जोडणारे जे “अॅप्रोच रोड” आहेत ते सर्व पूर्ण झाले आहेत परंतू भूविकास बँकेच्या शेजारून जिजामाता रोड परिसरात जाणा-या रस्त्याचे व पंचायत समिती जवळून न्यायाधीश निवासस्थानांकडे जाणा-या या  अॅप्रोच रोडचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. तसेच उर्वरीत रस्ता सुद्धा खराब झाला आहे.

परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आहे. उपनिबंधक कार्यालय ते कोर्टाकडे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होता व तूर्तास खराब झाला आहे.

पाण्याची समस्या या भागात नेहमीच भेडसावत असते , धरणात पाणी मुबलक असूनही पाणी पुरवठा अनियमित व अल्पवेळ असतो.


          परिसरात एक पक्क्या पाण्याची विहीर आहे परंतू ती अस्वच्छ असते. परिसरातील नागरिक वेळोवेळी ही विहीर स्वच्छ करीत असतात. या विहिरीतून पाणी पुरवठा करता येऊ शकतो परंतू स्थानिक प्रशासन याबाबत उदासीन आहे. असा पुरवठा शहरात काही विहिरीतून केला जातो. परंतु जिजामाता रोड भागात मात्र या विहिरीतून पाणी पुरवठा का नाही करता येऊ शकत ?

     याच भागातील कोर्टाला लागून असलेल्या अग्रवाल यांच्या इमारती समोर गेल्या कित्येक वर्षांपासून पथ दिवा मंजूर झाला आहे परंतु तो अद्याप लावला नाही.तसेच पूर्वी कोल्हटकर स्मारक जवळ एक मर्क्युरी लाईट होता आता तिथे आता एकही पथ दिवा नाही त्यामुळे रात्री तिकडे काही बेकायदेशीर कृत्ये घडत असतात.

      या भागातील मोकळी जागा सुद्धा अतिशय खराब आहे, या जागेच्या मागील भागात नाली नसल्याने तेथून मोठी दुर्गंधी पसरते

जिजामाता मार्ग हा शहरातील एक मध्यवर्ती भाग असूनही व या भागात प्रामाणिक करदाते असूनही या भागाची उपेक्षा होत आहे. या भागातील उपरोक्त सर्व समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे अशी या भागातील महिला व सर्व नागरिकांची आंतरिक इच्छा आहे. तेंव्हा मुख्याधिकारी व संबंधित विभाग व निर्वाची पदाधिकारी यांनी लक्ष घालावे.

२१/१०/२०२०

Article about statements of Sashi Tharur and Farooq Abdullah

कंगना विरोधात राष्ट्रद्रोहाची याचिका, शशी,फारुख यांच्या वक्तव्यांचे काय?

भारतात देशविरोधी भूमिका घेण्या-यांची मुळीच वानवा नाही. 

आपल्या देशाच्या इतिहासात अनेक देशद्रोही , देशविरोधी वक्तव्ये करणारे लोक होऊन गेलेत.परंतू स्वातंत्र्यानंतर देशविरोधकांच्या या शृंखलेत स्वातंत्र्योत्तर काळात “देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आमचे योगदान होते” अशी शेखी सतत  मिरवणा-या व दिर्घकाळ सत्ता उपभोगणा-यांच्या विचारसरणीतील अनेक नेत्यांचा समावेश झाला. आपल्याच देशातील इतर राजकीय पक्षांचा व 2014 पासून मोदी व त्यांच्या सरकारचा विरोध करता-करता अनेक नेते कुर्मगतीने देशविरोधीच होत जात असल्याचे चित्र देश पहातच आहे. मणिशंकर अय्यर हे यात आघाडीवर आहे. या महाशयांनी पाकीस्तानात जाऊन देशविरोधी वक्तव्ये केली होती. 2018 मध्ये मला पाकीस्तानातून प्रेम व भारतातून व्देष मिळतो असे वक्तव्य केले होते. मोदींना हटवण्यासाठी आम्हाला मदत करा अशी याचना ज्या पाकीस्तानला स्वत:ची , स्वत:च्या जनतेची मदत करता येत नाही त्या पाकड्यांना याच महाशयांनी केली होती. डोकलामच्या वेळी राहुल गांधी यांनी चिनच्या दूतावासात भेट दिली होती. चिन मधील कम्युनिस्ट पक्षाशी काँग्रेसने पक्षीय समझौता केल्याचे वृत्त सुद्धा झळकले होते. राहुल गांधी, मणिशंकर अय्यर यांच्यासारखेच स्वत:ला मोठे विद्वान समजणारे , इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे परंतू आयुष्यातील बहुतांश काळ विदेशात व्यतीत केल्याने भारताला न ओळखणारे , सुनंदा पुष्कर या दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये गूढरित्या मृत्यू झालेल्या सुस्वरूप महिलेचे पती असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुद्धा परवा पाकिस्तानात भारतविरोधी गरळ ओकलीच. कोरोना विरोधी लढा पाकिस्तानने भारतापेक्षा चांगला दिला, मोदी सरकार मुस्लिमांवर अत्याचार करीत आहे अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. लाहोर महोत्सवात आभासी पद्धतीने बोलतांना त्यांनी उपरोक्त उद्गार काढले होते. याच शशी थरूर यांनी 2016 मध्ये “भगतसिंग म्हणजे तत्कालीन कन्हैय्याकुमार” असे वक्तव्य करून वाद ओढवला होता. काँग्रेस नेत्यांप्रमाणेच काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरंसचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सुद्धा काश्मीर मध्ये पुनश्च 370 कलम लागू करण्यासाठी चीनची मदत घ्यावी अशा वल्गना केल्या आहेत. असे हे भारतातील नेते. यांना काय म्हणावे ? पाकीस्तान किंवा चिन येथील नेते भारतात येऊन अशा वल्गना कधी करतात का ? भारतातील प्रगल्भ लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा पुरेपूर फायदा हे संधीसाधू लोक करून स्वत:च्या राजकीय पोळ्या शेकत असतात. नजरकैदेतून फारुख अब्दुल्ला नुकतेच मोकळे झाले , ईडी ची चौकशी , काश्मीर मधील बंद पडत चाललेली राजकीय दुकानदारी यांमुळे त्यांना अस्वस्थ वाटत आहे. कंगना राणावत चित्रपटसृष्टीतील चुकीच्या बाबींवर प्रकाश टाकते , व्टीट  करते यांमुळे धार्मिक व्देश वाढतो आहे असा आरोप करीत तिच्या विरोधात वांद्रे येथील कोर्टात साहिल अशरफली सय्यद यांनी याचिका दाखल केली. या तक्रारीत कंगनाची बहिण रंगोली हिला सुद्धा समाविष्ट केले आहे. या देशात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये यापूर्वी अनेकवेळा अनेकांनी व अनेक धर्मियांनी केली आहेत. अकबरउद्दीन ओवैसी , झाकीर नाईक व इतर अनेक ज्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत त्यावेळी आता कंगना विरोधात याचिका करणारे हे साहिल महाशय कुठे होते ? साहिल महोदय आपणास खरेच आपल्या देशाचा , देशातील धार्मिक सलोख्याचा कळवळा असेल , आपणास देशात धार्मिक शांतता हवी असेल , देश व देशहित याची आपणास खरोखरच काळजी असेल तर आपण शत्रूराष्ट्राची तारीफ करणा-या व स्वत:च्या देशाची निर्भत्सना करणा-या शशी थरूर व ज्या चीनने आपल्यावर आक्रमणे केली , नुकतेच आपल्या जवानांना मारले त्या चीनची मदत 370 कलम पुन्हा लागू करण्यास घेऊ इच्छिणा-या , काश्मिरी लोकांना भारतीय म्हणून राहण्यापेक्षा चीनच्या अधिपत्याखाली रहायला आवडेल अशी वल्गना करणा-या फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात सुद्धा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका करावी असे वाटत नाही का ?  

१४/१०/२०२०

Article reminds the old magzine Chandamama (Chandoba in Marathi) for kids

स्मरण “चांदोबा”चे

प्रख्यात गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम च्या दु:खद निधनाची वार्ता रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. त्याला रसिकांनी पदुमनीला अशी उपाधी दिली होती. पदुमनिला अर्थात गाणी गुणगुणणारा  चंद्र. क्षणार्धात एस पी ची गाणी , चंद्र या गोष्टी मनात आल्या. चंद्राशी संबंधीत बाबी आठवल्या. जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे मानवी मन. क्षणार्धात मनातील विचार बदलत असतात. एकाच क्षणी आपले मन आपल्या घरी असते तर दुस-याच क्षणी ते दुस-या गोष्टीवर केंद्रित होते, तिस-या क्षणी आणखी इतरत्र. प्रथितयश कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी या मनाचे किती समर्पक असे वर्णन त्यांच्या “मन वढाय वढाय” या कवितेतून केले आहे.

“मन पाखरू पाखरू उंच उडे आभायात किती हाकला हाकला फिर येती पिकावर”

या ओळींप्रमाणे एस. पी. बालसुब्रह्मण्यमच्या उपाधीवरून चंद्र आठवला आणि चंद्रावरून बालकांसाठी चंद्रासाठी वापरला जाणारा “चांदोबा” हा शब्द आठवला व पुढे मन गेले ते एका बाल मासिकावर. वयाच्या चाळीशीच्या पुढे गेलेल्या अनेकांना नक्कीच आठवत असणार. होय त्या “चांदोबा” या लहान मुलांसाठी असलेल्या त्याच पुस्तकाबाबतच बोलतोय. चांदोबा मासिकाच्या आठवणी मनात घोळ घालू लागल्या. बस स्टँड वरील पुस्तकाच्या दुकानावर गेलो पण चांदोबा नव्हता , इतर दुकानात चौकशी केली , वृत्तपत्रवाल्याला विचारले परंतू चांदोबा जणू अमावस्या असल्याप्रमाणे गायबच झाला होता. चांदोबाची आठवण मनात घोटाळू लागली, त्यातील आकर्षक , मनमोहक अशी चित्रे पुन्हा एकदा पहावीशी वाटू लागली. परंतू करणार काय, चांदोबा काही मिळाला नाही शेवटी इंटरनेटचा आधार घेतला, गुगल सर्च केले “चांदोबा”ची माहिती आली परंतू एखादा तहानलेला व्यक्ती पाणी मिळाल्यावर पाण्याचे भांडे कोणते आहे, कशाचे बनले आहे हे न पहाता प्रथम घटाघटा जलप्राशन करतो. त्याप्रमाणे चांदोबाची माहिती न वाचता त्याच्या images पाहू लागलो. सि. के. रविशंकर यांनी काढलेली ती रेखीव चित्रे पुनश्च एकदा पाहिल्यावर पुन्हा बाल्यावस्थेत गेल्याप्रमाणे वाटू लागले. “ए वेद, ए शलाका“ म्हणून मुलांना

हाका मारल्या त्यांना चांदोबा मधील ती आकर्षक चित्रे संगणकाच्या पडद्यावर दाखवली. त्यांना सुद्धा ती भावली.
बालपणी कुठेतरी एकदा हे “चांदोबा” पाहिले त्यावर नजर खिळली होती. मला स्पष्टपणे आठवते पुस्तकातील गोष्टी वाचण्यापुर्वी त्याची पाने उलटत गेलो कारण त्यातील चित्रेच तशी होती. मग घरी “चांदोबा” आणण्याचा हट्ट करून ते वाचणे सुरु केले. त्यातील गोष्टी जरी आठवत नसल्या तरी त्या गोष्टीतील काही पात्रांची अनोखी अशी नावे मात्र आजही स्मरणात आहेत. अजब पोशाख असलेला भल्लूक मांत्रिक , जादूगार मँड्रेक अशा प्रकारची ती नांवे असत. विक्रम-वेताळ , पौराणिक गोष्टी अशा गोष्टी असत. त्यामुळे तत्कालीन बालांना अनेक पौराणिक पात्रे माहित झाली होती. खेळ तंत्रज्ञान , विज्ञान अशा विषयांचा सुद्धा अंतर्भाव या मासिकात असे. दुर्दैवाने आजच्या बालकांना आपल्याच पौराणिक गोष्टी व पौराणिक पात्रे माहित नाहीत. आज लहान मुलांकरीता चांदोबासारखी मासिके, पुस्तके आहेत की नाही काही ठावूक नाही. परंतू काही प्रकाशित होत असली तरीही अनेक भाषांतून प्रकाशित होणा-या चांदोबा या मासिकाची सर इतर मासिकांना नक्कीच नसेल. जगताला शीतल प्रकाश देणा-या चंद्राप्रमाणे बालकांना ज्ञानाचा प्रकाश देणा-या चांदोबा या लोकप्रिय , बालप्रिय अशा मासिकाचा प्रारंभ चंदामामा (अंबुलीमामा) या नावाने दक्षिण भारतात झाला ते वर्ष 1947 होते म्हणजे नव्या भारताच्या सुरुवातीलाच हे मासिक सुरु झाले. बी नागीरेड्डी आणि चक्रपाणी या जोडीने हे मासिक सुरु केले होते. सुरुवातीला तेलगु व तमिळ भाषेतून प्रकाशित होणारे हे मासिक इंग्रजीसह 13 भाषांत प्रकाशित होऊ लागले व वाचक संख्या 2 लाखाहून अधिक होती. “चांदोबा” मराठी भाषेत 1952 पासून येऊ लागले. अत्यंत मनमोहक , वाचनीय , लोकप्रिय , बालकप्रिय असे हे मासिक बदलते तंत्रज्ञान , वाचकांची बदलती अभिरुची , दिवसागणिक घटत जाणारी वाचक संख्या व वाचनप्रियता या सर्व कारणांमुळे या चांदोबा मासिकाचा खप चंद्रासारखा कले-कले ने घटू लागला. Geodesk या कंपनीने चांदोबाला डिजिटल स्वरूप देण्याचा प्रयत्न केला , पुढे त्यांच्यावर कोर्ट प्रकरणे झाली , डिस्ने कंपनी समभाग विकत घेणार होती, Geodesk ने 2007 मध्ये सर्व अंक पोर्टल वर देण्याचा प्रयत्न केला  परंतू वर्ष 2013 पासून अनेक अडथळे आले व 13 भाषांसाहित प्रकाशित होणारा , ज्ञान प्रकाश देणारा हा चंदामामा म्हणजेच मराठीतील चांदोबा वेबसाईट व App च्या माध्यमातून कसाबसा चमकत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. चांदोबा प्रेमी https://www.chandamama.in/main.php या संकेत स्थळावर चांदोबा वाचू शकतात. चांदोबाचे अॅॅप सुद्धा आहे परंतू ते चिनी आहे. लवकरच ज्यांच्याकडे चंदामामाचे हक्क आहे ते भारतीय अॅप उपलब्ध करणार आहेत. चांदोबा वाचण्यासाठी या सुविधा तूर्तास जरी असल्या तरी अनेक मोबाईल गेम्स , डिजिटल युग , मुलांच्या बदलत्या रुची या सर्वांमध्ये हा चांदोबा कसा टिकाव धरेल हा प्रश्नच आहे ?
    योगायोग असा की हा लेख लिहिल्यानंतर चांदोबाचे चित्रकार सि. के शिवशंकर यांचे 29 सप्टेंबर रोजी निधन झाल्याचे श्री श्याम पेठकर यांच्या 14/10/2020 च्या लेखामुळे कळले. त्यामुळे वरील लेख लेखनानंतर शिवशंकर यांना या लेखाव्दारे एकप्रकारची आदरांजलीच वाहिल्यासारखे वाटले.

०३/१०/२०२०

Condition of Arjun in Mahabharat War against his own relative and Parth Pawars tweets.

भ्रमरहित “पार्थ” 
कौरव पांडवांच्या युद्धात आपल्याच स्वजनांना शत्रू सैन्यात पाहून पार्थ म्हणजेच अर्जुन भगवंतास म्हणतो ,

“सीदन्ती मम गात्राणी मुखं च परिशुष्यति | वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||गांडीवं स्त्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते | न च शक्नोम्यव स्थातुं भ्रमतीव च मे मन: ||अर्थात
गळली मम गात्रे नि मुखही कोरडे पडे | कांपे शरीर हे माझे , रोमांच राहती उभे ||गळे गांडीव हातूनी , त्वचाही जळते अती | शक्य ना स्थिर राहणे , भ्रमते मनही माझे ||
भगवद्गीतेतील उपरोक्त श्लोकानुसार “समोर युद्धासाठी उभ्या ठाकलेल्या आपल्याच स्वजनांना पाहुन माझी गात्रे गळून गेली आहेत, तोंडाला कोरड पडली आहे , माझे शरीर कापत आहे , अंगावर काटे आले आहेत, माझा गांडीव धनुष्य हातातून पडत आहे , माझ्या अंगात ताप आला आहे मला आता स्थिर राहणे शक्य नाही आणि माझे मन भ्रमित झाले आहे” असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला. अशी महाभारतातील पार्थाची उर्फ अर्जुनाची अवस्था झाली होती.
सध्याच्या राजकारणातील पार्थाचे स्वकीय जरी शत्रू पक्षात नसले तरी त्याची अवस्था महाभारतातील पार्थाप्रमाणे झालेली नाही. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी “जय श्रीराम” म्हणून शुभेच्छा देणे , तदनंतर सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सिबीआय ने करावी अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना देणे, त्यावर आजोबांनी नातवाच्या मताला कवडीचीही किमंत नाही म्हणून तो अपरिपक्व असल्याचे भाष्य करणे. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सिबीआय कडे वर्ग झाल्यावर पुनश्च “सत्यमेव जयते “ असे ट्वीट करणे. अशी ट्वीटरच्या माध्यमातून शाब्दिक शस्त्रे हा आताचा पार्थ सोडत आहे. मराठा आरक्षणावरून काल पुन्हा त्याने आपल्या सत्तेत असलेल्या स्वकीयांना अडचणीत टाकणारा शाब्दिक हल्ला केला. मराठा आरक्षण प्रकरणी एका तरुणाने केलेल्या आत्महत्येवरून आपल्याच सरकार विरोधात “सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही” असा हा शाब्दिक वार होता. आपले पिता सरकार मध्ये असतांना व पितामह त्या सरकारचे जेष्ठ मार्गदर्शक असतांना आजचा हा अर्जुन असे शाब्दिक बाण सोडत आहे. या शाब्दिक बाणांनी त्याचे स्वकीय घायाळ होऊन गेले आहेत , वैतागून गेले आहेत. आजची मुले काही पण ट्वीट करतात , त्यांचे ट्वीट म्हणजे पक्षाची भूमिका नाही तो त्यांचा अधिकार आहे. असे स्पष्टीकरण पार्थ पित्याने दिले आहे. आजच्या या अर्जुनाची निश्चित भूमिका भविष्यात स्पष्ट होईलच. महाभारतातील पार्थाच्या मागे साक्षात भगवान श्रीकृष्ण होते आताच्या या पार्थाला कोणाचे मार्गदर्शन आहे हे तूर्तास समोर आलेले नाही. महाभारतातील तसेच पुराणातील कुणाचीही तुलना सद्यस्थितीतील व्यक्तींशी मुळीच होऊ शकत नाही. नामसाधर्म्य तेवढे काय ते असते. अटलजींच्या “कौरव कौन , पांडव कौन“ या कवितेप्रमाणे आताच्या काळात कौरव व पांडव यांच्यातील भेद ओळखणे मोठे कठीण झाले आहे. महाभारतातील पार्थाला आपल्याच स्वजनांवर वार करायची वेळ आल्यावर उपरोक्त श्लोकांप्रमाणे भ्रमित झाल्यासारखी अवस्था झाली होती. आताच्या पार्थची अवस्था मात्र तशी दिसत नाही, शाब्दिक वार करतांना त्याला काहीच संकोच वाटतांना दिसत नाही. त्याचे स्वजन हे त्याच्या शत्रू पक्षात नसूनही त्याला आपल्याच स्वजनांवर ट्वीटररुपी गांडीवव्दारे तीक्ष्ण शाब्दिक बाण सोडतांना महाभारतातील पार्थाप्रमाणे  भ्रमित अवस्थेत गेल्यासारखे सुद्धा दिसत नाही. आपल्याच स्वजनांनावर शाब्दिक हल्ले करणा-या या पार्थाची भविष्यातील वाटचाल निश्चितच वेगळी राहणार आहे.

२९/०९/२०२०

Singing Legend SP Balasubrahmanyam Passes Away. Article elaborate about him



पदुमनीलाचा अस्त 
रवा एस.पी.च्या दु:खद निधनाची वार्ता रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. तद्नंतर त्याने स्वत:च त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा शेअर केलेला व्हिडीओ पाहून आणखीनच खेद वाटला. दक्षिण भारतातून एस.पी. बालसुब्रह्मण्यम    जेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाला त्यावेळी आम्ही अगदीच शाळकरी होतो. परंतू त्या काळात एस.पी.चे “हे राजू , हे डॅडी “ हे बालगीत गाजले होते. बाल्यावस्थेत असल्याने बाप-लेकाचे ते बालगीत बाल मनाला भावून गेले होते. चित्रपटात राजूचे बाबा जितेंद्र या अभिनेत्यासाठी दिलेला तो मधुर आवाज कायमचा कानात बसला. तेंव्हा एस.पी चे नांव काही माहित नव्हते परंतू तो मधुर , प्रेमरस पूर्ण आवाज मात्र सहज ओळखू यायला लागला. पुढे किशोरवयात “तेरे मेरे बिचमे कैसा है ये बंधन” या गीतातील चित्रपटातील नायक कमल हसनला हिंदी येत नसल्याने “I dont know what you say“ या ओळी  व  एक दुजे के लिये मधील इतर गीते , “ये वक्त ना खो जाये“ , “ मौसम का तकाजा है” अशी प्रेमगीते ऐकल्यावर एस.पी.चा आवाज अधिकच भावला. सुरुवातीच्या काळात हिंदीत कमल हसन,
जितेंद्र यांच्यासाठी एस.पी.ने बरीच गीते गायली. दोघांनाही त्याचा आवाज चपखल बसला. मोहम्मद रफीच्या निधनानंतर रोमँटिक गाण्यासाठी एस.पी ला संगीतकार पसंती देवू लागले. एस.पी स्वत: रफीं चा प्रचंड चाहता होता. रफींप्रमाणेच तो उत्कृष्ट गायक व सज्जन व विनम्र होता. जितेंद्र श्रीदेवीच्या काळात मात्र एस.पी.ची गीते काही काळ कमी ऐकू आली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला “मैने प्यार किया” चित्रपटातील गाण्यातून “दिल दिवाना” ही साद देऊन एस.पी.ने पुनश्च रसिकांची माने जिंकली. “मेरे रंगमे रंगनेवाली“ अशा गीतांनंतर “आया है राजा” असे म्हणत गायकांचा राजा असलेल्या एस.पी.ची घोडदौड पुन्हा सुरु झाली.“सुन बेलीया, शुक्रिया,मेहरबानी “ , “साथिया तुने क्या किया” , ए . आर. रहमानने संगीतबद्ध केलेली मधुर गीते अशी एकापेक्षा एक सरस गीते गाणा-या एस.पी.च्या नावावर हिंदी , तमिळ , मल्याळी व इतर  १६ भाषांत गीते गाण्याचे अनेक विक्रम नोंदवल्या गेले. काही चित्रपटात सुद्धा तो दिसला आहे. परंतू एखाद्या व्यक्तीच्या यशाचे मोजमाप हे काही निव्वळ आकडेवारीवर केले जाऊ नये तर ते त्याच्या सामाजिक जाणीव, त्याची वागणूक, त्याची कार्ये यावर सुद्धा केले गेले पाहिजे. एस.पी.या बाबतीत सुद्धा अग्रेसर होता. मनुष्य हा कितीही मोठा का होईना जमिनीशी जुळलेला असावा, अध्यात्माशी आपल्या धर्माप्रती व धार्मिक रितीरिवाज , परंपरा, संस्कृती , दानशूरता यांच्याप्रती आदर बाळगणारा, उगीचच आधुनिकता न दाखवणारा असावा. एस.पी. आपल्या हिंदू धर्माविषयी असाच जागरूक व  आदर बाळगणारा , धर्माच्या परंपरा पाळणारा होता. दाक्षिणात्य हे तसेही धर्मनिष्ठ व परंपरा पाळणारे, मातृभाषेवर प्रेम करणारे असल्याने ते संस्कार एस.पी. मध्ये रुजलेले होते. चांगले वाईट लोक सर्वच क्षेत्रात असतात परंतू चित्रपटसृष्टीत काय-काय होते आहे हे आपण पाहतच आहोत. अंमली पदार्थ विषय सध्या ऐरणीवर आहे. यापूर्वीही  #MeToo सारखे विषय चर्चिल्या गेले आहेत. परंतू असे असले तरी अनेक चांगले सामजिक भान असलेले कलावंत सुद्धा याच चित्रपटसृष्टीने दिले आहेत. एस.पी.त्यातलाच एक होता. एस.पी.च्या निधनानंतर त्याने पूर्वीच केलेल्या कार्याबाबतचे एक वृत्त झळकले. आपले नेल्लोर येथील वडिलोपार्जीत घर कांची मठाला वेद पाठशाळेसाठी त्याने दान केले. नवीन पिढीला हे शिकण्यासारखे आहे. गायन क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणारा , पद्मश्री , पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त, अनेक कलावंतांना एस.पी.ने आपल्या आवाजाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचवले यात शिकार करणा-या , मद्यपान करून आपल्या गाडीखाली पदपथावरील गरीबांना चिरडणा-या बाष्कळ विनोद व सुमार अभिनय असलेल्या अभिनेत्याचा सुद्धा समावेश आहे.नुकतेच एस.पी. ने रजनीकांतसाठी एक गीत गायले होते , आपली प्रकृती चांगली असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता आणि अचानक तो गेला. त्याच्या मधुर गीतांनी त्याने करोडो रसिकांना मंत्रमुग्ध केले म्हणूनच त्याला पदुमनीला अर्थात गाणी गुणगुणणारा चंद्र अशी उपाधी त्याला लोकांनी प्रेमाने दिली  होती. हा गाणी गुणगुणणारा चंद्र आता लयाला गेला आहे परंतू आपल्या गाण्यांनी हा चंद्र रसिकांच्या मनात मात्र पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कायम प्रकाशमान राहील.