Click "Follow" Button below To Follow this Blog

२९/०४/२०२१

Memories of a tea stall , where owner was called as Tailor.

 टेलरचा चहा

संग्रहित चित्र 

कॉलेज मध्ये जाता-येता आम्ही कित्येकदा याच हॉटेलवर कचोरी, चहा घेण्यासाठी म्हणून थांबत असू. खुप गप्पा व धमाल होत असे. यात हॉटेल मालकाचा सुद्धा सहभाग असे. हळू-हळू मालकाशी परिचय वाढत गेला. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. कधी काळी त्यांनी आयोजित भोजन कार्यक्रमात सुद्धा जाणे झाले. कॉलेज जीवनातील हा आमचा कट्टा होता.

     सध्या जगभर कोरोना महामारी आहे. वाहिन्यांचे सततचे नकारात्मक बातम्यांचे प्रक्षेपण करणे, राजकारण्यांचे भीषण परिस्थितीतही चालले असलेले राजकारण या सर्वांमुळे मानसिक स्थिती ढासळते आहे. मनाला जर चांगले खाद्य मिळाले तर त्याने सुद्धा प्रसन्न चित्तवृत्ती होऊन आपण संकटांचा सामना करण्यास सिद्ध होतो. दिवसातील कितीतरी वेळ नकारात्मक बातम्यांचेच चिंतन आपसूकच होत असते. आज गुरुवार लेख लिहिण्याचा दिवस. मनात वरील सर्व बाबी होत्याच तेवढ्यात सौ ने चहा आणला. चहाच्या घोटा सोबत शून्यात पाहत काय लिहावे असा विचार सुरु होता. चहाचा कप हातातच होता चहाची वाफ माझ्या चष्म्यावर आली , काहीही दिसले नाही. कुण्यातरी प्रथितयश अशा व्यक्तीने सुध्दा मित्रांसोबत टपरीवर चहा घेण्यात जी मजा आहे त्याची सर इतर कुठे चहा घेण्यात नाही असे वक्तव्य केल्याचे मला स्मरण झाले आणि तो क्षण मला गतकाळातील मित्रांसह घेत असलेल्या चहाच्या आठवणीत घेऊन गेला. होय त्याच टेलरच्या चहाच्या आठवणीत.  

गो से महाविद्यालय खामगांव येथे नुकताच प्रवेश घेतला होता. त्याच काळात नांदुरा रोड जवळील बी एस एन एल च्या कार्यालया जवळ एक चहाची टपरी सुरु झाली होती. कॉलेज जीवनात चहा म्हणजे सर्वात लोकप्रिय पेय. सहज म्हणून एक दिवस आम्ही या दुकानात चहासाठी म्हणून थांबलो. चहा चांगला होता. तेंव्हा हे हॉटेल थोडे खड्ड्यात होते. आता रस्ता रुंदीकरणामुळे ते रस्त्यास समतल असे आहे. “राजेंद्र मुखशुद्धी कॉर्नर” असे नांव होते. चहा चांगला वाटला. मग कॉलेज मध्ये जाता-येता आम्ही कित्येकदा याच हॉटेलवर कचोरी, चहा घेण्यासाठी म्हणून थांबत असू. खुप गप्पा व धमाल होत असे. यात हॉटेल मालकाचा सुद्धा सहभाग असे. हळू-हळू मालकाशी परिचय वाढत गेला. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. कधी काळी त्यांनी आयोजित भोजन कार्यक्रमात सुद्धा जाणे झाले. एक दिवस या हॉटेल मालकाला कुणीतरी टेलर म्हणून संबोधल्याचे ऐकले. टेलर संबोधन कशामुळे होते , का होते या भानगडीत आम्ही काही पडलो नाही व आजही ते माहित नाही. पण मग आम्ही सुद्धा त्यांना टेलरच म्हणू लागलो. दुकान चहा, नाश्त्याचे पण मालक टेलर असे ते अजब समीकरण होते ते. कॉलेज जीवनातील हा आमचा कट्टा होता. काही विद्यार्थी तर असे होते की त्यांचे सापडण्याचे ठिकाण म्हणजे ही टपरी होती. ते सदा न कदा इथेच दिसत. इथे तास न तास ते का बसत याची कारणे सुद्धा निराळीच होती. हे हॉटेल कॉलेजच्या हमरस्त्यावर असल्याने येणारे जाणारे सर्वच विद्यार्थी येथून दिसत असत. त्यामुळेच मग “किसी की एक झलक पानेके लिये" हे तास न तास बसतात असे त्यांच्याच कंपूतील एकाने सांगितले होते. याच काळात या टेलरच्या चहाची एक गंमत सुद्धा आठवते. तेंव्हा विवेक नावाच्या माझ्या मित्राकडे आम्ही गटाने अभ्यास करीत असू. एक दिवस अभ्यास झाल्यावर संध्याकाळी चहा पिण्यास जाण्याचे ठरले तेंव्हा “आजी कोणी आले तर आम्ही टेलर कडे गेलो म्हणून सांग” विवेक म्हणाला व आम्ही रवाना झालो. एक मित्र विवेक कडे गेला “आजी कुठे गेले सर्व ?” मित्र , “अरे ते सर्व शिंप्याकडे गेले” आजी उत्तरल्या. हा मित्र एक क्षण गोंधळला. एक तर या विवेकचे घर म्हणजे तेंव्हा गावाबाहेर होते आता कोणत्या शिंप्याकडे गेले सर्व असा प्रश्न त्याला पडला. पण दुस-याच क्षणी त्याची “दिमाग की बत्ती जल गयी” व त्याने आम्हाला बरोबर शिंपी अर्थात टेलरच्या टपरीवर येऊन गाठले होते. त्यानी आम्हाला हा किस्सा सांगितल्यावर एकच हशा पिकला होता.           

   आज खामगांवात चहाची अनेक दुकाने उघडली आहेत. आकर्षक , सजावट , अंतर्गत रचना state of the art असा लुक असलेली. पण टपरीवरचा चहा तो टपरीवरचा चहा हे अनेकांना पटते. याचे कारण कुणास ठाऊक काय आहे ? तो चहा काही स्वस्त असतो असेही नाही पण मनसोक्त बसता येते, नैसर्गिक वातावरण असते, आपुलकीने विचारणा होते ही कदाचित टपरीच्या चहाच्या पसंतीची कारणे असतील. कालांतराने सर्व मित्र आपआपल्या प्रपंचात व्यस्त झाले , इतस्तत: विखुरले , टेलरच्या टपरीवर जाणे आपोआप कमी झाले पण आजही खामगांव सोडून गेलेले मित्र खामगांवला येतात, येण्याआधी किंवा आल्यावर फोन करतात. भेटण्याचे ठिकाण मात्र तेच पुर्वीचे असते. ते म्हणजे टेलरचे चहाचे दुकान मग चहाच्या घोटासोबत अनेक आठवणी व गप्पांचे घोट सुद्धा रिचवले जातात. या गप्पांमध्ये टेलर सुद्धा सामील होतात.

सद्यस्थितीत तर आपल्या सर्वांनी घरीच राहणे हाच एक चांगला उपाय आहे. कोरोना विषाणू मुळे आज जरी पुर्वीसारखे मोकळेपणे कुठे जाता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही तरी आज जर काळजी घेतली तर आपला आगामी काळ सुखाचा होणार आहे व नंतर चहा पित बसलेल्या मित्रांच्या गप्पा , दडपण रहित फुललेल्या बाजारपेठा असे चित्र दिसू लागेल. 

२४/०४/२०२१

Why closed Municipal Highschool can't be used as hospital in corona pandemic , article about this

 म्युनसिपल हायस्कुलचा रुग्णालय म्हणून उपयोग व्हावा. 

सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी मोठी लाट आली आहे , रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता आहे. रुग्णालये अपुरी पडत आहेत त्यामुळे कोरोना संबंधित उपचारासाठी या जागेचा चांगला उपयोग करता येईल. 

    मुन्सिपल हायस्कूल अर्थात नगर परीषदेची शाळा. आम्ही शालेय जीवनात असतांना या शाळेचे नांव इंदिरा गांधी मुन्सिपल हायस्कूल असे बदलण्यात आले होते. खामगांव नगर परीषदेची स्थापना ही 1869 या वर्षातील म्हणजेच काही वर्षानंतर या शाळेची स्थापना झाली असेल. आता एक-दोन वर्षापुर्वी पर्यंत ही शाळा सुरु होती. आता ती पटसंख्ये अभावी बंद पडली. शाळा , शाळेचे स्वरूप , शिक्षण यात बदल करायचा असतो नांव बदलून काय होणार ? परंतू ज्यात बदल करायचा ते सोडून आपल्या देशात भलतेच बदल केले जातात. बदलत्या काळात मुन्सिपल शाळा काही बदलली नाही. हळू-हळू विद्यार्थी संख्या घटत जाऊन ती बंद पडली. 
         एकदा मी या शाळेच्या मैदानात फिरायला गेलो असता इंग्रजकालीन ती कौलारू इमारत सुद्धा खिन्न उभी असल्यासारखी वाटत होती. मोडलेले दरवाजे, खिडक्या असलेले वर्ग ब-याच दिवसांपासून विद्यार्थ्यांचा कोलाहल न ऐकल्याने आपल्या भकास स्वरूपाने त्रस्त भासत होते. सर्वत्र धुळ, पक्षांची विष्ठा व पिसे, असे घाणीचे साम्राज्य असलेल्या ज्या वर्ग खोल्यात येथील विद्यार्थी कधी-काळी नमस्कार करून प्रवेश करीत असतील त्या विद्येच्या मंदिराचे हे असे स्वरूप मी पाहत होतो.एकेकाळच्या खामगांव शहरातील या दिमाखदार ईमारतीची आज ही अशी अवस्था झालेली आहे. प्रशासनाने येथे सेमी इंग्रजी शाळा का काढू नये ? येथे इस्पीतळ किंवा सरकारी रुग्णालयाचा एखादा विभाग सुद्धा बनवता येईल, सरकारी रुग्णालय येथून जवळच आहे.  सध्या कोरोना संक्रमण दुसरी मोठी लाट आली आहे , रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता आहे. रुग्णालये अपुरी पडत आहेत त्यामुळे कोरोना संबंधित उपचारासाठी या जागेचा चांगला उपयोग करता येऊ शकणार नाही का ?
     सरकारी मालमत्ता या सुरक्षित का राखल्या जात नाही ? प्रशासनाच्या असे काही विचाराधीन आहे की नाही ? कदाचित असेलही , नसल्यास कुणीतरी चांगला अधिकारी असा विचार करेल का? त्याला राजकारणी साथ देतील का ? की पुर्वाश्रमीची ग्रामीण भागातील , आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना समावून घेणारी व त्या विद्यार्थ्यांना घडवणारी ही मुन्सिपल हायस्कूल आता अशीच राहील का ? ती अजून खचत जाऊन केवळ भग्नावशेष शिल्लक राहतील का , स्टेडीयम स्वरूपासारखी बनवलेली भिंत तर आताच खचली आहे. असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते.
      आज कोरोना पिडित रुग्ण , त्यांचे नातेवाईक यांची हालत त्यांची मनस्थिती पाहून मन हेलावले आहे, शोकग्रस्त झाले आहे , या रुग्णांवर आलेल्या अवस्थेची कल्पना आपण करू शकत नाही तेंव्हा मायबाप सरकारने या शाळेचा या महामारीच्या संकटात रुग्णसेवे करिता उपयोग करून घेतला तर अनेक रुग्णांची सोय , गरिबांची सोय होऊ शकेल व पैस्यात तोलता येणार नाही असे त्या रुग्णांचे आशीर्वाद मिळतील.

२२/०४/२०२१

Article about the incident of 24 Covid Patients Death by Disrupting Oxygen Supply due to Tank Leakage

तडफडून मरणारे जीव आणि नाकर्ते शासन  




  सरकार कार्यक्षम असल्याचे चित्र जनतेला दिसणे अपेक्षित आहे परंतू याच्या अगदी उलट चित्र आहे लोक तडफडून मरत आहेत , महामारीच्या काळातही भ्रष्टाचार व काळाबाजार अशी प्रकरणे घडत आहेत. सरकार जरी कसे-बसे टिकून असल्याचे दिसत असले तरी मंत्री सहकारी पक्षातील आमदार हे आपल्याच पक्षातील नेत्यांची, मंत्र्यांची वक्त्यव्ये खोडत असतांना दिसत आहे त्यांना घरचा आहेर देतांना दिसत आहे. वरवर जरी सरकार दिसत असले तरी भ्रष्टाचार , काळाबाजार , तडफडून मरणारे जीव जातांना पाहून हे शासन नाकर्ते असल्याचे जनतेला स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात हे काय सुरु आहे.जगभरात कोरोना महामारी सुरु आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात  सुद्धा  कोरोनाच्या दुस-या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णालये भरली आहेत , औषधांचा मोठा तुटवडा व काळाबाजार सुरु आहे. सत्ताधारी व विरोधक हमरीतुमरी वर येऊन भांडत आहेत. बोगस कोरोना रुग्णालये , बोगस डॉक्टर गल्ले भरून घेत आहेत. लॉकडाऊन , लॉकडाऊन करता करता मुख्यमंत्री लाइव्ह येण्याची हौस भागवून घेतात व लॉकडाऊन साठी दोन-दोन दिवसांची मुदत वाढवून घेतली. नेत्यांच्या घरी जाऊन लस टोचली जात आहे तर काही नेत्यांचे नातेवाईक वयाच्या मर्यादेचे बंधन तोडून लस घेत असल्याची वृत्ते येत आहे. जनता कोरोनाच्या , मृत्यूच्या सावटाखाली वावरत असतांना नेते मात्र स्वत:च्या पात्रात बरोबर तूप ओढून घेत आहे. दिशा सालीयानी , सुशांत सिंग यांची हत्या की आत्महत्या , रक्षकच भक्षक होत चालले असल्याचे शंभर कोटींची वसुलीचे प्रकरण , भंडारा अग्नितांडव , सरनाईक इडी चौकशी , संजय राऊत यांच्या पत्नीची इडी चौकशी अशा घटनांवर हळू-हळू पडदा पडत आहे किंवा योजनाबद्धरित्या पडदा टाकल्या जात आहे . या सर्व प्रकरणात मौन साधून उद्धव ठाकरे यांनी मौन साधण्यात मनमोहनसिंग यांचा विक्रम मोडला आहे. यातच काल नाशिक येथे झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू गळतीची घटना होऊन योग्य दाबाने प्राणवायू न मिळाल्याने 20 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिकची ही घटना सरकारची व सरकारी यंत्रणांची नाचक्की करणारी घटना आहे. कोरोना रुग्णांसाठी तत्परतेने सोयी उभारण्याचा प्रत्यन केला जात आहे ते योग्य सुद्धा आहे. परंतू तत्परतेने ही कामे करतांना त्या कामाची गुणवत्ता तपासली जात आहे की नाही ? त्यात कुठे पाणी मुरते आहे का ? साधनांची गुणवत्ता चांगली आहे का ? साधने पुरवणारे कंत्राटदार , जोडणी करणारा कंत्राटदार योग्य पद्धतीने कामे करीत आहेत की नाही ? की नजराणे मिळाल्यावर काहीही तपासले जात नाही व कशी तरी कामे उरकली जात आहे ? नाशिक येथील घटनेबाबत मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांनी शोक प्रकट केला आहे. परंतू आधी भंडारा , आता नाशिक आणखी असे किती घटनांवर शोक व्यक्त करणार आहे सरकार ? मुख्यमंत्री महोदय आपले सरकार केवळ शोकच व्यक्त करणार की रुग्णालयात आग , प्राणवायू गळती सारखी कालची घटना या घटनांना जबाबदार कोण आहे याची शहनिशा करून त्यांना कठोरात-कठोर शासन सुद्धा करणार ? भंडारा रुग्णालयातील अग्नि तांडवास जबाबदार कोण ? त्याची चौकशी कुठपर्यंत आली हे काहीही अद्याप पुढे आलेले नाही ? नाशिक येथील घटनेबाबत नाशिक महापालिका व सरकार अशी दोघांनीही मदत जाहीर केली आहे. ते योग्यच आहे. परंतू गेलेले जीव परत येतील का ? मृतकांच्या आप्तांची न भरून निघणारी हानी तुमच्या आर्थिक मदतीने कदापीही भरून निघणार नाही. महाराष्ट्रात योग्य उपचारा अभावी अनेक कोरोना मृत्यू झाले आहेत , भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात बालकांवर अकारण मृत्यू ओढावल्या गेला होता. काल नाशिक येथे सुद्धा प्राणवायू गळतीमुळे अनेक परीवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कित्येक कोरोना रुग्णांचा  रुग्णालयात सोयी नसल्याने , प्राणवायू उपलब्ध नसल्याने , रेमडीसिवीर सारख्या इंजेक्शनचा व इतर औषधांचा काळाबाजार होत असल्याने झालेल्या अनुपलब्धत्यामुळे सुद्धा मृत्यू होत आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक आत्महत्या सुद्धा होत आहेत. या आत्महत्येची कारणे सुद्धा कोरोना मुळे रोजगार , आर्थिक चणचण , मानसिक तणाव हे असण्याची दाट शक्यता आहे. या काळात खरे तर शासन गरीब जनतेला दिलास देत आहे , धीर देत आहे, केवळ बोलघेवडेपणा न करता योग्य ते निर्णय झटपट निर्णय घेऊन कार्यक्षम असल्याचे चित्र दिसणे अपेक्षित आहे परंतू याच्या अगदी उलट चित्र आहे लोक तडफडून मरत आहेत , महामारीच्या काळातही भ्रष्टाचार व काळाबाजार अशी प्रकरणे घडत आहेत. सरकार जरी कसे-बसे टिकून असल्याचे दिसत असले तरी मंत्री सहकारी पक्षातील आमदार हे आपल्याच पक्षातील नेत्याची, मंत्र्यांची वक्त्यव्ये खोडत असतांना दिसत आहे त्यांना घरचा आहेर देतांना दिसत आहे.. वरवर जरी सरकार दिसत असले तरी भ्रष्टाचार , काळाबाजार , तडफडून मरणारे जीव जातांना पाहून हे  शासन नाकर्ते असल्याचे जनतेला स्पष्ट झाले आहे.  

२०/०४/२०२१

Article about hatred speeches of leaders rather working in filed in this corona pandemic

 ...त्यापेक्षा गरीबाच्या तोंडात घास भरा


एखादा कोरोना बाधित होईल असे काही त्याच्या तोंडात भरण्यापेक्षा या कोरोना विषाणू महामारीच्या कठीण समयी जे दुर्बल आहेत, गरीबीने त्रस्त आहेत अशांच्या तोंडात घास भरा. त्याने तुम्हाला जनतेचा आशीर्वाद तर मिळेलच शिवाय ज्या लोकप्रियतेसाठी तुम्ही प्रयत्नशील असता तशी लोकप्रियता सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. 

     आपल्या देशातील नेते हे काय बोलतील याचा काही नेम नसतो. याबाबत कित्येकदा लिहून झाले आहे तरीही वारंवार लिहावेच लागते. रेमडीसीवीर , त्याचा काळाबाजार यावरून सत्ताधारी व विरोधक यांचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात सुद्धा अतिशय हीन असे वक्तव्य करण्यात आले. त्यावरून पुन्हा खडाजंगी सुरु झाली. “मुंहमे आया बक दिया” याप्रमाणे तोंडात येईल ते बोलून द्यायचे , नंतर सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा , कार्यकर्त्यांना भडकवून द्यायचे , त्यांच्यात भांडणे लावून द्यायची , आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी जनतेचे लक्ष भलतीकडे वळवून द्यायचे. हे असे यांचे उपद्व्याप असतात. जनतेला उपदेशाचे डोस पाजणारे , युं करू त्यूं करू अशी पोकळ आश्वासने देणारे हे नेते काहीही विधायक कृती न करता , विकासाभिमुख कार्य धीम्या गतीने करत प्रक्षोभक , दर्जाहीन अशी वक्तव्ये करून कार्यकर्त्यांच्या पुढे आपण किती थेट बोलणारे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या कोरोनाचे भीषण संकट आहे. या संकटात खरे तर शत्रूला सुद्धा कोरोना होऊ नये अशी सर्वांची मानसिकता झाली आहे तेंव्हा एखादा कोरोना बाधित व्हावा असे चिंतणा-या व्यक्तीची मानसिकता किती भयंकर असेल याची कल्पना येते. तसे पाहिले तर या कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात सर्वच पक्षांनी एकत्र येऊन जनतेला धीर देणे आवश्यक आहे , जनतेसाठी त्यांच्या सुविधेसाठी झटणे आवश्यक आहे. ते राहिले बाजूला आणि हे आपआपसातच लढत आहेत. जनता आधीच त्रस्त झाली आहे , व्यापा-यांची दुकाने बंद असतात , उद्योगधंदे ठप्प आहेत , अनेकांचा रोजगार गेला आहे , गरीबांवर उपासमारीची वेळ आहे. गत एक वर्षापासून जनता घरीच असल्याने मानसिक स्थिती सुद्धा ढासळत चालली आहे. या सर्वांकडे लक्ष देण्याऐवजी नेत्यांना मात्र आपसात लढणे सुचत आहे. तसेच हे दुस-या पक्षाच्या जेष्ठ नेत्याला कोरोना बाधित करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. या कठीण काळात अनेक संस्था , NGO हे जनतेच्या मदतीला धाऊन गेले आहेत. नेते मात्र जनतेच्या मदतीला धाऊन जात असल्याचे अभावानेच दिसते आहे. जनतेला बेड मिळत नाही , ऑक्सिजनचा तुटवडा आहे , रेमडीसीवीर सारख्या कोरोनांच्या औषधांचा तुटवडा आहे , काळाबाजार होत आहे , रुग्णांची व त्यांच्या रुग्णाच्या आप्तांची काय अवस्था आहे हे तेच जाणतात. या अशा परिस्थितीत खरे तर जाणत्या नेत्यांना नसेल काही मदत जमत तर निदान जनतेला धीर वाटेल अशी कृती करणे , अशी वक्तव्ये करणे अपेक्षित आहे परंतू यांचे सर्व लक्ष मात्र या भीषण परिस्थितीतूनही राजकारण कसे करता येईल याकडे लागलेले आहे. अनेक नेते थोर पुरुष , संत यांचे दाखले भाषणप्रसंगी देत असतात, त्यांच्या नावांनी भवने उभारत असतात. “शब्द बराबर धन नही” म्हणणारे संत कबीर , “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” असे म्हणणारे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी जी चांगले बोलण्याची, चांगले शब्द वापरण्याची शिकवण दिली आहे ती मात्र हे नेते अंगिकारत नाही. या कोरोना आपत्तीच्या काळात नेत्यांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्धच्या लढाईत अग्रेसर होणे गरजेचे आहे , जनतेला आधार देण्याची गरज आहे ते न करता निव्वळ “उचलली जीभ अन लावली टाळूला “ याप्रकारची वक्तव्ये देशभरातून नेते करतांना दिसत आहे. संत गाडगेबाबांनी “भुकेलेल्याला अन्न द्या” अशी जी शिकवण महाराष्ट्रवासियांना दिली आहे त्या शिकवणीला स्मरून , ही अशी वक्तव्ये टाळून एखादा कोरोना बाधित होईल असे काही त्याच्या तोंडात भरण्यापेक्षा या कोरोना विषाणू महामारीच्या कठीण समयी जे दुर्बल आहेत, गरीबीने त्रस्त आहेत अशांच्या तोंडात घास भरा. त्याने तुम्हाला जनतेचा आशीर्वाद तर मिळेलच शिवाय ज्या लोकप्रियतेसाठी तुम्ही प्रयत्नशील असता तशी लोकप्रियता सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. 

१७/०४/२०२१

Article on the sad demise of Pro Sumant Tekade a renown orator , public and motivational speaker

 प्रा सुमंत टेकाडे:- एका शिवदीपस्तंभाचे जाणे

भरकटलेल्या जहाजांना जसे दीपस्तंभ किना-याची दिशा दर्शवितो तसे आपल्या लेखणी व वाणीतून तरुणांना व समाजाला शिवाजी महाराजांचे गुण त्यांचा प्रेरणादायी असा इतिहास सांगून दिशा दाखवणा-या प्रा सुमंत टेकाडे या शिवदीपस्तंभास ही शब्द सुमनांची श्रद्धांजली.

आज सकाळी प्रा सुमंत टेकाडे निवर्तल्याची तीव्र क्लेशदायक अशी बातमी समाज माध्यमाव्दारे कळली. वर्ष 2019 मध्ये खामगांव येथील टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सवा निमित्त सुमंतजी टेकाडे हे खामगांव येथे व्याख्यान देण्यास आले होते. टेकाडे यांची दर रविवारी तरुण भारत पुरवणीत प्रकाशित होणारी शिवदीपस्तंभ ही शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दलची लेख मालिका त्यावेळी वाचत होतो. त्यामुळे सुमंतजी यांच्या व्याख्यानाला जायचेच असे ठरवले होते व गेलो होतो. काय आवेशपुर्ण व्याख्यान होते ते. त्या वक्तादशसहस्त्रेशु अशा सुमंतजीनी श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले होते. प्रत्येक व्याख्यानानंतर ते शिवाजी महाराजांचा जयघोष करीत असत, शिवाजी महाराज दरबारात येतांना त्यावेळी जी मानवंदना दिल्या जात असत ती सुद्धा जशीच्या तशी अशी ते आवेशात देत असत. आजही त्यांची अनेक व्याख्याने त्यांच्या youtube चॅनलवर आहेत. अनेक तरुणांचा त्यांच्या या चॅनलला उदंड प्रतिसाद आहे. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना मोठा आघात पोहोचला आहे. त्यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या अनेक स्मृती तरळून गेल्या. खामगांव येथील व्याख्यानानंतर मी त्यांचेशी जुजबी असे संभाषण केले होते. त्यांनी अत्यंत मधुरभाषेत व विनम्रपणे सर्वांशी संवाद साधला होता. पुढे त्यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संवाद साधला होता. त्यांच्या व्याख्यानाबद्दल “कर्णतृप्त करणारे व्याख्यान” असा लेख लिहिला होता. तो त्यांनी वाचल्यावर आनंदाने मला आभार प्रकट करणारी प्रतिक्रिया पाठवली होती. व्याख्यानातील मुद्दे लेखात वाचल्यावर त्यांना खुप चांगले वाटल्याचे त्यांनी कळवले होते. मग त्यांचेशी अनेकदा संवाद होत गेला. कवि भूषण बद्दल त्यांनी लिहिलेल्या लेखावर मी पुनश्च लिहिल्यावर ते सुद्धा त्यांना आवडल्याचे त्यांनी कळवले होते. “राष्ट्रीय विचारावर लिहित रहा” असा सल्ला त्यांनी दिला होता. गत वर्षी त्यांनी “कोरोना विरुद्ध हर हर महादेव” अशी एक चित्रफित सुद्धा प्रसारित केली होती. तरुण भारत मध्ये आलेला माझा “भ्रमरहित पार्थ” हा लेख सुमंतजी यांनी पेपर प्रकाशित झाल्यावर रात्रीच मला पाठवला होता. नुकताच प्रभू श्रीराम विशेषांक “रामार्पण” यात सुद्धा माझा लेख आल्याचे त्यांनीच अंकाच्या अनुक्रमणिकेचे पान पाठवून मला सर्वप्रथम कळवले होते. अभ्यासू , व्यासंगी , चतुरस्त्र असे ते होते. अल्प अशा परिचया नंतर पुढे सुमंतजी व माझा संपर्क दृढ झाला होता. त्यांचे येणारे व्हिडीओ , कार्यक्रम यांची माहिती ते आवर्जून कळवत असत. एकदा त्यांच्या एका ऑनलाईन कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. प्रश्नोत्तराच्या वेळी माझा व्हिडीओ बंद होता पण मी प्रश्न विचारणे सुरु करताच “विनयजी बोला” असा त्वरीत प्रतिसाद त्यांनी मला दिला होता. एवढे मोठे वक्ते , लेखक , शिवचरित्राचे गाढे अभ्यासक , मोटीव्हेशनल स्पिकर असूनही ते तितकेच विनम्र होते. आता काही दिवसांपूर्वी मला शिवाजी महाराज यांच्या मुस्लिम अधिका-यांची भली मोठी नांंवे असलेला एक संदेश आला असता मी मार्गदर्शन म्हणून सुमंतजींना विचारले होते. त्यावर शिवाजी महाराज यांच्या एकूण 95 अधिका-यांमध्ये केवळ 2 मुस्लिम असल्याचे त्यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे सांगतिले होते. शिवाजी महाराजांचे वास्तववादी चित्रण ते आपल्या व्याख्यानातून करीत असत ,  शिवाजीराजांच्या ज्या गोष्टींचे पुरावे उपलब्ध आहेत त्याच बाबींचा उल्लेख ते आपल्या व्याख्यानातून करीत असत. काळाने असा वक्त्तादशसहस्त्रेशु हिरावून नेल्यामुळे प्रचंड अशी सामाजिक हानी झाली आहे. त्यांची अमोघ वाणी अनुभवाला आली , त्यांनी केलेले लेखन वाचनात आले हे त्यांच्या तमाम चाहत्यांचे भाग्य आहे.  हे काही जाण्याचे वय नव्हते. आज सुमंतजी जरी देह त्यागून गेले असले तरी त्यांच्या अनेक दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमाने ते आपल्यातच आहेत. तरीही त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांची व त्यांच्यावर प्रेम करणा-या अनेकांची न भरून निघणारी अशी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो. भरकटलेल्या जहाजांना जसे दीपस्तंभ किना-याची दिशा दर्शवितो तसे आपल्या लेखणी व वाणीतून तरुणांना व समाजाला शिवाजी महाराजांचे गुण व त्यांंचा प्रेरणादायी असा इतिहास सांगून दिशा दाखवणा-या प्रा सुमंत टेकाडे या शिवदीपस्तंभास ही शब्द सुमनांची श्रद्धांजली.